Thursday 6 April 2017

शेतकरी संपावर गेला तर ????

शेतकरी संपावर गेला तर ????

मित्रांनो ,भारतासारख्या लोकशाहीप्रदान देशामध्ये अगदी नवजात अर्भकाने सुद्धा सर्वात पहिल्या ऐकलेल्या काही शब्दांपैकी एक शब्द म्हणजे संप. त्यामध्ये विशेष असे काहीच वाटत नाही. संप हे आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने पूर्ण करून घेण्याचे एक प्रभावी अस्त्र आहे. सर्वसाधारणपणे असंघटित कामगार व शासकीय कर्मचारी संपाचे हत्यार हमखास उपसतात. मात्र शेतकरी संप ही  संकल्पना तशी नवीच व काहीशी अविश्वसनीय तथा असामान्यच म्हणावी लागेल. जगाचा पोशिंदा व अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी संपावर गेला तर ? कल्पनाही करवत नाही ना ? अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी मूलभूत गरजा पूर्ण करणारा समाज घटक शेतकरी जर खरोखरच संपावर गेला तर ? साधारणपणे हा विद्यालयीन जीवनात निबंधाचा व महाविद्यालयीन जीवनात वादविवादाचा विषय असायचा नाही ? पण आता अहमदनगर, औरंगाबाद व बीड मधील शेतकरी, नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावच्या शेतकऱ्यांच्या आव्हानानंतर संपावर जात आहेत. आगामी खरीप हंगामात पेरणी न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. 
एकेकाळी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ चाकरी समजली जात होती. मात्र आता चित्र नेमके उलटे आहे. शेतकऱ्यांची मुले शेती करायला नको म्हणत आहेत तर मुली शेतकरी दादला नको ग बाई म्हणत आहेत. शेतीची ही बदललेली स्तिथी या सर्वांना जिम्मेदार आहे. न परवडणारा हा व्यवसाय करायला अगदी सुशिक्षित तरुणही नको म्हणताहेत . एक काळ होता जेव्हा शेतकऱ्यांची मुले नोकरी सोडून शेती कसत होते. मात्र सरकारच्या व्यापारी धार्जिण्या धोरणांचा परिणाम शेती क्षेत्रावर झाला आहे हे सांगण्यासाठी कुठल्या तज्ज्ञाची आवशकता नाही. चित्र असे आहे की, आज शेतकरी व ग्राहक दोघेही परेशान आहेत आणि दलाल व व्यापारी गब्बर होत आहेत. शेतीचे बिघडलेले गणित सोडवताना शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शेतीच्या दुरावस्थेचा अनिष्ठ प्रभाव शेतमजूर व शेतीपूरक व्यवसायांवरही झाला आहे. 
कल्पना करा जर शेतकरी संपावर गेला तर काय होईल ? बरे शेतकऱ्यांनी संपावर का जावू नये ? उत्पादमूल्य देखील निघत नसेल तर शेती करावीच का ? पण एवढे निश्चित की जर खरोखरच शेतकरी संपावर गेला तर अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही .शेतकऱ्यांनी स्वतःपुरतेंच पिकवले तर इतरांनी खायचे काय ? शेतकरी सशक्त बनेल अशा उपायांची अंमलबजावणी वेळीच केली गेली नाही तर भाकरीसाठी भांडणे होतील. शेतकरी आता जागा झाला आहे, मरायचे नाही तर मारायचे अशा पवित्र्यात आता शेतकरी आला आहे. वरकरणी पाहता कर्जमाफी ही या आनंदोलनाची मागणी वाटत असली तरी शेती सशक्त करा हीच खरी आर्त मागणी आहे. यावर आयात निर्यात धोरणांमध्ये बदल करणे , शेतमालाला हमीभाव देणे, जलसिंचनाच्या सोयी निर्माण करणे ,सशक्त पीक विमा पर्याय उपलब्ध करून देणे , शेती सुविधा उपलब्ध करून देणे , सहज व स्वस्त पतपुरवठा उपलब्ध करून देणे, प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे, जोडधंद्याची व्यवस्था करणे, सहकारी चळवळीला मजबूत करणे हे उपाय योजावयास हवेत. 
ही चळवळ अमुक एका जातीची चळवळ नाही कारण शेतकऱ्याची कोणती एक ठराविक जात नाही तर शेतकरी हा एक वर्ग आहे. मी स्वतः शेतकरी नाही पण खरोखरच शेतकरी सशक्त करावयाचा असेल तर काही धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकरी आरक्षण, शेतकरी निवृत्तीवेतन असे पर्याय देऊन शेतकऱ्याला शेतीकडे आकर्षित केले जाण्याची नितांत आवश्यकता आहे. मित्रांनो रक्ताचे पाणी करून काळ्या आईची मशागत करणारा शेतकरी जर संपावर गेला तर तंत्रज्ञानाच्या या युगात शेती मशागत ऑनलाइन करता येणार नाही व शेतमाल डाउनलोड करता येणार नाही याची जाणीव सरकारला असावी म्हणजे झालं   ........ 

आपला: बालासाहेब सिताराम धुमाळ 
मोबाइल : ९४२१८६३७२५

No comments: