Tuesday 29 December 2020

लोकशाहीचा लिलाव

 #लोकशाहीचा_लिलाव

नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे गावच्या सरपंचपदासाठी झालेला लिलाव हा एकार्थाने लोकशाहीचाच लिलाव आहे. २ कोटी ५ लाखांत सरपंचपदाचा लिलाव करून उमराणे गावच्या पुढाऱ्यांनी हे दाखवून दिलेय की सत्ता ही पैशाने खरेदी केली जाऊ शकते. जनमताला संपत्तीच्या जोरावर थोपवले जाऊ शकते. सत्तेचे विकेंद्रीकरण, सत्तेत समान वाटा, कायदा, राज्यघटना यातील काहीच पैशांपेक्षा मोठे नाही हे यांनी दाखवून दिलेय. संपुर्ण पॅनल बिनविरोध निवडून आणण्यासाठी उमेदवारांनीही अक्षरशः पैशाचा पाऊस पाडला!!

एवढेच नाही तर लिलावाचा हा पैसा ग्रामदैवत रामेश्वर महाराजांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरला जाणार आहे हे विशेष!! म्हणजे जणुकाही गावात सर्वच एकाच धर्माचे आहेत, सर्वचजण आस्तिक आहेत!! जणुकाही गावात शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी, रस्ते, नाल्या, पथदिवे, सोलर प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प, कचरा प्रक्रिया प्रकल्प, खत निर्मिती प्रकल्प, सार्वजनिक शौचालये हे सर्व काही मुबलक प्रमाणात आहे!!! गावात कुणीही गरिब नाही, बेघर नाही!! शाळा, आंगणवाडी, वाचनालय, क्रिडांगण, व्यायामशाळा, दवाखाना, बाग-बगिचा, सर्व काही पुरेसे आहे!!! जलसंधारण, बचतगट, सामुहिक रोजगार निर्मिती, व्यवसाय प्रशिक्षण शिबिरे, स्वरक्षण शिबिरे यांची गरजच नाही!!!

काय मुर्खपणा आहे हा!!

मुळात तर कुठलीही निवडणूक ही बिनविरोध होऊ नये..कारण यामुळे सामान्य माणसाच्या निवडणूक लढण्याच्या व निवडून देण्याच्या अधिकाराचीच हत्या होते. ताकदवान, धनदांडग्या, बहुसंख्य व गुंडप्रव्रुत्तीच्या लोकांकडून सामदामदंडभेद वापरून येनकेनप्रकारेण सत्ता हस्तगत केली जाते व गोरगरिबांना, दुर्बलांना, सामाजिक द्रुष्ट्या मागासांना, अल्पसंख्यांकांना सत्तेपासून दुर ठेवले जाते. त्यामुळे अशा लोकशाही व घटनाविरोधी क्रुत्यांचा निषेध करायला हवा व अशा लोकांवर कायदेशीर कारवाई व्हायला हवी अन्यथा सर्व लोकप्रतिनिधी बोली लावुन खुर्चीत बसतील!!

असे आताच घडलेय असे नाही. यापुर्वीही असा लोकशाहीचा बाजार भरलेला आहे. यापुर्वीही सत्तेची विक्री झालेली आहे. आणि हे असेच चालत राहीले तर तो दिवस दुर नसेल जेव्हा अंबानी अदानी सारखे धनाढ्य उद्योगपती आपले पॅनल तयार करतील व लागेल तेवढा पैसा ओतुन आपल्या मुठीतील माणसे सरकारमध्ये पाठवतील!!  एका दारूच्या बाटलीवर मत विकणाऱ्या आपल्या देशात अगदी श्रीमंत, सुशिक्षित व बुद्वीजीवी देखील आपले मत विकताना मी पाहीलेय!! त्यामुळे प्रती मतदार हजार रुपये जरी दिले तरी, साधारणपणे 92000 कोटींंमध्ये सरकार तयार होऊ शकते!! आणि त्यांच्या सारख्यांसाठी ही मोठी रक्कम नाही!! शिवाय ती वसुल कशी करायची हे ही त्यांना ठाऊक आहे!ग्रामीण भागातील एक जुणी म्हण आहे, "दराची माती दरालाच लावायची!" किंवा "देवाचे घ्यायचे व देवालाच लावायचे"! अर्थात आपला हिस्सावाटा काढून हं!!! त्यामुळे लिलाव किंवा बोली तर सोडाच, बिनविरोध निवडणूक देखील लोकशाहीसाठी घातक व ताकदवान बहुसंख्यांक धनदांडग्यांसाठी पोषक आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे.


#बाळासाहेब_धुमाळ

Thursday 10 December 2020

तीन कृषी कायदे

 या नव्या तीन कृषी कायद्यांमुळे काय होणार आहे??


शेतकरी बांधवांनो, मी बाळासाहेब धुमाळ  तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, या कायद्यामुळे सुरूवातीला आपल्याला ब-यापैकी आर्थिक फायदा होणार आहे परंतु पुढे पुढे आपण नाडले जाणार आहात, टाळले जाणार आहात, वेठीस धरले जाणार आहात, एपीएमसीज बंद होणार आहेत आणि परिणामी आपण  पर्यायहीनतेतुन आपण निराश व हतबल होऊन बड्या उद्योजकांचे गुलाम होणार आहात!


 हळूहळू आपण शेती विकायला लागाल!! खरेदी करणारेही अदानी अंबानीच असतील आणि अशाप्रकारे आपल्या सर्व जमीनी कंपण्यांच्या मालकीच्या होणार आहेत!

आपण मुळ शेतकरी भुमिहीन होणार आहे!!


एवढेच नाही तर यामुळे मुळशी पॅटर्न बलशाली बनणार आहे. जोर जबरदस्ती व बळाचा वापर करून आपल्या जमिनी कॉर्पोरेटर्सच्या घशात घालण्यासाठ स्वार्थी भाई एजंट्स सक्रिय होणार आहेत. दुर्दैवाने आपल्याकडे कुठलाही पर्याय असणार नाही. त्यामुळे आपण या तिन्ही कायद्यांना विरोध करणे गरजेचे आहे.


याचा आणखी एक दुष्परिणाम मी तुम्हाला सांगतो, जेव्हा कंपन्या तुमच्याशी कॉन्ट्रॅक्टक्ट करतील, तेव्हा ते तुमच्याकडून वेगवेगळ्या भाज्या फळे अन्नधान्य तृणधान्य कडधान्य यांची अपेक्षा करणार नाहीत तर ते केवळ जागतिक मागणी असणारी थेट नगदी पिके पिकवण्यासाठी तुमच्यावर दबाव आणतील!! परिणामी आपल्या ताटामध्ये जी खाद्यान्न वैविध्यता आज आहे ती भविष्यात असणार नाही!!


आता शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेवर किंवा मार्केटमध्ये जो खुल्या स्वरूपातील शेतमाल आहे, आपण विकताय, तो मिळणार नाही! सर्व माल हा कंपनीच्या पॅकेट्समध्ये आणि चढ्या दराने खरेदी करावा लागेल, सर्वांनाच अगदी तुम्हालाही!!


 आणखी एक दुष्परिणाम जो मला दिसतो तो मी तुम्हाला सांगतो, यामुळे म्हणजे या कायद्यांमुळे एकाधिकारशाही आणि कंपनीशाही अस्तित्वात येणार आहे. ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी आठवतेय ना?? शिवाय यामुळे यांत्रिकीकरण वाढणार आहे. तंत्रज्ञानाचा अतिरिक्त वापर होणार आहे परिणामी शेतमजूर, हमाल, चालक, छोटे-मोठे उद्योजक, व्यापारी, दुकानदार बेरोजगार होणार आहेत आणि शेतकरी तर म्हणजे आपण तर निव्वळ गुलाम होणार आहात!!


 त्यामुळे जवळचे पाहू नका, दूरवरचे पहा. आपण जगाचे पोशिंदे आहात. नक्कीच आपल्या श्रमाचे मोल व्हायलाच पाहिजे, आपल्या मालाचे मोल व्हायलाच पाहिजे, आपल्याला विविध सोयी सुविधा सवलती सहकार्य मिळायलाच पाहिजे परंतु आपल्या जमिनीही आपल्याच नावावर राहिल्या पाहिजेत.


 आपण खुप श्रेष्ठ आहात, आपण बळीराजाचे वंशज आहात. म्हणून आपला कणा व बाणा ताठ राहिला पाहिजे. निश्चितच आपल्या हक्क अधिकारांचे रक्षण व्हायला पाहिजे. आपल्याला आर्थिक सहकार्य मिळायला पाहिजे परंतु हे यावरील उत्तर नाही. हे म्हणजे हे तीन कृषी कायदे. यावरील उत्तर म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समित्या सशक्त करणे, हमीभाव वाढवून देणे, विमा पॉलिसी शक्तिमान करणे, व्यवहारात पारदर्शकता आणणे, पिक पूर्व व पिकोत्तर आर्थिक सहकार्य करणे, नैसर्गिक संकटात मदत मिळणे, आवश्यक सोयी सुविधा गरजा जसे की पाणी वीज बी-बियाणे खते अवजारे यासाठी आर्थिक मदत करणे आवश्यक आहे परंतु अशा कायद्यांमुळे केवळ कॉर्पोरेटर्स मोठे होणार आहेत व आपण भिकारी होणार आहात.


बांधवांनो, पृथ्वीतलावरील जमिनीचे आपण मालक आहात👆 आपण अन्नदाते आहात, आपण सर्वात सर्वात श्रीमंत आहात 👆आणि ही श्रीमंती, या कायद्यांमुळे आपल्याकडून हिरावून घेतली जाणार आहे🙏


बांधवांनो मी जन्मापुर्वीपासुन शेतकरी आहे, माझा जन्म शेतातच झाला व बालपण शेतातच गेले, आज मी शेतकरी नाही परंतु पुन्हा शेतकरी बनण्यासाठी धडपड करतोय कारण समजून चुकलोय, वावर है तो पॉवर है.👍


बाळासाहेब धुमाळ

मो. 9421863725

Monday 2 November 2020

BUDGET 2019

 Reminder

BUDGET 2019... DNT

Friends, let's see what in-charge finance minister respected Mr. Piyush Goyal said in his budget speech for we Denotified, Nomadic and Semi- nomadic tribes today......?

"Our government is committed to reach the most deprived citizens of this country. To this end, the condition of the denotified, Nomadic and semi-nomadic communities, which are Vimukt,  Nomadic and semi-nomadic, the government this time has paid special attention towards these communities."

"These communities are hard to reach, less flexible and therefore frequently left out. The Nomadic and semi-nomadic communities move from place to place in search of a livelihood. Renke commission and Diste commission have done a commendable work to identify and least these communities."

"A committee under Niti Aayog will be set up to complete the task of identifying denotified Nomadic and semi-nomadic communities, Not yet formerly classified."

"The government will also set up a welfare development board, under the ministry of Social justice and empowerment, specially for the purpose of implementing welfare and development programmes for denotified Nomadic and semi-nomadic communities."

"The board shall ensure that special strategies are designed and implemented to serve these hard to reach communities. This board which is going to be formed, welfare development board, will in a way, care for the overall development of this class  and work for implementing and delivering the benefits of the schemes."

Guys, first of all I would like to thank heartily,  for the announcements made and the promises given by an acting Finance Minister Mr. Piyush Goyal. friends, actually these are the only announcements. These are the only promises.  Actually these could be given a year ago and brought to the implementation till now. But, but, ... What I can say???

The Welfare development board, what the government is saying about, we have in our  Maharashtra state, named as Vasantrao Naik DNT financial development board, which is always budget less!!

Even today also, the government didn't clarify about the structure of special committee which will it form under Niti Aayog, will it go through a Constitutional Amendment as OBC commission went? Will it have a constitutional status? Will it be a Commission or committee only?  Friends, the work which will be given to this community, that is  making the identification of those communities which are not yet classified under any category,  is actually done by the Renke commission and the Idate Commission. Doesn't it mean that these are the only promises once again? An intention behin these promises is the forthcoming Lok Sabha election. I don't say that don't go with BJP and/or with their alliance. But I mean to say that these are the only announcements and promises made today. These could be given in a regular cabinet meeting and completed some of these promises before the elections. Who can tell the government that the whole DNT India was hoping for an announcement of an implementation of Idate commission! The declaration of decision of constitutional safeguards resulting in creation of third separate schedule, announcement of repealing of habitual offenders act, protection under atrocities act and much more. But nothing happened, nothing announced.

 What the government actually has given to us, that too subject to allocation is three crore rupees for an educational and economical development of 15 crore deprived and the most downtrodden population of this country!! It means only 20 paise per head!!  Now can you think about a development in such a huge budget?? Which is nothing but a expenditure value of any leaders offspring's marriage ceremony or any big election campaign meeting!!!


Balasaheb S. Dhumal

Mob. 9421863725.

पालात आम्ही तुझी देवा वाट पाहतो...

देवा तुझ्या दयेची आम्हास आस आहे,

 भटकी ही जिंदगी रे बघ उदास आहे!

काळोख दाटले रे, पहाट पाहतो,

पालात आम्ही तुझी, देवा वाट पाहतो...




जीवन गरजा पूर्ण करून,

किमान संधी देशील कधी?

अस्तित्वाच्या लढाईत, 

विजयी आम्हा करशील कधी?

विजयी पताका डोलवायला,

गुलाल हवेत उधळायला

आम्ही सारेच व्याकूळतो...




देवा तू कृपावंत, कोमल तु अंतरी!

कृपा तुझी दगडांचीही, फुले करणारी!

तरी का रे काटे रुतलेल्या

पायांनाही शाळा दुरी!

मुलाबाळांना आमच्या, शाळा दाखव हरी

अरे पाटीवरती खडूने, नशीब त्यांना लिहू दे तरी!

 'अ' रे आईचा ऐकण्यासाठी,

आम्ही सारे आतुरतो....





तू नाहीस भाजीपाला, तुला लागतो खरा भाव! 

पण आम्हाला मिळेना आणि तुलाही कळेना!

आता तूच डोके लाव! 

विखुरलेले संसार आमचे, सावरण्यास तूच धाव...

पालापाचोळा आम्ही भटके, वावटळीत उडतो!

स्वला व स्वजनांना, शोधण्या सैरावैरा धावतो......



मंदिरे तुझी सोन्याची! हिऱ्यांची तुझी मूर्ती!

तुझ्याच साक्षीने इतिहासामध्ये,

आम्हीही गाजवली किर्ती!

दानपात्र तुझे ओसंडून वाहतेय!

आमचेही दैन्य, दुःख तसेच काहीसे ओसंडतेय!

खरतर संपूर्ण आयुष्यच दारिद्यात न्हातेय!!

परंतु तु गैरसमज करून घेऊ नकोस हं!

हेवा वगैरे आम्हा अजिबातच नाही...

उलट 'गर्व' आहे ! कारण यातच 'सर्व' आहे!

स्वत्वाचा अर्थ, सर्वशक्तीनीशी शोधतो...




खोदल्या विहिरी बांधली धरणे, तृप्त केली धरणी

आता पिण्याच्या पाण्यासाठी, वणवण अनवाणी!

तेव्हा बांधले किल्ले अन शोभा आणली महाली

राजे गेले अन राजकारण्यांनी, केली बघ गद्दारी!

आताही देवा जीवनाला, कळस चढवू आम्हीच

लाथ मारू तिथे पाणी काढू, मेहनतीने आम्हीच

पण लाथ मारण्या हक्काची, जागा तरी दे

श्रद्धा आहे तुझ्यावर म्हणून तर

तुला पाण्यात ठेवतो..





अन्न मिळत होतं, भिक्षा मागून तुझ्या नावानं

आता विरोधी कायदे, केलेत बघ सरकारनं!

भीक मागू देईना बाप आणि जेऊ घालीना माय

एकप्रकारे दोघांनीही मिळून, पोटावर दिलाय पाय!

आशा आहे आम्हा, कृपा नक्की करशील?

आम्हालाही जगण्याचा, रास्त हक्क देशील?

आमचे हक्क व अधिकार आम्ही मागतो...



देवा इथं वाळलंच काय? ओलं बी जळतंय!

शेपुट घोड्याचं नाही पिळता आलं,

तर गाढव बळी पडतंय!

बनून कधी 'बळी' देवा, कान माजो-यांचे पिळशील?

सोसलेले कांड आणि माजलेले सांड

पाताळी एकदाचे गाडशील?

कधी देवा पाय तुझे,

आमच्या पालाकडे वळवशील?

म्हणून तुझ्या दाराकडे डोळे आम्ही लावतो...



देवा जनावर बी आडोशाला आणि पक्षी पाना फांद्यांत

लपवित्यात त्यांची इज्जत!

इथे आम्ही रस्त्यावरती, न्हातोय बेइज्जत!

अरे तुझ्या डोळ्यासमोर, लुटली जातेय अब्रू!

रस्त्यांकाठी पुलांखाली, जन्मास येतेय लेकरू!

सर्वांनाच जन्माला तूच घालतोस,

 नको रे बाबा विसरू!

कधी आमच्या द्रौपदीच्या, रक्षणाला धावतो?

भीमरूपी देवा हात तुझे

कधी नराधमांच्या छाताडावर पाडतो...



देवा तू दाता आहेस, दे एवढेच दान..

दे पोटाला अन्न पाणी अन थोडासा मानसन्मान!

अंगभर कापड दे, हक्काचा निवारा, 

शिकून पुढे जायला देवा, दे तुझा सहारा.

पावशील ना रे आम्हालाही, एवढं पदरात टाकशील?

या जन्मातले नसले तरी पाप उदरात घेशील?

कायमचा निवारा देण्यासाठी,

हाती गोवर्धन कधी उचलतो??



चोर नाही आम्ही देवा, ना कुणा लुटतोय

तरी तुरुंगात आम्ही, जवतवा सडतोय!

लुच्चा निजे गढीमंधी अन इमानदार दारी

कलियुगाची देवा त-हारच आहे न्यारी!

चोर सोडून संन्याशीच फासावर चढतोय!

उघड डोळे न्याय कर, पट्टी कसली बांधतोय?

कधी तुझा आसुड, दुर्जनांवर ओढतो???




देव-धर्म देशासाठी उदार होऊन लढलो

गनिमांच्या अन गोर्‍यांच्याही, फौजांना आम्ही नडलो

पण आमच्याच देशात! आमच्या भोवती,

फास कायद्यांचा आवळलाय!!

जणू अजस्र अजगराच्या, तावडीत पाडस गवसलाय

सुदर्शन तुझे सोडून, हे फास सारे तोडशील कधी?

राज्यघटनेच्या कलमांमध्ये

आमचीही कलमे जोडशील कधी?

कधी येशील होऊन नव भीम तू??

नवस तुला करतो......



डाग पूस, हाक ऐक, धाऊन ये मदतीला

आजवर जिंकलो आताही जिंकूच!

फक्त सारथी रहा सोबतीला

दैव, दैन्य, दारिद्र्याशी जिंकू आम्ही लढाई

वीटेवरती वीट ठेवून घडवू यशाची पंढरी

आशिष दे, जोम दे, रग दे गं विठाई

वाट तुझी चालतोय, तुझे वारकरी

खांदेकरी पालखीचे, पालखी तुझी वाहतो..



छोटंसच पण सुखी, आयुष्य देना देवा

शतायुषी सौष्ठवांचा नाही आम्हा हेवा.

आकाशाची सफर नको, चंदेरी चादर नको

पण म्हणून केवळ देवा...

अंथरायला जमीन आणि पांघरायला आकाश नको!

बस्स! आता... बस्स आता...

माणूस आहोत आम्ही

 माणसासारखे वागव माधवा.

हाताला काम दे, घामाला दाम दे रे

डोक्यात बुद्धी दे, विचारात शुद्धी दे रे.

मग बघ आम्ही कशी दाखवतो,

बनुन तुझी लाडके लेकरे..

हात ठेवशील मस्तकावर आशा अशी करतो....





जीवन माणसास दिलेस तू,

 सुकर बनविले कुणी?

वस्तू, कला, खेळ, करमणूक दिल्या त्यांना कुणी?



धर्मा, शास्त्रा, तुला जपले,

हेरी केली, रेकी केली, शस्त्र धरिले करी,

युद्धे केली, परतून लाविली, वार झेलेली उरी!

देश धर्माचे सच्चे रक्षक!

दुर्लक्षित का रे तरी?

दुःख नाही रे दैन्याचे देवा

परी दुर्लक्षाने झुरतो?







देवा तुला डोक्यावरती, गळ्यामधी मिरवलं!

छन्नी हातोड्याने तुला, दगडा धोंड्यात घडवलं!

पशूंमध्ये खेळवलं, कपाळावरती मळवलं!

गोपाला तुझ्या खेळांना, रस्त्यांवरती दाखवलं!

कोवळ्या बोटांनी रे, नावे तुझी खुणावली!

आयुष्यभर तुझी गाडी, दारोदारी फिरवली!

पण आता तर गड्या तुझ्या भक्तांनीही

तोंड त्यांचं फिरवलय!

आम्हालाच काय! चक्क तुला देखील उडवलय!!

तुझाच खेळ आहे सारा, सारी तुझीच माया!

नाव आहे हरीचे, अन आहे कलीची काया!!

जाऊदे देवा आता...

भीक आम्हालाबी नकोच आहे

न्याय तेवढा हवा आहे..

तेव्हा तुझ्या नैवेद्याच्या ताटावाणी

ताट आमचे बी भरतो!

'अ' अज्ञानाचा ते 'ज्ञ' ज्ञानाचा

मार्ग नवा हा धरतो!






श्रद्धा परंपरा संस्कृती, जतन करून ठेवली.

मोरपीस रोवून मुकूटी, हरी नामे बोलली.

रूपे घेऊन बहु देवा, गुपीते सारी खोलली.

चित्रांच्या मालिकेतून, मांडली तुझी लीला.

देवा तुझी सेवा आम्ही, मनोभावे केली.

रागावू नकोस बाबा पण फळास नाही आली!

इतरांचे सांगण्यात गेले सारे आयुष्य,

आता धोक्यात आलेय, आमचेच भविष्य.

ठेक्यात वाजवला संबंळ

 पण डोक्यात झालाय गोंधळ!

अरे नंदीदेव गोमाता, वा पोपटराजा

सर्व होते खुष आमच्यावर!

तरीही सरकारला दिसला अत्याचार?

नाराज आम्ही तुझ्यावर नाही रे,

दाद तुझ्याकडे मागतो.

पाहतो आमच्या झोळीत, तु माप कधी टाकतो.

कळेनासी झाली देवा, आमची काय चुक?

मूकपणे देवा, कौल तुझा मागतो....



गतिमान आहे विश्व, बदल आम्हीही समजतो.

म्हणूनच पर्यायी, व्यवस्था आम्ही मागतो.

स्वतःसाठीच नाही जगणार, तुझेही काम करू.

तुझ्या दयेच्या बदल्यात देवा, जनसेवाबी करू.

विश्वास ठेव आमच्यावर आणि संधी दे आम्हा 

दाखला देतोस ना भक्तांना जसा?

आम्हा जातीचाही दे तसा!

एळकोट एळकोट होऊ दे एकदाचा,

या लाजीरवाण्या जगण्याचा!

न्याय, स्वातंत्र्य, समतेसह, मानवता दे आम्हा

हक्क मागणे न्याय मागणे हा कसला गुन्हा?

माणसासारखे सन्मानाचे, जीवन आम्ही मागतो....

काळोख दाटले रे, पहाट पाहतो,

पालात आम्ही तुझी, देवा वाट पाहतो...

कवीः बाळासाहेब धुमाळ
मो. 9421863725



बाळासाहेब धुमाळ

Mob. 9421863725


Friday 18 September 2020

कोरोना आणि बंदिस्त लोककलावंत

 कोरोना आणि बंदिस्त लोककलावंत

(लेखनः बाळासाहेब धुमाळ)



कोरोना नावाच्या विषाणूमुळे आलेली कोवीड 19 जागतिक महामारी लोकांना जशी आजाराने मारत आहे तशीच ती उपासमारीने व वैफल्यग्रस्ततेनेही मारत आहे. आजाराने मरणारांची संख्या समोर येतेय परंतु उपासमारीने, दारिद्र्याने मरणारांची व वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करणारांची किंवा व्यसनाधीन होणारांची संख्या समोर येत नाहीये. आजची विचित्र व सुन्न करणारी परिस्थिती आपण यापूर्वी कधीही पाहिलेली, अनुभवलेली नाही किंबहुना कल्पिलेलीही नाही. या कोरोनामुळे लावाव्या लागलेल्या टाळेबंदी म्हणजे लॉकडाऊन मुळे व त्यामुळे उध्वस्त झालेल्या अर्थव्यवस्थेमुळे सर्वांच्याच जीवनाची राखरांगोळी झाली आहे. परंतु असे असले तरी काही वर्गांवर या कोरोनाचा आधिकच भीषण असा परिणाम झालेला दिसतो. खासकरून  लोक कलावंत, ज्यांचे हातावरचे पोट आहे. ज्यांच्याकडे कुठलीच स्थावर मालमत्ता नाही. शेती पोती किंवा उद्योग व्यवसाय नाही. आधुनिक शिक्षण, कौशल्य किंवा तंत्र नाही अशा लोकांच्या वाट्याला तर प्रचंड दैन्य व नैराश्य आले आहे. टाळेबंदीने आर्थिक आणिबाणी तर कोरोनाने आधुनिक अस्पृश्यता जन्माला घातली आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरणार नाही. माणुस माणसाजवळ जात नाहीये. माणसाला जवळ येऊ देत नाहीये. प्रत्येकजण कोरोनाने भयभीत आहे. अशात लोककलावंतांचे  घरोघरी जाऊन, दुकानांसमोर उभे राहुन, रस्त्यांवर फिरुन किंवा धार्मिक, कौटुंबिक, सांस्कृतीक कार्यक्रमांमधून, सणौत्सवांमधून त्यांचे दोन पैसे कमावणे बंद झाले आहे. परिणामी या लोकांवर अक्षरशः रडण्याची वेळ आलेली आहे.


भारत ही साधुसंतांची महापुरुषांची भूमी आहे, देवभूमी आहे. केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची लोककला व लोकपरंपरा टिकवून ठेवणाऱ्या लोककलावंतांना आज साधे उदरनिर्वाह करणे देखील हालाखीचे झाले आहे. अत्युच्च कलाक्षमता असूनही हे लोक आज अत्यंत हीन दर्जाचे काम करण्यास लाचार झाले आहेत. एरवी संस्कृतिरक्षक म्हणून गौरवले जाणे, आपल्या मोठेपणासाठी व्यासपीठांवर सादरीकरणास यांना आमंत्रित करणे, टाळ्या वाजवणे, त्यांचा निवडणूक प्रचार सभांमध्ये, मोर्चांमध्ये वापर करून घेणे, धर्माचे व देशप्रेमाचे अतिरिक्त डोस पाजून त्यांना मोहित करणे सोपे आहे, योग्यही आहे परंतु संकटसमयी त्यांना निराधार करणे योग्य नाही. आज जेव्हा त्यांच्यावर बिकट वेळ आलेली आहे तेव्हा त्यांना वार्‍यावर सोडून देणे अत्यंत दुर्दैवी आहे.

पारंपारिक लोक कलावंतांमध्ये  भटक्या विमुक्त जमातींमधील लोक कलावंतांची संख्या अधिक आहे. कारण भटक्या-विमुक्तांचा हा जन्मजात  व्यवसाय आहे. लोककला कला ही त्यांच्यामध्ये उपजतच आहे. आजही भटके-विमुक्त जमातींमधील पारंपारिक धार्मिक लोक कलावंतांचे आपण आशीर्वाद घेतो. त्यांच्या पायांवर आपले मस्तक टेकवतो. परंतु आज हेच लोककलावंत पोटच्या खळगीसाठी कुणासमोरतरी हात पसरत असताना पाहायला मिळत आहेत. कारण एक कटु वास्तव, "प्रतिष्ठा किंवा प्रसिद्धी त्यांचे व त्यांच्या लेकरा बाळांचे पोट भरू शकत नाहीये". अस्मिता त्यांनाही आहे परंतु अस्मितेपेक्षा पोट व पोटापेक्षा जीव महत्वाचा आहे. ही मंडळी कठीण कष्टाची कामे, मोल मजुरीची कामे करू शकत नाहीत किंवा करत नाहीत असे अजिबात नाही परंतु या लोकांचा जन्मच कलेसाठी झालेला आहे. कला हेच या लोकांचे जीवन आहे. कला जी समाजाची गरज आहे, तिचे  व्यावसायीकरण होतेय आणि या व्यवसायिक कलाकारांमुळे भटक्या विमुक्त जमातींमधील पारंपरिक लोक कलावंत, त्यांच्या समस्या दुर्लक्षित राहतात. कारण ते संघटित नाहीत. हे पारंपारिक जमातीय लोककलावंत मोलमजूरीच करीत आहेत परंतु त्यांना मोलमजुरी किंवा इतर कुठलातरी हीन दर्जाचा व्यवसाय करायला लावणे हा त्यांचा तर अपमान आहेच, सोबतच हा संस्कृतीचा देखील अपमान आहे. एखाद्या मंत्र्याचे खाते बदलणे जितके सोपे आहे (मग त्या क्षेत्रातील त्यांना शिक्षण, अनुभव असो वा नसो) तितके एखाद्या इंजिनीअरला डॉक्टरचे काम करायला भाग पाडणे किंवा डॉक्टरला इंजिनिअरचे काम करायला भाग पाडणे सोपे नाही! किंबहुना ते शक्यही नाही आणि असेच हे आहे. माशाचे पिल्लू उडू शकत नाही, पक्षाचे पिल्लू पोहू शकत नाही, ससा मांसाहारी बनू शकत नाही आणि वाघ शाकाहारी बनू शकत नाही.. कारण हा निसर्ग आहे.

तसे तर बहुतांश लोककलावंतांना त्यांचे हक्काचे ना घर आहे, ना जमीन ना नोकरी आहे. परंतु जो त्यांचा हक्काचा पारंपारिक व्यवसाय आहे तो करणे देखील या कोरनामुळे त्यांना अशक्य झाले आहे. कोरोनाने या लोककलावंतांचे जीवन एका अर्थाने "लॉक" केले आहे. मागील सहा महिन्यांपासून हे लोककलावंत अक्षरशः बंदिस्त जीवन जगत आहेत. आषाढ कार्य, लगीन सराई, यात्रा, उत्सव, उरुस, गौरी गणपती असा कमाईचा हंगाम हातातून गेला आहे. आता नवरात्रोत्सव, दिवाळी, दसरा देखील कोरडाच जातो की काय? अशी भीती यांच्या मनात आहे. ग्रामीण लोकसंस्कृतीवर आयुष्य आधारीत असलेले हे लोककलावंत वर्षातील तीन-चार महिने कमावून, वर्षभर आपल्या कुटुंबाचे पालन पोषण साधेपणाने करत असतात परंतु जर आज ते उपाशी असतील तर सरकार व आपण पोटभर खाऊन ढेकर कसे काय देऊ शकतो?

विशेष म्हणजे जरी कोरोना व टाळेबंदी या लोककलावंतांसाठी गैरसोयीची होती. त्यांच्यावरील एक फार मोठे संकट होते तरीदेखील नेहमीच चांगल्याची बाजू घेणारा व लोकप्रबोधन करणारा हा वर्ग, उपलब्ध समाज माध्यमांचा वापर करून आपापल्या घरांमधून टाळेबंदीचे पालन करा असा संदेश आपापल्या पारंपारिक लोककलांमधुन देताना सर्वांनी पाहीला! लोककलावंत मग ते व्यावसायिक असोत किंवा पारंपारिक भटक्या विमुक्त जमातींमधील असोत, परिस्थिती सर्वांचीच विदारक आहे. परंतु त्यातही व्यासपीठांवर व्यावसायिक कला सादर करणारांपेक्षा घरोघरी जाऊन, रस्त्यांवर फिरुन पारंपारिक लोककला सादर करणाऱ्या व आपली उपजीविका चालणाऱ्या भटक्या विमुक्त जमातींमधील लोककलावंतांची परिस्थिती प्रचंड हलाखीची बनली आहे. कारण यांच्याकडे संकटकाळी वापरता येईल असा राखीव पैसा नाही. मागील सहा महीण्यांपासुन ऐन धंद्याच्या हंगामात त्यांच्या पोटावर पाय पडत आहे. यातून त्यांना सावरायचे असेल तर सरकारने त्यांना भरीव आर्थिक मदत करणे अत्यंत आवश्यक आहे. सोबतच नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन्स म्हणजेच एनजीओज, सेवाभावी समाजसेवी संस्था व संघटना, जमातीय संघटना, राजकीय पक्ष यांनी या लोकांकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अर्थात कोणीच गांभीर्याने घेतले नाही असे अजिबात नाही. ब-याच समाजसेवी संघटनांनी व संवेदनशील व्यक्तींनी यांना मदतीचा हात दिला आहे, देत आहेत परंतु एवढेच पुरेसे नाही.

लोककलांमधील बहुतांश लोक कलावंत हे भटके-विमुक्त जमातींमधील आहेत. गोंधळी, डवरी गोसावी, चित्रकथी, कुडमुडे जोशी, वासुदेव, कडकलक्ष्मीवाले, कोल्हाटी, भराडी, भोपी, बहुरुपी, पिंगळे, नंदीबैलवाले यांचे आर्थिक गणित पार कोलमडले आहे. वाघ्या-मुरळी, तमाशा, शाहिरी, आराधी, सुंबरान यांसारख्या लोककला करणाऱ्यांमध्येही भटके-विमुक्त जमातींमधील लोकच अधिक आहेत.  पिंगळा जोशी, नाथजोगी, सरोदे, डोंबारी, गोपाळ, मदारी, गारुडी या व अशा सर्वांवरच उपासमारीची वेळ आलेली आहे. आता जिथे चुल पेटणेच मुश्किल झाले आहे तिथे मुलाबाळांचे ऑनलाइन शिक्षण! कोरोनावरील औषधोपचार! याबाबत तर न बोललेलेच बरे.

निवडणूक प्रचार, राजकीय सभा मोर्चे, आंदोलने, नेत्यांचे स्वागत समारंभ यांमध्ये या लोककलावंतांना वापरून घेणाऱ्या राजकीय पक्षांनी व सरकारांनी थोडे मोठे मन दाखवायला हवे. या लोककलावंतांना तातडीने आर्थिक मदत करायला हवी. जर खरोखरच या जमाती व यांची लोककला जगावी असे वाटत असेल, जर खरोखरच हे मनोरंजनकार, प्रबोधनकार, अध्यात्मिक, धर्मप्रसारक, राष्ट्रप्रेमी भटके-विमुक्त लोककलावंत कठीण काळात हतबल होऊ नयेत, यांना हालाकीचे व अपमानास्पद जीवन जगावे लागु नये असे वाटत असेल तर सरकारने यांना आर्थिक हातभार लावला पाहिजे. ज्यांनी सर्वांचे जीवन हरित केले त्यांचे जीवन जर आज रुक्ष होत असेल तर हा त्यांच्यावरील खुप मोठा अन्याय ठरेल. यासाठी भटक्या विमुक्तांमधील संघटनांनी अधिक पुढाकार घेऊन यांच्या व्यथा रस्त्यावर उतरून मांडल्या पाहिजेत, कागदोपत्री सरकार दरबारी पोहोचवल्या पाहिजेत. प्रसारमाध्यमांनी यांच्या समस्यांची दखल घ्यावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

लेखनः बाळासाहेब धुमाळ

दि. 18.09.2020

मो. 9421863725

Saturday 4 July 2020

तुकयाचा गोंधळ

*#तुकयाचा_गोंधळ*

*भारत एक वैविध्यपूर्ण ऐतिहासिक व आध्यात्मिक संस्कृती लाभलेला प्राचीन देश आहे. भारताला देवभूमी म्हटले जाते. त्यातही महाराष्ट्र अग्रस्थानी आहे कारण महाराष्ट्राला संतभूमी व शूरवीर भूमी म्हणूनही ओळखले जाते. भव्यदिव्य स्थापत्य अविष्कार, सण उत्सव, विधी व लोककलांनी आपले अध्यात्म व आपली भारतीय संस्कृती संपन्न आहे.*

*आपल्याकडे अनेक विधी प्रकार होतात जसे की बारसे, गृहप्रवेश, मुंज, विवाह, सत्यनारायण पूजा, डोहाळे, शांती, यज्ञ, अंत्यविधी, दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध इत्यादी. तसेच अनेक व लोककला देखील आहेत जसे की, किर्तन, प्रवचन, व्याख्यान, रामलीला, लोकनाट्य, नाटक, कलगीतुरा, कवाली, गझल, पोवाडा, भीमगीते, भारुडे, डोंबाऱ्याचा खेळ, वासुदेवाची गाणी, बहुरूप्यांचे नाट्य, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, चित्र कथांचे प्रयोग इत्यादी.*

*सुरुवातीला सांगितलेले काही विधी व त्यानंतर सांगितलेले काही लोककला प्रकार दोन्हीही आध्यात्माशी निगडित आहेत हे विशेष! लोककलेद्वारे देखील धर्माचे, अध्यात्माचे व नैतिकतेचे धडे आजवरच्या लोककलावंतांनी दिलेले आहेत व आजही देत आहेत ही बाब या ठिकाणी लक्षणीय आहे.*

*आपण जर बारकाईने पाहिले तर हे सर्व व इतर अनेक विधी प्रत्येक ठिकाणी कोणीतरी पुरोहित करत असतो. पुरोहित हे एका ठराविक जातीचे किंवा धर्माचेच असतील असे नाही तर त्या त्या विधीचे ज्ञान ज्यांना आहे किंवा ज्यांचा तो पारंपारिक व्यवसाय आहे असे लोक या विधींचे पौरोहित्य करत असतात. दुस-या बाजूला ज्या लोककला आहेत त्या लोककला सादर करणारे देखील ठराविक एका जातीचेच आहेत. कारण अर्थार्जनाच्या दृष्टीने प्रत्येक जातीची परंपरागत आपली आपली ठरलेली एक लोककला असते. असे असले तरी काही लोककलांना जातीचे बंधन नसते उदाहरणार्थ किर्तन ! किर्तनासाठी जातीचे बंधन नाही. किर्तन कोणीही सादर करू शकते परंतु वासुदेवाची गाणी असोत किंवा बहुरुप्याचे नाट्यप्रयोग असोत किंवा गोंधळ विधी असो किंवा पोतराजाची गाणी असोत हे व असे इतर अनेक कलाप्रकार त्या त्या ठराविक जातीचे लोकच करतात. गोंधळ सोडता इतर कोणताही विधी घ्या किंवा मनोरंजनात्मक कलाप्रकार घ्या, कोणताच विधी किंवा कला प्रकार एक दोन ते तीन तासांपेक्षा अधिक चालत नाही परंतु गोंधळ मात्र जो केवळ महाराष्ट्राचाच  नव्हे तर संपूर्ण भारताचा कुलाचार विधी आहे तो मात्र रात्रभर चालतो!*

            *मला कळत नाही, काय आवश्यकता आहे रात्रभर गोंधळ विधी चालवण्याची ? गोंधळ हा एक विधी आहे व विधी तास दीड तास, दोन तास मनोभावे चालला पाहिजे. जेव्हा त्याला आपण खूप जास्त वेळ देऊ तेव्हा त्यातला विधी बाजूला जातो व तिथे मनोरंजन येते आणि मनोरंजन आले की त्यामध्ये मग आवडी निवडी नुसार फर्माईशी व सादरीकरण येते आणि त्यामुळे त्याचे पावित्र्य लोप पावते.*

*घरातील सर्व शुभकार्य प्रसंगी कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच अपेक्षापुर्तीसाठी देवीला आळवण्यासाठी गोंधळ घातला जातो. ही एक पूजा आहे, जी अत्यंत मनोभावे तज्ञ, शास्त्रज्ञानी गोंधळी पुरोहिताकडून घातली जाते. यात पूजन, वंदन, स्मरण, प्रार्थना, कृतज्ञता व मार्गदर्शन आणि प्रबोधन यांचा समावेश होतो. यात विधीला व अध्यात्मिक प्रबोधनाला प्राधान्य आहे. मनोरंजनला दुय्यम महत्त्व आहे. अध्यात्म व संस्कृती हा आधार असलेले सांगितीक मनोरंजन याचा समावेश गोंधळ कला या प्रकारात होतो. मार्गदर्शन व प्रबोधन हा केंद्रीभूत भाग असतोच परंतु हा विधी नसतो. हा रंगमंचावर स्टेजवर किंवा मेजवान्यांंमध्ये सादर केला जाऊ शकतो. मेजवानी म्हणजे बर्थडे पार्टी असेल किंवा कुणाचाही कुठल्याही प्रकारचा आनंददायी विशेष प्रसंग असेल त्याठिकाणी आपण ही कला ऐकू पाहू शकतो, सादर करू शकतो परंतु तो तेव्हा विधी नसतो हे लक्षात घेतले पाहिजे.*

*गोंधळात संस्कृतीचे म्हणजे इतिहास, अध्यात्म, धर्मशास्त्र, महात्म्य, धर्म ग्रंथातील ओव्या श्लोक, विशेष घटना व व्यक्ती यांच्या भोवती सांगितिक पद्धतीने गद्यपद्यात्मकतेने कथन, गायन, व अभिनय याद्वारे विषयातील आशायाचे निरुपन कथेद्वारे करायचे असते. मध्ये मध्ये दृष्टांतांचा किंवा दाखल्यांचा वापर केला जातो. निरुपन रंजक व्हावे यासाठी एखादे आशय संबंधित गीत सादर केले जाते. प्रेक्षकांना कंटाळवाने होवू नये, प्रेक्षक खिळून राहावेत यासाठी मधुन मधुन विनोदही सादर केले जातात.  किर्तन व गोंधळ यात प्रचंड साम्य आहे परंतु दुर्दैवाने आज गोंधळी पुरोहित व गोंधळी कलावंत तसेच लोक म्हणजे कार्यक्रम मालक, श्रोते व प्रेक्षक ही बाब विसरले आहेत. विधी, पूजन, श्रद्धा, अध्यात्म, प्रार्थना, कृतज्ञता बाजूलाच राहते आणि केवळ मनोरंजन एवढाच गोंधळाचा हेतू आहे असे समजले जाते व त्या पद्धतीने तो हेतू साध्य केला जातो. गोंधळामधून  होत आलेले वैचारिक, नैतिक, भावनिक, कौटुंबिक, नातेविषयक उद्बोधन आणि ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्मिक, ऐहिक मार्गदर्शन व प्रबोधन आजच्या गोंधळ विधी व कलेतून होताना दिसत नाही. ही जेवढी दुःखद बाब आहे तेवढीच चिंतेची बाब देखील आहे. आजवर गोंधळाने व गोंधळी कलावंतांनी जगाला जीवनाचे तत्वज्ञान शिकविले आहे याचा विसर पडता कामा नये.*

*आजच्या चंगळवादी व प्रायोगिक जगामध्ये स्वार्थ, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर व अहंकार प्रचंड फोफावला आहे. अपयश, खच्चीकरण, स्वप्नविलास, विभक्त कुटुंब पद्धती, जोडप्यांचे वाढलेले उत्पन्न, त्यांना आपापल्या कार्यालयांमध्ये मिळणारा मानपान, असलेले पद आणि प्रतिष्ठा, वाढलेली धावपळ, व्यसनाधीनता आणि पर्यावरणीय समस्यांमुळे माणसाचे मानसिक व वैचारिक आरोग्य ढासळत चालले आहे. शारीरिक आरोग्य तर ढासळतच आहे परंतु वैचारिक अधःपतनही होत चालले आहे. काल्पनिक जीवन जगण्याची सवय माणसाला जडत आहे. अशात केवळ धार्मिक व आध्यात्मिक वैचारिक प्रबोधनच आपल्याला तारू शकते. मनःशांतीसाठी सत्संग, कीर्तन, गोंधळ, प्रवचन असे बुद्धीला व मनाला सशक्त करणारे धार्मिक व अध्यात्मिक वैचारिक डोस मिळणे काळाची गरज आहे.*

*एक गोंधळी म्हणून माझी, माझ्या सर्व गोंधळी कलावंतांना अगदी नम्र विनंती आहे की, गोंधळ विधी व गोंधळ लोककला यांचे पावित्र्य, प्रतिष्ठा व महत्त्व जपा. गोंधळ हे एक सांगितिक विधीनाट्य आहे. ही आपली अस्मिता आहे. सर्व शक्ती उपासकांचे हे श्रद्धा स्थळ आहे. शक्तीची उपासना करत आलेले आजवरचे सर्व भक्तजन गोंधळ अत्यंत मनोभावे व श्रद्धेने घालत आलेले आहेत. शक्तीची पूजा संपूर्ण देशभर केली जाते नव्हे जगभर केली जाते. आदिमाया शक्तीची उपासना जर ब्रह्म, विष्णू, महेश, भगवान परशुराम, नारदमुनी ते अगदी छत्रपती शिवाजी महाराज देखिल गोंधळ घालून करीत होते तर मग आज या उपासनेचे, या विधीचे रूपांतर केवळ मनोरंजनात का झाले आहे ? याचा आपण शोध घेतला पाहिजे.  हे मनोरंजन कधीकधी येवढे ओंगाळवाणे व अश्लाघ्य असते की, ते पहावत ऐकतही नाही.*

*"देवी पूजन, प्रार्थना, आराधना व कृतज्ञता या नंतर दर्जेदार विषय, आशय, वेशभूषा, संवाद असणारे गांभीर्यपुर्वक शुचिर्भूततेसह नियोजनबद्ध केलेले सांगितिक सादरीकरण म्हणजे गोंधळ" ही बाब आपण व कार्यक्रम मालकांनी तसेच प्रेक्षकांनी समजून घेणे आवश्यक आहे. हे कार्यक्रम मालकांना समजत नसेल तर आपण त्यांना ते समजून सांगितले पाहिजे. गोंधळातुन आजवर दोन ते तीन तासांचा शास्त्रशुद्ध विधी, ज्यामध्ये देवी पूजनानंतर एखादे देवी महात्म्य, पुराण धर्मग्रंथ,धर्मकाव्य यामधील ओव्या, ओळी, श्लोक किंवा एखादी ऐतिहासिक किंवा दैवी घटना वा व्यक्ती अथवा देवावतार याविषयी निरूपणाधारे किर्तना प्रमाणे सादरीकरण करून आपण संस्कृती, धर्म, देश, मानवता यांचे रक्षण व सदविचारांचे प्रसारण करीत आलेलो आहोत. हीच आपली परंपरा व ओळख आहे. म्हणून गोंधळ ही आपली अस्मिता आहे व आपल्या अस्मितेचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे. आपण स्वत:ला भाग्यवान समजले पाहिजे की, एवढा संपन्न दैवी तथा प्रतिष्ठीत वारसा आपल्या पुर्वजांनी आपल्यासाठी ठेवला आहे. परंतु वारशाच्या बाबतीत सर्वकालिन सत्य असेही आहे की, आपण देखील वारशाचे वारसच असतो, मालक नसतो. आपणही हा वारसा पुढे, पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत करायचा असतो. शक्य असेल तर त्यात भर घालून तो समृध्द करायचा असतो. परंतु दुर्दैवाने आपल्याकडुन चुक होत आहे व वैयक्तीक स्वार्थापायी आणि आजच्या पुरता विचार करुन आपण एक महान धार्मिक लोककला परंपरा भरकटवत आहोत.*

            *भरकटवत आहोत म्हणजे गोंधळामधून विधी, श्रद्धा, मार्गदर्शन व प्रबोधन संपवत चाललो आहोत. हे एक कटू सत्य आहे, जे लिहिण्याची माझी अजिबात इच्छा नाही परंतु नाही लिहिले म्हणून वास्तव बदलत नाही. कदाचित लिहिल्यामुळे तरी बदलेल असा आशावाद मी बाळगून आहे. अर्थात काही ठिकाणी अपवाद पाहायलाही भेटतो म्हणा. आजही अनेक ठिकाणी खरा गोंधळ पहायला ऐकायला मिळतो. खास करून ग्रामीण भागांमध्ये, बालाघाटच्या डोंगरी भागामध्ये अनेक श्रोते प्रेक्षक आहेत जे अजुनही जुन्या पद्धतीच्या गोंधळाचीच मागणी करतात. कथेची मागणी करतात आणि त्या भागात अनेक आपले गोंधळी कलावंतही आहेत ज्यांचेकडे खुप छान जुने ज्ञान आहे. त्यांचे सादरीकरण खूप दर्जेदार आहे. परंतु व्यापक अर्थाने आजच्या गोंधळाकडे पाहिला गेले तर अलीकडे कार्यक्रमाचे मालक, त्यांचे गणगोत्र, मित्र परीवार, सगे सोयरे, जे गोंधळाचे श्रोते व प्रेक्षक असतात, त्यांच्या अपेक्षा बदलत आहेत. त्यांना काहीतरी मसालेदार, आंबट आणि उडत्या चालीवरील मनोरंजन हवे असते, जे शास्त्रात बसत नाही आणि याचीच जाणीव आपण म्हणजे गोंधळी बांधवांनी त्यांना करून द्यायची आहे.*

        *बदल ही काळाची ओळख आहे, तो काळाचा स्वभाव आहे, त्यामुळे आपणही बदलावे लागेल यात शंका नाही परंतु बदल हा सकारात्मक असला पाहिजे. बदल हा चौकटीमध्ये बसूनच केला गेला पाहिजे. चौकटीच्या बाहेर जाऊन, पथभ्रष्ट होऊन म्हणजे रस्ता सोडून केलेला बदल हा #बिघाड समजला जातो. बदल हा तंत्रज्ञानाचा वापर, सादरीकरणातील प्रयोग, संच रचना, नैपत्य वेशभूषा, संगित संयोजन यामध्ये करायला निश्चित हरकत नाही. नव्हे नव्हे तो करावाच परंतु त्यामुळे मूळ ढाच्यात बदल होणार नाही याची काळजी घ्यावी. उदाहरणादाखल पाहिचे ठरले तर किर्तनामध्ये अनेक बदल झाले, सादरीकरणात झाले, किर्तनाचे व्यावसायिकीकरण झाले परंतु म्हणून किर्तन किंवा ब्राह्मण्य किंवा लोकनाट्य यांच्या मूळ ढाचामध्ये बदल झालेला नाही. यांची मूळ चौकट अजूनतरी शाबूत आहे. त्यामुळे गोंधळ देखील प्राचीन गोंधळाप्रमाणेच, पूजन, आराधना, प्रार्थना, याचना, कथाभाग निरूपण, सांगितिक दृष्टांत व मनोरंजन या चौकटीतच असावा, या वाटेवरच चालावा असे मला वाटते. तुम्हाला ऐकून वाचून नवल वाटेल, मी असेही काही गोंधळ पाहीले आहेत की ज्यात संबळच नव्हता!! नुसताच धांगडधिंगा!!!*

*बदलाच्या अनुषंगाने अजून एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे कुठलाच विधी रात्रभर चालत नाही म्हणून रात्रभर गोंधळ सादरीकरण करण्याची प्रथा मोडीत काढणे आवश्यक आहे. कारण यामुळे झोप होत नाही परिणामी कलावंत, कार्यक्रमाचे मालक, प्रेक्षक यांच्या शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. आपल्या कुटुंबावर, आपल्या शरीरचर्येवर व दिनचर्येवर त्याचा विपरीत परिणाम होतो. वैयक्तीक जीवनामध्ये विस्कळीतपणा येतो. कुटुंबाची घडी विस्कटून जाते. आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणावर व बायका बहिणींच्या वैयक्तिक जीवनावर अनिष्ट परिणाम होतो. कार्यक्रम मालकांसाठी व श्रोत्यांसाठी जागरणाचा हा अनुभव कधीतरी येतो परंतु कलावंताच्या बाबतीमध्ये जर झोपच नसेल तर? याचा परिणाम त्यांच्या शरीर मन बुध्दी यावर होतो. परिणामी व्यसन, अवेळी जेवण व अवेळी झोप आणि कौटुंबिक ताणतणाव यांसारखी संकटे वाटयाला येतात. त्यामुळे रात्री अकराच्या आत विधी संपवणे व झोपेसाठी कुटूंबात येणे आवश्यक आहे.*

*मनोरंजनासाठी लोकांकडे अनेक पर्याय आहेत. त्या पर्यायांचा त्यांना खुशाल वापर करू द्या, जसा करायचा आहे तसा करू द्या परंतु चार पैशांसाठी आपण आपली वैभवशाली संस्कृती जी आपल्या लाखो-करोडो पूर्वजांनी हजारो वर्षांपासून इमाने इतबारे मनोभावे जपली आहे व आपल्या स्वाधिन केली आहे. ज्यांनी आपले कलाविश्व संपन्न करून ठेवले आहे. आपल्याला आपले अढळ सामाजिक स्थान तयार करून ठेवले आहे, त्यांच्या पुण्यात्म्यांना दुःख पोहोचेल असे वर्तन आपल्याकडून घडायला नको. या कामी तरुणांनी पुढाकार घेऊन कथाभाग सादरीकरण आत्मसात केले तर खूप फायद्याचे होईल. जुनी मंडळी ज्यांना कथा भागाचे ज्ञान आहे, त्यांना हा चालू असलेला धांगडधिंगा पटत नाही परंतु लोकांना ते सवयीमुळे नकार देऊ शकत नाहीत कारण प्रश्न पोटाचा असतो. त्यामुळे जर तरुणांनी पुढाकार घेतला व ठोस भूमिका घेतली तर एक नवा पायंडा पडू शकतो. स्वर, रचना, नव निर्मिती, आधुनिक वाद्ये व नेपथ्य वेशभूषा यातील बदलांसह दमदार अभिनय व प्रभावी सादरीकरण यांच्या जोरावर सुरेल व विविध रसपूर्ण गोंधळ विधिनाट्य लोकांनादेखील बदलायला भाग पाडू शकते आणि आजची युवा गोंधळी पिढी हे करू शकते याबाबत माझ्या मनात अजिबात शंका नाही.*

*यामध्ये हवे तर दोन भाग पाडले जाऊ शकतात. किर्तनाचा व गोंधळाचा सारखाच बाज असतो. गोंधळाचा बाज किर्तना प्रमाणे ठेवा. देवी पूजन व्हावे व पुजनानंतर दोन तीन तासाचे निरूपण कथाभागद्वारे व्हायला हवे. किर्तनामध्ये जसे अभंग असतात तसे गोंधळामध्येही गोंधळ गीते असावेत परंतु विषयाला आशयाला धरून द्रुष्टांतपर. हा झाला गोंधळ विधी आणि गोंधळगीतांचा कार्यक्रम म्हणाल तर त्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम तयार करा. त्याची रचना व त्याचे स्वरूप स्वतंत्र ठेवा. त्यात पुजा विधी करू नका. बोलीच अशी करा की गोंधळ विधी घालायचाय का गोंधळगीतांचा देवीगीतांचा कार्यक्रम घ्यायचाय?*

*वारकरी संप्रदायातील किर्तनात अभंग असतातच परंतु केवळ अभंगच नसतात! त्यासाठी भजनाचा स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करतात. तसेच गोंधळामध्ये देखील दृष्टांता पुरते काही देवी गीते घेऊन संबंधित कथाभाग किंवा संबंधित विषयाचे निरूपण दोन ते तीन तासांमध्ये संपून त्यामध्ये प्रबोधन, अध्यात्म नैतिक शिक्षण अशी सगळी गुंफण करून दोन तासाचा किंवा जास्तीत जास्त तीन तासांचा गोंधळ विधी असावा असे मला वाटते. साधारणपणे रात्री बाराच्या अगोदर सर्व कार्यक्रम संपवून कलावंत आपापल्या घरी जाऊ शकतील किंवा किमान त्याच घरी आराम करू शकतील अशी व्यवस्था असायलाच हवी. संपूर्ण रात्रभर कलावंतांनी जागून दुसऱ्या दिवशी घरी जाऊन झोपणे यामुळे त्यांच्या शरीरावर मनावर आणि वर सांगितल्याप्रमाणे कुटुंबावर विपरीत परिणाम होतो. यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे.*

*गोंधळ कला आणि गोंधळ गीते ही महाराष्ट्राची लावणी नंतरची दोन नंबरची आवड आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण साधरणपणे सर्वेक्षण केले तर लावणी ही महाराष्ट्राची जीव की प्राण आहे परंतु दोन नंबरला गोंधळ गीते मराठी माणसांना खूप आवडतात. त्यामुळे गोंधळ गीतांचा एक स्वतंत्र कार्यक्रम चाहते ठेऊ शकतात. गोंधळी कलावंत तो स्वीकारू शकतात परंतु एका गोंधळ विधीमध्ये आपण जर सर्वच देऊ लागलो तर त्यांची संपूर्ण रात्र तर जाईलच वरून विधी आणि मनोरंजन यात फरक उरणार नाही. जेणेकरून कार्यक्रम मालकांना विधीची किंमत कळेल, त्याचे महत्त्व कळेल व कलेचेही महत्त्व कळेल यासाठी असा बदल केला जावा.*

*अन्यथा मग विधी, पौरोहित्य, श्रद्धा, आराधना, उपासना बाजुलाच जाईल आणि कला व मनोरंजन मध्ये येईल आणि मनोरंजन म्हटले की सर्वच आले आणि नेमके तेच होत आहे आता. त्यामुळे गोंधळगीत संध्या, किंवा गोंधळगीत रजनी किंवा गोंधळगीत मैफिल किंवा गोंधळगीतांचा लाईव्ह कॉन्सर्ट ही संकल्पना पुढे येणे अत्यंत आवश्यक आहे. ती देखील दर्जेदार, ती सादर करत असताना कुठल्याही प्रकारच्या हिनतेच्या पातळीवर ती जाणार नाही, अपमानास्पद किंवा टिकात्मक प्रतिक्रिया येणार नाहीत याची काळजी आपण गोंधळी कलावंतांनी घेणे गरजेचे आहे. यासाठी गीतांची निवड, हावभाव, नृत्य, भाषा, अंगविक्षेप, महिला कलाकारांचा मर्यादित आणि परिणामकारक वापर लक्षपूर्वक करणं गरजेचे आहे. जेणेकरून आपल्याकडे कोणी तुच्छतेने पाहणार नाही. तुम्ही म्हणाल लोक फर्माईश करतात... करू द्या, तुम्ही पुर्ण करू नका, तुम्ही पूर्ण करता म्हणून फर्माईश केली जाते. काही लोक तर अगदी छोट्याशा बक्षिसापाई नको ते सादर करतात! अगदी शांताबाई, शालु, शिला, झिंगाट, आमदार, वाड्यावर, बाबुराव.....*

*गोंधळामधील महिलांचा चुकीचा वापर, गैरलागू नृत्य, दिवट्यावरील अश्लील विनोद हे थांबले पाहिजेत. अशांवर सामाजिक व संघटनात्मक दबाव आणण्याची आवश्यकता आहे. कारण गोंधळ विधीला व गोंधळी कलेला जे महत्त्व व प्रतिष्ठा यात आपले काही योगदान नाही. आज आपल्या पदरी असलेले गोंधळ विधीचे पौरोहित्य व गोंधळी कला ही आपल्याला देणगी स्वरूपात मिळालेली आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला ती देवी उपासनेसाठी व उपजीविकेसाठी दिलेली आहे. आपण तिचे केवळ वाहक आहोत, मालक नाहीत. आपण तिच्यामध्ये भर टाकली पाहिजे. ना की ती ओरबाडून नष्ट केली पाहिजे. तिचे महत्त्व व तिची प्रतिष्ठा संपणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. धर्माश्रय, राजाश्रय व सोबतच लोकाश्रय लाभलेली आपली ही विरासत आपल्या स्वतःच्या चुकांमुळे नष्ट होणार नाही याची आपण मनोमन चिंता केली पाहिजे. अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही*

*पारंपरिक जागरण जे खंडोबाचे असते, त्यामध्ये वाघ्या मुरळी असतात. तिथेही मुरळी अत्यंत शालीन सभ्य सोज्वळ  असायची. ती श्रद्धेने मनोभावे खंडोबाची भक्त्ती करायची. भाविक भक्तांचे मनोरंजन करायची. आजवरचा असाच इतिहास आहे. परंतु आता त्यामध्येही बदल होतोय हे कटू सत्य नाकारता येणार नाही. गोंधळामध्ये तरी माझ्या माहितीप्रमाणे आजवर महिला कलाकारांना स्थान नव्हते परंतु म्हणून आता त्यांना स्थान असू नये या मताचा मी नाही. गोंधळामध्ये महिलांना स्थान असायलाच हवे. नव्हे नव्हे ते अधिकाधिक महत्त्वपूर्ण कसे असेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. महिला सरदार कशा तयार होतील, महिला संबळवादक कशा तयार होतील यासाठी ज्येष्ठ कलावंतांनी आणि संघटनांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जेव्हा कुठल्याच क्षेत्रांमध्ये महिला मागे नाहीत तेव्हा गोंधळ विधी व गोंधळ कला या सारख्या लोकप्रिय व प्राचीन विधी तथा कलेपासून आपल्या पन्ननास टक्के लोकसंख्येने अलिप्त राहावे ही बाब माझ्या विचारांना पटत नाही. जर किर्तन महिला करू शकते, सांगू शकते, व्याख्यान प्रवचन देऊ शकते, एव्हाना जर फाइटर प्लेन चालू शकते तर गोंधळ का घालू शकत नाही किंवा गोंधळ कला का सादर करू शकत नाही? आपण आपल्या बुद्धीच्या कक्षा विस्तारण्याची अत्यंत आवश्यकता आहे. इतिहास निर्णयांची, पावलांची, घटनांची आणि त्यांच्या परिणामांची नोंद घेत असतो. मग ती पाऊले उलट असो किंवा सुलट असोत!*

*पुरोगामी आणि प्रतिगामी अशा दोन दिशा असतात आपण कोणत्या दिशेने चालायचे हा आपला विषय आहे. परंतु माझे वैयक्तिक मत आहे की, आपण पुढच्या दिशेने चालले पाहिजे. ज्या अनिष्ट, चुकीच्या, संकुचित व कालबाह्य बाबी आहेत त्या काढून टाकुन, चांगल्याचा स्वीकार केला पाहिजे. त्यासाठी ज्यांना आज चांगले म्हटले जातेय, जे नावारूपास आले आहेत, मग ते समाजवर्ग असोत किंवा व्यक्तिविशेष असोत, त्यांच्यापासून आपण काहीतरी शिकून 
स्वतः मध्ये बदल करून, आपण देखील पुढे चालत राहिले पाहिजे. हाच निसर्गाचा नियम आहे. हेच प्रगतीचं सूत्र आहे.*

*गोंधळ व गोंधळी या शब्दाला आज जरी उपहासाने उच्चारले जात असले तरी दुःखी होण्याची गरज नाही कारण सत्याला सत्वाची परीक्षा द्यावीच लागते. किर्तन देखील यातून सुटलेले नाही परंतु आता हे आपल्या हातात आहे की गोंधळाचे हरवलेले वैभव आपण कशा पद्धतीने परत मिळवायचे. गोंधळात प्राणी बळी दिले जाणार नाहीत, मद्यप्राशन केले जाणार नाही, धुडगुस घातला जाणार नाही याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. तशी स्पष्ट बोली किंवा तशी रोखठोक बोलणी किंवा तसा लेखी करारच आपण कार्यक्रम घेण्यापूर्वी करायला. आवश्यक पूजेचे साहित्य जसे आपण कार्यक्रम मालकांना अगोदरच लिहून देतो तशाच आपल्या अटीशर्ती देखील त्यांना लिहून द्या. दोघांच्या स्वाक्षरीने दोन प्रति परस्परांकडे ठेवा. त्यात स्पष्ट लिहा की अशा पद्धतीने जर तिथे कुठलाही प्रकारचे चुकीचे वर्तन झाले, चुकीची फर्माईश झाली, किंवा धुडगूस वगैरे घालण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही कार्यक्रम अर्ध्यावर सोडून येऊ. आम्हाला तिथे कुठल्याही प्रकारचा त्रास झाला तर आम्ही पोलिसात जाऊ असे ठणकावून सांगा. या कामी संघटनांनी कलावंतांना आणि कलावंतांनी परस्परांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. शक्यतो मानधनाची पंचाहत्तर टक्के रक्कम कार्यक्रमापुर्वीच घ्या.*

*गोंधळ सादर करत असताना प्रभावी भाषेत प्रबोधन करा व गोंधळ ही विधी पूजा आहे हे त्यांच्या गळी उतरवा. त्यांना समजून सांगा. अगोदर तर आपण समजून घ्या व नंतर त्यांना समजून सांगा. एकदा का त्यांना समजले म्हणजे, एकदा का समाजाला अर्थात लोकांना समजले की गोंधळ हा मनोरंजनाचा प्रकार नसून हा एक पवित्र विधी आहे, हे एक विधिनाट्य आहे, यामध्ये थोडेफार मनोरंजन असते परंतु इथे धुडगूस घालता येत नाही की मग ते नको ती फर्माइश करणार नाहीत व आपल्याला होणारा त्रासही कमी होईल व त्या विधीचे पावित्र्य देखील राखले जाईल. गोंधळाला गतवैभव व प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर उच्च कला व ज्ञान आत्मसात करावे लागेल. पोट भरण्यासाठी उठसूट तेच ते पाच दहा धांगडधिंगा गाणे वेढ्यावाकड्या आवाजात म्हणायचे आणि आडवातिडवा संबळ बदडायचा याला गोंधळ म्हणत नाहीत. मुळात तर लोकांना या अशा अज्ञानी व अकुशल कलावंतांनीच चुकीची सवय लावलेली आहे. जुणे काही येत नाही म्हणून कसले तरी भलतेच अंगविक्षेप केले आणि दुर्दैवाने लोकांनाही ते आवडले आणि आता लोक तेच मागतात. पोरी किती आहेत? कशा आहेत? असे थेट विचारतात! याला जबाबदार कोण?*

*बंधु-भगिनींनो म्हण असली तरी, 'घडी लोटली की पिढी लोटत नाही'. पिढी लोटण्यासाठी कठोर परिश्रमच घ्यावे लागते. एक काळ होता जेव्हा गोंधळ केवळ गोंधळीच घालायचे! कारण त्यासाठी तपश्चर्या करावी लागायची, शिकावे लागायचे, ज्ञान, गुणवत्ता, सामर्थ्य, कलेचा दर्जा व पौरोहित्याची माहीती असायला लागायची. गुरू शिष्य परंपरा होती तेव्हा! आता? आता यातले काहीच लागत नाही म्हणून गोंधळाला, गोंधळ्याची गरज लागत नाही. उठसुठ कुणीही गोंधळ घालतेय! का असे झाले? कारण विधीची जागा मनोरंजनाने घेतली. जुण्याची शुद्धतेची व शास्वततेची जागा आंबट, मसालेदार धिंगाण्याने घेतली म्हणून!! आणि यासाठी जातीवंत गोंधळीच असावा असे काही नाही!म्हणून असे झाले.*

*आपले गुरूतुल्य अस्तित्व जिवंत ठेवायचे असेल, संस्कृती जतन करायची असेल तर "गोंधळ हा विधीच राहिला पाहिजे" तो शुद्ध, सात्विक, पवित्र व शास्त्रोक्ततच राहिला पाहिजे. अन्यथा तमाशा, जलसा, ऑर्केस्ट्रा अशा मनोरंजक कार्यक्रमांची कमी नाही, त्याच रांगेत गोंधळ विधी जाऊन बसेल. हायवेवर प्रवास करताना मी दोन तीन ठिकाणी "हॉटेल गोंधळ पार्टी" असे धाब्यांवर बोर्ड वाचले आहेत. ते पाहून मला खूप वाईट वाटले. आतमध्ये काय असते हे मी पाहिले नाही पण एक कल्पना केली. कदाचित तिथे मोठमोठ्या हॉटेल्समध्ये जसे म्युझिकल बँड किंवा ऑर्केस्ट्रा असतात, ग्राहकांच्या मनोरंजनासाठी तसे तिथे कदाचित गोंधळ गीते, वाघ्या मुरळीचे गीते सादर होत असतील आणि त्या हॉटेलचे ग्राहक त्याचा आनंद घेत असतील अशी एक साधारणपणे ती संकल्पना असावी असा माझा अंदाज आहे. मी आत जाऊन काय ते पाहिलेले नाही परंतु तो फलकच म्हणजे हॉटेल गोंधळ पार्टी फलकच मला खूप खटकला.*

आपण सर्व गोंधळी स्वाभिमानी हिंदू तर आहोतच परंतु संस्कृतीचे वाहक आहोत. धर्मनिष्ठा व राष्ट्रनिष्ठा यांचा आपण प्रसार व प्रचार केलेला आहे व करतही आहोत परंतु आता थोडी वाट चुकत चाललो आहोत. मला खात्री आहे, आपण देवीची उपासना मनोभावे केली, करून घेतली, तर देवी प्रसन्न होईल की नाही मला माहीत नाही परंतु आपले व समाजाचे म्हणजे लोकांचे मन प्रसन्न होईल आणि प्रसन्न 
आत्मविश्वास संपन्न मन सर्व प्रकारच्या संकटांचा सामना करू शकते व वाटेल ते स्वप्न पाहून ते स्वप्न पूर्ण करू शकते. यासाठी आपण आपल्या गोंधळ नामक संगीत विधी नाट्यात एक उपासक म्हणून जी उपासना करू, जी स्तुतीगीते, पुरानातील संदर्भ, दैवी अवतार कथा, शौर्य कथा, धर्मग्रंथातील ओव्या श्लोक, हिंदवी स्वराज्य इतिहास, आख्याने यांचे निरूपण दर्जेदार निवेदन, बतावणी, संगीत, दृष्टांत व दाखले यांच्या आधारे केले तर नक्कीच गोंधळाची हरवलेली प्रतिष्ठा परत येईल व गोंधळी हा वंदनीय पुरोहित म्हणून समोर येईल यात तिळमात्र शंका नाही.*

*यासाठी आपणही स्वतःसाठी एक आदर्श संहिता निर्माण केली पाहिजे व तिचे पालन केले पाहिजे. आपल्यासाठी आराध्य व वंदनीय असलेली कवड्याची माळ, संबळ, तुणतुने, दिवटी यांचे पावित्र्य जपले पाहिजे. मनोहारी व प्रसन्न पूजेची आरास असलेला पट आपल्याला भरता आला पाहिजे. रांगोळी, फळे पुष्पे, हळदी कुंकाची रास, कलश पूजा यांची सुरेख व आकर्षक पद्धतीने मांडणी आपल्याला करता आली पाहिजे. मंचावरील आपली भाषा, प्रसन्न व आत्मविश्वासपुर्ण मुद्रा, संवाद, हावभाव, हालचाल, संगीत संयोजन, नैपथ्य समर्पक आणि निसंदिग्ध व शुद्ध असावे. कुठल्याही प्रकारच्या व्यसनाला अजिबात थारा असू नये. बिडी सिगारेट ओढून, खाऊन-पिऊन, धूम्रपान करून कोणत्याही प्रकारची आराधना उपासना किंवा प्रबोधन होऊ शकत नाही. आपण आपले शिक्षण, शास्त्रीय ज्ञान व व्यावसायिक सामर्थ्य वाढवले पाहिजे.  सराव वाढवला पाहिजे. अज्ञानी किंवा अर्धज्ञानी प्रबोधकाचे प्रबोधन कुणीही ऐकुन घेत नाही. शुद्ध चारित्र्य व कौटूंबिक व सामाजिक आदर्श घालून द्यावे लागतील. अंगीकारावे लागतील. लोकांसांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असे चालत नाही. उक्ती आणि कृतीमध्ये समानता असायला हवी. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणतात ते यामुळेच.*

*सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण एकजूट असले पाहिजे. आपणच आपला आदर केला पाहिजे. परस्परांच्या कलेचा,  सादरीकरणाचा, ज्ञानाचा व नवनिर्मितीसह नवप्रयोगांचा आदर केला पाहिजे. त्याचे कौतुक केले पाहिजे. आपण जर आपल्यांना बाब्या म्हटले तर इतरही बाब्याच म्हणतील त्यामुळे आपण बाबु म्हटले पाहिजे तेव्हा इतर लोकही बाबूच म्हणतील. व्यावसायिक स्पर्धा समजून घेतली जाऊ शकते नव्हे ती असायलाच हवी कारण अशा सकारात्मक स्पर्धांमुळे कला समृद्ध होते. कलेची उंची वाढते परंतु म्हणून परस्परांविषयी मनामध्ये आकस किंवा अंतर नसले पाहिजे. जशी विद्या विनयाने शोभते तशी कलाही निरहंकाराने शोभते. अहंकार कलेचा व कलाकाराचा नाश करतो. चकाकते ते सर्व सोने नसते तर जुने तेच सोने असते हे ध्यानात घेऊन तात्पुरत्या फायद्यासाठी कायमचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊ.*

*गोंधळी ही एक प्राचीन जमात आहे. गोंधळ देवावतारातील विधी आहे. गोंधळी जातीत जन्म घेऊन, गोंधळ विधी करण्याची आणि गोंधळ कला सादर करण्याची दैवी संधी आपल्याला लाभली यासाठी आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे. गोंधळाचे महात्मे, गोंधळाची शुद्धता, गोंधळाचे पावित्र्य जतन करून ठेवले पाहिजे व गोंधळाचे एखाद्या धुडगूसात धिंगाण्यात रूपांतर होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपण सर्व गोंधळी समाज बांधवांनी व कलाकारांनी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या खालील ओळींचा कधीही विसर पडणार नाही याची काळजी घेऊया आणि तुकोबांना अपेक्षित असलेला तुकयाचा गोंधळ घालुया......*

*_आम्ही गोंधळी गोंधळी। गोविंद गोपाळांच्या मेळी।।_*
*_आमुचा घालावा गोंधळ। वाजवूंं हरिनामी संबळ।।_*
*_दहा पांंचा घाला जेवूं। आम्ही गोंधळाला येऊंं।।_*
*_काम क्रोध बकरे मारा। पुजा रखुमादेवीवरा।।_*
*_जेथेंं विठोबाचे देऊळ। तेथे #तुकयाचा_गोंधळ ।।_*


(बाळासाहेब धुमाळ)

दि. 04.07.2020

Friday 15 May 2020

अवडंबर.. बाळासाहेब धुमाळ

#अवडंबर

जरी अद्याप तरी वड, उंबर, पिंपळ या व्रुक्षांचे कुठलेही विशेष वैद्यकीय महत्त्व प्रयोगशाळेत सिद्ध झालेले नसले तरीही काही विशिष्ट लोक यांना दैवी वगेरे म्हणून मांडण्याचा प्रयत्न करतात.बरं, मांडतात ते मांडतात, ते वरून इतरांवरही दबाव आणतात, मानाच म्हणून!! विशेष म्हणजे या मांडणारांच्या दारात वा बांधावर हे व्रुक्ष नाहीत हं!!! 

आता जर यांचे असेलच वैद्यकीय महत्त्व तर दाखवा ना पेटंट एखादे. म्हणजे गरज पडली, जीव वाचवायचा असेल तेव्हा विज्ञान व आधुनिक वैद्यकशास्त्र व वेळ गेळी, जीव वाचला की मग जेव्हा मते मिळवायची वेळ येते तेव्हा धर्मशास्त्र व असिद्धध आयुर्वेदिक व योगशास्त्रीय मोठेपणांचा उपदेश!!! मानायलाही हरकत नाही परंतु सिद्धता महत्वाची नाही का? पुरानातले कपोलकल्पित ऐकीव दाखले देऊन चालत नाही. ते त्रिकालाबाधित व कधीही कुठेही सिद्धतेच्या अग्निदिव्यातुन पिर झाले पाहिजे.

या क्षेत्रातील लोकांनी, ज्यांनी हा असा उपदेश केलाय आजवर ते आपल्या ज्ञानाधिष्ठित तर्काप्रमाणे स्वतःला सिद्ध करू शकलेले नाहीत. ते फक्त भावनिक धमक्या देतात म्हणजे इमोशनली ब्लॅक मेल करत राहातात. विशेष म्हणजे याचा आधार ते धर्माला बनवतात. आहार, व्यायाम, वैद्यकशास्त्र हे जाती धर्म प्रांत भाषा देश निरपेक्ष असतेय.

वड, पिंपळ, उंबर हे व्रक्ष विशाल व कमी पावसाच्या प्रदेशातही जगु शकतील अशी आहेत कारण यांची मुळे खोलवर जातात. सर्वात महत्वाचे म्हणजे विशाल व डेरेदार आकारामुळे हे सावली छान देशात. लाखो करोडो पक्षी व सुक्ष्मप्राण्यांना अन्न निवारा पुरवतात, त्यांचे संरक्षण करतात, माती धरुन ठेवतात, वादळांना अडवतात, पुनरूत्पादन साखळीत महत्वाची भुमिका पार पाडतात हे विशेष आहे. सोबतच निसर्गातील सर्वच वनस्पतींमध्ये असल्याप्रमाणे यांतही काही औषधी गुणधर्म देखील आहेत परंतु हे चोवीस तास औक्सिजन वगेरे देत नाहीत. कुठलीही हरित म्हणजे हिरवी वनस्पती केवळ दिवसाच औक्सिजन देते.

  परंतु सावली व प्रतिकूल परिस्थितीत जिवंत राहण्याची क्षमता हा या व्रुक्षांचा गुण #विशेष आहे. तसा तो अनेक डोंगराळ झुडपांमध्येही आहे. परंतु ते यांच्याएवढे विशाल व डेरेदार नाहीत. त्यांना यांच्याएवढे आयुर्मान नाही. मी अधार्मिक वा नास्तिक अजिबात नाही परंतु याबाबतीत जे विवेचन केले जातेय तेही धर्माधिष्ठित ते मला अजिबात पटत नाही.

वड, लिंब, उंबर यांचे शास्त्रीय, वैद्यकीय महत्त्व जे सिद्ध करू शकत नाहीत ते याला धर्माशी जोडतात. जगात काय हिंदू हाच एक धर्म आहे काय? की जगात केवळ भारतातच हे व्रुक्ष आहेत? यांचे शास्त्रीय व वैद्यकीय महत्त्व तुम्ही सिद्ध करू शकता काय?? जर खरोखरच फारच वैद्यकीय महत्त्व असेल यांचे तर सिद्ध करा ना मग, खुप चांगली संधी चालुन आलीये, कोरोनाच्या रूपाने...

असे काही प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अहंकारी वगैरे संबोधले जाते. काही तर अशांना धर्मद्रोही, नास्तिक ते अगदी राक्षसी संबोधतात!! मला वाटते, हा प्रश्न अहंकाराचा वा इतर फाफट पसा-याचा नाही. बुद्धीचाही नाही कारण प्रत्येकजण बौद्धिक असतोच असे नाही परंतु, प्रश्न अनुभवाधारित निष्कर्षाचा, अंधत्वाचा, मूर्खपणाचा व नको त्यांना श्रेय देण्याचा नक्कीच आहे...

आपापल्या जातीने, धर्माने केलेल्या शिकवणुकीप्रमाणे कोण वागत नाही? त्यांचा अभिमान कुणाला नाही? मी स्वतः जातीभिमानी व धर्माभिमानी आहे परंतु त्याने प्रश्न सुटत नाही ना! मग श्रेय कुणाला देणार? धर्माला,अध्यात्माला की ज्ञानाधारित विज्ञानाधारित वास्तवाला? हे जग बुद्धीवाद्यांनी इथपर्यंत आणलेले आहे. मग ते संशोधक असोत, वैद्यक असोत, अभियंते, विचारवंत वा मग समाजसेवी असोत. हे सर्वच लोक बुद्धीवादी व कष्टाळू होते. यांना या प्रुथ्वीवर जीवसृष्टी खासकरून मानवस्रुष्टी जीवंत ठेवायची होती. तेच त्यांचे ध्येय होते.  म्हणून मी याचे श्रेय त्या बुद्धीवाद्यांनाच देईल..

परंतु जात व धर्माचा वापर करून आपली सामाजिक आर्थिक व राजकीय पोळी भाजून घेणारांना हे कुठे कळतेय त्यांना यामागील वैयक्तिक व राजकीय संधी जास्त कळते, दिसुन येते आणि म्हणून याचा वापर ते आपापल्या पद्धतीने, आपापल्या सोयीसाठी करून घेतात! परंतु यांना विरोध केलाच पाहीजे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल वा मग जयद्रथही दाखव व सुर्यही दाखव असे ठणकावले पाहीजे. हा सिद्धांत आहे मग हा सिद्ध का करू नये त्यांनी? याचा विचार व्हायला नको??

वैचारिक द्रुष्टीने विचार केलात तर केवळ या तीन झाडांचेच नव्हे तर पर्यावरणातील संपुर्ण मानवेतर सजीव तसेच निर्जीव घटकांचे पर्यावरणीय व वैद्यकीय महत्त्व अकल्पनिय व अमाप आहे. परंतु ते महत्त्व समजून घेण्यापेक्षा आपण त्यांना धर्माशी, श्रद्धेशी व अध्यात्माशी जोडलेले आहे. पुर्वजांचा हेतु उदात्त होता कारण जगात जेव्हा कुठलाही धर्म अथवा देव अस्तीत्वात नव्हता तेव्हाही आदिमानव निसर्गाची जोपासना करत होते. ती यामुळे की त्यांच्या दैनंदिन जीवनात यांचे अनन्यसाधारण महत्त्व होते म्हणून. आजच्या मानवाने #जोपासना सोडून #उपासना करायला सुरूवात केली. गाईला माता म्हटलेय आणि टेंपोत कोंडून ठेवलेय, दैवी म्हणवणारी पुरातन व विशाल झाडे स्वतःला वाचवू शकले नाहीत! तिथे आपले काय? नद्यांचेही असेच झाले. गंगा मैय्येचे गटार झालेय!!  म्हणजे याला धार्मिक अध्यात्मिक जोड आपण का दिली होती हे आपण विसरलोय!! अहो ती त्यांच्या रक्षणासाठी दिली होती, त्यांची गरज ओळखून परंतु हे सिद्ध केले आपण की आपण अशा कुठल्याही देवीदेवतांना घाबरत नाही. कारण त्यांच्यातली दैवी शक्ती कुठेही दिसली नाही. दिसली असती तर लोकं सुतासारखे सरळ वागले असते..

आज बाजारात कुठेही वड उंबर पिंपळाचे तेल, काढा, चूर्ण नाही. यावर कुठेही कारखाने चालत नाहीत. कुणालाही यापासून उत्पन्न मिळत नाही. कुणाही शेतकऱ्याच्या बांधावर औषधनिर्मिती करणाऱ्या कंपण्यांचे अधिकारी या व्रुक्षांची मागणी कधीही करीत नाहीत! उत्पन्न फक्त लाकडापासून मिळतेय! म्हणून सपासप कु-हाडी चालवल्या गेल्या, विशेष म्हणजे तथाकथित विकासाच्या नावावर!! घरासमोरील, शेतातील झाड तोडले की पाप लागते! वेगवेगळ्या पुजा घालाव्या वागतात! आणि रस्त्यांच्या दुतर्फा जी लाखो करोडो झाडे होती त्यांना का कुठली दैवी अथवा कायदेशीर शिक्षा झाली नाही?? 

प्रत्येक धर्माच्या धारणा वेगवेगळ्या असतात. या झाडांमध्ये आपण इथे अध्यात्म पाहतो म्हणजे जगात सर्वत्र असेच असेल असे नाही. विशेष म्हणजे सजीव व निर्जीव घटकांना आपल्याकडे अध्यात्माशी जोडूनही आपल्याएवढा या घटकांचा -हास जगात कुठेही झाला नाही. है दुर्दैवी आहे की नाही मी त्यात जात नाही कारण पुन्हा विषय दैवापाशी येतो जे असतच नाही परंतु नक्की की या पाशवी पर्यावरण -हासाची किंमत मात्र संपूर्ण मानवजात व सजीवस्रुष्टी भोगत आहे, भोगणार आहे. कारण यामागे विज्ञान आहे. हा कुठलाही दैवी प्रकोप वगेरे नाही. विज्ञानाचे पर्यावरणाचे महत्त्वही आधुनिक प्रगत शास्त्राने सिद्ध केलेय. त्याच्या विनाशाचे परिणामही दाखवून दिले आहेत. 

म्हणून मला वाटतं पर्यावरण म्हणजे निसर्ग हाच खरा देव आहे परंतु याची #उपासना नव्हे तर #जोपासना करण्याची आवश्यकता आहे. बघा पटतंय का? शेवटी प्रत्येकाची आपली विचार करण्याची पद्धती असते व त्यानुसार तो अभिव्यक्ती करत असो. प्रत्येक अभिव्यक्तीचा मी आदरच करतो. मित्रांनो, उंबराच्या झाडाच्या भोवती जर वटा बांधला तर त्याचा #औदुंबर होतो! वर्षातुन एखादे दिवशी देव वा देवी माणुन मानवजातीचे प्रश्न सुटणार नाहीत. माझा #औदुंबराला नाही, #अवडंबराला विरोध आहे.👆

बाळासाहेब धुमाळ.
9421863725

Friday 24 April 2020

कोरोनायुद्धाची तयारी

#कोरोनायुद्धाची तयारी...

मित्रांनो लॉक डाऊनचा अंधकार संपून मुक्त स्वातंत्र्याच्या शितल चंद्रप्रकाशाचे ग्रहण करण्यासाठी आसुसलेल्या चकोर पक्षासारखी आपल्या सर्वांची अवस्था झाली आहे. परंतु हा काळ ना कल्पनाविलास करण्याचा आहे ना काव्य प्रतिभा दर्शविण्याचा आहे. अगोदरच नैराश्य, हतबलता आणि भयभीत करणाऱ्या घटना तथा बातम्यांमुळे आपण सर्वजण मरणासन्नतेच्या फेजमध्ये गेलेलो आहोत. आशा-निराशा, जीवन- म्रुत्यू आणि आहे-नाहीच्या फे-यात आपले मन दोलायमान अवस्थेत आहे आणि अशा या विदारक युद्धजन्य परिस्थितीत कुठलेही अवजड व क्लिष्ट विचारांचे बाण सोडायला ना ते माझ्या स्म्रुतीच्या भात्यात आहेत आणि ना ही तुम्हाला ते पेलवणार आहेत! त्यामुळे साहित्यिक अभिव्यक्तीच्या जंजाळात न पडता कोरोनाच्या दुष्टचक्रातून मुक्त होण्याच्या वास्तववादी विचारांच्या अनुषंगाने माझ्या मनात जे विचार आले, ज्यांनी मला रात्री झोपु दिले नाही ते सरळसोट तुमच्यासमोर मांडतो.

बाकी जरी सोडून दिले सर्व तरी एक वास्तव न स्विकारता ते सोडून चालणार नाही की हे युद्ध आहे! शिवाय हे युद्ध इतक्यात संपणार नाहीये! कोरोना लवकर जाणार नाहीये! तो ब-याच लोकांचे जीवही घेणार आहे! परंतु असे असले तरी ते बरेच लोक ते असतील जे कोरोनाला गांभिर्याने घेणार नाहीत. 'कुछ नही यार, चलता है' हा अविर्भाव त्यांना नडणार आहे. काही सतर्क व निरपराध देखील दुर्दैवाने बळी पडतील परंतु तरीही सरकारने व आपण जनतेने जर जागरूक होऊन पाऊले उचलली तर कोरोना विरूद्ध आपल्याला विजय प्राप्त होऊ शकतो. 

तसे पाहता हे युद्ध प्रचंड घनघोर असणार आहे. कारण आपली लोकसंख्या, प्रादेशिक विस्तार, सामाजिक विविधता, शैक्षणिक व आर्थिक विषमता, आपली अर्थव्यवस्था, मर्यादित संसाधने व वैद्यकीय सोयीसुविधा यामुळे हे आव्हान जास्त कडवे असणार आहे. असे असले तरी द्रुढसंकल्प, एकजूट, पुर्वनियोजन व रणनीती यांच्या जोरावर, आपण जरी काहीसे दुभळे असलो तरी या वैश्विक महामारीवर मात करू शकु. अर्थात आपण घाबरूनही जायचे नाहीये. कारण याचा म्रुत्यु दर कमी आहे परंतु गाफीलही राहायचे नाहीये कारण याचा संसर्ग दर प्रचंड आहे. हा गुणाकार करतो परंतु मा. मुख्यमंत्री म्हटल्याप्रमाणे आपण याला गुणाकार तर सोडा बेरीजही करू द्यायची नाहीये उलट आपणच याची वजाबाकी करायची आहे.

यासाठी सर्वप्रथम तर सरकारांना आपली सक्षमता वाढवावी लागणार आहे. किमान कोरोनाविरूद्धच्या लढाईतील फोरफ्रंट सोल्जर्स म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, पैरामेडीकल स्टाफ, पोलीस, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, सफाई कामगार हे लोक तरी कोरोना प्रादुर्भावापासुन दुर राहीले पाहीजेत. कारण एकतर हे लोक संख्येने मर्यादित असतात. जर हेच आजारी पडले तर यांची कामे कोण करील? व दुसरे म्हणजे जर यांनाच बाधा झाली तर यांच्यापासून इतरांना प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट असते आणि म्हणूनच या सैनिकांना बाधा होणार नाही यासाठी सर्व आवश्यक वैद्यकीय संरक्षक साहीत्य यांना उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.

जनतेला द्यावयाच्या मुलभूत सेवा आधुनिक पद्धतीने, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगून व वैद्यकीय नियमांनुसार द्याव्या लागणार आहेत. अधिकाधिक चाचण्या कराव्या लागतील. लोकांचे सर्वेक्षण करावे लागेल. सर्वांची सर्व माहीती जवळ ठेवावी लागेल. प्रत्येकाच्या प्रत्येक हालचालींवर, वर्तनावर शक्य तेवढे बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे. उपलब्ध संसाधनांचा खुबीने वापर करून अर्थचक्र गतीमान ठेवावे लागेल.या युद्धातील आवश्यक सामुग्री म्हणजे वैद्यकीय इन्फ्रास्ट्रक्चर व उपकरणे, औषधे व इतर साधने निर्माण करण्यावर तसेच ती इतरांकडून उपलब्ध करून घेण्यावर देखील भर द्यावा लागणार आहे. काही तात्कालिक बदल करावे लागणार आहेत उदाहरणार्थ केवळ खाजगीच नव्हे तर सरकारी कंपन्या व कार्यालये देखील चार शिफ्ट्समध्ये चालवावी लागतील जेणेकरून कामावरही परिणाम होणार नाही व गर्दीही होणार नाही. सार्वजनिक वाहतुकीच्या सांधनांपेक्षा वैयक्तिक दुचाकी, सायकल अशी साधने वापराला शक्य तेवढी चालना द्यावी लागणार आहे जेणेकरून सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमधील गर्दी कमी होईल आणि शारिरीक अंतर वाढेल. मुख्य म्हणजे सर्व प्रकारच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिवहनावर बंधन घालावे लागेल.

कुठलेच उत्पादन, व्यवसाय, व्यापार बंद तर होणार नाही परंतु त्यामुळे कोरोना प्रसारही होणार नाही अशी रणनीती सरकारने आखावी लागणार आहे. सृजनशीलता व ज्ञानाचे दैनंदिन जीवनातील उपयोजन महत्वाचे ठरणार आहे. शक्य तेवढे मोबाईल, औनलाईन, संगणकीय व डीजीटल व्यवहार वाढवावे लागणार आहेत. खरेदी विक्रीमध्ये घरपोच डिलिव्हरी हा पर्याय महत्वपूर्ण असला पाहिजे. तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा पाण्याअगोदरच वळण तयार करावे लागणार आहे. कुठल्याच प्रकारचे राजकीय, धार्मिक व इतर सामुहिक सभांना कटाक्षाने मज्जाव केला पाहीजे. आंदोलने, मोर्चे यांना परवानगी नाकारली पाहीजे.

आपले म्हणजे जनतेचे कोरोनामुळे जीवन थांबले नाही पाहिजे, ते थांबणारही नाही परंतु हा कोरोना काय आहे? हे आपण समजून घेऊन त्याचा मुकाबला करायला पाहीजे. त्यासाठी आपल्या जीवनपद्धतीत बदल करण्याची आवश्यकता पडणार आहे. आपल्या वर्तनात आपल्याला बदल करावा लागणार आहे. दैनंदिन कामेच परंतु वेगळ्या पद्धतीने करावी लागणार आहेत. पावलोपावली सतर्कता बाळगावी लागणार आहे. काटकसरीने व साधेपणाने जगावे लागणार आहे. आपल्या सवयी, आवडीनिवडी रिती बदलायला लागणार आहेत.

आपण रोजचे रोज बाजारात जाण्यापेक्षा आठवडा, पंधरवडा, महीनाभर पुरेल एवढे साहीत्य एकदाच खरेदी करायला लागणार आहे. टाळेबंदी, विलगीकरण, शारिरीक अंतर पाळावे लागेल. पाहुणे, पर्यटन, सणोत्सव, धार्मिक प्रार्थना व कार्यक्रम, लग्नसमारंभ यांना मुरड घालावी लागणार आहे. समुह, गर्दी हे आपल्यासाठी घातक आहे हे समजून घ्यायला लागणार आहे. स्वच्छतेच्या सवयी, निर्जंतुकीकरण, सुरक्षितता, आहार, व्यायाम यांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. संयम, सहकार्य, मानवता जपावी लागणार आहे. शेतात उन्हातान्हात घाम गाळणारे शेतकरी व जीवनावश्यक वस्तुंचे व्यापारी दोघांप्रतीही आपण कृतज्ञता बाळगली पाहीजे.

कोरोना विरूद्धचे हे युद्ध किमान दीडदोन वर्षे चालेल असा तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे उतावळेपणा कामाचा नाही. या युद्धात विजयी व्हायचे असेल तर नव्या, आधुनिक व वैज्ञानिक म्हणजे वैद्यकीय शस्त्रांचा वापर करावा लागणार आहे. कोरोनाचा पराभव ठोस चाणाक्ष युद्धनीती शिवाय होणार नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला आपल्या प्राणापेक्षा आपल्या कुटुंबातील व्यक्तिंच्या, मित्रमंडळी, सहकारी, शेजारीपाजारी यांच्या प्राणांची काळजी घ्यावी लागणार आहे. उघड्यावर शौच करणे, थुंकणे, खोकणे, शिंकणे कटाक्षाने बंद करायचेच आहे. मास्कला आपल्या पोषाखाचा अविभाज्य भाग बनवायचे आहे आणि आपल्यामध्ये अथवा आपल्या कुटूंबियांमध्ये थोडी जरी लक्षणे आढळली (ताप व श्वसनत्रास) तर दवाखाना गाठायचा आहे.

शेवटी एवढेच...
बांधवांनो, आपण जास्त नाही, काही महिनेच आपल्या हक्काधिकारांकडे दुर्लक्ष करून कर्तव्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. छोट्या छोट्याच परंतु कोवीड 19 या संसर्गजन्य वैश्विक महामारी विरोधात मोठ्या ठरणाऱ्या बाबी समजून घेऊन, प्रभावी लस येईपर्यंत जर का आपण संयमाने एकजुटीने आपलेपणाने किल्ला लढवला, सरकारला आवश्यक ते सहकार्य केले व सामाजिक सौजन्य जपले तर निश्चितच आपण सर्वजण हे युद्ध जिंकु आणि हे युद्ध आपल्याला काहीही झाले तरी जिंकायचेच आहे.👍 विजयध्वज फडकवायचाच आहे.🇮🇳

#जयहिंद

(बाळासाहेब धुमाळ)