Sunday 22 April 2018

बलात्कारः एक अमानवी कृत्य

बलात्कारः एक अमानवी कृत्य

मित्रांनो अलिकडच्या काळात मुली महीलांवरील वाढते बलात्कार व हत्या यामुळे अवघा देश ढवळून निघाला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर आपल्या देशाची नाचक्की होत आहे. आदर्श संस्कृती व संम्रुद्ध परंपरा लाभलेल्या या देशात स्त्रीयांना अत्यंत पवित्र नजरेने पाहीले जात आले आहे. मात्र आता कठुआ, उन्नाव, इंदोर येथील बलात्कार प्रकरणानंतर असे वाटायला लागले आहे की देशातील मानवता संपुष्टात आली आहे की काय? कारण बलात्कार अगदी कोवळ्या जिवांवरही होत आहेत व वृद्धांवरही!! तसेच ते अगदी किशोरवयीन शाळकरी मुलांकडुनही होत आहेत, तरुणांकडूनही होत आहेत व वृद्धांकडुनही!! आडाणी असोत अथवा सुशिक्षित कोणीच अपवाद नाहीत. तसेच ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात हा घानेरडा व चिड निर्माण करणारा प्रकार घडताना दिसत आहे. असे प्रकार अलिकडे जवळजवळ दररोज घडत आहेत. काही उघड होतात तर काही उघड होत नाहीत. तपास यंत्रणांनी यांच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा करायला हवी व यापुढे असे होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सर्व स्तरातून आवाज उठत आहेत.
आपल्या देशात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. शिक्षेची भीती वाटेनाशी झाली आहे. कारण शिक्षा कठोर नाहीत. गुन्हेगाराला एखाद्या न्यायालयाने एकदा शिक्षा सुनावली की तिची अमलबजावणी होत नाही. त्याला वरच्या न्यायालयात बाजू मांडण्याची संधी उपलब्ध आहे. यामुळे यातच बराच वेळ जातो. मला वाटते जो काही कसुन तपास व सत्यता पडताळणी करायची आहे ती खालच्या स्तरावरच व्हावी. यामुळे कायदा एक खेळणे बनुन जातो. मुळात तर आपल्याकडे न्याय प्रविष्ट प्रकरणे सुनावणीसाठीच लवकर येत नाहीत. त्याची कारणे अनेक आहेत. मी त्यात जात नाही. पण आपल्याकडे गुन्हा सिद्ध व्हायला व प्रत्यक्ष शिक्षा द्यायला प्रचंड उशीर होतो हे सत्य आहे. तपास काळात तो पारदर्शक होत नाही. शिक्षा झाली तरी ती कठोर होत नाही. परिणामी गुन्हेगारांवर वचक राहत नाही. त्यामुळेच अगदी कालच केंद्रीय कॅबिनेटने अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने 'पोक्सो' कायद्यात सुधारणा करण्यास परवानगी दिली आहे. 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स' कायद्यात बदल झाल्यानंतर आता १२ वर्षाखालील चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार आहे. सध्या पॉक्सो कायद्यात दोषीला कमीत कमी ७ वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा होते. मात्र आता १२ वर्षांखालील मुलीवरील बलात्का-याला  फाशीच दिले जाईल असा लोकांच्या अपेक्षेप्रमाणे कायदा करून सरकारने बरे केले.
मित्रांनो स्वराज्यात रांझ्याच्या बाबाजी पाटलाने एका स्त्री सोबत गैरवर्तन केल्यावर महाराजांनी त्याचा चौरंग केला होता! (दोन्ही हात व दोन्ही पाय छाटणे) त्याला तर शिक्षा झालीच सोबतच इतरांनाही जरब बसली. आता स्वराज्यातील कायदे व शिक्षापद्धतीचा आदर्श घेऊन सरकारनेही कायद्यात बदल करून बलात्का-यांना अशीच जबर शिक्षा करायला हवी जेणे करून पुन्हा कोणी असे दुष्कृत्य करायला धजावणार नाही. तुम्ही म्हणाल फाशीपेक्षा कोणती मोठी शिक्षा आहे? तर मला वाटत नाही फाशी कठोर शिक्षा आहे. शिक्षा अशी असावी की गुन्हेगार मरुही नये व जगु शकुही नये. आयुष्यभर त्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप वाटावा व त्याने स्वतः लोकांना असा गुन्हा तुम्ही करू नका असा उपदेश करावा. इतर लोक जेव्हा त्याच्याकडे पाहतील तेव्हा त्याला पाहाताक्षणीच त्याने काय गुन्हा केला आहे हे त्यांच्या लक्षात यावे व त्यांच्या मनात अशा गुन्ह्यांबाबत भिती निर्माण व्हावी. दुसरे असे की गुन्हा केला आहे की नाही हे शोधायला वर्षोंवर्षे कशाला लागतात? थातुरमातुर कैद व विलंब अशाने गुन्हे कमी होणार नाहीत आणि असेच होत राहीले तर लोक आरोपींना पोलीसात देण्याऐवजी स्वतःच शिक्षा देतील. फैसला on the spot!! परिणामी अराजकता माजेल.
आज समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. प्रत्येकजण अशा घटनांमुळे अस्वस्थ पण हतबल आहे. जेव्हा घटना घडते तेव्हा प्रसार माध्यमातून टिका होते. चर्चा होते. आपण सामाजिक माध्यमातून निषेध नोंदवतो आणि शांत बसतो. मी तर या सर्व प्रकारामुळे प्रचंड अस्वस्थ आहे. मीच काय आपण सर्वच अस्वस्थ आहोत कारण सर्वांनाच आई, बहीण, बायको, मुलगी, भाची, पुतनी, नात आहे. आपल्या देशात स्त्री चारित्र्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाश्चिमात्य देशात बलात्काराकडे एक अपघात म्हणून पाहीले जाते मात्र आपल्याकडे तसे नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे बलात्काराला स्त्रीला जिम्मेदार समजले जाते! तिचे राहणीमान, तिचे स्वातंत्र्य, तिचा स्वाभिमान यामुळेच असे घडले असावे असा तुघलकी तर्क काढला जातो. बलात्कारात महीलेची चुक असण्याचा प्रश्नच कसा काय येऊ शकतो हेच मला कळत नाही? पुरूष आपल्या पाशवी शक्तीचा वापर करून आपली अतिरेकी कामवासना शमविण्यासाठी अत्याचार करतो. हा एक कठोर गुन्हा आहे. यात महीलेचा कसलाही दोष नसतो मात्र तरीही बलात्कारानंतर पिढीतेचे अवघे जिवनच नष्ट होते. जर पिढीता विवाहित असेल तर तिचा संसार उद्ध्वस्त होतो. पतिकडून सासरकडून तिला वाळीत टाकले जाते. तिला अपमानास्पद वागणूक दिली जाते. परिणामी बिचारी वाममार्गाला लागते अथवा आत्महत्या करते. हेच अविवाहित मुलीच्या बाबतीत घडले तर तिच्यावर याचा एवढा प्रचंड मानसिक व शारिरीक परिणाम होतो की त्यातून ती सावरतच नाही. तिचा मित्रपरिवार कुटुंबातील सदस्य तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहातात. तिचे लग्न जमत नाही. जरी जमले व झाले तरी कोणीतरी तिला ब्लॅक मेल करुन तिचे पुन्हा पुन्हा शोषण करते. जेव्हा भुतकाळ समोर येतो तेव्हा तिचा सासर कडून छळ होतो व तिला मारुन टाकले जाते अथवा घटस्फोट दिला जातो. बदनामीच्या भितीने व पुढच्या त्रासाच्या भितीने बहुतांश वेळा बलात्कार उजेडातच आणले जात नाहीत. परिणामी गुन्हेगार सोकावतात. बलात्कारामुळे मुली महीलांचे अवघे आयुष्य नष्ट होते. आत्महत्या, वेश्याव्यवसाय, गुन्हेगारी याकडे वळलेल्या मुली महीला या सर्वसाधारणपणे बलात्काराने पिढीत असतात. याचे कारण म्हणजे समाज! समाज बलात्कारानंतर महिलेकडेच आरोपीच्या नजरेने पाहतो. हे चुकीचे आहे ज्यात स्त्रीचा कसलाही दोष नसतो. ज्यात तिच्यावरच अन्याय होतो. त्यात तिला दोषी कसे काय समजले जाऊ शकते?

मित्रांनो मी जेंव्हा एकांतात विचार करत बसतो तेव्हा मला असे वाटते की ही अशी कृत्ये केवळ वासनांधतेमुळे होत नसावीत. कारण अनेक प्रकरणात अगदी बालके, व्रुद्ध, विकलांग ते त्रुतियपंथी देखील असे कृत्य करताना समोर आले आहेत. हे सगळे पाहुन माझे मन सुन्न होते व यावर कायमस्वरूपी पर्याय काय असु शकतो? या द्रुष्टीने मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला काही उपाय सुचतात जे मी आपल्या समोर मांडतो. पहीले म्हणजे बलात्काराकडे पहाण्याची द्रुष्टी. यात पिढीतेकडे पहाताना निर्दोष द्रुष्टीने पाहीले पाहीजे. तिला समजून घेऊन तिला पुन्हा जिवन जगण्यासाठी उभे केले पाहिजे. तिचा हरवलेला आत्मविश्वास तिला परत मिळवून दिला पाहिजे व तिच्याकडे सन्मानजनक नजरेने पाहीले पाहीजे. ना तिरस्कार ना सहानुभूती दाखवता काही घडलेच नाही या अविर्भावामध्ये की हे कोणाशीही घडू शकते हे समजून घेऊन वागले पाहीजे. दुसरे म्हणजे बलात्कार दडवून नाही ठेवले पाहीजेत आणि बलात्कार झाला म्हणजे स्त्रीच्या द्रुष्टीने आभाळ फाटल्यासारख्या द्रुष्टीने नाही पाहीले पाहिजे. हा एक अपघात होता असे समजुन गुन्हेगाराला सर्वांसमक्ष आणणे व त्याला कायद्याच्या कचाट्यात आणणे याला महत्त्व दिले पाहिजे. यात कुटुंबाने तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मुली स्त्रियांना शारिरीक व मानसिक द्रुष्ट्या सशक्त व मजबूत बनविले पाहीजे. संकटसमयी ती स्वतःचा बचाव कसा करु शकेल याचे कुटूंबातुन व शासनाकडून प्रशिक्षण तीला मिळाले पाहिजे. अत्याचार होत असताना अथवा झाल्यावर स्त्रीनेच आरोपीला स्वसंरक्षणार्थ अद्दल घडवावी यासाठी तिला कायद्याने शस्त्र बाळगण्याची परवानगी असावी व चालविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात यावे. स्वसंरक्षणार्थ तिच्याकडून झालेल्या कृतीला अपराध समजले जाऊ नये. (अर्थात तपासा अंती)

हे झाले महीलांच्या बाबतीत, पुरूषांच्या बाबतीत अशा गुन्ह्याला माफी नसावी. जलद व पारदर्शक तपासणी व तात्काळ कठोरात कठोर शिक्षा व्हावी.(फाशी कठोर शिक्षा नाही) जेणेकरून असा गुन्हा करायला कोणी धजावणार नाही. शिक्षेची भिती निश्चितपणे गुन्ह्याचे प्रमाण कमी करू शकते मात्र मला वाटते हा प्रकार केवळ शिक्षेने समुळ नष्ट होईल असे अजिबात वाटत नाही. कारण ज्या देशांमध्ये कठोर शिक्षा आहेत उदाहरणार्थ अरब देश, तेथेही गुन्हे घडतातच. त्यामुळे केवळ शिक्षा हा बलात्कार संपविण्यामागील पर्याय ठरू शकत नाही. शालेय शिक्षणात मुल्य शिक्षण व लैंगिक शिक्षण दोन्ही प्रकारचे शिक्षण प्रभावीपणे दिले गेले पाहिजे. कुटुंबात संस्कार केले गेले पाहीजेत. विभक्त कुटुंब पद्धती, पालकांचे व्यस्त जीवनमान, टीव्ही मोबाईलचा अतिरेक व घरातील एकंदरीत उदासीन व असंतुलित वातावरण यामुळे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे. मुलाचे कुटूंबात व शाळेत फाजील लाड होता कामा नयेत. घरात धार्मिक व अध्यात्मिक वातावरण ठेवले तर मन प्रसन्न राहुन घाणेरडे विचार मनात येत नाहीत. मित्रांनो अगदी साधु संत व पुरोहीतही चुकीचे वागताना सापडले आहेत. मात्र आपण हे समजुन घ्या की ते खरे साधु संत अथवा पुरोहित नव्हतेच. ते एक व्यावसायिक होते. खरे अध्यात्म विचारांवर व वर्तनावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते मग धर्म कोणताही असो. अध्यात्मिक व नैतिक शिक्षण व्यक्तीच्या मनावर निश्चित चांगला परिणाम करते.
अश्लील चित्रे व मजकूर, टिव्ही, मोबाईल व इंटरनेटवरील द्रुष्ये यामुळे पाशवी लैगिक इच्छा प्रबळ होतात. पाँर्नमुळे उत्तेजित होण्याचा प्रकार होतो. त्यावर कायद्याने बंदी घातली गेली पाहीजे. पण दुसरीकडे अगदी ग्रामिण आडाणी लोक, ज्यांचा आणि या बाबींचा कधीही संबंध येत नाही तेही बलात्कारासारखी कृत्ये करताना पकडले जात आहेत. ते ही वयाचा विचार न करता!! असे का होत असावे? तर अशा कृत्यांमागे मनोरुग्नता, अंधश्रद्धा, नशा, धार्मिक द्वेष, वैयक्तिक दुश्मनी अशीही कारणे असु शकतात. याचे कारण मला वाटते पर्यावर्णीय ( ecological), रासायनिक (chemical) व जैविक (genetical) बदल हे असावे. त्यामुळे बलात्का-याला कठोर शासन करणे व बलात्कार होऊ नयेत यासाठी उपाय योजना करणे या दोन्ही पातळ्यांवर कार्य व्हायला हवे. शिक्षेबरोबरच प्रबोधन, उद्बोधन व्हायला हवे.
संशयितांवर  वैद्यकीय (मानसिक व रासायनिक) उपचार व्हायला हवेत. खासकरून ज्यांनी यापुर्वी असे छोटे मोठे गुन्हे (विनयभंग, बळजबरी) केले आहेत त्यांच्यावर. औषधौपचाराने अशांच्या पाशवी इच्छेचे शमन वा दमन करायला हवे. अतिरेकी कामवासना वैद्यकिय इलाजाने नष्ट करायला हवी. यात संशयितांच्या कुटुंबियांनी मागे राहाता कामा नये. लक्षण दिसताच डॉक्टरांना भेटुन उपाय करायला हवेत. जर मनामध्ये असे विक्षिप्त विचार येत असतील तर स्वतःवर नियंत्रण ठेवून तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. औषधोपचार व समुपदेशन (medicenal treatment and counseling) घ्यायला हवे. तरच हे प्रकार बंद होतील. शिक्षा तर कठोर असावीच मात्र कठोर शिक्षेसोबतच समुपदेशन, औषधोपचार, उद्बोधन, प्रबोधन असेही मार्ग योजायला हवेत. तरच हा प्रश्न सुटेल. अशी मानसिकता बालपणी कुटुंबात कुटुंबियानी, शाळेत शिक्षकांनी ओळखुन त्यावर वैद्यकीय उपचार करायला हवेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळेने, मित्रांनी कुटुंबियांकडे शिफारस करताना थोडाही विलंब करु नये व संबंधित कुटूंबाने अथवा समस्या ग्रस्त पुरुषाने देखील उपचार घेण्यात कमीपणा अथवा अपमान समजू नये. कारण वेळीच घेतलेली खबरदारी पुढचा अनर्थ टाळु शकते. A stitch at time saves nine.
ब-याचदा असले रोग आपली लक्षणे दाखवत असतात मात्र तो पुरूष स्वतःकडे तसेच त्याचे कुटुंब, मित्र परिवार व समाज त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी काळ सोकावतो व पुन्हा पुन्हा असे प्रकार घडतात हे आजवरच्या पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.
आज जर विज्ञान (medical science) एवढे प्रगत अवस्थेत आहे तर अशीही एखादी लस शोधली जावी जी बालपणीच मुलांना टोचली की पुढे पुरुष किशोर वयात, तरुणपणात अथवा आजीवन लैंगिक द्रुष्ट्या पाशवी व अतिरेकी होणार नाहीत. त्यामुळे बलात्काराकडे बघण्याचा द्रुष्टीकोन बदलला, गुन्हेगाराला कठोर व जलद शिक्षा केली व बलात्कार होणार नाहीत यासाठी धोरणात्मक उपाययोजना केल्या तरच हा लांच्छनास्पद व मानवतेला काळीमा फासणारा अमानवीय प्रकार समुळ नष्ट होईल. आणि मला नाही वाटत हे अशक्य आहे. जर आपण माझ्या मताशी सहमत असाल तर समाजात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत हा संदेश पोचवा ही नम्र विनंती.

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9673945092.

Thursday 19 April 2018

नारी

अखिल नारी शक्तीच्या दया, दात्रुत्व, माया, ममता, मात्रूत्व, संयम, सहनशीलता, इच्छाशक्ती, निस्वार्थता,त्याग, समर्पण,  सेवाभाव, उर्जा, बुद्धिमत्ता, यशस्वीता, नम्रता, सौदर्य, प्रसन्नता, समायोजन व तडजोडीला माझा मानाचा मुजरा.... 🙏

या प्रुथ्वीतलावर मानवरुपी सुंदर प्राण्यास जन्माला घालुन त्यास मायेने वाढविल्याबद्दल.......
विश्वरूपी गाड्याचे दुसरे चाक बनून हा गाडा यशस्वीपणे इथपर्यंत घेचत आणल्याबद्दल....
सर्व मानवी तत्वे, मुल्ये, संस्कार, आदर्श, संस्कृती व विविध भावनांचे संस्करण, संगोपन व संरक्षण केल्याबद्दल...
ज्यांनी जीवनाला खरा अर्थ व आनंद प्राप्त झाला ती विविध नाती निर्माण करून ती जतन करून ठेवल्याबद्दल...
प्रत्येक यशस्वी पुरूषाचा दुसरा हात बनुन, अर्धे अंग बनुन यशश्री खेचुन आणल्याबद्दल....
अनेक भरकटलेल्या संसाररुपी रथाची दोन्ही चाके स्वतःच बनुन उत्तम सारथ्यासह  तो संसार रथ एकटीने मार्गावर आणल्याबद्दल...
आणि एकुणच हे मानवी आयुष्य सुंदर तथा परिपुर्ण बनविल्याबद्दल  मी आपणास मनापासून मनभरून धन्यवाद देतो🙏

असेल त्या परिस्थितीत, सर्व संकटे झेलत, सर्व आव्हाणे पेलत, सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक दैदिप्यमान गौरवास्पद कामगिरी करून  दाखविल्याबद्दल मी आपले -हदयपुर्वंक अभिनंदन करतो🌷🌷

माझी आई सौ. चंद्रकला,  पत्नी सौ. सोनाली, मुलगी कु. व्रुष्टी, पाचही बहीणी सौ. सारिका, सौ. संगिता, सौ. कविता, सौ. अश्विनी व कु. उषा, भावजय सौ. रजनी, आजवरच्या माझ्या सर्व महीला शिक्षिका, सर्व सासवा, सख्या तर हयात नाहीत राहील्या मात्र सर्व प्रकारच्या नात्याने लागणा-या आज्या,  सर्वच चुलत, मावस, सावत्र बहीणी, चुलत्या, मावश्या, आत्या, माम्या, भाऊजया, नाती, भाच्या, पुतन्या, मेहुण्या, सहकारी भगीनी, विद्यार्थीनी, सर्व मानलेल्या बहीणी, मानलेल्या नात्यातील सर्व प्रिय मुली-महीला, मैत्रिणी व आत्या-मामाच्या मुली☺️तुम्हा सर्वांना माझ्याकडून "जागतिक महिला दिनाच्या" मनःपूर्वक शुभेच्छा🌷🌷🌷

माझ्यासह सर्वच पुरूष जातीच्या चुका पोटात घेऊन यापुढेही सर्व पुरुष व स्त्रिया मिळुन यशाची, जीवनाची आणि एकंदरीतच निसर्गाची टाळी आनंदाने वाजवू👏👏👏👏👏👏
धन्यवाद🙏

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9673945092.

Tuesday 17 April 2018

All are the same

नावात काय ठेवलय???
बालासाहेब असो वा बाळासाहेब..
बालाजी असो वा बाळाजी...
बालु असो वा बाळु..

सर म्हणा वा नका म्हणा...
रस असला म्हणजे झाले.
गुरु म्हणा वा नका
गुरूर नसला म्हणजे झाले😊

काहीही निवडले तरी
साहेब वा जी येतेच की😊.
नाही तर मग प्रेमाने
बाला वा बाळा😊

म्हणा ना म्हणा दादा
होईल भाऊ हा वादा.😊
What is in the Name?
All are the Same🙏

B.S. ही yes B.D.ही yes
Only Names r different
Same is the Face.
What is in the Name?
All are the Same😊🙏

पोखरी काय, पाथरी काय
बीड काय, पुणे काय😊
Only Places r different
Same is the Aim😊
What is in the Name
All are the Same 🙏

मो. 9673945092

दान

मित्रांनो नमस्कार🙏सुप्रभात🌷
आज अक्षय तृतीया साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. केवळ हिंदूच नव्हे तर जैन धर्म शास्त्रानुसार देखील एक शुभ दिवस...
आज केलेले दान अक्षय राहते असा उपदेश श्रीकृष्णाने युधिष्टीराला म्हणजे धर्माला केला होता. मात्र संस्कृती जपत असताना व आत्म समाधान मिळवत असताना आपला विवेक देखील जागा असावा लागतो. धर्म व विज्ञान यांचा जसा यथार्थ मेळ विवेकानंदांनी अब्दुल कलामांनी घातला होता व तशीच शिकवण दिली होती, तिचा विसर पडला नाही पाहिजे. चांगले काम करणारे शुभमुहूर्ताची वाट पहात बसत नाहीत. नवनिर्माणासाठी प्रगतिपथावर अग्रेसर होण्याची कुठल्याही शुभ मुहूर्ताची अथवा पुजेची आवश्यकता नसते. दान नक्की करावे मात्र ते करताना स्वतःची ऐपत व ज्याला दान करावयाचे आहे त्याची सर्वांगाने योग्यता तपासली पाहीजे. त्याची निकड अथवा गरज पाहीली पाहिजे. विं. दा. करंदीकर म्हणतात,.....
"देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे."
म्हणजे सदैव मिळण्याचीच अपेक्षा न करत राहता कधीतरी स्वतःही दान करावे. इतरांना धार्मिक व श्रद्धाळू बनविणारे व दानाचे महत्व समजावून दान स्विकारणारे स्वतः कधी दान करताना दिसतात का हे ही पाहीले पाहीजे. दात्रूत्व माणसाला निस्वार्थ वा परार्थ शिकविते. त्यातच खरा परमार्थ दडलाय हे आपण समजून घ्यायला हवे.
मित्रांनो पात्र पाहुन दान करावे असे म्हणतात. म्हणजे योग्यता तपासून, आवश्यकता पाहून दान करावे. दानाने निष्क्रियता तर वाढणार नाही ना? क्रियाशीलता संपुष्टात येवून परावलंबित्व तर वाढीस लागणार नाही   ना? याचीही आपण काळजी घ्यायला हवी.
अक्षय दानाची व्याख्या समजून घ्यायला हवी. जे हयात नाहीत त्यांच्या नावाने दान करण्याची काहीही आवश्यकता नसते आणि मानसिक समाधान, आठवण, श्रद्धा, धर्माची शिकवण म्हणुन जर दान करावयाचेच असेल तर अनाथालये, वृद्धाश्रमे, विकलांगांच्या शाळा व वस्तीगृहे यांना दान करा. अवयव दान करा, रक्तदान करा. अनेक लोक या देशात आजही निवाराहीन आहेत, भूमिहीन आहेत. त्यांच्या निवा-यासाठी शासनाला अथवा समाजसेवेचे कार्य करणाऱ्या एनजीओंना भुदान अथवा इतर पुरक दान करा.अनाथ बालकांना दत्तक घ्या, बुद्धीमान गरिब विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करून राजर्षी शाहु महाराज व सयाजीराव गायकवाड यांचा आदर्श घ्या, गोरगरिबांच्या लेकीबाळींचे विवाह लावून द्या.
मित्रांनो हयात असलेल्या आईवडीलांना आपल्याला जन्म दिल्याचा पश्चात होणार नाही. तर आपल्याला जन्मास घातल्याचे समाधान व अभिमान वाटेल असे काहीतरी करा. आवश्यक नाही प्रत्येक वेळी मंदिरात जाऊन पुजा अर्चना करणे. कधीतरी सरकारी शाळेत, सरकारी दवाखान्यातही जा. तिथल्या अडचणी समजून घ्या. तिथे काही करता येईल का पहा. आजही अनेक गावांत, वाड्यावस्त्यांवर, तांडेपाड्यांवर रस्ते, लाईट, पिण्याचे पाणी, शाळा-आंगणेवाडी, वैद्यकीय सुविधा, स्मशानभूमी नाही. तेथे केलेले दान फलदायी व अक्षय ठरेल. मला खात्री आहे की असे दान आपल्या पितरांना देखील. समाधान व शांतता प्रदान करेल. हयात असलेल्या मातापित्यांनाही व पितरांनाही...
मित्रांनो, गंगास्नान केल्याने पापमुक्ती मिळत नाही तर जलप्रदूषण होते, संसर्गजन्य आजार जडतात. अक्षय तृतीयेचे शुभमुहूर्त साधुन नदी सफाई, पात्रातील गाळ काढुन पात्र रुंदीकरण, असे उपक्रम राबविले तर नक्कीच समाधान मिळेल.
बघा पटलं तर घ्या. सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शुभ कार्यासाठी, प्रगतीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐

आपलाः बाळासाहेब धुमाळ
मो. 9673945092.

Monday 16 April 2018

चिखे

चिखे.....

या मेरे खुदा मेरे मौला
यह क्या बोला जा रहा है?
वहेशीयों को मजहब से
तोला जा रहा है।

दरिंदगी अपने चरम पर है
और चर्चे सारे धरम पर है।
इन्सानियत का रेप हो रहा है
तु है की खर्राटे मार सो रहा है।

सरे आम लडकीयाँ
लुटी जा रही है।
तुज पर से मेरी आस्था
टुटी जा रही है।

हैवानों का कैसे धरम
कैसे मजहब हो सकता है?
बचाता रहेगा इनको तो
गजहब हो सकता है।

आप बीती पर खाली चर्चे है
हातों में चुनावी पर्चे है।
गर है तू तो इनका खात्मा कर।
शांत मेरा अशांत आत्मा कर।

इज्जत यहाँ तार तार है
आलम यह बार बार है।
सुर्खीयाँ सुन रोता है मन।
मुर्तीयाँ तोड कहेता है मन।

ये कैसी दुनिया बनाई
ये कैसा इन्सान??
शिकारी है चारो ओर
इन्सानियत परेशान।

शोरों में पिडीताओं की चिखे
लुप्त हो रही है।
पता तो तेरा है नही
पर आवाम तेरी भक्त हो रही है।

बालासाहेब धुमाळ।
मो. 9673945092

Wednesday 11 April 2018

परिपाठ

....................... परिपाठ ...........................

मित्रांनो नमस्कार🙏🏼 आज ११ एप्रिल म्हणजे शिक्षणाची गंगा दिन दुभळ्या , गोरगरीब, वंचित दुर्लक्षित बहुजनांच्या दारापर्यंत घेऊन जाणाऱ्या महामानव क्रांतिसूर्य महात्म्या जोतिबा फुले यांची 191 वी जयंती. त्यांच्या महान कार्याला व स्मृतींना विनम्र अभिवादन करून मी तुम्हाला माझा आत्ताचा एक अनुभव सांगतो.
 मित्रांनो उन्हाळ्यामुळे सकाळ सत्रातच शाळा असल्याने मी सकाळी 6:30 लाच शाळेत येतो. नित्याप्रमाणे आजही आलो.सकाळची साफसफाई करून विद्यार्थ्यांनी 7:00 वाजता बेल दिली. राष्ट्रगीत झाले, प्रतिज्ञा झाली आणि नंबर आला तो भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचा!!! 
आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष राज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधानसभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत हे म्हणण्याचा!!!!
नित्याप्रमाणे परिपाठ सुरु झाला मात्र माझे व माझ्या विद्यार्थ्यांचे लक्ष मात्र परिपाठात काही लागत नव्हते. त्याचे कारण म्हणजे आमच्या शाळेच्या मैदानात रात्रीच्या वेळी निवाऱ्यासाठी काही फिरस्ती किंवा भटके कुटुंब आले होते. परिपाठा दरम्यान माझी मुलं त्यांच्याकडे पाहत होती, त्यांची मुलं कुतूहलाने माझ्या मुलांकडे पाहत होती माकडांप्रमाणे. माझी मुलं परिपाठामध्ये एकेक सदर सादर करत होती तर ती मुलं व त्यांचे पालक त्यांच्या आम्हाला न समजणाऱ्या भाषेमध्ये बडबडत होती. मला काही केल्या राहावले नाही. मी परिपाठामधुन त्या कुटुंबांकडे गेलो. त्यांची विचारपूस केली. ते कोण आहेत? कोठून आले आहेत? व काय करतात असे विचारले असता, त्यांच्या त्या 3 कुटुंबांपैकी एक कुटुंब डोंबारी जमातीचे निघाले तर दोन कुटुंबे नंदीवाले जमातीचे आढळले. पोटाची खळगी भरण्यासाठी दररोज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन कला कसरती दाखवून पोट भरणारे हे कुटुंब पाहून वाईट वाटले. त्यांची अवस्था पाहून कासावीस झालो. त्याचे कारण असे, दरवर्षी आम्ही शाळाबाह्य मुलांची संख्या निरंक देतो. मात्र या तीन कुटुंबातच जवळजवळ सहा मुले शाळाबाह्य दिसली!!!  म्हणजे यांच्यापर्यंत अद्यापही शिक्षणाची गंगा तर सोडाच पण साधी ओल पण पोहचलेली दिसली नाही.
माझी मुलं व्यवस्थित ब्रश करून आंघोळ करून दुध चहा-नाष्टा घेऊन युनिफॉर्ममध्ये निटनेटके परिपाठात बसली होती. तर त्या पालांमधील निम्मी मुलं अद्यापही गोदड्यातच होती. निम्मी कसलीतरी पाकीट फोडून काहीतरी खात होती. ना ब्रश केलेला, ना आंघोळ झालेली ! त्यांच्या पालकांनाही याचं काही वाईट वाटत नव्हतं. दोन मोठ्या पुरुष मंडळींनी अंघोळ केलेली आढळली. ते आरशात चेहरा पहाताना दिसली.  बायका अंथरुणाच्या घड्या घालत होत्या.  बहुधा ते दुसऱ्या गावी जाण्याची तयारी करत असावीत असं मला वाटलं. मी त्यांच्याकडे चौकशी केली. विचारले आता काय करणार? त्यावर ते म्हणाले साहेब आता आम्ही खेळ लावणार. डोंबारी नंदिवाल्यांचा खेळ दाखवणार आम्ही. चार पैसे जमा करणार व मीठ मिरची आणणार पोटाला. मी म्हटलं पाहातात का लोक आता पहिल्यासारखा खेळ तुमचा? तर कोणी पहातं कोणी नाही असं उत्तर आलं?  पाहिला तरी आता लोकांचे हात खिश्याकडे जात नाहीत साहेब. पोट भरणं लई अवघड झालं आहे साहेब पण काय करू? आईबापांनी शिकवलं नाही आता पुढं आम्ही शिकवतोय तर लेकरं शिकत नाहीत. बोरडींगीत नकु म्हणत्यात अन सोबत ठेवावं तर शाळा बुडतीया. म्हणून काय करावं कळत नाही. अन नाही तरी शिकुन बी काय उपेग न्हाई वो, त्यांचा पोरगा चवदावी शिकला पण काही उपेग झाला नाही. काहीशा वैतागलेल्या सुरात तो उत्तरला.
मी विचारले तुमचं नाव काय? तर ते म्हणाले मी शिवराम लिंबाजी जाधव गाव जातेगाव तालुका शिरूर जिल्हा अहमदनगर. मी मनात म्हटलं शिरुर तालुका नगरमध्ये!! डोंबारी जातीचा आहे. मला चार मुले व एक मुलगी आहे. मी शाळेत जातात का विचारले तर ते म्हणाले नाही. शाळेत जात नाही. त्यांच्याच बाजूला साहेबा बाबु गायकवाड नावाचे नंदिवाले जमातीचे व्यक्ती त्यांच्या समवयस्क भावासोबत बसले होते. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव गावचे.  त्यांनाही 4 अपत्ये होती दोन मुले व दोन मुली.  ह्यांची दोन अपत्ये शिकत होती. 
त्यांची ती अवस्था पाहून मी बेचैन झालो म्हणजे एकीकडे आपण ग्लोबलायझेशनच्या, आधुनिकीकरणाच्या, प्रगतिच्या गप्पा मारतो!! स्मार्ट सिटीज मोनो मेट्रो रेलच्या गप्पा मारतो. भारत महासत्ता बनत असल्याचे म्हणतो. तर दुसरीकडे या भटक्या विमुक्त जमाती अद्याप पारतंत्रातच जीवन जगताहेत. यांच्या जीवनात स्वातंत्र्याचा सूर्य कधी उगवेल? यांच्या आयुष्याची रेल कधी पटरीवर येईल?

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्या तीन कुटुंबांपैकी कोणाकडेही स्वतःचे घर नव्हते. जमीन नव्हती. कुटुंबात कोणीही शिकलेले नव्हते. त्यांच्याकडे बँक पासबुक नव्हते. मतदार ओळखपत्र नव्हते. आधार कार्ड नव्हते. पॅन कार्ड नव्हते. आधुनिक जगातील एकच वस्तू त्यांच्या जवळ होती ती म्हणजे गाडवे घोडे यांची जागा घेतलेला छोटा हत्ती (मिनी टेंपो)!!
मला प्रश्न पडला जर यांच्याकडे काहीच नाही तर या लोकांना या देशाचे नागरिक अस कसे काय म्हटले जाऊ शकते? यांनी का म्हणावे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत म्हणून? यांच्या मदतीला कोणीतरी धावून जायला हवे. शासन, एनजीओ यांना हे पालातील, छपराखालील, पुला-नळ्याखालील, फुटपाथवरील, सिग्नलवरील दारिद्रय दिसत नसावं का? यांना कधी भारताचे ख-याअर्थाने नागरिकत्व मिळणार?? (मुळनिवासी असुनही!!!)
 चर्चा करत असताना शिवराम लिंबाजी गायकवाड अगदी बेंबीच्या देठापासून दुःखावस्था सांगत होते. साहेब ज्या गावात खेळ दाखवायला जातो त्या ठिकाणी जागा मिळत नाही. गावातील टगे बायकापोरांना लेकराबाळांना त्रास देतात. मी म्हटलं पोलिसात वगैरे जात नाही का? तर ते म्हणाले पोलीस काय आणि कोर्ट काय हे मला माहीतच नाही. आम्ही आजवर पोलिस स्टेशनची किंवा कोर्टाची पायरी कधीही चढलो नाही. इकडंच हातापाया पडून मिटवले तंटे. या जातीत जन्म झाला हे कदाचित पहील्या जन्माचं पाप असावं. त्यांची दयनियता व  हतबलता मला असह्य वेदना देत होती पण औषध काहीच नव्हते.
आता मी साहेबा बाबु गायकवाड नावाच्या व्यक्तीशी गप्पा मारण्याचे ठरवले. ते बोलण्याच्या मानसिकतेत नव्हते. ते काहीसे चिडलेल्या अवस्थेत दिसले.
काय करायचे साहेब सांगुन?? सांगुन काय फरक पडणार आहे. अशी लईजण लईदा चौकशी करतात माहिती घेऊन, फोटो काढून जातात. फरक काहीच पडत नाही. आमच्या मदतीला कोणीही धावून येत नाही. त्यामुळे मला काही विचारू नका. मी म्हणालो तुमच्या जातीचे नेते तुमची काही मदत करत नाहीत का? त्यावर ते म्हणाले कोणीही नाही. ना जातीचे ना बिगर जातीचे. कोणीही आमच्या मदतीला येत नाही.
मित्रांनो मी त्यांचा मूड ओळखला. तेवढ्यात परिपाठही संपला. मग मी माझ्या वर्गामध्ये  जाऊन विचार करत बसलो. खरच या जमाती अजुनही स्वतंत्र आहेत का? यांना खरोखरीच स्वातंत्र्य मिळाले आहे का? हा भारत देश खरच यांचा देश आहे का? देशात मुठभर हक्काची माती नाही का वितभर नावावर जमीन नाही, डोक्यावर हक्काचे छप्पर नाही तो देश यांचा देश कसा काय असू शकतो????? 
आमचा शालेय परिपाठ रोजच सुरू होतो आणि रोजच संपतो पण या विमुक्त भटक्या जमातींचा दुःख, दैन्य, दारिद्रय, हतबलता व दुर्लक्ष या सदरांनी युक्त परिपाठ कधी संपेल देव जाणो....

....बाळासाहेब सिताराम धुमाळ
...मो. 9673945092.

DNT म्हणजे काय रे भाऊ?

DNT म्हणजे काय रे भाऊ?

मित्रांनो नमस्कार, चळवळीमध्ये काम करत असताना अथवा वैयक्तिक कामासाठी फिरत असताना असा अनेकदा अनुभव आला की लोकांना DNT म्हणजे काय? NT म्हणजे काय? यात कोणत्या जमाती समाविष्ट आहेत? आपली जमात कशात येते? ते अगदी आपली जमात कोणती? हेच अनेकांना माहीत नाही. काही भंगार लोक असेही आढळले की ते स्वतः DNT आहेत, आरक्षणाचा लाभ घेवून शिक्षण नोकरी मिळवून मजेत जीवन जगत आहेत. मात्र आता स्वतःची जात लपवत आहेत. स्वतःला DNT म्हणवून घ्यायला कमीपणाचे समजत आहेत.
एकीकडे चळवळ शासनाला आमच्याकडे लक्ष द्या, आमच्यावर अन्याय होतोय हे सांगण्याठी मरमर करतेय तर दुसरीकडे आपले लोक DNT विषयाबाबतीत अज्ञानी आहेत आणि काही झोपेचे सोंग घेवून आहेत. काही लोक जातीय संघटना तयार करून जातीसाठी कागद काळे करतात. लोकांना भुलथापा मारतात,
जातीचे संघटन असणे चांगले असले तरी हे लक्षात घ्या, कोण्याही एका जातीला काहीही मिळू शकत नाही. या संघटनाचा उपयोग DNT चळवळीला होताना दिसत नाही. त्यासाठी सर्वांनी DNT म्हणुन लढा. मी हे ही स्पष्ट करु इच्छितो की महाराष्ट्रातील अनेक DNT जमाती, केंद्रात SC/ST मध्ये आहेत!! केंद्रात स्वतंत्र DNT आयोग आहे. राज्यात स्वतंत्र VJNT OBC SBC मंत्रालय आहे. स्वतंत्र संचालनालय आहे मात्र पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात येत नाही.
म्हणूनच सर्वच DNTएकतर  सरसकट SC/ST मध्ये वर्ग करा अथवा आता DNT असलेल्या व sc, st, obc मध्ये समाविष्ट असलेल्या सर्व DNT चा वेगळा केंद्रात स्वतंत्र आरक्षण प्रवर्ग तयार करून लोकसंखेच्या प्रमाणात आम्हाला केंद्रात स्वतंत्र आरक्षण द्या. ना sc, ना st ना obc!!फक्त DNT 👍👍या मागणीसाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
शिवाय सध्या राज्य सरकार आपल्या साठी काय करीत आहे? काय करायला हवे? काय मागणी करावी हे अनेकांना कळत नाही. त्यासाठी DNT म्हणजे काय/कोण हे समजणे गरजेचे आहे. म्हणून.. ...
DNT म्हणजे Denotified Nomedic Tribes म्हणजे विमुक्त भटक्या जमाती.

विमुक्त जमातींना विमुक्त जाती VJ म्हणूनही संबोधले जात आहे पण ते चुकीचे आहे. या जमाती आहेत, जाती नाही. या एकुण १४ आहेत.

१)अ) बेरड ब) नाईकवाडी, क) तलवार
ड) वाल्मिकी
२)बेस्तर वडार
३)भामटा अ) भामटी, ब) गिरणी वडडार, क) कामाटी, ड) पाथरुट इ) टकारी (मुस्लिम धर्मीयांसह), फ) उचले, ग) घंटीचोर
४)कैकडी (मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, बीड, परभणी, उस्मानाबाद, नांदेड, जिल्हे व चंद्रपूर जिल्हयातील राजूरा तालुका यात)अ) धोंतले ब) कोरवा क) माकडवाले किंवा कोंचीकोरवा ड) पामलोर इ) कोरवी
५)कंजारभाटअ) छारा, ब) कंजार,
 क) नात
६)कटाबू
७)बंजाराअ) गोर बंजारा, ब) लंबाडा/ लंबारा, क) लंभाणी
ड) चरण बंजारा, इ) लभाण, फ) मथुरा लभाण ग) कचकीवाले बंजारा, ह) लमान बंजारा इ) लमाण/ लमाणी, ज) लबान, क) *** ल) धाली/ धालीया, ग) धाडी/ धारी, न) सिंगारी व) नावी बंजारा, प) जोगी बंजारा, क्यु) **, र) ** स) बंजारी
८)पाल पारधी
९)राज पारधीअ) *** , ब) गाव पारधी, क) हरण शिकारी, ड)*
१०)राजपूत भामटाअ) परदेशी भामटा, ब) परदेशी भामटी
११)रामोशी-
१२)वडारअ) गाडी वड्डर, ब) जाती वड्डर, क) माती वड्डर ड) पाथरवट, इ) संगतराश / दगडफोडू, ई) वड्डर
१३)वाघरीअ)सलात, ब) सलात वाघरी
१४)छप्परबंद (मुस्लिम धर्मीयासह)

NT म्हणजे Nomedic Tribes म्हणजे भटक्या जमाती. यांचे ३ विभागात वर्गीकरण केले आहे.

NTB म्हणजे भजब
 मुळ २८ + नव्याने समाविष्ट ९=३७

१) गोसावी1) बावा 2) बैरागी 3) भारती 4) गिरी गोसावी 5) भारती गोसावी 6) सरस्वती पर्वत 7) सागर 8) बान किंवा वान 9) तीर्थ आश्रम 10) अरण्य घरभारी 11) संन्यासी 12) नाथपंथी गोसावी 13) पुरी
२)बेलदार ओड, मुस्लीम बेलदार, कापेवार, मुन्नर कापेवार, मुन्नर कापु, तेलंगा, तेलगी, पेंटरेडडी, बुकेकरी, मुस्लीम राज, मुसलमान राज, मुस्लीम मेमार, मेमार, मुस्लीम गवंडी (शा. नि. दि .30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट )
३)भराडीअ) बाळ संतोशी ब) किंगरीवाले क) नाथबावा ड) नाथ जोगी, गारपगारी इ) नाथपंथी डवरी गोसावी ई) नाथ, जोगी, नाथपंथी उ) डवरी
४)भुते भोपे
५)कंजारभाट
६)चित्रकथी
७)गारुडी, सापगारुडी (मुस्लीम धर्मियांसह)
८)लोहारघिसाडी, घिसाडी लोहार किंवा गाडी लोहार किंवा चितोडी लोहार, रजपूत लोहार, पांचाळ लोहार, खाती, खातवाढी, जिनगर, चितोडीया-लोहार, चितारी / जिनगर (शा. नि. दि . 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट)
९)गोल्लागोल्लेवार, गोलेर, गोलकर
१०)गोंधळी
११)गोपाल अ) गोपाल भोरपी ब) खेळकरी गोपाळ ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे सुधारित जात)
१२)हेळवे12) हिलव
१३)जोशीअ) बुडबुडकी, ब) डमरुवाले, क) कुडमुडे, ड) मेंढगी, इ) सरोदे, सरोदी, फ) सहदेव जोशी, म) सरवदे, ह) सरोदा
१४)काशी कापडी
१५)कोल्हाटी डोंबारी
१६) मैराळअ) दांगट, ब) वीर
१७)मसनजोगी1)सुदगडसिध्द, 2) मपनजोशी, 3) शारदाकार / शार्दाकार / शारदाकाळ / बालासंतु
१८)नंदीवाले तिरमल
१९)पांगूळ
२०)रावळ, राऊळ किंवा रावळयोगी
२१)सिक्कलगरकटारी, सेक्क्लगर (मुस्लिम धर्मिय), शिख-शिकलीगार, शिख-शिकलीकर, कातारी शिकलगार, मुस्लिम शिकलगार, शिकलीगार, शिकलीगर, शिकलगार, शिकीलगर, श्किलकर, शिकलीकर, शिकलकरी, सिकलकर, सिकलीकर, सिकीलगर, सिकीलकर, सिकलीघर, सिक्कलकर, सिकलीगर, सिकलगर, सिक्कलीगर, सायकलगर, सैकलकर,सैकलगर, कातारी-शिकलकर (शिकलीकरी) हिंदू धर्मीयांसह (शा. नि. दि . 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट)
२२)वगळले (ठाकर –रत्नागिरी जिल्हा)
२३)वैदू
२४)वासुदेव
२५) भोई 1) झिंगा भोई 2) परदेशी भोई 3) राजभोई 4) भोई 5) कहार 6) गोडिया कहार 7) धुरिया कहार 8) किरात 9) मछुआ 10) मांझी 11) जातिया 12) केवट 13) ढीवर 14) धीवर 15) धीमर 16) पालेवार 17) मछेंद्र 18) नावाडी, भोई नावाडी, तारु-नावाडी 19) मल्हार 20) मल्हाव 21) बोई 22) गाढव भोई 23) खाडी भोई 24) खारे भोई 25) ढेवरा 26) भनारा, भनारी, भनारे 27) निषाद 28) मल्ला 29) मल्लाह 30) नावीक 31) ओडा 32) ओडेवार 33) ओडेलू 34) बेस्तार 35) बेस्ता 36) बेस्ती 37) बेस्तालू 38) भनार (शा. नि. दि 30 जानेवारी, 2014 प्रमाणे समा‍विष्ट )
२६) बहुरुपीअ) बोहरशी, ब) बहुरुपिया, क) भोरपी, ड) रायरंध्र, इ) अय्यार व अय्यारी
२७)ठेलारी (धुळे, नाशिक, जळगाव, व औरंगाबाद जिल्हयात)
२८)ओतारीअ) ओतनकर, ब) ओतकर, क) वतारी, ड) ओझारी इ) वतकर, वतकरी, वतनकर, वतोकर, ओतकरी, ओतोकार वतोकार
२९)मरीआईवाले
३०)कडकलक्ष्मीवाले, ३१)मरगम्मावाले
३२)गिहरा / गहरा
३३)गुसाई / गोसाई
३४)मुस्लीम मदारी, गारुडी, सापवाले व जादूगर
३५)भारतीय इराणी
३६)गवळी, मुस्लीम गवळी, गवलान, ग्वालवंश गोपाल-गवळी गवळी- गोपाल ( शा. नि. दि. 4 सप्टेंबर 2014 प्रमाणे सुधारित जात)
३७)दरवेशी, वाघवाले- शाह (मुस्लीम धर्मीय), अस्वलवाले
३८)बागडी (भज-ब) ( शा. नि. दि . 30 जानेवारी, 2014 प्रमाणे.

NTC भजक
म्हणजे धनगर

१) अहिर, धनगर अहिर २) डांगे ३) गटरी ४) हंडे ५) तेलवर ६) हटकर ७) हाटकर ८) शेगर, सगर, सेगर ९) खुटेकर १०) तेलंगी ११) तेल्लारी १२) कोकणी-धनगर १३) कानडे १४) वऱ्हाडे धनगर १५) झाडे १६) झेंडे १७) कुरमार १८) माहुरे १९) लाडसे २०) सनगर २१) धनवर २२) गडारिया २३) गड्री २४) गढरी २५) डंगेधनगर व डोंगरी धनगर २६) गडरिया/ गडारिया (शा.नि. दि ३० जानेवारी, २०१४ प्रमाणे समा‍विष्ट)

NTD भजड
म्हणजे वंजारी (वंजार, वंजारा)

आपल्याला आरक्षण किती आहे?
DT/VJ --- 3%
NTB----- 2.5%
NTC------- 3%
NTD------- 2%

संकलनः बाळासाहेब धुमाळ
मो. 9673945092.

गोंधळी वधु-वर सुचक ग्रुप

गोंधळी भावाबहीणींनो नमस्कार....

मी समाजामध्ये जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा अनेक लोक मला एखादा चांगला मुलगा किंवा मुलगी (वर किंवा वधु) आहे का? म्हणुन विचारतात. ऐनवेळी आठवत नाही. माझ्या ते लक्षातही राहात नाही. शिवाय जबाबदारी, वेळेची कमतरता यामुळेही दुर्लक्ष होते/करतो. अलीकडे शैक्षणिक व आर्थिक प्रगतीमुळे (काहींच्या) अपेक्षा वाढल्या आहेत. समाज एकसंघ नसल्यामुळे ब-याच अडचणी येतात. आज अनेक पालक व स्वतः वधु-वर स्थळाच्या शोधात आहेत पण मनोवांचीत स्थळाचा शोध लागत नाही...

Whatsapp किंवा Hike वर आज अनेक matrimonial म्हणजे विवाहजुळणीविषयक groups आहेत. आदरणीय डॉ. विजय रेणके सरांनी त्यांच्या शुभमंगल गोंधळी या ग्रुपच्या माध्यमातून अनेक लग्ने जमण्यास मोलाचे सहकार्य केले, आजही करत आहेत.

मला वाटते WhatsApp किंवा Hike पेक्षा Facebook वरील ग्रुप अधिक फायद्याचा ठरेल. कारण इथे कोणाला मेंबर करायचे, काय शेअर करू द्यायचे, काय करू द्यायचे नाही हे नियंत्रकाच्या Admin च्या हाती असते. सदस्य संख्येलाही मर्यादा नसते? बायोडाटा पुन्हा पुन्हा सेंड करून रिमाईंड करून द्यावे लागत नाही. एकदा बायोडाटा दिला की संपले. आपण ग्रुपमध्ये समाविष्ट होण्यापुर्वीच शेअर झालेल्या पोष्ट्सदेखील पाहु शकतो!!शिवाय एखाद्या बायोडाट्याबाबत कमेंट्सही करू शकतो. म्हणून मी.....

Gondhali Vadhu var suchak group (गोंधळी वधु-वर सुचक ग्रुप) तयार करत आहे. हा एक closed ग्रुप असेल अर्थात ज्याची joining request accept करेल त्यांनाच या ग्रुपचे सभासद होता येईल.

Join / सभासद  होण्यासाठी Gondhali Vadhu var suchak group ला request पाठवावी लागेल. पण request पाठविण्यापुर्वी मला माझ्या whatsapp नंबर 9673945092 वर संपुर्ण biodata हा request पाठवणाराचे नाव टाकुन पाठवावा लागेल. आपण तो Facebook messenger वरही पाठवु शकता. त्या नंतरच request accept केली जाईल."

Biodata किंवा profile नसेल तर सदस्यत्व नसेल. परिणामी बघ्यांची गर्दीही नसेल. ग्रुपचे सर्वच सभासद केवळ ज्यांच्याकडे मुलगा किंवा मुलगी आहे असेच असतील. एकदा सदस्य झाले की मग आपण ग्रुपवर तो बायोडाटा टाकु शकाल. एखादा समाजबांधव facebook वर नाही किंवा आहे पण वापरातले विशेष समजत काही, अशावेळी तसा बायोडाटा मी टाकेल व फोनवरून त्यांना माहीती कळवेल.

बायोडाटा परिपुर्ण असावा. फोटो, संपूर्ण नाव व पत्ता, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, शारिरीक वर्णन, अपेक्षा, संपर्क क्रमांक इत्यादी.

मला पाठवलेले बायोडाटाज अत्यंत गोपनीय असतील. काही शंका कुशंका मनात असेल तर मला संपर्क करा. बायोडाट्याशिवाय सभासदत्वाची साधी अपेक्षाही करू नका. लग्न जमले, लग्न झाले की काही दिवसात क्रुपया स्वतःच ग्रुप सोडायचा अथवा मी काढुन टाकील.

आणि सर्वात शेवटचे व सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही एक समाज सेवा असेल. सभासदांना मी ओळखतच असेल असे नाही. मी केवळ एक माध्यम असेल, दुवा असेल. हा ग्रुप म्हणजे एक व्यासपिठ असेल. एक प्रकारचा मोफत वधु-वर परिचय मेळावा. आपली ओळख आपणच करून द्या, ओळखही आपणच करून घ्या. काही मदत लागली तर मला मागा. कोणीतरी नियंत्रक व मध्यस्थ असावा म्हणून मी. मला धन्यवादाशिवाय कसलीही अपेक्षा नसेल....

तेव्हा facebook messenger अथवा Whatsapp, Hike वर 9673945092 या क्रमांकावर बायोडाटा पाठवा व नंतर खालील लिंकवर क्लिक करून ग्रुपचे सभासद बना.

मित्रांनो मला messenger, whatsapp, Hike वर अनेक पोष्टस येतात. अनेकदा पहाणेही शक्य होत नाही. जर यदाकदाचित आपण बायोडाटा पाठवूनही आपली request accept केली गेली नाही तर कृपया एक फोन करून आठवण करून द्या. आपला वधु-वर शोध नक्की सोपा होईल अगदी घरी बसल्या!!! 🙏

 माझा यात काही स्वार्थ नाही. स्थळ शोधताना किती त्रास होतो. किती माणुस हतबल होतो. लोक आपलेच जवळचे कशी गंमत पाहतात. माहीत असुनही स्थळ सांगत नाहीत. हे मी अनुभवलेले आहे. 
समाजात ओळख नसल्याने, कामाधंद्यात व्यस्त असल्याने, घरात कोणी पुढाकार घेऊन करणारे नसल्याने इतरांवर विश्वास ठेवूनही, खर्च करूनही, आपली योग्यता असुनही मनासारखे स्थळ मिळत नाही. म्हणुनच तंत्रज्ञानाचा वापर करून मी अगदी विश्वसनीय व सुरक्षित पद्धतीने समाजाची छोटीशी मदत करत आहे. 
आपले काम सोपे व्हावे, आपल्याला विनाखर्च, विना दगदग, घर बसल्या, कुणाच्याही पुढेपुढे न करावे लागता आपल्या मनासारखे स्थळ मिळावे या निर्मळ इच्छेसह.....

आपलाः बाळासाहेब धुमाळ.
मो. 9673945092.

लिंक👇👇
https://www.facebook.com/groups/184093738877883/

आपलाः बाळासाहेब धुमाळ.
मो. 9673945092.

बारसं

😓😰😷😥
............बारसं.........
विकास प्रक्रियेनं विखारी
कलावंतांना केलं मजुर.
मजुरांना केलं मजुबुर
अन मजबुरांना भिकारी.
छापुन मातर न्यारंच येतय
केवढा! केला विकास म्हणुन...

कुणी करतय सहन गुमान
कुणी राखतय इमान.
कुणी मागतय भिक आळीपाळीनं
कधी अन्नाची कधी कामाची.
कधी प्राणाची तर कधी अब्रुची
जगतेत कसेबसे गुलाम बनुन....

पण बघुन गड्यांनो सारं
दाटतोय कंठ निशब्द.
रडतय मन निराश्रु
गरगरतय डोकं विलक्षण.
घिरट्या घालणारे विचार
उठतेत भयंकर वादळ बनुन....

वाटतय घ्यावी हाती मशाल
ओतावं घासतेल सर्वत्र अन.
पेटवावं सगळच स्वतःसह..
पण घाबरतो की येईल छापून.
भटक्याविमुक्ताने विकास
बेचिराख केला म्हणुन...

हिणवतील माझ्या लेकरांना
गुन्हेगाराची औलाद म्हणून
अन करतील बारसं त्यांचंबी
गुन्हेगार म्हणून!!!
बसवतील एखाद्या सिग्नलवर
भिकारी म्हणुन.....

😓😓😓😓
...बाळासाहेब धुमाळ
मो. 9673945092.

महाराणी सईबाई

मित्रांनो......
रविवारी मी मित्रांसोबत स्वराज्याची पहीली राजधानी किल्ले राजगड पहायला गेलो होतो. चढण्यास अतिशय कठीण व सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा किल्ला पाहून समाधान वाटले, अभिमान वाटला. पण इतर किल्ल्यांप्रमाणेच राजगडही संवर्धनाच्या बाबतीत दुर्लक्षितच दिसला. नेहमीप्रमाणेच दुःख ही झाले. मात्र सर्वाधिक दुःख झाले ते राणी सईबाईंची समाधी पाहुन!!!
भलेही त्यांनी स्वराज्याभिषेक पाहीला नव्हता पण राजेंनी स्वराज्याची शपथ बालपणीच घेतली होती. विवाहापासुनच त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी राजेंना सर्वोतोपरी सहकार्य केले होते. स्वराज्याच्या निर्मिती कार्यात त्यांनी आपल्या पतीला पावलापावलावर साथ दिली होती.
आपल्या १९ वर्षांच्या संसारात त्यांनी संभाजी राजेंसह चार अपत्यांना जन्म दिला होता. पुरंदरवर संभाजी राजे जन्मले तेव्हा भोसले परिवारात प्रचंड आनंद झाला होता. त्या अर्थाने त्या स्वराज्याच्या पहील्या महाराणी होत्या.
छत्रपती शिवाजी राजेंच्या लाडक्या पत्नी व स्वराज्याचे दुसरे राजे छत्रपती संभाजी राजे यांच्या मातोश्री सईबाई! मातोश्री जिजाऊंच्या लाडक्या सुनबाई होत्या त्या. त्यांचा व राजेंचा विवाह जिजाऊंनीच लावून दिला होता. त्या राजमाता जिजाऊंची निवड होत्या. त्यांनी घर संसार व्यवस्थित हाताळला होता.
त्या फलटनचे १५ वे राजे मुधोजी नाईक निंबाळकर यांच्या कन्या व फलटनचे १६ वे राजे बजाजीराव नाईक निंबाळकर यांच्या भगिनी होत्या. निंबाळकर घराणे शुर व घरंदाज राजघराणे होते. शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांची सासरवाडीदेखील फलटणच्या निंबाळकर घराण्यातीलच होती.
सईबाई एक सुंदर, सुशिल, चारित्र्यसंपन्न, बुद्धिमान व निस्वार्थी पत्नी होत्या. संभाजी राजे दोन वर्षाचे असतानाच त्या गेल्या. संभाजी राजेंचा सांभाळ आजी जिजाऊंनी व सावत्र आई सोयराबाईंनी केला. संभाजी राजेंच्या जन्मापासूनच त्या आजारी होत्या. त्या दि.५ सप्टेंबर १६५९ रोजी गेल्या. त्यांच्या निधनाने राजेंना अतिशय दुःख झाले होते. त्यांना जिजाऊंनी सावरले. मी असेही वाचून आहे की शिवरायांच्या म्रुत्यु प्रसंगी त्यांनी "सई" हेच शेवटचे शब्द उच्चारले होते.
मात्र आज स्वराज्याच्या पहील्या महाराणीच्या समाधीवर साधे छतही नसावे हे पाहून मन उदास झाले. उन्हा पाऊसापासुन रक्षण व्हावे म्हणून साधी निवा-याखाली समाधी नसावी हे खेदजनक आहे. हे दुर्लक्ष व ही भग्नावस्था संतापजनक आहे.
शुल्लक व लबाड राजकारण्यांच्या समाधी संगमरवरी आहेत. भव्य स्मारकांच्या गप्पा व श्रेयाची भांडणे आपण रोजच ऐकतो पहातोय. मात्र आपल्या प्रेरणास्थानांची, वारसा स्थळांची, ऐतिहासिक अस्मितांची असलेली दुरावस्था पाहून एरवी गर्वाने शिवाजी महाराजांचा, मराठा साम्राज्याचा व स्वराज्याचा जयघोष करणारे शिवप्रेमी व शासन एवढे उदासीन कसे काय असु शकतात???
कळत नाही.......

... बाळासाहेब धुमाळ.
मो. 9673945092.

विजाभज संघटन

सर्व भटक्या विमुक्त भावाबहीणींनो नमस्कार🙏
आपल्या जातीय संघटना खुप आहेत. म्हणजे मी हमेशा मस्करीत म्हणत असतो," मुठभर लोकांच्या ओंजळभर संघटना"!!!!  माणसं कमी अन पदाधिकारीच जास्त झालेत. संघटना असणे, संघटीत असणे चांगलेच मात्र जास्त संघटना असणे हे असंघटित असल्याचे लक्षणच नव्हे तर पुरावा समजा....
बरे या संघटनांचा भटक्या विमुक्तांच्या चळवळीला काही उपयोगही होत नाही. अनेकांना तर भटके विमुक्तांची चळवळ काय आहे हेच माहीत नाही!!!
तेंव्हा मला वाटते, जातीय संघटनांनी आपापले अस्तित्व व अस्मिता कायम ठेवून शासकिय व राजकीय स्तरावर प्रश्न सोडविण्यासाठी भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटनांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे. जातीय संघटना शासनदरबारी प्रश्न सोडवू शकत नाहीत. शासन कोण्याही एका जातीचे प्रश्न सोडवू शकत नाही. त्यामुळे राजकीय पक्षांची जशी आघाडी वा युती असते त्यापध्दतीने अगोदर जातीय संघटनांची व नंतर भटक्या विमुक्तांची एकच शिखर संघटना असायला हवी.
भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या आज रोजी अनेक नोंदणीकृत संघटना आहेत. आपल्या आवडीनुसार व त्यांच्या योग्यतेनुसार आपली शक्ती त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी करा. आपापल्या रिती परंपरा, भाषा, वेष, कला जोपासा पण सोबतच परस्परांतील नकारात्मक स्पर्धा, असुया, मत्सर हेवेदावे मात्र बाजूला ठेवा. श्रेयाचा विचार सोडून द्या आणि सर्वांनी सर्वांच्या भल्यासाठी एकत्र या...
आपण म्हणजे भटके विमुक्त लोकशाहीमध्ये राजकीय पर्याय बनू शकतो काय? यावरही विचार मंथन करायला हवे असे वाटते. कारण लोकशाहीचा मतदार सर्वात प्रभावी घटक आहे. लोकशाहीत प्रश्न सदनाशिवाय व शासकिय प्रशासकीय टेबलांशिवाय सुटू शकत नाहीत. आणि प्रश्न सुटू शकतात कोणाचे तर जे एकजूट असतात त्यांचे!!! त्यामुळे एकतर पक्ष स्थापन करा अथवा मजबूत व सर्वव्यापी संघटना बनवा. राजकिय पक्षांना देखील आपले महत्त्व समजावून सांगा. सर्वजण (राजकीय पक्ष व मागासवर्गीय संघटना) आपला केवळ वापर करून घेत आहेत मात्र आपल्याला देत काहीच नाहीत. लोकसंख्येत आपण २५% आहोत मात्र असंघटीत आहोत आणि त्यामुळे दुर्लक्षित आहोत म्हणून आता संघटीत व्हा व मागायचे सोडून द्यायला भाग पाडा......✊✊✊✊✊

........बाळासाहेब धुमाळ.
........मो. 9673945092