Friday 18 January 2019

महाराष्ट्र ठेलारी महासंघाचा प्रथम वर्धापन दिन

महाराष्ट्र ठेलारी महासंघाचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा,  समाजाची उत्फूर्त उपस्थिती....
 नवे भदाणे, ता. साक्री जि. धुळे
दि. 17.01.2019.

भटके-विमुक्त मित्रांनो नमस्कार....
मित्रांनो आपल्या सामाजिक एकजुटीचा, समाज जागृतीचा आणि समाजाला न्याय मिळवून देणे हेच अंतिम ध्येय असलेल्या भटके विमुक्त हक्क परिषदेचा या ध्येयाच्या वाटेवरील सहप्रवास दिवसेंदिवस अधिकाधिक जोमात होत आहे. ऊर्जेने मार्गक्रमण करीत असताना आनंदाने सांगावेसे वाटते की हक्क परिषदेसोबत भटक्या विमुक्तांच्या विविध संघटना खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत.

काल दिनांक 17 जानेवारी 2019 गुरुवार रोजी महाराष्ट्र ठेलारी महासंघाचा प्रथम वर्धापन दिन होता. त्यानिमित्ताने भटाई देवी मंदिर, नवे भदाणे, तालुका साक्री, जिल्हा धुळे येथे महासंघाचा प्रथम वर्धापन उत्साहात साजरा झाला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन साक्री विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार काँग्रेसचे मा. श्री. डी. एस. आहिरे यांनी दिप प्रज्वलन करून तसेच राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून केले. याप्रसंगी सर्व मान्यवरांचे घोंगडी देऊन स्वागत करण्यात आले.


{वर्धापनदिनाची क्षणचित्रे पहाण्यासाठी येथे क्लिक करा}👇
https://youtu.be/EKJNZPy_d6c

{हक्क परिषदेचे नाशिक विभाग अध्यक्ष मा. श्री. पुरूषोत्तम काळे सरांचे भाषण ऐकण्या-पाहण्यासाठी येथे क्लिक करा}👇
https://youtu.be/HtQhZCjfwBE

कार्यक्रमास उद्घाटक आमदार मा. डी. एस. अहिरे यांचे सोबतच शिवसेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष मा. हिलाल अण्णा माळी, धुळे मनपा चे माजी स्थायी समिती सभापती मा. श्री. सतीश तात्या महाले भटके विमुक्त हक्क परिषदेचे विभागीय अध्यक्ष श्री पुरुषोत्तम काळे  प्रदेश संघटक श्री साहेबराव गोसावी विभागीय संघटक श्री अशोक गिरी महाराज जिल्हा संघटक प्रकाश रामोळे  यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवय राज्याचे रोजगार हमी योजना तथा पर्यटन मंत्री आणि नंदुरबारचे  पालकमंत्री मा. ना. जयकुमार भाऊ रावल यांनीही कार्यक्रमास  पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात बोलताना व्यासपिठावरील सर्वच मान्यवर वक्त्यांनी भटक्या विमुक्त जमातींची परिस्थिती खरोखरच बिकट असल्याचे, त्यासाठी विशेष उपाय योजना केली जाण्याची आवश्यकता असल्याचे बोलून दाखविले. तसेच भटके-विमुक्तांच्या या न्याय्य लढ्यामध्ये त्यांचे संपूर्ण सहकार्य राहील अशीही त्यांनी ग्वाही दिली.

आमदार मा. श्री. डी. एस. अहिरे यांनी इदाते आयोगाच्या अंमलबजावणीमध्ये आपण विरोधी पक्षाचा आमदार म्हणून आपली चोख भूमिका बजावू व सरकारवर आयोगाच्या अंमलबजावणीसाठी दबाव आणू असेही ठणकावून सांगितले.

कार्यक्रमात सर्वाधिक प्रभावी व उपस्थितांच्या टाळ्यांचा प्रतिसाद मिळविणारे भाषण झाले ते म्हणजे  कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व मार्गदर्शक, भटके विमुक्त हक्क परिषदेचे नाशिक विभागीय अध्यक्ष मा. श्री. पुरुषोत्तम काळे सरांचे! मा. श्री. काळे सरांनी एकजुटीतून स्वास्तित्व निर्माण करण्याच्या महाराष्ट्र ठेलारी संघाच्या प्रयत्नांचे, त्यांच्या कार्यपद्धतीचे तोंड भरून कौतुक केले.  त्याबद्दल महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तसेच हक्क परिषदेचे नाशिक विभागीय संघटक मा. श्री. शिवदास वाघमोडे यांचे तसेच त्यांच्या सर्व सहकार्‍यांचे मुक्तकंठाने कौतुक केले. त्यांनी उपस्थित विराट जनसमुदायाचेही विशेष अभिनंदन केले व त्यांना एकजुटीचे महत्त्व समजून घेतल्याबद्दल धन्यवाद दिले.

आपल्या सविस्तर व अभ्यासपूर्ण भाषणात श्री. काळे यांनी भटक्या-विमुक्तांचे प्रश्न, ठेलारी समाजाच्या समस्या, मा. इदाते आयोग,  महाराष्ट्रातील राजकारणात व सत्ताकारणात भटक्या-विमुक्तांचा अभाव,  मिशन लेटर टु पीएम #Mission_Letter_To_PM इत्यादी विविध विषयांवर आपले विचार मांडले. त्यांनी महाराष्ट्र शासनाने नुकतेच वसंतराव नाईक भटके विमुक्त विकास महामंडळाला 300 कोटी रुपये देण्याच्या केलेल्या घोषणेचे स्वागत केले व त्याबद्दल सरकारला धन्यवाद दिले. व्यासपीठावरील शासकीय व राजकीय प्रतिनिधींना भटक्या-विमुक्तांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी त्यांच्या विशेष सहकार्याची नम्र मागणी केली तसेच मोदी सरकार, नक्की इदाते आयोग लागु करून आम्हा समस्त विमुक्त भटक्यांचे आशिर्वाद घेईल असा आशावाद व्यक्त केला.

कार्यक्रमास सुरुवात होण्यापूर्वी श्री. पुरुषोत्तम काळे यांनी भटके विमुक्त हक्क परिषदेचे प्रदेश संघटक मा. श्री साहेबराव गोसावी, नाशिक विभागीय संघटक श्री अशोक गिरी महाराज धुळे जिल्हा संघटक श्री. प्रकाश रामोळे, साक्री तालुका संघटक श्री. सखाराम गोंधळी यांच्यासोबत साक्री तालुकाध्यक्ष श्री गोटू जगताप  नितीन कांगणे नाना पेटकर या सह तालुका कार्यकारिणीने  साक्री येथील शासकीय विश्रामगृहात आमदार मा. श्री. डी. एस. अहिरे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी भटक्या विमुक्तांचे विविध प्रश्न, इदाते आयोगाची अंमलबजावणी, भटक्या-विमुक्तांचे राष्ट्रीय मिशन 'लेटर टु पीएम'  या विषयांवर मा. आमदारांसोबत सविस्तर चर्चा केली.

कार्यक्रमास उपस्थित प्रचंड जनसमुदायाने हक्क परिषदेच्या लेटर टु पीएम या लोकचळवळीत उस्फुर्त सहभाग घेतला. लागलीच जागचे जागी उपस्थितांमधून तब्बल दोन हजार तीनशे (2300) पत्रे, मिशन अंतर्गत माननीय पंतप्रधानांना पाठविण्यासाठी लिहून व लिफाफा बंद करून तसेच त्यावर पत्ता लिहून तयार करण्यात आली. नंतर कार्यक्रम संपल्यावर ती पोस्ट ऑफिसमध्ये संबंधित कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी हक्क परिषदेच्या व महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी खुप मेहनत घेतली. याप्रसंगी आमदार मा. श्री. डी. एस. अहीरे यांनी आपणही आपल्या लेटरहेडवर माननीय पंतप्रधानांना पत्र लिहून आयोगाच्या अमलबजावणीची मागणी करणार असल्याचे सांगितले.

 महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधुन महासंघाची 21 सदस्यांची प्रदेश कार्यकारीणी घोषित करण्यात आली शिवाय धुळे व नंदुरबार जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र विभागीय अशी तब्बल 90 प्रतिनिधींची जंबो कार्यकारीणीदेखील यानिमित्ताने जाहीर करण्यात आली. या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले ते समाजाचा समंजसपणा! प्रसिद्धी व श्रेयासाठी लोक आज काय नाही ते करतात परंतु या कार्यक्रमात मात्र तसे काहीही दिसले नाही. व्यासपीठावर निमंत्रित मान्यवरांशिवाय इतर कोणीही आले नाही. तसेच एवढेच काय तर कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका बॅनर यावरही संघटनेचे नाव व मान्यवर निमंत्रित केवळ  यांचीच नावे होती. ना स्वागत हार तु-यासाठी नाराजी दिसली, ना भाषणबाजी दिसली, ना फोटोबाजी दिसली!! या बद्दल भटके विमुक्त हक्क परिषद समस्त ठेलारी समाजाचे मनापासून कौतुक करते व महासंघास पुढील काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देते.

एका सुंदर अशा यशस्वी आयोजनाबद्दल आमचे नाशिक विभागीय संघटक व महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. शिवदास वाघमोडे यांचे,  महासंघाचे उपाध्यक्ष श्री. रामदास कारंडे, सचिव श्री. दिनेश सरक, सरचिटणीस श्री. सुरेश सरक, खजिनदार श्री.  ज्योतीराम कर्नर, संपर्क प्रमुख श्री. गोरक सरक, कार्याध्यक्ष श्री. अभिजीत मारनर, प्रसिद्धीप्रमुख श्री. मोतीराम गरदरे, सरचिटणीस श्री. गोकुळ सरक, सल्लागार  श्री. अश्विन मारनर, सहसचिव श्री.  प्रवीण खामगळ, संघटक श्री. विलास गरदरे, सरसेनापती श्री. पंकज मारनर, कार्यवाहक श्री. काशिनाथ सोनकर, विस्तारक श्री. मनोहर रूपनर, सल्लागार श्री. लखन कुरूंगले महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या कार्यकरणीचे व इतर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आणि समस्त ठेलारी समाज बांधवांचे अभिनंदन करते आणि महासंघाच्या भावी यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते.

बाळासाहेब धुमाळ
प्रवक्ता तथा प्रसिद्धीप्रमुख
भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य
मो. 9421863725.

Monday 7 January 2019

जुळता जुळता जुळतंय की....

जुळता जुळता जुळतंय की....
                  मित्रांनो, आपल्या विमुक्त भटक्या समाजाच्या संघटनांनी, कार्यकर्त्यांनी एखाद्या विधायक कार्यक्रमासाठी तात्काळ तयार होणे, त्यात त्यांनी स्वतःला झोकून देणे हे अलीकडच्या काळामध्ये तसे सहसा पाहायला न मिळणारे चित्र!! परंतु कालचा रविवार भटक्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.....

             काल दिनांक 06 जानेवारी 2019 रोजी अकोला येथे सकल नाथपंथी समाज संघटना अकोला व विमुक्त भटक्या जाती जमाती संघटना अकोला यांची एक संयुक्त सहविचार सभा संपन्न झाली. सभेमध्ये संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सभेचा विषय होता "मिशन लेटर टू पीएम" मध्ये सहभाग नोंदवणे. त्या अनुषंगाने विविध संघटनांच्या लेटर हेडवरून तसेच वैयक्तिक अधिकाधिक पत्रे माननीय पंतप्रधानांना कसे पाठवायचे ? यावर सखोल चर्चा व विचार विनिमय झाला. त्यानुसार नियोजन करण्यात आले . जबाबदारी वाटून देण्यात आली. अनेकांनी ती स्वतःहून स्वीकारली. झेरॉक्स देणे, पाकिटे देणे, पत्ता लिहायला मदत करणे अशी कामे अनेकांनी स्वतःहून स्वीकारली. या आठवड्यात अधिकाधिक प्रत्यक्ष भेटी घेऊन, घरोघरी जाऊन समाजाला तसेच विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना भेटून मिशन लेटर टू पीएम ची आवश्यकता पटवून देऊन त्यामध्ये सहभागी होण्याची विनंती करण्याचे ठरले.

                  बैठकीस सकल नाथपंथी समाज संघटनेचे राज्य सचिव श्री. मनोहर इंगळे, अकोला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्री. राजिवनाथ कासार, सचिव श्री. रविंद्र सुुरंंसे, विमुक्त भटक्या जाती जमाती संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. राजेश पेंढारी, शहराध्यक्ष व बीजेपी विमुक्त भटक्या जाती जमाती सेलचे शहर उपाध्यक्ष श्री. गजानन वाडेकर, सरचिटणीस श्री.पंढरी दोरकर, सचिव श्री. गणेश पाचपोर, श्री. देवानंद राठोड, प्रसिद्धी प्रमुख श्री. चंद्रकांत महाजन तसेच श्री. नरेश गहलोत, श्री. किशोर पवार, श्री. दिनेशनाथ पाठक इत्यादी अनेक कार्यकर्ते हजर होते.

                   कालच एका दुसऱ्या कार्यक्रमानेही सर्वांचे लक्ष आकर्षित केले. तो कार्यक्रम म्हणजे गोपाळ समाजहित महासंघ चाकण, राजगुरूनगर (खेड) पुणे जिल्हा आयोजित "समाज महामेळावा व पुरस्कार वितरण सोहळा". या महामेळाव्याचे अध्यक्ष होते, प्रगतशील व्यापारी श्री.दत्तात्रय चौगुले तर या महामेळाव्याचे उदघाटन झाले खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार शिवसेनेचे मा.श्री. सुरेश भाऊ गोरे यांच्या हस्ते. कार्यक्रमास गोपाळ समाजहित महासंघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली ज्यात राज्याध्यक्ष श्री.प्रभाकर तपासे, राज्य कार्याध्यक्ष श्री. संजय गव्हाणे, राज्य उपाध्यक्ष श्री.सुभाष गव्हाणे, प्रदेशाध्यक्ष श्री.गोविंद गव्हाणे इत्यादींचा समावेश होता.
  

                   राज्यातील सर्व 52 विमुक्त भटक्या जमातींचे एक प्रभावी संघटन बनत चाललेल्या भटके विमुक्त हक्क परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. श्री. धनंजय ओंबासे, सचिव प्रा. श्री. सखाराम धुमाळ, युवा आघाडीचे सचिव श्री. प्रतिक गोसावी, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री. भिमराव इंगोले, श्री. सुरेश शिंदे, अल्पसंख्यांक आघाडीचे श्री. येलान बरमावला, श्री. नयिम शेख, गोपाळ समाजाचे पदाधिकारी श्री. संजय गव्हाणे ही मंडळी मेळाव्यास खास मुंबईहुन आली होती.


                    मेळाव्यामध्ये समाजातील कर्तबगार समाज बांधवांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्याचबरोबर समाजाचा इतिहास, वर्तमान व भविष्य, समाजासमोरील समस्या व आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना व कारवाई, त्यासाठीचे पुर्वनियोजन यावरही भाषणे करण्यात आली परंतु प्रामुख्याने इदाते आयोगाच्या अमलबजावणीच्या मागणीसाठी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय मिशन लेटर टु पीएम यावर विशेषत्वाने चर्चा झाली. उपस्थितांना भटके विमुक्त हक्क परिषदेचे राज्याध्यक्ष प्रा. श्री. धनंजय ओंबासे यांनी मिशन लेटर टु पीएम बद्दल मार्गदर्शन केले. आपल्या सर्व विमुक्त भटक्या जमातींनी हेवे- दावे, गट-तट, श्रेयवाद बाजूला ठेवून आपापल्या संघटनांच्या माध्यमातून, समाजाच्या माध्यमातून तसेच व्यक्तिशः या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे कळकळीचे आवाहन केले.

                        महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद सभागृहात गोपाळ समाजाचा एक तरी आमदार असावा अशी जोरदार मागणी झाली. त्यासाठी गोपाळ समाजाचा उमेदवार म्हणून वाशिम मधुन विधानसभेसाठी श्री. संजय गव्हाणे यांना निश्चित करण्यात आले.



 या महामेळाव्याला महीला व पुरूषांची अक्षरशः हजारोंच्या संख्येने उपस्थिती दिसुन आली. या यशस्वी आयोजनासाठी गोपाळ समाजहित महासंघाच्या चाकण, राजगुरूनगर (खेड) पुणे जिल्हा यांचे व प्रदेशाध्यक्ष श्री. नंदकुमार पवार यांचे मी मनःपूर्वक कौतुक करतो. एक आदर्श मेळावा घेऊन दाखविला या बद्दल मी व्यक्तिशः या सर्वांचे मनःपूर्वक कौतुक करतो, त्यांचे अभिनंदन करतो व आभारही व्यक्त करतो. इच्छा असुनही व पुण्यापासून जवळ असुनही बाहेरगावी गेल्यामुळे मी मेळाव्याला उपस्थित राहु शकलो नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. 

               मला वाटते, हाच आदर्श इतर सर्व समाज संघटनांनी घेऊन आपापल्या स्तरावर बैठका घेऊन ,भेटीगाठी वाढवून मिशन लेटर टू पीएम मध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे. त्याचबरोबर सर्व संघटना, सर्व जमाती व सर्वपक्षीय नेत्यांचे अभ्यासकांचे सामाजिक कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन माननीय राष्ट्रपती महोदयांची, माननीय पंतप्रधानांची, माननीय सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांची, माननीय रोहीणी आयोगाची, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असणाऱ्या मंत्र्यांची, माननीय बीजेपी अध्यक्षांची, आपापल्या खासदारांची भेट घ्यावी. त्यासाठीचे नियोजन अशा बैठकांमधुन व मेळाव्यांमधुन करावे. ज्यांना-ज्यांना, जेथे-जेथे,  जे-जे शक्य असेल, त्यांनी-त्यांनी, तेथे-तेथे, ते-ते करावे. 

                  अलीकडच्या काळामध्ये मी काही जातीय संघटनांचे, काही कार्यक्रम पाहीले. जिथे तेच तेच जुने विषय घेऊन त्यावर चर्चा करण्यात आली. खरे तर हे नेहमीच होत आले आहे आजवर, परंतु अजून तरी याचा काहीही उपयोग झालेला नाही. भाषणे, स्वागत, सत्कार, कार्यकारिणी गठन, पुरस्कार, फोटो शेशन, खानपान आणि बातम्या... झाले!! परंतु खऱ्या अर्थाने समाजाचे प्रश्न सोडवू शकतील अशा मुद्द्यांवर किंवा अशा उपायांच्या नियोजनावर चर्चा होत नाही. नियोजन झाले तरी त्यावर कार्यवाही होत नाही. सर्वांकडून समर्थन दिले जात नाही. सहकार्य केले जात नाही. त्यामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला जात नाही. केवळ समाजाच्या बैठका बोलून मेळावे घेऊन समाजाचे काही भले होणार नाही.  त्यामुळे मला वाटते, पुढच्या काळामध्ये होणाऱ्या बैठका, मेळावे यांमध्ये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रणनीती ठरविली जावी परंतु मागणी एकच असावी, ती म्हणजे इदाते आयोगाची अंमलबजावणी किंवा रोहिणी कमिशनची अमलबजावणी. हेच विषय समोर ठेवून त्या दृष्टीने रणनीती ठरवली गेली पाहिजे.थोड्या वेळासाठी प्रसिद्धी ,श्रेय, संघटना, समाज बाजूला ठेवून सर्व 52 जमातींनी जर एकजुटीने प्रयत्न केले तर इदाते आयोगाची अंमलबजावणी सरकारला करावीच लागेल. किमान त्यावर अधिकृत भाष्य तरी करावे लागेल. आजवर ज्या ज्या संघटनांनी व वैयक्तिक समाज बांधवांनी मिशन लेटर टू पीएम मध्ये सहभाग घेतला त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद देतो. आपण हे दाखवून दिले की ठरवले म्हणजे होते. इच्छा असेल तर काहीही केले जाऊ शकते. जुळता जुळता जुळू शकते......!  धन्यवाद. #Letter_To_PM.

आपलाः
बाळासाहेब धुमाळ
मो. 9421863725.