Thursday 31 December 2015

धन्यवाद 2015 सुस्वागतम 2016

नमस्कार मित्रांनो 🙏
मी आपला मित्र बी. एस. धुमाळ सरत्या वर्षाला सीऑफ व नव्या वर्षाला हाय हॅलो वेलकम करताना नेहमी प्रमाणे अकारण अशांत आहे. नित्यनेमाने नवा दिवस उजाडत असताना दिवसामागून दिवस ढळतही आहेत. नव्या सकाळचे स्वागत करत असताना  आयुष्याच्या कोठ्यातील किती दिवस संपले? ? याचे अनामिक दुःख प्रत्येकालाच वाटत असते. मी म्हणेन दुःख करू नये पण याची जाणीव असावी की किती संपले व साधारणपणे किती शिल्लक आहेत. हा हिशेब असला म्हणजे स्वप्नांची गोळाबेरीज करता येईल. शेवटी स्वप्ने ती स्वप्नेच! ती सर्वच पुर्ण कधीच होत नाहीत पण त्यांच्या शिवाय जीवनात मजा नाही.  जीवनातून स्वप्ने वजा केली की उरते ती केवळ झोप!
शुभेच्छा दिल्याने चांगला व न दिल्याने वाईट दिवस उगवत नाही. प्रत्येकाला आपल्या कामाचे फळ मिळत असते.
पण आपल्या चांगल्या दिवसांची अपेक्षा करणारे व त्यासाठी शुभेच्छा देणारे कोणी असेल तर बळ वाढते व जोमाने प्रयत्न वाढतात.  त्यासाठी हा शुभेच्छा प्रपंच असतो. पण हे ही लक्षात घ्यायला हवे की मागील वर्षीही शुभेच्छा दिल्याच होत्या ना कोणीतरी? ?? मग सर्व चांगलेच झाले का? ? तर नक्कीच नाही!  पण उदास व्हायचे नाही , मानले तर सुख असते.  शेवटी दुःखासोबत माणसाचे निरंतर नाते असते. सुख पाहता जवापाडे,  दुःख पर्वताएवढे.  अर्थात ते असावे देखील कारण अंधारच नसेल तर प्रकाश किरणांचे मोल तरी कसे उमजेल?  पण सुफळ पदरी पडावे यासाठी सुमार्ग, सुसंगती व सदाचरणासह अखंड कष्ट आवश्यक असते.
नवीन वर्षाचे स्वागत करत असताना सरत्या वर्षांतील चांगले व वाईट दोन्हीही अनुभव कामी येणार आहेत.  चांगल्यातून आत्मविश्वास आणि प्रेरणा व वाईटातून धडा घेतला तर नवीन वर्ष नक्की आनंदाचे व  सुखासमाधानाचे जाईल. अनेक प्रियजन आपल्यातून गेले. कोणाच्या जाण्याने जरी जीवन थांबत वा संपत नसले तरी त्यांची कमतरता मात्र प्रकर्षाने जाणवत असते. हे मन असल्याचे लक्षण  सर्वात दिसायला हवे. गेलेल्यांच्या पवित्र स्मृती स्मरणात ठेवून त्यांना आदर्श मानून  जीवन प्रवास करत राहणे हेच शहाण्याचे लक्षण. .
शेवटी माझ्या सर्व भावकियांना, पाहूण्यांना, सहका-यांना, शेजा-यांना,  मित्रांना, शत्रूंना, सर्व परिचितांना व अपरिचितांना हे नवे वर्ष चांगले जावो. चांगले म्हणजे,  जेथे आरोग्य, स्वच्छता, शांतता, आपलेपणा, प्रेम, माया, दया, करूणा, मोठेपणा, क्षमा , नैतिकता, प्रमाणिकता आहे असे. प्रगती, प्रतिष्ठा,  समाधान, आनंद आहे असे वर्ष आपणास जावो ही प्रार्थना. पण....
समजा नसेलच जाणार तर?? तर येणाऱ्या सर्व संकटांशी दोन हात करण्याचे सामर्थ्य आपणात येवो हीच आदिशक्तीकडे प्रार्थना. खरेतर प्रत्येक क्षण हा नवा अनुभव देत असतो व अनुभवातून माणुस तावून सुलाखून एखाद्या धारदार व टोकदार शस्त्राप्रमाणे तयार होत असतो. हेच अनुभव पुढे जीवन समृद्ध संपन्न व यशस्वी बनविण्यात मदतगार सिद्ध होत असतात.
नव्या वर्षात आपला समाज, धर्म, देश प्रगत व संपन्न बनो. त्यासाठी माझे तुमचे योगदान लाभो. शेवटी "देह मंदिर चित्त मंदिर,  एक तेथे प्रार्थना. सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना,  सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना.
नुतन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

Monday 21 December 2015

बाजीराव मस्तानी

"मशहुर मेरे इश्क की कहानी हो गई ।
कहते है मै दिवानी मस्तानी हो गई ।"

वा काय गीत आहे 👌
बाजीराव पेशवे व त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांची न्याय न मिळालेली प्रेम कथा .
 सातारच्या शाहु महाराजांच्या ऋणात राहून मराठेशाहीला अर्ध्या हिंदुस्तानात पोचवणारा, मस्तानीच्या कृष्णाचं नामकरण नाकारणा-या ब्राह्मणांच्या विरोधात बंड पुकारून पेशव्यांच्या वंशजाचं नाव समशेर बहाद्दुर ठेवणारा, जाती धर्माच्या, कर्मकांडाच्या प्रथांना लाथ मारणारा, 40 लढाया लढून अपराजीत राहिलेला बाजीराव शेवटी आप्तस्वकियांकडून मात्र हरला..
मस्तानी... स्त्री कशी असावी तर मस्तानी सारखी... बापावर संकट आलं म्हणून रणांगणात उतरणारी, आई मुस्लिम म्हणून नमाज पढणारी, बाप राजपूत म्हणून कृष्णभक्तीत लीन राहणारी, प्रेम मिळवण्यासाठी बुधवार पेठेतल्या वेश्यावस्तीत राहून बाजीरावाची वाट पाहणारी, रखेल म्हणून समाजानं हिनवलं तरी प्रेमापोटी तो अपमान गिळून प्रेम देणारी, ज्या पेशव्यांनी हाल हाल करून प्राण घेतले, त्यांच्याच रक्षणासाठी आपला मुलगा समशेर बहाद्दुरला लढायला सांगणारी, विरांगणा, नृत्यांगणा, स्वर्गसुंदरी आणि एक आदर्श पत्नी, पतीच्या विरहात प्राण त्यागणारी.. "मस्तानी" इतिहासात उपेक्षीतच राहिली...
काशी....... नव-याचं दुस-या स्त्रीवर प्रेम आहे. हे माहित असतानाही कर्तव्यं निभावणारी, सवतीची मंगळागौरीला ओटी भरणारी.. बाजीरावांसाठी मस्तानीची बंदिवासातून सुटका करावी यासाठी प्रयत्न करणारी... एक आदर्श पत्नी काशीबाई...
      भंसाळींनी  मांडलेला इतिहास रंगवलेला आहे  पण, घटना सत्य आहे...
शेवटी तो सिनेमा आहे,  तो पहावा वाटला पाहिजे ना ? सवत असली तरी काशीबाई मस्तानीची खणा नारळानं ओटी भरते, कुंकु लावते..  ही आदर्शवत मराठी संस्कृती भंसाळीनं जगाच्या कानाकोप-यात पोचवली...कट्टर ब्रम्वृदांनी व सत्तालालसी कुटूंबियांनी बाजीरावांना संपवले.. आणि मस्तानीचे हाल हाल केले. बाजीरावांनी पेशव्यांना वैभव प्राप्त करून दिलं.. मस्तानीला हाल हाल करून मारलं तिच्याच मुलानं समशेर बहाद्दुरनं शेवटच्या श्वासापर्यंत मराठा साम्राज्याचं रक्षण केलं.. वयाच्या  27 व्या वर्षीच वीरमरण आले त्याला.
सिनेमात रणवीरचं कौतुक करावसं वाटतं अन दिपिकाबद्दल बोलायला शब्दच नाहीत. .. मस्तानी हिच्यापेक्षा सुंदर असूच शकत नाही.. शेवटी काशीबाईला न्याय मिळवून देणा-या प्रियंकाचे विशेष कौतुक.... भव्य सेट, मराठी थाटबाट, उत्तम दिग्दर्शन करून.. सुश्राव्य संगीताची धुरा सांभाळणा-या संजय लिला भंसाली यांचे विशेष अभिनंदन,..
नक्की पाहा🙏 खरंच प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाने आवर्जून पहायला हवा असा सिनेमा आहे. संजय लीला भंसाळी हे का ग्रेट आहेत त्याचा पुन्हा प्रत्यय येतो. दीपिका पादुकोण,  प्रियंका चोपड़ा अन रणवीर यांनी खरच सुरेख अभिनय केला आहे. गीत, संगीत, नृत्य, दृश्ये अप्रतिम आहेत.


बालासाहेब धुमाळ,  बीड /पुणे.

हे बंध रेशमाचे

हे बंध रेशमाचे 🌹🌹🌹🌹

हे बंध रेशमाचे
जन्मोजन्मी जुळो.
सोनियाच्या चांदण्यांनी
जीवन अवघे उजळो.

दुःख-दारिद्र्य प्रेमाच्या
ज्योतीसवे जळो.
सहजीवनाचा अर्थ सकला
तुमच्यामुळे कळो.

प्रित राघु-मैनेची
अवघे विश्व पाहो.
पुष्पवृष्टी स्वर्गामधुनी
सदैव बरसत राहो.

पावित्र्य या नात्याचे
जपले तुम्ही आहो.
दिव्यजल मांगल्याचे
अंगणी आपल्या वाहो.

साथ दिवा-वाती सम
अशीच देत रहा.
नौका पैलतीरी संसाराची
अशीच नेत रहा.

लाभो अखंड सहचर्य
अवकाशापरी अनंत.
आयुष्य उभयतांना
उदंड देवो भगवंत.

भाऊ-वहीणी लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐🙏🙏
ब-याच दिवसांनंतर प्रयत्न केलाय भावना शब्दबद्ध करण्याचा तेव्हा 😃🙏
आपला बालाजी 🙏

तळीभंडार

तळीभंडार
हा कुलाचारातील
प्रमुख भाग आहे.....
ज्या घरात कुलस्वामी खंडोबाचे कुलाचार पाळले
जातात त्या प्रत्येक घरामध्ये तळी भंडार हमखास
होतोच....
प्रत्येक अमावस्या व पौर्णिमेला घरातील देवासमोर
तळीभंडार करण्याची प्रथा असते तर काही घरांमध्ये
विजयादशमी ( दसरा ) व
चंपाषष्ठी यादिवशी हा विधी होत असतो.
तळी भंडारा विषयी सांगितले जाते मणीसूर व
मल्लासूर दैत्यांचा संहार केल्यानंतर
ऋषीमुनींना जो आनंद झाला त्या आनंदात
मल्हारी मार्तंडाचा जयजयकार केला त्याचेच
तळी भंडार हे प्रतिक आहे.जेजुरी मंदिरामध्ये
भंडारगृह,बारद्वारीमध्ये किंवा पितळी कासवावर
तळी भंडाराचा विधी केला जातो घरातील देवासमोर
केला जाणारा विधी व मंदिरामध्ये
केला जाणारा विधी यामध्ये थोडा फरक आहे
देवापाशी आल्यानंतर आपली सर्व दुःख उधळून देवून
देवापाशी आनंद मागितला जातो.
खोब-याचे तुकडे व भंडार उधळला जातो.खोब-याचे तुकडे
उधळण्यामागे अनेक कारणे आहेत जसे आपला वंश खोब-
याच्या कुटक्यासारखा एकास दोन दोनास चार
असा वाढत जावा तर दुसरे असे
की पूर्वी सोन्याच्या मोहरा भंडारा बरोबर
उधळल्या जात असत परंतु कालौघात मोहरा शक्य
नाही म्हणून खोबरे उधळले जाते
सोन्याच्या मोहरा किंवा खोबरे याहीपेक्षा श्रद्धेने
केलेला विधी महत्वाचा अंतःकरणापासून दिलेली हाक
देवाला पोहोचते
घरी देवासमोर केला जाणारा तळी भंडाराचा विधी
ताम्हणामध्ये विड्याची ( नागिणीची ) पाने,
सुपारी , खोब-याचे तुकडे , भंडार इ. साहित्य घेऊन
तीन पाच सात अशा विषम संख्येमध्ये पुरुष
मंडळीनी एकत्र येऊन सदानंदाचा येळकोट च्या गजरात
ताम्हण उचलले जाते तदनंतर पानाचा विडा ठेवून
(काही घरांमध्ये डोक्यावरील टोपी,रुमाल
अथवा वस्त्र जमिनीवर ठेवतात) त्यावर ताम्हण ठेवले
जाते.एक विडा देवासमोर
मांडला जातो तळी उचलणा-या प्रत्येकापुढे एक एक
विडा ठेवला जातो देवाला भंडार वाहून
प्रत्येकाच्या कपाळी भंडार लावल्यानंतर
पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट च्या गजरात ताम्हण
उचलले जाते.सरते शेवटी तळीचे ताम्हण मस्तकी लावले
जाते.

------- तळीभंडार ---------
हरहर महादेव........ चिंतामणी मोरया ............
आनंदीचा उदे उदे ......भैरोबाचा चांगभले .....
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट ........
येळकोट येळकोट जयमल्हार .......
अगडधूम नगारा ........सोन्याची जेजुरी .........
देव आले जेजुरा..........निळा घोडा ...........
पायात तोडा ........कमरी करगोटा .........
बेंबी हिरा ........मस्तकी तुरा .......
अंगावर शाल .......सदाही लाल .......
आरती करी ........म्हाळसा सुंदरी .......
देव ओवाळी नानापरी.......
खोब-याचा कुटका .........भांडाराचा भडका ...........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट .........
येळकोट येळकोट जयमल्हार........
अडकेल ते भडकेल .......भडकेल तो भंडार ........
बोल बोल हजारी ...वाघ्या मुरुळी ....
खंडोबा भगत प्रणाम प्रणाम.........
बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट........
येळकोट येळकोट जयमल्हार........

संकलन : बी. एस. धुमाळ 🙏

खंडोबा

🌷खंडोबा🌷

खंडोबा हे मुख्यत्वे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातील लोकप्रिय हिंदू दैवत आहे. हे दैवत महाराष्ट्रातील अनेकांचे कुलदैवत आहे. परंपरेने खंडोबा हा शंकराचा अवतार मानला जातो. खंडोबाच्या परिवारात म्हाळसा,बाणाई या पत्नी; हेगडे हा प्रधान (हा बाणाईचा भाऊ आहे); कुत्रा आणि वाहन घोडा यांचा समावेश होतो. खंडोबाच्या मूर्ती बैठ्या, उभ्या व अश्वारूढ अशा स्वरूपात असून हातात डमरू, त्रिशूळ, खंडा आणि पानपत्र ; चतुर्भुज; कपाळाला भंडारा असे रूप असते.“

🌰नावे🌰
एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग -> मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसर्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभंश आहे. (स्कंद -> स्कंदोबा -> खंडोबा) याखेरीज मल्हारी(मल्लारी
), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी ही खंडोबाची इतर नावे होत. मल्लू खान आणि अजमत खान (अजमत = चमत्कार) ही नावे खंडोबाच्या मुसलमान भक्तांमध्ये लोकप्रिय आहेत. ते खंडोबाच्या खंडा शस्त्रास मल्लू खान की गदा अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा शत्रू असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे एक कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.कर्नाटकात खंडोबास मैलार किंवा खंडू गौडा (स्वैरपणे: खंडू पाटील) तर आंध्रात मल्लाण्णा नावाने ओळखतात.”

🌰दैवत🌰
खंडोबा हे दैवत अकराव्या शतकापासून लोकप्रिय झाले  असावे. खंडोबाचे ऐतिहासिक उल्लेख चौदाव्या शतकापासून येतात. खंडोबावरिल सर्वाधिक महत्वाचा ग्रंथ मल्हारी माहात्म्य ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रकांडात असल्याचा दावा करतो पण या पुराणाच्या प्रमाण आवृत्तीत याचा उल्लेख मिळत नाही. मुळचे लोकदैवत असलेल्या खंडोबाचे क्रमश: वैदिकीकरण झाल्याचे दिसते.

🌰लोककथा 🌰
या देवतेस पौराणिक शिव व वैदिक रूद्र यांचा पूर्णावतार मानतात. खंडोबाच्या परिवारातील इतर सदस्यांचेंही वैदिकीकरण झाले आहे. यामुळे म्हाळसा बाणाई या पार्वती व गंगा यांच्या, रक्त पिणारा खंडोबाचा कुत्रा कृष्णाचा तर शुभ्र घोडा नंदीचा अवतार मानला गेला. खंडोबा हे दैवत वैदिक पशुपती रुद्राप्रमाणे दरोडेखोर, घोडा आणि कुत्रा यांच्याशी संबंधित आहे. खंडोबाचा भक्तीपंथ किमान बाराव्या शतकापासून अस्तित्वात आहे. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींनी खंडोबाचा उल्लेख केला आहे. आंध्राच्या काकटिय सम्राटांचे खंडोबा हे कुलदैवत होते. मल्हारी माहात्म्य ग्रंथातील प्रेमपुरी जागा कर्नाटकातील बीदरजवळचे आदी मैलार स्थान आहे असे मानले जाते. आदी मैलार खंडोबाच्या बारा प्रमुख स्थानांमध्ये मोडते. मराठी परंपरेने मूळचा प्रेमपुरीचा खंडोबा प्रेमपुरी -> नळदुर्ग -> पाली (जि. सातारा) असे करत जेजुरीस स्थिरावला. मराठी परंपरेत खंडोबा कानडी देव मानला जात असल्याचे संशोधक सोन्थेमर सांगतात. दख्खनच्या लिंगायत, जैन व इतर व्यापा-यांनी खंडोबा पंथाचा प्रसार केला असावा. पैठणच्या मराठी कंडक यक्षाशीही या देवतेचे एकीकरण झाले आहे.
मराठी साहित्यात खंडोबा देवतेबाबत मिश्र धारणा आहेत. एकनाथांनी या पंथास व देवतेस कमी लेखले आहे. अनेक देशस्थ ब्राह्मणांचे कुळदैवत असलेला खंडोबा कोकणस्थ ब्राह्मणांकडून कमी प्रतीचे दैवत मानले गेले.[ संदर्भ हवा ] खेळखंडोबा हा वाक्प्रचार सर्वनाश या अर्थी येतो. त्याचवेळी मराठीत मल्हारी माहात्म्य, जयाद्रीविजय आदी ग्रंथ व वाघ्यामुरळींच्या लोकगीतांमध्ये या देवतेची स्तुती केल्याचे दिसते.

  🌸 महात्मा फुले यांनी खंडोबा देवतेस बळीराजाच्या राज्यातील महाराष्ट्र क्षेत्राचा अधिपती मानले आहे. महाराष्ट्र क्षेत्र विस्ताराने मोठे असल्याने बळीराजाने या प्रदेशाचे नऊ खंड केले. जेजुरीचा क्षेत्रपती असणारा खंडोबा त्यातील एक होय. खंडोबाचे मार्तण्ड हे नाव "मार-तोंड" यावरून आले असल्याचे त्यांचे मत आहे.
जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला. बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला.

🌰कुळाचार🌰
हे दैवत अनेक कुटुंबांचे कुलदैवत असल्याने विविध कुळाचारात खंडोबास स्थान आहे.

🌰जागरण गोंधळ🌰
देवतेची गीतांमधून स्तुती असे या आचाराचे स्वरूप असते. अनेक मराठी कुटुंबांमध्ये लग्नानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे.
तळी भरण
तळी भरण हा नैमित्तिक स्वरूपाचा कुळाचार आहे. यात पाच पुरूषांद्वारे बेल भंडारा सुपारीने देवतेची ओवाळणी केली जाते. शेवटी तीन वेळा थाळी उचलून वरखाली करताना सदानंदाचा येळकोट, भैरवनाथाचे चांगभले असा जयजयकार करतात. मराठीतील तळी उचलणे हा समर्थन करणे या अर्थाचा वाक्प्रचार या आचारावरूनच आला असावा.

🌰उपासना🌰
बेल, भंडारा, दवणा यांना खंडोबाच्या पूजेत महत्व असून कांदा त्यास आधिक प्रिय आहे. त्यास मांसाचाही नैवद्य दाखवितात. याशिवाय रगडा भरित आणि पुरणपोळीचाही नैवद्य दाखवितात खंडोबाचे उपासक ब्राह्मणांसारख्या जातीव्यवस्थेतील वरच्या जातीपासून लिंगायत, धनगर, मराठा अशा सर्व जातंमध्ये आढळतात. हे दैवत सकाम दैवत असल्याने अनेक नवस केले जातात.

🌰मल्हारी माहात्म्य🌰
संस्कृत व मराठी भाषेतील या ग्रंथाने खंडोबा देवतेस लोकजीवनात महत्वाचे स्थान दिले. हा ग्रंथ (बहुदा खंडोबा कुलदैवत असलेल्या महाराष्ट्रीय कवीने) इ.स.१२६० - १७४० च्या दरम्यान रचला गेल्याचा कयास आहे. खंडोबाने मणी व मल्ल दैत्यांशी मार्गशीर्ष शुक्ल १ ते ६ अशी सहा दिवस लढाई केली व सहाव्या दिवशी चंपाषष्ठीस दोघांचा वध केला. या सहा दिवसात खंडोबाचा उत्सव साजरा केला जातो. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात बावीस अध्याय आहेत.

🌼खंडोबाच्या लग्नकथा🌼
खंडोबा हे दैवत बहुपत्नीक आहे. खंडोबाच्या स्त्रिया वेगवेगळ्या जातीतील आहेत. अशा बहुपत्नीकत्वामु
ळे त्या जातींमध्ये एक प्रकारचा सांस्कृतिक धागा तयार झाला आहे. खंडोबाची पहिली पत्नी म्हाळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बाणाई (वा पालाई) धनगर आहे. तिस-या पत्नीचे नाव रमाबाई आहे. चौथी पत्नी फुलाई जातीने तेलीण आहे तर पाचवी चांदाई मुस्लिम आहे. मल्हारी माहात्म्य या ग्रंथात खंडोबाच्या दोनच पत्न्यांचा उल्लेख येतो. म्हाळसा हा मोहिनी व पार्वती यांचा संयुक्त अवतार मानन्यात येतो. म्हाळसा नेवाश्याच्या तिमशेट नावाच्या व्यापा-याच्या घरात जन्मली. खंडोबाच्या स्वप्नात मिळालेल्या दृष्टांतानुसार तिमशेटने पाली (जि. सातारा) येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते.
दुसरी पत्नी बाणाई (बनाई ?) इंद्राची मुलगी असल्याचे मानले जाते. ही एका धनगरास सापडली. बाणाईला जेजुरी येथे पती मिळेल असे वर्तविण्यात आले. जेजुरीस बाणाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले. बाणाईच्या सहवास मिळण्यासाठी खंडोबाने आपली पत्नी म्हाळसा हिच्या सोबत सारीपाटाचा डाव मांडला. डाव हरणा-यास बारा वर्षे वनवास ही अट होती. खंडोबा हा डाव हरला व धनगराचे रूप घेऊन बाणाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला. एक दिवस खंडोबाने सारी मेंढरे मारली व बाणाईच्या पित्यास बाणाईशी लग्न लावल्यास सारी मेंढरे जिवंत करतो असे सांगितले आणि बाणाईचे लग्न या धनगराशी झाले. खंडोबाच्या प्रेमात पडलेली बाणाई या लग्नास अनिच्छूक होती. जेजुरीच्या वाटेवर खंडोबाने आपले खरे रूप बाणाईस दाखविले. बाणाईस बघून म्हाळसा संपप्त झाली. तेव्हा बायकांचा झगडा थांबविण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग म्हाळसेस तर खालचा भाग बाणाईस दिला. म्हणून जेजुरीगडावर म्हाळसेचे मंदिर वर तर बाणाईचे पायथ्यास आहे असे सांगतात.

🌰दंतकथा🌰

* सावकारी भुंगा: औरंगजेबाच्या दक्षिणेवरील मोहिमेवर असताना त्याने यवतजवळील दौलतमंगल किल्ला काबिज केला. तेथून त्याने जेजुरीचे मंदिर पाहिले व मंदिर भ्रष्ट करण्याच्या हेतूने सैन्य पाठवले. मुघल सैन्य जेजुरीच्या गडकोटापाशी आले असता त्यांना मंदिराचे दरवाजे बंद असल्याचे दिसले. त्यांनी सुरुंग लावून कोट उडविण्याचे ठरवले. पण जेथे सुरुंगासाठी भोक केले होते तेथून हजारो भुंगे बाहेर पडले व त्यांनी मुघल सैन्यावर हल्ल चढविला. सैन्य जेथे जाईल तेथे त्यांचा पाठलाग केला. मुसलमान सरदाराने या घटनेचा अर्थ एका हिंदूस विचारला तेव्हा त्याने खंडोबा हे कडक दैवत असून तुम्ही त्यास डिवचले यामुळे असे घडले असे सांगितले आता ही अस्मानी बंद करण्यासाठी तुम्हास काहीतरी करणे भाग आहे असे सांगितले. सरदाराने औरंगजेबाकडे जाऊन या घटनेचा वृतांत सांगितला. तेव्हा औरंगजेबाने सव्वा लाख रूपये खंडोबास नजर केले. अशी सावकारी रक्कम वसूल केल्यामुळे या भुंग्यांना सावकारी भुंगे म्हणतात. जेजुरी मंदिराच्या उजव्या दरवाज्याजवळील भुंगे सावकारी भुंगे म्हणून दाखवले जातात.

🌼 भाया भक्ताची साक्ष:
एकदा कडेपठारावर (हे पठार जेजुरी मुख्य मंदिरानजिक आहे) धनगरांची पोरे विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तेथे आला. पण आपला भक्त भाया येत आहे पाहून तो अदृश्य झाला. इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्याजाण्याबद्दल भायास सांगितले. खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अस्वस्थ झाला. खंडोबा जेथे बसला होता त्या घोंगड्याखाली हळदीचे लिंड्ग सापडले. तेव्हा भायाने त्या लिंड्गाची प्रार्थना सुरू केली. वडिलधा-यांनी जेव्हा पोरांच्या कथेवर विश्वास न ठेवता लिंड्ग फेकून दिले तेव्हा लिंड्गाचे रूपांतर एका मौल्यवान मण्यात झाले आणि वडिलधारे विचारात पडले. इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबा प्रकट झाला हा वाद सुरू झाला तेव्हा ज्या कोणाची कु-हाड लिंगात रुतेल त्याला खंडोबा आणण्याचे श्रेय मिळेल असे ठरले. अपेक्षेप्रमाणे भायाची कु-हाड रूतली आणि त्यातून रक्तदूधाचा प्रवाह सुरू झाला. यानंतर देव स्वतः प्रकट झाला व मरळ घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिंपडल्यास हा प्रवाह थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्तप्रवाह थांबला. तेथे मंदिर उभारण्यात आले. पुढे मंदिराच्या वहिवाटीचा वाद उत्पन्न झाला असता वरिल कथा पेशवे दरबारात पुरावा म्हणून मांडण्यात आली होती. (सन १७५०)

🌰उत्सव/यात्रा🌰

🌼जेजुरी:
वर्षात चैत्री, पौषी, श्रावणी व माघी अशा चार मोठ्या यात्रा होतात. हे उत्सव देवाची विधीपूर्वक पूजा, विविध घराण्यांच्या मानाच्या पालख्यांचे व झेंड्याचे आगमन असे या यात्राउत्सवांचे स्वरूप असते. सुप्याचे खैरे, संगमनेरचे होलम आणि इंदूरच्या होळकरांना पालखीचा मान असतो.डफ, मर्फा,सनई, ताशा आदी वाद्यांच्या साथीने झेंड्यांच्या काठ्या शिखरास टेकवण्याची स्पर्धा चालते. जेजुरीगडावर हळदीची मुक्त उधळण होते. मुरळींचे नृत्य या सोहळ्याचे आणखी एक आकर्षण असते. पौषी यात्रेस भरणारा गाढवांचा बाजार हे पौष यात्रेचे आकर्षण आहे.
सोमवती अमावस्येस (सोमवारी येणा-या अमवास्येस) खंडोबाच्या दर्शनास मोठी गर्दी जमते. सोमवतीस खंडोबा व म्हाळसा यांच्या पालख्यांची प्रातःपूजेनंतर सवाद्य मिरवणूक निघते. नंतर त्यांच्या प्रतिमांना कर्हा नदीवर स्नान घातले जाते.

🌼नळदुर्ग
नळदुर्ग येथिल मंदिर खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे श्रावणी पौर्णिमेस खंडोबा व बानाई (दुसरे नावः पालाई) यांचा विवाह सोहळा पार पडतो.

🌼पाली (सातारा जिल्हा):
पालीचे मंदिर पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरच्या अतित गावाजवळ असून हे मंदिरही खंडोबाच्या १२ प्रमुख स्थानांमध्ये मोडते. येथे पौष पौर्णिमेस खंडोबा व म्हाळसा यांचा विवाह सोहळा पार पडतो
खंडोबाची खालील स्थाने आहेत.

*जेजुरी (पुणे जिल्हा) (खंडोबा देवाचे मुख्य पीठ)

* पाली (सातारा जिल्हा)

* काळज ((ता. फलटण)(सातारा जिल्हा)

* पिंपळगाव निपाणी ता. निफाड जि. नाशिक

* मंगसुळी (बेळगाव जिल्हा)

* देवरगुड्डा (राणीबेन्नूर)

* मैलार लिंगप्पा (खानापूर, बेळगाव जिल्हा)

* मैलारपूर (यादगीर) (बेळ्ळारी जिल्हा)

* आदी मैलार (बीदर जिल्हा) (गुलबर्ग्याजवळ)

* अणदूर (नळदुर्ग) (उस्मानाबाद जिल्हा)

* माळेगाव (नांदेड जिल्हा)

* सातारे (औरंगाबाद जिल्हा)

* शेगुड (अहमदनगर जिल्हा)

* निमगाव दावडी (पुणे जिल्हा).