Sunday 22 April 2018

बलात्कारः एक अमानवी कृत्य

बलात्कारः एक अमानवी कृत्य

मित्रांनो अलिकडच्या काळात मुली महीलांवरील वाढते बलात्कार व हत्या यामुळे अवघा देश ढवळून निघाला आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर आपल्या देशाची नाचक्की होत आहे. आदर्श संस्कृती व संम्रुद्ध परंपरा लाभलेल्या या देशात स्त्रीयांना अत्यंत पवित्र नजरेने पाहीले जात आले आहे. मात्र आता कठुआ, उन्नाव, इंदोर येथील बलात्कार प्रकरणानंतर असे वाटायला लागले आहे की देशातील मानवता संपुष्टात आली आहे की काय? कारण बलात्कार अगदी कोवळ्या जिवांवरही होत आहेत व वृद्धांवरही!! तसेच ते अगदी किशोरवयीन शाळकरी मुलांकडुनही होत आहेत, तरुणांकडूनही होत आहेत व वृद्धांकडुनही!! आडाणी असोत अथवा सुशिक्षित कोणीच अपवाद नाहीत. तसेच ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागात हा घानेरडा व चिड निर्माण करणारा प्रकार घडताना दिसत आहे. असे प्रकार अलिकडे जवळजवळ दररोज घडत आहेत. काही उघड होतात तर काही उघड होत नाहीत. तपास यंत्रणांनी यांच्या मुळापर्यंत जाऊन गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा करायला हवी व यापुढे असे होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे सर्व स्तरातून आवाज उठत आहेत.
आपल्या देशात गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नाही. शिक्षेची भीती वाटेनाशी झाली आहे. कारण शिक्षा कठोर नाहीत. गुन्हेगाराला एखाद्या न्यायालयाने एकदा शिक्षा सुनावली की तिची अमलबजावणी होत नाही. त्याला वरच्या न्यायालयात बाजू मांडण्याची संधी उपलब्ध आहे. यामुळे यातच बराच वेळ जातो. मला वाटते जो काही कसुन तपास व सत्यता पडताळणी करायची आहे ती खालच्या स्तरावरच व्हावी. यामुळे कायदा एक खेळणे बनुन जातो. मुळात तर आपल्याकडे न्याय प्रविष्ट प्रकरणे सुनावणीसाठीच लवकर येत नाहीत. त्याची कारणे अनेक आहेत. मी त्यात जात नाही. पण आपल्याकडे गुन्हा सिद्ध व्हायला व प्रत्यक्ष शिक्षा द्यायला प्रचंड उशीर होतो हे सत्य आहे. तपास काळात तो पारदर्शक होत नाही. शिक्षा झाली तरी ती कठोर होत नाही. परिणामी गुन्हेगारांवर वचक राहत नाही. त्यामुळेच अगदी कालच केंद्रीय कॅबिनेटने अत्यंत कठोर निर्णय घेतला आहे. सरकारने 'पोक्सो' कायद्यात सुधारणा करण्यास परवानगी दिली आहे. 'प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सुअल ऑफेन्स' कायद्यात बदल झाल्यानंतर आता १२ वर्षाखालील चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होणार आहे. सध्या पॉक्सो कायद्यात दोषीला कमीत कमी ७ वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा होते. मात्र आता १२ वर्षांखालील मुलीवरील बलात्का-याला  फाशीच दिले जाईल असा लोकांच्या अपेक्षेप्रमाणे कायदा करून सरकारने बरे केले.
मित्रांनो स्वराज्यात रांझ्याच्या बाबाजी पाटलाने एका स्त्री सोबत गैरवर्तन केल्यावर महाराजांनी त्याचा चौरंग केला होता! (दोन्ही हात व दोन्ही पाय छाटणे) त्याला तर शिक्षा झालीच सोबतच इतरांनाही जरब बसली. आता स्वराज्यातील कायदे व शिक्षापद्धतीचा आदर्श घेऊन सरकारनेही कायद्यात बदल करून बलात्का-यांना अशीच जबर शिक्षा करायला हवी जेणे करून पुन्हा कोणी असे दुष्कृत्य करायला धजावणार नाही. तुम्ही म्हणाल फाशीपेक्षा कोणती मोठी शिक्षा आहे? तर मला वाटत नाही फाशी कठोर शिक्षा आहे. शिक्षा अशी असावी की गुन्हेगार मरुही नये व जगु शकुही नये. आयुष्यभर त्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप वाटावा व त्याने स्वतः लोकांना असा गुन्हा तुम्ही करू नका असा उपदेश करावा. इतर लोक जेव्हा त्याच्याकडे पाहतील तेव्हा त्याला पाहाताक्षणीच त्याने काय गुन्हा केला आहे हे त्यांच्या लक्षात यावे व त्यांच्या मनात अशा गुन्ह्यांबाबत भिती निर्माण व्हावी. दुसरे असे की गुन्हा केला आहे की नाही हे शोधायला वर्षोंवर्षे कशाला लागतात? थातुरमातुर कैद व विलंब अशाने गुन्हे कमी होणार नाहीत आणि असेच होत राहीले तर लोक आरोपींना पोलीसात देण्याऐवजी स्वतःच शिक्षा देतील. फैसला on the spot!! परिणामी अराजकता माजेल.
आज समाजामध्ये प्रचंड असंतोष आहे. प्रत्येकजण अशा घटनांमुळे अस्वस्थ पण हतबल आहे. जेव्हा घटना घडते तेव्हा प्रसार माध्यमातून टिका होते. चर्चा होते. आपण सामाजिक माध्यमातून निषेध नोंदवतो आणि शांत बसतो. मी तर या सर्व प्रकारामुळे प्रचंड अस्वस्थ आहे. मीच काय आपण सर्वच अस्वस्थ आहोत कारण सर्वांनाच आई, बहीण, बायको, मुलगी, भाची, पुतनी, नात आहे. आपल्या देशात स्त्री चारित्र्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाश्चिमात्य देशात बलात्काराकडे एक अपघात म्हणून पाहीले जाते मात्र आपल्याकडे तसे नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे बलात्काराला स्त्रीला जिम्मेदार समजले जाते! तिचे राहणीमान, तिचे स्वातंत्र्य, तिचा स्वाभिमान यामुळेच असे घडले असावे असा तुघलकी तर्क काढला जातो. बलात्कारात महीलेची चुक असण्याचा प्रश्नच कसा काय येऊ शकतो हेच मला कळत नाही? पुरूष आपल्या पाशवी शक्तीचा वापर करून आपली अतिरेकी कामवासना शमविण्यासाठी अत्याचार करतो. हा एक कठोर गुन्हा आहे. यात महीलेचा कसलाही दोष नसतो मात्र तरीही बलात्कारानंतर पिढीतेचे अवघे जिवनच नष्ट होते. जर पिढीता विवाहित असेल तर तिचा संसार उद्ध्वस्त होतो. पतिकडून सासरकडून तिला वाळीत टाकले जाते. तिला अपमानास्पद वागणूक दिली जाते. परिणामी बिचारी वाममार्गाला लागते अथवा आत्महत्या करते. हेच अविवाहित मुलीच्या बाबतीत घडले तर तिच्यावर याचा एवढा प्रचंड मानसिक व शारिरीक परिणाम होतो की त्यातून ती सावरतच नाही. तिचा मित्रपरिवार कुटुंबातील सदस्य तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहातात. तिचे लग्न जमत नाही. जरी जमले व झाले तरी कोणीतरी तिला ब्लॅक मेल करुन तिचे पुन्हा पुन्हा शोषण करते. जेव्हा भुतकाळ समोर येतो तेव्हा तिचा सासर कडून छळ होतो व तिला मारुन टाकले जाते अथवा घटस्फोट दिला जातो. बदनामीच्या भितीने व पुढच्या त्रासाच्या भितीने बहुतांश वेळा बलात्कार उजेडातच आणले जात नाहीत. परिणामी गुन्हेगार सोकावतात. बलात्कारामुळे मुली महीलांचे अवघे आयुष्य नष्ट होते. आत्महत्या, वेश्याव्यवसाय, गुन्हेगारी याकडे वळलेल्या मुली महीला या सर्वसाधारणपणे बलात्काराने पिढीत असतात. याचे कारण म्हणजे समाज! समाज बलात्कारानंतर महिलेकडेच आरोपीच्या नजरेने पाहतो. हे चुकीचे आहे ज्यात स्त्रीचा कसलाही दोष नसतो. ज्यात तिच्यावरच अन्याय होतो. त्यात तिला दोषी कसे काय समजले जाऊ शकते?

मित्रांनो मी जेंव्हा एकांतात विचार करत बसतो तेव्हा मला असे वाटते की ही अशी कृत्ये केवळ वासनांधतेमुळे होत नसावीत. कारण अनेक प्रकरणात अगदी बालके, व्रुद्ध, विकलांग ते त्रुतियपंथी देखील असे कृत्य करताना समोर आले आहेत. हे सगळे पाहुन माझे मन सुन्न होते व यावर कायमस्वरूपी पर्याय काय असु शकतो? या द्रुष्टीने मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला काही उपाय सुचतात जे मी आपल्या समोर मांडतो. पहीले म्हणजे बलात्काराकडे पहाण्याची द्रुष्टी. यात पिढीतेकडे पहाताना निर्दोष द्रुष्टीने पाहीले पाहीजे. तिला समजून घेऊन तिला पुन्हा जिवन जगण्यासाठी उभे केले पाहिजे. तिचा हरवलेला आत्मविश्वास तिला परत मिळवून दिला पाहिजे व तिच्याकडे सन्मानजनक नजरेने पाहीले पाहीजे. ना तिरस्कार ना सहानुभूती दाखवता काही घडलेच नाही या अविर्भावामध्ये की हे कोणाशीही घडू शकते हे समजून घेऊन वागले पाहीजे. दुसरे म्हणजे बलात्कार दडवून नाही ठेवले पाहीजेत आणि बलात्कार झाला म्हणजे स्त्रीच्या द्रुष्टीने आभाळ फाटल्यासारख्या द्रुष्टीने नाही पाहीले पाहिजे. हा एक अपघात होता असे समजुन गुन्हेगाराला सर्वांसमक्ष आणणे व त्याला कायद्याच्या कचाट्यात आणणे याला महत्त्व दिले पाहिजे. यात कुटुंबाने तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. मुली स्त्रियांना शारिरीक व मानसिक द्रुष्ट्या सशक्त व मजबूत बनविले पाहीजे. संकटसमयी ती स्वतःचा बचाव कसा करु शकेल याचे कुटूंबातुन व शासनाकडून प्रशिक्षण तीला मिळाले पाहिजे. अत्याचार होत असताना अथवा झाल्यावर स्त्रीनेच आरोपीला स्वसंरक्षणार्थ अद्दल घडवावी यासाठी तिला कायद्याने शस्त्र बाळगण्याची परवानगी असावी व चालविण्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात यावे. स्वसंरक्षणार्थ तिच्याकडून झालेल्या कृतीला अपराध समजले जाऊ नये. (अर्थात तपासा अंती)

हे झाले महीलांच्या बाबतीत, पुरूषांच्या बाबतीत अशा गुन्ह्याला माफी नसावी. जलद व पारदर्शक तपासणी व तात्काळ कठोरात कठोर शिक्षा व्हावी.(फाशी कठोर शिक्षा नाही) जेणेकरून असा गुन्हा करायला कोणी धजावणार नाही. शिक्षेची भिती निश्चितपणे गुन्ह्याचे प्रमाण कमी करू शकते मात्र मला वाटते हा प्रकार केवळ शिक्षेने समुळ नष्ट होईल असे अजिबात वाटत नाही. कारण ज्या देशांमध्ये कठोर शिक्षा आहेत उदाहरणार्थ अरब देश, तेथेही गुन्हे घडतातच. त्यामुळे केवळ शिक्षा हा बलात्कार संपविण्यामागील पर्याय ठरू शकत नाही. शालेय शिक्षणात मुल्य शिक्षण व लैंगिक शिक्षण दोन्ही प्रकारचे शिक्षण प्रभावीपणे दिले गेले पाहिजे. कुटुंबात संस्कार केले गेले पाहीजेत. विभक्त कुटुंब पद्धती, पालकांचे व्यस्त जीवनमान, टीव्ही मोबाईलचा अतिरेक व घरातील एकंदरीत उदासीन व असंतुलित वातावरण यामुळे मानसिक संतुलन ढासळत चालले आहे. मुलाचे कुटूंबात व शाळेत फाजील लाड होता कामा नयेत. घरात धार्मिक व अध्यात्मिक वातावरण ठेवले तर मन प्रसन्न राहुन घाणेरडे विचार मनात येत नाहीत. मित्रांनो अगदी साधु संत व पुरोहीतही चुकीचे वागताना सापडले आहेत. मात्र आपण हे समजुन घ्या की ते खरे साधु संत अथवा पुरोहित नव्हतेच. ते एक व्यावसायिक होते. खरे अध्यात्म विचारांवर व वर्तनावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते मग धर्म कोणताही असो. अध्यात्मिक व नैतिक शिक्षण व्यक्तीच्या मनावर निश्चित चांगला परिणाम करते.
अश्लील चित्रे व मजकूर, टिव्ही, मोबाईल व इंटरनेटवरील द्रुष्ये यामुळे पाशवी लैगिक इच्छा प्रबळ होतात. पाँर्नमुळे उत्तेजित होण्याचा प्रकार होतो. त्यावर कायद्याने बंदी घातली गेली पाहीजे. पण दुसरीकडे अगदी ग्रामिण आडाणी लोक, ज्यांचा आणि या बाबींचा कधीही संबंध येत नाही तेही बलात्कारासारखी कृत्ये करताना पकडले जात आहेत. ते ही वयाचा विचार न करता!! असे का होत असावे? तर अशा कृत्यांमागे मनोरुग्नता, अंधश्रद्धा, नशा, धार्मिक द्वेष, वैयक्तिक दुश्मनी अशीही कारणे असु शकतात. याचे कारण मला वाटते पर्यावर्णीय ( ecological), रासायनिक (chemical) व जैविक (genetical) बदल हे असावे. त्यामुळे बलात्का-याला कठोर शासन करणे व बलात्कार होऊ नयेत यासाठी उपाय योजना करणे या दोन्ही पातळ्यांवर कार्य व्हायला हवे. शिक्षेबरोबरच प्रबोधन, उद्बोधन व्हायला हवे.
संशयितांवर  वैद्यकीय (मानसिक व रासायनिक) उपचार व्हायला हवेत. खासकरून ज्यांनी यापुर्वी असे छोटे मोठे गुन्हे (विनयभंग, बळजबरी) केले आहेत त्यांच्यावर. औषधौपचाराने अशांच्या पाशवी इच्छेचे शमन वा दमन करायला हवे. अतिरेकी कामवासना वैद्यकिय इलाजाने नष्ट करायला हवी. यात संशयितांच्या कुटुंबियांनी मागे राहाता कामा नये. लक्षण दिसताच डॉक्टरांना भेटुन उपाय करायला हवेत. जर मनामध्ये असे विक्षिप्त विचार येत असतील तर स्वतःवर नियंत्रण ठेवून तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा. औषधोपचार व समुपदेशन (medicenal treatment and counseling) घ्यायला हवे. तरच हे प्रकार बंद होतील. शिक्षा तर कठोर असावीच मात्र कठोर शिक्षेसोबतच समुपदेशन, औषधोपचार, उद्बोधन, प्रबोधन असेही मार्ग योजायला हवेत. तरच हा प्रश्न सुटेल. अशी मानसिकता बालपणी कुटुंबात कुटुंबियानी, शाळेत शिक्षकांनी ओळखुन त्यावर वैद्यकीय उपचार करायला हवेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शाळेने, मित्रांनी कुटुंबियांकडे शिफारस करताना थोडाही विलंब करु नये व संबंधित कुटूंबाने अथवा समस्या ग्रस्त पुरुषाने देखील उपचार घेण्यात कमीपणा अथवा अपमान समजू नये. कारण वेळीच घेतलेली खबरदारी पुढचा अनर्थ टाळु शकते. A stitch at time saves nine.
ब-याचदा असले रोग आपली लक्षणे दाखवत असतात मात्र तो पुरूष स्वतःकडे तसेच त्याचे कुटुंब, मित्र परिवार व समाज त्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी काळ सोकावतो व पुन्हा पुन्हा असे प्रकार घडतात हे आजवरच्या पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे.
आज जर विज्ञान (medical science) एवढे प्रगत अवस्थेत आहे तर अशीही एखादी लस शोधली जावी जी बालपणीच मुलांना टोचली की पुढे पुरुष किशोर वयात, तरुणपणात अथवा आजीवन लैंगिक द्रुष्ट्या पाशवी व अतिरेकी होणार नाहीत. त्यामुळे बलात्काराकडे बघण्याचा द्रुष्टीकोन बदलला, गुन्हेगाराला कठोर व जलद शिक्षा केली व बलात्कार होणार नाहीत यासाठी धोरणात्मक उपाययोजना केल्या तरच हा लांच्छनास्पद व मानवतेला काळीमा फासणारा अमानवीय प्रकार समुळ नष्ट होईल. आणि मला नाही वाटत हे अशक्य आहे. जर आपण माझ्या मताशी सहमत असाल तर समाजात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी अधिकाधिक लोकांपर्यंत हा संदेश पोचवा ही नम्र विनंती.

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9673945092.

No comments: