Tuesday 25 September 2018

धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ?

धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ?
धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ?

अलीकडच्या काळात रस्त्यांवर साजरे होणारे सार्वजनिक धार्मिक उत्सव, मिरवणूकींमध्ये गर्जणारे कर्णकर्कश डीजे,  प्रार्थनास्थळांवरील अनियंत्रित भोंगे, विवाह व घटस्फोट, अपत्य मर्यादा अशा अनेक मुद्द्यांवरून कायद्याने धर्मात हस्तक्षेप करून शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही धर्माचे धार्मिक आचरण इतरांसाठी म्हणजेच सार्वजनिकरित्या मानव जीवनासाठी त्रासदायक ठरू नये ही कायद्याची भुमिका आहे. मानवी जीवन, पर्यावरण व प्रकर्षाने जीवावरण यांना बाधा पोहोचणार नाही. जन्मजात मानवी हक्क अधिकारांचे संरक्षण व्हावे ही कायद्याची भुमिका आहे. मात्र समाजातील काही लोकांना हे धर्मावरील अतिक्रमण वाटते. धर्मामध्ये कायद्याने हस्तक्षेप करू नये, धर्म हा कायद्यापेक्षा प्राचीन आहे, धर्म हा कायद्यापेक्षा श्रेष्ठ आहे, धर्म ही आमची वैयक्तिक बाब आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या जातात. काहीजण तर अगदी कायद्यालाही आव्हान देतात. याच मुद्द्यावर मागच्या आठवड्यामध्ये मी एक फेसबुक पोल घेतला होता. "धर्म श्रेष्ठ की कायदा श्रेष्ठ?" असा सरळ प्रश्न फेसबुक मित्रांना विचारला होता.

अर्थात मला यात अपेक्षेएवढा प्रतिसाद मिळाला नाही कारण मुळात फेसबुक पोल ही संकल्पनाच अद्याप ब-याच जणांना माहीत नाही. तर बऱ्याच जणांना असे वाटते की उगीच आपले मत कळवून कशाला डोळ्यावर यायचे? वास्तविक पाहता हा पोल गोपनीय असतो. यात कोणी काय मत नोंदविले हे इतरांना कळत नाही. अशा प्रकारच्या पोलमधून साधारणपणे समाजमन काय विचार करते हे तपासून पाहण्याचा प्रयत्न केला जातो. तसाच प्रयत्न मी केला होता. यात 26 टक्के लोकांनी धर्म श्रेष्ठ तर 74 टक्के लोकांनी कायदा श्रेष्ठ असे मत नोंदविले. ज्यांनी कायदा श्रेष्ठ असे मत मांडले त्या सर्वांना मी मनःपूर्वक धन्यवाद देतो.

 मला कळत नाही कायद्यापेक्षा धर्म श्रेष्ठ असूच कसा काय शकतो?? खरे तर न्याय, संधी, समानता, हक्क अधिकारांची जपणूक हाच खरा धर्म असायला हवा. परंतु प्रत्येक धर्माचे नियम वेगळे असतात! कायदा मात्र सर्वांसाठी एकच असतो, समान असतो. धर्म बदलला जाऊ शकतो परंतु व्यक्तिगणिक कायदा बदलला जाऊ शकत नाही. धर्म ही वैयक्तिक बाब आहे तर कायदा ही सार्वजनीक हिताचे संरक्षण करणारी यंत्रणा आहे. धर्माची निर्मिती कोणी केली? नियम कोणी बनविले? धर्म नियम बनविताना लोकमत व लोकहित लक्षात घेतले होते काय? याचे उत्तर सापडत नाही मात्र कायदे हे लोकांमार्फत निवडलेल्या अथवा लोक मान्यता असलेल्या समित्या, परिषदा व मंडळे यांनी बनविलेले असतात.

धर्मातून अनिष्ठ रूढी, परंपरा निर्माण होतात. त्यांनाच पुढे धर्मनियमांचे स्वरूप प्राप्त होते. पुढे काळाच्या कसोटीवर ही विचारसरणी टिकत नाही, परिणामी हे आचरण अयोग्य व अनिष्ट सिद्ध होते, मात्र तरीही त्यात बदल करता येत नाही! तशी धर्मात तरतूदच नसते! जर कोणी त्यात बदल करण्याचा, शुद्धीकरण, उद्बोधन, अथवा प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, तशी चळवळ सुरू केली तर त्याला धर्मद्रोही सिद्ध केले जाते. कायद्यात मात्र तसे नसते एखादा कायदा अन्यायकारक अथवा विसंगत आढळून आला तर त्यात बदल केला जाऊ शकतो अथवा तो संपुष्टातही आणला जाऊ शकतो.

आजवर धर्मातील अनेक रूढी, परंपरा, प्रघात यांनी मानवाचे शोषण केले आहे. एका ठराविक वर्गाकडे धर्मनियम बनविण्याची, त्यांची अंमलबजावणी करण्याची तसेच नियंत्रण ठेवण्याची, न्याय देण्याची, दंड करण्याची मक्तेदारी होती व आजही आहे. हे सर्व अधिकार वंशपरंपरेने अर्थात जन्मजात प्राप्त होतात.कायद्यात मात्र तसे नसते. आपली बौद्धिक योग्यता सिद्ध करून कोणीही कायद्याचा निर्माता, अमलदार अथवा न्यायदाता बनू शकतो. कायद्याच्या राज्यात जन्माने काहीच मिळत नाही. तिथे धर्म हा निकषही नसतो. धर्माचा काही फायदाही होत नाही व तोटाही होत नाही.

धर्मामुळे शक्तीचे ध्रुवीकरण होते तर कायद्यामुळे विकेंद्रीकरण होते. अनावश्यक उन्माद वा माज वाढीस लागतो, इतरांना आपल्यापेक्षा कमी लेखण्याची मानसिकता बनते, तशीच सवय जडते, द्वेष बळावत राहतो! तर कायदा संयम शिकवितो! बारकाईने पाहता धर्माने दिनदलित, दुर्बल व दुबळे, स्त्रिया, शारीरिकदृष्ट्या असक्षम लोक या समाजघटकांचा काहीही विचार केलेला नाही. या शोषित व दुर्लक्षित लोकसमूहाच्या विकासासाठी कोणतीही विशेष व्यवस्था केली नाही उलट यांचे अधिकाधिक शोषण कसे होईल याचीच काळजी घेतली म्हटले तर वावगे ठरणार नाही. कायद्याने मात्र या सर्व घटकांना प्राधान्य दिले, न्याय दिला. एवढेच काय तर कायद्याने अगदी पशूपक्षी, वनस्पती ते पर्यावरणाचे अगदी निर्जीव घटक यांनाही न्याय दिला!

कायदा हा स्वतःच्या चिकित्सेची, समीक्षेची, टिकात्मक अभिव्यक्तीची जनतेला अनुमती देतो. असहमत वर्ग सनदशीर मार्गाने कायद्याला विरोध करू शकतो, निषेध नोंदवू शकतो आव्हान देऊ शकतो! कारण कायदा तशी अनुमती देतो नव्हे कायद्यात तशी सोयच केलेली असते मात्र धर्माच्या बाबीत हे करता येत नाही. धर्माला हे स्वतःवरील आक्रमक वाटते. याला धर्मद्रोह संबोधले जाते! आजवरच्या अनेक चिकित्सक संतांना, विचारवंतांना व संशोधकांना याची किंमत मोजावी लागली आहे.

जगातील प्रत्येक धर्म आपल्या धर्मियांना धर्मतत्वांचे व नियमांचे पालन करायला सांगतो मात्र परधर्म व परधर्मीयांबाबत एक प्रकारचा दुजाभावच जोपासला जातो. कायद्याने मात्र सर्व धर्म समान ठरविले आहेत. धर्माने समाजाला जाती-जातीत, पंथा-पंथात विभाजित केले आहे. स्तरीकरणाची म्हणजेच विषमतेची सुरुवात धर्मापासूनच झाल्याचे दिसते मात्र हे वर्गीकरण कमी करण्याचे काम कायद्याने केल्याचे दिसते. प्रत्येक धर्म स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतो यातून तुलना व स्पर्धा निर्माण होते. आपण इतिहासात अनेक उदाहरणे पाहू शकतो की जिथे केवळ धर्मप्रसारासाठी मोठ-मोठी युद्धे झाली! मोठ्या प्रमाणावर जिवीतहानी झाली! प्रचंड हाल झाले! जोरजबरदस्तीने धर्मांतर करून घेण्यात आले! आजही सर्वच धर्मातील अनेक संस्था धर्म वाढविण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र यातील कोणीही सकल मानव जातीचे जीवनमान सुधारावे, अन्याय-अत्याचार संपावेत, समानतेचे, न्यायाचे राज्य प्रस्थापित व्हावे यासाठी काम करताना दिसत नाही. थोड्याफार प्रमाणात प्रयत्न होताना दिसले तरी पर धर्मियांसाठी कोणीही काहीही करत नाही कारण स्वधर्म हेच कार्यक्षेत्र समजले जाते परंतु सर्व धर्मीयांच्या जीवनमानाची काळजी केवळ कायदाच घेतो. न्यायाचे व समानतेची राज्य प्रस्थापित केवळ कायदाच करतो!

वास्तविक पाहता कायदा हा मुळात धर्माचा अविभाज्य भाग असायला हवा. तसा तो प्रत्येक धर्मियाने समजायलाच हवा. आज प्रत्येक धर्माचे आपले असे स्वतंत्र कायदे आहेत. धर्मांनी अर्थात धर्मग्रंथांनी धर्मोपदेशकांनी मानवी जीवनात सुव्यवस्था व नीतीमुल्ये वाढीस लागावी त्यासाठी काही बंधने लावली हे खरे परंतु यातील वैविध्यामुळे स्थलकाल विसंगतीमुळे याला मर्यादा येतात. देशात जरी धर्म अनेक असले तरी माणुस मात्र एकच आहे. त्याची रचना, त्याच्या भावभावना, त्याच्या अपेक्षा, गरजा व समस्या समान आहेत. त्यामुळे एक समान कायदा असणे व तो श्रेष्ठ मानणे हेच उचीत व कालसुसंगत आहे.

धर्म श्रेष्ठ म्हणणारांनी व इतरांनाही म्हणा म्हणणाऱ्यांनी आपल्या बुद्धीची कवाडे उघडी ठेवून, सद्सद्विवेक जागा ठेवून हा विचार करावा की धर्माचे श्रेष्ठत्व मानावेसे म्हटले तरी प्रश्न असा निर्माण होईल कि कोणत्या धर्माचे श्रेष्ठत्व मान्य करायचे? कारण अनेक बाबींवर दोन धर्मांमध्ये मतभेद आहेत. वेगवेगळी धारणा आहे. काही धर्म हिंसेचे समर्थन करतात तर काही धर्म अहिंसेचे! कायदा मात्र कोणत्याच प्रकारची हिंसा मान्य करीत नाही. तो किमान एका देशात तरी एकच असतो त्यामुळे आज जेव्हा माणसाची ओळख, त्याचे लाभ हक्क अधिकार हे देशावरून निश्चित होतात तेव्हा कोणत्याही देशात, त्या देशाचा कायदा हाच श्रेष्ठ मानला गेला पाहिजे.

धर्माचा पुळका असणारे लोक जेव्हा धर्मातील लोकांना धर्मातीलच लोकांकडून त्रास दिला जातो तेव्हा का बरे मूग गिळून गप्प बसतात? किमान आपल्याच धर्मातील लोकांना तरी त्रास दिला जाऊ नये ना? धर्म हा जर माणसाला विभागत असेल, धर्मामुळे जर माणसे गटागटात विभागली जात असतील, धर्म धर्मांतर्गत अन्याय अत्याचार कलह रोखु शकत नसेल तर धर्माला श्रेष्ठ का म्हणून म्हणायचे? आणि जर असे म्हटले की धर्म श्रेष्ठ! तर मग आजवर धर्मांतरे का झाली? नवीन धर्मांची निर्मिती का झाली? म्हणजेच त्या कुठल्या का असेना, धर्मांमध्ये काहीतरी अयोग्य किंवा अनिष्ट होत होते जे न पटल्याने एक ठराविक वर्ग एखाद्या ठराविक धर्मापासून बाजूला झाला व त्यांना पटत असलेल्या विचारांच्या धर्माशी जोडला गेला अथवा आपला स्वतःचा वेगळा धर्म निर्माण केला.

मला कळत नाही, शेवटी धर्म धर्म म्हणजे तरी काय हो? आज रोजी आपण ज्या विविध क्षेत्रातील संघटना पाहतो अथवा राजकीय पक्ष पाहतो त्यापेक्षा धर्माची रचना वेगळी ती काय? कोणे एके काळी धर्माची स्थापना किंवा धर्माची निर्मिती ही देखील याच पद्धतीने झालेली आहे. कुणाच्यातरी विचारांवर धर्म आधारलेला आहे. कोणीतरी धर्माची संहिता तयार केली व ती संहिता पाळणारे एकत्र आले आणि धर्म तयार झाला. एकप्रकारे धर्म हा समविचारी लोकांचा समुहच आहे. पुढे धर्म संस्थापकाचे विचार व धर्माचे कार्य यांनी प्रेरित व प्रभावित होऊन धर्माचे अनुयायी वाढत गेले. संघटना किंवा राजकीय पक्ष यापेक्षा काही वेगळे असतात का? त्यामुळे कोणीही धर्माचे आगाऊ भूषण बाळगण्याची आवश्यकता नाही. त्याची काही आवश्यकताही नाही व उपयोगही नाही.

 बरं, आपला तो धर्म आणि दुसऱ्यांचा तो?? इतरांनाही धर्म आहे ना? त्यांनाही त्यांच्या धर्माचा अभिमान आहे. या माझ्यातुझ्यात सर्वसामान्य माणसाचे हाल होतात त्याचे काय? मानवी उत्क्रांतीच्या काळामध्ये सर्वप्रथम माणूस समूहाने राहू लागला व त्यानंतर समविचारी लोकांच्या समूहामध्ये राहू लागला. त्यातून धर्म जन्माला आला अर्थात तेव्हाही त्याने कायद्याला महत्व दिलेच होते. कायद्याचे श्रेष्ठत्व त्या माणसांनी सुद्धा मान्य केले होते व त्याप्रमाणे ते वागत होते मात्र काळाच्या ओघात त्यांनी घालून दिलेले नियम हे बदललेल्या परिस्थितीत विसंगत व अन्यायकारक सिद्ध झाले. म्हणजे जर प्राचीन माणूस कायदा श्रेष्ठ मानत होता तर मग आता एकविसाव्या शतकातील सुशिक्षित व विचारी माणसे कायद्याला आव्हान कसे काय देतायत हे समजत नाही. कायद्यापेक्षा त्यांना धर्म श्रेष्ठ कसा काय वाटू शकतो हे समजत नाही. अर्थात अशा लोकांची संख्या जास्त नाही परंतु एवढी धार्मिक कट्टरता देखील धोक्याचीच!

साधी बाब आपण समजून घेतली पाहिजे की जे चांगले ते श्रेष्ठ असायला हवे ना? जर धर्म श्रेष्ठ आहे असे म्हटले तर आजवर असंख्य धर्म सुधारणा चळवळी करण्याची गरजच पडली नसती. त्यातील अनिष्ट बाबी संपविण्यासाठी व योग्य ते करून घेण्यासाठी कायदे करावे लागले नसते. धर्मामुळे धर्मयुद्धे झाली! कायद्यामुळे युद्धे शमली! भांडणे मिटली! आज कायद्यांमुळे भांडणे अथवा युद्धे करता येत नाहीत यातच कायद्याचे श्रेष्ठत्व आले. अहो कायदा आहे म्हणून आज प्रत्येकजण सुरक्षित आहे अन्यथा धार्मिक दंगलींमध्ये तसेच देशादेशांमधील धार्मिक युद्धांमध्ये मानव जात केव्हाच नष्ट झाली असती. कायदा आहे म्हणून जीवनाला, संपत्तीला व प्राणाला संरक्षण आहे अन्यथा यादवी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. कायद्याला आव्हान देण्याऐवजी आपापला धर्म मनात व घरात मानुन कायद्याचा आदर करण्यातच खरे शहाणपण आहे.

परंतु याचा अर्थ धर्म मानुच नये असा होतो का? धर्माची तत्त्वे जोपासूच नयेत असा होतो का? तर मी म्हणेल अजिबात नाही. धर्म हा मानलाच पाहिजे परंतु धर्म म्हणजे काय? धर्माने काय केले पाहिजे? धर्माची कोणती तत्वे पाळायला पाहिजेत? हे समजून घेतले पाहिजे. शिवाय जसा आपला धर्म आहे तसाच इतरांचाही धर्म आहे याची जाणीव ठेवून परस्पर सामंजस्य जपत जीवन शेवटाला नेहणे, ते नेहत असताना मागच्यांसाठी अनुकूल, सकारात्मक व हितावह सामाजिक वातावरण निर्माण करणे हाच खरा धर्म! कोणीतरी सांगावे व आपण धर्माच्या नावाखाली ते ऐकावे याला धर्मप्रेम म्हणत नाहीत तर याला गुलामी म्हणतात, तीही मानसिक गुलामी! याचाही विचार करायला हवा. धर्म हा प्रत्येकाला असतो. प्रत्येकाची ती एक खाजगी खाजगी बाब आहे. म्हणून प्रत्येकाने ती खाजगीच ठेवायला पाहिजे. धर्म प्रत्येकाने मनात ठेवला पाहिजे, घरात ठेवला पाहिजे. सार्वजनिक जीवनामध्ये मानवता हाच खरा धर्म मानला गेला पाहिजे. कायद्याचे पालन हेच धर्माचरण असले पाहिजे नव्हे कायदा पाळणे हाच प्रत्येक देशवासीयांचा धर्म बनला पाहिजे.

 परंतु आज आपण पाहतो प्रत्येक धर्मात धर्मप्रेमाच्या नावाखाली धर्माचे प्रदर्शन करून एक प्रकारे शक्तीप्रदर्शन करण्याची चढाओढ निर्माण झाली आहे. अशा प्रकाराची अजिबात आवश्यकता नाही. उलट आवश्यकता आहे ती धर्माच्या ख-या तत्त्वांचे पालन करून मानवता वाढीस लावण्याची. जेव्हा धर्माचा उपयोग राजकारणासाठी व लोकांना मूर्ख बनवून अर्थार्जनासाठी केला जातो तेव्हा धर्माचा खरा उद्देश नष्ट होतो आणि जेव्हा असे होते तेव्हा कायद्याची आवशक्ता निर्माण होते. आजवर अनेक धर्ममार्तंडांना व धर्मोपदेशकांना आपण माती खाताना पाहीले आहे. चारित्र्यहीन व्यापारी जेव्हा पैसा व प्रतिष्ठा मिळविण्यासाठी धर्माचा उपयोग करतात तेव्हा कायद्याची आवश्यकता पटते.

त्यामुळे धर्म श्रेष्ठ वाटणारांनी व आपले हे मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करणारांनी एक लक्षात घ्यायला हवे की धर्माचा अभिमान केवळ आपल्यालाच आहे असे नाही. फरक एवढाच आहे की काही अंध अनुयायी असतात तर काही डोळस चिकीत्सक असतात जे उठसूट कुणाचेही विचार स्विकारत नाहीत. त्यामुळे केवळ आपणच धर्माभिमानी असल्याचा आव कोणीही आणू नये. आपणच सर्वोच्च धर्माभिमानी असल्याचा अविर्भाव अयोग्य आहे खरेतर जो धर्मातील एखाद्या अनिष्ट प्रथेविषयी रूढी परंपरेविषयी अथवा विद्यमान वर्तनाविषयी टीका करत असेल ती बाब सर्वांच्या समोर आणत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे कारण खऱ्या अर्थाने तोच खरा धर्म प्रेमी समजला गेला पाहिजे ज्याला आपल्या धर्मात कायद्याचे राज्य अपेक्षित असते. त्याला कोणत्याही प्रकारच्या अयोग्य व अनिष्ट बाबींचे अस्तित्व मान्य नसते मात्र काही लोक स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी, स्वतःची वेगळी ओळख टिकविण्यासाठी त्याला धर्मद्रोही सिद्ध करण्याचा ओढून-ताणून प्रयत्न करतात. मात्र हे इतरांच्या लक्षात येत नाही असं समजण्याची चूक करू नका कारण 74 टक्के लोकांना कायदा हाच श्रेष्ठ वाटतो....!

(बाळासाहेब धुमाळ)
मो. 9673945092.

Wednesday 12 September 2018

पुनर्जन्म मिथ्य की तथ्य?

पुनर्जन्म मिथ्य की तथ्य?

सुप्रसिद्ध संगीत संशोधक व हार्मोनियम वादक डॉ. विद्याधर ओक यांनी "पुनर्जन्म मिथ्य की तथ्य ?" हे पुस्तक लिहून एकप्रकारे खळबळच माजवली आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी हे मोहंजोदाडो संस्कृतीतील एका राजगुरुचा पुनर्जन्म आहेत! उद्योगपती मुकेश अंबानी हे सम्राट अकबराचा पुनर्जन्म आहेत! उद्योगपती रतन टाटा हे औरंगजेबाचा पुनर्जन्म आहेत! तर जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ या कवयित्री बहिणाबाई चौधरींचा पुनर्जन्म आहेत! डॉ. ओकांनी या पुस्तकात इतरही अनेक पुनर्जन्माची उदाहरणे दिली आहेत.

 त्यांनी हे अंदाज चेहरा व गुणात्मकता यांच्या आधारे बांधले आहेत. अंदाज कोणीही बांधु शकतो, कल्पना कोणीही करू शकतो मात्र डॉ. ओक हे कोणीही व्यक्ती नाहीत. ते इंग्लंड, अमेरिकेत उच्च शिक्षण घेतलेले डॉक्टर व संशोधक आहेत. ते एम.बी.बी.एस.डी. आहेत! त्यांनी एक विशिष्ट प्रकारची हार्मोनियम तयार केली आहे जिचे पेटंट त्यांच्याकडे आहेत!

पुनर्जन्म या संकल्पनेचे समर्थन वा पुनरुच्चार आजवर त्यांनीच केला आहे असेही नाही. आजवर जगभरातील अनेक विदवान शास्त्रज्ञांनी आपले आयुष्य या, आत्मा, भुत, पुनर्जन्म यांच्या शोधार्थ खर्च केले आहे. त्यांनी मोठमोठे दर्जेदार प्रबंध सादर केले आहेत. मोठमोठी पुस्तके लिहिली आहेत. केवळ हिंदु धर्मातच नव्हे तर जगातील सर्वच धर्मात व संप्रदायात पुनर्जन्म ही संकल्पना सत्य समजली जाते. डॉ. ओक आपल्या पुस्तकाच्या अर्थात "पुनर्जन्म" या संकल्पनेच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडतात. ते म्हणतात की, दोन सख्ख्या भावांतही गुणात्मक दृष्ट्या खूप जास्त अंतर कसे काय असते? कमी वयातील बालकही अत्यंत प्रज्ञावंत असल्याचे अनेकदा कसे काय आढळून येते? कोणी शिकविलेले असते त्याला? हे असे सर्व प्रकार, पूर्वजन्माचे गुण एखाद्या व्यक्तीमध्ये आल्यानेच होतात असे त्यांना वाटते. 

तसे पाहता पुनर्जन्म ही संकल्पना फायदेशीरही खुप आहे. ती मानवी वर्तनावर नियंत्रक म्हणून भूमिका बजावते. माणसाला पुढील जन्मी चांगला जन्म मिळावा यासाठी चालू जन्मात चांगले कार्य करण्यास एक प्रकारे प्रव्रुत्तच करते. माणसातील मृत्यूची भीती नाहीशी करते व प्राप्त परिस्थितीमध्ये, जन्माने प्राप्त झालेले जीवन, त्यातील आव्हाने, संकटे स्वीकारून जगण्यास सक्षम बनवते. आजवर सर्वच धर्मात पाप-पुण्य, स्वर्ग-नर्क, जन्म-पुनर्जन्म या संकल्पना मान्य केलेल्या आहेत. मृत्यूनंतरचे सर्व विधि जसे की, दहन, रक्षाविसर्जन, दशक्रियाविधी, गंगापूजन, वर्षश्राद्ध व दानधर्म यापाठीमागचा उद्देशही हाच असतो की म्रुत आत्म्यास शांती लाभावी व पुढील जन्मी चांगला जन्म मिळावा; म्हणजेच पुनर्जन्म मिळावा. आपण बऱ्याचदा जन्मखूण आहे, पोटी आला आहे, नावकरी आहे अशी वाक्ये ऐकत असतो. ही सर्व उदाहरणे काहीशी पुनर्जन्माशीच मिळती जुळती आहेत.

आजवर अनेक साहित्यिकांनी या विषयावर कथा, कविता, कादंब-या लिहील्या आहेत. अनेक नाटककारांनी नाटके लिहीली आहेत तर अनेक चित्रपट निर्माते-दिग्दर्शकांनी या विषयावर चित्रपट बनविले आहेत. या सर्व मंडळींना आपण चुकीचे ठरवू शकत नाही. या विषयाची उत्सुकता सर्वांनाच आहे, जगभर आहे.

मात्र असे असले तरी एक विज्ञानाचा विद्यार्थी व शिक्षक असल्याने माझा पुनर्जन्मावर अजिबात विश्वास नाही. अर्थात असे म्हणत असताना मी डॉ. ओक व आजवरच्या सर्व साधुसंतांच्या, साहित्यिकांच्या व संशोधकांच्या बुद्धीचा आणि कार्याचा विनम्र आदर करतो. मात्र मी स्वतःला कितीही समजावायचा प्रयत्न केला तरी काही प्रश्न मला सतावताच. जसे की, आजवर अनेक देवी-देवतांनी पृथ्वीतलावर जन्म घेतले आहेत म्हणे! त्यांचे ते पुनर्जन्मच होते ना? मग हे पुनर्जन्म आता का होत नाहीत? स्वर्ग नावाची संकल्पना धर्मशास्त्रात सांगितली आहे. स्वर्ग हा आकाशात असतो म्हणे! मग तो आजवरच्या एवढ्या सगळ्या अवकाश संशोधन मोहिमांमध्ये का आढळला नाही? जन्माला आलेल्या सर्वांनाच पुनर्जन्म मिळतो का? हा पुनर्जन्म केवळ माणसाचाच होतो की इतर प्राण्यांचाही होतो? सर्वांनाच माणुस म्हणुनच पुनर्जन्म मिळतो कि इतर प्राणी म्हणुनही मिळतो? सर्वांनाच मिळतो व माणूस म्हणूनच मिळतो असे म्हटले तर मग पृथ्वीवरील लोकसंख्या वाढत का आहे? कायम राहिली पाहिजे ना?

जर आत्मा हा निर्गुण-निराकार आहे असे शास्त्र सांगत असेल तर डॉ. ओक असे कसे काय म्हणतात की आत्मा स्वतः सोबत काही गुण हे पुढच्या जन्मी घेऊन जातो? बरं, जर आत्मा केवळ एक देह सोडून दुसरा देह धारण करतो तर मग त्याची स्मृती कशी काय नष्ट होते? बरं जर स्मृती नष्ट होते तर मग त्यातील गुण कसे काय जीवंत राहतात? डॉ. ओकांनी सांगितलेल्या सर्व भारतीयांचे पुनर्जन्म केवळ भारतातच कसे काय झाले? केवळ भारतातच मानव आहेत असे नाही शिवाय असेही नाही की केवळ भारतातच भारतीय आहे.  शिवाय जैवरासायनिक बदल, जन्मजात बुद्यांक हे घटक कसे काय दुर्लक्षिले जाऊ शकतात? पुनर्जन्म ही संकल्पना जर शास्त्रात सांगितली आहे असे म्हटले तर "शास्त्र" हे निरंतर प्रगती करत असते हे ही आपण लक्षात घेतले पाहिजे ना? परंतु "या" शास्त्राची कुठलीही प्रगती झाल्याचे दिसत नाही. एखादी बाब सत्य व टिकाऊ असली पाहिजे तरच ती सत्य समजली जाऊ शकते. शिवाय ती सिद्धही केली जायला हवी. ती वैश्विकही असायला हवी. ती काल व स्थलसापेक्षही असायला हवी. काय या सत्यता पुनर्जन्माच्या बाबतीत सत्यात उतरतात?

डॉ. ओक कल्पना काहीही करू शकतात. त्यावर लेखनही करू शकतात. मात्र किमान आजचे जग तरी विज्ञान मानते आणि विज्ञान हे तत्वावर आधारलेले आहे. तत्व जे सिद्ध होतात. त्यामुळे
जेव्हा एखादी प्रतिष्ठित विद्वान व्यक्ती असे म्हणते तेव्हा त्याला सहाजिकच महत्त्व प्राप्त होत असते. त्यामुळे मला शंका आहे की, या पुस्तकामुळे अंधश्रद्धा वाढीस लागण्यास मदत होणार नाही कशावरून? पूजापाठ, कर्मकांड वाढीस लागणार नाही कशावरून? बुवा, बाबा, साधु, तांत्रिक,  मांत्रिक यांचे फावणार नाही कशावरून? कर्तृत्वास बंधने येणार नाहीत कशावरून? माणूस दैववादी व उदासीन बनणार नाही कशावरून? माणूस परिस्थितीशी संघर्ष करण्यापेक्षा माघार घेऊन ,आहे त्याच्यात समाधान मानणार नाही कशावरून? अयोग्य व अन्यायकारक परिस्थीतीशी समायोजन साधण्याची वृत्ती वाढीस लागणार नाही कशावरून???

मला वाटते ही पुनर्जन्म नावाची संकल्पना काल्पनिक आहे. ती तोवर काल्पनिक मानायला हवी जोवर तीला विज्ञानाने घालुन दिलेले निकष पुर्ण करता येत नाहीत. त्यामुळे किमान तोवर तरी 'पुनर्जन्म मिथ्य की तथ्य?' ते तुम्हीच ठरवा.......

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
मो. 9673945092.

Saturday 8 September 2018

वैभवशाली भारतीय संस्कृतीचे दुर्लक्षित वारसदार


वैभवशाली भारतीय संस्कृतीचे दुर्लक्षित वारसदार
भारतीय संस्कृती सर्वार्थाने समृद्ध व संपन्न संस्कृती आहे. तिचा गौरवशाली भूतकाळ व उज्ज्वल भविष्यकाळ आहे. शौर्य, साहित्य, कला, संगीत, स्थापत्य, अध्यात्म, शिक्षण व एकंदरीतच इतिहास वैभवशाली आहे. भारताची ही वैभवसंपन्न सांस्कृतिक ओळख संपूर्ण जगात आहे. मात्र ही ओळख आजची नाही.

आर्यांच्या आक्रमणापूर्वी अस्तित्वात असलेली सिंधू संस्कृतीच मुळात संपन्न होती. ही सभ्यता तिच्यातील हडप्पा, मोहेंजोदडो ही शहरे, त्यांच्यातील टुमदार गृहरचना, प्रशस्त रस्ते, सांडपाण्याची बंदिस्त व्यवस्था यांसाठी प्रसिद्ध होती. विपुल पशुधन, समृद्ध संगीत व कला हे सर्वच अगदी वाखाणण्याजोगे होते. या संस्कृतीचे निर्माते असलेले, एतद्देशीय द्रविड लोक कलागुण संपन्न व शांतता प्रिय होते तर परकिय आर्य हे, आक्रमक व साम्राज्यवादी होते. अर्थात मानवी प्रवासाच्या त्या काळात हा असा सत्तासंघर्ष व व्यापारसंघर्ष सामान्य होता, नैसर्गिक होता. मात्र सहाजिकच आर्यांच्या अतिक्रमणाचा या लोकांवर अनिष्ट परिणाम झाला. मुळात भटकेच असलेले आर्य व येथील मूळ निवासी द्रविड कारागीर, कलाकार, वाहतूकदार व पशुपालक यांच्यात नेहमी तक्रारी होऊ लागल्या. लढाया होऊ लागल्या ज्यात त्यांचा आर्यांपुढे निभाव लागला नाही. सततच्या युद्धाला कंटाळून, भयभीत होऊन, शांतता हवी म्हणुन अशा नानाविध कारणांनी परंतु मजबुरीने बहुतांश मुळनिवासी स्थलांतरित व विस्थापित झाले. त्यांच्यावर रानोमाळी, वनीजंगली लपून राहण्याची तसेच भटकत जीवन जगण्याची वेळ आली. एका ठिकाणी न राहाता संरक्षण, सोयीसुविधा व रोजगार अनुकूलतेच्या शोधार्थ हे लोक भटकंती करू लागले म्हणून त्यांना भटके असे म्हटले जाऊ लागले. टोळ्या टोळ्यांनी राहणे, प्रत्येक टोळीची व्यवसाय भिन्नता, प्रत्येक टोळीच्या वेगवेगळ्या रितीभाती, परंपरा, भाषा व विवाहपद्धती यांमुळे यांना जमातींचे स्वरूप आले. सतत भटकणाऱ्या जमाती म्हणून भटक्या जमाती अशा प्रकारचा भटक्यांचा अस्थिर व फिरस्ती जीवनाचा पूर्व इतिहास आहे जो अत्यंत प्राचीन आहे.

टोळ्याटोळ्यांनी वास्तव्य करणे, टोळ्यांच्या वैयक्तिक परंपरा जोपासणे, आपल्या टोळीला इतर टोळीपेक्षा श्रेष्ठ व वरचड सिद्ध करणे, कधी आर्यांच्या टोळ्यांशी तर कधी मुळ द्रविडीयन टोळ्यांशी संघर्ष होणे, रानावनातील लपुन छपून राहणे, हल्ले प्रतिहल्ले करणे या कारणांमुळे या टोळ्यांची कायिक, शौर्यात्मक, कलात्मक व कौशल्यात्मक क्षमता वृद्धींगत होत गेली. याचा परिणाम असा झाला की या शक्तीशाली हल्ल्यानंतरही आणि प्रदिर्घ संघर्षानंतरही या भटक्या जमाती हजारो वर्षांनंतरदेखील येथील समाजव्यवस्थेत व अर्थव्यवस्थेत आपले प्रबळ स्थान टिकवून होत्या हे विशेष!

कालपरत्वे परिस्थितीनुरूप समायोजन साधुन, सामाजिक एकोपा निर्माण करून, प्रसंगी माघार घेऊन या जमाती येथील मध्यवर्ती हिंदु संस्कृतीशी संलग्न राहील्या व संस्कृतीच्या अविभाज्य घटक बनल्या. या काळात व्यवसायाधारित जाती व्यवस्था अस्तित्वात होती पुढच्या काळात जाती आधारित व्यवसाय व्यवस्था प्रस्थापित झाली. असे असले तरी रोजगाराच्या दृष्टीने सर्व जाती जमाती स्वायत्त व स्वयंपूर्ण होत्या कारण शहरे संपन्न व खेडे समृद्ध होती. या समृद्धतेत व संपन्नतेत उभय वर्गांचा हिस्सावाटा होता. नव्हे नव्हे या कालखंडापर्यंत दोन्ही संस्कृती एकात्म झाल्या होत्या. मात्र इसवी सन सोळाशे मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीची देशात स्थापना झाली आणि प्लासीच्या लढाईने देशात प्रत्यक्ष इंग्रजी सत्तेचा अंमल सुरू झाला तेथपासून एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत या जमातींंना पराकोटीचा संघर्ष करावा लागला. गुन्हेगारी जमाती कायद्याने तर यांना ब्रिटीश सरकारने अगदी गुन्हेगार जमातींचे लेबलच लावून टाकले! त्यांनी मारलेला गुन्हेगार जमाती हा शिक्का अद्यापही पुसला गेलेला नाही!

पूर्वाश्रमीच्या लढवय्या, शूर, आक्रमक, काटक, रानटी व व्यापारी जमाती ज्यात महाराष्ट्रातील बेरड, बेस्तर, भामटा, कैकाडी, कंजारभाट, कटाबु, वंजारी, बंजारा अथवा लमाण, पारधी, रामोशी, पथारी यांसह भारतातील सर्वच जमाती पुरातन काळापासून आक्रामक व काटक जमाती आहेत. यांचे प्राचीन राजेशाही, स्वराज्य निर्मिती, ब्रिटीश विरोधी उठाव व स्वातंत्र्य लढा यात अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. काटकता, निर्भीडता, चपळाई, स्वामिनिष्ठा रक्तातच असल्याने या जमाती राजसत्तेच्या लाडक्या, विश्वासू तसेच आधारस्तंभ जमाती होत्या. तत्कालीन राजेशाहीने या जमातींची कौशल्ये व क्षमता पाहून त्यांना महत्त्वाची कामे नेमुन दिली होती, जबाबदाऱ्या निश्चित केल्या होत्या. उपजत योग्यता अपेक्षेप्रमाणे आढळल्याने या जमातींना आपल्या घोडदळ, पायदळ, आरमारदल, गुप्तहेर खाते अथवा गुप्तचर यंत्रणा यात महत्वाच्या जागांवर प्रभावीरीत्या वापरण्यात आले होते. ज्यांना या जमातींची क्षमता व योग्यता समजली त्यांचे राज्य सुरक्षित व अबाधित राहिले. दोघांनीही परस्परांना बळकटी प्रदान केली.

शिवकाळात स्वराज्यासाठी प्राणपणाने लढणाऱ्या या जमातींना छत्रपती शिवराय, शंभूराजे, राजारामराजे यांच्या काळात योग्य तो मानसन्मान मिळाला. शिवछत्रपतींच्या जीवाला जीव देऊन त्यांच्या व जिजाऊंच्या स्वप्नातील स्वराज्य उभे करण्यात भटक्या विमुक्तांनी  ते ज्या ज्या क्षेत्रात निष्णात आहेत त्या त्या क्षेत्रातील सर्वोत्तम योगदान दिले. शिवरायांच्या गनिमी कावा युद्धनीतीमध्ये या जमातीमधील अनेकांनी हिरीरीने सहभाग घेतला नव्हे नव्हे महाराजांनी याच जमातींचा कौशल्याने वापर करून घेतला. आपल्या आपल्या पारंपारिक भाषा व सांकेतिक भाषा असल्याने तसेच वेषांतर करण्याची अंगभूत कला असल्याने शत्रू गोटातील, शत्रू राज्यातील माहिती सफाईदारपणे जमा करून ती राजदरबारी पोहोचविण्याचे काम गुप्तपणे या जमातींनी केले. एकुणच काय तर सर्वांनी आपापल्या परीने स्वराज्यास हातभार लावला हे सर्वज्ञात आहे. किमान सर्वश्रुत तरी नक्कीच आहे. महाराष्ट्रात मराठेशाहीच्या अस्तानंतर मात्र या जमातींचा राजाश्रय नाहीसा झाला कारण इंग्रजांनी येथील राजेशाही संपुष्टात आणली होती. संस्थाने खालसा केली होती. अस्तित्वात असलेली इंग्रजी सत्तेच्या अंकित होती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही मात्र त्यातही ज्या संस्थानिकांची अस्मिता जिवंत होती त्यांना या जमातींनी ताकद दिलेली आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रासह संपुर्ण देशभर सारखीच होती.

आज वैभवशाली इतिहासाची साक्ष देत उभे असलेले तसेच काळाच्या ओघामध्ये नाहीसे झालेले अनेक गडकिल्ले, दुर्ग, लेणी, मनोरे, भुयारे, मंदिरे, राजवाडे, गुहा, दिपमाळा, सभामंडप, तळघरे, कारंजे, धरणे, घाट, खिंडी, मकबरे इत्यादी नयनरम्य आणि डोळ्याचे पारणे फेडणा-या निर्मीती, वडार, बेलदार, पाथरवट या जमातींनी निर्माण केल्या आहेत. स्थापत्यकलेचे हे अनुपम नमुने तत्कालीन सम्रुद्धतेचे पुरावे आहेत. म्हणजे आजच्या या जमाती त्या काळच्या वास्तुशास्त्रातील वास्तुरचनाकार व अभियंते होत्या असे म्हटले तर अजिबात चुकीचे होणार नाही. या वास्तू त्यांनी ना केवळ आपल्या घामाच्या धारा गाळून बनविलेल्या आहेत तर रक्ताच्या धारा वाहवून, अवयव गमावून, कायमचे अपंगत्व पत्कारून व प्रसंगी जीव गमावून निर्माण केल्या आहेत. तेव्हा आज सर्वांना अभिमानास्पद अशा या दीर्घायुषी व विलोभनीय वास्तू उभ्या आहेत. यासाठी यांनी कुठलाही विशेष मोबदला कधी मागीतला नाही.

युद्धकाळात व एरवीही लागणारी शस्त्रास्त्रे, तोफा व तोफखाने गड-किल्ल्यांचे दरवाजे, मुर्त्या व पुतळे, नाणी व शिक्के तयार करणारे व इतरही धातुकाम व मूर्तिकाम करणाऱ्या लोहार, घिसाडी, ओतारी, ठुकारी, शिकलगार या जमातींनी सोसलेल्या झळा, मारलेले हातोडे व सहन केलेले चटके विसरता येणार नाहीत. सागरी सरहद्दीवर गस्त घालण्याचे, लढाऊ जहाजे व होड्या चालविण्याचे, कित्येक महीने समुद्रातच राहणून शत्रुला रोखण्याचे, परतवून लावण्याचे काम करणारे भोई, मल्लाव, कोळी यांचा त्याग व यांचे परिश्रम यामुळे युद्धे जिंकणे, मुलूख सहीसलामत ठेवणे, परमुलूख हस्तगत करणे शक्य झालेले आहे. याचा यांनी कधीही मावेजा मागीतला नाही.

देवी-देवतांची भक्ती, उपासना करणारे तसेच इतिहासातील प्रेरक, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे, घटना इत्यादी कथा व गीते लोककलेद्वारे सादर करून संस्कृतीचे मौखिक तसेच आपापल्या इतर कलाप्रकारांनी वहन करणा-या वासुदेव, बहुरूपी, आईंवाले, गोसाई, भोपी, गोंधळी, गोसावी, भराडी, चित्रकथी, हेळवे, जोशी, पांगुळ इत्यादी जमातींनी धार्मिक, अध्यात्मिक पात्रांची व घटनांची माहीती सांगितिक व कलात्मक पद्धतीने लोकांसमोर मांडली. साधुसंतांचा, राजेमहाराजेंचा इतिहास जिवंत ठेवला. इतिहासातील शुरविरांच्या गाथा, चरित्रे, प्रसंग आदींचे गुणात्मक व मुल्यात्मक महत्त्व जनतेसमोर कलेद्वारे सादर केले. एवढेच नव्हे तर युद्धकाळात सैनिकांसमोर प्रेरक व जोशवर्धक कथा व गीते सादर करून त्यांचा आत्मविश्वास वाढवीला, ऊर्जा दिली. मनोरंजनाबरोबरच नैतिकता, मुल्ये, शौर्य व आदर्शाचे धडे कलेतुन दिले. समाजातील वातावरण धार्मिक, सांप्रदायिक, प्रसन्न व शांततेचे ठेवले. याची दखल घेवून सर्वच नाही तरी किमान शिवरायांसारख्या पारखी राजांनी काही प्रमाणात का असेना पण यांना जहागि-या, वतने, इनाम, बक्षिसे बहाल केली.

 प्राण्यांच्या सहाय्याने खेळ दाखविणा-या गारुडी, नंदीवाले, मदारी, वाघवाले, दरवेशी, अस्वलवाले, जादूगार रक्षक आहेत येथील जैवविविधतेचे. पर्यावरणीय व पशुपक्षीय जैवविविधता मनोरंजनातून समजावून देण्याच्या पद्धतीच्या त्या जनक आहेत. तसेच रस्त्यावर मर्दानी कौशल्याधारित कसरती करणारे कोल्हाटी, गोपाळ, डोंबारी या जमाती शुद्ध व सात्विक मनोरंजन, बलोपासना यांचे महत्व समजावतात. जंगलांवर आधारित जीवन असणारे व गोल्ला, धनगर, ठेलारी तसेच मसनजोगी, काशिकापडी या सर्व भटक्या विमुक्त जमाती या देशाच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे भूषण आहेत. येथील लोकजीवनाच्या या नाड्या होत्या. यांच्या भाषा, यांचे राहणीमान, यांची कलाकौशल्ये यांनी या देशाची संस्कृती लोकजीवन समृद्ध केलेले आहे. या जमाती ख-या अर्थाने वाहक आहेत धार्मिक, अध्यात्मिक व सांस्कृतिक भिन्नतेच्या. देशाचा व संस्कृतीचा इतिहास या जमातींनी पद्धतशीरपणे जिवंत ठेवला आहे. त्याचे पिढी दरपिढी संक्रमण व संवहन केले आहे. यासाठी त्यांना द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत.

आज रोजी मात्र या जमातींची जाणीवपूर्वक उपेक्षा केली जात आहे. यांच्याकडे मुद्दामहून दुर्लक्ष केले जात आहे. या उपेक्षेची व दुर्लक्षाची समीक्षा व चिकित्सा होणे अत्यंत आवश्यक आहे. भारतभर विखुरलेला हा भटका समाज, विकासाच्या मुख्य प्रवाहापासून जाणीवपूर्वक दूर ठेवला जात आहे. ही उपेक्षा आता असह्य होत आहे. सहनशीलतेचा अंत होत आहे. मुख्यत्वे ब्रिटिशांनी शोषण केल्यामुळे देशोधडीला लागलेल्या या जमातींचे आपल्या तेथील बलुतेदार व आलुतेदार पद्धतीनेही शोषणच केलेले आहे. या पद्धतीने हक्काचा रोजगार जरी उपलब्ध करून दिला होता तरी या पद्धतीत क्षमतांची योग्य किंमत होत नव्हती. केवळ अन्नधान्याच्या मोबदल्यात इतर बलुतेदारांच्या व आलुतेदारांच्या सोबत लोहार, घिसाडी, भोई, गुरव, गवळी, धनगर, गोंधळी, डवरी, गोसावी, जोशी या भटक्या जमातींनी वस्तू व सेवा पुरवून प्राचीन भारतीय कृषीजीवन व दैनंदिन लोकजीवन स्वयंपूर्ण केले. या जमातींनी या देशाला यशोशिखरावर आरूढ केलेले आहे. आज जो भारत विश्वात आपल्या वैभवशाली संस्कृतीसाठी आदराने उच्चारला जात आहे त्यात भटक्या-विमुक्तांचे योगदान लक्षणीय आहे. मात्र त्यांच्या कायमस्वरूपी पक्क्या उपजीविकेच्या साधनाची उपलब्धता करण्यात आली नाही. आज रोजी हा समाज विकासाच्या कुठल्याही पातळीवर आढळत नाही. वर्षानुवर्षांचा कोंडमारा, जीवनमानावर नकारात्मक परिणाम करणारे कायदे, यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण यामुळे  बंद पडलेले पारंपरिक रोजगार, संपुष्टात आलेली पारंपारिक बलुतेदारी व आलुतेदारी पद्धती, त्यामुळे निर्माण झालेली बरोजगारी, भुमिहीनता व साधनविहीनता यांचा विपरीत परिणाम भटक्यांच्या जीवनमानावर पडलेला आहे.

पुर्वीच्या काळी जरी या जमाती धनवान नव्हत्या तरी मानवान मात्र नक्कीच होत्या. हे महत्त्वपूर्ण स्थान त्यांनी आपल्या कला कौशल्यातून व कर्तबगारीतुन मिळविले होते. हा समाज वैशिष्ट्यपूर्ण भारतीय संस्कृतीचा मूळाधार होत्या. भारतीय वैविध्यपूर्ण संस्कृतीची मुख्य ओळख होत्या! मात्र दुर्दैवाने आज रोजी तेच गौरवपूर्ण इतिहास असलेले भटके विमुक्त अगदी उदरनिर्वाहासाठी लाचार आहेत. पायाला चाक बांधून भटकंती करणारे, भटके लोक मरणासन्न जिवन जगत आहेत. एवढ्या वैभवशाली संस्कृतीचे निर्माते असुनही यांना कुठल्याही प्रकारचा मावेजा अथवा मोबदला मिळत नाही. वास्तविक पाहता हा गौरवास्पद इतिहास निर्माण करण्यासाठी यांनी तेव्हा कुठलीही विशेष अपेक्षा व्यक्त केली नव्हती.केवळ पोटापुरत्या अन्नपाण्यावर ध्यैयाने बेभान होवून आपल्या सर्वशक्तिनीशी यांनी कार्ये केली.

 ब्रिटिशांनी त्यांच्या साम्राज्य प्रस्थापित करण्यातील, त्यात वृद्धी होण्यातील त्यांच्या दृष्टीने सर्वात मोठ्या अडसर असणाऱ्या या जमातींना पद्धतशीरपणे बाजूला केले. या जमातींचे उपद्रवमूल्य ओळखून त्यांना गुन्हेगार जमाती घोषित केले. त्यांच्यावर कायद्याने बंधने लादली मात्र स्वतंत्र भारतातील नागरिकांनी या जमातींचा नेमका गुन्हा समजून घेतला पाहिजे. यांनी नेमका कोणत्या प्रकारचा गुन्हा केला होता हेच अद्याप कित्येकांना माहीत नाही मात्र तेच लोक या जमातींना गुन्हेगार जमाती असे संबोधतात! वास्तविक पाहता या जमातींनी गोऱ्या सरकारला सळो की पळो करून सोडले होते मात्र दुर्दैव असे की आज रोजी याच लढवय्या व गुणवान जमातींवर भीक मागण्याची वेळ आलेली आहे! कायद्याने तर भिकही मागता येत नाही. ज्याप्रमाणे 'गुन्हेगार जमाती' हा डाग आहे त्याचप्रमाणे 'भिकारी जमाती' हा देखील एक प्रकारचा डागच आहे जो या जमातींवर पडला आहे.

वैभवशाली भारतीय संस्कृतीचे हे खऱ्या अर्थाने निर्माते असूनही यांना कुठलाही वारसा हक्क प्राप्त झाला नाही. खऱ्या अर्थाने या संस्कृतीचे वारसदार असुनही या जमातींची आज अवहेलना होत आहे. एका गौरवपूर्ण इतिहासाच्या निर्मात्या असूनही या जमातींवर प्रथम आर्यांच्या अतिक्रमणामुळे, पुढे ईस्ट इंडिया कंपनीमुळे, त्यानंतर इंग्रजांच्या जुलमी कायद्यामुळे, तदनंतर स्वतंत्र भारतातील अन्यायकारक कायद्यांमुळे आणि आता आधुनिकीकरण व औद्योगिकरणामुळे आज बेरोजगार होण्याची वेळ आली आहे.

 समाजाच्या संशयास्पद व घृणास्पद दृष्टिकोनामुळे यांना कोणतेही सन्मानजनक काम मिळत नाही. यांच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही परिणामी यांना प्रतिबंधित व्यवसाय जसे की, दारू तयार करणे, अवैध वाहतूक करणे, गुन्हेगारी जगताला पूरक व्यवसाय करणे, महिलांवर देहविक्रय करणे, भीक मागणे असे व्यवसाय करण्याची दुर्दैवी वेळ आलेली आहे. अर्थात असे व्यवसाय करणाऱ्यांची संख्या जरी थोडीच आहे तरी शिक्षण, प्रतिष्ठा, संपत्ती, रोजगार नसल्याने तसेच निरक्षरता, व्यसनाधीनता, दैववादीपण व अंधश्रद्धा असल्याने समाजात नकारात्मकता, द्वेषभावना व विद्रोहवृत्ती वाढीस लागत आहे. ही भावना भविष्यात अधिक गतीने वाढूही शकते जर अशाच प्रकारे प्रस्थापितांकडून हिनतेची, अविश्वासाची तसेच संशयाची वागणूक मिळू लागली आणि शासनाकडूनही उदासीनतेची व दुर्लक्षीततेची वागणूक मिळत राहिली तर!

 हे दुर्लक्ष असेच होत राहीले तर हा समाज अधिकच वाममार्गाला लागू शकतो. असेही या देशात डोके भडकवणारांची संख्या कमी नाही. एखाद्या चुकीच्या व्यक्तीकडून अथवा गटाकडून या जमातींचा आपराधिक कामांसाठी वापर करून घेतला जाऊ शकतो. त्यामुळे वेळीच या जमातींकडे शासनाने विशेष लक्ष देऊन यांना मुख्य प्रवाहात आणण्याची नितांत निकड आहे. असे नाही झाले तर पुन्हा एकदा उठाव करण्याची वेळ या जमातींवर लादल्यासारखे होईल याची जाणीव प्रस्थापितांना व शासनाला होणे अत्यंत आवश्यक आहे कारण या जमाती या देशाच्या वैभवशाली संस्कृतीच्या सर्वार्थाने वारस आहेत परंतु दुर्लक्षित आहेत!!!!

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
मो. 9673945092.

Wednesday 5 September 2018

शिक्षकदिन

शिक्षकदिन...

प्रतिभावंत मराठी लेखक, विचारवंत आणि आद्य समाजसुधारक महात्मा फुल्यांनी महाराष्ट्रात शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची व अस्पृश्य शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा सुरू केली तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्यातच वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये पहीली शाळा सुरू केली. त्यांचे हे कार्य प्रवाहाच्या विरूद्ध होते. त्यांना प्रतिगामी सनातन्यांकडुन पराकोटीचा विरोध झाला. पण फुले आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात स्वतःच्या घरापासून केली. पत्‍नी सावित्रीबाईंना शिकवून त्यांच्यावर मुलींच्या शाळेची जिम्मेदारी सोपवली. अशाप्रकारे क्रांतिज्योती सावित्रीबाई ह्या देशाच्या आद्य शिक्षिका व मुख्याध्यापिका आहेत!!

अंगावर शेण चिखल झेलून त्यांनी शिक्षणाच्या रोपाचे रोपन केले. त्यांनी सहन केलेला त्रास व केलेला त्याग अकल्पनीय आणि अतुलनीय आहे. परिणामी आज त्याच रोपाचा विशाल असा वटवृक्ष झाला आहे. खासकरून स्त्रीयांना व अस्पृश्य तथा बहुजनांना त्यांनी शाळेची वाट दाखवली. केवळ शिक्षणच नव्हे तर एकुणच पुरोगामित्व, सेवाभाव व मानवतावाद वाढीस लावण्यात या दामपत्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः महात्मा फुलेंना गुरू मानत!  महात्मा फुले 1827 ला जन्मले व प्रतिकूल परिस्थितीत, कर्मठ भारतीय व जुलमी इंग्रज यांच्या विरोधात जावून युगप्रवर्तक कार्य करून 1890 मध्ये गेले.

ज्यांचा जन्मदिवस आज आपण #शिक्षकदिन म्हणून साजरा करतोय ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 1888 जन्मले 1975 ला गेले. ते भारताचे पहीले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते. ते भारतरत्नही आहेत. ते प्राध्यापक होते, ते प्रज्ञावंत होते, उत्कृष्ट वक्ते, साहित्यिक व तत्वज्ञ होते. मी व्यक्तीशः त्यांचा चाहता आहे.

मात्र मला कळत नाही की त्यांचा जन्मदिवस "शिक्षकदिन" म्हणून साजरा करण्यासारखे त्यांनी शिक्षण क्षेत्रात कोणते अतुलनीय समाजकार्य केले आहे??? मला हे ही कळत नाही की, फुले दामपत्य आद्य शिक्षक असुनही, भारतीय महीला शिक्षण व अस्पृश्यांच्या तसेच बहुजनांच्या शिक्षणाचे आद्य जनक असुनही, त्यांचा त्याग व संघर्ष अतुलनीय असुनही त्यांना अद्याप भारतरत्न पुरस्कार का दिला गेला नाही. खरे तर ते सर्व पुरस्कारांपेक्षा वरचे आहेत पण मग तसे जाहीर का केले जात नाही???? शिवाय या दोघांच्याही स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवर दोन विशेष दिवस का साजरे केले जात नाहीत???

चालु आहे यात काही बदल करावा असे मला अजिबात वाटत नाही. ते योग्यही ठरणार नाही. मात्र महामानव महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर अन्याय होतोय हे नक्की हे दुर्लक्ष, हा अन्याय थांबवून त्यांना राष्ट्रीय स्तरावर यथोचित सन्मान दिला गेलाच पाहिजे.
शिक्षक दिनानिमित्त या दोन्हीही आद्य शिक्षकांना माझा मानाचा मुजरा तसेच भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतींनाही विनम्र अभिवादन...
बाळासाहेब धुमाळ.
मो. 9673945092.

Monday 3 September 2018

संघटित भटक्या विमुक्त जमातींचे असंघटीत आंदोलन

भटक्या विमुक्त संघटीत जमातींचे असंघटीत आंदोलनः
आर्यांच्या आक्रमणापासून ते ब्रिटिशांच्या आक्रमणापर्यंत, ब्रिटिश राजवटीपासुन ते भारतीय स्वातंत्र्यापर्यंत आणि भारतीय स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत भारतातील मूळ भटक्या-विमुक्तांवर घोर अन्यायच होत आलेला आहे. आज रोजी देशात साधारणपणे 315 भटक्या जमाती तर 198 विमुक्त जमाती आहेत. पैकी महाराष्ट्रात 14 विमुक्त जमाती ( VJA), 37 भटक्या जमाती  ब ( NTB)  शिवाय धनगर म्हणजे भजक (NTC) आणि वंजारी म्हणजे भजड (NTD) या जमाती अस्तित्वात आहेत. पैकी धनगर जमात अनुसुचित जमातीमध्ये समाविष्ट होण्यासाठी तर वंजारी जमात ओबीसीमध्ये समाविष्ट होण्यासाठी प्रयत्न करतेय. अर्थात त्यांनी तसा प्रयत्न करावा? की न करावा? हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे म्हणा परंतु मला कळत नाही, धनगर बांधवांची भुमिका एकवेळ आपण समजू शकतो. ती रास्तही आहे परंतु वंजारी बांधवांचे गणित काही माझ्या लक्षात येत नाही. म्हणजे जे आरक्षण आदरणीय मुंडे साहेबांच्या प्रयत्नाने व कृपेने मिळाले आहे त्याचा त्याग करून हे बांधव एनटी ते ओबीसी असा उलट प्रवाही प्रवास का करताहेत? हे माझ्यासाठी सध्या तरी अनाकलनीय आहे. आज अनेक ओबीसी जाती स्वतःला भटके सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असताना वंजारी मात्र स्वतःला ओबीसी सिद्ध करू पहात आहेत ते कसले हित जाणुन हे त्यांनाच ठाऊक. मात्र मला खात्री आहे हे त्या जमातीचे सार्वमत नक्कीच नाही. असो सद्ध्यातरी या उभय जमाती भटक्याच आहेत, आपली भावंडेच आहेत. त्यामुळे मला त्यात जास्त खोलवर जायचे नाही. ओघाने आले म्हणुन लिहीले मात्र मला आपले लक्ष इकडे वेधायचे आहे की या वरील सर्वच जमातींचे राज्य स्तरावरील व केंद्र स्तरावरील विविध प्रश्न आहेत व ते व्यापक अर्थाने समान आहेत. ते प्रश्न सामान्यपणे पुढीलप्रमाणे आहेत.

देशभरातील भटक्या-विमुक्तांची जातवार जनगणना करणे, रेणके आयोग व इदाते आयोग यांनी केलेली भटक्या विमुक्तांसाठीच्या स्वंतत्र तिसऱ्या शेड्युलची शिफारस आमलात आणणे, घटनात्मक दर्जा असलेला कायमस्वरूपी राष्ट्रीय भटके विमुक्त आयोग निर्माण करणे, महाराष्ट्राच्या धर्तीवर इतर राज्यांमध्येही भटक्या-विमुक्तांना आरक्षण मिळणे, राज्य लोकसेवा आयोगाकडून शासकीय अधिकारी व कर्मचारी भरती प्रक्रियेत समांतर आरक्षणात होत असलेला अन्याय दूर करणे, विजाभज इमाव व विमा प्रवर्ग कल्याण मंत्रालयास भरीव अनुदान देवून त्याची स्पष्ट विभागणी करुन खर्च करणे, राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवाल क्रमांक 49 मधील त्रुटी दूर करुन अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या धर्तीवर सरसकट नॉन क्रिमिलियरच्या अटीतून सूट मिळणे, इदाते आयोगाचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर खुला करणे व जसाच्या तसा अमलात आणणे, जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळण्यातील जाचक अटी दूर करुन सर्वांना ही प्रमाणपत्रे सहजपणे मिळणे, अस्ट्रॉसिटी कायदा भटके विमुक्तांनाही लागू करुन सरंक्षण मिळणे, कलाकार नकलाकार कसरतीकार कारागीर भटक्या जमातींना गावोगावी उतरण्यासाठी हक्काची जागा मिळणे, त्यांना पोलीस संरक्षण मिळणे, विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती वेळेवर मिळणे, नोकरभरतील अनुशेष भरणे, अनुसूचित जाती जमातींच्या धर्तीवर नोकऱ्यांमध्ये पदोन्नती मिळणे, बंद करण्यात आलेल्या शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करणे, भटक्या विमुक्त जमातींच्या महिलांवरील अत्याचार बंद होणे, बार्टीसारखीच भटके विमुक्तांसाठीही स्वतंत्र संशोधन संस्था स्थापन करणे, लोककला संवर्धनासाठी शासकीय शिक्षण-प्रशिक्षण संस्था असणे, भटके विमुक्तांमधील कौशल्य विकास व उद्योजकता विकासास चालना मिळेल अशा सोयीसुविधा असणे, वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळास भरीव आर्थिक तरतूद करणे, यशवंतराव चव्हाण पालमुक्त वसाहत योजना प्रभावीपणे राबविणे, पशुपालनास भरीव अर्थसहाय्य मिळणे, वनराई पास मिळणे, जमातींमधील उपजमातींना स्वतंत्र जमात म्हणून कागदोपत्री मान्यता मिळणे, वस्त्या व तांडे यांना स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळणे, बेघरांना घरे मिळणे, भूमिहीनांना भूमी मिळणे, मोफत शिक्षण रोजगार व स्वयंरोजगार यांचे प्रशिक्षण मिळणे, संरक्षण मिळणे, अस्तीत्वात असलेल्या योजनांच्या अमलबजावणीत प्राधान्य मिळण्याऐवजी अधिकारी व पदाधिकारी यांच्याकडून  जाणिवपूर्वक दुर्लक्ष होणे, असे विविध प्रश्न देशभरातील भटक्या-विमुक्तांच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक मागासलेपणास कारणीभूत आहेत.

देशातील सर्वात मागास असलेला आपला समुदाय जर खर्‍या अर्थाने मुख्य प्रवाहामध्ये यावा असे वाटत असेल तर हे वरील सर्व प्रश्न सुटणे अत्यावश्यक आहे. हे प्रश्न सर्वसामान्य समाज बांधवांना जरी माहीत नसले तरी त्या-त्या समाजाच्या नेत्यांना मात्र नक्कीच माहित आहेत. मात्र तरीही ते या प्रश्नांकडे का डोळेझाक करत आहेत? का दुर्लक्ष करत आहेत हे मला समजत नाही. हे प्रश्न केवळ मंत्रिमंडळांकडून, सभागृहांकडून, संसदेकडून, राज्यपालांकडून व राष्ट्रपतींकडून तसेच न्यायालयांकडुनच सोडवले जाऊ शकतात. यासाठी समाजाने संघटीत असणे अत्यंत आवश्यक आहे. नियोजनबद्ध व सुयोग्य पद्धतीने संघटीतरित्या संघर्ष करणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे समाज संघटितही आहे मात्र आपले जमातीय संघटन आहे. म्हणजे आपण जात म्हणून अथवा जमात म्हणून संघटीत आहोत मात्र दुर्दैवाने "भटके विमुक्त" म्हणून तितकेसे संघटीत नाही आहोत. भटक्या विमूक्तांची जवळजवळ प्रत्येक जमात ही स्वतःपुरती बर्‍यापैकी संघटित आहे. प्रत्येक जमातीतील लोक एकत्र येऊन जमातीचे मेळावे आयोजित करणे, वधू-वर सूचक मेळावे घेणे, छोटे-मोठे सत्कार समारंभाचे कार्यक्रम आयोजित करणे, गणेशोत्सव नवरात्रोत्सव दहीहंडी उत्सव साजरा करणे असे उपक्रम घेतात. त्यांच्या नेत्यांचा हेतू हा स्थानिक राजकारण्यांवर प्रभाव पाडणे, आपली तसेच जमातीची छोटी-मोठी कामे करून घेणे असा असतो मात्र या संघटनांचा उपयोग वर उल्लेख केल्याप्रमाणे राज्य व देश स्तरावर भटक्या-विमुक्तांच्या प्रगतीमधील मुख्य अडसर असलेले प्रश्न सोडविण्यासाठी होत नाही. जेव्हा भटके-विमुक्त म्हणून संघर्ष करण्याची, एकत्र येऊन आंदोलन करण्याची वेळ येते तेव्हा या वैयक्तिक जमातीय संघटीततेचा फायदा सर्व जमातींच्या संघटीत असण्यासाठी तितकासा होताना दिसत नाही. म्हणजे जमातीच्या मेळाव्यांना हजारोंच्या संख्येने लोक येऊ शकतात तेथेच सर्व जमातींच्या मिळून प्रश्नांवर जेव्हा एखादी संघटना रस्त्यावर उतरते तेव्हा मात्र शे-सव्वाशे लोकही येत नाहीत हा आजवरचा कटू अनुभव आहे.

तसे पाहिले तर आजवर आपल्या कुठल्याही एका जमातीचे प्रश्न शासनकर्त्यांकडून सुटल्याचे दिसत नाही कारण शासन कोण्या एकाच जमातीचे प्रश्न सोडवूच शकत नाही. प्रत्येकाच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्या सोडविणे शक्य होत नाही. स्थानिक पुढारी काही कामे आपण संघटीत असल्यामुळे करतात. त्यात काही विशेष नाही कारण त्यांना मतांची आवश्यकता असते. त्यांच्या दृष्टीने आपण वोट बँक असतो. विशेष म्हणजे आपल्या मागण्याही क्षुल्लक असतात. जसे की विज जोडणी, नळ जोडणी, रस्ते नाल्या निर्मीती ते एखादे समाज मंदिर, पोलीस स्टेशनमधील सहकार्य, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी, कार्यक्रमांना संरक्षण हजेरी व वर्गणी इत्यादी. अशा छोट्या छोट्या मागण्या ते पुर्ण करून आपला मतदार निश्चित करतात. दैनंदिन जीवन जगत असताना या छोट्या छोट्या अडचणी दुर होणेही आवश्यक असते हे मी समजू शकतो. अशावेळी आपल्या जमातीय संघटीततेचा व आपल्या जमातींच्या नेत्यांचा उपयोग होतो हे ही मी समजतो.

मात्र मला आपले लक्ष आपल्या मुख्य प्रश्नांकडे वेधायचे आहे. अशाप्रकारे छोटे छोटे प्रश्न सोडविण्यासाठी समाजाची बहुमोल शक्ती खर्चुन आपले वर उल्लेखिलेले मुलभूत प्रश्न सुटणार आहेत का? आपल्या जीवनमानावर तसेच आपल्या पुढील पिढ्यांच्या जीवनमानावर यामुळे काही विशेष प्रभाव पडणार आहे का? मग आपण शक्ती, बुद्धी व सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळ वाया घालवत नाही आहोत का? कोणत्या प्रश्नांना महत्त्व द्यावे हे आपल्याला समजायला नको का? हे जे आपण करतोय ते अनावश्यक आहे असे माझे अजिबात म्हणणे नाही मात्र पुरेसे नक्कीच नाही. कारण आपल्या खऱ्या समस्या सोडवायच्या असतील, आपल्या या स्थितीस जिम्मेदार असणाऱ्या प्रश्नांना हात घालायचा असेल व कायमस्वरूपी ईलाज करायचा असेल तर आपल्यातील ही शक्ती भटक्या-विमुक्तांच्या सकल प्रश्नांवर भांडणाऱ्या आणि सर्व भटक्या-विमुक्तांसाठी सर्वांपासून बनलेल्या संघटनांच्या पाठीशी उभी करायला हवी.

मित्रांनो आपण हे समजून घेतले पाहिजे की आपले प्रश्न गहन आहेत. आपले प्रश्न राज्यस्तरीय, देशस्तरीय आहेत. जरी त्यांची सोडवणूक जिल्हास्तरावरून होणार असेल तरी आदेश मात्र राज्य मंत्रीमंडळ, केंद्रिय मंत्रीमंडळ यांचेकडून व्हायला लागतील. ते सोडवण्याची क्षमता स्थानिक राजकीय पुढाऱ्यांमध्ये नाही एव्हाना ते त्यांच्या अख्त्यारीतील देखील नाहीत. स्थानिक राजकीय नेत्यांचा तसेच काही प्रमाणात जमातींच्या नेत्यांचा हेतू साध्य होतो मात्र आपला म्हणजे समाजाचा हेतू मात्र तसाच दुर्लक्षित व अनुत्तरीत राहतो. त्यासाठी मी सर्व जमातींच्या नेत्यांना नम्र विनंती करतो की आपापले जातीय संघटनांचे अस्तित्व कायम ठेवून अशाच प्रकारे लोकांना संघटित करून, ही संघटित शक्ती भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या झगडणा-या व आपल्यातूनच तयार झालेल्या संघटनांच्या पाठीशी उभी करायला हवी.

त्याचबरोबर भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या अनेक संघटनांनी देखील वैयक्तिक स्वार्थ, हेवेदावे व श्रेयवाद बाजुला सारून, वेगवेगळ्या व्यासपीठांवरून शासनाकडे मागण्या मांडण्यापेक्षा आपापसात समन्वय ठेवून एकसंघपणे हे प्रश्न शासनापर्यंत जर पोहोचवले, त्यावर जर आंदोलने केली तर नक्कीच आपले आंदोलन धारदार होईल. त्याकडे शासनकर्त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही व परिणामी आपले प्रश्‍न सुटणे सुकर होईल यासाठी सर्वांनी एकत्र येऊन एक समान कार्यक्रम तयार करून त्याच्या पूर्ततेसाठी झगडले पाहिजे. अन्यथा आपण पाहतो आपल्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी आपली अक्षरशः उभी हयात आंदोलनासाठी खर्च केली मात्र म्हणावे तितके यश पदरी पडलेले नाही. याचे कारण एकच 'जमातीय संघटित शक्ती भटक्या-विमुक्तांच्या संघर्षाच्या कामी येत नाही'. त्यासाठी जमातीय संघटनांच्या नेत्यांनी, भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संघटनांमध्ये सामील होऊन आपली शक्ती बुद्धी चळवळीची ताकद वाढविण्यासाठी कामी आणायला हवी. अशाप्रकारे जर जमातीय संघटनांची संघटित शक्ती भटक्या-विमुक्तांच्या आंदोलनापाठीमागे उभी राहीली तर मला खात्री आहे, आपले प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत. त्यामुळे कृपया सर्वांनी विषय समजून घेऊन एकत्रितपणे लढा उभारावा असे मला वाटते तशी मी सर्वांना नम्र विनंती करतो.

आपलाः
श्री. बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो.नं. -9673945092.