Thursday 1 March 2018

अम्रुतमहोत्सवी आधारवड शारदाताई बाळकृष्ण रेणके

......अम्रुतमहोत्सवी आधारवड......

मित्रांनो नमस्कार, कोणत्याही कर्तृत्वान पुरुषाच्या यशापाठीमागे एका कर्तव्यशील महिलेचा मोलाचा हातभार असतो हे आपण आजवर अनेक उदाहरणांमधुन ऐकलेले, पाहिलेले व वाचलेले आहेच. त्या कर्तृत्वान पुरुषाचे नाव तर आपण घेतो मात्र त्याच्या यशामध्ये उल्लेखनीय नैतिक वाटा असलेल्या महीलेचा मात्र विसर पडतो. अनेकदा तर अशी नावे समोरही येत नाहीत. बरे असेही नाही की हे असे मुद्दाम केले जाते कारण ही महीला दुसरी तिसरी असतेच कोण?आई,पत्नी,प्रेयसी, बहीण, मुलगी, मैत्रिण,आत्या, मावशी मामी,आजी म्हणजे आपलंच कुणीतरी अगदी जवळचं.पण काळाच्या ओघात,धावपळीत व नैसर्गिकता म्हणुन असे दुर्लक्ष होत असते. परिणामी हे महत्वपुर्ण पात्र पडद्याआडच राहतं.
तीने केलेला त्याग, घेतलेले परिश्रम, सोसलेल्या यातना आणि केलेली हुरहुर निरूल्लेखीत राहाते. असे होऊ नये म्हणून मी आपणास आज अशाच एका अत्यंत कर्तव्यशील महिलेची ओळख करुन देणार आहे.
लोक त्यांना आदराने 'ताई' म्हणून संबोधतात मात्र मी त्यांना प्रेमाने 'आई' म्हणून बोलावतो. या छोट्याशा लेखास शिर्षक मी जे "अमृतमहोत्सवी आधारवड" असे दिले आहे ते ब-याच विचारांती. आज विस्तारलेल्या आधारवडाची रुजवण झाली 75 वर्षांपुर्वी ब्रिटीश भारतात,  दि. 01 मार्च 1943 रोजी म्हणजे आजच्याच दिवशी! या आधारवडाचे नाव आहे सौ. शारदाताई रेणके (जोशी). पारतंत्र्यातील शिक्षणाची दुरावस्था, त्यातही स्त्री शिक्षणाची दयनीयता आणि भटक्या विमुक्तांची शिक्षणाविषयीची अनास्था तर विचारायलाच नको. जोशी या भटक्या जमातीमध्ये कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्हयात जोशी जमातीच्या बावन्नवाडीपैकी हलकटा या गावी शारदाताईंचा जन्म झाला. या बावन्नवाडीलाच जातगाव असेही म्हणत. वास्तविक शारदाताई जन्मत:च कुशाग्र बुध्दीच्या होत्या. 1961 ला त्या चांगल्या गुणांनी एस. एस. सी. उत्तीर्ण झाल्या! मात्र त्यांना पुढे शिकविले गेले नाही. बुध्दीमान असूनही पुढे का शिकविले गेले नाही? याचे स्पष्टीकरण फार गंमतीशीर आहे मित्रांनो. ज्या काळी ज्या जमातीमध्ये एस. एस. सी. झालेला मुलगा देखील मिळणे दुरापास्त होते त्या काळी व त्या समाजात एस. एस. सी. झालेल्या शारदाताई बावन्नवाडीतील परिसरातील एकमेव मुलगी होत्या! मग त्यांच्यासाठी त्यांच्या योग्य नवरा कोठे शोधायचा? म्हणून पुढचे शिक्षण नको ही त्यांच्या घराच्यांची व्यावहारिक दुरदृष्टी!!!  कुटूंबाचे सततचे स्थलांतर, कुटूंबियांचा शिक्षणाला प्रखर विरोध, समाजाचा मुलींकडे पाहण्याचा संकुचित द्रुष्टीकोन व इतर शंका कुशंका यामुळे शारदाताईंच्या शिक्षणाचे राम नाम सत्य झाले.
त्यांच्या सुदैवाने व योग्यतेने पुढे त्यांना मुंबईत बाँबे पोर्ट ट्रस्टमध्ये क्लार्क म्हणून नोकरी मिळाली. याच काळात त्यांची ओळख झाली एका उमद्या, देखण्या, उच्चशिक्षित व परिपक्व विचारांच्या आणि परखड वाणीच्या तरुणाशी! हळूहळू ओळखीचे रूपांतर मैत्रीत अन मैत्रिचे रूपांतर प्रेमात झाले. त्या तरुणाचे नाव होते बाळकृष्ण रेणके! ज्यांना आज आपण सर्वजण आदराने रेणके आण्णा असे संबोधतो. मात्र त्याकाळी आण्णांमध्ये असे आदराने संबोधन्यासारखे काहीच दिसत नव्हते. ना घरदार, ना शेतीबाडी, ना नोकरी!
मात्र म्हणतात ना की, असामान्य द्रुष्टी असणा-यांना अगदी सामान्य माणसात सुद्धा असणारे असामान्यत्व स्पष्टपणे दिसते! त्याचप्रमाणे आण्णांमध्ये असणारे असामान्यत्व शारदाताईंना अगदी स्पष्ट दिसून आले. एकीकडे शारदाताई शासकीय नोकरदार, सुंदर तरुणी! शिवाय मध्यम वर्गीय कुटूंबातुन आलेल्या! तर दुसरीकडे आण्णा म्हणजे गरिब कुटूंबातील सुशिक्षित बेरोजगार युवक! मात्र त्यांच्याकडे होती कुशाग्र बुद्धिमत्ता, देखणेपण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते त्याकाळातील बी.एस.सी.केमिस्ट्री होते! म्हणून शारदाताईंनी आण्णांमधील हे असामान्यत्व चटकन हेरले आणि दोघांनी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. धाडसी यासाठी की तो प्रत्यक्षात उतरवणे तेवढे सोपे नव्हते. भटक्या जमातींची विवाहविषयक कठोर बंधने, जातपंचायतींची दहशत असा चाकोरी बाहेरील विचार करायची हिंमतही करु देत नसायची. कारण वर सांगितल्याप्रमाणे शारदाताई जोशी समाजाच्या तर आण्णा गोंधळी समाजाचे!! दोन्हीही हिंदू भिक्षुक जमातीच मात्र स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपणा-या या जमाती! दोन्हीकडच्या केवळ कुटूंबियांचाच नव्हे तर समाजाचाही यांच्या लग्नाला कठोर विरोध होता. मात्र असला हा विरोध जुमानतील ते ताई व आण्णा कसले? शिक्षणाने अनिष्ट रूढी परंपरांना झुगारण्याचे बळ प्राप्त होत असते हे दाखवून देण्याची ती वेळ होती. पण त्यासाठी घरच्यांच्याविरोधात अगदी रणशिंगच फुंकण्याची गरज असते असे नाही हा आदर्श त्यांनी त्या काळी घालुन दिला. जर आपण बरोबर असु तर घरच्यांना ते मान्य करावेच लागेल हा विश्वास त्यांना होता. त्यामुळे दोघांनीही या विरोधाकडे, घरच्यांच्या अज्ञानातुन निर्माण झालेला, सामाजिक जडणघडणीचा प्रभाव पडलेला एक कौटुंबिक प्रश्न या द्रुष्टिनेच पाहीले. हे एक संकट न मानता एक आव्हान समजले व कोणताही टोकाचा व अनैतिक निर्णय न घेता घरच्यांना आपला निर्णय कसा बरोबर आहे व त्यांचे विचार करणे कसे चुकीचे आहे हे पटवून दिले. शेवटी घरच्यांनाही त्यांनी तयार केले! दोन्ही परिवाराच्या संमतीने गिरगावच्या दत्त मंदिरात पारंपरिक हिंदु धर्म विवाह पद्धतीने साधेपणानेच त्यांनी लग्न केले. शारदाताई जोशी या सौ. शारदाताई बाळकृष्ण रेणके झाल्या. ते दोघे परस्परांचे साता जन्माचे सोबती झाले!!
शारदाताई म्हणजे चाकोरीबद्ध जीवन जगणारी महीला. आपली नोकरी, आपला नवरा अन आपला घर संसार एवढेच त्यांचे विश्व. या बरोबरच उभय परिवाराकडून अर्थात सासर व माहेर यांच्याकडून येणाऱ्या जबाबदा-या निभावण्यात त्या व्यस्त असत. तर आण्णांच्या डोक्यात समाजसेवेचे भुत संचारलेले!! संघटन, आंदोलने, निदर्शने, मोर्चे, प्रेरक व स्फोटक भाषणे यात त्यांना रूची!! म्हणजे दोघांचे विचार व आचार निव्वळ परस्पर विरोधीच!! तरीही शारदाताई आण्णांसोबत जिथे भाड्याने घर मिळेल तिथे प्रेमाने व आनंदाने राहील्या. या सुरूवातीच्या काळात संसाराचा सारा भार ताईंवरच होता तरीही त्या डगमगल्या नाहीत, चिडचिडेपणा त्यांच्यात आला नाही की त्यांच्या मनाला अरूंदपणा वा उथळपणा स्पर्शूनही गेला नाही.
पुढे शारदाताईंच्या इच्छेप्रमाणे व आण्णांच्या योग्यतेप्रमाणे आण्णांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत फाँरेंसिक खात्यात सिनियर सायंटिफिक आँफिसर ही नोकरी मिळाली. नोकरी मिळाली खरी पण आण्णा नोकरीत रमले नाहीत.डोक्यात काहीतरी वेगळे, कटु वास्तवात बदल घडवू शकेल असे काहीतरी करावे हा विचार त्यांना स्वस्थ बसु देत नव्हता. त्यांनी लवकरच आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. या निर्णयाला आजच्याच काय तेव्हाच्याही पत्नीने विरोधच केला असता. मात्र अण्णांचे विचार,त्यांची धडपड,आवड, कल पाहून शारदाताईंनी देखील आण्णांच्या निर्णयाचे स्वागत केले. अण्णांच्या भाषेतच सांगायचे तर लोक देवाला माणसे अथवा प्राणी सोडतात! त्याप्रमाणे मला शारदेने देवाला सोडले! फरक एवढाच की माझा देव माझा समाज होता व माझी देवपूजा समाज कार्य होती. शारदा नसती तर माझ्याच्याने काहीही झाले नसते. माझे राहणे खाणे, कपडेलत्ते, प्रवास खर्च, कार्यक्रमांचा खर्च सर्वकाही शारदा भागवत आली आहे. आजही मी तिच्या पेन्शनवरच उड्या मारतो आहे हे ते काहीसे भाऊक होऊन बोलतात आणि लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात..
मित्रांनो शारदा ताईंचे महानपण एवढ्यातच नाही. घरसंसार, नवरा, मुलेबाळे तर सर्वच करतात मात्र म्हणतात ना,  संगतीने वान नाही लागला तरी गुण मात्र हमखास लागतो. याच म्हणीचा प्रत्येय ताईंनाही आला. आण्णांच्या सहवासात राहुन त्यांच्यात देखील समाजकार्याची आवड निर्माण झाली. समाजातील गरजूंसाठी, दुर्लक्षितांसाठी, पीडितांसाठी आपणही काहीतरी केले पाहिजे या जाणिवेतून शारदाताईंनी अण्णांसोबत शनिवारी रविवारी अर्थात सुट्टीच्या दिवशी मुंबईतील रस्त्यांवर, चाळींतून आणि झोपडपट्यांमधुन सर्वेक्षण केले. यात फुटपाथवरील अनाथ महिला , कचरा गोळा करणाऱ्या महिलांपासून ते अगदी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला या सर्वांचे ताईंनी सर्वेक्षण केले 3000 देवदासींचा मुंबईत महाराष्ट्रातील पहिला महिला मेळावा त्यांनी घेतला.  याची दखल शासनाला व प्रसार माध्यमांनाही घ्यावी लागली व त्याचा परिणाम म्हणून पुढे देवदासींना पेन्शन सुरू झाली.  त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी दहा हजार रुपये अनुदान शासनाने सुरू केले. याच काळात एका अनाथ चिमुरडीचे पालकत्व ताईंनी स्वीकारले व तिला सात वर्षे आपली पोटची मुलगी म्हणून स्वतःच्या मुलींसोबत सांभाळले. पुढे त्या मुलीची हुबळी येथील मावशी आली व त्या मुलीला घेऊन गेली. मात्र तोवर ताईंनी त्या मुलीला सातवीपर्यंतचे शिक्षण दिले होते. 1993 मध्ये ताईंनी आपल्या पतीला पूर्णवेळ साथ देण्यासाठी व आपलेही कार्य पूर्णवेळ करता यावे यासाठी नोकरीतुन स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारली! याला म्हणतात त्याग मित्रांनो,  शारदाताई म्हणजे सदैव प्रसन्न हसतमुख आणि प्रसिद्धीपासून कोसो दूर राहणारं व्यक्तिमत्व. भाषणबाजी, पेपरबाजी त्यांना अजिबात आवडत नाही. मात्र चार चौघात बोलताना आपला विषय प्रतिपादन करताना त्या कसलेल्या वक्ता वाटतात. 1993 पासून सोलापूर व परिसरातील ग्रामीण महिलांचे संघटन करून त्यांना ताईंनी महिला शोषण , महीला अन्याय अत्याचार यांच्या विरुद्ध उभे ठाकण्याची शक्ती दिली. शाळाबाह्य मुलांसाठी त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार शिकवणी घेतली.  स्त्रियांसाठी रात्रीचे प्रोढशिक्षणाचे वर्ग चालवले. तसे पाहता रेणके आण्णांचे कार्यक्षेत्र भटक्या-विमुक्तांची संबंधित राहिले आहे तर शारदा ताईंना महिलांचे शोषण महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबविणे व महिला सशक्तिकरण करणे या कार्याची प्रचंड आवड आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन 2003 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना "सावित्रीबाई फुले पुरस्कार" देऊन त्यांचा गौरव केला आहे.  त्यांच्या 1993 ते 2003 या दशकातील केलेल्या ग्रामीण गोरगरीब महिलांबद्दलच्या कार्याचा हा गौरव होता मित्रांनो. त्यांनी पतीच्या निसर्ग शेतीच्या कार्याला पूर्ण ताकदीने सहकार्य केले. अण्णांच्या त्यांनी शेतीपासून काढलेल्या विश्वविक्रमी उत्पादनाच्या प्रयोगाला महाराष्ट्र शासनाने "कृषी रत्न पुरस्कार " व सेंद्रिय पद्धतीच्या शेती प्रयोगाला "सेंद्रिय शेतीचा शिल्पकार" असे दोन पुरस्कार दिले. मात्र आण्णा या दोन्ही पुरस्कारांचे श्रेय स्वतः अजिबात घेत नाहीत. उलट ते हे नम्रपणे कबूल करतात की निसर्ग शेती व सेंद्रिय शेतीमधील माझे प्रयोग हे केवळ शारदेमुळेच शक्य झाले आहेत. माणसे, खासकरून बायका जोडण्याचे ताईंचे कसब या प्रयोगात प्रचंड कामी आले.
मित्रांनो, शारदाताई व आण्णा या दाम्पत्यांना पाच मुली आहेत. पैकी चार विवाहित आहेत तर एक अविवाहीत आहे. आण्णा म्हणजे सतत समाज कार्यात व्यस्त प्राणी. आज इथे तर उद्या तिथे. आयुष्यभर चळवळ व तत्संबंधीचे कार्यक्रम आणि पुढे राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून पडलेली महत्वपुर्ण जबाबदारी यामुळे अण्णा कधीकधी तर महिना-महिना घरी येत नसत. तेव्हाही लेकींना प्रेमाने सांभाळणे, त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या अडचणी दूर करणे ही सर्व कामे स्वतः शारदाताई व्यवस्थित करत असत. केवळ पतीलाच नव्हे तर मुलींनाही त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले. निर्णय जरी चर्चेअंती घेतले जात असले तरीही आपले निर्णय त्यांनी कोणावरही लादले नाहीत. स्वतः वंशपरंपरागत व्यवसाय म्हणजे भिक्षुकी व घरोघरी फेरी मारण्याचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातून येणाऱ्या शारदाताईंनी आपल्या पाचही मुलींना उच्चशिक्षित बनवले. त्या कधीही बोलत नाहीत मात्र त्यांनी करून दाखवले. आज त्यांच्या पाचही मुली स्वावलंबी आहेत. सर्वजणी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि स्वतःच्या पायावर केवळ उभ्याच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च उच्च पदांवर आहेत! त्यामुळे शारदाताई व आण्णा अगदी निर्धास्त आहेत. शारदाताईंनी आण्णांवर आणि उभयतांनी मुलींवर ठेवलेला विश्वास सार्थ ठरला. त्यांच्या चारही मुलींचे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झाले आहेत! आण्णा कधी कधी माझ्याशी गमतीने बोलतात की बाळासाहेब माझ्या घरात अख्खा भारत नांदतो आहे!! कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब अशा अनेक राज्यांशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. मित्रांनो,भाषा व प्रदेशावरून रणकंदन करणाऱ्या आजच्या तकलादू लोकांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन नाही का? सर्वजाती समभाव व सर्वधर्मसमभाव यांच्या वल्गना करणाऱ्यांनी समभाव म्हणजे काय हे शिकावे या रेणके कुटुंबाकडून!! ते शिकावे या शारदाताईंकडून!!
त्यांनी मुलींसाठी संपत्ती कमावून ठेवली नाही मात्र त्या स्वतः संपत्ती कमावू शकतील एवढे त्यांना सक्षम बनविले. आज त्यांच्या सर्व मुली कुठल्याही संकटाचा मुकाबला करण्यास सक्षम आहेत हे विशेष आणि हे पाहिल्यानंतर मातापित्यांचे यश म्हणजे काय किंवा यश कशाला म्हणावे हे पटते, याचा साक्षात्कार येतो. स्वतःचे घर नसलेल्या शारदाताई, स्वतःच्या घरात रहायला गेल्या 1971 साली!!! मात्र आता त्यांच्या मुलींची मुंबईत स्वतःची घरे व स्वतःच्या गाड्या आहेत हे त्यांना गौरवास्पद व स्वप्नवत वाटते. खरे तर हे परमेश्वराने दिलेले फळ आहे असे मी समजतो. हे फळ आहे ताई आणि अण्णांच्या नीतिमत्तेला दिलेले, त्यांच्या संस्कारांना दिलेले आणि त्यांनी समाजासाठी निस्वार्थपणे केलेल्या कष्टाला दिलेले.
ताईंचे मोठेपण इथेच संपत नाही. ताईंनी दोन्हीही घरी दिवा लावला. सासरीही आणि माहेरीही! दोन्हीकडच्या जिम्मेदा-या त्यांनी लीलया पार पाडल्या. दोन्हीकडची वर्दळ, एकत्र कुटुंबपद्धती यांचा त्यांनी कधीही ताण घेतला नाही, कांगावा केला नाही, पतीला व नातेवाईकांना ऐकावणे केले नाही. त्या कधी रागावल्या नाहीत, त्यांनी कधीही कपाळावर आठ्या पडल्या नाहीत अथवा आदळ-आपट केली नाही. कधी साडीचोळीसाठी, दागदागिन्यांसाठी, गाडीघोडीसाठी हट्ट आग्रह धरला नाही. विशेष म्हणजे स्वतः कमावत्या असुनही!!!एवढेच काय तर त्यांनी ते कधी चेहऱ्यावरही दिसू दिले नाही. शारदाताई नेहमी अण्णांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या.शिवाय त्यांनी एका सुंदर संयुक्तकुटुंबाची बांधणी केली. स्वतःच्या मुली, पुतने, नातवंडे या सर्वांना एका धाग्यात गुंफुण ठेवले. अण्णांनी देखील ताईंच्या कोणत्याही निर्णयामध्ये हस्तक्षेप केला नाही अथवा त्यावर हरकत घेतली नाही.
विचार करा मित्रांनो सामान्य घरातून जाऊन, असामान्य बनुन सामान्यपणे जीवन जगणे सोपे आहे काय? पंख फुटणारे जोडपे अन शिंगे फुटणारे कारटे यांचा आदर्श घेतील काय? वेल सेटेल्डंच जोडीदार पाहीजे असा पराकोटीचा आग्रह धरणा-या आजच्या युवती शारदाताईंनी घालुन दिलेला आदर्श अंगिकारतील? शारदाताईंमध्ये सामंजस्य, मनाचे मोठेपण, आदर, त्याग, समर्पण, उदारता नसती तर बाळकृष्ण रेणके आण्णा घडले असते?
शारदाताई मराठी- कन्नड-हिंदी-गुजराती अस्खलितपणे बोलतात. त्यांचे लाघवी बोलणे, निरागस स्मित हसणे आणि निरामयी तेजस्वी दिसणे मला तर त्यांच्या प्रेमातच पाडते! मी अण्णांना गमतीने म्हणत असतो, अण्णा तुम्हाला सुंदर बायको मिळाली हं. यावर तेही प्रामाणिकपणे म्हणतात, हो बाळासाहेब, नक्कीच, त्यासाठी परमेश्वराचा मी ऋणी आहे रे. शारदा  तनाने जितकी सुंदर आहे त्याहुन कितीतरी अधिक ती मनाने सुंदर आहे. सौंदर्याची सम्राज्ञी म्हण हवं तर. मोठमोठ्या सामाजिक कार्याबरोबरच घराचं घरपण हे लहान लहान गोष्टीत असतं हे ताईंना चांगलेच ठाऊक आहे. मुलींमध्ये त्या त्यांची मोठी बहीण म्हणून राहतात. सिनेमा पाहणे, गाण्याच्या भेंड्या खेळणे, कुटुंबासह पत्ते खेळणे यात आनंद शोधणा-या शारदाताई पर्यटनाच्या खुप छंदी आहेत. त्यांना खूप आनंद मिळतो भ्रमणातुन. समुद्र पाहणे हा त्यांचा खास छंद.
मित्रांनो अखिल भारतभर भटक्या-विमुक्तांच्या चळवळीचे आधारवड आदरणीय बाळकृष्ण रेणके आण्णा आहेत याबाबत जसे कोणाचेच दुमत नाही तसेच "अण्णांचा आधारवड शारदाताई आहेत" यात स्वतः आण्णांचेही दुमत नाही हे विशेष! असा हा आधारवड अमृतमहोत्सवी झाला आहे. अर्थात शारदाताई दिनांक आज 01 मार्च 2018 रोजी वयाची 75 वर्षे पुर्ण करीत आहेत!!! म्हणजे हा त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस!! मात्र हा अमृतमहोत्सवी आधारवड अजूनही सळसळता आहे!गर्द आहे!टवटवीत आहे! आणि आजही आधार देतच आहे! आणि संदेश देत आहेत त्या नुसतेच डेज साजरे करण्यात धन्यता मानणाऱ्या आजच्या प्रेमी युगलांना आणि अग्नी भोवती सात फेरे घेऊन साताजन्माची साथ निभावण्याच्या आणाभाका खाऊनही सात दिवसही सुखाने संसार न करू शकणा-या सोकाँल्ड माँडर्न विवाहित जोडप्यांना की "आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याची स्वप्ने आपली असतात आणि ती पुर्ण करण्यासाठी आपण आपले योगदान कसे द्यायचे असते.
आई जगदंबा करो शारदाताईंचे सौंदर्य, औदार्य, हास्य आणि स्वास्थ्य असेच व्रुदींगत होत राहो हीच सदिच्छा. मला आज जसा आदरणीय शारदाताईंना पाहून हा त्यांचा अम्रुतमहोत्सवी वाढदिवस आहे यावर विश्वास बसत नाही तसाच विश्वास त्यांच्या शतकोत्सवी वाढदिवशीही त्यांना शुभेच्छा देताना न बसो हीच प्रार्थना व हीच शुभेच्छा.

 शुभेच्छुकः बाळासाहेब सिताराम धुमाळ
 मो. 9673945092j

No comments: