Thursday 9 June 2016

रेणुका....

रेणुका:::::::::

ईक्ष्वाकू वंशात रेणू या नावाचा महापराक्रमी राजा होऊन गेला. भागीरथीच्या काठी कान्यकुब्ज शहरी राहून तो कारभार पाहात असे. पुत्रप्राप्तीसाठी त्याने शंकराची भक्ती केली. तेव्हा प्रसन्न होऊन शंकरांनी त्याला एक सर्वगुणसंपन्न अशी मुलगी व नंतर एक मुलगा होईल असा वर दिला. मग राजाने अत्री, वसिष्ठ इ. ऋषींना बोलावून यज्ञ आरंभला. पूर्णाहुती झाल्यावर यज्ञातून एक सर्वांगसुंदर कन्या निघाली. रेणू राजाने तिचे नाव रेणुका असे ठेवले. ही रेणुका म्हणजे पार्वती व कश्‍यप पत्नी अदिती या दोघींचा अवतार होय. याची कथा अशी
एकदा दैत्यांच्या त्रासाला कंटाळून सर्व देव विष्णूकडे गेले. त्यांनी विष्णूला पूर्वी त्यांनी हिरण्याक्षाचे वेळी घेतलेला वराहावतार, हिरण्यकश्‍यपूच्या वेळचा नृसिंहावतार व बळीच्या वेळचा वामनावतार यांची आठवण करून देऊन पुन्हा अवतार घेण्यासाठी विनंती केली. प्रसन्न होऊन विष्णू म्हणाले, "या वेळी अदितीचे उदरी मी पूर्णरूपाने अवतार घेणार आहे, तेव्हा तिने ते तेज सहन करण्याची तयारी करावी." हा निरोप घेऊन देव अदितीकडे गेले व त्यांनी आपापले तेज अदितीच्या गर्भासाठी दिले; पण ते पुरेसे नाही असे समजून तिने पार्वतीची तपश्‍चर्या सुरू केली. पार्वती प्रसन्न झाल्यावर अदिती म्हणाली, "विष्णू माझ्या उदरी अवतार घेणार आहेत, त्यांचे तेज सहन करण्यासाठी तू माझ्या शरीरात वास कर." पार्वती याला तयार झाली; पण शंकरांनी तिचे पती कश्‍यप यांच्या शरीरात वास करावा याची तजवीज करण्यास सांगितले. मग अदितीने शंकरांना प्रसन्न करून घेऊन वर मागितला, की आपण व कश्‍यप एकरूप होऊन माझा स्वीकार करावा. अशाप्रकारे शंकर व कश्‍यप तसेच पार्वती व अदिती एकरूप झाले. रेणू राजाच्या यज्ञातून बाहेर आलेली मुलगी म्हणजे अदिती व कश्‍यप यांची मुलगी जी पार्वती व अदिती या दोघींचा अवतार होय.
भागीरथीच्या तीरी कान्यकुब्जनगरीत रेणू राजाच्या यज्ञातून रेणुकेने जन्म घेतला . भृगुऋषींचा मुलगा च्यवन याचा मुलगा ऋचिक ऋषी गोदावरीच्या काठी राहत होता. त्याने सोमवंशी राजाची कन्या सत्यवती हिच्याशी विवाह केला. पुढे सत्यवतीच्या पोटी शंकर व कश्‍यप एकरूप होऊन जन्माला आले. ऋचिक ऋषीने त्या मुलाचे नाव जमदग्नी ठेवले. एकदा ऋचिक ऋषींच्या आश्रमात अनेक ऋषी आले व त्यांनी काशीयात्रेला जाण्याचा विचार केला. त्याप्रमाणे ते सर्व जण जमदग्नीला घेऊन यात्रेला निघाले. कान्यकुब्जनगरीचा राजा रेणू याने आपल्या मुलीचे स्वयंवर मांडले आहे असे कळल्यावर ते ऋषी समारंभ पाहण्यासाठी मंडपात गेले. अनेक देशांचे राजे, राजपुत्र रेणुकेच्या प्राप्तीसाठी आले होते. रेणुकेने त्या सर्वांसमोरूनच जाऊन केवळ समारंभ पाहण्यासाठी आलेल्या जगदग्नीच्या गळ्यात माळ घातली. हे पाहून सर्व राजांना संताप आला व त्यांनी रेणुकेला पळवून नेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्यांनी सैन्य एकत्र करून रेणू राजाशी युद्ध पुकारले. त्या मोठ्या सैन्याबरोबर लढून आपल्याला विजय कसा मिळणार, अशी रेणू राजाला चिंता वाटू लागली. तेव्हा जमदग्नीने आपले क्षात्रतेज प्रकट केले. त्याने आपल्या विलक्षण युद्धकौशल्याने सर्व राजांना पळवून लावले.
मग रेणू राजाने जमदग्नी व रेणुकेचा थाटामाटात विवाह करून दिला. त्याने जमदग्नीला घोडे, हत्ती, रथ, शहरे, रत्नभांडार इ. देऊन कन्यादान केले व भागीरथीच्या काठी राहण्याची विनंती केली. या समयी इंद्राने जमदग्नीला कामधेनू व कल्पतरू दिला. जमदग्नी रेणुकेसह भागीरथीच्या काठी राहू लागला.
पुढे रेणुकेच्या पोटी भगवंतांनी परशुरामाच्या रूपात अवतार घेतला.

टिप : मित्रांनो हे विचार माझे नाहीत व ना ही शब्द माझे आहेत. मी केवळ कागदावरील मॅटर टाईप करून आपल्या सेवेत सादर केले आहे.

संकलन व लेखन:
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9421863725 /9673945092

No comments: