Saturday 20 October 2018

माणुस जन्मजात गुन्हेगार असु शकतो काय?

माणूस जन्मजात गुन्हेगार असू शकतो काय?

आठवड्यापूर्वी हिंदुस्तान टाईम्समध्ये एक बातमी छापून आली होती, "How Nomadic Communities bear the brunt of Fictional fear mongering?" अर्थात कशा भटक्या जमाती सहन करतात काल्पनिक भितीच्या विक्रीचा आघात? पत्रकार गायत्री जयरामन यांनी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा गावातील गावगुंडांनी पोरचोर टोळी असल्याची अफवा पसरवून नाथपंथी डवरी गोसावी समाजातील पाच जणांचे अमानुष हत्याकांड घडवून आणले. हे हत्याकांड त्याचबरोबर केरळ, कर्नाटक, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगाना, तामिळनाडू येथील कलाकार, कसरतीकार, नकलाकार व भिक्षुक भटक्या विमुक्त जमातीतील लोकांवरील हल्ले व हत्या करण्याची समाजाची मनोवृत्ती वाढीस लागण्यास तामिळ चित्रपट " थीरन अधिगारम ओंद्रू" या चित्रपटास कारणीभूत  समजले होते. हा व या चित्रपटाचा तेलगू मेक असणारा "खाकी" बॉक्स ऑफिसवर सुपर हिट ठरले होते. वाचल्याबरोबर चित्रपट पाहण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण झाली परंतु तामिळ आणि तेलगू म्हटल्यावर नाईलाज झाला कारण दक्षिणेतल्या भाषा साध्या ऐकल्या तरी डोके गरगरते माझे! अर्थात केवळ भाषा भिन्नतेमुळे हं!

पुढे पुढे वाचत गेलो असता समजले की प्रदर्शनावेळी या चित्रपटाविरोधात भटक्या-विमुक्तांच्या चळवळीतील तामिळनाडूमधील कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी निदर्शने केली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठात धाव घेतली होती व चित्रपटातील क्रिमिनल ट्राईब्ज, क्रिमिनल ऑफेंडर्स अॅक्ट, क्रिमिनल ट्राईब्ज अॅक्ट 1871, 1830 च्या दशकातील लुटीच्या घटना अशी दृश्ये व असे संदर्भ वगळावेत. बावरिया जमातीचा उच्चार, अनुवंशिक गुन्हेगार असे शब्द तसेच चित्रपटातील साप पकडणे, लुटीपूर्वी देवी पूजा करणे, भटक्या-विमुक्तांची पारंपारिक हत्यारे दाखविणे, अशी आक्षेपार्ह शब्द, विधाने, दृष्ये व संदर्भ वगळावीत यासाठी आंदोलने केली होती. अशी दृश्ये व संदर्भ यासाठी वगळावीत की यामुळे समाजाचा दृष्टिकोन बदलू शकतो. हा चित्रपट 'बावरिया ऑपरेशन' वर आधारित होता व 'बावरिया' ही एक भटके-विमुक्त जमात आहे.

आंदोलकांनी केवळ दृश्य व संदर्भ वगळण्याचीच मागणी नव्हती केली तर पुढे जाऊन चित्रपटाच्या निर्मात्यांनी समाजाची माफी मागावी व चित्रपटाच्या उत्पन्नातील 50 टक्के हिस्सा भटक्या विमुक्त जमातींच्या कल्याणासाठी द्यावा अशीही मागणी केली होती. पुढे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक तसेच कलाकारांनी आंदोलकांची लेखी माफी मागितली होती.
चित्रपटातील काही दृश्य व संदर्भ वगळले परंतु तोवर अनेकांनी हा चित्रपट पाहिला होता व त्याचे दृश्य अनिष्ट परिणाम दिसू लागले होते. रस्त्यांवर (म्हणजे भटक्यांच्या घरांवर) आणि जिथे जिथे भटके जातील तिथे तिथे भितीचे काळे जमा झाले होते. याचा भटक्यांच्या जीवनावर अनिष्ट परिणाम झाला होता.डिनोटिफाईड ट्राईब्ज वेल्फेअर असोसिएशन (DTWA)  आणि दि एम्पावरमेंट सेंटर ऑफ नोमेडीक अँड ट्राईब्ज सोसायटी इन मदुराई अशा संघटनांनी यासाठी पुरेपूर प्रयत्न केले होते कारण या संघटनांना खात्री होती की या चित्रपटाचा अनिष्ट परिणाम समाज मनावर होऊ शकतो आणि हे ओळखूनच त्यांनी चित्रपटास विरोध केला होता.

मदुराईचे तत्कालीन जिल्हाधिकारी के. वीरराघव राव यांनी आंदोलनकर्त्यांना व भटक्या विमुक्त जमातीना पुरेसे सहकार्य केले. परंतु चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर पोरचोर टोळी आल्याच्या अफवा अपेक्षेप्रमाणे पसरू लागल्या व  निष्पाप भटके-विमुक्त लोक अनियंत्रित जमावाकडून मारले जाण्याच्या घटना वाढू लागल्या. यावर आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्याचे डीएसपी के. ईश्वर राव यांना तातडीची पत्रकार परिषद बोलावून "जनतेने अफवांवर विश्वास ठेऊ नये. या घटनांमागे भटके विमुक्त लोक नाहीत" हे जाहीर करावे लागले.

असे असले तरी चित्रपटाचे कथानक व एकंदरीतच निर्मिती  जबरदस्त असल्याने चित्रपट सुपरहिट झाला होता. एवढेच नव्हे तर चहात्यांचे चित्रपटाचे निर्माते एस. आर. प्रभू यांना चित्रपट हिंदीमध्ये सलमान खानला घेऊन बनवावा असेही फोन कॉल्स आले होते म्हणे! एवढे सगळे वाचल्यावर माझी चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली. मी गुगलवर चित्रपटाविषयी अधिक माहिती शोधू लागलो. बातम्या वाचल्या, व्हिडिओज व इमेजेस पाहिल्या, लिखित माहितीही वाचली. 'थिरन थिरूमरन' नामक एका प्रामाणिक व धाडसी पोलिस अधिकाऱ्याची मध्यवर्ती भूमिका असलेला हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट नोव्हेंबर 2017 मध्ये तामिळ भाषेत बनला होता. वर उल्लेख केल्याप्रमाणे नंतर तेलुगूमध्येही खाकी नावाने त्याचा मेक आला आणि हिटही झाला.

'ऑपरेशन बावरिया' या दक्षिणेतील पोलिसांच्या कारवाईवर हा चित्रपट आधारित आहे. महामार्गाजवळील एकांतामधील घरांत लुटमार करणाऱ्या संघटित गुन्हेगारांच्या टोळीवरील हे पोलीस ऑपरेशन होते. बावरिया गँग अथवा लॉरी गँग अशी ओळख असणा-या गुन्हेगारांच्या टोळीने सन 1995 ते 2006 या कालावधीत तामिळनाडू, आंध्रप्रदेश, दिल्ली, कर्नाटक, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये धुमाकूळ घातला होता. या टोळीकडून लुटीबरोबरच अनेक लोकांची हत्या देखील झाली होती. ज्यात एका आमदाराचा व एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याचाही समावेश होता. पोलीस नोंदींनुसार 64 जण जखमी झाले होते. यातील मुख्य आरोपी ओमवीर बावरिया आणि लक्ष्मण उर्फ अशोक बावरिया यांना तामिळनाडू विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती मात्र तत्पूर्वीच ओमवीर बावरिया हा मुख्य आरोपी तुरुंगातच मृत्युमुखी पडला. सर्व अकरा आरोपींवरील गुन्हे सिद्ध झाले. बसुरा बावरिया आणि विजय बावरिया हे दोघे पोलीस एन्काऊंटर मध्ये मारले गेले होते तर बाकीच्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती ज्यात दोन महिलांचाही समावेश होता.

विशेष म्हणजे " थीरन अधिगारम ओंद्रू" या चित्रपटाचे हिंदी डबिंग देखील मला पाहायला मिळाले जे केवळ युट्युब वरच आहे. चित्रपट अंगावर काटा आणणारा आहे. खासकरून पार्श्वसंगीत!  परंतु त्याहीपेक्षा अधिक विमनस्क करणारा व तशाही अवस्थेत विचार करायला भाग पाडणारा हा चित्रपट आहे. बावरिया ही राजस्थानच्या अरवली पर्वत रांगेत राहणारी भटकी जमात आहे. इतरही राज्यात ती आढळते जसे की हरियाणा, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, मध्य प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यात. पंजाब मध्ये ही जमात अनुसूचित जातींमध्ये मोडते तर इतरत्र ओबीसीमध्ये. यांच्या दहा उप जमाती आहेत. भटक्या जमातींच्या सर्व चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा, जात पंचायती सर्व काही हे लोक पाळतात.

पारतंत्र्याच्या काळात इंग्रजी छावण्या, सरकारी खजीने, रेल्वे आणि अधिकारी व त्यांची कुटुंबे यांना या जमाती लुटत असत. इतर भटक्या विमुक्त जमातींप्रमाणेच यांच्यावरही ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राईब्ज अॅक्ट 1871 नुसार अगणित अन्याय-अत्याचार केले. मात्र असे असले तरी आज रोजी हा समाज सामान्य जीवन जगू इच्छित असूनही समाजाच्या दृष्टिकोनामुळे यांच्यावर कोणीही विश्वास करीत नाही. यांना कोणी कामावर ठेवीत नाही. गुन्हा कोणीही करो, कोठेही घडो संशयित गुन्हेगार हेच असतात! जमावाकडून मारहाण, झोपड्यांची जाळपोळ आणि महिलांवरील पाशवी अत्याचार त्यांच्या पाचवीलाच पुजलेले! भय, दारिद्र्य, निरक्षरता आणि अपमान यांचे सावट कायम माथी असते. यातून कसेबसे बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना आढळणारी बावरिया जमात या "थीरन अधिगारम ओंद्रू" सारख्या चित्रपटांमुळे संकटात सापडली आहे. केवळ बावरिया जमातीकडेच नव्हे तर संपूर्ण भटक्या-विमुक्त जमातींकडे आज रोजी संशयित गुन्हेगार म्हणून पाहिले जात आहे. भिक्षेकर्‍यांच्या  मनामध्ये प्रचंड भीती बसली आहे. भिक्षेकरी घर सोडायची हिंमत करीत नाही आहेत.

ब्रिटिशांच्या भारतात येण्यापूर्वी या सर्व भटक्या विमुक्त जमाती एक प्रतिष्ठेचे व सन्मानजनक जीवन जगत होत्या. येथील राज्यसत्तेच्या विश्वासु होत्या. मात्र इंग्रजांशी देशप्रेमापोटी केलेला संघर्ष यांना प्रचंड महागात पडला. इंग्रजांनी तर बेसुमार शोषण केलेच, अमाप छळलेच परंतु तिच दृष्टी ते मागेही सोडून गेले! हाकलून देणे, चौकात खांबाला बांधणे, झाडाला बांधून दगड फेकून मारणे, महिलांना नग्न करून अपमानजनक कृत्य करायला लावणे असे अमानवी अन्याय अत्याचार या जमातींना देशभर सहन करावे लागत आहेत. वास्तविक पाहता स्वातंत्र्याच्या सैनिक व संस्कृतीच्या संरक्षक जमाती असुनही अगदी महाराष्ट्रासारख्या पुरोगामी व पुढारलेल्या राज्यातही या असुरक्षित आहेत. इथे जर भटक्या-विमुक्तांची एवढी दयनीय अवस्था असेल तर इतर राज्यांमध्ये कशी असेल याची कल्पनाही करवत नाही! मात्र बातम्यांमधून ते समोर येतेच आणि अनिच्छेने का असेना पण हे सर्व वाचावे ऐकावे व पहावे लागतेच!

वाहतूक, मनोरंजन, कलाकुसर याद्वारे हक्काचे उदरनिर्वाहाचे पारंपरिक असलेले साधन सरकार कायद्याने काढून घेत असेल तर मला प्रश्न पडतो की ओमवीर बावरिया का निर्माण होणार नाही? सन्मानाने जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूनही समाज जर या जमातींकडे गुन्हेगार आणि कमजोर जमाती म्हणून पाहत असेल, नेहमी यांना भयभीत व दबावाखालीच ठेवत असेल तर ओमवीर बावरिया का निर्माण होणार नाही? टिळकांनी स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध अधिकार सांगितला मात्र येथे या जमातींच्या बाबतीमध्ये स्थानबद्धता, सामाजिक बहिष्कार व गुन्हेगाराचा ठपका हाच जन्मसिद्ध अधिकार होऊन बसला आहे! अर्थात मी ओमवीर बावरियाचे अथवा इतर गुन्हेगारांचे समर्थन करतोय असे अजिबात समजू नका. अशा प्रवृत्तींना ठेचूनच काढले पाहिजे. यांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. मी या अशा मनोवृत्तीचा धिक्कारच करतो परंतु मी याहूनही अधिक तीव्र धिक्कार करतो तो "या जमातींना गुन्हेगार जमाती संबोधण्याच्या मानसिकतेचा!"

कुठलीच जमात जन्मजात "गुन्हेगार जमात" कशी काय समजली जाऊ शकते? गुन्हेगार समजली पाहिजे त्यांची परिस्थिती! जी त्यांना भाग पाडते गुन्हेगार बनायला! खरे तर गुन्हेगार समजला पाहिजे समाज! जो यांच्याकडे सतत गुन्हेगार या दृष्टीनेच पाहतो! गुन्हेगार समजले पाहिजे सरकार जे यांच्या सर्वांगीण पुनरुत्थानासाठी धोरणात्मक निर्णय घेत नाही! माणसाच्या लेकरांना म्हणजे माणसासारख्या माणसांना जन्मजात गुन्हेगार समजून तशी वागणूक देणे हे कुठल्या माणुसपणाचे लक्षण आहे? गुन्हेगारी अनुवंशिक कशी काय असु शकते? नवजात बालकांना, किशोर किशोरी, महिला ते वृद्धांना देखील गुन्हेगार, राक्षस ते अगदी भुत पिशाच्च समजून त्यांना ठेचुन मारणे, त्यांना वाटेल तेव्हा अटक करणे, कोठडीत डांबून ठेवणे हे ना स्वातंत्र्याचे लक्षण आहे ना सार्वभौमत्वाचे!

कोणताही माणूस जन्मजात गुन्हेगार कसा काय असू शकतो? जन्मतः बालकाला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले वातावरण मिळू शकते. परिणामी त्याच्यावर त्या वातावरणाचे संस्कार होऊन तो गुन्हेगारीकडे झुकुही शकतो. कदाचित तो गुन्हेगार होऊही शकतो! परंतु म्हणुन तो जन्मतःच गुन्हेगार असतो असे म्हणणे म्हणजे त्या नवजात बालकाच्या शरिरातील रक्तच गुन्हेगाराचे असते असे म्हणण्यासारखे होईल. त्याच्या दंडात गुन्हेगारीची लस टोचून त्याच्या दंडावर "गुन्हेगार" असे गोंदल्यासारखे होईल. त्यासाठी अशा परिस्थितीचे निर्मूलन होणे न्यायाच्या दृष्टीने आवश्यक आहे. स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतरही सरकार पाहिजे तेवढे परिवर्तन करु शकलेले नाही हे कटू वास्तव आहे. अर्थात म्हणून परिवर्तन झालेच नाही असे नाही परंतु यात सरकारचा तितकासा हिस्सावाटा मला दिसत नाही. यासाठी सरकारी प्रयत्न वाढविण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हे प्रयत्न वाढविण्याऐवजी काही जमातीतील लोक जन्मतःच गुन्हेगार असतात असे समजणे व इतरांना समजायला लावणे हे "महापाप" म्हणावे लागेल.

प्रसार माध्यमे, मनोरंजनाची साधने व कायदे यांनी जबाबदारीने आपापली भूमिकापार पाडायला पाहीजे. एखादी कलाकृती बनविणे मग ते नाटक असेल, चित्रपट असेल, मालिका असेल अथवा कथा कादंबरी असेल, यात  प्रेक्षकांची वा श्रोत्यांची वाहवा मिळवणे, व्यवसाय करणे, प्रसिद्धी मिळवणे यासाठी एखाद्या जातीचे अथवा जमातीचे नकारात्मक चित्रण करणे योग्य नाही. यामुळे समाजमन बदलते, समाजाची विचार करण्याची दृष्टी बदलते. समाजातील लोकांचा त्या सकल जमातीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पूर्वग्रहदूषित बनतो! "मागचं पाणी गढूळ आलं पुढचं किती जपायचं?" ही अशी वैचारिक अधोगती समाज उपयोगी नाही. एखाद्या जमातीचा असा उद्धार करण्यामुळे त्या जमातीची बदनामी होते. जर एखाद्या जमातीमध्ये एखादी व्यक्ती अथवा गट गुन्हेगारी कृत्यात वारंवार आढळून येत असेल तर त्याचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना करायला पाहिजेत. खरंतर चित्रपटांमधून सामाजिक प्रश्न मांडण्याची, त्याकडे समाजाचे व सरकारचे लक्ष वेधून घेण्याची आजवरची परंपरा आहे परंतु अशा प्रकारे एखाद्या जमातीला गुन्हेगार दाखवून तिची तशी ओळख निर्माण करणे हे खऱ्या कलाकाराचे लक्षण असू शकत नाही

आज दुर्दैवाने स्थिती अत्यंत विषाक्त आहे. देशभरातील भटक्या विमुक्तांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे. परंतु हे असेच चालत राहीले तर याचा अनिष्ट परिणाम होईल. हे अपराधीपणाचे शल्य त्या जमातीतील नवतरुण तरूणींना बोचेल. अशाने सुधारणावादी, शुद्धीकरणवादी व पुरोगामी दिशेने पडणाऱ्या पावलांवर घातक परिणाम होईल. त्यांचे पाय मागे ओढल्यासारखे होईल. यामुळे वाममार्ग सोडून सन्मार्गावर मार्गस्थ होण्याचा संकल्प करून तसा प्रयत्न करणार्‍यांचे मानसिक खच्चीकरण होईल. त्यांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागेल. अशा प्रकारची नकारात्मक ओळख त्या जमातीतील नवनिर्माणाला आणि परिवर्तनाला बाधक ठरेल आणि अशी मानसिकता तयार होईल की "जर गुन्हा न करताही गुन्हेगार समजले जात असेल तर मग गुन्हा केलेले काय वाईट?"

आणि म्हणून जशी गुन्हेगारी कधीच समर्थनीय असू शकत नाही तसेच गुन्हेगारी रक्तात असते ही अविचारी फिलॉसॉफी देखील कधीच समर्थनीय असु शकत नाही. जर एखाद्या जमातीमध्ये अशी विघातकता वारंवार आढळून येत असेल तर त्यामागच्या सामाजिक, मानसिक कारणांचा शोध घेतला पाहिजे. अशांची शैक्षणिक, आर्थिक स्थिती सुधारायला पाहिजे. त्यासाठी सुधारणावादी उपाययोजना करायला पाहिजेत. त्यांची अपरिहार्यता समजून घेऊन तिथे पर्यायव्यवस्था निर्माण केली गेली पाहिजे तरच आपण एक चांगला समाज घडवू शकू, एक विकसित भारत देश घडवू शकु!

टोळ्या टोळयाने राहणारा बावरिया समाज आज रोजी दारिद्र्याच्या, निरक्षरतेच्या, अंधश्रद्धेच्या, असुरक्षिततेच्या व  बेरोजगारीच्या गर्तेत सापडला आहे. त्याला तेथून बाहेर काढण्याऐवजी, त्याच्यावरील कलंकांचे परिमार्जन करण्याऐवजी असे चित्रपट काढून त्यांच्यावर गुन्हेगार म्हणून जाहीर शिक्कामोर्तब होत असेल तर ते अत्यंत घातक आहे. याचे काय चांगले परिणाम होतील?? अशा प्रकारे जर आपण कूळ, जात, वंश, जमात, सांप्रदाय, पंथ अथवा धर्म जन्माने गुन्हेगार सिद्ध करू लागलो तर काय परिस्थिती निर्माण होईल ते परमेश्वरच जाणो परंतु त्या परिस्थितीस व होणाऱ्या परिणामांस सर्वस्वी आपणच  जिम्मेदार असू एवढे निश्‍चित.........

चित्रपटातील ओम बावरियाचे विधान मला खूप अस्वस्थ करते. तो म्हणतो, "मुझे नेकी के नाम से घीन आवे है। क्योंकी एक इन्सान की नेकी को दुसरा इंसान कमजोर समज लेवे है। उसे अपना गुलाम बना लेवे है। न जाने कितनी बिरादरीयाँ बर्बाद हो गई, मुझे एक बेरहम डकैत बनाने में। ओए नही बनना ओए मुझे नेक और  समझदार........"

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
 मो. 9673945092.

Tuesday 16 October 2018

अंबरनाथ आंदोलनास स्थगिती

(अति महत्वाचे)
प्रेस नोट
भटके विमुक्त हक्क परिषदेच्या वतीने आयोजित अंबरनाथ येथील शिधावाटप कार्यालयावरील मोर्चा तूर्तास #स्थगित.
-----------------------------------------------------------------
अंबरनाथ, 16 ऑक्टोबर
अंबरनाथ जि. ठाणे येथील भटके विमुक्त नाथपंथी डवरी गोसावी व इतर भटके-विमुक्त तसेच आदिवासी मागासवर्गीय रेशनकार्ड धारक रितसर लाभार्थी आहेत. मात्र तरीही त्यांना शिधावाटप कार्यालयाकडून अन्नधान्याचे वाटप होत नाही. लाभार्थ्यांची कार्ड्स रद्द करण्यात आली आहेत.

या विरोधात उद्या दिनांक 17 ऑक्टोबर रोजी भटके विमुक्त हक्क परिषद व नाथपंथी डवरी गोसावी भटके-विमुक्त सेवा संस्था अंबरनाथ यांचे वतीने अंबरनाथ येथे सर्कस मैदानापासुन पुरवठा कार्यालयावर भव्य मोर्चा काढून सदर अन्याया विरोधात आंदोलन करण्यात येणार होते. मात्र आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी हक्क परिषदेचे अध्यक्ष श्री. धनंजय ओंबासे, युवा शाखेचे राज्य सचिव श्री. प्रतिक गोसावी आणि हक्क परिषदेचे ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. भिमराव इंगोले यांनी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. गिरीश बापट यांची या पार्श्वभूमीवर मंत्रालयात भेट घेतली. होत असलेला अन्याय मंत्रिमहोदयांना समजून सांगीतला व यात आपण व्यक्तिशः लक्ष घालून होत असलेला अन्याय थांबवावा असे आवाहन करण्यात आले. मंत्री महोदयांना उद्याच्या प्रस्तावित आंदोलनाचीही कल्पना देण्यात आली. तेव्हा माननीय मंत्री महोदयांनी तात्काळ संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून घेतले आणि उद्याच्या उद्या सदर प्रश्न मार्गी लावण्याच्या कडक सूचना केल्या. उद्याच मला हक्क परिषदेच्या नेतृत्वाकडून सदर प्रश्न सुटल्याचा फोन कॉल आला पाहिजे अशा शब्दात अधिकार्‍यास सुनावले.

उद्याच बंद करण्यात आलेली रेशन कार्ड्स सुरू करून द्यावीत व पूर्ववत अन्नधान्याचा पुरवठा सुरू करावा असेही मंत्र्यांनी सांगितले. त्यासाठी उद्याच ठाणे जिल्हा अन्नधान्य पुरवठा कार्यालयाच्या संबंधित अधिका-यांसोबत हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांची सकाळी 11:00 वाजता बैठकही निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे हक्क परिषदेने पुकारलेले उद्याचे आंदोलन तूर्तास #स्थगित करण्यात येत आहे याची सर्व अंबरनाथ तसेच परिसरातील आंदोलक कार्यकर्त्यांनी व समाज बांधवांनी नोंद घ्यावी.

पोटापाण्याचा प्रश्न गांभीर्याने घेऊन तातडीने मार्गी लागल्यामुळे अंबरनाथ येथील भटके विमुक्त आदिवासी मागासवर्गीय लाभार्थी समाजबांधवांना दिलासा मिळाला आहे. त्याबद्दल मंत्री महोदय माननीय गिरीश बापट व संबंधित विभागाचे ओ. एस. डी. श्री. शेख साहेब यांना भटके विमुक्त हक्क परिषद मनःपूर्वक धन्यवाद देते......

(बाळासाहेब धुमाळ)
प्रवक्ता तथा प्रसिद्धीप्रमुख
भटके विमुक्त हक्क परिषद म. रा.
मो. 9673945092.

Monday 15 October 2018

भटके विमुक्त हक्क परिषद म.रा. दादर चिंतन बैठक

प्रेस नोट
भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय विचारमंथन बैठक दादर येथे  संपन्न
-------------------------------------------------------------------------

(दादर, मुंबई)
दिनांक 14 ऑक्टोबर 2018 रोजी यादव गवळी ट्रस्टच्या नायगाव, दादर, मुंबई येथील श्रीकृष्ण हॉलमध्ये सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5:00 या वेळेत "भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य" या भटक्या-विमुक्तांच्या संघटनेच्या राज्य कार्यकारीणीची व राज्यभरातील विविध संघटनांच्या पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्त्यांची विचारमंथन बैठक संपन्न झाली. बैठकीचे अध्यक्षपद संघटनेचे अध्यक्ष श्री. धनंजय ओंबासे यांनी भूषविले तर बैठकीला संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. शंकर माटे, सचिव प्रा.श्री. सखाराम धुमाळ, उपाध्यक्ष श्री. मंगेश सोळुंके, महिला आघाडीच्या राज्यप्रमुख श्रीमती प्रियांका राठोड, शिक्षक आघाडीचे राज्य प्रमुख श्री. कृष्णा जाधव, नाशिक विभागाचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम काळे, उपाध्यक्ष  वसंत गुंजाळ,  साहेबराव गोसावी, सुपडू खेडकर , बी टी मोरे  युवा शाखेचे राज्य सचिव श्री. प्रतीक गोसावी आदी पदाधिका-यांनी मार्गदर्शन केले.

बैठकीस राज्यभरातुन साधारणपणे शंभर कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीची सुरुवात संघटनेचे सचिव प्रा. श्री. सखाराम धुमाळ यांच्या स्फूर्तीगीताने झाली. प्रास्ताविक प्रा सखाराम धुमाळ यांनी केले व हक्क परिषदेच्या सुरुवातीपासूनचा आजपर्यंतचा प्रवास या बाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर शिक्षक आघाडी राज्य प्रमुख श्री कृष्णा जाधव यांनी भटके विमुक्त हक्क परिषदेची उद्धिष्ट , ध्येय, धोरण या बाबत माहिती देऊन पुढील वाटचाल या ध्येय धोरणाला धरूनच असणार असल्याचे  सांगण्यात आले. प्रदेश कोषाध्यक्ष तथा  नाशिक विभाग अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम काळे यांनी  संघटनेची कार्यपद्धती कशी राहील या बाबत माहिती दिली व संघटनेची आचारसंहिता या बाबत माहिती देऊन ती प्रत्येकाने पाळावी असे सर्वानुमते ठरविण्यात आले.  तसेच नाशिक विभागातील धुळे,नंदुरबार, जळगांव, नगर , नाशिक येथे झालेल्या आंदोलनाचा अनुभव सांगितला व नाशिक विभागातून सुरू झालेले हे लक्षवेधी आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होण्यासाठी सर्वानी प्रयन्तशील राहावे असे श्री काळे म्हणाले व सर्वानुमते आचारसंहिता मान्य करण्यात आली असून आचारसंहितेचा भंग भंग होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे सर्वानुमते मान्य करण्यात आले . संघटनेची प्रदेश , विभाग, जिल्हा , तालुका अशी रचना असून त्यात समाविष्ट पदांची रचना मांडण्यात आली शिवाय हक्क परिषदेत महिला आघाडी, शिक्षक आघाडी, युवा आघाडी , वकील परिषद अश्या विविध आघाड्यांची रचना देखील कार्य करीत असल्याचे सांगण्यात आले. भविष्यातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली. राज्यभर करावयाच्या आक्रोश आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यातील म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील (नाशिक विभाग) यशस्वी आंदोलनाचे श्रेय सर्वांनी विभागीय अध्यक्ष श्री. पुरुषोत्तम काळे, श्री. साहेबराव गोसावी श्री. वसंत गुंजाळ, श्री. सुपडू खेडकर , श्री. अशोक महाराज पुरी या सह नाशिक विभागातील सर्व जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांना दिले. सर्वांनी त्यांचा टाळ्यांच्या कडकडाटात गौरव केला.

आंदोलनाचा दुसरा टप्पा पश्चिम महाराष्ट्र ( पुणे विभाग) येथून नवरात्रोत्सवानंतर प्रारंभ करण्याचे ठरले. या टप्प्याची सुरुवात कोल्हापूरपासून करून सांगली, सातारा करीत पुणे येथे भव्य समारोपीय आंदोलन करण्याचे निश्चित झाले. दरम्यान महिला आघाडीच्या वतीने रत्नागिरी येथे  महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा प्रा डॉ प्रियंका राठोड  मा बी टी मोरे एक भव्य लक्षवेधी एक दिवसीय आक्रोश आंदोलन  देखील छेडण्याचे  ठरले.

हक्क परिषदेने  घेतलेला उत्तर महाराष्ट्रात दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे  येथे घेतलेला विभागीय मेळावा, आजवर झालेल्या  गोलमेज परिषदा, आक्रोश आंदोलने, मंत्रालयात अधिका-यांशी व मंत्र्यांशी तसेच लोकप्रतिनिधींशी झालेल्या बैठका यांद्वारे काय साधले? यात कितपत यश वा अपयश आले? यावर साधक बाधक चर्चा झाली. आंदोलनातील सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही बाबींवर विचारविमर्श झाला. आगामी काळात चळवळीत महिलांचा, युवकांचा, नोकरदारांचा, कलावंतांचा तसेच तंत्रज्ञानाचा समावेश वाढविण्यावर एकमत झाले. लवकरच राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस तसेच देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांना भेटून, निवेदन देऊन, चर्चा करून मा.दादा इदाते आयोग लवकरात लवकर लागू करण्यासाठी विनंती करण्याचे बैठकीत निश्चित झाले.

अलीकडच्या काळातील भटक्या-विमुक्तांवरील अत्याचाराच्या घटना जसे की राईनपाडा हत्याकांड, हिंजवडी बलात्कार प्रकरण, श्रीगोंदा महीलेस विवस्त्र करून मारहाण प्रकरण तसेच वारजे भिक्षुक अटक प्रकरण या विविध प्रकरणांमध्ये हक्क परिषदेने कशाप्रकारे पीडितांच्या पाठीशी उभे राहण्याचे भूमिका घेतली यावरही थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला.

त्यानंतर राज्यभरातून आलेल्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपापली थोडक्यात मनोगते व्यक्त केली. यात समाजाचा, इतिहास, सद्यस्थितीतील समस्या, उपाय व चळवळीची दिशा यांवर मतप्रदर्शन झाले. दुपारच्या सत्रात संघटनेत पुढील काळात स्वेच्छेने जबाबदारीपूर्वक सक्रिय राहू इच्छिणाऱ्या क्रियाशील कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना हक्क परिषदेच्या राज्य कार्यकारणीवर, विभागीय कार्यकारणीवर तसेच जिल्हा कार्यकारिणीवर नेमण्यात आले. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात विविध स्तरांवर या कार्यकर्त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या. लगेचच नियुक्तीपत्रे त्यांना प्रदान करण्यात आली.

नियुक्त्यांमध्ये श्री. रामचंद्र जाधव (पश्चिम महाराष्ट्र युवा अध्यक्ष), श्री. वसंत गुंजाळ (प्रदेश संघटक), श्री. साहेबराव गोसावी (प्रदेश संघटक), श्री. सुपडू खेडकर (नाशिक विभागीय संघटक), श्री. अशोक गिरी (नाशिक विभागीय संघटक), श्री. संजय गोसावी (शिक्षक आघाडी नाशिक विभाग प्रमुख), श्री. श्याम शिंदे (प्रदेश संघटक), श्री. अमर करंजे (प्रदेश संघटक), श्री. शिवाजी भिसे (मुंबई उपनगरीय संघटक), श्री. मल्लू पवार (नाशिक विभागीय संघटक), श्री. शिवाजी गिरी (युवा जिल्हाध्यक्ष बीड), श्री. रामकृष्ण मोरे (नंदूरबार जिल्हाध्यक्ष),  श्री. दिपक वनारसे (कार्यालय प्रमुख), श्री. जयराज भाट ( प्रदेश संघटक), श्री. शिवदास वाघमोडे (नाशिक विभाग संघटक), श्री. शंकरराव कोळेकर (प्रदेश संघटक), श्री. बळीराम महाडिक (प्रदेश संघटक), श्री. गोपीचंद इंगळे(नाशिक विभागीय संघटक), श्री. बापू डुकरे (अंबरनाथ शहराध्यक्ष), श्रीमती भाग्यश्री प्रमोद (महिला संघटक),  श्री. दत्तात्रय मोरे (मुंबई कामगार संघटक), श्री. नारायण सीताराम खेडेकर (मुंबई शहर उपाध्यक्ष), श्री. हनुमंत शेगर (अंबरनाथ शहर उपाध्यक्ष), श्री. अशोक गायकर (मुंबई प्रदेश संघटक) श्री. राकेश तमाचेकर (नंदुरबार जिल्हा संघटक), श्री. साहेबराव कुमावत (प्रदेश संघटक)इत्यादी पदाधिकाऱ्यांना नियुक्त्या व नियुक्तीपत्रे देण्यात आली.

बैठकीच्या शेवटी अध्यक्ष श्री. धनंजय ओंबासे यांनी सर्वांना सर्व शक्तीनिशी राग, लोभ, द्वेष, मत्सर, स्वार्थ, मीपणा, मोठेपणा बाजूला ठेवून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. जे जे भटक्या विमुक्तांचे कार्य करतील, जेव्हा जेव्हा आपणास आवाज देतील तेव्हा तेव्हा राज्यातील हक्क परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन केले. दि. 21ऑक्टोबर 2018 रोजी बोरिवली, मुंबई येथे मा. दादा इदाते यांच्या अध्यक्षतेखाली भटक्या विमुक्तांची राज्यस्तरीय विचार मंथन बैठक होत असून हक्क परिषदेस त्या बाबतच निरोप आला आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे असे श्री. ओंबासे म्हणाले.

संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. शंकर माटे यांनी आपल्या समारोपीय मार्गदर्शनात सांगीतले की कार्यकर्त्यांनी भाषणबाजीवर जास्त जोर न देता कार्यावर अधिक लक्ष द्यावे. ते म्हणाले की, मा. दादा इधाते आयोग मंजूर करून घेणे हेच आपले उद्धिष्ट असुन त्यासाठी समर्पित भावनेतून काम करण्याचा सर्वांनी निर्धार करावा. तसेच लवकरच मा. मुख्यमंत्र्यांची व मा. पंतप्रधानांची भेट घेण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले. अखेरीस प्रदेश उपाध्यक्ष श्री. मंगेश सोलंकी यांनी सर्वांचे आभार मानले व राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप झाला.

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
प्रवक्ता तथा प्रसिद्धीप्रमुख
भटके विमुक्त हक्क परिषद म.रा.
मो. 9673945092.

Saturday 13 October 2018

आक्रोश

भटके विमुक्तांचे (VJNT) राज्यव्यापी आक्रोश आंदोलन:⚡️🔥
मित्रांनो लोकशाहीमध्ये बहुसंख्यांकांना काहीसे झुकते माप असते. अल्पसंख्यांकडे दुर्लक्ष केले जाते. विशेष म्हणजे हे दुर्लक्ष जाणीवपूर्वक केले जाते कारण संख्यात्मकता ही लोकशाहीची ओळख बनली आहे. कटु वास्तव हे आहे की आज जो समाजघटक संख्यात्मकदृष्ट्या मोठा असेल, राजकारणी, शासन आणि प्रशासन त्यांचेच प्रश्न प्राधान्याने सोडवतात! वास्तविक पाहता असे व्हायला नको आहे. ज्यांच्या प्रश्नात सत्यता आहे, आर्तता आहे, गंभीरता आहे त्यांचे प्रश्न शासनकर्त्यांनी प्राधान्याने सोडवायला हवेत. हिच मानवतेची शिकवण आहे व नैतिकतेचे सुत्र आहे.

परंतु भटक्या विमुक्त लोकांचे प्रश्न वर्षोनुवर्षे रखडलेलेच आहेत. इंग्रजांच्या राजवटीत तर ते अधिकच तीव्र झाले व स्वतंत्र भारतात राजकारणापलीकडे, राजकीय पक्ष विचारच करताना दिसत नाहीत. भटक्या विमुक्त जमाती संघटित नाहीत. आपली स्थिती जरी बिकट असली, प्रश्न जरी तिव्र व रास्त असले तरी व आजवर आपण वेळोवेळी शासन दरबारी ते मांडलेही असले तरी अद्यापही सुटले नाहीत. तसे ते हवे तेवढ्या प्रभावीपणे मांडलेच गेले नाहीत हे ही वास्तव आहे. मांडणारांनी पुरेपूर प्रयत्न केला परंतु जनसामान्यांचे पाठबळ हवे तेवढे लाभले नाही. भटक्या-विमुक्तांच्या जमातीय संघटना तसेच जमातींच्या मिळून भटके विमुक्त शिर्षकाखाली काम करणाऱ्या अनेक संघटना आहेत. परिणामी आपली शक्ती विभागली गेली आहे. आपापसात समन्वय नाही, निश्चित ध्येयधोरण नाही. नियोजनबद्धता व रणनीती नाही. एकमेकांना सहकार्य तर सोडाच विरोध कसा करता येईल हेच आपण आजवर पाहिले आहे!! त्यामुळे एकीचे बळ कधी दिसुनच आले नाही ही शोकांतिका आहे.

चळवळीत सूर्य उगवणे गरजेचे असावे, आरवणारा कोंबडा कोणाचा का असेना! शिवाय भटक्या-विमुक्तांच्या समस्या सोडविण्याची चळवळ ही केवळ आणि केवळ प्रश्नांशी बांधिलकी जपणारी असावी, कोणा राजकीय पक्षाशी अथवा विचारधारेशी किंवा गटातटाशी चळवळीचे काहीही देणे-घेणे नसावे हे अद्यापही आपल्या लक्षात आलेले नाही. छोटे मोठे मेळावे भरवणे, स्थानिक नेत्यांवर प्रभाव पाडून लहान सहान वैयक्तिक व सामाजिक कामे करून घेणे यापलीकडे संघटीततेचा काहीही फायदा झाला नाही.  आपले राज्यस्तरीय व देशस्तरीय प्रश्न अनुत्तरितचे अनुत्तरीतच राहिले! दुर्दैवाने आपल्यात अनेक गटतट असल्याने व प्रत्येकामध्ये काहीसा अहंकार, काहीसा मी पणा दाटल्याने प्रत्येक जण स्वतःला शहाणा समजतो, मोठा समजतो व आपल्या शिवाय चळवळीचे हे प्रश्न सुटूच शकत नाहीत अशा काल्पनिक आविर्भावात गुंतून जातो. परिणामी नाही म्हटले तरी चळवळ मंदावते कारण चळवळ म्हणजे विशिष्ट ध्येयप्राप्तीसाठी केलेला सार्वजनिक लढा! याला सार्वजनिक स्वरूप प्राप्त होत नाही!

आज रोजी स्थिती इतकी बिकट आहे की, भटक्या विमुक्तांमध्ये म्हणजे व्हीजेएनटीमध्ये बुद्धिवादी लोकांची कमी नाही परंतु त्या बुद्धीचा उपयोग चळवळीसाठी होताना दिसत नाही. प्रत्यक्ष जमीन पातळीवर तन-मन-धनाने सक्रियरित्या काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची कमी नाही परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रसंगी पाठबळ मिळताना दिसत नाही. काही ध्येयवेडे लोक सर्वांना एकत्रित करून एकसंघपणे लढा उभारत आहेत मात्र त्यात लोक व संघटना सामील होताना दिसत नाहीत. आडपाय घालणे, खाली खेचणे या प्रव्रुत्तीमुळे समाजाचे अगणित नुकसान होत आहे.

आता हेच बघा ना, आपल्याला सामाजिक संरक्षण नाहीये. आपल्या बांधवांवर व माता भगिनींवर होणार्‍या अन्याय अत्याचाराची शृंखला संपता संपत नाहीये. शासन आपला आवाज ऐकत नाहीये कारण आपल्या आवाजात ताकदच नाहीये. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे इतरांना ज्ञान शिकविणारा आपला समाज, पक्षांचा थवा, जनावरांचा कळप, मधमाशांचे पोळे, मुंग्यांचे वारूळ , उसाची मोळी यांचा आणि एकजुटीचा काय संबंध आहे? आणि एकजुटीचा व अन्याय प्रतिकाराचा काय संबंध आहे? हे समजतो, इतरांना सांगतो परंतु स्वतःवर वेळ आली की समूहापासून चळवळीपासून अलिप्त राहतो! अन्याय आहे, अत्याचार आहे, शोषण आहे, निरक्षरता आहे, दारिद्र्य आहे, दुर्लक्ष आहे तरी एकजुट नाही!! गांभीर्य नाही, संरक्षण नाही, घटनात्मक आरक्षण नाही, निश्चित ध्येयधोरण नाही, उपाय योजना नाहीत, तरीही गर्व अहंकार आहे!! अजब आहे ना? अहो अशाने प्रश्न सुटतील कसे?

आपल्यातील काही महाभाग आहेतही असे की त्यांचे काही प्रश्नच नाहीत परंतु त्यांनी एवढे समजून घ्यावे की आपल्या पिढीचे प्रश्न संपले म्हणजे सर्व प्रश्न संपले असे नाही. पुढच्या पिढीचे काय आपण शिकले, सुधारले म्हणजे झाले का? आपली काही सामाजिक बांधिलकी नसावी काय? आपला पैसा नसु द्या परंतु आपली बुद्धी व आपला अनुभव ही समाजाची व चळवळीची संपत्ती आहे! ती अशी वाया घालवू नका. आपल्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, प्रश्न हाताळण्याची हातोटी आहे, समाजाला संघटित करुन सुयोग्य दिशा देण्याची क्षमता आहे, नेतृत्व करण्याची योग्यता आहे त्यामुळे चळवळीपासून अलिप्त राहू नका. आपले दैनंदिन कारभार सांभाळत थोडा वेळ आपल्या समाज बांधवांसाठी द्या. मित्रांनो समाजाला आर्थिक मदत करून प्रश्न सुटत नसतात उलट अशाने माणूस आळशी बनतो परंतु जाणीव जागृती करणे, मार्गदर्शन करणे, उद्बोधन व प्रबोधन करणे, स्वाभिमान जागा करणे, शासनाचे लक्ष वेधून घेणे, शासनाला समाजाच्या समस्यांच्या निराकरणासाठी समाजहीताचे निर्णय घ्यायला भाग पाडणे अशाने एक तर प्रश्न निर्माणच होत नाहीत आणि झालेले सुटल्याशिवाय राहत नाहीत.

भटक्या विमुक्तांना उठावाची अत्यंत प्राचीन पार्श्वभूमी आहे आता पुन्हा एकदा संघटित होऊन उठाव करण्याची वेळ आली आहे. किमान महाराष्ट्रात तरी भटके विमुक्त हक्क परिषद नियोजनबद्धपणे व सर्व जमातींना एकत्रित करून, सोबत घेऊन, संघटितपणे कागदोपत्री व रस्त्यांवर अशा दोन्ही पातळ्यांवर यशस्वीरित्या लढा उभारताना दिसत आहे. भटक्या-विमुक्तांची एक मध्यवर्ती संघटना म्हणून नावारुपास येत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपापले वैयक्तिक हित, मतभेद व गर्व अहंकार काही काळासाठी बाजूला ठेवून केवळ भटके विमुक्त म्हणून हक्क परिषदेच्या हाकेला ओ देवून राज्यव्यापी आक्रोश आंदोलनात सर्व शक्तीनिशी सामील व्हावे असे मला वाटते.

कोणीतरी दिव्य नेता निर्माण होईल! तो आपले प्रश्न शासनदरबारी मांडील व शासन आपले प्रश्न सोडविल अशा भ्रमात कोणीही राहू नये. आपले प्रश्न आपल्यालाच सोडवावे लागणार आहेत. त्याकरिता माणसे जागी करावीत, चळवळीशी जोडावीत, ध्येयाने प्रेरित करावीत व उद्दिष्टाशी बांधावीत असे मला वाटते. कारण या जगात विना सायास काहीही मिळत नाही. अगदी आई देखील आपल्या बाळाला रडल्या शिवाय दूध पाजत नाही! एकदा वेळ निघून गेल्यावर आक्रोश करून काही साध्य होत नसते. तेव्हा शहाण्यास अधिक बोलणे न लगे, सर्वांनी जागे व्हावे एकजूट व्हावे व संघर्ष करावा. अशक्त व लाचार लोक अन्यायापुढे मान झुकवितात तर सशक्त व स्वाभिमानी लोक अन्यायाविरुद्ध आंदोलन उभे करतात.

भटके विमुक्त हक्क परिषदेच्या राज्यव्यापी आक्रोश आंदोलनाचा पहिला टप्पा नाशिक विभागात पार पडला आहे. विभागातील धुळे, नंदुरबार, अहमदनगर, जळगाव व नाशिक या पाच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर वेगवेगळ्या दिवशी एक दिवसीय आक्रोश आंदोलन यशस्वीपणे पार पडले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात पुणे विभागातील सातारा, सांगली, कोल्हापूर व पुणे येथे आंदोलन होणार आहे. पहिल्या टप्प्यातील आंदोलनात सर्व 52 जमातींच्या सर्व संघटनांनी, कार्यकर्त्यांनी व विशेष म्हणजे कलावंत व महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. काही बिगर भटके विमुक्त संघटनांनी आंदोलनाला बिनशर्त जाहीर पाठींबा दिला. प्रसार माध्यमांनी पुरेपूर सहकार्य केले. त्यामुळे आता पुढील टप्प्यातील आंदोलन करण्यासाठी तयारीला लागा. लोकांना कल्पना द्या वातावरण तयार करा.

आपल्यापैकी अनेक जण आपापल्या जमातीत, जमातीय संघटनांचे पदाधिकारी आहेत. अनेक जण भटक्या-विमुक्तांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या अशा हक्क परिषदेसारख्या एखाद्या संघटनेचे पदाधिकारी आहेत परंतु या संघटना म्हणजे राजकीय पक्ष नाहीत आणि जरी काही संघटना राजकीय पक्षांची प्रेरित व प्रभावित असतील तरी मला वाटते. आपला समाज व आपल्या समस्या आणि राजकीय पक्ष यांचा काहीही परस्पर संबंध नसावा. प्रश्नांच्या अनुषंगाने आपण कोणीही असलो, कुठेही असलो, आंदोलनाचे आयोजक संयोजक कोणीही असले तरी एकत्र यायलाच हवे.

दुसरी गोष्ट म्हणजे ज्यांना कुणाला हक्क परिषदेमध्ये राज्य स्तरावर, विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर, शहर स्तरावर अथवा तालुकास्तरावर पद घेऊन खरोखरच जिम्मेदारी सांभाळायची आहे, ज्यांची सर्वांना सोबत घेऊन कार्य करण्याची क्षमता आहे, काम करण्याची तयारी आहे, त्यांनी तशी इच्छा व्यक्त करायला हवी.  हक्क परिषद हे एक बिगरराजकीय, निस्वार्थी व पारदर्शक संघटन आहे. यात प्रत्येक स्त्री-पुरुषाला, प्रत्येकाच्या विचारांना व नेतृत्वगुणांना महत्त्व आहे. त्यांच्या उन्नतीस वाव आहे. आपल्यातील नेतृत्व क्षमता ही भटक्या विमुक्त जमातींची मालमत्ता आहे. तीचा विकास होणे, करणे काळाची गरज आहे.

मित्रांनो, मला जे बोलायचे ते मी बोललो. सदस्य होण्याची सक्ती नाही.पद घ्याच असा अट्टाहास नाही. इच्छुकांची कमी नाही परंतु सक्षम व लायक व्यक्तींची कोणत्याही संघटनेला आवश्यकता असते. त्यामुळे चळवळ भक्कम बनते. संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळायला हवी ज्यांच्या अंगी क्षमता असेल. नेतृत्वाची क्षमता असणारी माणसे कधीही मागे राहू नयेत म्हणुन हे नम्र आवाहन. असो सदस्य बनणे, पदाधिकारी बनणे ऐच्छिक आहे. आपण कुठल्या ना कुठल्या संघटनेचे सदस्य अथवा पदाधिकारी आहात म्हणजे आपण चळवळीतच आहात. त्यामुळे काहीही करा आणि हे राज्यव्यापी आक्रोश आंदोलन प्रभावी व परिणामकारक कसे होईल? यासाठी सर्वांनी संपूर्ण ताकदीनिशी तयारीला लागा.
धन्यवाद!!🙏

(बाळासाहेब सिताराम धुमाळ)
 मो. 9673945092.

दुर्दैवी भटकंती

दुर्दैवी भटकंती

"मराठवाड्यात पाऊस नाही म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी आम्हाला गावोगावी हिंडावे लागतेय. एवढे कष्ट करून आमच्या मुली चांगल्या शकतील व सर्व चित्र बदलतील असे वाटत होते पण माझ्या लेकींवर बलात्कार झाल्याने आम्ही पूर्ण उद्ध्वस्त झालोय" हे करुण व आर्त उद्गार आहेत दुर्देवी पीडित मुलींच्या दुःखी भयभीत आणि हताश आईचे!!!😓

पुण्याच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील हिंजवडी या उच्चभ्रु आयटी परिसरात रविवार दिनांक 16 सप्टेंबर 2018 रोजी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दोन बारा वर्षांच्या अल्पवयीन बहिणींवर चॉकलेटचे आमिष दाखवून पाशवी बलात्कार करण्यात आला. गणेश निकम व त्याच्या 16 वर्षीय साथीदाराने त्यांना मंदिरामागील झाडीत नेऊन त्यांच्यावर आळीपाळीने बलात्कार केला शिवाय कोणाला सांगाल तर याद राखा म्हणून धमकावले.

मात्र दोन-तीन दिवसांनंतर बुधवारी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दवाखान्यात ऍडमिट करण्यात आले. दुर्दैवाने उपचारादरम्यान त्यांच्यातील एकीचा मृत्यू झाला आहे व दुसरी देखील गंभीर आहे. घटना उघड झाल्यानंतर आईने पोलिसात धाव घेतली आणि पोलिसांनी नराधम गणेश निकम व त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले आहे. दुर्दैवी पीडित कुटुंब मराठवाड्यातील वंजारी या भटक्या जमातीचे आहे. तर नराधम गणेश निकम हा जळगाव जिल्ह्यातील आहे.

सदर कुटुंब ऊसतोड कामगार आहे. ते अत्यंत असुरक्षित आहे. " माझी एक मुलगी तर गेली मात्र आता दुसऱ्या मुलीचे लग्न होईल की नाही याची मला चिंता वाटते" हे हृदयाचा ठाव घेणारे उद्गार आहेत त्या दुःखी मातेचे जीच्या गरीबी व भटकंतीमुळे तीच्या मुलींवर हा अमानुष प्रसंग ओढावला.

मला अजिबात आश्चर्य वाटत नाही की या प्रकरणाची कुठल्याही मुख्य मिडियाने विशेष दखल का घेतली नाही? अथवा लोकप्रतिनिधी राजकारणी गणेश मंडळात मतदारांना आकर्षित करण्यात एवढे का दंग आहेत की त्यांना त्यांच्या आजुबाजुला काय चाललेय याचीच खबरबात नाही?

मला एतकिंचितही विचारावेसे वाटत नाही की एरवी बातम्या झापुन आणणारे स्त्रीवादी समाजसेवक आता काय झोपा काढत आहेत काय? एवढे सारे भटक्या विमुक्तांचे विविध राजकीय पक्षात लोकप्रतिनिधी व पुढारी आहेत त्यांचे मन एवढे कसे काय मरू शकते??

कारण आपल्याकडे दुर्दैवाने बलात्कारासारखी गंभीर घटना देखील जात, धर्म, भाषा, पक्ष, पैसा, स्थानिक, विस्थापित असे निकष लावून गंभीर अथवा सौम्य ठरवली जाते. हे कटु असले तरी सत्य आहे. त्यामुळे माझ्यासारखाच प्रत्येक बहीणींचा भाऊ व लेकींचा बाप अस्वस्थ आहे.

त्यामुळे मी प्रत्येक बापाला, प्रत्येक भावाला आणि भटक्या विमुक्तांच्या सर्व संघटनांना, कार्यकर्त्यांना नम्र आवाहन करतो की या दुःखी पिढीत व असुरक्षित कुटुंबाला धिर देण्यासाठी आणि त्या दुर्दैवी अत्याचारग्रस्त एका मयत व दुसऱ्या मृत्यूशी सामना करत असलेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरून सदर घटनेचा तीव्र निषेध नोंदवावा व गुन्हेगार नराधमांना लवकरात लवकर तथा कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आपापल्या पद्धतीने सरकारवर दबाव वाढवावा....🙏

(बाळासाहेब धुमाळ)
मो. 9673945092.

वैष्णव बापुः


वैष्णव बापू....
बापुजींचे अर्थात म. गांधीजींचे वास्तववादी तत्वज्ञान म्हणजे सत्य, अहिंसा, प्रेम, विश्वास, समता, मानवता, सत्याग्रह, स्वदेशी, साधेपणा, वक्तशीरपणा, श्रमप्रतिष्ठा, स्वदेशनिष्ठा, सविनय आंदोलन, सत्याग्रह, कृषीप्रधानता, ग्रामविकास, मुलोद्योगी शिक्षण प्रणाली, महीला सबलीकरण, जातीवाद व अस्पृश्यता निर्मूलन, सेवाभाव, स्वच्छता, स्वावलंबन, प्रामाणिकपणा, शाकाहार, ब्रम्हचर्य! हे तुम्हा-माझ्या सारख्याच्या कल्पनेपलीकडील आहे. तरीही काही बिनडोक व अक्कल शुन्य महाभाग मात्र आपली दिड दमडीची बुद्धी वापरून या महामानवाला मुर्ख समजतात, कमी लेखतात! बापु चांगले नव्हते म्हणतात!!!

ते बापु ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढा अहिंसक मार्गाने लढला व जिंकून दाखविला!! एक जादुई माणुस ज्याच्याकडे माणसे आपसूक आकर्षित होत असत. त्यांच्या साधी राहाणी अत्युच्च विचारसरणीमुळे जगभरात त्यांचे करोडो अनुयायी आहेत. मुळ भारतीय सांस्कृतिक मूल्ये ज्यांच्या रोमारोमात विराजमान होते. इतरांच्या धर्माचा आदर करणारे एक सच्चे हिंदू असणारे बापुजी, कट्टरतावाद्यांच्या दृष्टीने नालायक ठरणारच ना..

ज्यांना दक्षिण आफ्रिकेत महात्मा म्हणतात! भारतात ज्यांना राष्ट्रपिता म्हणतात! सर्वसामान्य लोक ज्यांना प्रेमाने बापु म्हणतात! युनो ज्यांना man of the millennium म्हणते!! ज्यांचे असंख्य शिष्ये तत्वज्ञानाच्या अवकाशातील लखलखते तारे राहीले व आहेत त्या विचारसुर्याला राजकारणातले काही कळले नाही असे म्हणणा-या आणि विचारांचे ध्रुवीकरण झालेल्या पुर्वग्रह दुषित नालायकांना बापु लायक कसे काय वाटतील???

पद, पैसा व प्रतिष्ठेचा दुरान्वयेही मोह नसलेल्या महात्म्याला धन व राजकारणाचा बेसुमार हव्यास असणारेच जेव्हा हिन लेखतात तेव्हा त्यांना गांधीवाद म्हणजे काय हे विचारण्यात काय अर्थ आहे? 
गाढवांपुढे गीता वाचण्यात काय अर्थ आहे? जग क्रोधाने नव्हे तर प्रेमाने जिंकता येते हे ज्यांनी जगाला शिकविले ते प्रसन्नतेचे पुजारी बापु, या अशा बदमाशांमुळे बदनाम होत आहेत.

एखाद्याशी वैचारिक मतभेद समजले जाऊ शकतात. बापुंचे व तत्कालीन काही नेत्यांचे विचारवंतांचे परस्परांशी मतभेद होते मात्र शेवटी ते सर्वचजण बापूंना आदर्श मानतात. मात्र आताचे काही मिश्रविचारी लोक बापुंवर खालच्या स्तराला (अर्थात स्वतःच्याच) जाऊन टिका करतात, चिखलफेक करतात, कमेंट्स करतात, जोक्स करतात तेव्हा मला खुप वाईट वाटते. म्हणजे मला कळत नाही, सव्वाशे वर्षे ज्यांचे विचार मानवजातीला तारत आहेत ते गांधीजी मुल्यहीन कसे काय असु शकतात??

चला मला एवढे समजायला जास्त वेळ लागत नाही की जो राजकीयदृष्ट्या, धार्मिक द्रुष्ट्या, वैचारिक द्रुष्ट्या उदासीन (न्युट्रल) राहतो, तो शेवटी एकटा पडतो. गांधींनी सर्वांसाठी कार्य केले, सर्वांसाठी विचार मांडले पण शेवटी गांधी कुणाचे? असे म्हणायची वेळ आली. एक मात्र नक्की की गांधींना कितीही बदनाम करण्याचा आणि नियोजनपूर्वक संपविण्याचा प्रयत्न केला तरी असा नथुराम गोडसे जन्माला येऊच शकत नाही जो गांधी विचार संपवू शकेल. कारण बापू माणसाच्या मनामनात आसनस्थ आहेत.

मला वाटते ज्यांना बापूंचे केसविरहीत डोके तर दिसते परंतू डोक्यातील अमुल्य विचार समजत नाहीत, साधा चष्मा तर दिसतो पण त्यांची दुरद्रुष्टी व प्रेमदृष्टी दिसत नाही, खादीचा धोती-पंचा तर दिसतो पण त्यातील बेडागपणा साधेपणा स्वावलंबन व स्वदेशप्रेम दिसत नाही, त्यांची आधाराची काठी तर दिसते पण त्यांनी त्याच काठीच्या आधाराने भारतीय स्वातंत्र्यसैनिकांना कसा आधार दिला ते दिसत नाही, त्यांची किरकोळ देहयष्टी तर दिसते पण त्यातील पोलादी द्रुढनिश्चय दिसत नाही, त्यांना समजावण्यात आणि आपलाच वेळ खर्च करण्यात काय अर्थ आहे????

म्हणून महामानव, युगपुरुष, युगप्रवर्तक, राष्ट्रपिता, महात्मा गांधी यांना एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्व गांधीवादी भावाबहीणींना मनःपूर्वक शुभेच्छा🌷 आणि जे बापूंना नावे ठेवतात त्यांनी दररोज सकाळी महात्मा गांधींजींचे अत्यंत आवडते असे संत नरसिंह मेहता यांचे गुजराती भजन जे त्यांच्या नित्य प्रभात प्रार्थनांमधील अविभाज्य घटक होते ते, "वैष्णव जन तो तेने कहिये..." हे भजन नक्की वाचावे व ऐकावे! विचारात फरक पडेल!.बाकी जास्त बोलण्यात काही अर्थ नाही कारण बापूच म्हटलेत, मौनं सर्वार्थ साधनं!!

‘वैष्णव जन तो तेने रे कहिए जे पीड़ पराई जाणे रे।
(खरा वैष्णव तोच आहे, जो दूस-याचे दुःख समझू शकतो) 

‘पर दु:खे उपकार करे तोये, मन अभिमान ना आणे रे1॥’ 
(दूस-याच्या दु:खावर जर उपकार केले, तर आपल्या मनात कसलाही अभिमान येऊ देत नाही)

‘सकल लोक मां सहुने वन्दे, निंदा न करे केनी रे।’
(जो सर्वांचा सम्मान करील आणि कुणाचीही निंदा करणार नाही)

 ‘वाच काछ मन निश्छल राखे, धन धन जननी तेनी रे॥2॥’
(जो आपली वाणी, कर्म आणि मन निश्छल रखील, त्याची आई धन्य-धन्य आहे)

‘समदृष्टि ने तृष्णा त्यागी परस्त्री जेने मात रे।’
(जो सर्वांना समान दृष्टिने पाहील, सांसारिक तृष्णेपासुन मुक्त होईल,  परस्त्रीला आपली आई समझील)

‘जिह्वा थकी असत्य न बोले, पर धन नव झाले हाथ रे॥3॥’
(ज्याची जिभ असत्य बोलताना थांबेल व जो दूस-याचे धन मिळविण्याची इच्छा बाळगणार नाही)

'मोह माया व्यापे नहिं जेने दृढ़ वैराग्य जेना मन मां रे।’
(जो मोह मायामध्ये गुरफटणार नाही, ज्याच्या मनात दृढ़ वैराग्य असेल)

’राम नाम शु ताली रे लागी, सकल तीरथ तेना तनमां रे॥4॥’
(जो प्रत्येक क्षणाला मनात राम नामाचा जप करतो, त्याच्या शरीरात सर्व तीर्थ विद्यमान असतात)

‘वणलोभी ने कपट रहित छे, काम क्रोध निवार्या रे।’
(ज्याने लोभ, कपट, काम आणि क्रोधावर विजय प्राप्त केला असेल)

‘भणे नरसैयो तेनु दर्शन करतां, कुल एकोतेर तार्या रे॥5॥’
(अशा वैष्णवाचे केवळ दर्शन घेतले तरी, त्याच्या परिवाराच्या एकाहत्तर पिढ्या तरून जातात)

(बाळासाहेब धुमाळ)

परोगामित्व

पुरोगामीत्वः 
कालपासून महीलांच्या रंगीत साड्यांवर फार पोष्ट्स फिरताना दिसत आहेत सोशल मीडियावर. महीलांना सावित्रीबाई फुलेंची आठवण करून दिली जात आहे. आज तर काही महाभागांना कावीळ झाल्यासारखं वाटत होतं म्हणे! कारण काय तर आज सगळं पिवळं पिवळंच दिसत होतं!!

माता सावित्रीबाईची आठवण येणे चांगलेच पण सावित्रीबाई फुलेंची आठवण आजच कशी काय झाली? एरवी क्रांतीज्योतीची जयंती पुण्यतिथी कधी येते आणि कधी जाते तेही समजत नाही! तेव्हा का नाही येत आठवण?

मला कळत नाही, धार्मिक व श्रद्धाळु असणे, पारंपरिक सण उत्सव साजरे करणे हे सुशिक्षित, पुरोगामी व विज्ञानवादी नसल्याचे लक्षण दाखवून काही लोक आपल्या नसलेल्या बुद्धीचा प्रकाश पाडण्याचा का प्रयत्न करतात???

अरे बाबांनो उच्चशिक्षित, विज्ञाननिष्ठ, तत्वज्ञानी, कवी, लेखक, प्रबोधक हे आपापले धर्म चालीरीती रूढी परंपरा पाळत असतील, सण उत्सव साजरे करत असतील तर त्यांना मुर्ख कसे काय ठरवू शकता तुम्ही??

जगातील जवळजवळ प्रत्येकजण धार्मिक व श्रद्धाळु आहे. मग जग काय नालायकच आहे?? जर धार्मिकतेतुन, श्रद्धेतुन वैयक्तिक  असो की सामाजिक असो, शारिरीक, मानसिक, आर्थिक नुकसान होत नसेल तर माणसाने जर श्रद्धाळु का असु नये?? प्रत्येक माणसाला आपल्या जाती धर्माचा, रितीरिवाजांचा, सण उत्सवांचा, प्रतिकांचा, परंपरांचा आणि अस्मितांचा अभिमान असतोच की?? तुम्हाला का वाटते असु नये??

योग्य अयोग्य ठरविण्याचा, प्रमाणित करण्याचा, कुणाच्या भावना दुखविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?? इतरांवर टिका टिप्पणी करताना, फालतु कमेंट्स आणि बाष्कळ विनोद करताना आपापल्या अंतर्मनात डोकावून पहा जरा. आपले वर्तन, विचार कसे आहेत?? किती शुद्ध, शितल, सौम्य, सभ्य, मानवतावादी, पुरोगामी आहेत ते!! 

तुम्हाला जसे वागायचे तसे वागा परंतु इतरांनी कसे वागायचे ते त्यांना ठरवू द्या प्लीज. नाही परिवर्तन, प्रबोधन, उद्बोधन मी समजू शकतो परंतु ज्या मुद्यांत काही दम नाही, काही अर्थ नाही, काही नुकसान नाही असे मुद्दे समोर करून उगाच कोणाच्या भावना दुखावल्या म्हणजे तुम्ही पुरोगामी वा विज्ञानवादी ठरत नाहीत.

महीलांनी विविध रंगांच्या साड्या नेसलेल्या तुम्हांला आवडत नाही. हे तुम्हाला रूचत पचत नाही आणि डीजेच्या तालावर लग्न कार्यात, पार्ट्यात नाचणं चालतं?? तुमचीही एखादी रंगीत ओळख असेलच ना?? फॅशन शो मध्ये स्वतः कमी कपड्यात वॉक करणं, आपल्या लेकरांना फॅशनप्रमाणे सजवणं धजवणं चालतं?? तुमच्या बायका पोरिंनी तुमच्या तुमच्या सणांना जयंत्यांना तंग कपडे घातलेलं चालतं? आम्ही घालत नाहीत म्हणायची आहे हिंमत?? नाही ना? मग जिन्स टि शर्टपेक्षा साडी खराब!! वा रे पुरोगामित्व!!!!!!!!

(बाळासाहेब धुमाळ)
मो. 9421863725.

देव

देवः
दर्शन रांगेत श्रद्धाळुंच्या
घाम अंगातून गळतो!
खास भक्तांना विनाअडथळा
थेट प्रसाद मिळतो!!

देवबी आता भक्तांच्या
खिश्यानुरुप आशिर्वाद देतोय!
हात वर करण्यासाठी
टेबलाखालुन घेतोय!!

अनवाणी आडाणी गरिब
भक्त बिचारा उपाशी!
घरात दाटला अंधार
देवाला आरती तुपाची!!

रिकाम्या हाती आलेलं
देवाला आवडत नाही!
दक्षणा देणा-याला
कुणीच आडवत नाही!!

भाव भक्तीनं घ्यावं दर्शन
दुःख सांगावं आयुष्याचं!
देवच गुतलाय हिशेबात
नियोजन करीत भविष्याचं!!

त्यानं तरी का दरिद्री रहावं
पानफुलात खुश अखेर?
लक्ष्मीही सदा पार्वती
माणुसच तेवढा कुबेर?

अलंकार वस्त्रे दिल्यानं
पण देव कसा पावल?
दम दावुन धनाचा
देव संकटी धावल?

दान देणं त्यांच काम
कर्म करणं आपलं.
निर्विकार मनात कधी
पाप नाही वापलं.

त्याला लागत असता तर
प्राणही वाहीला असता!
घेत असता सारं तो तर
देवळात पुजारी नसता!!

त्याच्या नावं व्यापार
चालतो असं वाटतं.
दफ्तरी त्याच्या सारं
खाती तुझ्या साठतं.

(बाळासाहेब धुमाळ)
मो. 9421863725