Wednesday 5 April 2017

आद्यक्रांतीकारक कोण ???

आद्यक्रांतीकारक कोण ???
मित्रांनो, आजवर भारत हा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिला आहे. मात्र लेखणीचे तथाकथित जन्मजात हकदार, काही ठराविक व सोईस्कर घटनांचीच नोंद घेत आले आहेत . काही नरवीरांची व त्यांच्या आचंबित करणाऱ्या पराक्रमाची आणि कामगिरीची त्यांनी जाणीवपूर्वक दखलच घेतली नाही. १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा आद्यक्रांतिकारक नरवीर म्हणजे उमाजी नाईक.
नुकताच ३ फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतिदिन झाला मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे महापुरुषांना जातीचे लेबल लावणाऱ्या या समाजात उमाजी नाईक केवळ रामोशी समाजाशिवाय कोणाच्याच लक्षात राहत नाहीत . महामानवांचा आदर त्यांनी केलेल्या कामावरून अथवा गाजवलेल्या पराक्रमावरून करण्याऐवजी त्यांना जाती धर्माच्या तराजूत मोजले जाते . पण अशाने या महामानवाचे महानपण सीमित होऊन जाते हे आपण का ध्यानात घेत नाही देव जाणो.
भटक्या विमुक्त जमातींमधील रामोशी या जमातीत लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी दिनांक ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म झाला. उमाजी नाईकांच्या कुटुंबावर पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी होती. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी नाईक जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरा आणि करारी होते. यतांनी पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली होती . वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तीरकमठा, गोफण, तलवार, भाला, कुऱ्हाडी, इत्यादी चालवण्याची कला शिकले. या काळात भारतात इंग्रजांनी आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३ मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
उमाजी नाईक यांनी इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर ते भावासारखे धावून जाऊ लागले . इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजींना सरकारने इ.स. १८१८ मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याकाळात ते लिहिणे वाचणे शिकले .आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्याच्या कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजींना पकडण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदर जवळ त्यांच्यात आणि इंग्रज सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजींनी इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजींचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैनिक होते.
१८२४ ला उमाजींनी भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते .आणि काहीचे प्राण घेतले होते.
उमाजीने १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी विरोध करा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून उमाजींनी एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनते राजा बनले . या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजींना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली उमाजींच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले. त्यातच एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाणही फितूर झाला. या दोघांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्याला ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिला नरवीर उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी हसत हसत फासावर चढले. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.
आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक हे हि असेच उपेक्षित राहून गेलेल्यांपैकी एक. स्वत:च्या कार्याने एक दीपस्तंभ ठरलेले . ज्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?"
मित्रांनो विचार करण्यासारखी बाब आहे कि वयाच्या केवळ ४१ व्या वर्षी देशासाठी ब्रिटिशांकडून फासावर लटकावले गेलेले आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक किती विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, बहुजनांना, भटक्या विमुक्तांना व एकंदरीतच किती देशवासीयांना माहित आहेत. मी जेव्हा काही महिन्यांपूर्वी जेजुरीला गेलो तेव्हा तेथे उभा केलेला उमाजी नाईकांचा पुतळा पाहून भावुक झालो व उमाजी नाईकांबद्दल अधिक माहिती जमा करण्याच्या उद्देशाने, कुतूहलाने व काहीशा बावळटपणे एका पुजाऱ्याला विचारले, बाहेर जो पुतळा आहे तो कॊणाचा आहे ? तर नियोजनबद्ध उत्तर मिळाले, ते खंडोबाचे फार निस्सीम भक्त होते, भक्त उमाजी !!!!! जो काही थोडा फार ऐकीव इतिहास राहिला, तो लुटारू उमाजी नाईक एवढाच. निश्चित ते लुटारू होते पण ते कोणाला लुटत असत ? का लुटत असत ? त्या पैशांचे ते काय करत असत ? असा प्रश्न ना आपण कधी विचारतो, ना कोणी त्याचे कधी उत्तर देते ...
देशभक्त भटक्या विमुक्तांच्या टोळ्या इंग्रजांना लुटत असत, याच्या पाठीमागे देशभक्ती होती. शिवरायांच्या स्वराज्यात हेरगिरी करणारे भटके विमुक्त , जुलमी परकीय शासकांना या देशातून हाकलून लावत होते . म्हणजे आताच्या भाषेत ते स्वातंत्र्याचे युद्ध लढत होते. याचाच बदला म्हणून इंग्रजांनी क्रिमिनल ट्राईब्ज ॲक्ट १८७१, १९११, १९२४ नुसार या अशा जमातींना "जन्मजात गुन्हेगारी जाती" ठरवले . जन्माने कोणी गुन्हेगार कसा असेल ? पण जे सरकारच साम्राज्यवादी होते ते काहीही करू शकत होते. शिवाय इंग्रज हेही युरोपीय भटक्या जमातीचेच होते त्यामुळे भारतातील भटक्या जमातीमधील हे रानटी चपळ व शूर सैनिक येथील डोंगराळ भागात आपल्याला पुरून उरतील याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच राजेंनी भटक्या विमुक्त जमातीचा स्वराज्य निर्मितीसाठी योग्य वापर करून घेतला. त्यांच्यावर विश्वास टाकला, जबाबदारी सोपवली व वतने जहागिऱ्या देऊन सम्मान हि केला.
टॉस नावाचा इंग्रज अधिकारी लिहितो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता, जर उमाजी नाईकांना फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." अनेक अभ्यासक म्हणतात कि, जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच भारत स्वतंत्र झाला असता. अशा या धाडसी उमाजी नाईकांनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. मग आता तुम्हीच ठरवा आद्यक्रांतीकारक कोण ???

No comments: