Saturday 13 October 2018

वैष्णव बापुः


वैष्णव बापू....
बापुजींचे अर्थात म. गांधीजींचे वास्तववादी तत्वज्ञान म्हणजे सत्य, अहिंसा, प्रेम, विश्वास, समता, मानवता, सत्याग्रह, स्वदेशी, साधेपणा, वक्तशीरपणा, श्रमप्रतिष्ठा, स्वदेशनिष्ठा, सविनय आंदोलन, सत्याग्रह, कृषीप्रधानता, ग्रामविकास, मुलोद्योगी शिक्षण प्रणाली, महीला सबलीकरण, जातीवाद व अस्पृश्यता निर्मूलन, सेवाभाव, स्वच्छता, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, शाकाहार, ब्रम्हचर्य! हे तुम्हा-माझ्या सारख्याच्या कल्पनेपलीकडील आहे. तरीही काही बिनडोक व अक्कल शुन्य महाभाग मात्र आपली दिड दमडीची बुद्धी वापरून या महामानवाला मुर्ख समजतात, कमी लेखतात! बापु चांगले नव्हते म्हणतात!!!

ते बापु ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढा अहिंसक मार्गाने लढला व जिंकून दाखविला!! एक जादुई माणुस ज्याच्याकडे माणसे आपसूक आकर्षित होत असत. त्यांच्या साधी राहाणी अत्युच्च विचारसरणीमुळे जगभरात त्यांचे करोडो अनुयायी आहेत. मुळ भारतीय सांस्कृतिक मूल्ये ज्यांच्या रोमारोमात विराजमान होते. इतरांच्या धर्माचा आदर करणारे एक सच्चे हिंदू असणारे बापुजी, कट्टरतावाद्यांच्या दृष्टीने नालायक ठरणारच ना..

ज्यांना दक्षिण आफ्रिकेत महात्मा म्हणतात! भारतात ज्यांना राष्ट्रपिता म्हणतात! सर्वसामान्य लोक ज्यांना प्रेमाने बापु म्हणतात! युनो ज्यांना man of the millennium म्हणते!! ज्यांचे असंख्य शिष्ये तत्वज्ञानाच्या अवकाशातील लखलखते तारे राहीले व आहेत त्या विचारसुर्याला राजकारणातले काही कळले नाही असे म्हणणा-या आणि विचारांचे ध्रुवीकरण झालेल्या पुर्वग्रह दुषित नालायकांना बापु लायक कसे काय वाटतील???

पद, पैसा व प्रतिष्ठेचा दुरान्वयेही मोह नसलेल्या महात्म्याला धन व राजकारणाचा बेसुमार हव्यास असणारेच जेव्हा हिन लेखतात तेव्हा त्यांना गांधीवाद म्हणजे काय हे विचारण्यात काय अर्थ आहे? 
गाढवांपुढे गीता वाचण्यात काय अर्थ आहे? जग क्रोधाने नव्हे तर प्रेमाने जिंकता येते हे ज्यांनी जगाला शिकविले ते प्रसन्नतेचे पुजारी बापु, या अशा बदमाशांमुळे बदनाम होत आहेत.

एखाद्याशी वैचारिक मतभेद समजले जाऊ शकतात. बापुंचे व तत्कालीन काही नेत्यांचे विचारवंतांचे परस्परांशी मतभेद होते मात्र शेवटी ते सर्वचजण बापूंना आदर्श मानतात. मात्र आताचे काही मिश्रविचारी लोक बापुंवर खालच्या स्तराला (अर्थात स्वतःच्याच) जाऊन टिका करतात, चिखलफेक करतात, कमेंट्स करतात, जोक्स करतात तेव्हा मला खुप वाईट वाटते. म्हणजे मला कळत नाही, सव्वाशे वर्षे ज्यांचे विचार मानवजातीला तारत आहेत ते गांधीजी मुल्यहीन कसे काय असु शकतात??

चला मला एवढे समजायला जास्त वेळ लागत नाही की जो राजकीयदृष्ट्या, धार्मिक द्रुष्ट्या, वैचारिक द्रुष्ट्या उदासीन (न्युट्रल) राहतो, तो शेवटी एकटा पडतो. गांधींनी सर्वांसाठी कार्य केले, सर्वांसाठी विचार मांडले पण शेवटी गांधी कुणाचे? असे म्हणायची वेळ आली. एक मात्र नक्की की गांधींना कितीही बदनाम करण्याचा आणि नियोजनपूर्वक संपविण्याचा प्रयत्न केला तरी असा नथुराम गोडसे जन्माला येऊच शकत नाही जो गांधी विचार संपवू शकेल. कारण बापू माणसाच्या मनामनात आसनस्थ आहेत.

मला वाटते ज्यांना बापूंचे केसविरहीत डोके तर दिसते परंतू डोक्यातील अमुल्य विचार समजत नाहीत, साधा चष्मा तर दिसतो पण त्यांची दुरद्रुष्टी व प्रेमदृष्टी दिसत नाही, खादीचा धोती-पंचा तर दिसतो पण त्यातील बेडागपणा साधेपणा स्वावलंबन व स्वदेशप्रेम दिसत नाही, त्यांची आधाराची काठी तर दिसते पण त्यांनी त्याच काठीच्या आधाराने भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना कसा आधार दिला ते दिसत नाही, त्यांची किरकोळ देहयष्टी तर दिसते पण त्यातील पोलादी द्रुढनिश्चय दिसत नाही, त्यांना समजावण्यात आणि आपलाच वेळ खर्च करण्यात काय अर्थ आहे????

म्हणून महामानव, युगपुरुष, युगप्रवर्तक, राष्ट्रपिता, महात्मा गांधी यांना एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्व गांधीवादी भावाबहीणींना मनःपूर्वक शुभेच्छा🌷 आणि जे बापूंना नावे ठेवतात त्यांनी दररोज सकाळी महात्मा गांधींजींचे अत्यंत आवडते असे संत नरसिंह मेहता यांचे गुजराती भजन जे त्यांच्या नित्य प्रभात प्रार्थनांमधील अविभाज्य घटक होते ते, "वैष्णव जन तो तेने कहिये..." हे भजन नक्की वाचावे व ऐकावे! विचारात फरक पडेल!.बाकी जास्त बोलण्यात काही अर्थ नाही कारण बापूच म्हटलेत, मौनं सर्वार्थ साधनं!!

‘वैष्णव जन तो तेने रे कहिए जे पीड़ पराई जाणे रे।
(खरा वैष्णव तोच आहे, जो दूस-याचे दुःख समझू शकतो) 

‘पर दु:खे उपकार करे तोये, मन अभिमान ना आणे रे1॥’ 
(दूस-याच्या दु:खावर जर उपकार केले, तर आपल्या मनात कसलाही अभिमान येऊ देत नाही)

‘सकल लोक मां सहुने वन्दे, निंदा न करे केनी रे।’
(जो सर्वांचा सम्मान करील आणि कुणाचीही निंदा करणार नाही)

 ‘वाच काछ मन निश्छल राखे, धन धन जननी तेनी रे॥2॥’
(जो आपली वाणी, कर्म आणि मन निश्छल रखील, त्याची आई धन्य-धन्य आहे)

‘समदृष्टि ने तृष्णा त्यागी परस्त्री जेने मात रे।’
(जो सर्वांना समान दृष्टिने पाहील, सांसारिक तृष्णेपासुन मुक्त होईल,  परस्त्रीला आपली आई समझील)

‘जिह्वा थकी असत्य न बोले, पर धन नव झाले हाथ रे॥3॥’
(ज्याची जिभ असत्य बोलताना थांबेल व जो दूस-याचे धन मिळविण्याची इच्छा बाळगणार नाही)

'मोह माया व्यापे नहिं जेने दृढ़ वैराग्य जेना मन मां रे।’
(जो मोह मायामध्ये गुरफटणार नाही, ज्याच्या मनात दृढ़ वैराग्य असेल)

’राम नाम शु ताली रे लागी, सकल तीरथ तेना तनमां रे॥4॥’
(जो प्रत्येक क्षणाला मनात राम नामाचा जप करतो, त्याच्या शरीरात सर्व तीर्थ विद्यमान असतात)

‘वणलोभी ने कपट रहित छे, काम क्रोध निवार्या रे।’
(ज्याने लोभ, कपट, काम आणि क्रोधावर विजय प्राप्त केला असेल)

‘भणे नरसैयो तेनु दर्शन करतां, कुल एकोतेर तार्या रे॥5॥’
(अशा वैष्णवाचे केवळ दर्शन घेतले तरी, त्याच्या परिवाराच्या एकाहत्तर पिढ्या तरून जातात)

(बाळासाहेब धुमाळ)

No comments: