Wednesday 5 September 2018

शिक्षकदिन

शिक्षकदिन...

प्रतिभावंत मराठी लेखक, विचारवंत आणि आद्य समाजसुधारक महात्मा फुल्यांनी महाराष्ट्रात शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची व अस्पृश्य शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.

त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा सुरू केली तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्यातच वेताळ पेठेत इ.स.१८५२ मध्ये पहीली शाळा सुरू केली. त्यांचे हे कार्य प्रवाहाच्या विरूद्ध होते. त्यांना प्रतिगामी सनातन्यांकडुन पराकोटीचा विरोध झाला. पण फुले आपल्या भूमिकेवर ठाम राहीले. त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरूवात स्वतःच्या घरापासून केली. पत्‍नी सावित्रीबाईंना शिकवून त्यांच्यावर मुलींच्या शाळेची जिम्मेदारी सोपवली. अशाप्रकारे क्रांतिज्योती सावित्रीबाई ह्या देशाच्या आद्य शिक्षिका व मुख्याध्यापिका आहेत!!

अंगावर शेण चिखल झेलून त्यांनी शिक्षणाच्या रोपाचे रोपन केले. त्यांनी सहन केलेला त्रास व केलेला त्याग अकल्पनीय आणि अतुलनीय आहे. परिणामी आज त्याच रोपाचा विशाल असा वटवृक्ष झाला आहे. खासकरून स्त्रीयांना व अस्पृश्य तथा बहुजनांना त्यांनी शाळेची वाट दाखवली. केवळ शिक्षणच नव्हे तर एकुणच पुरोगामित्व, सेवाभाव व मानवतावाद वाढीस लावण्यात या दामपत्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः महात्मा फुलेंना गुरू मानत!  महात्मा फुले 1827 ला जन्मले व प्रतिकूल परिस्थितीत, कर्मठ भारतीय व जुलमी इंग्रज यांच्या विरोधात जावून युगप्रवर्तक कार्य करून 1890 मध्ये गेले.

ज्यांचा जन्मदिवस आज आपण #शिक्षकदिन म्हणून साजरा करतोय ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 1888 जन्मले 1975 ला गेले. ते भारताचे पहीले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते. ते भारतरत्नही आहेत. ते प्राध्यापक होते, ते प्रज्ञावंत होते, उत्कृष्ट वक्ते, साहित्यिक व तत्वज्ञ होते. मी व्यक्तीशः त्यांचा चाहता आहे.

मात्र मला कळत नाही की त्यांचा जन्मदिवस "शिक्षकदिन" म्हणून साजरा करण्यासारखे त्यांनी शिक्षण क्षेत्रात कोणते अतुलनीय समाजकार्य केले आहे??? मला हे ही कळत नाही की, फुले दामपत्य आद्य शिक्षक असुनही, भारतीय महीला शिक्षण व अस्पृश्यांच्या तसेच बहुजनांच्या शिक्षणाचे आद्य जनक असुनही, त्यांचा त्याग व संघर्ष अतुलनीय असुनही त्यांना अद्याप भारतरत्न पुरस्कार का दिला गेला नाही. खरे तर ते सर्व पुरस्कारांपेक्षा वरचे आहेत पण मग तसे जाहीर का केले जात नाही???? शिवाय या दोघांच्याही स्मृतीप्रित्यर्थ राष्ट्रीय पातळीवर दोन विशेष दिवस का साजरे केले जात नाहीत???

चालु आहे यात काही बदल करावा असे मला अजिबात वाटत नाही. ते योग्यही ठरणार नाही. मात्र महामानव महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर अन्याय होतोय हे नक्की हे दुर्लक्ष, हा अन्याय थांबवून त्यांना राष्ट्रीय स्तरावर यथोचित सन्मान दिला गेलाच पाहिजे.
शिक्षक दिनानिमित्त या दोन्हीही आद्य शिक्षकांना माझा मानाचा मुजरा तसेच भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतींनाही विनम्र अभिवादन...
बाळासाहेब धुमाळ.
मो. 9673945092.

No comments: