Saturday 13 October 2018

दुर्दैवी भटकंती

दुर्दैवी भटकंती

"मराठवाड्यात पाऊस नाही म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला गावोगावी हिंडावे लागतेय. एवढे कष्ट करून आमच्या मुली चांगल्या शकतील व सर्व चित्र बदलतील असे वाटत होते पण माझ्या लेकींवर बलात्कार झाल्याने आम्ही पूर्ण उद्ध्वस्त झालोय" हे करुण व आर्त उद्गार आहेत दुर्देवी पीडित मुलींच्या दुःखी भयभीत आणि हताश आईचे!!!😓

पुण्याच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील हिंजवडी या उच्चभ्रु आयटी परिसरात रविवार दिनांक 16 सप्टेंबर 2018 रोजी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दोन बारा वर्षांच्या अल्पवयीन बहिणींवर चॉकलेटचे आमिष दाखवून पाशवी बलात्कार करण्यात आला. गणेश निकम व त्याच्या 16 वर्षीय साथीदाराने त्यांना मंदिरामागील झाडीत नेऊन त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला शिवाय कोणाला सांगाल तर याद राखा म्हणून धमकावले.

मात्र दोन-तीन दिवसांनंतर बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांच्यातील एकीचा मृत्यू झाला आहे व दुसरी देखील गंभीर आहे. घटना उघड झाल्यानंतर आईने पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी नराधम गणेश निकम व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. दुर्दैवी पीडित कुटुंब मराठवाड्यातील वंजारी या भटक्या जमातीचे आहे. तर नराधम गणेश निकम हा जळगाव जिल्ह्यातील आहे.

सदर कुटुंब ऊसतोड कामगार आहे. ते अत्यंत असुरक्षित आहे. " माझी एक मुलगी तर गेली मात्र आता दुसऱ्या मुलीचे लग्न होईल की नाही याची मला चिंता वाटते" हे हृदयाचा ठाव घेणारे उद्गार आहेत त्या दुःखी मातेचे जीच्या गरीबी व भटकंतीमुळे तीच्या मुलींवर हा अमानुष प्रसंग ओढावला.

मला अजिबात आश्चर्य वाटत नाही की या प्रकरणाची कुठल्याही मुख्य मिडियाने विशेष दखल का घेतली नाही? अथवा लोकप्रतिनिधी राजकारणी गणेश मंडळात मतदारांना आकर्षित करण्यात एवढे का दंग आहेत की त्यांना त्यांच्या आजुबाजुला काय चाललेय याचीच खबरबात नाही?

मला एतकिंचितही विचारावेसे वाटत नाही की एरवी बातम्या झापुन आणणारे स्त्रीवादी समाजसेवक आता काय झोपा काढत आहेत काय? एवढे सारे भटक्या विमुक्तांचे विविध राजकीय पक्षात लोकप्रतिनिधी व पुढारी आहेत त्यांचे मन एवढे कसे काय मरू शकते??

कारण आपल्याकडे दुर्दैवाने बलात्कारासारखी गंभीर घटना देखील जात, धर्म, भाषा, पक्ष, पैसा, स्थानिक, विस्थापित असे निकष लावून गंभीर अथवा सौम्य ठरवली जाते. हे कटु असले तरी सत्य आहे. त्यामुळे माझ्यासारखाच प्रत्येक बहीणींचा भाऊ व लेकींचा बाप अस्वस्थ आहे.

त्यामुळे मी प्रत्येक बापाला, प्रत्येक भावाला आणि भटक्या विमुक्तांच्या सर्व संघटनांना, कार्यकर्त्यांना नम्र आवाहन करतो की या दुःखी पिढीत व असुरक्षित कुटुंबाला धिर देण्यासाठी आणि त्या दुर्दैवी अत्याचारग्रस्त एका मयत व दुसऱ्या मृत्यूशी सामना करत असलेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरून सदर घटनेचा तीव्र निषेध नोंदवावा व गुन्हेगार नराधमांना लवकरात लवकर तथा कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपापल्या पद्धतीने सरकारवर दबाव वाढवावा....🙏

(बाळासाहेब धुमाळ)
मो. 9673945092.

No comments: