Sunday 18 November 2018

निश्कलंक कला व स्वाभिमानी कलावंत

निश्कलंक कला व स्वाभिमानी कलावंत...

गावाकडील तमाशामधील डान्स म्हणुन अश्लील डान्सचे व्हिडिओज अलिकडे सोशल माध्यांवरून पसरवले जात आहेत व आवडीने पाहीलेही जात आहेत. सोशल मिडीया त्याची त्याची कमाई करून जातो मात्र स्त्री जातीच्या, लोककलेच्या आणि संस्कृतीच्या अब्रुची लक्तरे मात्र वेशीवर टांगली जातात. एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही तर काही बुद्धीवादी या सर्वाचे लंगडे समर्थन करून फुकटचा भाव खाण्याचा प्रयत्न करतात!! पोटापाण्यासाठी करावं लागतं! त्यात काय वाईट आहे? कला आहे! पारंपरिक आहे असे म्हणुन अकलेचे दिवे पाजळतात.

अरे नालायक तत्वज्ञांनो तुम्हाला यांच्याच पोटाची बरी फिकीर आहे. दयावानांच्या अवलादिंनो कधी ख-याखु-या उपासमारांची मदत केल्याचे आठवतेय का? एखाद्या डोईवरील पदर ढळू न देता डान्स करणाऱ्या मुरळीला नाहीत सोडत असे पैसे? शांत सोज्वळ शुद्ध पुरातन धार्मिक कसे आवडेल?? मुळात कुठलीतरी भंगार कला महाराष्ट्राची म्हणून दाखवून, बाहेरच्या पोरी महाराष्ट्रीय संगीतावर नाचवून इथल्या तमाशाला व एकंदरीतच लोककला संस्कृतीला बदनाम नका करू. आपल्याकडे रस्त्यांवर कला सादर होत नाही असे नाही, मी ही त्याच जमातींमधुन आहे परंतु आपल्याकडील रस्त्यावरची कला एकतर जवळजवळ संपुष्टात आली आहे. शिवाय दुसरे म्हणजे आपली लोककला ही शुद्ध, स्वच्छ व सात्विक आहे. तिला धार्मिक अधिष्ठान आहे. अशा वासनिकतेला कला म्हणता येणार नाही. मग ते खरोखरच महाराष्ट्रात होत असेल तरीही! शिवाय प्रत्येक गोष्टीची जागा, काळ वेळ ठरलेली असतेय. त्याप्रमाणेच त्या त्या गोष्टी गोड वाटतात.

तसे तर आता आपलाही बिहार, झारखंड, हरियाणा होऊ लागलाच आहे म्हणा. आपल्याही काही तमाशा, जागरण गोंधळ, परण्या, वराती यामधील डान्स प्रकार अगदी भोजपुरी व कॅब्रेलाही लाजवेल एवढ्या खालच्या पातळीला पोहचलाय. काही ठिकाणी तर मुली म्हणुन भलतेच कंबर हलवतात!! याला कारण आहे प्रेक्षकांनी सोडलेली लाज! कलाकारांना तेच सादर करावं लागतं जे प्रेक्षकांना आवडतं!! परंतु चार पैसे मिळतात म्हणून काहीही नाही केले पाहिजे. माणसाने मेले तरी चालावे परंतु अस्मिता, स्वाभिमान व मन जीवंत राहायला हवे. कला ही निष्कलंक, सोज्वळ, चारित्र्यसंपन्न, प्रबोधक व निखळ मनोरंजक असायला हवी. पुर्वी ती तशीच होती अगदी बेडाग व सन्माननीय! परंतु आता हवा बदलतेय. हे बंद झाले पाहिजे. बंद केले पाहिजे.

बरे उपदेश तरी त्यांना कसा करावा?? परंतु मला दुःख ही होते व किव येते त्या पोरींची!! जणाची नाही मनाची तरी लाज वाटली पाहिजे. वखवखलेल्या नजरांमध्ये विभत्स्य अंगविक्षेप ज्याला नृत्य म्हटले जातेय ते करून भिक मागणे भूषणावह वाटते काय? अशाप्रकारे खुल्लमखुल्ला देहप्रदर्शन करण्याशिवाय इतर कुठलाच मार्ग सापडत नाही का यांना उदरनिर्वाहासाठी?? स्वतः कष्ट करायला नकोत, शिकायला नको, बदलायला नको आणि पुन्हा समाजाला आणि सरकारला दुषने द्यायला बुद्धीवादी व मिडीया तयार. पारंपरिक आहे म्हणून सर्वच जपले पाहीजे का?? माझा याला स्पष्ट विरोध आहे.

मुळात कमी श्रमात जास्त उत्पन्न मिळवायची मानसिकताच धोकादायक आहे. मला असे अजिबात नाही म्हणायचे की या मुली स्वेच्छेने आनंदाने हे काम करत आहेत. मला असेही नाही म्हणायचे की त्या अगदी फावड्यानेच पैसे ओढत आहेत म्हणून, त्यांची मजबुरी त्यांचे कमी शिक्षण, त्यांच्यावरील कौटुंबिक संस्कार व त्यांच्या सभोवतालची परिस्थिती असेल कदाचित जी समजून घेतली जाऊ शकते. शिवाय या मुली "त्या मुली" ज्या मुली नसतातच मुळी!! त्या उदर्निवाहाचे नाव पुढे करून जर असे चाळे करत असतील तर मी तरी ते मान्य करू शकत नाही. यांना ना बुद्धी कमी आहे ना यांची शारिरीक क्षमता कमी आहे उलट यांच्यामध्ये अंगभूत कलागुण व सृजनशीलता ठासून भरली आहे. परंतु असे असले तरी हे लोक दिशा भरकटले आहेत, यांचा रस्ताच चुकलेला आहे. चूकीच्या रस्त्यावर चालत असताना ध्येय प्राप्ती होऊ शकत नाही आणि म्हणूनच याचे समर्थन नाही होऊ शकत.

अहो ठरविल्यावर काय अशक्य आहे हो? कोण म्हणतोय अगदी कलेक्टरच बना पण निदान शिपाई, लिपिक तरी बना, राहीले डॉक्टर निदान नर्स तरी बना, राहीले इंजिनिअर निदान यांत्रिक तांत्रिक कामगार तरी बना. ज्यांनी जग बदलून दाखविले आहे आजवर ते काही सोन्याच्या चमचाने अम्रुत पिऊन नव्हते ना आले!! नाहीच जमले तर मजुरी करा परंतु इज्जत घालु नका. म्हणून योग्य आयोग तपासून चुकीचे सोडून देण्यातच खरे शहाणपण आहे. हे असे धंदे आयुष्यभर करता येत नाहीत. समर्थन करणारे आपल्या मुली बहीणींना का नाही स्ट्रीट डान्सर्स बनवत? आवडेल? मला तर नाही आवडणार? इज्जतीने पोट भरणे, नाव कमावणे खुप सोपे नक्कीच नाही परंतु खुप कठीणही नक्कीच नाही. फक्त परिश्रम करण्याची तयारी व सकारात्मक इच्छाशक्ती हवी.

अरे आता तारूण्यावर दोन पैसे उधळणारे कुबेर नंतर वृद्धापकाळात दमडी देणे तर सोडा डुंकूनही बघत नाहीत. असा आजवरचा इतिहास आहे. संस्कृती संवर्धन, संस्कृती रक्षण असे वजनदार शब्द वापरून परिस्थिती बदलत नाही. परिवर्तन हा निसर्ग नियम आहे. आपण जर आपल्यात बदल नाही घडवून आणला तर आपण राहु येथेच जिथे आहोत तिथे अर्थात रस्त्यावर!! आणि जग जाईल चंद्रावर. आपण पहातच काय अनुभवतही आहोतच की? लोक कलावंतांचे, कलावंत जमातींचे आयुष्य संपले परंतु दारिद्रय, सामाजिक अप्रतिष्ठा नाही संपली. जे शिकले ते संपन्न व सन्मानित झाले परंतु शिक्षण जे या समृद्धतेचे व संपन्नतेचे गमक आहे ते मात्र अगदी गोपनीय ठेवले. त्यामुळे मला वाटते सर्वच नाही पण किमान अप्रतिष्ठीत, कमी मोबदल्याच्या आणि चारित्र्यहनन करणाऱ्या पारंपरिक लोककला रस्त्यावर सादर करू नयेत.

हे शोषण तर आहेच पण ही एकप्रकारची मानसिक गुलामगिरीदेखील आहे. यात पिढ्याच्यापिढ्या बरबाद झाल्या. त्यापेक्षा उदरनिर्वाहाचे, रोजगाराचे इतर पर्याय शोधले पाहीजेत. शोधले म्हणजे सापडतेच. शिकून सवरून एक तर प्रशासनात या, खाजगी कंपन्यात जा किंवा मग आपल्यातील जन्मजात कलागुणांना शिक्षण, तंत्रज्ञान यांची जोड देऊन मानसन्मान, पैसा व प्रतिष्ठा कमवा. आदर्श घ्यायला खुप आहेत. फार लांब जाण्यापेक्षा नागराज मंजुळे, अजय-अतुल यांच्याकडे पहा. तेही जर असेच रस्त्यावर कला सादर करत बसले असते तर??? चुक भुल माफ करा.

बाळासाहेब सिताराम धुमाळ.
9673945092.

No comments: