Saturday 20 October 2018

माणुस जन्मजात गुन्हेगार असु शकतो काय?

माणूस जन्मजात गुन्हेगार असू शकतो काय?

आठवड्यापूर्वी हिंदुस्तान टाईम्समध्ये एक बातमी छापून आली होती, "How Nomadic Communities bear the brunt of Fictional fear mongering?" अर्थात कशा भटक्या जमाती सहन करतात काल्पनिक भितीच्या विक्रीचा आघात? पत्रकार गायत्री जयरामन यांनी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावातील गावगुंडांनी पोरचोर टोळी असल्याची अफवा पसरवून नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पाच जणांचे अमानुष हत्याकांड घडवून आणले. हे हत्याकांड त्याचबरोबर केरळ, कर्नाटक, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तामिळनाडू येथील कलाकार, कसरतीकार, नकलाकार व भिक्षुक भटक्या विमुक्त जमातीतील लोकांवरील हल्ले व हत्या करण्याची समाजाची मनोवृत्ती वाढीस लागण्यास तामिळ चित्रपट " थीरन अधिगारम ओंद्रू" या चित्रपटास कारणीभूत  समजले होते. हा व या चित्रपटाचा तेलगू मेक असणारा "खाकी" बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरले होते. वाचल्याबरोबर चित्रपट पाहण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली परंतु तामिळ आणि तेलगू म्हटल्यावर नाईलाज झाला कारण दक्षिणेतल्या भाषा साध्या ऐकल्या तरी डोके गरगरते माझे! अर्थात केवळ भाषा भिन्नतेमुळे हं!

पुढे पुढे वाचत गेलो असता समजले की प्रदर्शनावेळी या चित्रपटाविरोधात भटक्या-विमुक्तांच्या चळवळीतील तामिळनाडूमधील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी निदर्शने केली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठात धाव घेतली होती व चित्रपटातील क्रिमिनल ट्राईब्ज, क्रिमिनल ऑफेंडर्स अॅक्ट, क्रिमिनल ट्राईब्ज अॅक्ट 1871, 1830 च्या दशकातील लुटीच्या घटना अशी दृश्ये व असे संदर्भ वगळावेत. बावरिया जमातीचा उच्चार, अनुवंशिक गुन्हेगार असे शब्द तसेच चित्रपटातील साप पकडणे, लुटीपूर्वी देवी पूजा करणे, भटक्या-विमुक्तांची पारंपारिक हत्यारे दाखविणे, अशी आक्षेपार्ह शब्द, विधाने, दृष्ये व संदर्भ वगळावीत यासाठी आंदोलने केली होती. अशी दृश्ये व संदर्भ यासाठी वगळावीत की यामुळे समाजाचा दृष्टिकोन बदलू शकतो. हा चित्रपट 'बावरिया ऑपरेशन' वर आधारित होता व 'बावरिया' ही एक भटके-विमुक्त जमात आहे.

आंदोलकांनी केवळ दृश्य व संदर्भ वगळण्याचीच मागणी नव्हती केली तर पुढे जाऊन चित्रपटाच्या निर्मात्यांनी समाजाची माफी मागावी व चित्रपटाच्या उत्पन्नातील 50 टक्के हिस्सा भटक्या विमुक्त जमातींच्या कल्याणासाठी द्यावा अशीही मागणी केली होती. पुढे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक तसेच कलाकारांनी आंदोलकांची लेखी माफी मागितली होती.
चित्रपटातील काही दृश्य व संदर्भ वगळले परंतु तोवर अनेकांनी हा चित्रपट पाहिला होता व त्याचे दृश्य अनिष्ट परिणाम दिसू लागले होते. रस्त्यांवर (म्हणजे भटक्यांच्या घरांवर) आणि जिथे जिथे भटके जातील तिथे तिथे भितीचे काळे जमा झाले होते. याचा भटक्यांच्या जीवनावर अनिष्ट परिणाम झाला होता.डिनोटिफाईड ट्राईब्ज वेल्फेअर असोसिएशन (DTWA)  आणि दि एम्पावरमेंट सेंटर ऑफ नोमेडीक अँड ट्राईब्ज सोसायटी इन मदुराई अशा संघटनांनी यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते कारण या संघटनांना खात्री होती की या चित्रपटाचा अनिष्ट परिणाम समाज मनावर होऊ शकतो आणि हे ओळखूनच त्यांनी चित्रपटास विरोध केला होता.

मदुराईचे तत्कालीन जिल्हाधिकारी के. वीरराघव राव यांनी आंदोलनकर्त्यांना व भटक्या विमुक्त जमातीना पुरेसे सहकार्य केले. परंतु चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पोरचोर टोळी आल्याच्या अफवा अपेक्षेप्रमाणे पसरू लागल्या व  निष्पाप भटके-विमुक्त लोक अनियंत्रित जमावाकडून मारले जाण्याच्या घटना वाढू लागल्या. यावर आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्याचे डीएसपी के. ईश्वर राव यांना तातडीची पत्रकार परिषद बोलावून "जनतेने अफवांवर विश्वास ठेऊ नये. या घटनांमागे भटके विमुक्त लोक नाहीत" हे जाहीर करावे लागले.

असे असले तरी चित्रपटाचे कथानक व एकंदरीतच निर्मिती  जबरदस्त असल्याने चित्रपट सुपरहिट झाला होता. एवढेच नव्हे तर चहात्यांचे चित्रपटाचे निर्माते एस. आर. प्रभू यांना चित्रपट हिंदीमध्ये सलमान खानला घेऊन बनवावा असेही फोन कॉल्स आले होते म्हणे! एवढे सगळे वाचल्यावर माझी चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली. मी गुगलवर चित्रपटाविषयी अधिक माहिती शोधू लागलो. बातम्या वाचल्या, व्हिडिओज व इमेजेस पाहिल्या, लिखित माहितीही वाचली. 'थिरन थिरूमरन' नामक एका प्रामाणिक व धाडसी पोलिस अधिकाऱ्याची मध्यवर्ती भूमिका असलेला हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट नोव्हेंबर 2017 मध्ये तामिळ भाषेत बनला होता. वर उल्लेख केल्याप्रमाणे नंतर तेलुगूमध्येही खाकी नावाने त्याचा मेक आला आणि हिटही झाला.

'ऑपरेशन बावरिया' या दक्षिणेतील पोलिसांच्या कारवाईवर हा चित्रपट आधारित आहे. महामार्गाजवळील एकांतामधील घरांत लुटमार करणाऱ्या संघटित गुन्हेगारांच्या टोळीवरील हे पोलीस ऑपरेशन होते. बावरिया गँग अथवा लॉरी गँग अशी ओळख असणा-या गुन्हेगारांच्या टोळीने सन 1995 ते 2006 या कालावधीत तामिळनाडू, आंध्रप्रदेश, दिल्ली, कर्नाटक, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. या टोळीकडून लुटीबरोबरच अनेक लोकांची हत्या देखील झाली होती. ज्यात एका आमदाराचा व एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याचाही समावेश होता. पोलीस नोंदींनुसार 64 जण जखमी झाले होते. यातील मुख्य आरोपी ओमवीर बावरिया आणि लक्ष्मण उर्फ अशोक बावरिया यांना तामिळनाडू विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती मात्र तत्पूर्वीच ओमवीर बावरिया हा मुख्य आरोपी तुरुंगातच मृत्युमुखी पडला. सर्व अकरा आरोपींवरील गुन्हे सिद्ध झाले. बसुरा बावरिया आणि विजय बावरिया हे दोघे पोलीस एन्काऊंटर मध्ये मारले गेले होते तर बाकीच्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती ज्यात दोन महिलांचाही समावेश होता.

विशेष म्हणजे " थीरन अधिगारम ओंद्रू" या चित्रपटाचे हिंदी डबिंग देखील मला पाहायला मिळाले जे केवळ युट्युब वरच आहे. चित्रपट अंगावर काटा आणणारा आहे. खासकरून पार्श्वसंगीत!  परंतु त्याहीपेक्षा अधिक विमनस्क करणारा व तशाही अवस्थेत विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट आहे. बावरिया ही राजस्थानच्या अरवली पर्वत रांगेत राहणारी भटकी जमात आहे. इतरही राज्यात ती आढळते जसे की हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यात. पंजाब मध्ये ही जमात अनुसूचित जातींमध्ये मोडते तर इतरत्र ओबीसीमध्ये. यांच्या दहा उप जमाती आहेत. भटक्या जमातींच्या सर्व चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा, जात पंचायती सर्व काही हे लोक पाळतात.

पारतंत्र्याच्या काळात इंग्रजी छावण्या, सरकारी खजीने, रेल्वे आणि अधिकारी व त्यांची कुटुंबे यांना या जमाती लुटत असत. इतर भटक्या विमुक्त जमातींप्रमाणेच यांच्यावरही ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राईब्ज अॅक्ट 1871 नुसार अगणित अन्याय-अत्याचार केले. मात्र असे असले तरी आज रोजी हा समाज सामान्य जीवन जगू इच्छित असूनही समाजाच्या दृष्टिकोनामुळे यांच्यावर कोणीही विश्वास करीत नाही. यांना कोणी कामावर ठेवीत नाही. गुन्हा कोणीही करो, कोठेही घडो संशयित गुन्हेगार हेच असतात! जमावाकडून मारहाण, झोपड्यांची जाळपोळ आणि महिलांवरील पाशवी अत्याचार त्यांच्या पाचवीलाच पुजलेले! भय, दारिद्र्य, निरक्षरता आणि अपमान यांचे सावट कायम माथी असते. यातून कसेबसे बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना आढळणारी बावरिया जमात या "थीरन अधिगारम ओंद्रू" सारख्या चित्रपटांमुळे संकटात सापडली आहे. केवळ बावरिया जमातीकडेच नव्हे तर संपूर्ण भटक्या-विमुक्त जमातींकडे आज रोजी संशयित गुन्हेगार म्हणून पाहिले जात आहे. भिक्षेकर्‍यांच्या  मनामध्ये प्रचंड भीती बसली आहे. भिक्षेकरी घर सोडायची हिंमत करीत नाही आहेत.

ब्रिटिशांच्या भारतात येण्यापूर्वी या सर्व भटक्या विमुक्त जमाती एक प्रतिष्ठेचे व सन्मानजनक जीवन जगत होत्या. येथील राज्यसत्तेच्या विश्वासु होत्या. मात्र इंग्रजांशी देशप्रेमापोटी केलेला संघर्ष यांना प्रचंड महागात पडला. इंग्रजांनी तर बेसुमार शोषण केलेच, अमाप छळलेच परंतु तिच दृष्टी ते मागेही सोडून गेले! हाकलून देणे, चौकात खांबाला बांधणे, झाडाला बांधून दगड फेकून मारणे, महिलांना नग्न करून अपमानजनक कृत्य करायला लावणे असे अमानवी अन्याय अत्याचार या जमातींना देशभर सहन करावे लागत आहेत. वास्तविक पाहता स्वातंत्र्याच्या सैनिक व संस्कृतीच्या संरक्षक जमाती असुनही अगदी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी व पुढारलेल्या राज्यातही या असुरक्षित आहेत. इथे जर भटक्या-विमुक्तांची एवढी दयनीय अवस्था असेल तर इतर राज्यांमध्ये कशी असेल याची कल्पनाही करवत नाही! मात्र बातम्यांमधून ते समोर येतेच आणि अनिच्छेने का असेना पण हे सर्व वाचावे ऐकावे व पहावे लागतेच!

वाहतूक, मनोरंजन, कलाकुसर याद्वारे हक्काचे उदरनिर्वाहाचे पारंपरिक असलेले साधन सरकार कायद्याने काढून घेत असेल तर मला प्रश्न पडतो की ओमवीर बावरिया का निर्माण होणार नाही? सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूनही समाज जर या जमातींकडे गुन्हेगार आणि कमजोर जमाती म्हणून पाहत असेल, नेहमी यांना भयभीत व दबावाखालीच ठेवत असेल तर ओमवीर बावरिया का निर्माण होणार नाही? टिळकांनी स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार सांगितला मात्र येथे या जमातींच्या बाबतीमध्ये स्थानबद्धता, सामाजिक बहिष्कार व गुन्हेगाराचा ठपका हाच जन्मसिद्ध अधिकार होऊन बसला आहे! अर्थात मी ओमवीर बावरियाचे अथवा इतर गुन्हेगारांचे समर्थन करतोय असे अजिबात समजू नका. अशा प्रवृत्तींना ठेचूनच काढले पाहिजे. यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मी या अशा मनोवृत्तीचा धिक्कारच करतो परंतु मी याहूनही अधिक तीव्र धिक्कार करतो तो "या जमातींना गुन्हेगार जमाती संबोधण्याच्या मानसिकतेचा!"

कुठलीच जमात जन्मजात "गुन्हेगार जमात" कशी काय समजली जाऊ शकते? गुन्हेगार समजली पाहिजे त्यांची परिस्थिती! जी त्यांना भाग पाडते गुन्हेगार बनायला! खरे तर गुन्हेगार समजला पाहिजे समाज! जो यांच्याकडे सतत गुन्हेगार या दृष्टीनेच पाहतो! गुन्हेगार समजले पाहिजे सरकार जे यांच्या सर्वांगीण पुनरुत्थानासाठी धोरणात्मक निर्णय घेत नाही! माणसाच्या लेकरांना म्हणजे माणसासारख्या माणसांना जन्मजात गुन्हेगार समजून तशी वागणूक देणे हे कुठल्या माणुसपणाचे लक्षण आहे? गुन्हेगारी अनुवंशिक कशी काय असु शकते? नवजात बालकांना, किशोर किशोरी, महिला ते वृद्धांना देखील गुन्हेगार, राक्षस ते अगदी भुत पिशाच्च समजून त्यांना ठेचुन मारणे, त्यांना वाटेल तेव्हा अटक करणे, कोठडीत डांबून ठेवणे हे ना स्वातंत्र्याचे लक्षण आहे ना सार्वभौमत्वाचे!

कोणताही माणूस जन्मजात गुन्हेगार कसा काय असू शकतो? जन्मतः बालकाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले वातावरण मिळू शकते. परिणामी त्याच्यावर त्या वातावरणाचे संस्कार होऊन तो गुन्हेगारीकडे झुकुही शकतो. कदाचित तो गुन्हेगार होऊही शकतो! परंतु म्हणुन तो जन्मतःच गुन्हेगार असतो असे म्हणणे म्हणजे त्या नवजात बालकाच्या शरिरातील रक्तच गुन्हेगाराचे असते असे म्हणण्यासारखे होईल. त्याच्या दंडात गुन्हेगारीची लस टोचून त्याच्या दंडावर "गुन्हेगार" असे गोंदल्यासारखे होईल. त्यासाठी अशा परिस्थितीचे निर्मूलन होणे न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतरही सरकार पाहिजे तेवढे परिवर्तन करु शकलेले नाही हे कटू वास्तव आहे. अर्थात म्हणून परिवर्तन झालेच नाही असे नाही परंतु यात सरकारचा तितकासा हिस्सावाटा मला दिसत नाही. यासाठी सरकारी प्रयत्न वाढविण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हे प्रयत्न वाढविण्याऐवजी काही जमातीतील लोक जन्मतःच गुन्हेगार असतात असे समजणे व इतरांना समजायला लावणे हे "महापाप" म्हणावे लागेल.

प्रसार माध्यमे, मनोरंजनाची साधने व कायदे यांनी जबाबदारीने आपापली भूमिकापार पाडायला पाहीजे. एखादी कलाकृती बनविणे मग ते नाटक असेल, चित्रपट असेल, मालिका असेल अथवा कथा कादंबरी असेल, यात  प्रेक्षकांची वा श्रोत्यांची वाहवा मिळवणे, व्यवसाय करणे, प्रसिद्धी मिळवणे यासाठी एखाद्या जातीचे अथवा जमातीचे नकारात्मक चित्रण करणे योग्य नाही. यामुळे समाजमन बदलते, समाजाची विचार करण्याची दृष्टी बदलते. समाजातील लोकांचा त्या सकल जमातीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्वग्रहदूषित बनतो! "मागचं पाणी गढूळ आलं पुढचं किती जपायचं?" ही अशी वैचारिक अधोगती समाज उपयोगी नाही. एखाद्या जमातीचा असा उद्धार करण्यामुळे त्या जमातीची बदनामी होते. जर एखाद्या जमातीमध्ये एखादी व्यक्ती अथवा गट गुन्हेगारी कृत्यात वारंवार आढळून येत असेल तर त्याचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना करायला पाहिजेत. खरंतर चित्रपटांमधून सामाजिक प्रश्न मांडण्याची, त्याकडे समाजाचे व सरकारचे लक्ष वेधून घेण्याची आजवरची परंपरा आहे परंतु अशा प्रकारे एखाद्या जमातीला गुन्हेगार दाखवून तिची तशी ओळख निर्माण करणे हे खऱ्या कलाकाराचे लक्षण असू शकत नाही

आज दुर्दैवाने स्थिती अत्यंत विषाक्त आहे. देशभरातील भटक्या विमुक्तांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. परंतु हे असेच चालत राहीले तर याचा अनिष्ट परिणाम होईल. हे अपराधीपणाचे शल्य त्या जमातीतील नवतरुण तरूणींना बोचेल. अशाने सुधारणावादी, शुद्धीकरणवादी व पुरोगामी दिशेने पडणाऱ्या पावलांवर घातक परिणाम होईल. त्यांचे पाय मागे ओढल्यासारखे होईल. यामुळे वाममार्ग सोडून सन्मार्गावर मार्गस्थ होण्याचा संकल्प करून तसा प्रयत्न करणार्‍यांचे मानसिक खच्चीकरण होईल. त्यांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागेल. अशा प्रकारची नकारात्मक ओळख त्या जमातीतील नवनिर्माणाला आणि परिवर्तनाला बाधक ठरेल आणि अशी मानसिकता तयार होईल की "जर गुन्हा न करताही गुन्हेगार समजले जात असेल तर मग गुन्हा केलेले काय वाईट?"

आणि म्हणून जशी गुन्हेगारी कधीच समर्थनीय असू शकत नाही तसेच गुन्हेगारी रक्तात असते ही अविचारी फिलॉसॉफी देखील कधीच समर्थनीय असु शकत नाही. जर एखाद्या जमातीमध्ये अशी विघातकता वारंवार आढळून येत असेल तर त्यामागच्या सामाजिक, मानसिक कारणांचा शोध घेतला पाहिजे. अशांची शैक्षणिक, आर्थिक स्थिती सुधारायला पाहिजे. त्यासाठी सुधारणावादी उपाययोजना करायला पाहिजेत. त्यांची अपरिहार्यता समजून घेऊन तिथे पर्यायव्यवस्था निर्माण केली गेली पाहिजे तरच आपण एक चांगला समाज घडवू शकू, एक विकसित भारत देश घडवू शकु!

टोळ्या टोळयाने राहणारा बावरिया समाज आज रोजी दारिद्र्याच्या, निरक्षरतेच्या, अंधश्रद्धेच्या, असुरक्षिततेच्या व  बेरोजगारीच्या गर्तेत सापडला आहे. त्याला तेथून बाहेर काढण्याऐवजी, त्याच्यावरील कलंकांचे परिमार्जन करण्याऐवजी असे चित्रपट काढून त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून जाहीर शिक्कामोर्तब होत असेल तर ते अत्यंत घातक आहे. याचे काय चांगले परिणाम होतील?? अशा प्रकारे जर आपण कूळ, जात, वंश, जमात, सांप्रदाय, पंथ अथवा धर्म जन्माने गुन्हेगार सिद्ध करू लागलो तर काय परिस्थिती निर्माण होईल ते परमेश्वरच जाणो परंतु त्या परिस्थितीस व होणाऱ्या परिणामांस सर्वस्वी आपणच  जिम्मेदार असू एवढे निश्‍चित.........

चित्रपटातील ओम बावरियाचे विधान मला खूप अस्वस्थ करते. तो म्हणतो, "मुझे नेकी के नाम से घीन आवे है। क्योंकी एक इन्सान की नेकी को दुसरा इंसान कमजोर समज लेवे है। उसे अपना गुलाम बना लेवे है। न जाने कितनी बिरादरीयाँ बर्बाद हो गई, मुझे एक बेरहम डकैत बनाने में। ओए नही बनना ओए मुझे नेक और  समझदार........"

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
 मो. 9673945092.

No comments: