Saturday 13 October 2018

आक्रोश

भटके विमुक्तांचे (VJNT) राज्यव्यापी आक्रोश आंदोलन:⚡️🔥
मित्रांनो लोकशाहीमध्ये बहुसंख्यांकांना काहीसे झुकते माप असते. अल्पसंख्यांकडे दुर्लक्ष केले जाते. विशेष म्हणजे हे दुर्लक्ष जाणीवपूर्वक केले जाते कारण संख्यात्मकता ही लोकशाहीची ओळख बनली आहे. कटु वास्तव हे आहे की आज जो समाजघटक संख्यात्मकदृष्ट्या मोठा असेल, राजकारणी, शासन आणि प्रशासन त्यांचेच प्रश्न प्राधान्याने सोडवतात! वास्तविक पाहता असे व्हायला नको आहे. ज्यांच्या प्रश्नात सत्यता आहे, आर्तता आहे, गंभीरता आहे त्यांचे प्रश्न शासनकर्त्यांनी प्राधान्याने सोडवायला हवेत. हिच मानवतेची शिकवण आहे व नैतिकतेचे सुत्र आहे.

परंतु भटक्या विमुक्त लोकांचे प्रश्न वर्षोनुवर्षे रखडलेलेच आहेत. इंग्रजांच्या राजवटीत तर ते अधिकच तीव्र झाले व स्वतंत्र भारतात राजकारणापलीकडे, राजकीय पक्ष विचारच करताना दिसत नाहीत. भटक्या विमुक्त जमाती संघटित नाहीत. आपली स्थिती जरी बिकट असली, प्रश्न जरी तिव्र व रास्त असले तरी व आजवर आपण वेळोवेळी शासन दरबारी ते मांडलेही असले तरी अद्यापही सुटले नाहीत. तसे ते हवे तेवढ्या प्रभावीपणे मांडलेच गेले नाहीत हे ही वास्तव आहे. मांडणारांनी पुरेपूर प्रयत्न केला परंतु जनसामान्यांचे पाठबळ हवे तेवढे लाभले नाही. भटक्या-विमुक्तांच्या जमातीय संघटना तसेच जमातींच्या मिळून भटके विमुक्त शिर्षकाखाली काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. परिणामी आपली शक्ती विभागली गेली आहे. आपापसात समन्वय नाही, निश्चित ध्येयधोरण नाही. नियोजनबद्धता व रणनीती नाही. एकमेकांना सहकार्य तर सोडाच विरोध कसा करता येईल हेच आपण आजवर पाहिले आहे!! त्यामुळे एकीचे बळ कधी दिसुनच आले नाही ही शोकांतिका आहे.

चळवळीत सूर्य उगवणे गरजेचे असावे, आरवणारा कोंबडा कोणाचा का असेना! शिवाय भटक्या-विमुक्तांच्या समस्या सोडविण्याची चळवळ ही केवळ आणि केवळ प्रश्नांशी बांधिलकी जपणारी असावी, कोणा राजकीय पक्षाशी अथवा विचारधारेशी किंवा गटातटाशी चळवळीचे काहीही देणे-घेणे नसावे हे अद्यापही आपल्या लक्षात आलेले नाही. छोटे मोठे मेळावे भरवणे, स्थानिक नेत्यांवर प्रभाव पाडून लहान सहान वैयक्तिक व सामाजिक कामे करून घेणे यापलीकडे संघटीततेचा काहीही फायदा झाला नाही.  आपले राज्यस्तरीय व देशस्तरीय प्रश्न अनुत्तरितचे अनुत्तरीतच राहिले! दुर्दैवाने आपल्यात अनेक गटतट असल्याने व प्रत्येकामध्ये काहीसा अहंकार, काहीसा मी पणा दाटल्याने प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजतो, मोठा समजतो व आपल्या शिवाय चळवळीचे हे प्रश्न सुटूच शकत नाहीत अशा काल्पनिक आविर्भावात गुंतून जातो. परिणामी नाही म्हटले तरी चळवळ मंदावते कारण चळवळ म्हणजे विशिष्ट ध्येयप्राप्तीसाठी केलेला सार्वजनिक लढा! याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त होत नाही!

आज रोजी स्थिती इतकी बिकट आहे की, भटक्या विमुक्तांमध्ये म्हणजे व्हीजेएनटीमध्ये बुद्धिवादी लोकांची कमी नाही परंतु त्या बुद्धीचा उपयोग चळवळीसाठी होताना दिसत नाही. प्रत्यक्ष जमीन पातळीवर तन-मन-धनाने सक्रियरित्या काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची कमी नाही परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रसंगी पाठबळ मिळताना दिसत नाही. काही ध्येयवेडे लोक सर्वांना एकत्रित करून एकसंघपणे लढा उभारत आहेत मात्र त्यात लोक व संघटना सामील होताना दिसत नाहीत. आडपाय घालणे, खाली खेचणे या प्रव्रुत्तीमुळे समाजाचे अगणित नुकसान होत आहे.

आता हेच बघा ना, आपल्याला सामाजिक संरक्षण नाहीये. आपल्या बांधवांवर व माता भगिनींवर होणार्‍या अन्याय अत्याचाराची शृंखला संपता संपत नाहीये. शासन आपला आवाज ऐकत नाहीये कारण आपल्या आवाजात ताकदच नाहीये. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे इतरांना ज्ञान शिकविणारा आपला समाज, पक्षांचा थवा, जनावरांचा कळप, मधमाशांचे पोळे, मुंग्यांचे वारूळ , उसाची मोळी यांचा आणि एकजुटीचा काय संबंध आहे? आणि एकजुटीचा व अन्याय प्रतिकाराचा काय संबंध आहे? हे समजतो, इतरांना सांगतो परंतु स्वतःवर वेळ आली की समूहापासून चळवळीपासून अलिप्त राहतो! अन्याय आहे, अत्याचार आहे, शोषण आहे, निरक्षरता आहे, दारिद्र्य आहे, दुर्लक्ष आहे तरी एकजुट नाही!! गांभीर्य नाही, संरक्षण नाही, घटनात्मक आरक्षण नाही, निश्चित ध्येयधोरण नाही, उपाय योजना नाहीत, तरीही गर्व अहंकार आहे!! अजब आहे ना? अहो अशाने प्रश्न सुटतील कसे?

आपल्यातील काही महाभाग आहेतही असे की त्यांचे काही प्रश्नच नाहीत परंतु त्यांनी एवढे समजून घ्यावे की आपल्या पिढीचे प्रश्न संपले म्हणजे सर्व प्रश्न संपले असे नाही. पुढच्या पिढीचे काय आपण शिकले, सुधारले म्हणजे झाले का? आपली काही सामाजिक बांधिलकी नसावी काय? आपला पैसा नसु द्या परंतु आपली बुद्धी व आपला अनुभव ही समाजाची व चळवळीची संपत्ती आहे! ती अशी वाया घालवू नका. आपल्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, प्रश्न हाताळण्याची हातोटी आहे, समाजाला संघटित करुन सुयोग्य दिशा देण्याची क्षमता आहे, नेतृत्व करण्याची योग्यता आहे त्यामुळे चळवळीपासून अलिप्त राहू नका. आपले दैनंदिन कारभार सांभाळत थोडा वेळ आपल्या समाज बांधवांसाठी द्या. मित्रांनो समाजाला आर्थिक मदत करून प्रश्न सुटत नसतात उलट अशाने माणूस आळशी बनतो परंतु जाणीव जागृती करणे, मार्गदर्शन करणे, उद्बोधन व प्रबोधन करणे, स्वाभिमान जागा करणे, शासनाचे लक्ष वेधून घेणे, शासनाला समाजाच्या समस्यांच्या निराकरणासाठी समाजहीताचे निर्णय घ्यायला भाग पाडणे अशाने एक तर प्रश्न निर्माणच होत नाहीत आणि झालेले सुटल्याशिवाय राहत नाहीत.

भटक्या विमुक्तांना उठावाची अत्यंत प्राचीन पार्श्वभूमी आहे आता पुन्हा एकदा संघटित होऊन उठाव करण्याची वेळ आली आहे. किमान महाराष्ट्रात तरी भटके विमुक्त हक्क परिषद नियोजनबद्धपणे व सर्व जमातींना एकत्रित करून, सोबत घेऊन, संघटितपणे कागदोपत्री व रस्त्यांवर अशा दोन्ही पातळ्यांवर यशस्वीरित्या लढा उभारताना दिसत आहे. भटक्या-विमुक्तांची एक मध्यवर्ती संघटना म्हणून नावारुपास येत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपापले वैयक्तिक हित, मतभेद व गर्व अहंकार काही काळासाठी बाजूला ठेवून केवळ भटके विमुक्त म्हणून हक्क परिषदेच्या हाकेला ओ देवून राज्यव्यापी आक्रोश आंदोलनात सर्व शक्तीनिशी सामील व्हावे असे मला वाटते.

कोणीतरी दिव्य नेता निर्माण होईल! तो आपले प्रश्न शासनदरबारी मांडील व शासन आपले प्रश्न सोडविल अशा भ्रमात कोणीही राहू नये. आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागणार आहेत. त्याकरिता माणसे जागी करावीत, चळवळीशी जोडावीत, ध्येयाने प्रेरित करावीत व उद्दिष्टाशी बांधावीत असे मला वाटते. कारण या जगात विना सायास काहीही मिळत नाही. अगदी आई देखील आपल्या बाळाला रडल्या शिवाय दूध पाजत नाही! एकदा वेळ निघून गेल्यावर आक्रोश करून काही साध्य होत नसते. तेव्हा शहाण्यास अधिक बोलणे न लगे, सर्वांनी जागे व्हावे एकजूट व्हावे व संघर्ष करावा. अशक्त व लाचार लोक अन्यायापुढे मान झुकवितात तर सशक्त व स्वाभिमानी लोक अन्यायाविरुद्ध आंदोलन उभे करतात.

भटके विमुक्त हक्क परिषदेच्या राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाचा पहिला टप्पा नाशिक विभागात पार पडला आहे. विभागातील धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव व नाशिक या पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर वेगवेगळ्या दिवशी एक दिवसीय आक्रोश आंदोलन यशस्वीपणे पार पडले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे येथे आंदोलन होणार आहे. पहिल्या टप्प्यातील आंदोलनात सर्व 52 जमातींच्या सर्व संघटनांनी, कार्यकर्त्यांनी व विशेष म्हणजे कलावंत व महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. काही बिगर भटके विमुक्त संघटनांनी आंदोलनाला बिनशर्त जाहीर पाठींबा दिला. प्रसार माध्यमांनी पुरेपूर सहकार्य केले. त्यामुळे आता पुढील टप्प्यातील आंदोलन करण्यासाठी तयारीला लागा. लोकांना कल्पना द्या वातावरण तयार करा.

आपल्यापैकी अनेक जण आपापल्या जमातीत, जमातीय संघटनांचे पदाधिकारी आहेत. अनेक जण भटक्या-विमुक्तांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशा हक्क परिषदेसारख्या एखाद्या संघटनेचे पदाधिकारी आहेत परंतु या संघटना म्हणजे राजकीय पक्ष नाहीत आणि जरी काही संघटना राजकीय पक्षांची प्रेरित व प्रभावित असतील तरी मला वाटते. आपला समाज व आपल्या समस्या आणि राजकीय पक्ष यांचा काहीही परस्पर संबंध नसावा. प्रश्नांच्या अनुषंगाने आपण कोणीही असलो, कुठेही असलो, आंदोलनाचे आयोजक संयोजक कोणीही असले तरी एकत्र यायलाच हवे.

दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना कुणाला हक्क परिषदेमध्ये राज्य स्तरावर, विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर, शहर स्तरावर अथवा तालुकास्तरावर पद घेऊन खरोखरच जिम्मेदारी सांभाळायची आहे, ज्यांची सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची क्षमता आहे, काम करण्याची तयारी आहे, त्यांनी तशी इच्छा व्यक्त करायला हवी.  हक्क परिषद हे एक बिगरराजकीय, निस्वार्थी व पारदर्शक संघटन आहे. यात प्रत्येक स्त्री-पुरुषाला, प्रत्येकाच्या विचारांना व नेतृत्वगुणांना महत्त्व आहे. त्यांच्या उन्नतीस वाव आहे. आपल्यातील नेतृत्व क्षमता ही भटक्या विमुक्त जमातींची मालमत्ता आहे. तीचा विकास होणे, करणे काळाची गरज आहे.

मित्रांनो, मला जे बोलायचे ते मी बोललो. सदस्य होण्याची सक्ती नाही.पद घ्याच असा अट्टाहास नाही. इच्छुकांची कमी नाही परंतु सक्षम व लायक व्यक्तींची कोणत्याही संघटनेला आवश्यकता असते. त्यामुळे चळवळ भक्कम बनते. संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळायला हवी ज्यांच्या अंगी क्षमता असेल. नेतृत्वाची क्षमता असणारी माणसे कधीही मागे राहू नयेत म्हणुन हे नम्र आवाहन. असो सदस्य बनणे, पदाधिकारी बनणे ऐच्छिक आहे. आपण कुठल्या ना कुठल्या संघटनेचे सदस्य अथवा पदाधिकारी आहात म्हणजे आपण चळवळीतच आहात. त्यामुळे काहीही करा आणि हे राज्यव्यापी आक्रोश आंदोलन प्रभावी व परिणामकारक कसे होईल? यासाठी सर्वांनी संपूर्ण ताकदीनिशी तयारीला लागा.
धन्यवाद!!🙏

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
 मो. 9673945092.

No comments: