Sunday 8 May 2016

गोंधळ

महाराष्ट्राची प्राचिन परंपरा गोंधळ आणि गोंधळी।

लग्न समारंभ , नवीन घर बांधणे किवा विकत घेणे नवरात्र गृहप्रवेश ईत्यादी शुभ मंगल प्रसंगी व आपल्याला होणाऱ्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ हा कार्यक्रम ठेविला जातो.

या कार्यक्रमामध्ये गोंधळी लोक सर्व देवीदेवतांचे नाव घेतात.त्यांना गोंधळास येण्याचे आवाहन करतात. या कार्यक्रमामध्ये सर्वाना अन्न दान केले जाते.

महाराष्ट्रातील लोककला या प्रकारात किर्तना नंतर गोंधळाला विशेष म्हणजेच अनन्य साधारण महत्त्व आहे. गोंधळ आणि गोंधळी प्राचीन काळापासून लोककला प्रकारात मोडली गेली आहे. विशेषत: तुळजाभवानी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली.

अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा व कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आपल्या दारावर आलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी. अंबेमातेच्या जयजयकार करीत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींचे गाणे सादर करतो. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला 'संबळ गोंधळ' म्हणतात. तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला 'काकड्या गोंधळ' असे म्हटले जाते.

आजही कोणत्याही शुभकार्याअगोदर जवळपास सर्व समाजात कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा लोकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्यांनी गोंधळ घालण्यासाठी बोलावले असेल तेथे जोंधळ्याच्या ताटाचे तिकाटणे उभे करतात, दिवटे पेटवतात. दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात. हे ऐकताना विशेष आनंद होतो.

उदा.

अंबे जोगवा दे जोगवा दे
माय माझ्या भवानी जोगवा दे ।

हे जसे भक्तीची भक्ती करणारे गीत आहे तसे-

मी मिरचीचे भांडण ।
एका रोज खटखटीन जी ॥
मिरची अंगी लईच ताठा ।
म्हणतिया मी हाई तिखटजी ॥

असे विनोदी गीतही सादर केले जाते.

उदा.
रत्नागिरी ज्योतिबा ।
गोंधळा या हो ।
तुळजापूरची अंबाबाई गोंधळा या हो।
पंढरपूरचे विठोबा गोंधळा या हो ।

असे गीत गाऊन आमंत्रित केले जाते. त्यात वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. सर्वसाधारणपणे रात्री ९ च्या सुमारास सुरु झालेला गोंधळ पहाटेपर्यंत सुरू असतो. यासाठी कुठलाही रंगमंच लागत नाही. घरापुढील आंगण, ओटा चालतो. रंगभूषा आणि नेपथ्यही नसते. संत साहित्यात देखिल गोंधळाचा उल्लेख आढळतो.

संत एकनाथांनी -

द्वैत सारूनि माळ मी घालिन।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन।
भेदरहित वारीस जाईन।

असा जोगवा मागितला.

असा हा गोंधळ महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. आजही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात गोंधळ परंपरा पाहावयास मिळतो .

Only collecter

मातृभक्त परशुराम by Balasaheb Dhumal

=======मातृभक्त परशुराम======

            आज भगवान परशुराम महाराजांची जयंती आहे. भगवान परशुराम जे विष्णुचे सहावे अवतार होते ते आपल्या आईवर अत्यंत प्रेम करत असत. पिता जमदग्नी  ऋषी व माता रेणूका यांचे ते पाचवे पुत्र होते, अशी आख्यायिका आहे की, त्यांच्या आश्रमातुन ते आश्रमाबाहेर असताना तेथील राजा सहस्त्रार्जुन याने आश्रमातील कामधेनू नावाची गाय आश्रमावर हल्ला करुन व जमदग्नी ऋषींचा वध करुन पळवून नेली. पतीच्या निधनाने माता रेणूका सती गेली. आईच्या विरहाने व्याकुळ भगवान परशुराम  शोक करु लागले . तेव्हा त्यांचे मातृप्रेम पाहून आकाशवाणी झाली की "तुला तुझी आई भुमीतून वर येवून दर्शन देईल मात्र तु मागे वळून पाहू नकोस". मात्र काही वेळाने परशुरामांनी मागे वळून पाहीले तेव्हा माता रेणुकेचे फक्त डोके वर आले होते. म्हणून आजही आपण रेणुका मातेचे फक्त शिर अर्थात 'तांदळा' एवढेच रुप पाहतो.
अशी ही आख्यायिका आहे की, पुजेला नदीवर पाणी आणायला गेलेल्या रेणुका मातेला यायला उशिर झाला म्हणून संशयाने क्रोधीत होऊन जमदग्नी ऋषींनी आपल्या मुलांना मातेचे शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. मात्र पाचही पुत्रांनी नकार दिला, त्यांचा जमदग्नीने वध केला. सहावा पुत्र परशुराम हा अत्यंत बुध्दीमान, शुर व आज्ञाधारक होता. वडीलांचा राग ओळखून त्याने मातेचा शिरच्छेद केला. त्या नंतर पित्याकडून वर मागून भावंडासह मातेस जीवंत केले. येथे जमग्दनी ऋषींच्या क्रोधाचे कारण रेणुका मातेने तुलसी बागेकडे दुर्लक्ष केल्याने बाग करपली. म्हणून जमग्दनी क्रोधीत झाले असे ही सांगितले जाते.
तिसरी एक आख्यायिका अशी आहे की, पुत्र परशुरामाकडून आपल्या पत्नीचे शिर उडविल्या नंतर जमग्दनी ऋषी पत्नी विरहाने व्याकूळ झाले व पश्चातापाच्या आगीत होरपळून पुत्र परशुरामाला रेणुका मातेला जीवंत कर म्हणून विणवणी करु लागले. तेव्हा परशुराम महाराज, मातेचे शिर जे उडून स्वर्गात गेले होते त्याच्या शोधात स्वर्गात जातात व देवांशी चर्चा करुन यावर उपाय शोधतात. देव गणांनी त्यांना मातेच्या शिराचा जागर करण्यासाठी गोंधळ घालण्याचे सुचविले. मग ब्रम्हा विष्णु महेशासह भगवान परशुरामांनी विश्वातील पहिला 'गोंधळ' स्वर्गात घातला.  अशाप्रकारे देवीचा गोंधळ अस्तिवात आला व तो घालणारी गोंधळी जात जन्मास आली. म्हणजे 'भगवान परशुराम हे आद्य गोंधळी होते' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र माता रेणुका आपल्या मागे खरोखरच येतेय का ? या कुतूहलातून परशुरामाने मागे वळून पाहिले आणि माता रेणुका तेथेच लुप्त झाली. ते ठिकाण म्हणजे आजचे माहूर जे पूर्वी मातापूर म्हणून ही ओळखले जात होते.
अशा अनेक आख्यायिका आहेत. मात्र आख्यायिका अनेक असल्या तरी भगवान परशुराम हे अत्यंत विदवान, शुर, आज्ञाधारक व मातृप्रेमी पुत्र होते हे स्पष्ट होते. आज त्यांची जयंती भारतभर व भारताबाहेरही अत्यंत हर्षोल्हासाने साजरी केली जात आहे. "गोंधळी" जात ही मातेची भक्त असल्याने गोंधळी समाज बांधवांत तर आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे.
आजच्या दिवसाचे आणखी एक विशेषत्व म्हणजे आज 'आंतरराष्ट्रीय मातृदिन' आहे. रेणुका मातेला जगदंबा, जगदमाता व आदिशक्ती या नावांनी ओळखले जाते. म्हणजेच जगदंबा ही सर्व विश्वाची आई आहे. आईचे आपल्या सर्वांच्या जिवणात अत्यंत मानाचे स्थान आहे. आई म्हणजे हे सांगताना कितीही मोठा विदवान असला तरी तो शब्दहीन होतो.
आईचे वर्णन करताना तिला अनेक शब्दकारांनी अनेक उपमा दिल्याचे आपण वाचतो. आईला सर्व गुन्हे माफ करणारे न्यायालय, स्वत:च्या मनाचा आरसा, दुधावरची साय, लंगडयाचा पाय, चालते बोलते विश्वविद्यालय असे  संबोधले  जाते. काहींनी तर आईला ब्रम्हा विष्णु महेश्वराची उपमा दिली आहे तर काहीजणांनी आईला कधीही न सरनारी व कधीही उरणारी शिदोरी असेही संबोधले आहे. साने गुरुजींनी आपली आई अत्यंत भावस्पर्शी सांगितली आहे. आईचे आपल्यावर एवढे उपकार असतात की, तिच्या एका जन्माचे उपकार आपण हजार जन्म घेतले तरी फिटत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या परीने तिची वर्णन करतो व तिची थोरवी गातो. म्हणजे बघाना जर आपल्याला कुठे इजा झाली वा वेदना होवू लागल्या की आपल्या मुखातून अलगद ध्वनी बाहेर येतो तो “आई”! अशा या आईला विनम्र नमन. ....
शेवटी सर्वाना भगवान परशुराम महाराज जयंतीच्या व मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. या लेखाचा शेवट मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात असताना केलेल्या कवितेने करतो.

 ..............आई...............

जिने निर्मियले शब्दां, ती ब्रम्हरुप आई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

पोसण्या चिमुकल्या तान्हया
जी रात्रीचा दिस करी
कोमेजता बाळ जराही
जी रात्रभर जागी राही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

न असे स्वत:चे भान
केवळ चिमुकल्यावरीच असे ध्यान
जी नयनात तान्हुल्याच्या
उषत्काल उद्याचा पाही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

जी जगे तान्हयाकरीता
नसे ध्येय आगळे जीवणाचे
वाढविण्या पोटचा गोळा
अवघे आयुष्य आपले वाही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

उन्हात स्वत: राही
छाया चिमुकल्या देई
न होवोत त्रास इवल्या
करीता स्वयं कष्ट घेई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

वस्त्र मिळोत तीच्या बाळा
करिता स्वत: चिंधी लेई
निजविण्या पाडसा तिचिया
जी अखंड अंगाई गाई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

सुखात कधी तर कधी दु:खात त्याच्या
वर्षावात यशाच्या तर पुरात आसवांच्या
बाळा देई स्थान आई आपुल्या -हदयी
वेडी जगावेगळी त्याच्याच वृष्टीत न्हाई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही

मांगल्यमुर्ती आई,
कैवल्य किर्ती आई
अमृत बिंदू आई,
निस्वार्थ सिंधू आई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

हकी जीवण नौका सकलांची
करुनी त्याग अण समर्पण
जी भ्र् ही न काडीता मुखातून
डोंगर दु:खाचा साही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

सरता गरज घरटयाची,
पाखुरे सोडूनी जाती
स्वार्थ पाहती आपुला
तोडूनी सर्व नाती
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

इतरांस्तव मोठे
पण आईस तरीही छोटे
सहन करी सर्व
जरी जिवाची होतसे लाही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

मी पामर सान एैसा
महती तिची काय वर्णू?
परी सांगतो एतुके, सर्वस्व माझे आई
हर क्षण आईविरहाचा करीतसे मजला त्राही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

मागणे हे ईश्वरा, असू देत तुजा आसरा
परी माफ कर मजसी, स्थान तिला तुज आदी
करीतो नमन देवा, माऊलीस कोटी कोटी
उपकार जिचे फडने, सहस्त्रजन्म शक्य नाही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

प्रार्थना तुजला देवा, दे जन्म सदैव तिच्या पोटी
न सुचोत शब्द मजला, वर्णया तिजसाठी
वाहती नयनी अश्रु अन बुध्दीच जड होई
विरहात तिच्या हे कोकरु कदापि न राही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

शब्दांकन - बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ
    मो.न.  - 9421863725

Friday 6 May 2016

सैराट परश्या-आर्ची by Balasaheb Dhumal

.........सैराट परश्या-आर्ची .....
आज महाराष्ट्र र्सैराटमय झाला आहे. परश्या आर्ची आणि नागराज यांची काहीजण स्तुती करत आहेत तर काहीजण टिका करत आहेत. पण मला वाटते नागराज मंजुळेंनी सैराटद्वारे समाजातील जातीपातीच्या भिंती तोडू पाहणा-या प्रेमींचा  समाजाकडून होत असलेला छळ आणि या प्रेम करणा-या मुला-मुलींना कुटूंबाकडून व समाजाकडून असलेल्या अपेक्षा सैराट मध्ये दाखवल्या आहेत. त्यांचा दाबला जात असलेला आवाज व कोंडला जात असलेला श्वास दाखवला आहे . सामाजिक विषमता हा या देशाला लावलेला कलंक आहे आणि दुर्दैवाने हा कलंकच आपल्याला बहूमान वाटतो आहे. मग जात कोणतीही असो, अगदी मलाही माझी जात ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ वाटते. रोटीबेटी व्यवहारात जातच पाया असते पण जातीचा पाया व्यवसाय आहे हे विसरलं गेलं. हा कलंक धुतला जाऊ शकतो हा विश्वास नागराजला आहे. ख-या अर्थाने नागराज हा केवळ एक दिग्दर्शक नसुन या भेदाभेदाने ग्रासलेल्या समाजाला प्रेमाने एकात्म करू इच्छिणा-या प्रेम पाखरांच्या पंखांना कसे छाटले जात आहे हे दाखवणारा दृष्टा उद्बोधक आहे. सैराट अशा पाखरांच्या पंखांना बळ देणारा प्रेरक ठरणार आहे. मुळात नागराज हाच या समाजाला नकोसा झालेला, या समाज रचनेचा बळी होता. हे त्यानेच सांगितले आहे. ज्याने हे सर्व अनुभवले आहे असा तो एक खंबीर प्रबोधनकारी, क्रांतिकारी, समाज सुधारक आहे. आता तो कुणाला बोचतोय तर कुणाला टोचतोय पण त्यात त्यांचाही दोष नाही. जातीचा पगडाच एवढा घट्ट आहे की त्यामुळे निर्माण होणारी अमाणुषता न जाणवण्या इतपत मने बोथट झाली आहेत आपली.
मुख्य म्हणजे कोणी कोणाला पळवुन नेहले अथवा कोण कोणासोबत पळून गेला हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की का आपल्या इच्छेनुसार जिवनसाथी निवडू दिला जात नाही? का प्रेमाला विरोध केला जातो? सैराट मध्ये कोळी-मराठा दाखवले आहेत परंतू मराठा ऐवजी इतर जातीतील मुलगी असती तरीही स्थिती काही वेगळी नसती. वास्तविक पाहता किमान प्रेम प्रकरणांमध्ये तरी मुलीच्या घरच्यांकडून जातीऐवजी मुलाचा स्वभाव, त्याचे आचरण, विचार, देखणेपण, शरीरयष्टी, कर्तृत्व आणि योग्यता पाहायला हवी. मुलीच्या बाबतीतही असेच काहीसे!  सैराट मधील परश्या देखणा, हुशार, सुस्वभावी, मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा, मदतगार वृत्तीचा, निर्व्यसनी मुलगा होता. त्याच्या विचारांना आदर्शाचे अधिष्ठान होते हे त्याच्या व त्याच्या शिक्षकामधील संवादातून दिसुन येते. मात्र केवळ त्याच्या जातीमुळे व गरिबीमुळे त्याला डावलले गेले. अशावेळी घरच्यांच्या हे का लक्षात येत नाही की ते दोघे परस्परांवर जिवापाड प्रेम करत आहेत, त्यातच त्यांचे सुख आहे आणि त्यांच्या सुखात आपले सुख असायला हवे. दुसरे म्हणजे आर्ची-परश्याने त्यांचा निर्णय योग्य आहे हे सिद्ध करून दाखविले होते. त्यांना मुलगा झाला होता, आर्थिक प्रगतीही झाली होती शिवाय त्यांनी घरच्यांकडून काही अपेक्षाही केली नव्हती तरीही त्यांना जिव गमवावा लागला!!! काय चुक होती त्यांची? थोडेसे अपरिपक्व वयातील प्रेम एवढीच काय ती टिका करायला जागा !!
सैराटची कथा ही जवळजवळ प्रत्येकानेच आपापल्या जिवनात अनुभवलेली आहे. जात वेगळी असल्याने व आर्थिक विषमता असल्याने असे कित्येक परश्या-आर्ची सोबत जिवन जगू शकले नाहीत व ज्यांनी तसे धाडस केले त्यांना त्याची किंमत मोजावी लागली. पण आता हवेने आपली गती व दिशा बदलली आहे , तुम्हाला मला जे जमले नाही ते आजचे तरूण करून दाखवतील आणि पुढील काही वर्षांत या भेदाभेदाच्या भिंती आपोआप ऊळमळून पडतील यात शंका नाही.
नागराजला विरोध करण्यापेक्षा आपण प्रत्येकाने चिंतन व आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, मीही. कारण आर्ची-परश्याचे सैराटपण प्रातिनिधीक आहे ते चित्रपटाद्वारे नागराजने मांडले आहे.
साधी गोष्ट आहे मित्रांनो ज्यांनी ही व्यवस्था निर्माण केली त्यांनी स्वतःत बदल केला पण आपण स्वतःला बदलायला तयार नाही आहोत. किमान प्रेम प्रकरणांत तरी हा पुरूषी अहंकार व स्वतःला श्रेष्ठ समजण्याची जुलमी अहंकारी वृत्ती सोडली जावी असे मला वाटते. बाकी ज्याचे त्याने ठरवावे.
समाज चित्रपटाने बिघडत नाही, तसे असते तर समाज खुपच सुधारलेला असता !!! प्रश्न आहे बोधाचा तर  समाजाने आता तरी जातियवाद सोडायला हवा! सैराट हा प्रस्थापित आणि विस्थापित अशा नजरेतून पाहीला तर दाहक वास्तवाचा प्रत्यय यईल.
आर्ची जे या चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र आहे ते एक केवळ स्री पात्र नाही तर ते एक मत आहे आजच्या स्त्रीचं! जी विचाराने अत्यंत परिपक्व आहे, धाडसी निर्भीड आणि स्वतःच्या विचाराने वागणारी आहे. जी कोणाला घाबरत नाही, कोणाच्या दबावाखाली रहात नाही. जी समर्थ आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेवून ते योग्य आहेत हे सिद्ध करायला. जीला जाणीव आहे भारतीय संस्कृतीची, जी धैर्याने तोंड देऊ शकते संकटांना! ! जी कष्टाळू आहे, पतीच्या पावलावर पाऊल टाकत त्याला शेवट पर्यंत साथ देण्यास कटिबद्ध आहे. पण युगानुयुगे जे दमन होते आहे तिच्या भावभावनांचे आणि चिरडले जाते आहे तिच्या स्वप्ननांना ! या सर्वांना ती वैतागली आहे आणि बंड करून उठण्यास आतुर आहे. अशा मुलीचा मानस आणि अयशस्वी संघर्ष नागराजने उत्तमरीतीने मांडला आहे. पुरूषी मानसिकतेपुढे हारली ती, पण चणुक दाखवून गेली आपल्या क्षमतेची आणि देऊन गेली एक हिंमत तिच्या सारख्या अनेक आर्चींना!!
शिवाय आपण याचाही विचार करायला हवा की, परश्या-आर्ची चा निरपराध अनाथ मुलगा काय साधु संत विचारवंत किंवा सुधारकच होईल का? ? जर तो नक्षलवादी आतंकवादी वा चोर लुटारू दरोडेखोर अथवा विक्षिप्त मानसिकतेचा मनोरुग्ण गुन्हेगार निघाला तर नवल ते काय? त्यात त्याचा तरी काय दोष असेल? खुप कमी नागराज असतात जे समाजाला ते नको होते तरी आज समाजाचे प्रबोधन करताहेत. बहूतांश नागराज व परश्या-आर्चीचे लेकरं विद्रोहच करतात! ! त्यामुळे हे परश्या-आर्चीचे सैराटपण समजून घ्यायला हवे असे मला वाटते.

शब्दांकन: बालासाहेब सिताराम  (बी.एस.) धुमाळ
मो. 9421863725

Sunday 1 May 2016

दुसरी पारी

सुर्योदय दररोज होतो, सुर्यास्तही दररोज होतो. पण जेव्हा एखादा सुर्योदय मनात विचित्र हुरहुर घेवून येतो. दररोजच्या कामाची गती मदांवतो, लगबग कमी करतो, जेव्हा कार्यालयात आपल्या टेबलवर कतृज्ञतेच्या भावनेने सेवानिवृत्तीबददल शुभेच्छांचे गुच्छ यायला लागतात तेव्हा आजचा दिवस आपला कार्यालयातील शेवटचा दिवस आहे हे वास्तव पटत नाही. आजवर येथील प्रत्येक टेबल, फाईल, कपाट  हेच आपले विश्व होते, त्यावर आपला अधिकार होता जो उद्यापासून नसेल यावर विश्वास बसत नाही. वास्तविक पाहता कुण्याही कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक व्यक्तीस सेवानिवृत्ती दिवशी आनंद कमी व दु:ख अधिक होते. ज्याच्या डोळयाच्या कडा ओल्या होणार नाहीत असा एकही व्यक्ती आढळत नाही.
 आजवर आपण आपल्या आयुष्याचे हिरो असतो कुटूंबाच्या समस्या, अडचणी, वाटचाल, आरोग्य, इच्छा-आकांक्षा यांची आपण काळजी घेतो. मर्यादित वेतनात आपल्या कुटूंबाचा गाडा चालवून स्वपनांच्या पूर्ततेसाठी थेंब थेंब बचत करतो. मुलांचे शिक्षण, त्यांचे करिअर व दोनाचे चार हात करण्यासाठी राबराब राबतो. पण यापुढील भूमिका आपल्याला  सहकलाकार म्हणून पार पाडायची आहे यावर आपला लवकर विश्वास बसत नाही.सुखरुप सेवानिवृत्त झालो याचा आनंद जरी असला तरी उद्यापासून काय ? माझा वेळ कसा जाईल? स्वत:सह कुटूंबाला घडयाळयाच्या काटयांबरोबर धावण्याची लागलेली सवय कशी मोडेल ? हे प्रश्न डोक्यात थैमान घालतात.
वस्तु: सेवानिवृत्ती ही अविश्वसनिय जरी असली तरी ती निश्चित असते. जसा जन्मासोबत मृत्यु निश्चित असतो, तशीच नेमणूकीसोबत सेवानिवृत्तीही निश्चित असते. ते एक कटू वास्तव असते ज्याचा स्विकार हा प्रत्येकाला करावाच लागतो. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात जाण्यासाठी त्या व्यक्तीची अपत्ये, सुन, नातवंडे चांगली असावी लागतात.आजवर घरातील प्रत्येक लहान मोठे निर्णय परवानगी घेवून अथवा कल्पना देवून घेतलेले असतात. मात्र जर कुटूंबाकडून सेवानिवृत्तीनंतर वेगळी, दुय्यम वागणूक दिली गेली तर अशा वेळी मन दुखावते, मनस्ताप होतो, चिडचिड होते. कमी झालेली कमाई, आर्थिक चणचण आणि काही गोष्टी तरुणपणीच का केल्या नाहीत याचा पश्याताप, गेलेली वेळ, काही चुकलेले निर्णय, आरोग्याच्या सुरु झालेल्या कटकटी व्यक्तीला हतबल करतात. कुटूंबाची घडी निट असेल तर ठिक नाही तर अनिच्छेने अनेकजण वृदधाश्रमाचा  रस्ता धरतात.
पण असे म्हटले जाते की, कर्तृत्तववान माणसाच्या सेवापुस्तकेत निवृत्ती हा शब्द कधीच येत नाही. सेवानिवृत्ती ही एका अर्थाने जिवणाची एक नवी सुरुवात असते. नव्याने जीवन जगण्याची एक नवी संधी असते.  सेवा काळातही समस्या होत्याच ना ? त्या आपण यशस्वीपणे सोडवितो, मग सेवानिवृत्तीनंतर च्या समस्या आपण सोडवू शकत नाही का? जुण्याची नव्याशी सांगड घालता आली, अतिव स्वाभिमान टाळला तर जनरेशन गॅप नावाची समस्याही येत नाही.
पर्यटन, अध्यात्मिक व सामाजिक कार्य, स्वभावातील थोडीशी लवचिकता, प्रदिर्घ अनुभव व परिपक्व बुध्दीमत्तेच्या जोरावर जीवणाच्या कसोटी क्रिकेटच्या दुस-या पारीची सुरूवात जर आत्मविश्वासाने केली तर जीवनात कधीही दुःख, उदासी व हताशा वाट्याला नाही.

शब्दांकन -  बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ
मो.न. 9421863725