Wednesday 15 September 2021

शब्द स्वरूपी गणा......

 शब्द स्वरूपी गणा......


मंडळी, विघ्नहर्त्या लाडक्या गणरायाचा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतवर्षातील एक पवित्र, मंगलमय, आनंददायी आणि प्रत्येकाच्या मनामनात प्रेम, मैत्री, आपलेपणा निर्माण करणारा, सर्वांना एकत्र आणून एकजीव करणारा  लोकोत्सव! परंतु वर्तमान कोरोना संकटामुळे हा आनंदोत्सव यंदाही काहीसा झाकोळला आहे! असे असले तरी बाप्पांच्या चाहत्यांच्या आनंदामध्ये व उत्साहामध्ये कुठेही कमी जाणवत नाहीये. जो तो आपापल्या परीने त्याची व्यक्तिशः आराधना करीत आहे. बाप्पा हा खास करून बालभक्तांच्या आणि तरुण-तरुणींच्या प्रेमाचा विषय असतो. ही मंडळी आपापल्या स्टाईलने त्याच्यावर प्रेम करत असते! मी काही गणेशभक्त तर असेही पाहिले आहेत जे त्याला अक्षरशः आपल्या अंगावर गोंदवून घेतात!

गणेशोत्सव म्हटले की संगिताचा थरार आलाच. केवळ थरारच नव्हे तर सर्व प्रकारचे संगीत त्यात आले. हा एक प्रकारचा भक्तीनादच असतोय म्हटले तर वावगे ठरणार नाही! कारण मुळातच गणपती म्हणजे चौदा विद्या आणि चौसष्ठ कलेचे अधिपती! परंतु कोरोना निर्बंधांमुळे गर्दी जमविणाऱ्या कार्यक्रमांवर दुर्दैवाने बंधने आली आहेत. स्वाभाविकच कलावंत व कलाप्रेमी गणेशभक्त दोघेही हिरमुसलेले आहेत. त्यांच्या आनंदावर काहीसे विरजण पडले आहे.

खरेतर संगीत हे रसिकांसाठी केवळ एक मनोरंजनाचे साधन असते परंतु कलावंतांसाठी ते त्यांचा ' जीव की प्राण ' असते! ते त्यांचा श्वास असते! त्याच्याशिवाय हे लोक जगूच शकत नाहीत! कलाकारांसाठी कला हिच आराधना असते! त्यातही गणेश म्हणजे कलेची देवता. ही देवता कलावंतांना ऊर्जा, उत्साह, सृजनशीलता आणि समृद्धीसह प्रतिष्ठा प्रदान करीत असते! आणि म्हणूनच कलाकार आपल्या सादरीकरणा प्रारंभी आपल्या लाडक्या गणेशाचे स्तवन करीत असतात. विना संकट त्यांचा कार्यक्रम सिद्धीस जावो, एक चांगले सादरीकरण त्यांच्या हातून होवो, यासाठी ते एक प्रकारे गणेशाचा आशीर्वाद घेत असतात. "शाहीरी, तमाशा, नाटक, गोंधळकला या व इतरही कला प्रकारांमध्ये प्रारंभी जे सांगीतिक गणेश वंदन केले जाते त्याला ' गण ' असे संबोधतात" एक प्रकारे गण म्हणजे ताल-सूर रुपी पुष्पांद्वारे गणेशाला वाहिलेली पुष्पांजलीच जणू! जणुकाही ती एक प्रकारची शब्दरूपी आळवणच असतेय!

कोरोना महामारीच्या काळात, कलावंत आपल्या लाडक्या बाप्पाला ही सांगीतिक मानवंदना रंगमंचावरून देऊ शकत नाहीयेत! याची त्यांनाही खंत आहे व रसिकांनाही खंत आहे! असे असले तरी अलीकडे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, सोशल माध्यमांच्या सहज उपलब्धतेमुळे काही युवा कलावंत, थोड्याफार प्रमाणात का होईना परंतु कला विश्वाला आपले योगदान देतच आहेत. विषय बाप्पांचा आहे! त्याला मानवंदना देण्याचा आहे! आणि आपण शांत कसे काय बसु शकतो? म्हणून काही युवा शाहिर एकत्र आले व त्यांनी गटाने एक सांगीतिक मानवंदना देणारा एक अत्यंत सुमधूर व सुश्राव्य ' सामूहिक शाहिरी गण ' निर्माण केला जो सध्या युट्युबवर प्रचंड गाजतोय! रसिक श्रोत्यांना या गणाने अक्षरशः भुरळ घातली आहे. या गणाचे बोल आहेत...

शब्द स्वरूपी गणा नमितो, ऐक रसिका जरा |

 ताल सुरांनी आळवितो मी, रिद्धी-सिद्धीच्या वरा ||

या गणाचे गायक आहेत शाहीर रामानंद उगले, शाहीर प्रसाद, शाहीर होनराज, शाहीर पृथ्वीराज, शाहीर माधवी, शाहीर यशवंत, शाहीर अजिंक्य, शाहीर संतोष, शाहीर कांचन, शाहीर मनोज थोरे, शाहीर विजय, शाहीर विक्रांत शिवानी कुलकर्णी इत्यादी. गणाचे संगीतकार आहेत रामानंद-कल्याण ही बंधू जोडी! त्यांच्या संगीताला समृद्ध बनवलेय त्यांनी, ज्यांना मी या गणाचे खास आकर्षण संबोधिल असे, ढोलकी सम्राट आदरणीय पांडुरंग भाऊ घोटकर व सुप्रसिद्ध ढोलकी वादक श्री. कृष्णा मुसळे यांनी! त्यांना साथ दिली आहे, सागर उदावंत आणि अर्थातच कल्याण उगले यांनी! या गणाचे कोरस म्हणजे सह गायक देखील सर्वच छान आहेत. सर्वांनी छान साथ दिली आहे. खरेतर गण कर्णमधुर व सुश्राव्य व्हावा यासाठी सर्वांनीच आपापले संपुर्ण योगदान दिले आहे. सर्वांचेच सादरीकरण अप्रतिम झाले आहे. तांत्रिक टिमने देखील आपली जिम्मेदारी अतिशय व्यवस्थित पार पाडली आहे. सर्वांचेच करावे तेवढे कौतुक कमीच आहे.


परंतु असे असले तरी, माझ्या मनाला अधिक स्पर्श करून गेले आहेत, ते या गणाचे बोल! अर्थात या गणाचे गीत! गणातील अगदी शब्दंशब्द अत्यंत वजनदार, रुबाबदार, अर्थपूर्ण, शोभिवंत आणि हृदयाचा ठाव घेणारा आहे. एखाद्या कवीचे काव्यविश्व कसे समृद्ध असावे? त्याचा शब्दसागर कसा अथांग आणि विशाल असावा? आणि त्यातील शब्दरूपी मोत्यांची गुंफण त्यातील लाटांप्रमाणे कशी लयबद्ध असावी? त्याचे कवित्व कसे कलेसाठी कल्याणकारी असावे? याचा प्रत्यय हा गण ऐकल्यावर येतो!

गाणे, मग ते कोणतेही असो, ते जर पडद्यावरील असेल किंवा मंचावरील असेल तर ते ओळखले जाते, ते कुणावर चित्रीत झाले आहे त्याच्या नावावरून किंवा मग ते कोणी सादर केले आहे त्याच्या नावावरून किंवा पडद्यावर किंवा मंचावरील नसेल तर मग ते ओळखले जाते ते कोणी गायले आहे? त्या गायकाच्या नावावरून! परंतु मला असे वाटते, " गाणे बनते ते गीत व संगीत यांच्या पवित्र मिलाफातून " यातही गीत महत्त्वाचे ? की संगीत महत्त्वाचे? हा नेहमीचाच कोड्यात टाकणारा प्रश्न! कारण आपण अनेकदा पाहतो, कसलीही गीत प्रतिभा नसलेले साधे गाणे देखील केवळ त्याच्या उडत्या संगीतामुळे प्रचंड लोकप्रिय बनते! परंतु त्याची ही लोकप्रियता चिरकाल टिकून राहात नाही! श्रोत्यांना ते ठेका धरायला लावते खरे परंतु मंत्रमुग्ध करीत नाही! जोवर गाण्यात गायकाचा प्राण उतरत नाही तोवर ते गाणे श्रोत्यांच्या अंतकरणात उतरत नाही आणि त्यासाठी लागते चांगले गीत!!! गीत चांगले असलेले गाणे, म्हणजे शब्द चांगले असलेले गाणे वर्षांनुवर्षे रसिकांना आपलेसे करून ठेवते!

या गणाचा गीतकार आहे युवा लोककलावंत कल्याण उगले. त्याने गणामध्ये शब्दांची वर्णिलेली महती, थेट काळजाला जाऊन भिडते! मानवी भावनांचा ईश्वराशी थेट भेट घडवते! मला वाटते कल्याण उगले हा एक असा हिरा आहे, ज्याला अनेक पैलू आहेत! तो एक गीतकार तर आहेच. त्याने आजवर अनेक गीते लिहिलेली आहेत, जी लोकप्रिय देखील झाली आहेत. सोबतच हे एक चतुरस्त्र व हरहुन्नरी कलामिश्रण आहे! वडील शाहीर आप्पासाहेब उगले यांच्याकडून त्याला काव्यप्रतिभा तर ढोलकी सम्राट गुरुवर्य पांडुरंग भाऊ घोटकर यांच्याकडून त्याला वाद्यप्रतिभा लाभली आहे! कल्याण हा एक अति उत्कृष्ट ढोलकी वादक आहे! एवढेच नव्हे तर तो एक निष्णात बहुवाद्य वादकही आहे हे विशेष! आपण संगीत क्षेत्रामध्ये नेहमी पडद्यावरील चेहराच लक्षात ठेवतो, त्याचेच चाहते होतो परंतु पडद्यामागच्या व्यक्तीला मात्र लक्षात ठेवत नाही. परंतु वास्तव तसे नसतेय! " प्रेक्षक वा श्रोते हे घुंगरांचे वेडे असतात परंतु घुंगरू मात्र ढोलकी आणि लेखणीचे वेडे असतात!" ही जादू असतेय बोटांची! आणि हा कल्याण तर असा अवलिया आहे...  ज्याची बोटे ढोलकीवर व कागदावर, दोन्हीवरही कमालीची जादू दाखवतात!!

मी त्याला बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. तो एक तंत्रस्नेही लोककलावंत आहे. आपल्या कामामध्ये तो हमेशा तंत्रज्ञानाचा वापर करीत असतो. तो सतत नाविन्यपूर्ण सांगितिक प्रयोग करत असतो आणि माझ्या दृष्टीने हेच त्याला अधिक श्रेष्ठ बनविते! असे सांगितिक प्रयोग केवळ कलावंतालाच नव्हे सकळ कलेला श्रीमंत बनवित असतात! त्याचा आजवरचा प्रत्येक सांगीतिक प्रयोग, श्रोत्यांना संगीत नभात पोहोचविण्यात यशस्वी झालेला आहे. प्रत्येक वेळी रसिक श्रोता त्याच्या निर्मितीमध्ये रममाण झालेला आहे. सदरचा, "शब्द स्वरूपी गणा" हा गण साधारणपणे सहा मिनिटांचा आहे. असे असले तरी ऐकत असताना तो कधी संपतो हे कळतही नाही! आणि आपण पुन्हा तो रिप्ले करण्यास मजबुर होतो! आणि यालाच सांगीतिक यश म्हणायचे!

तेव्हा शेवटी मी असेच म्हणेल की, या बहुदा पहिल्याच सामूहिक शाहिरी प्रयोगातून सर्व लोककलावंतांनी केलेली  ही आर्त सांगीतिक आळवण, बाप्पाला प्रसन्न करो आणि लवकरात लवकर या कोरोनारुपी राक्षसाचा नाश होऊन पुन्हा एकदा कलामंदिरे, रंगमंदिरे रसिकांनी ओसंडून वाहोत, कलामंच, व्यासपीठे पुन्हा कलावंतांनी सजोत आणि कलावंतांचा कोंडलेला श्वास एकदाचा मोकळा होऊन पुन्हा त्यांचे जीवन गणेशाच्या जास्वंदाप्रमाणे फुलो, पुन्हा पहील्यासारखीच लोककला बहरास येवो, शब्द ताल सुर लय यांचा हा झरा पुन्हा अखंड वाहत राहो आणि लोककलेचे 'कल्याण' होवो हिच गणरायाचे चरणी नम्र प्रार्थना.

बाळासाहेब (बालाजी) धुमाळ

मो. 9421863725.


Monday 30 August 2021

विमुक्तांचा स्वातंत्र्य दिन चिरायू होवो

 


✂️✂️✂️✂️

ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीला छेद देण्यासाठी देशात सन 1857 ला सशस्त्र राष्ट्रीय उठाव झाला. या उठावाची तयारी बरीच वर्षे अगोदर पासून सुरू होती आणि यासाठी पुढाकार घेतला होता इथल्या भटक्या जमातींनी! त्यांच्या टोळ्यांनी! दुर्दैवाने हे बंड म्हणजे पहीले स्वातंत्र्य युद्ध अयशस्वी ठरले! परंतु या बंडाचे कारण कोण होते? हे धुर्त इंग्रजांच्या लक्षात आले आणि त्यांनी 1871 मध्ये क्रिमिनल टाईब्स एक्ट नावाचा जुलमी व जाचक कायदा तयार करून देशातील 196 भटक्या जमातींना गुन्हेगार जमाती समजून 52 कँटोन्मेंटस्मध्ये बंदिस्त केले. सन 1952 मध्ये स्वतंत्र भारताच्या सरकारने त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून त्यांना #विमुक्त केले आणि तेव्हापासून सर्व विमुक्त बंधू-भगिनी 31 ऑगस्ट हा आपला #विमुक्ती_दिवस म्हणून साजरा करतात! "खऱ्या अर्थाने हा त्यांचा #स्वातंत्र्य_दिवसच आहे असे मी समजतो, जो भारतीय स्वातंत्र्याच्या पाच वर्षांनंतर उशिराने साजरा करण्याची त्यांना संधी मिळाली!" त्या सर्व विमुक्त भावा-बहिणींना स्वातंत्र्यदिनाच्या मनापासून मन भरून शुभेच्छा❤️💐👏👏 बांधवांनो, आजही Habitual Offender's Act आहे आणि तो आजही आपले शोषण करतोय! तो समुळ नष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याशिवाय आपल्यावरील हा गुन्हेगारीचा डाग मिटणार नाही. तो मिटविण्याचा संकल्प आजच्या दिवशी करूयात.✊✊✊ पुन्हा एकदा सर्व विमुक्त भावाबहीणींना स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा.❤️💐👏👏👏


बाळासाहेब धुमाळ

9421863725.



Monday 9 August 2021

सावधान! ओबीसी आरक्षण संपुष्टात येतेय!!!

सावधान! ओबीसी आरक्षण संपुष्टात येतेय!!!


                    सध्या ओबीसी समाजकारण व राजकारण चांगलेच तापले आहे. कारण अलीकडच्या काळात ओबीसींच्या जीवनावर परिणाम करतील असे अनेक न्यायालयीन व सरकारी निर्णय आले आहेत. केंद्र सरकारने अलीकडेच 102 वी घटना दुरुस्ती करून ओबीसी आयोगाला घटनात्मक अधिष्ठान प्राप्त करून दिले. ओबीसी मध्ये इतर जातींना समाविष्ट करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना दिले. राज्य सरकारची शिफारस, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचा अहवाल, केंद्र सरकारची शिफारस आणि माननीय राष्ट्रपती महोदयांचे शिक्कामोर्तब अशी ती प्रक्रिया होती. परंतु त्यातही आता बदल होतोय! पुन्हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास जाती ठरविण्याचे अधिकार केंद्र सरकार हे राज्य सरकारांना बहाल करतेय! आता यासाठी केंद्र सरकारला पुन्हा एकदा निश्चितच यासाठी घटना दुरुस्तीच करावी लागेल तरच ती न्यायालयात टिकेल. खरे तर ही केंद्रानेच 2018 मध्ये 102 वी घटनादुरुस्ती करून केलेली चुक होती परंतु ती आता 127 व्या घटनादुरुस्तीने दुरुस्त केली जातेय! त्याचबरोबर राज्यांमध्ये ज्या ओबीसींशी संबंधित महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, त्यामध्ये ओबीसींचे पदोन्नतीमधील आरक्षण थांबणे! ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण संपणे! आणि इतर अनेक मुद्दे आहेत. सर्वच राज्यांमध्ये तिथल्या तिथल्या असंतुष्ट जाती स्वतःला ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करीत आहेत. 102 व्या घटना दुरुस्तीमुळे केंद्र सरकारवर दबाव वाढत होता. राजकारण बिघडत होते म्हणून केंद्राने आता ही जिम्मेदारी राज्यांवर सोपविली व एकप्रकारे आपली सुटका करून घेतली आहे! परंतु असा निर्णय घेतला तरी केंद्र सरकार आरक्षणाची मर्यादा वाढवणार आहे काय? हे महत्त्वाचे आहे. कारण माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या बेंच ऑफ जजेसचा स्पष्ट निकाल आहे की आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांच्यावर जाऊ शकत नाही! जर राज्य सरकारे पन्नास टक्क्यांहून अधिक आरक्षण देऊ शकत नसतील तर मग राज्यांना शैक्षणिक व मागास सूचीमध्ये जातींना समाविष्ट करण्याचा अधिकार देऊन काय साध्य होणार आहे? उलट यामुळे जातीजातींमध्ये भांडणे सुरु होतील. अमागास जाती ओबीसीमध्ये येण्यासाठी आक्रमकपणे प्रयत्न करतील तर मूळ ओबीसी जाती नवीन जातींना आपल्यामध्ये समाविष्ट करण्याला कडाडून विरोध करतील! परिणामी सहाजिकच सामाजिक सलोखा व सामंजस्य धोक्यात येईल.

               बरं ही यादी केवळ राज्यांची यादी असेल की केंद्राची यादी असेल? म्हणजे ओबीसींची केंद्राची सूची व राज्यांची ओबीसींची सूची वेगवेगळी असते आणि आणि ती असलीच पाहिजे असे माझे अगदी वैयक्तिक मत आहे. आता 127 व्या घटनादुरुस्तीमुळे जर एखाद्या राज्याने एखाद्या जातीला किंवा जातींच्या वर्गाला एसईबीसी म्हणून आरक्षण दिले (कारण एसईबीसी म्हणजेच ओबीसी हे लक्षात घ्या!) तर ते आरक्षण केंद्र सरकारच्या ओबीसी यादीमध्ये समाविष्ट होईल काय? हे ही स्पष्ट व्हायला हवे. केंद्र सरकारवरचा घटनात्मक, न्यायालयीन व राजकीय दबाव वाढला व परिणामी केंद्राने पुन्हा एकदा सर्व राज्यांना ओबीसी जातींना ओळखून ओबीसी म्हणून समाविष्ट करून घेण्याचे अधिकार देण्याचा लोकप्रिय निर्णय घेतला. असे असले तरी हा निर्णय सरळ सरळ राजकीय आहे हे दिसून येते. 127 वी घटना दुरूस्ती संसदेत सुरू आहे. परंतु ही घटनादुरुस्ती निव्वळ धूळफेक आहे आणि नुसती धूळ फेकच नाही तर ते जाती-जातींमध्ये भांडणे लावण्याचे षड्यंत्र आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. या घटनादुरुस्तीमुळे आता राज्यांंना आपल्या राज्यातील ओबीसी ठरविण्याचा तसेच ओबीसींचे विभाजन करण्याचा देखील अधिकार प्राप्त होणार आहे. आता राज्य सरकारांवरील दबाव वाढणार आहे. राज्यांमध्ये तणाव वाढणार आहे. परंतु आरक्षणाची टक्केवारी वाढविण्याचा अधिकार जर नसेल तर आरक्षण देणार कसे? कुणाचे कमी करणार? ते प्रत्यक्षात शक्य आहे काय? मराठा बांधवांना व देशभरातील अनेक क्षत्रिय समाज बांधवांना, सामाजिक मागासलेपणाची जाणीव झाली आहे व आता त्यांना आरक्षण हवे आहे, मीही त्यांचे समर्थन करतो कारण सब घोडे बारा टक्के नसतात. कोणाच मागास घटकाचा याला विरोध नाही. एससी एसटीचा तर असण्याचा प्रश्नच येत नाही परंतु ओबीसींचाही नाही. ओबीसींचे केवळ एवढेच म्हणणे आहे की, आमच्यात देऊ नका शिवाय आमच्या वाट्याचे काढून देऊ नका. त्यांना त्यांचा स्वतंत्र वाटा द्या. आणि इथेच घोडे अडतेय! आता हा पेच सुटणार कसा? त्यामुळे जोवर आरक्षणाची 50% ची मर्यादा संपुष्टात येत नाही व जातनिहाय जनगणना होत नाही तोवर आरक्षणाचा हा देशभरातील किचकट बनत चाललेला प्रश्न मिटणार नाही. शिवाय क्षत्रियांचे सामाजिक मागासलेपण सर्वोच्च न्यायालयाने मान्यही केले पाहिजे ना? राजकारणी आश्वासन देत असतात. व्होटबँकेला खुष करण्यासाठी कधी कधी लोकप्रिय निर्णय घेत असतात परंतु ते राज्यघटनेच्या चौकटीत बसतात का कोर्टात टिकतील का? याचा विचार करीत नाहीत. द्याचेय ना? तर मग सरकारांनी ते कोर्टात टिकवूनही दाखविलेही पाहिजे. मग त्यासाठी जे काही आवश्यक असेल ते करा. इथे सहाजिकच पुन्हा एकदा घटनादुरुस्तीच आवश्यक आहे. जर सवर्ण आरक्षणासाठी होऊ शकते तर मग ओबीसींसाठी का होछ शकत नाही? हे जोवर आपल्या लक्षात येणार नाही, खासकरून देशभरातील क्षत्रिय बांधवांच्या लक्षात येणार नाही, तोवर हाडकाच्या मागे पळणाऱ्या कुत्र्यासारखी आपली अवस्था होईल. आपण कुत्रा शब्दावर जोर देऊ नका, शब्दामागील अर्थ समजून घ्या, हे अमिष आहे, प्रलोभन आहे, मुर्ख बनविण्याचा कार्यक्रम आहे, राजकारण आहे, शाळा आहे, उत्थान नाही. आज देशातला ओबीसी, जो देशाच्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक आहे! त्याला केवळ 27 टक्केच आरक्षण आहे! हा अन्याय नाही का? तर वरून तेही धोक्यात आले आहे! केवळ आरक्षणच नव्हे तर संपूर्ण अस्तित्वच धोक्यात आले आहे! मग ते शैक्षणिक असो, आर्थिक असो, सामाजिक असो वा राजकीय असो! परंतु दुर्दैवाने ते ओबीसींच्या लक्षातच येत नाहीये. वेळ निघून गेल्यानंतर पश्चाताप करण्याची ओबीसींची जुनीच सवय आहे!

                 एका बाजूला ओबीसींमध्ये समाविष्ट होण्याची व ती करून घेण्याची धडपड सुरू आहे. अगदी तसे शर्थीचे प्रयत्नच सुरू आहेत! तर दुसरीकडे ओबीसी निद्रिस्त आहेत! जो काही ओबीसींचा लढा सुरू आहे, तो प्रलोभने देऊन ज्याला आपण चॉकलेट म्हणतो ते देऊन! म्हणजे पदांच्या स्वरूपात चॉकलेट देऊन किंवा मग पदाचे गाजर  दाखवून संपविण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न सुरू आहे. ओबीसींचे विभाजन करण्यासाठी न्यायमूर्ती रोहिणी आयोग नेमला गेला आहे. तो नेमून आता जवळजवळ चार वर्षे होत आहेत! अगदी 2017 मध्ये तो नेमला गेला होता. त्याच्याही बाबतीमध्ये तारीख पर तारीख पर तारीख सुरू आहे! परंतु याचेही फायदे तोटे आपण समजून घेतले पाहिजेत. नक्कीच काही वंचित उपेक्षित ओबीसींना विभाजनाचा लाभ होईल परंतु यामुळे देशव्यापी ओबीसींची चळवळ मात्र संपुष्टात येईल. आपण महाराष्ट्रात पाहतोय की, विमुक्त जातींची चळवळ वेगळी असतेय! भटक्या जमाती 'ब' मधील मुळ भटक्या जमातींचे समाजकारण त्यांची चळवळ वेगळी असतेय! तशीच 'क' आणि 'ड' ची चळवळ देखील वेगळी असतेय! शिवाय ओबीसींचीही वेगळी असतेय! तिथेही कुणबी, माळी, तेली, कुंभार अशी वर्चस्वाची लढाई सुरूच असतेय! विमुक्त स्वतःला भटके समजत नाहीत, जे ते आहेत व होते! भटके स्वतःला ओबीसी समजत नाहीत, जे ते आहेत! विमुक्त व भटके दोघेही स्वतःला एकत्रितपणे डीएनटी समजत नाहीत! स्वतःला ओबीसी समजत नाहीत, जे ते आहेत! मग अशाच प्रकारे हे चालत राहिले तर देशभरातील ओबीसींची तीन ते चार वर्गात विभागणी केल्यानंतर ते ही स्वतःला समग्र व व्यापक ओबीसी समजणार नाहीत! आजही देश पातळीवर डीएनटी अर्थात विमुक्त भटके जे साधारणपणे लोकसंख्येने पंधरा ते वीस कोटी आहेत ते स्वतःला ओबीसी समजत नाहीत व उर्वरित ओबीसी जे साधारणपणे पन्नास कोटींहून अधिक आहेत तेही यांना ओबीसी समजत नाहीत! गंमतच आहे ना?

              ओबीसींचे राजकीय आरक्षण तेही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण संपले. तसे तर विधानसभा लोकसभा या ठिकाणी तर ओबीसींना आरक्षणच नाही! परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय आरक्षण संपले याची चर्चा खूप आहे परंतु ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती संपुष्टात आणली जात आहे! नोकऱ्यांमधील ओबीसींचा अनुशेष वाढत चालला आहे! ओबीसींना बढतीमध्ये आरक्षण तर मिळतच नाहीये, जे थांबले आहे ते काही ओबीसींचे थांबले आहे, जसे की महाराष्ट्रातल्या भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्गातील ओबीसी लोकांचे थांबले आहे. सोबतच ते एससी एसटीचेही थांबले आहे. यावर मात्र कोणीही विशेष बोलताना दिसत नाही. क्वांटीफायबल डाटा असो किंवा इंम्पेरिकल डाटा असो, राज्य सरकारला उपलब्ध करायला किती वेळ लागेल? मी समजतो फार तर फार सहा महिने लागतील! मग सरकार आजवर कामाला का नाही लागले? मे महीण्यापासुन हा वाद सुरू आहे. आजही सरकार काम करीत नाहीये! केंद्र सरकारवर जिम्मेदारी ढकलून प्रश्न मिटणार आहेत का? न्यायालयांनी जी आकडेवारी मागितली आहे व आकडेवारी सादर करून आरक्षण देण्याची मुभा दिली आहे, ती राज्य सरकारला दिली आहे, केंद्र सरकारला नाही! राज्य सरकारने अगदी काल परवा पर्यंत राज्य ओबीसी आयोग नेमला नव्हता! आता तो नेमला आहे. मला कळत नाही, एवढ्या महत्त्वाच्या व संवेदनशील मुद्द्यावर सरकार, प्रसारमाध्यमे, ओबीसी संघटना व ओबीसी समाज गंभीर का नाही?

               ओबीसींचे शासकीय सेवेतील प्रमाण किंवा प्रतिनिधित्व दाखवणारा व पदोन्नतीमधील आरक्षणासाठी आवश्यक असणारा क्वांटीफायबल डाटा असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या आरक्षणासाठी आवश्यक असणारा इंम्पेरिकल डाटा असो, ठरवले तर सरकार दोन-तीन महिन्यात सादर करू शकते! जसा तो त्यांनी मराठा आरक्षणाच्यावेळी न्यायमूर्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आयोग स्थापन करून जमा व सादर केला होता! म्हणजे जे जमा व सादर करायचे असते ते सरकार रात्रीचा दिवस करून जमा व सादर जमा करते! परंतु जे करायचेच नसते त्याचा टेनिस बॉल बनवून त्याची केंद्र-राज्य अशा कोर्टात तो जोरदार फटके मारून टोलवाटोलवी केली जाते.

              1931 नंतर देशात जातीनिहाय जनगणना झाली नाही! ही करायला अडचण काय असावी? सर्व प्रश्नांची उत्तरे जर जनगणनेतून सापडणार असतील तर केंद्र सरकार जातिनिहाय जनगणना का करीत नाही? परंतु उत्तरे द्यायचीच नाहीत! प्रश्न हे प्रश्नच ठेवायचे आहेत! लोकांना लटकत व आपल्या अवतीभोवती घुटमळतच ठेवायचे आहे! त्यामुळे जनगणना करायचीच नाही! केंद्रात ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त व्हायला स्वातंत्र्यानंतर सत्तरहून अधिक वर्षे लागली.  डीएनटीचा तर विचारही न केलेला बरा! त्यांची अवस्था तर "ना घर का ना घाट का" अशीच झालेली आहे. वास्तविक पाहता जर सवर्णांनी साठी दहा टक्के आरक्षण रातोरात! कुठल्याही आयोगाचे गठण न करता! अहवाल न घेता! सामाजिक मागणी नसताना! दिले जाऊ शकते तर मग 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा का उठवली जाऊ शकत नाही? ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात सेंट पर्सेंट रिझर्वेशन का दिले जात नाही? ओबीसी सर्व क्षेत्रात पन्नास टक्केपेक्षा अधिक आरक्षणाचे हक्कदार असूनही त्यांना 27 टक्के आरक्षणावरच का मर्यादित ठेवले जातेय? बरं, जे दिले जातेय ते घटनात्मक आरक्षण का दिले जात नाहीये?  म्हणजे ओबीसी आरक्षणाला घटनात्मक दर्जा का दिला जात नाहीये? आरक्षण म्हणजे शेवटी नेमके काय आहे? प्रमाणबद्ध प्रतिनिधित्वच ना? मग ते सर्वांना समान का असू नये? ज्यांना आजवर नव्हते त्यांना प्राधान्य द्यायला काय हरकत आहे? तत्पूर्वी सध्याचे प्रतिनिधित्व देखील तपासले पाहिजे. जर एखाद्या जातीला वा वर्गाला ते असेल तर पुन्हा देण्यात येऊ नये, ते बंद करावे वा कमी करावे परंतु नसेल तर द्यावे ना? त्यासाठी जातिनिहाय जनगणना, क्वांटीफायबल डाटा असो किंवा इंम्पेरिकल डाटा, संविधानिक आयोग, घटनादुरुस्त्या या बाबी फार महत्त्वाच्या आहेत. त्या झाल्याच पाहिजेत. नव्हे नव्हे त्या आपण ओबीसींनी करून घेतल्याच पाहिजेत.

           मला कळत नाही, जर एससी-एसटी ला सेंट पर्सेंट  रिझर्वेशन आहे तर मग ते ओबीसींना का नसावे? पन्नास टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या मागासवर्गीय समूहाला 27 टक्केच आरक्षण का? तेही केवळ शिक्षण व नोकरीतच! पदोन्नतीत का नाही? राजकारणात का नाही? तेव्हा घटनाकारांना किंवा तत्कालीन धोरण निर्मात्यांना काय वाटले असेल तो भाग निराळा आहे. आता परिस्थिती बदलली आहे. लोकसंख्या बदलली आहे. तेव्हा कदाचित ओबीसींची स्थिती बिकट नसेल परंतु आता ओबीसींची स्थिती, त्यातल्या त्यात डीएनटींची म्हणजे भटके विमुक्तांची स्थिती ही एससी एसटींपेक्षाही अधिक बिकट बनली! आहे मग डीएनटी ओबीसींना सेंट पर्सेंट रिझर्वेशन का नसावे? जे जे घटनात्मक, कायदेशीर, अर्थसंकल्पीय हक्क अधिकार प्रावधान एससी एसटी साठी आहेत ते ते सर्व ओबीसींसाठी असलेच पाहिजेत. मी असे नाही म्हणत की एससी एसटी  प्रमाणेच ओबीसींनाही क्रीमिलेअरची अट नसावी! अजिबात नाही! उलट मी तर म्हणेन की ती एससी एसटींनाही असावी. कारण त्याशिवाय आरक्षणाचा लाभ शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचणारच नाही. जर जो सर्वार्थाने मागास आहे, त्याच्यापर्यंत आरक्षण खरोखरच पोचवायचे असेल तर क्रिमिलियरची अट असणे अत्यंत आवश्यक आहे. श्रीमंत लोकच जर आरक्षणाचा लाभ घेऊ लागले, जो घेणे त्यांच्यासाठी सोपे जाते! तर मग सर्वसामान्य उपेक्षित मागासवर्गीयांना आरक्षणाचा लाभ कधी होईल? आणि जर तो झालाच नाही तर मग आरक्षणाचा हेतूच संपुष्टात येणार नाही का? आरक्षण हे असक्षम घोड्याला सक्षम बनविण्याचे साधन किंवा माध्यम आहे असे राजश्री शाहू महाराज सांगून गेले परंतु ठराविक प्रजातींचे आरक्षीत घोडेच जर ही आरक्षणाचा धावपट्टी वापरून प्रगतीचा पौष्टिक खुराक खाणार असतील तर मग जे असक्षम प्रजातींचे आरक्षित घोडे आहेत त्यांनी काय खायचे? त्यासाठी मला वाटते की ही सक्षमता अक्षमता वेळोवेळी तपासून पाहिली पाहिजे. प्रतिनिधित्वाचे प्रमाणदेखील वेळोवेळी तपासून पाहिले पाहिजे. स्वर्गीय इंदिराजी प्रमाणे आता संपत्तीचे सिलिंग होणार नाही. आता कुठलीही भूदान चळवळ निर्माण होईल असे वाटत नाही कारण आता ना विनोबा आहेत, ना बापू आहेत, ना इंदिराजी आहेत! परंतु निदान व्यक्तीचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय मागासलेपण वेळोवेळी तरी तपासलेच पाहिजे आणि ते तपासून त्याप्रमाणे नवीन धोरण ठरविले गेले पाहिजे.

          आता दहा टक्के आरक्षण सवर्णांना दिले आहे परंतु ते गरीब सवर्णांना दिले आहे. त्याची अंमलबजावणी जर काटेकोरपणे, प्रभावीपणे व प्रामाणिकपणे नाही झाली तर सहाजिकच सवर्णांमधले सक्षम घोडेच या आरक्षणाच्या धावपट्टीवरून धावून तो प्रगतीचा खुराक हडप करतील! ओबीसींचे दुर्दैव काय आहे माहित आहे का? खरे तर सर्वच मागासवर्गीयांचे हे दुर्दैव आहे, मग त्यात एससी आले, एसटी आले, डीएनटी आले व इतर मागासवर्गीय आले, सर्वच! सार्वजनिक जीवनात वागताना, बोलताना "आम्ही कमी नाही आहोत! श्रेष्ठ आहोत! प्रतिष्ठित आहोत! आमची उज्वल पौराणिक व ऐतिहासिक ओळख आहे! आमचा वंश वरच्या दर्जाचा आहे! आमचा वारसा व परंपरा फार श्रेष्ठ आहे!" असे म्हणतात एवढेच नाही तर त्यातील काही असेही म्हणतात की, "आम्हाला हे मागासवर्गीय नावाचे स्टिकर किंवा लेबल नकोच आहे! आम्हाला ही आरक्षण नावाची भीक किंवा कुबडी नकोच आहे! आम्ही मागासवर्गीय नाही आहोत! हा आमच्यावरील डाग आहे!" परंतु हे असे कोण म्हणतात माहित आहे? ते जे आरक्षणाचा लाभ घेऊन अगोदरच मोठे झाले आहेत ते! किंवा ते जे आता आरक्षणाचा लाभ घेऊच शकत नाहीत, जे पात्रच नाहीत! म्हणजे अगोदर घेतला आहे, सनदी अधिकारी, वर्ग दोन वर्ग एक अधिकारी बनले आहेत! आता त्यांची मुले आरक्षणाला पात्र नाहीत! मग अशी मंडळी म्हणते, " आम्हाला आरक्षणच नको!" कुठल्याही जाती मधले दोन चार घरे सुधारले म्हणजे ती संपूर्ण जात किंवा जमात सुधरत नाही, तिची प्रगती होत नाही आणि अशा प्रगत लोकांना पुन्हा आरक्षणाचा लाभ मिळू नये यासाठीच नॉन क्रिमिलियरची अट असणे अत्यंत गरजेचे आहे.

               गंमत पहा, एकीकडे जे ताकदवान आहेत! सबळ आहेत! सधन आहेत! संपन्न आहेत! सक्षम आहेत! श्रेष्ठ आहेत! प्रतिष्ठित आहेत! व सर्व क्षेत्रात बहुसंख्येने उपलब्ध  आहेत! ते ओढून-ताणून! साम-दाम-दंड भेद वापरून स्वतःला मागासवर्गीय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला देशभरात चित्र दिसते आणि जे ऑल रेडी  मागास आहेत! सर्व दृष्टीने, सामाजिक दृष्ट्या तर आहेतच परंतु आर्थिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्याही मागास आहेत! जे कोणत्याच क्षेत्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत! ज्यांना कुठल्याच क्षेत्रात पुरेसे प्रतिनिधित्व नाही! ज्यांना कुठल्याच क्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्राप्त होत नाही! ते म्हणतात, " माजच नाही तर गर्व आहे किंवा गर्वच नाही तर माज आहे!" अशा प्रकारच्या घोषणा देत सामाजिक श्रेष्ठत्वाचा किंवा उच्चत्वाचा आव आणण्यात काय अर्थ आहे? याला खरेतर माज, गर्व किंवा आव म्हणण्यापेक्षा मी 'अज्ञान' म्हणेल! हे अज्ञान आहे. सामाजिक आरक्षण शाबूत राहावे, ते पिढ्यानपिढ्या चालत राहावे, असे माझे अजिबात म्हणणे नाही. ते संपलेच पाहिजे परंतु तत्पूर्वी मागासवर्गीयांचे सामाजिक मागासलेपण संपले पाहिजे. सर्व क्षेत्रात समानता आली पाहिजे. सर्वांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली पाहिजे. संपत्ती असो, शिक्षण असो अथवा राजकारण असो सर्वत्र सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे. सर्वत्र समान प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे व सर्व सामाजिक घटक एका स्तरावर आले पाहिजेत. एकदा का ही समानता आली की आरक्षण संपवून टाकलेच पाहिजे. विशेष म्हणजे आरक्षित जातींची संख्या वरचेवर कमी व्हायला पाहिजे परंतु दुर्दैवाने ती वाढतच आहे! वेळोवेळी याचा फेर आढावा घेऊन सरकारांनी ज्या ज्या आरक्षित जाती आहेत त्यांची उन्नती झाल्याचे दिसून येतेय का कसे किंवा त्यांचे तेवढे प्रतिनिधीत्व असल्याचे दिसून येतेय का हे तपासले पाहिजे. जर असेल तर त्यांना आरक्षित जाती जमाती प्रवर्गामधून वगळले पाहिजे व जे पात्र आहेत परंतु अद्याप आरक्षणापासून किंवा आरक्षण लाभापासून वंचित आहेत त्यांचा समावेश देखील केला पाहिजे. घटनात्मक लोकशाहीमध्ये जनता ही सरकार असते. ज्याला आपण सरकार म्हणतो ते जनतेचे प्रतिनिधी असतात. जनसेवक असतात. जनतेला काय पाहिजे हे विचारात न घेता हे जनसेवक स्वतःचा अजेंडा रेटून नेहतात. त्यांना जे द्यायचे आहे ते कोणी नाही मागितले तरी देतात! जे त्यांना द्यायचेच नाही ते सर्वांनी ओरडून-ओरडून मागितले तरी ते देत नाहीत! आणि हे असे ओबीसींच्या बाबतीमध्ये नेहमीच होते. त्यामुळे आता तरी ओबीसींनी सर्व आपसातले मतभेद, गट-तट विसरून, श्रेयवाद विसरून सामाजिक मुद्द्यांच्या आधारे, निदान आपल्या पुढील पिढ्यांच्या भवितव्याचे रक्षण करण्यासाठी तरी एकत्र येऊन, खासकरून राजकीयदृष्ट्या एकत्र येऊन लढाई लढली पाहिजे. यात उच्चशिक्षित, सुशिक्षित, नोकरदार, सधन लोकांनी युवक-युवतींनी पुढाकार घेतला पाहिजे अन्यथा ओबीसी आरक्षण संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल असे मी या अर्थाने म्हणतोय की जर ओबीसी मध्ये अशाच पद्धतीने वेगवेगळ्या जाती जमातींचा समावेश होत गेला व आरक्षण मात्र 27 टक्केच राहिले तर ते आरक्षण असून नसल्यासारखे म्हणजे संपुष्टात आल्या सारखेच आहे आणि दुसऱ्या बाजूला तर न्यायालयाच्या माध्यमातून तसेच सरकारच्या माध्यमातून शिक्षण, नोकऱ्या, पदोन्नत्या, राजकारण या मधले आरक्षण तर संपत चालले आहेच शिवाय शिक्षणसंस्था, उद्योगधंदे, रोजगार, सरकारी बँका व इतर उपक्रम, स्वायत्त सरकारी संस्था, यांचे खाजगीकरण होतच आहे! मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्त्या थांबविल्या किंवा संपविल्या जातच आहेत! भविष्यात तर मला सहकार क्षेत्राचे देखील भवितव्य अंधकारमय दिसतेय! एकुणच काय तर ही सर्व लक्षणे अप्रत्यक्षपणे आरक्षण संपविण्याचीच आहेत! हे एक प्रकारचे षडयंत्रच नसेल कशावरून?

लेखकः बाळासाहेब (बालाजी) धुमाळ

मो. 9421863725.



सांस्कृतिक धोरण आणि जातिवंत लोककलावंत

 सांस्कृतिक धोरण आणि जातिवंत लोककलावंत



                    देशात मार्च 2020 पासून कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यासह संपुर्ण देशातच कमी-अधिक प्रमाणात टाळेबंदी लागू आहे. आता जवळजवळ दिड वर्ष लोटून गेलेय. टाळेबंदी लागू आहे. कारण कोरोना हा हवेमार्फत पसरणारा, संपर्कामुळे फैलावणारा विषाणू आहे आणि या विषाणूची लागण होऊन होणारा कोवीड नावाचा आजार अत्यंत जीवघेणा आहे. अद्याप पर्यंत तरी याच्यावर प्रभावी वैद्यकीय उपचार उपलब्धच नाही. शिवाय अशा प्रकारची जागतिक महामारी आता जिवंत असलेल्या कोणीच पाहिलेली नाही. अशा प्रकारची महामारी आपल्या देशामध्ये एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्लेगच्या स्वरूपात आली होती. 19 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून आता पर्यंत देशाने अनेक साथीचे व संसर्गजन्य आजार अनुभवले आहेत. ज्यात प्रामुख्याने प्लेग, कॉलरा, एन्फ्लूएंझा, स्पॅनिस फ्लयू, बर्ड फ्ल्यू आणि इतर अनेक आजार अनुभवले. परंतु महामारी मात्र एकदाच अनुभवली होती प्लेगच्या रुपात. त्यावेळी देशाची लोकसंख्या होती साधारणपणे 45 कोटी आणि प्लेगमुळे मृत्यु पावलेल्या लोकांची संख्या होती 10 दशलक्ष म्हणजे 1 कोटी ! आताची परिस्थिती ही सर्वांसाठीच, खासकरून आताच्या सरकारांसाठी यापूर्वी कधीही न अनुभवलेली, न हाताळलेली आणि न पाहिलेली होती. गर्दीमुळे हा विषाणू पसरतो आणि तो पसरू नये आणि आपली जनता त्याला बळी पडू नये यासाठी सरकारांकडे टाळेबंदी करणे, जमावबंदी करणे, संचारबंदी करणे याशिवाय दुसरे पर्यायच उपलब्ध नव्हते. लोक एकत्र येऊ नयेत, गर्दी होऊ नये यासाठी सरकार आपले सर्वोत्तम प्रयत्न करीत होते. त्यासाठी लोकजागृतीही करीत होते, निर्बंधही आणीत होते, प्रसंगी पोलिसी बळाचा वापर देखील करीत होते आणि ते त्याच्या जागेवर बरोबरही होते.

 परंतु याचा अत्यंत गंभीर परिणाम हातावरील पोट असणाऱ्या वर्गावर खूप मोठ्या मोठ्या प्रमाणावर झाला. आपल्या कलागुणांच्या आधारे, गर्दी जमवणारे व गर्दी समोर म्हणजे प्रेक्षकांसमोर व श्रोत्यांसमोर आपली लोककला सादर करणारे लोक कलावंत सहाजिकच शासकीय नियमांमुळे घरात बंदिस्त होते व आजही आहेत. कोरोनाने त्यांचे उपजीविकेचे एकमात्र पारंपरिक साधन त्यांच्याकडून हिरावून घेतले आहे. अशा  लोककलावंतांना सरकारने काहीतरी थेट आर्थिक मदत करावी अशी रास्त व आर्त मागणी केवळ लोक कलावंतांकडूनच नव्हे तर मिडिया व सर्वसामान्य जनतेकडूनही होत होती. या कोरोना टाळेबंदीचा फटका केवळ लोककलावंतांनाच बसला आहे असे अजिबात नाही तर तो सर्वांनाच बसला आहे. सरकारने आपल्या स्तरावर काही घटकांना शक्य तेवढी मदतही केली. ज्यामध्ये शेतकरी, रिक्षावाले, मजूर, औद्योगिक कामगार, असंघटित नोंदणीकृत कामगार वगैरे वगैरे परंतु लोककलावंत मात्र अशा कोणत्याही थेट आर्थिक मदतीपासून वंचित होते. नुकताच राज्य सरकारने अशा राज्य भरातील छपन्न हजार लोककलावंतांना प्रत्येकी पाच हजार रुपये थेट आर्थिक मदत  देण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला आहे. यावर राज्य सरकार जवळपास 28 कोटी रुपये खर्च करणार आहे. यामुळे लोक कलावंतांचे सर्वच प्रश्न सुटणार आहेत असे अजिबात नाही परंतु म्हणतात ना, 'बुडत्याला काडीचा आधार' तसा थोडाफार का होईना परंतु या आर्थिक मदतीचा आधार त्या 56 हजार लोककलावंतांना होणार आहे आणि त्याबद्दल त्या सर्व लाभार्थ्यांचे मनापासून अभिनंदन व मा. मुख्यमंत्र्यांना व राज्य सरकारला मनापासून धन्यवाद.

                      परंतु आता प्रश्न असा आहे की, राज्यांमध्ये केवळ 56 हजारच लोक कलावंत आहेत का? तर अजिबात नाही. आता जे लोक कलावंत पडत्या काळात, परिस्थिती हालाखीची असुनही या शासकीय मदतीपासून वंचित राहणार आहेत त्याला जबाबदार कोण? सरकार आहे काय? तर नाही, कारण सरकारकडे लोककलावंतांची अधिकृत आकडेवारी तेवढीच आहे. त्यामुळे यासाठी सरकारला जिम्मेदार धरता येणार नाही. महाराष्ट्र सरकार लोक कलावंतांसाठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते व मदतही करत असते कारण महाराष्ट्र हे केवळ एक आधुनिक, औद्योगिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या सधनच राज्य नाही तर एक प्रगल्भ सांस्कृतिक वारसा लाभलेले आणि ते जोपासणारे राज्य देखील आहे. इतर राज्यांसाठी महाराष्ट्र हे एक दिशादर्शक राज्य आहे. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्र सरकारच्या अनेक निर्णयांचे अनुकरण इतर राज्य सरकारे व अगदी केंद्र सरकार देखील करीत असते. म्हणूनच आपल्या महाराष्ट्राकडे देश सन्मानाने व आदराने पाहत असतो. सांस्कृतिक क्षेत्राच्या बाबतीत सरकारचे एक ठोस असे सांस्कृतिक धोरण आहे. हे धोरण ठरविताना एक तज्ञांची समिती गठीत करण्यात आली होती आणि या धोरणाचा मसुदा तयार करण्यात आला होता. त्या मसुदा समितीचे अध्यक्ष एक अत्यंत अभ्यासू व संवेदनशील व्यक्तिमत्व होते, ज्यांचा मी फारच चाहता देखील आहे आणि ते होते आदरणीय आ. ह. साळुंखे सर. त्यांचे इतर सहकारी म्हणजे उपाध्यक्ष, सचिव व सदस्य देखील तेवढेच तोलामोलाचे होते. हे राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरले सन 2010 मध्ये व आज त्याचीच अंमलबजावणी सुरु आहे. या धोरणात महाराष्ट्रातील सांस्कृतिक जीवनाशी निगडित सर्व बाबींचा समावेश करण्यात आला असल्याचा त्यांचा दावा आहे. या धोरणाची चौदा पायाभूत तत्त्वे निश्चित करण्यात आली आहेत. ज्यात भाषा आणि साहित्य, प्राच्यविद्या, कला ज्यामध्ये प्रयोगात्मक कला, दृश्यात्मक कला व चित्रपट तसेच महिलांविषयक सांस्कृतिक दृष्टिकोन व क्रीडा संस्कृती याही तत्त्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. हे सांस्कृतिक धोरण ठरविताना ही बाब गांभीर्याने विचारात घेतली गेली होती की, "कोणत्याही समाजाच्या प्रतिभेचा सर्वांगीण असा सामूहिक अविष्कार हा त्या समाजाच्या सांस्कृतिक मूल्यांमधून होत असतो. निसर्गाकडून जे काही प्राप्त झालेले असते त्यावर विविधांगी सृजनशीलतेच्या आधारे संस्कार करून मानव जे निर्माण करतो ती त्याची संस्कृती असते. प्रत्येक व्यक्तीची संस्कृती ही दुसऱ्या व्यक्तीच्या संस्कृतीपेक्षा काही प्रमाणात का होईना वेगळी असते" (इथे अर्थातच संस्कृती म्हणजे भाषा, पेहराव, कला, व्यवसाय, जीवनशैली इ. अभिप्रेत असावे) " संस्कृती ही संस्काराने प्रगत होत जाते. महाराष्ट्राची संस्कृती देखील काळाच्या ओघात समाज जीवनात प्रविष्ट झालेल्या अनिष्ट गोष्टी दूर करण्यासाठी झालेल्या संस्कारातून प्रगत झाली आहे. कला क्षेत्रातील उच्च गुणवत्तेचा व विविधतेचा ऱ्हास न होता तिचा आलेख चढताच राहावा यासाठी आपण नेहमी जागरूक असायला हवे. विकासाचे ध्येय गाठीत असताना जात, संप्रदाय, धर्म, आर्थिक स्तर, लिंग इत्यादी प्रकारच्या विशिष्ट कारणाने कोणताही जनसमूह समग्र समाजापासून तुटणे हे व्यापक सामाजिक हिताच्या दृष्टीने हानीकारक असते. त्यासाठी सांस्कृतिक पायाभरणी करण्याबरोबरच सामाजिक समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे प्रयत्न झाले व त्यातूनच आधुनिक आदर्श व प्रगल्भ समाज निर्माण झाला. भारतीय संविधानात नमूद 'न्यायाधिष्ठीत समाजरचना' हे उद्दिष्ट गाठणे हे आपले अंतिम ध्येय आहे.

सहाजिकच आपले म्हणजे सरकारचे व समाजाचे अंतिम मध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो. परंतु शांतपणे मन व मेंदू उघडे ठेवून विचार केल्यास असे आढळून येते की, भटक्या लोककलावंतांना समाजाच्या व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचे आणि त्यांना आधुनिक प्रगत माणूस बनविण्याचे प्रयत्न अपुरे पडले आहेत किंबहुना ते झालेच नाहीत. सरकारला व घटनेला अभिप्रेत असलेली न्यायाधिष्ठीत समाजरचना व न्याय, स्वातंत्र्य, समानता या बाबी भटक्या लोककलावंत जमातींपर्यंत पोहोचल्याच नाहीत. माझा आरोप नाही परंतु हे खेदयुक्त मत आहे की, सरकारने सांस्कृतिक धोरण तयार करताना आणि आता ते राबवत असताना भटक्या जातिवंत पारंपारिक लोककलावंतांना ध्यानातच घेतले नाही. समग्र विकासाची संकल्पना मांडत असताना व ती अमलात आणत असताना, "भटक्या पारंपारिक लोककलावंत जमातींमधील लोककलावंतांना" शासकीय योजनांचा अधिकाधिक लाभ कसा होईल? या जमातींमधील लोककलावंत अधिकाधिक संख्येने त्यांच्या परिस्थितीमध्ये बदल घडवून आणून समाजाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये कसे येतील? यासाठी नियोजनबद्ध व प्रकर्षाने या लोककलावंत जमातींना डोळ्यासमोर ठेवून सांस्कृतिक धोरण तयार केले गेले नाही. जर या लोककलांना व लोककलावंतांना केंद्रस्थानी ठेवले गेले असते (अर्थात आताही त्यामध्ये काही बदल केले जाऊ शकतात) तर अनेक पारंपारिक जातिवंत लोककलावंत शासनाच्या विविध योजनांचे लाभार्थी बनले असते व परिणामी सहाजिकच त्यांच्यामध्ये बदल होऊन सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत प्रगल्भ समाज व न्यायाधिष्ठित समाजरचना निर्मितीचे उद्दिष्ट पुर्ण झाले असते. जर पारंपारिक जातिवंत लोककलावंतांना केंद्रस्थानी ठेवून धोरण आखले गेले नाही तर राज्याचे केवळ सांस्कृतिकच नुकसान होणार नाही तर समग्र व  व्यापक दृष्टया, घटनात्मक लोकशाहीला अभिप्रेत असलेली सर्वांगीण प्रगतीची संकल्पनाच मार खाईल.

एका बाजूला या भटक्या लोककलावंत जमातींना 'संस्कृतीरक्षक जमाती',  'संस्कृती वाहक जमाती' म्हणून मानासन्मानाने उल्लेखायचे आणि दुसऱ्या बाजूला सांस्कृतिक धोरण बनविताना, ते राबविताना, शासकीय योजनांचा लाभ देताना, शासकीय आर्थिक मदत देताना मात्र त्यांना वंचित ठेवायचे! हे दुटप्पी धोरण अन्यायकारक आहे. केवळ गौरवोद्गार काढून त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होणार नाही. संस्कृतीमध्ये कला, साहित्य, क्रीडा हे फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. केवळ मनोरंजनच नव्हे तर प्रबोधन, मार्गदर्शन, जाहिरातीकरण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या 'राष्ट्रीय व धार्मिक अस्मितांचे संवर्धन' लोककलांच्या माध्यमातून लोककलावंत करत असतात. या लोककलांना 'लोकाश्रय' आहे परंतु दुर्दैवाने 'राजाश्रय' मात्र नाही. गोंधळ गीते महाराष्ट्रातील प्रत्येक कलाप्रेमीला आवडतात. संबळ वादन ऐकून त्याचे कान तृप्त होतात. परंतु याचा लाभ मिळतो तो व्यवसायिक कलावंतांना! मग ते जातीने गोंधळीच असतील असेही नाही आणि नसावे देखील परंतु दुसरीकडे जे जातीचे गोंधळी आहेत ते मात्र एक उपेक्षित, हालाखीचे किंवा सर्वसामान्य जीवन जगत आहेत! म्हणजे ज्यांनी कला निर्माण केली! ती जतन करून ठेवली! त्यांच्यावर हा अन्याय नाही का? या लोककला जर खरोखरच टिकाव्यात असे वाटत असेल, कारण आपण पाहतोय अनेक लोककला आज नामशेष झाल्या आहेत. लुप्त पावल्या आहेत. आज नंदीवाले, वासुदेव, बहुरुपी, पांगुळ, नाथपंथी, चित्रकथी क्वचितच दिसतात किंवा दिसत सुद्धा नाहीत! त्यांच्याकडे ज्ञानाचा, अध्यात्माचा,  महापुरुषांचा पौराणिक व ऐतिहासिक खूप मोठा खजिना आहे! तो त्यांना वारस्याच्या रूपाने प्राप्त झालेला आहे परंतु तो दुर्लक्षित आहे! जर खऱ्या अर्थाने हा सांस्कृतिक ठेवा, हा खजिना जतन करायचा असेल, त्याच्यामध्ये उन्नती करायची असेल तर कला, साहित्य, क्रीडा ज्यांच्या रक्तातच आहे त्यांना प्राधान्य मिळायला हवे. त्यांना म्हणजे त्या कलागुणांना व त्या कलावंतांना, दोघांनाही. या लोककलावंत जमातींकडील लोककलांचा औपचारिक शिक्षण प्रशिक्षणात समावेश करणे गरजेचे आहे. त्यात या कलावंत जमातींमधील विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश मिळायला हवा. आपण शिक्षणामध्ये "कल अर्थात आवड तपासतो. आयक्यू अर्थात क्षमता तपासतो" शैक्षणिक धोरण ठरविताना तज्ञ सांगतात की विद्यार्थ्याच्या कलाप्रमाणे, त्याच्या आवडीप्रमाणे, त्याच्या क्षमतेप्रमाणे (काठिण्य पातळीनुसार) आणि त्याला आनंद देणारे शिक्षण असावे परंतु प्रत्यक्षात मात्र या जमातींमधील मुला-मुलींमध्ये असणाऱ्या अंगभूत कला कौशल्यांकडे, त्यांच्या 'कल अर्थात आवडीकडे ' 'आयक्यू अर्थात क्षमतांकडे' सरकारकडून सपशेल दुर्लक्ष केले जातेय! अंगभूत अनुवंशिक कलागुण, घरातील पूरक वातावरण व औपचारिक शिक्षण मार्गदर्शन यांचा मिलाफ झाला तर निश्चितच सांस्कृतिक विश्व तर संपन्न होईलच सोबतच या पारंपारिक भटक्या लोककलावंत जमातींची सर्वांगीण प्रगती देखील होईल. त्यांचे जीवनमान देखील सुधारेल.

             सरकारच्या लोक कलावंतांसाठी अनेक योजना आहेत. सरकार लोक कलावंतांसाठी अनेक योजना राबवते. जसे की वृद्ध कलावंत मानधन योजना. या योजनेसाठी जिल्हा स्तरावर समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे अथवा तालुका स्तरावर गटविकास अधिकारी,  पंचायत समिती यांचेकडे अर्ज सादर करावा लागतो आणि यासाठीचे पात्रता निकष काय असतात? तर संबंधित कलावंताने पंधरा ते वीस वर्ष या क्षेत्रात योगदान दिलेले असावे, त्याचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे, काही विशिष्ट आजारांनी ग्रस्त कलावंतांसाठी ही वयाची अट शिथिल आहे तसेच विधवा परित्यक्ता व वृद्ध महिला कलावंतांना यात प्राधान्य देखील आहे. सादरीकरणानुसार राष्ट्रीय पातळीवरील कलावंतासाठी 2100 रुपये, राज्यस्तरावरील कलावंतांसाठी 1800 रुपये तर स्थानिक स्तरावरील लोक कलावंतांसाठी हे मानधन 1500 रुपये प्रति महिना आहे. परंतु वास्तव असे आहे की, ते कधीही वेळेवर व नियमित मिळत नाही. प्रयोगात्मक कला सादर करणाऱ्या संस्थांना देखील सरकार अनुदान देते परंतु भटक्या जमातींमधील पारंपारिक लोककलावंतांच्या संस्था किती आहेत? हा संशोधनाचा विषय ठरतो.

             सरकार शाहिरी, किर्तन, नाट्य, शास्त्रीय कला, तमाशा, बालनाट्य, वगनाट्य, पथनाट्य या विभागात सादरीकरण करणाऱ्या कलावंतांची प्रशिक्षण शिबीरे देखील आयोजित करते परंतु इथेही भटके लोककलावंत वंचितच राहतात. शास्त्रीय व लोककला क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांची नोंदणी केली जाते. यात शास्त्रीय संस्थांची नोंदणी झालेली दिसते परंतु पारंपारिक जातीय लोककलावंतांच्या संस्थांची नोंदणी नगण्य आहे. लोक कलावंतांसाठी रेल्वेमध्ये प्रवास करताना तिकिटामध्ये सवलत आहे. म्हाडा मध्ये घरे मिळण्यासाठी तरतूद आहे परंतु या सर्व ठिकाणी ज्या अटी व शर्ती असतात त्यात प्रमुख अट असते संबंधित लोककलावंत हा 'नोंदणीकृत' असावा! ही नोंदणी भटके लोककलावंत करीत नाहीत किंबहुना त्यांना ती कशी करावी? हेच माहीत नसते. त्यातील जाचक अटी व शर्तींची पूर्तता ते करीत नाहीत. त्यासाठी लागणारे पुरावे त्यांच्याकडे नसतातच. अर्जाचा नमुना नेमका कसा असतो? तो कुठे व कधी करायचा असतो? याचे त्यांना दुर्दैवाने ज्ञानच नसते. महाराष्ट्र राज्य माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावतीने लोककला व पथनाट्य पथकाची निवड करण्यात येते. त्यांना योजनांचा लाभ दिला जातो परंतु पारंपारिक जातिवंत लोककलावंत जसे की गोंधळी, वाघे-मुरळी, डवरी, बहुरूपी असे लोक त्या अटींची पूर्तता करण्यात कमी पडतात कारण यासाठी किमान दहा जणांचे पथक असायला लागते. त्यांना शासकीय योजनांमध्ये सादरीकरण केल्याचा अनुभव असावा लागतो. प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र असावे लागते. त्यांची स्वतःची साऊंड सिस्टम असावी लागते. केंद्र सरकारच्या गीत व नाट्य विभागाकडे नोंदणी असल्यास प्राधान्य मिळते परंतु पुन्हा तेच! ही नोंदणी कशी करावी? हेच यांना ठाऊक नसते! ही नोंदणी ऑनलाइन देखील करता येते परंतु साधी बाब आहे, ज्या लोकांना आपली झोळी शिवायला आणि वाद्याची पाने शिवायलाही वेळ मिळत नाही ते ऑनलाइन नोंदणी कधी करतील? आणि कशी करतील?

             शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळात पोहोचविण्यासाठी, शासन लोककलावंतांना पाचारण करते. परंतु पारंपारिक जातिवंत लोककलावंत याला पात्र ठरत नाहीत. ते आपली माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडे सादर करीत नाहीत. आता मला वाटते, येथे सामाजिक संघटनांची भूमिका महत्वपूर्ण ठरते, जी ठरताना दिसत नाही. सरकारची कोणतीही योजना असो, तिचा लाभ घेण्यासाठी लोककलावंत हे नोंदणीकृत व संचाने लोककला सादर करणारे असावे लागतात. वास्तविक पाहता गोंधळी, वाघे-मुरळी असे लोककलावंत संचासहच कला सादर करतात परंतु नोंदणीकृत नसतात! परिणामी लाभापासून वंचित राहतात. यासाठी काम करायला हवे, तरच ते निकषांमध्ये बसतील. यावर सामाजिक संघटनांमध्ये विचार व्हायला हवा. हे त्यांना समजून सांगायला हवे की, आपण भलेही स्वतंत्र कला सादरीकरण करत असाल जसे की बाप-लेक, सासरा-जावई, मेहुणे-मेहुणे, मित्र-मित्र परंतु किमान कागदावर तरी दहापेक्षा अधिक कलावंतांचा संच बनवून आपल्या संचाची नोंदणी सरकार दरबारी करायलाच हवी. यासाठी सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थांनी तसेच संवेदनशील सुशिक्षित नोकरदार समाज बांधवांनी या कलावंतांना व त्यांच्या संचांना आवश्यक मदत करायला हवी.


            संस्कृतीचा वारसा वंशपरंपरागत पद्धतीने पिढ्यानपिढ्या जोपासणारे, त्याचे वहन करणारे लोककलावंत जसे की,  नंदीवाले, पोतराज, बहुरूपी, वासुदेव आणि इतर अनेक लोक कलावंत हे संचाने कला सादरीकरण करत नसतात म्हणून अशा योजनांचे लाभार्थी ठरत नाहीत. भटक्या जमातींमधील हे लोक कलावंत, भूमिहीन बेघर असूनही, अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असूनही विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ शकत नाहीत. महाराष्ट्र हे एक अत्यंत पुरोगामी आणि सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न राज्य आहे. हे मी यापूर्वीच लिहिले आहे. राज्यातील कलाप्रेमींनी या कलावंतांना प्रेम दिले आहे, देत आहेत परंतु केवळ प्रेमावर घर चालत नाही. कला तर जगलीच पाहिजे परंतु कलावंतही जगला पाहिजे हे आपण समजून घेतले पाहिजे. लोककलांचा विकास करण्याची व लोककलावंतांची सर्वांगीण प्रगती करण्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची आहे परंतु तसे होताना दिसत नाही. यासाठी सरकार, समाज व सामाजिक संघटना यांचा उदार व सकारात्मक दृष्टीकोन असायला हवा. आपण किती लोकांना लाभांपासून टाळू शकतो यापेक्षा किती जास्तीत जास्त लोककलावंतांना लाभ मिळवून देऊ शकतो? यावर विचार व्हायला हवा आणि म्हणून मला असे वाटते की सरकारने आपले सांस्कृतिक धोरण, जातिवंत पारंपारिक लोक कलावंतांच्या हिताचे, त्यांना शासकीय योजनांचे लाभ मिळवून देणारे, क्लिष्ट, किचकट व जाचक अटी दूर करणारे तयार करायला हवे. यासाठी भटके विमुक्तांमधील संघटना व संस्थांनी पुढाकार घेऊन नियोजन करायला हवे. ज्येष्ठ अनुभवी आणि जे लोककलावंत अशा शासकीय योजनांचा लाभ घेत आहेत अशा लोककलावंतांनी देखील आपले सामाजिक योगदान दिले पाहिजे. "जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे शहाणे करूनी सोडावे सकळ जन" असे जे म्हणतात ते उगीच नाही. अन्यथा पारंपारिक जातिवंत लोककलावंत पिढ्यानपिढ्या लोक कला सादरीकरण करूनही देव, देश, धर्म, संस्कृतीचे जतन करूनही वंचित, उपेक्षित व मागासच राहतील.

            मला असे वाटते की, समाजकारण्यांनी समाजकारणाची दिशा बदलायला हवी. समाजकारण करण्याची पद्धती बदलायला हवी. नको तिथे नाहक शक्ती वेळ व पैसा वाया घालविण्यापेक्षा समाजाच्या अडचणी काय आहेत? व त्या कशा रितीने दूर केल्या जाऊ शकतात?  या प्रश्नांच्या मुळाशी जाऊन शिक्षण, रोजगार, आरोग्य, संरक्षण, निवारा या प्रश्नांवर काम करण्याची वेळ आलेली आहे. केवळ कागदे काळे करून, फोटोज काढून व ती सोशल मिडीयावर शेअर करून समाज प्रगत होणार नाही. विशेष गंमत अशी आहे की आपण ज्यांच्यासाठी काम करतोय ते आपल्याला ओळखतही नाहीत! आणि ते स्वाभाविकही आहे परंतु जर आपण त्यांना ओळखत नसू तर ती असंवेदनशीलता ठरेल असे मला वाटते. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे कारण आपण सुशिक्षित आहोत, आपण सबळ आहोत, आपण सक्षम आहोत, आपण सधन आहोत. मला कळत नाही, ज्यांच्यासाठी मंत्रालय आहे, मंत्री आहेत, कार्यालये आहेत, अधिकारी आहेत, ज्यांच्या समस्यांवर संशोधन करून लोक डॉक्टरेट मिळवितात, साहित्यिक बनतात, ज्यांच्या समस्यांवर, दुःखांवर व जीवन मानावर पुस्तके लिहीली जातात व ती महागात विकली जातात! ज्यांना भटक्यांच्या क्षेत्रात कला, साहित्य, समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार मिळतात, त्यांचे दिमाखदार सोहळ्यांमध्ये वितरण केले जाते! ज्यांची व्याख्याने ऐकण्यासाठी लोक पैसे देऊन येतात किंवा आयोजक स्वत: त्यांना पैसे देतात! त्यांना काहीना काही मिळतेच परंतु हा सर्व खटाटोप ज्यांच्यासाठी व ज्यांच्यावर आधारित आहे त्या भटक्या जातिवंत लोककलावंतांना काय मिळते? त्यांना न्याय मिळतोय का? गफलत कुठे होतेय, मला असे वाटते की कीर्तनकार, तमाशाकार, गझलकार, नृत्यकलाकार, शास्त्रीय कलाकार, नाट्यकलाकार या नावांची कुठलीही जात अथवा जमात नाही. अनेक जातींची अथवा जमातींची आपली स्वतःची अशी 'लोककला' नाही परंतु ते या लोककला सादर करतात आणि त्यात काही गैरही नाही कारण कलेवर कोणाची मक्तेदारी किंवा ताबेदारी असू शकत नाही परंतु वाईट याचे वाटते की, लाभाचे वेळी जातिवंत लोककलावंत राहातात बाजुलाच आणि व्यावसायिक लोक कलावंतांनाच प्राधान्य मिळते! ज्या जातीवंत गोंधळी, डवरी, गोसावी, चित्रकथी, वासुदेव, बहुरुपी आणि इतर अनेक लोककला सादर करणा-या जाती जमाती आहेत, ज्यांनी या कलांना जन्मास घातले आहे, त्यांना जिवंत ठेवले आहे, त्यांना लोकांपर्यंत पोहोचवले आहे, त्यांच्या माध्यमातून चांगली कामे केली आहेत, त्या जाती मात्र न्यायापासून अद्यापही वंचित आहेत हे वास्तव आहे.

           भटक्या जमातींमधील गोंधळी, डवरी, भराडी, बहुरूपी,  चित्रकथी, गारुडी, गोपाळ, हेळवे, जोशी, कोल्हाटी, डोंबारी, नंदीवाले, तिरमल, पांगुळ, कडकलक्ष्मीवाले, मरीआईवाले, मदारी, गारुडी, सापवाले, जादूगार, वाघवाले, पोतराज, आराधी, मयूर नृत्य करणारे असे असंघटित व बिगर नोंदणीकृत लोककलाकार आपापल्या पारंपारिक वेशभूषेत, पारंपारिक वाद्यांसह, आपल्या पारंपारिक लोककलेच्या माध्यमातून जसे की शाहिरी, गण-गवळण, अभंग, पोवाडे, वगनाट्य, बालनाट्य, पथनाट्य, भारुडे इत्यादींच्या माध्यमातून लोकरंजन, लोकप्रबोधन गावोगावी जाऊन चौका-चौकात, रस्त्यांवर यात्रा-जत्रा, मेळे, उरूस इत्यादी ठिकाणी करीत असतात. अनेकदा याच लोककला व पथनाट्य यांच्या माध्यमातून शासन शासकीय लाभ, योजना व शासकीय आवाहानांचे जाहिरातीकरण करण्यासाठी देखील लोककला व पथनाट्य यांचा वापर करीत असते परंतु दुर्दैवाने वर उल्लेख केलेल्या भटक्या जमातींमधील पारंपारिक जातिवंत लोककलावंत मात्र अशा शासकीय कार्यक्रमांपासून, योजनांपासून वंचित राहतात! विशेष म्हणजे हे सर्व लोक त्यांची साधने त्यांच्या स्वतःच्या पैशाने खरेदी करत असतात! यातले बहुतांश लोक भूमिहीन व बेघर असतात तरीही यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव ते कोणते?

            कला अकादमी ही संगीत, लोककला, नृत्य, नाटक, दृककला, चित्रपट इत्यादी क्षेत्रातील कलांचा अभ्यास करते, त्यावर संशोधन व प्रयोग करते आणि त्यांना प्रोत्साहित करते. त्यासाठी आर्थिक मदत करते, प्रशिक्षण देते, त्यांना पुरस्कार देते, त्यांच्यासाठी कला महोत्सव आयोजित करते परंतु या उल्लेखनीय कामांपासून जातिवंत पारंपारिक लोककलावंत मात्र वंचितच राहतात! किंबहुना या लोकांना या बाबींची माहितीच नसते! व्यावसायिक शास्त्रीय संगीत क्षेत्र, नाट्यक्षेत्र, शाहिरी किर्तन, कलाकेंद्र या क्षेत्रांमधील बऱ्याच संस्था व कलावंत हे नोंदणीकृत असतात. त्यांची शासनाकडे आकडेवारी व वैयक्तिक माहिती उपलब्ध असते. काहींची नसते देखील परंतु भटक्या जमातींमधील पारंपारिक जातिवंत लोककलावंतांची मात्र अपवादात्मक म्हणावी एवढ्याच म्हणजे अगदी नगण्य म्हटले तरी हरकत नसावी एवढ्यांचीच माहिती सरकारांकडे असते. याचे कारण म्हणजे हे कलावंत नोंदणीकृत नसतात. कलावंत म्हणून, कला संच म्हणून किंवा कला संस्था म्हणून यांची नोंदणी झालेली नसते. ती कशी करावी हेच यांना माहित नसते. त्याची किचकट प्रक्रिया व अटी शर्तींची अपूर्णता याला कारणीभूत असते. अशा वेळी सामाजिक संघटनांनी, संघटनांच्या आघाड्यांनी, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन त्यांना सहकार्य केले, तर या वंचित भटक्या जमातींना शासन दरबारी ओळख मिळेल. त्यांच्या कलेला प्रतिष्ठा मिळेल. त्यांची नोंद घेतली जाईल व परिणामी ते सरकारी लाभ, मदत, योजना यांचे लाभार्थी होतील.

               आपण नुकतीच साहित्यसम्राट, साहित्यरत्न, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती साजरी केली. अण्णाभाऊ स्वतः एक लोक साहित्यिक होते. त्यांनी अनेक लावण्या व पोवाडे लिहून सामाजिक-आर्थिक विषयांवर, अन्याय अत्याचार व विषमतेवर, शोषणावर रूढीवादावर हल्ला केला. समाजाचे दाहक वास्तव आपल्या लेखणीद्वारे कागदावर उतरवले, ते समाजासमोर व सरकार समोर मांडले. परंतु आज परिस्थिती अशी आहे की, अशा असंख्य लोक साहित्यिकांची आणि लोककलावंतांची कुचंबना, अवहेलना होताना दिसते. व्यासपीठावर टाळ्यांद्वारे दाद मिळविणाऱ्या युवा लोककलावंतांना लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये किंवा मुलगा मिळत नाहीये! यावरून समाजाची मानसिकता दिसून येते. समाजाला जावई म्हणून  किंवा पती म्हणून किंवा पत्नी म्हणून किंवा सुन म्हणून 'नोकरदार' व्यक्ती हवी आहे! खरेतर आपल्या कल्पने पलिकडील प्रतिष्ठा व पुरातन वारसा लाभलेल्या या लोककलेला, देश, देव आणि धर्म या तिन्हींसाठी आपले अमुलाग्र आणि परमोच्च योगदान देणाऱ्या या जमातींना आज जर असे  भिका-याचे जीवन जगावे लागत असेल तर याचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.

              माझ्या या शब्द प्रपंचाचा विषय सरकारचे सांस्कृतिक धोरण आणि पारंपारिक लोककलावंत जमाती' असा यामुळे आहे की, मला असे दिसतेय की, कुठेतरी हे धोरणच चुकतेय! राज्यघटनेला अभिप्रेत असणारी 'न्यायाधिष्ठीत समाजरचना' ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही! जर ती त्यांच्यापर्यंत पोहोचली असती तर सहाजिकच आज आपल्याला पालांमध्ये, नदी नाले ओढे गटारे रेल्वे पटरी यांच्या शेजारी, फुटपाथवर, पुलांखाली ही माणसे राहताना दिसली नसती आणि हा आरोप नाही की केवळ योगायोगही नाही की हे सर्व लोक काही विशिष्ट जाती जमातींचेच आहेत! प्रामुख्याने ते विमुक्त आणि भटक्या जमातींमधील आहेत. याचा सर्व्हे सरकार कधी करणार? जर हे सांस्कृतिक धोरण व्यवस्थित राबविले असते तर सिग्नलवर भीक मागताना महिला मुले दिसले नसते. ज्या वयात त्या बालकांनी शाळेत गेलेच पाहिजे, जे कायद्याने बंधनकारक आहे! त्या वयात ही छोटी छोटी बालके विविध कला सादर करून किंवा गाडीच्या काचा पुसून, काहीतरी विकून दोन पाच रुपयांच्या स्वरूपात एक प्रकारची भिक मागताना दिसलेच नसते. जर हे प्रयत्न प्रामाणिकपणे झाले असते तर मग डोक्यावर मरीआईचा, कडकलक्ष्मीचा देव्हारा घेऊन किंवा गळ्यात देवी अडकवून, हातावर परडी घेऊन भिक्षा मागताना महिला दिसल्या नसत्या! अंगावर सुया टोचून घेऊन उघड्या अंगावर चाबकाचे फटके मारून घेऊन भिक मागणारे पुरुष दिसले नसते! याला संस्कृती म्हणता येणार नाही. हे बंद झाले पाहिजे परंतु यांचे पुनर्वसनही झाले पाहिजे. यांचे समुपदेशन झाले पाहिजे. मग प्रसंगी जोर जबरदस्ती करावी लागली तरी बेहतर! यांच्यासाठी शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, निवारा, शौचालय अशा मूलभूत गरजा उपलब्ध व्हायलाच हव्यात. हे मी यामुळे म्हणतोय की, हे सर्व घटक देखील लोक संस्कृतीचाच भाग आहेत असे आपण पाहतोय आणि जर ही लोकसंस्कृती असेल तर मग शासनाचे सांस्कृतिक धोरण कुठे तरी गडबडतेय हे स्पष्ट आहे.

यासाठी केवळ राज्य सरकारच जबाबदार आहे असे अजिबात नाही. मला तर वाटते यासाठी केंद्र सरकार अधिक जबाबदार आहे. कारण देशाची संस्कृती प्रजासत्ताक दिनी राजपथावर केंद्र सरकार दाखवते परंतु ती संस्कृती जतन करणारे लोक मात्र कसल्या प्रकारचे जीवन जगत आहेत? याच्यावर विचार करीत नाही. केंद्र सरकारची आर्थिक ताकद, क्षमता ही राज्य सरकारपेक्षा अधिक असते. त्यामुळे याची अधिक जबाबदारी केंद्र सरकार वर जाते. शिवाय केंद्र सरकार देखील सांस्कृतिक विभाग चालवते! ते देखील राज्यांप्रमाणेच लोक कलेसाठी व लोक कलावंतांसाठी विविध विभाग, योजना, प्रशिक्षणे, पुरस्कार, मानधने, सवलती अर्थसाह्य देते परंतु मुद्दा हा आहे की हा सर्व खटाटोप देशभरातील पिढ्यानपिढ्या लोककलेची सेवा करणाऱ्या व देशाची संस्कृती जपणा-या जोपासणा-या, देशाच्या संस्कृतीला लोकसंस्कृती बनविणाऱ्या जातिवंत भटक्या लोक कलावंतांपर्यंत पोचतेय का? तर नाही! त्यामुळे राज्य व केंद्र दोन्ही सरकारांनी हे गांभीर्याने घ्यायला हवे व संघटनांनी व संस्थांनी ते त्यांच्या गळी उतरवायला हवे असे मला वाटते.

               भटक्या लोककलावंत जमाती शासकीय योजनांसाठी पात्र कशा होतील? यासाठी निकषांमध्ये बदल करायला हवेत. शिक्षणाची अट काहीशी शिथील करायला हवी. कार्यक्रम आखुण या लोककलावंतांची नोंदणी करून घ्यायला हवी. त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे. प्रमाणित करायला हवे. यासाठी सरकार सोबतच सामाजिक संघटना आणि सेवाभावी संस्था यांनी देखील आपले योगदान दिले पाहिजे. म्हणजे नेमका मुद्दा काय आहे? आणि आपण काय केले पाहिजे? असे काम होणे आवश्यक आहे. अर्थातच लोककलावंतांनी देखील सरकार व समाजकारण्यांना साथ दिली पाहिजे. कारण जोवर माणूस स्वतः मध्ये बदल करून घेण्याची, स्वतः बदलायची तयारी दर्शवित नाही, तोवर त्याच्यामध्ये बदल होऊच शकत नाही. तो कोणीही करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी देखील शिक्षणास, प्रशिक्षणास, कागदपत्रांस, नोंदणीस, कलेतील आधुनिकतेस, काळाप्रमाणे बदलास, संघटित होण्यास प्राधान्य दिले पाहिजे. त्याशिवाय त्यांच्यावर होणारा अन्याय थांबणार नाही व ते शासनस्तरावर लोककलावंत म्हणून गणले जाऊ शकत नाहीत याची जाणीव लोककलावंतांना देखील व्हायला हवी.

             मी वारंवार "जातिवंत लोककलावंत" हे दोन शब्द उल्लेखित आहे. नक्कीच "कला जन्माने प्राप्त होत नाही" परंतु घरातले वातावरण लोककलेचे असते म्हणून भटक्या जमातींमधील जवळजवळ प्रत्येक बालकाला ही लोककला 'वारशाच्या' रूपात लाभते. लोककलेचे 'बाळकडू' त्याला बालपणी घरातच मिळते. असे म्हटले जाते की 'माशाच्या पिल्लाला पोहणे शिकवावे लागत नाही' कारण पोहण्याचे कौशल्य त्याला जन्मतःच लाभते. त्याचप्रमाणे आपल्याला दिसून येईल की, या भटक्या जमातींमधील मुला-मुलींना त्यांची त्यांची पारंपारिक लोककला ही त्यांना आईच्या दुधातूनच लाभलेली आहे! त्यांच्यातील रक्तातच लोककला आहे! बरं, "जन्माने जर कला प्राप्त होत नसेल तर मग जन्माने विषमता का बरे प्राप्त होते? जन्माने हीनता असमानता दारिद्र्य हे का बरे प्राप्त होते?" हे कोण नाकारेल की आजही म्हणजे एकविसाव्या शतकात सुद्धा या भटक्या लोककलावंत जमाती विकासाच्या तसेच समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कोसो दूर आहेत? मला कलेमध्ये जात आणायची नाहीये परंतु "जातीची एक कला असतेय" हे लक्षात आणून द्यायचे आहे. जातीचे लोककलावंत व व्यावसायिक लोककलावंत या मधला फरक लक्षात आणून द्यायचा आहे. व्यावसायिक कलावंत हे सुशिक्षित असतात, नोंदणीकृत असतात. परिणामी ते विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास पात्र ठरतात. परंतु जातीचे पारंपारिक लोककलावंत बहुधा अशिक्षित किंवा अल्पशिक्षित असतात. परिणामी  ते पात्रता निकष पूर्ण करीत नाहीत. त्यांच्याकडे प्रक्रियेचे अज्ञान असते आणि मला असे वाटते की, सामाजिक संघटनांचे हे नैतिक कर्तव्य असायला हवे की त्यांच्यामध्ये ते ज्ञान निर्माण झाले पाहिजे. यासाठी काम करणे गरजेचे आहे. सामाजिक संघटनांची ही जिम्मेदारी 'नैतिक' आहे असे म्हणतोय मी, 'अधिकारीक किंवा कायदेशीर' जिम्मेदारी नाही. ते त्यांचे व्यावसायिक कर्तव्यही नाही. ते त्यांच्यावर बंधनकारक नाही कारण त्यासाठी त्यांना कुठलेही मानधन किंवा पगार भेटत नाही. खरंतर घरच्या भाकरी खाऊन 'लष्कराच्या भाकरी भाजण्यासारखे' हे काम आहे  परंतु यालाच सामाजिक दायित्व म्हणतात. ज्यांना आपल्यासाठी काही सरकारी योजना असतात, अनुदान असते, पुरस्कार असतात, सवलती असतात हेच माहित नाही, त्यांना ते माहीत करून देणे, त्यांचे प्रबोधन करणे, त्यांना दिशादर्शन मार्गदर्शन करणे, त्यांना मदत सहकार्य करणे, फार आवश्यक आहे. हे आपले सामाजिक नैतिक कर्तव्य आहे आणि यालाच सामाजिक बांधिलकी असे म्हणतात. 

              लोककलावंतांनी कागदोपत्री  लोक कलावंत असले पाहिजे. डॉक्युमेंटेशन फार आवश्यक असतेय. अंगात कलागुण भरपूर आहेत परंतु कलावंत असल्याचा जर कागदोपत्री पुरावा नसेल तर अंगी असलेल्या कलागुणांना शासनदरबारी शून्य किंमत ठरते. त्यामुळे पुरावा जमा करणे, संच बनवणे, नोंदणी करणे, एनजीओज नोंदणीकृत संघटनांची मदत मिळवणे गरजे आहे. यामध्ये मला असे वाटते की, सामाजिक संघटनांची व एनजीओजची भूमिका फार महत्त्वाची ठरेल. यांनी अशा लोककलावंतांना प्रमाणित केले पाहिजे. त्यांना प्रमाणपत्र देणे, पुरस्कार देणे आवश्यक आहे. लोककलेचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था स्थापन करणे, त्यांच्यामार्फत प्रशिक्षण देणे, शिबिरे लावणे, लोककला महोत्सव आयोजित करणे, त्यामध्ये सहभागी होणाऱ्या कलावंतांना, त्यांच्या संचांना प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. हीच प्रमाणपत्रे पुढे त्यांच्यासाठी पुरावा म्हणून कामी येईल. यातले आतापर्यंत काहीच घडले नाही किंवा घडत नाही असा माझा  अजिबात दावा नाही. अनेकजण या क्षेत्रामध्ये या पूर्वीपासूनच हे काम करीत आहेत व प्रभावीपणे करीत आहेत परंतु ते कुठेतरी  अपुरे पडत आहे असे दिसते. पैशांशिवाय लढा उभा राहात नाही. बळ, बुद्धी व पैसा कुठल्याही चळवळीची त्रिसूत्री असते. यावरच तिचे यशापयश अवलंबून असते. त्यामुळे थोडे अर्थसाह्य देखील लोककलावंतांनी अशा संघटनांना व संस्थांना करायला हवे. नोकरदार, व्यवसायिक, स्थिरस्थावर समाज बांधवांनी यथाइच्छा  यथाशक्ती आपली सामाजिक बांधिलकी निभावली पाहिजे. सर्वत्र अंधारच आहे असे अजिबात नाही. काही प्रकाशमय चित्र देखील आहे. समाज बदलतोय. बदलाव  हेच तर आपले अंतिम ध्येय आहे. नवनवी तंत्रे कौशल्ये क्षमता आपण अंगीकाराव्यात, बदलत्या जगानुसार स्वतःमध्येही बदल करावेत. बदलत्या जगाच्या गरजांची, आवश्यकतांची पूर्तता करण्यासाठी आपण स्वतःला सक्षम करावे हे अपेक्षित आहे. परंतु असा बदललेला समाज किती आहे? याचेही सर्वेक्षण व्हायला हवे. सरकारी सर्वेक्षण होईल तेव्हा होईल, किमान सामाजिक संघटनांनी तरी सर्वेक्षण करायला हवे आणि प्रत्येक भटक्या लोककला सादर करणाऱ्या जमातीमधील प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनात हे सर्वेक्षण करायला हवे की आपण, आपला समाज किती सुधारला आहे? सुधार किंवा प्रगती ही केवळ सोशल मिडीयावर कट्टर हिंदुत्वाचा, भडक व आक्रमक व्यक्तिमत्त्वाचा आणि नसलेल्या किंवा अल्प प्रमाणात असलेल्या संपत्तीचा देखावा करून संपूर्ण समाज सुधारणार आहे काय? याचेही चिंतन मनन व्हायला पाहिजे. अशाप्रकारे देखावा  करून समाज प्रगत होणार नाही. आपण एकीकडे 'गर्वच नाही तर माज आहे, माजच नाही तर गर्व आहे' अशा वल्गना करीत असतो आणि दुसऱ्या बाजूला जे आपण पाहूही शकत नाही ते समाजाचे चित्र आपल्याला पाहावे लागतेय! हे कटू वास्तव लिहून लपणार नाही आणि डोळे मिटून घेतल्याने मिटणार नाही. यासाठी एक ठोस धोरण तयार करावे लागेल. ते फार महत्त्वाचे ठरेल. धोरण मग ते सरकारचे असो वा समाजकारण्यांच्या असो. नेमके आपले प्रश्न काय आहेत? प्राप्त परिस्थिती म्हणजे वास्तव काय आहे? आपल्या समोरील आव्हाने काय आहेत? व त्यावर मार्ग कसा काढायला हवा? कसे आपण समाजाच्या व विकासाच्या दोन्हीच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ? दुर्दैवाने हे कोणीही विचारीत नाही, कोणीही सांगत नाही! ना सरकार ना समाजकारणी! शिवाय नुसतेच सांगून काय होणार? सहकार्य करायला नको? रस्ता दाखवणे, बोट धरून चालायला मदत करणे फार आवश्यक आहे. किमान सुरुवातीला तरी. परंतु दुर्दैवाने असे होताना दिसत नाही. एक तर काही राजकारणी व समाजकारणी लोककलावंतांना अंधारात ठेवतात आणि ज्यांना उन्नतीचा व प्रगतीचा खजिना सापडला आहे तो त्यांना कसा सापडला आहे? व त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्ग कोणता आहे? हे इतरांपासून दडवून ठेवतात! मग हा सर्वसामान्य लोककलावंत समाज सुधारणार कसा? व  कधी?

             आपल्या पारंपारिक लोककलावंत जमाती बेरोजगार होत आहेत, पारंपरिक उपजीविकेची साधणे कालबाह्य ठरत आहेत. काहींवर कायदेशीर बंधने येत आहेत तर काही आधुनिक स्पर्धेत टिकत नाहीयेत. पर्यायाने या जमाती हतबल व लाचार होत आहेत हे वास्तव असताना आपण भारत हा एक प्रगत देश आहे असे जर समजत असु, जर अशी आपली समजुत असेल तर असा समज असणारांना मी शुद्ध मूर्ख म्हणेल! या लोकांना म्हणजे जे बेरोजगार हतबल लाचार आहेत अशा भटक्या लोकांना पर्याय सापडतीलही परंतु ते चांगलेच असतील असेही नाही. बरीच युवापिढी चुकीच्या पद्धतीने पैसे कमावण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जेव्हा समाज आपल्याला नाकारतो, हीन लेखतो, जेव्हा आपल्यासमोर पर्याय उपलब्ध नसतात, जेव्हा व्यवस्थित पुनर्वसन होत नाही तेव्हा हतबलतेतून आकस व ईर्षा मनात उत्पन्न होते. द्वेषाची भावना मनात बाळगून माणुस आक्रमकपणे उग्रपणे आपले महत्त्व समाजाच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न नैसर्गिकपणे करीत असतो. त्याला आपण नाकारून चालणार नाही व तसे होणार नाही याची काळजी सरकारने व समाजकारण्यांनी घ्यायला हवी.

            हे लोककलेचे आणि लोककलावंतांचे दुर्दैव आहे की, ज्यांना कलेतला 'क' देखील येत नाही ते कलेचे ठेकेदार किंवा गुत्तेदार बनले आहेत व कलाकार मात्र वेठबिगार बनले आहेत! कलाकारांना व साहित्यिकांना जशी कलागुणांची दैवी प्रतिभा देणगीच्या स्वरूपात लाभलेली असते तसेच काही अवगुणांचे अभिशाप ही लाभलेले आढळतात! जसे की, व्यसन,  बहुपत्नीत्व! हे त्यांचे वैयक्तिक जीवन आहे व नक्कीच ते त्यांनी आपापल्या पद्धतीने जगावे यात दुमत नाही. हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे की ते कसे जगावे परंतु ते सुंदर असावे, कौटुंबिक कलह विरहित असावे एवढेच. इतर समाज आपल्याकडे आदराने, मानासन्मानाने व प्रतिष्ठेने पाहत असतो आणि जर आपल्याकडून अशा चुका होत असतील तर ते आपल्या व्यक्तिमत्वास व व्यवसायास देखील हानिकारक ठरते. आपण म्हणतो ना की, ' माणसाने अंथरूण पाहून पाय पसरावेत' ते अनेक लोककलावंतांना समजलेच नाही. हे जमिनीवर बऱ्याचदा पाहायला मिळते आणि ज्या लोककलावंतांना हे समजले आहे ते यशस्वी झाल्याचेही आपण पाहतो.

               शासकीय लाभांपासून आणि समाजाच्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून भटक्या जमाती दुर आहेत. प्रकर्षाने लोककलावंत दूर का आहेत? यावर लिहीत असताना सामाजिक संघटनांची भूमिका मला सरकारच्या भूमिकेपेक्षा ही अधिक महत्त्वाची वाटते. बहुतांश तमाशा तसेच शाहीरी क्षेत्रातले  लोककलावंत, नाट्यकलावंत, सिनेकलावंत, शास्त्रीय कलेतील लोककलावंत नोंदणीकृत असतात. एकजूट असतात. संघटीत असतात. यातले बरेचजण सुशिक्षितही असतात. भलेही ते जातीने कोणीही असोत परंतु भटक्या जमातींचे पारंपरिक लोककलावंत मात्र  पिढ्यांपिढ्यांपासून लोककला सादर करीत असूनही केवळ कागदोपत्री लोककलावंत ठरत नाहीत म्हणून अशा शासकीय योजनांपासून व मदतीपासून वंचित ठरतात. कारण यांच्या बाबतीत परिस्थिती नेमकी वरील लोककलावंतांच्या विरुद्ध असते. जातीवंत पारंपरिक लोककलावंत शिक्षणाला, संघटीत होण्याला, काळाबरोबर अद्ययावत होण्याला महत्त्व देत नाहीत. प्रवाहापासून अलिप्त राहतात परिणामी शासकीय लाभांपासुनही वंचित राहतात. काही लोककलावंतांच्या संघटना, सामाजिक संघटना व लोककलावंत आघाड्यांवर काम करणारे राजकीय पदाधिकारी जे स्वतःला समाजसेवक म्हणवतात ते या लोक कलावंतांकडून पैसे अगदी जबरदस्तीने घेतात. प्रलोभने दाखवून, आशेला लावून, भिती दाखवून!! हे पाहून वाईट वाटते. थोडाफार मोबदला अथवा प्रक्रिया शुल्क अथवा मेहनताना समजून घेतला जाऊ शकतो, तो दिलाच पाहिजे परंतु 'चार आण्याची कोंबडी व बारा आण्याचा मसाला' असे होता कामा नये. वयोवृद्ध लोककलावंतांना लुटताना, त्यांना चप्पल झिजवायला भाग पाडताना, खोटी खोटी परंतु आत्मविश्वासपूर्ण आश्वासने देऊन आशेला लावताना मी माझ्या डोळ्याने पाहिले आहे. मला वाटते, इथे भटक्यांमधील सामाजिक संघटनांनी, त्यांच्यातल्या आघाड्यांनी, सुशिक्षित स्थिरस्थावर समाज बांधवांनी आपले योगदान देऊन अशा लुटारू समाज सेवकांवर अंकुश ठेवायला हवा व स्वतः पुढाकार घेऊन समाजासाठी, मानवतेसाठी गरजु लोककलावंतांच्या मदतीला धावून गेले पाहिजे. त्यांच्यासाठी थोडा वेळ व थोडी बुद्धी दिली पाहिजे. ज्यांना शक्य असेल त्यांनी अर्थसाह्य देखील केले पाहिजे. शासकीय किचकट प्रक्रिया सुलभ करून दिली पाहिजे आणि सोबतच शासनाशी पत्रव्यव्हार करुन, भेटीगाठी बैठका घेवून शासनाच्या सांस्कृतिक धोरणांमध्ये बदल करुन अधिकाधिक भटक्या जमातींमधील पारंपारीक लोककला व लोककलावंत यांना शासकीय योजनांचा व मदतींचा लाभ कसा होईल? कसे अधिकाधिक पारंपारीक जातीवंत भटके लोककलावंत हे शासकीय योजनांचे, मदतीचे लाभार्थी होतील यासाठी सामाजिक संघटना, सेवाभावी संस्था, समाजसेवी सुशिक्षित, नोकरदार, सधन तसेच तरुण लोकांनी प्रयत्न करायला हवेत. धन्यवाद.


लेखक: बाळासाहेब (बालाजी) सिताराम धुमाळ

मो. 9421863725.

Thursday 29 July 2021

जागृत मतदार...



जागृत मतदार...
वाचक भावा-बहीणींनो, आपली माणुस म्हणून अडचण काय आहे माहितीये का? मला वाटतं, आपल्याला जे दाखवलं जातं, त्यावर आपण अंधपणे विश्वास ठेवतो, खासकरून आपण भारतीय तर जास्त विश्वास ठेवतो! अर्थात ही मानवी वृत्ती आहे, वैश्वक आहे परंतु त्यातही आपल्या भारतात अधिक आहे. तसं पाहीलं तर यात चुकीचं पण काहीही नाही कारण याच्या पाठीमागे शास्त्र आहे परंतु जेव्हा आधुनिक काळात, आधुनिक शासन व्यवस्थेत, स्वायत्त संस्थाच पुरावा व निकाल देतात तेव्हा? खासकरून न्यायव्यवस्था! तेव्हा तर आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागतो ना? कारण आपली बुद्धी इथपर्यंतच चालते. आपल्याला आजवर इथपर्यंतचंच ज्ञान होतं.

परंतु आता राजकारणातल्या महत्त्वाकांक्षा इतक्‍या विस्तारल्या आहेत आणि राजकारण एवढ्या खालच्या आणि गलिच्छ पातळीला गेलेलं आहे की आता राजकारणात सत्तेसाठी काहीही केलं जाऊ शकतं! अगदी काहीही केलं जाऊ शकतं! काहीही व कुणालाही खरेदी केलं जाऊ शकतं, ब्लॅक मेल केलं जाऊ शकतं, अमिष दाखवलं जाऊ शकतं, धमकावलं जाऊ शकतं किंवा मग संपवलं जाऊ शकतं! यामुळेच आपल्या देशातल्या बुद्धीवाद्यांचं मतदानाचं प्रमाण फार कमी झालं आहे. बुद्धिवादी लोक, सुशिक्षित लोक, नोकरदार लोक, उच्च वर्गातले लोक मतदान फार कमी करतात कारण त्यांचा लोकशाहीवरचा विश्वास संपलेला आहे, त्यांना ही सर्व शाळा कळलेली आहे. परिणामी राजकीय उमेदवार लोक हे सर्वसामान्य, गोरगरीब, व्यसनी लोकांना निवडणूकी दिवशी उचलून आणतात, एक दिवस मानसन्मान देतात, त्यांच्यावर खर्च करतात, "देशीप्रेम" दाखवतात!

दुर्दैवाची दुसरी गोष्ट म्हणजे, बुद्धीवादी जे सांगतात ते इतर लोक ऐकत नाहीत, काल परवा पर्यंत शिकलेल्या, अभ्यासू, बुद्धीवादी, तत्वज्ञानी, चिंतनशील, साहित्यिक लोकांना समाजामध्ये महत्व होतं. त्यांची नाही तरी त्यांच्या बुद्धीची, त्यांच्या मतांची, त्यांच्या मांडणीची आणि त्यांच्या दूरदृष्टीची किंमत केली जायची. परंतु आता चतुर, स्वार्थी राजकारणी लोक, बुद्धीवाद्यांनाच मुर्खात काढत आहेत! त्यांना अगदी देशद्रोही सुद्धा सिद्ध केलं जातंय! असो, विषय तो नाही,  काल-परवापर्यंत मिडीया स्टिंग ऑपरेशन्स करायचा,  सत्य लोकांपर्यंत आणून पोचवायचा. मात्र आता मिडीयाचे रूपांतर हाऊसेस मध्ये झाले आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ व्यवसायिकांनी काबीज केला आहे, परिणामी संपादक व पत्रकार गुलाम बनलेले आहेत.

 त्यामुळे राफाईल असो, नोटबंदी असो, एखादे हायप्रोफाईल हत्याकांड असो, शेतकरी विरोधी कायदे असोत किंवा पेगासीस मालवेअर असो.. यांना जनसमर्थन मिळताना दिसत नाही. आपल्याकडे जनसमर्थन कोणत्या मुद्द्यांना मिळतं? जात-धर्म, आरक्षण या मुद्द्यांना! काही लोकांचं मत असतं की आमच्यासाठी पहिले मुद्देही महत्त्वाचे नाहीत आणि दुसरे मुद्देही महत्त्वाचे नाहीत! आम्हाला पाहिजेत आमच्या नागरी सोयीसुविधा. यामध्ये शिक्षण, आरोग्य, रस्ते, लाईट, पाणी, सुरक्षितता, रोजगार इत्यादी! हे अगदी बरोबर आहे परंतु जेव्हा यंत्रणाच पोखरलेली असते, जेव्हा व्यवस्थाच चुकीच्या पद्धतीने काम करत असतात, जेव्हा लोकशाहीचे सर्व स्तंभ ढासळलेले असतात तेव्हा आपण ही अपेक्षा करणं चुकीचं आहे असं मला व्यक्तीशः वाटतं! म्हणजे हे असं आहे की थेंबाथेंबाने कमवायचं आणि ओंजळीने गमवायचं! जर या देशांमधली लोकशाहीच पारदर्शक नाही राहिली, स्वायत्त संस्थाच पारदर्शक नाही राहील्या, न्यायव्यवस्थाच पारदर्शक नाही राहिली, प्रसारमाध्यमेच पारदर्शक नाही राहिली, सभागृहे व कार्यकारी मंडळेच पारदर्शक नाही राहिली तरी या आपल्या अपेक्षा पूर्ण होणार कशा?

 आपण हे विसरता कामा नये की गांधीजी आणि नेहरू हे सुद्धा परस्पर विरोधी विचारांचे होते परंतु समान उद्देशासाठी ते एकत्र आले! गांधीजी आणि आंबेडकर हे सुद्धा परस्पर विरोधी विचारधारेचे होते परंतु देशासाठी ते एकत्र येऊन काम करत होते आणि जर मला विचाराल की आजवरचं देशातलं सर्वात चांगलं मंत्रिमंडळ कुठलं होतं? तर ते होतं पहीलं, अगदी पहिल मंत्रीमंडळ! कारण त्यात सर्वच विचारधारेचे व वर्गाचे लोक होते. सर्वांच्या कल्पना विचारात घेतल्या गेल्या होत्या. अगदी काल-परवापर्यंत त्या घेतल्या जात होत्या परंतु आता तसे होत नाहीये! तेव्हा राजकारणात समाजकारण जास्त होते आणि समाजकारणात आणि राजकारणात दोन्हीतही नैतिकता पायाभूत होती, जी आता नाही. मनमानी, दडपशाही, दादागिरी तर आहेच परंतु आता हाताशी बाळगलेल्या बड्या उद्योजकांच्या  परस्पर सहकार्यामुळे राजकीय पक्षांकडे प्रचंड पैसा आहे. त्यामुळे जाहिरातबाजी, शोबाजी, देखावे, सादरीकरण, तंत्रज्ञान यापुढे सर्वसामान्य माणूस भांबावून जातो आणि समजा याचीही मतदारांवर जादू नाही चालली तर जात-पात, देव-धर्म, मंदिर-मशीद, भाषा-प्रदेश, नक्षलवाद-आतंकवाद किंवा मग पुलवामा आणि बालाकोट हे मुद्दे असतातच! त्यामुळे आता नागरिक म्हणून, मतदार म्हणून आपण अधिक जागृत होण्याची वेळ आलेली आहे.

बाळासाहेब (बालाजी) धुमाळ
मो. 9421863725.

Thursday 22 July 2021

ओबीसींची जनगणना म्हणजे "बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला"

 

"ओबीसींची जनगणना म्हणजे "बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला".... बाळासाहेब धुमाळ.


 ब्रिटीश सरकारने 1931 मध्ये केलेल्या जातनिहाय जनगणनेनंतर झालेल्या पहील्या वहील्या 2011 ते 2015 या कालावधीत झालेल्या जातनिहाय जनगणनेसाठी तब्बल पाच हजार कोटी रुपये खर्च झाले!! तिची आकडेवारी तर समोर आलीच नाही परंतु चुका मात्र समोर आल्या! म्हणे त्यात तब्बल नऊ कोटी चुका सापडल्या!! आणि आता तर 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये ओबीसींची जनगणना होणारही नाही!! केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींची होणार आहे अशी माहिती समोर येतेय!


काय कमाल आहे? आपल्याकडे भटक्या कुत्र्यांची, मोकाट गाईंची आणि इतर पशु-पक्ष्यांची अधिकृत शासकीय गणना होते परंतु स्वातंत्र्याच्या तब्बल पाऊण शतकानंतरही ओबीसींची गणना होत नाही ! हसावं की रडावं हेच कळत नाही! ओबीसींच्या सर्व प्रश्नांची कारणे आणि सर्व प्रश्नांचे समाधान जातनिहाय जनगणनेत आहे. जातनिहाय जनगणनेमुळे अधिकृत आकडेवारी समोर येईल व ओबीसींचे प्रश्न सोडवणे सोपे होईल. परंतु त्यामुळे राजकारण्यांचे भिंग फुटेल! ओबीसी सर्वच क्षेत्रांमध्ये मागासलेले, पिछाडीवर आहेत, लोकसंख्येच्या प्रमाणात नाहीत हे समोर येईल, सिद्ध होईल आणि म्हणून जाणीवपूर्वक ती केली जात नाही हे समजायला फार बुद्धीमत्तेची गरज नाही. सरकारला ती करायचीच नाही! अगदी जाणिवपूर्वक! कारण एकतर बाप दाखवावा लागेल, नाहीतर श्राद्ध घालावे लागेल!


प्रतिनिधित्वाची आणि परिस्थीतीची वास्तव आकडेवारी समोर आली की ओबीसी जागा होईल. अधिकार,  प्रतिनिधित्व आणि आपला लोकसंख्येप्रमाणे विविध क्षेत्रातील हिस्सा वाटा तो मागेल. आपण त्यांना आजवर फसवले आहे, याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना आहे. विशेष म्हणजे देशातील एकही राजकीय पक्ष ओबीसींच्या हिताचा नाही. ते फक्त ओबीसींना वापरत आहेत! नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर एक बातमी वारंवार मिडीया मधून दाखवली जातेय की, नव्या केंद्रीय मंत्रिमंडळात तब्बल 27 ओबीसी मंत्री आहेत! मला वाटते यात विशेष काहीच नाही. मुळात ते 39 असायला हवेत! 78 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळात 39 ओबीसी मंत्री असायला हवेत कारण देशामध्ये ओबीसींची संख्या पन्नास टक्क्यांहून अधिक आहे. मुळात लोकसभेच्या विद्यमान 540 खासदारांपैकी किमान 270 व राज्यसभेच्या विद्यमान 245 खासदारांपैकी किमान 123 सदस्य खासदार ओबीसी असायला हवेत. परंतु अल्पसंतुष्ट ओबीसींना हे कोणी समजून सांगावे मिळते हेच नशीब अशी भिकारी वृत्ती जोपासणाऱ्या ओबीसींना 27 मंत्री देखील खूप जास्त वाटतात! अर्थात हे मंत्री किंवा लोकप्रतिनिधी समाजाच्या प्रश्नांवर बोलतात किंवा नाही? समाजाच्या समस्या सोडवतात किंवा नाही? हा पुन्हा संशोधनाचा विषय!


 प्रस्थापित राजकारण्यांना ओबीसी हे केवळ गुलाल उधळण्यासाठी, घोषणा देण्यासाठी, झेंडे मिरविण्यासाठी आणि सतरंज्या उचलण्यासाठीच हवे आहेत! जाती श्रेष्ठत्वाचा आणि धर्म श्रेष्ठत्वाचा अतिरिक्त डोस दिला की,  ओबीसींना त्यांच्या प्रश्नांचा विसर पडतो, त्यांच्या अवस्थेचा विसर पडतो! हे या धुर्त राजकारण्यांना चांगले ठाऊक आहे. यांना ओबीसी नेते नको आहेत केवळ कार्यकर्ते हवे आहेत आणि म्हणून ते तेच करतात! परंतु दुर्दैवाने हे ओबीसींच्या मात्र लक्षात येत नाही.


 मला कळत नाही, सरकारला जर ओबीसींची जातनिहाय जनगणना करायला अडचणच काय आहे? पैसा जनतेचा, जनगणना करणारी यंत्रणा सरकारी अर्थात जनतेची! मग अडचण काय आहे? आणि जर सरकारला ती करायचीच नसेल तर देशभरातील संपुर्ण ओबीसी लोक संपूर्ण जनगणनेवर, निवडणूक व मतदान प्रक्रियेवर ओबीसी बहिष्कार का टाकत नसतील? रस्त्यांवर का उतरत नसतील? *"ओबीसींना राजकारण, शिक्षण, नोक-या, बजेट या सर्व क्षेत्रांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात घटनात्मक आरक्षण मिळणे हा ओबीसींचा अधिकार आहे."* ओबीसींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरू कॅबिनेटमधून आपल्या कायदा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि अजूनही ओबीसींना न्याय मिळत नाही! ओबीसींना साधारणपणे 50 % आरक्षण आणि एससी एसटींना 22.5 % आरक्षण अशा पद्धतीने साधारणपणे 75 % आरक्षण देशात असलेच पाहिजे आणि त्यासाठी घटनादुरुस्ती करून आरक्षण मर्यादा उठविण्याची वेळ आली वेळ आली तरी ती केलीच पाहिजे. सवर्णांच्या 10% आरक्षणासाठी घटना दुरुस्ती होऊ शकते तर मग ओबीसींच्या सेंट पर्सेंट रिझर्वेशनसाठी घटनादुरुस्ती का होऊ शकत नाही? पण मुळात ओबीसीच या विषयावर गंभीर नाहीत, निद्रिस्त आहेत, गटातटात, जाती जातीत, पंथापंथात विभागलेले आहेत! राजकीय पक्ष आणि धार्मिक नेते ओबीसींना सुधरू देत नाहीत. आता निदान ओबीसी समाजाने स्वतःहून तरी सुधारायला हवे, असे मला वाटते.


बाळासाहेब धुमाळ

मो. 9421863725


Monday 14 June 2021

धन विरहीत धरम हो!

 धन विरहीत धरम हो !









ना गंगा मैय्या , ना गो माता

ना इनका है इनसे नाता !

नाता है सिर्फ संपत्ती से

नाता है सिर्फ सत्ता से !

धरम केवल दिखावा है

श्रद्धालुओं से छलावा है !


ना श्रीकृष्ण से ना

उनकी प्रेम करूणा से !

ना श्रीराम से 

ना उनकी मर्यादाओं से !

नही है रिश्ता इनका

उनके किसी भी उपदेश से !


मंदिर तो एक बहाना है

अर्थसरिता में नहाना है !

जिसने जल स्थल नभ का

निर्माण किया हो !

उसका आशियाना तो

बस एक फसाना है !


वह देखता है खुली आंखों से

भक्तगनों का चंदा भी ,

लूट का गोरखधंदा भी !

भोले भक्त और निष्पाप भी

अधर्मीओं के पाप भी

वह देखता है अनपढ बेघर

घुमंतू बाल गरिब भी !

इलाज की प्रतिक्षा में

दम तोडतें मरीज भी !


मंदीर बढे़ भिखारी भी

आत्मनिर्भरता की दुहाई भी !

देते महंगे विज्ञापन देखे

विकास की गवाही भी !

देखे रेत के ढेर में गढी

तैरती लाशों की कहानी भी !

सुन्न है रात का चंद्रमां

सुन्न मैय्या का पानी भी !


राम कृष्ण के नाम पर

हर कोई कमाता खाता है !

और बंदिस्त बेबस भुखी

स्वयं हमारी गोमाता है !

मन की मैल ना साफ है

ना साफ है गंगा मैय्या !

राम नाम से बढा हो गया

देखो यारों रुपय्या !


पाठशालाओं अस्पतालों को

चंदा कोई देता नही !

उसकी दानपेटी में उबाल है

जो कुछ भी लेता नही !

यह कैसी श्रद्धा है ?

यह कैसा मौका है ?

सादगी सीखाते साईराम को

गहनों रत्नों का तोफा है !


कहे वह आंखे खोल भक्त

देख मन की दृष्टी से !

झांसे में इनके मत आ

द्वेष हिंसा से तोबा कर

भुखे को खिला

प्यासे को पिला

सिंच फसल नफरत की

प्यार मुहोबत की वृष्टी से !


आस्था का गर व्यापार हो

तो व्यापारीयों पर कहर हो !

जो हड़पे उसकी जमीनों को

वह उठाए ऐसे कमिनों को !

खतम हो इनकी हस्ती !

शिवजी की जटाओं की धारा

ले डूबे इन पापियों की कश्ती !

भक्तों पर ना सही पर

भगवान पर तो रहम हो !

सत्य और न्याय का

मतलब ही धरम हो !

भक्ती श्रद्धा और विश्वास ,

काफी है धरम को

अतः धन विरहीत धरम हो !

धन विरहीत धरम हो !


बालासाहेब उर्फ बालाजी धुमाळ

मो. 9421863725

वाह

 #वाह











जीवन गीत मी लिहीत जावे

माझे वेढेपण तु सहन करावे

समजुन घ्यावे मनोभावे

ऐकावे गावे सुचवावे काहीतरी

पण अशीच तु माझ्या जवळ बसावे


संशया कदापि स्थान नसावे

आपल्यात असेच आपलेपण असावे

रूसावे फुगावे आपल्या आपल्यात

अन आपणच आपले मन जपावे..


आपण आपल्याच विश्वात

तल्लीन अन एकात्म व्हावे

चुका दाखवाव्यात परस्परांच्या

मिळून रिकाम्या जागा भरावे

आपणच आपले कौतूकही करावे...


मी म्हणजे तु तु म्हणजे मी

तु तु मै मै ला स्थान नसावे

काल आज होत नाही

आज उद्या येत नाही

उद्याचा कसला भरवसा

आज हाच सर्वकाही...


हा सहवास अमुल्य प्रिये

याचे सदैव भान असावे.

तु मला अन मी तुला जपावे

प्रेम रंग हा आगळा

याच रंगी नहावे...


दोन अपुर्णांची संगत पुर्णत्व आणते

जीवनही असेच संगतीने पुर्ण व्हावे

कौतुक करणारे करतीलच

टिकाही करणारे करतीलच

जगाची वाट बघण्यात

आपण आयुष्य का संपवावे?

आपणच आपल्याला "वाह" करावे...


बालासाहेब उर्फ बालाजी धुमाळ

मो. 9421863725.

Wednesday 9 June 2021

जात पंचायतींना वाळीत टाका...

 जात पंचायतींना वाळीत टाका...

गोंधळी समाज बांधवांनो, चंद्रपूरच्या भंगाराम वॉर्डमध्ये जात पंचायतीने बहिष्कृत केलेल्या स्व. प्रकाश ओगले यांच्यावर अंतिम संस्कार करण्यासही समाजाला मज्जाव केला! रडून पडूनही, आर्त विनवण्या याचना करूनही जेव्हा समाजाच्या हृदयाला पाझर फुटत नव्हता तेव्हा पर्यायहीनतेतुन त्यांच्या मुलींनी प्रकाशजींच्या पार्थिवाला खांदा दिला! मुखाग्नी दिला! अंत्यसंस्कार पार पाडला! हा सर्व प्रकार पाहून ऐकून, अर्थात मी प्रत्यक्ष जाऊन ऐकला वा पाहिला नाही परंतु सहाजिकच हा सोशल मिडीयाचा आणि मिडीयाचा काळ आहे, त्यामुळे दोन्ही मिडियावर किंबहुना तीनही मिडीयावर हे ऐकायला वाचायला आणि पाहायला मिळाले आणि मला फार वाईट वाटले! माझा फार अपमान झाला! तुम्ही म्हणाल की आता तुमचा कसा मध्येच अपमान झाला? तुम्ही तर तुमच्या घरात होतात, घटनास्थळी नव्हतात, तुम्ही कुठे तेथे अनुभवायला किंवा सहन करायला हजर होते किंवा त्या परिवाराचा आणि तुमचा काय संबंध?? तर संबंध असा आहे की मीही गोंधळी आहे, मीही हिंदु आहे, मीही माणूस आहे! आणि मी जातीने गोंधळी म्हणून, मी हिंदू म्हणून आणि मी एक माणूस म्हणून अतिशय ताठ मानेने बोलतो, वावरतो आणि जगतो, माझ्या जातीचा, धर्माचा मोठेपणा सांगतो आणि म्हणून माझा या घटनेशी जवळचा संबंध आहे.

 घडलेला प्रकार जेवढा दुर्दैवी आहे तेवढाच बेकायदेशीर व गुन्हेगारी स्वरूपाचा देखील आहे. आपले महाराष्ट्र हे सामाजिक बहिष्कारा पासून व्यक्तींचे संरक्षण अधिनियम - २०१६ या पद्धतीचा कायदा करणारे देशातील पहिले राज्य आहे. या कायद्यांतर्गत सामाजिक बहिष्काराचे आदेश देणाऱ्या जात पंचायतीच्या सदस्यांना सात वर्षांपर्यंतचा तुरुंगवास किवा पाच लाखांपर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. महाराष्ट्र हे शिवछत्रपती, फुले, शाहू, तुकोबा, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, डॉ. आंबेडकर यांचा वारसा जपणारे पुरोगामी व देशासाठी दिशादर्शक राज्य आहे. म्हणून चंद्रपूरचा हा प्रकार आपल्या संपूर्ण गोंधळी समाजासाठी, हिंदू धर्मासाठी आणि राज्यासाठी क्लेशदायक आणि शरमेने मान खाली घालायला लावणारा प्रकार आहे.

 अर्थात आता आपल्यामध्ये शरम नावाची बाब शिल्लक राहिली आहे की नाही? ठाऊक नाही! कारण असे प्रकार नेहमीच घडतात! आपण नेहमीच वाचतो ऐकतो पाहतो आणि सोडून देतो! अहो माणुस रानटी होता तेव्हा, शिक्षण नव्हते, विज्ञान नव्हते, कायदा नव्हता त्या कालखंडात माणूस असाच होता, समाजही असाच होता परंतु आता जेव्हा आपण औद्योगिकीकरण, जागतिकीकरण, यांत्रिकीकरण करून आपली बुद्धीमत्ता सिद्ध केली आहे! आज जेव्हा आपण ब्लॅक होल, युनिव्हर्स, मायक्रोबायोलॉजी, ॲनाटोमी, फिजिओलौजी, व्हायरोलौजी, रॉकेट सायन्स, बिग बँग, जेनेटिक्स अशा प्रगत शास्त्रांमध्ये निष्णात झालो आहोत! आज जेव्हा आपण आधुनिक झालो आहोत, तेव्हाही जर असे प्रकार घडत असतील आणि आपण ते तरीही सहन करत असू तर? तर मग अवकाशात उपग्रह सोडण्याला, परग्रहांचा शोध लावण्याला, चंद्रा मंगळावर जाण्याला, अंतराळात स्पेस स्टेशन उभारण्याला, काय अर्थ आहे? जर आपण आपलेच भाऊबंद, नातेवाईक स्विकारू शकत नसु तर एलिएंसना आपण का शोधतोय? जर एका बाजूला आपण एवढे आधुनिक असू आणि दुसऱ्या बाजूला जर एवढे मागास असू, प्रतिगामी असू तर असेच म्हणावे लागेल की आपण एक तर माणूस नाही आहोत अथवा आपल्याला मन बुद्धी नाहीये. गोंधळी जमात, मन बुद्धी हीन जमात आहे असेच म्हणावे लागेल ना? किंवा मग असे म्हणावे लागेल की, गोंधळी जमात ही विद्यमान व्यापक आणि आधुनिक मानव जातीच्या समूहापासून अलिप्त आहे! परंतु वास्तव हे नाही.

आपल्या जातीचा अभिमान प्रत्येकालाच आहे, मलाही आहे अर्थात तो असावा की नसावा यावर चर्चा, विचारमंथन होऊ शकते, व्हायलाच हवे कारण आधुनिकतेबरोबरच विषमतेला पुरक बाबींचा अंत देखील व्हायलाच हवा. जात ही जतन करून ठेवायचा दागिना नाहीये तर तोडून फेकून द्यायचे जोखड आहे. असे समजतेय की या स्व. प्रकाश उगले यांना सात मुली आणि दोन मुले आहेत. सात मुलींपैकी सहा मुलींची लग्ने झाली आहेत, तर दोन्ही मुलांची लग्ने झाले आहेत, पैकी मोठ्या मुलानेही आंतरजातीय विवाह केलेला असल्याने त्यालाही समाज बहिष्कृत केले गेले आहे! मुळात स्व. प्रकाश ओगले यांना समाजाबाहेर टाकण्याचे कारणही त्यांनी आंतरजातीय विवाह केला होता हेच होते! हा सगळा प्रकार पाहून माझ्या तळपायाची आग मस्तकाला जातेय! मला फार वाईट वाटतेय! फार राग येतोय! हा असला कसला समाज? समाज म्हणजे काय? समानतेवर आधारलेला, समानतेचे तत्व जोपासणारा एक लोकगट! मग तो जातीवरून पडलेला असो किंवा धर्मावरून किंवा अनुवंशावरून, कामाच्या स्वरूपावरून, ठिकाणावरून अथवा कशावरूनही असो. जर समाज आपल्याच घटकाला बहिष्कृत करत असेल! त्याच्या सुखात तर सोडा, दुःखातही म्हणजे अगदी त्याच्या अंत्यविधी मध्येसुद्धा सहभागी होत नसेल व कुणाला सहभागी होऊ देत नसेल तर याला काय समाज म्हणावे? मृतदेहाशी कसले वैर? यात त्याच्या मुलींचा, त्याच्या मुलांचा, जावयांचा, नातवंडांचा काय दोष? व्यक्तीच्या मृत्यूनंतरही जर नियम संपत नसतील तर ते आपण संपवले पाहिजेत आणि ते नियम करणारे देखील संपवले पाहिजेत. 

जात पंचायतींना कुठलाही कायदेशीर व घटनात्मक आधार नाही. मग या खाणाऱ्या पिणाऱ्यांना, हरामखोरांना आपण पंच किंवा न्यायाधीश म्हणावे काय? हे जितके दुर्दैवी आहे, तितकेच घृणास्पद व निंदनीय आहे. या जात पंचायतींमधील स्वयंघोषित काही बिन्डोक आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हा अधिकार दिलाच कोणी? हे कोण लोकांना बहिष्कृत करणारे? आज आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत. आपण चंद्रावरच नव्हे तर आता मंगळावरही गेलो आहोत. आपण अनेक अज्ञात आकाशगंगा शोधून काढल्या आपण! अंतराळात स्पेस स्टेशन तयार केले आहे आणि तरी अजूनही रूढी परंपरा अंधश्रद्धा किंवा मनमानी दादागिरी यांना आपल्या आधुनिक समाजामध्ये स्थान का असावे काय? आपण फक्त ऐकतोय आणि न ऐकल्यासारखे करतोय! पाहतोय आणि न पाहील्यासारखे करतोय! का? का आपण जात पंचायतींवर बहिष्कार टाकू शकत नाही? का आपण त्यांना समाजातून बेदखल करू शकत नाही? का आपण त्यांच्यावर जिथे आहोत तिथून गुन्हे दाखल करू शकत नाही?

 चंद्रपूरची ही घडलेली घटना जितकी दुर्दैवी आणि मनाला वेदना देणारी आहे, राग आणणारी आहे तितकीच एका अर्थाने ऐतिहासिक देखील आहे! अर्थात हे पहिल्यांदाच होत नाही की, मुलींनी आईच्या किंवा वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला आहे परंतु चला पुन्हा एकदा दिसून आले की मुली देखील मुलांपेक्षा कमी नाहीत. या घटनेने पुन्हा एका नव्या अध्यायाला सुरुवात केली आहे. ही घटना अनेक अशा शोषित आणि अन्याय अत्याचार ग्रस्त मुलींसाठी प्रेरणा ठरणार आहे. मी तर आवाहन करतो सर्व मुलींना की, यापुढे जर असा प्रकार कधी घडलाच दुर्दैवाने तर मुलींनी समाजाला विनवणी करू नये, सरळ स्वतः पदर कमरेला खोचावा जसा जयश्री ताईंनी व त्यांच्या बहीणींनी खोचला! स्वतः मुलगा व्हावे व कर्तव्य पार पाडावे. भंगार लोकांच्या नादाला लागू नये. त्या जयश्री ओगले ताई आणि त्यांच्या बहिणींना मी खरच मानाचा मुजरा करतो. त्या झुकल्या नाहीत म्हणून. किंबहुना जर माझी पोस्ट त्यांच्यापर्यंत पोहचलीच तर विनंती करतो या पोस्ट मधून की, या नराधमांना अजिबात सोडू नका. हे कायद्याचे राज्य आहे. तुम्ही तुमचे सर्वोत्तम योगदान द्या. यांना तुरूंगात, जिथे यांची खरी जागा आहे तिथे पोहचवा. समाज नक्कीच तुमच्या पाठीशी उभा ठाकेल जसे युवा योद्धे संजय कदम व इतर उभे ठाकले! कारण ही चार टाळकी (जातपंचायती मधली) म्हणजे समाज नाहीत. समाज व्यापक आहे, विस्तीर्ण आहे, समंजस व विचारी आहे.

जे आपल्या सोबत नसतील त्यांनी विचार करावा की, कसल्या गप्पा मारतोय आपण देवीचे भक्त असल्याच्या? पापा-पुण्याच्या? श्रद्धेच्या? देवा-धर्माच्या? देव धर्म हे शिकवतो काय? धर्म धरून ठेवायला शिकवतो. धर्माची एक धारणा असते. धर्म, एकता आणि एकात्मता, समता आणि समानता शिकवतो. अशा पद्धतीने बहिष्कृत करणे शिकवत नाही. ही कसली मानसिकता? तुम्ही म्हणाल की विषय जातीचा आहे तर धर्मापर्यंत कशाला घेऊन चालले आपण? तर मी तुम्हाला अत्यंत जिम्मेदारीने सांगतो की मुळात जातींची निर्मिती हेच धर्माचे अपयश आहे. जातीच्या किंवा जात पंचायतींच्या निर्मिती पाठीमागे धर्माच्या चुकीच्या संकल्पना आहेत. त्यामुळे सर्व विचारी समाजाने, समाज संघटनांनी, समाजसेवकांनी त्या ओगले परिवाराच्या पाठीशी उभे राहण्याची नितांत गरज आहे आणि ते जे कोणी चार बिनडोक टाळके असतील या मानसिकतेची, त्यांना अद्दल घडावी यासाठी प्रयत्न करण्याची नव्हे त्यांना त्यांच्या खर्‍या जागेपर्यंत पोहोचविण्याची खूप गरज आहे. मी पुन्हा सांगतो, त्यांची जागा तुरुंगात असली पाहिजे म्हणजे यापुढे असे अन्यायकारक फर्मान काढणाऱ्या त्यांच्या मानसिकतेच्या गटांवर अंकुश येईल.

आपण सर्व गर्विष्ठ गोंधळी आहोत. आपली जात स्त्री शक्तीचा आदर करायला शिकवणारी जात आहे. आदर करणारी जात आहे. "सम बळ म्हणजे संबळ" हे आपण विसरलो आहोत की काय? मला कळत नाही, या जातपंचायतींना कोणाला दंड ठोठावण्याचा, कुणाची योग्याअयोग्यता जस्टीफाय करण्याचा अधिकारच कुणी दिला? हे कोण ठरवणार योग्य काय आणि अयोग्य काय? यांच्या गाडीखाली किती अंधार आहे तो शोधला म्हणजे लक्षात येईल की तो लपविण्यासाठी ही मंडळी असा दबावगट निर्माण करते. थेट पोलीसांत किंवा न्यायालयात जाणे कधीही अयोग्यच. आपल्या माणसांसमोर आपली समस्या मांडलीच पाहीजे. सामाजिक मध्यास्थता समजून घेतली जाऊ शकते परंतु अशा अविवेकी हुकूमशाही फरमाणांना सामाजिक मध्यस्थता म्हणता येत नाही. याला अरेरावी, गुंडगिरी म्हणतात. योग्य-अयोग्य ठरविण्याचा, अपराधी ठरविण्याचा अधिकार शासन, प्रशासन, पोलिस यंत्रणा यांना आहे. दंड किंवा शिक्षा ठोठावण्याचा अधिकार मा. न्यायालयांना आहे. या यंत्रणा कशासाठी आहेत मग?

मोठ्यांनी आंतरजातीय विवाहाचे पाऊल उचलले तर ते पुरोगामी व कौतुकास्पद पाऊल आणि सर्वसामान्यांनी उचलले तर ते पाप! गुन्हा! लज्जास्पद व लांच्छनास्पद पाऊल! हे ठरवणारे ही जात पंचायत कोण? श्रीमंत असो वा गरीब, जीवनसाथी निवडण्याचा अधिकार वैयक्तिक नाही का? की तो केवळ मोठ्या लोकांनाच आहे? गंमत म्हणजे जर मोठ्या जातीतील मुला सोबत अथवा मुलीसोबत आंतरजातीय विवाह केला तर त्यावर बोट ठेवले जात नाही, विवाह समारंभ थाटामाटात संपन्न झाले तर त्यावर बोट ठेवले जात नाही परंतु सर्वसामान्य लोकांनी जर आंतरजातीय विवाह केला तर आभाळ फाटते!! अशी दुटप्पी भूमिका न्यायोचित आहे काय? तसे तर भारतामध्ये होणारे आज वरचे जवळजवळ सर्व विवाह हे जातीमध्ये आणि मोठमोठ्या बैठकीमध्ये जमलेले, थाटामाटात संपन्न झालेले आहेत तरीही घटस्पोट का झाले? तरीही हुंडा आणि इतर कारणांमुळे कौटुंबिक अन्याय अत्याचार का झाले? अगदी बहिणी भावांमध्ये झालेले विवाहसंबंध म्हणजे आत्या मामांच्या लेकरांसोबतचे विवाह संबंध देखील तडीस गेले नाहीत. हे वास्तव आहे की अशा विवाह संबंधांमध्ये देखील प्रचंड टॉर्चर केले गेले, मानसिक त्रास दिला गेला. अशिक्षित आणि ग्रामीण कुटूंबातच नाही तर उच्चशिक्षित, प्रगत आणि प्रतिष्ठित शहरी कुटूंबांमध्ये देखील!

जेष्ठांनी, धुरीनांनी सामंजस्याने विषय नक्कीच हाताळायला हवेत, न्याय करायलाच हवा कारण अजुनही आपला समाज प्रचलित न्याय व्यवस्थेसमोर न्याय मागण्यासाठी सक्षम नाही परंतु वा-याच्या दिशेने वाहणे, फुटाण्यावर (दारू मटण बाई पैशावर साक्ष देणे) याला न्याय नव्हे तर अन्याय म्हणतात. याचा सर्वमान्य स्वीकार कसा काय होऊ शकतो? या स्वयंघोषित नियंत्रकांचा आणि नितीमुल्ये तत्वे जात शिक्षण बुद्धी कायद्याचे ज्ञान यांचा अजिबात संबंध नाही. जे आपली काळी संपत्ती टिकविण्यासाठी स्वयंघोषित न्यायाधीश बनतात, आपले क्रुत्रिम वलय निर्माण करतात, त्यांनाच आता वाळीत टाकण्याची वेळ आलेली आहे. विशेष म्हणजे जुन्या जात पंचायतींची जागा आता काही समाज संघटना घेत आहेत. आपले साम्राज्य, संस्थान, संपत्ती राजकारण टिकविण्यासाठी किंवा ते निर्माण करण्यासाठी जे लोक खासकरून प्रशासनतुन सेवानिवृत्त झालेले लोक, समाजाला दिशा दाखवण्याचा, संघटीत करण्याचा आव आणतात ते आयुष्यभर सरकारी पदाच्या माध्यमातून मिळवलेली व सेवानिवृत्ती नंतर गमावलेली प्रतिष्ठा, मानसन्मान मिळवण्यासाठी हा सर्व खटाटोप करतात! आपल्या सेवाकाळात हेच लोक समाजाला जवळही करीत नाहीत. जात लपवतात! हे कटू वास्तव कसे काय विसरता येईल? आपल्या मर्जीतील चांडाळ चौकट आपल्या भोवती निर्माण करून सर्वसामान्य समाजावर दबावतंत्र अवलंबू पहातात. जेव्हा समाज खरोखरच संकटात असतो, जेव्हा समाजाला यांच्या मदतीची गरज असते तेव्हा ही मंडळी नॉट रिचेबल असते. अर्थात सर्वच नाही. सेवाकाळातही व सेवानिवृत्ती नंतरही यांचे कार्य खरोखरच खूप चांगले आहे. मी त्यांचा प्रचंड आदर करतो परंतु खऱ्या अर्थाने असे लोक खूप कमी आहेत. आपण जाऊ तिथे आपली सोय झाली पाहिजे हे यांचे ध्येय असतेय. राजकारण्यांच्या बैठकीमध्ये आपल्याला महत्त्व असले पाहिजे आणि ते महत्त्व मिळविण्यासाठी समाज आपल्या पाठीशी आहे हे दाखवून देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यातून समाजाचे भले करणे बाजूला राहते स्वतःचेच भले करून घेतले जाते! समाजाला वापरून फेकून दिले जाते! मुळात यांना जाती संपवायच्याच नाहीत. समाज यांच्याच भोवती यांना फिरत ठेवायचाय!!

असो, काही समाज संघटना किंवा समाजसेवक जे चुकीच्या पद्धतीने वागतात त्यांनी याची जाणीव करुन घ्यावी की समाज मूर्ख नाही, समाजाला सर्व काही कळते, फरक एवढाच आहे की ते व्यक्त होत नाहीत आणि हे केवळ गोंधळी समाजासाठीच लागू होतेय असे अजिबात नाही. सर्व भटक्या विमुक्त जमातींसाठी लागू होतेय किंबहुना भटक्या-विमुक्तांच्या बाहेरच्या मागास जाती जमाती सर्वांमध्ये हा प्रकार आहे. पात्र पाहून वाढले जातेय! असो मूळ विषयावर येतो, जात पंचायत! दंड भरला, दारू बोकड बाई यांचा नैवेद्य दाखवला की पंच व त्यांची पंचायत प्रसन्न होते! पाचामुखीचा परमेश्वर एवढा लालसी, भ्रष्ट आणि अमानुष कसा काय होतो? त्यामुळे मित्रांनो आता या जात पंचायतींची पंचाईत करण्याची वेळ आलेली आहे. हे मारत आहेत आणि आपण मारून घेतोय!! आता पार्थिवाला मूठमाती मिळो अथवा न मिळो परंतु जातपंचायतींना मूठमाती देण्याची वेळ आलेली आहे. नैसर्गिकरित्या जातीबाहेर लग्न केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये असमाधानी व क्रोधापुर्ण भावना निर्माण होतेच. प्रत्येकाला वाटते की जातीतली मुले किंवा मुली मेल्या होत्या काय? याने किंवा हिने का बाहेर लग्न केले? असंतोष समजून घेतला जाऊ शकतो परंतु त्याहीपेक्षा अधिक हे समजून घेण्याची गरज आहे की जीवनसाथी ठरविण्याचा अधिकार वैयक्तिक आहे व तो वैयक्तिकच राहिला पाहिजे. आपले वैर पार्थवाशी किंवा पार्थिवाच्या लेकरा बाळांशी नसले पाहिजे. ज्याला हे दंड असे नाव देत आहेत ती एक प्रकारची खंडणी आहे, लाच आहे, भ्रष्टाचार आहे आणि आशा खंडणीखोर लाचखोर भ्रष्टाचारी लोकांनी समाजाचे नियंत्रण करावे, नेतृत्व करावे, न्यायनिवाडा करावा आणि तोही अशाप्रकारे? ही बाब आपण कसे काय सहन करू शकतो? मुळात जात पंचायत बेकायदेशीर आहे. आज जात पंचायती अस्तित्वात नाहीत परंतु तरीही समाज बैठका बसतात, त्यांत निर्णय होतात, जे असंतुलित एकांगी व नियम कायद्यांना धरून नसतात. ठराव किंवा निर्णय हे पक्षपाती व अन्यायकारक असतात मग जात पंचायत नसल्याचे म्हणता येणार नाही. या बैठका, संघटनांची मध्यस्थता ही एक प्रकारची जात पंचायतच असते. अशा किती बैठकांमध्ये पोलीस, कायदे यांचे ज्ञान असणारे समाजातील का असेनात परंतु प्रतिनिधी असतात? कायदेशीर मदत उपलब्ध करून दिली जाते? हम करे सो कायदा हे तत्व कसे काय चालेल? आपण कितीही ओरडलो की आमच्यात जात पंचायती नाहीत तरी जे समोर येतेय ते खोटे नाही. कुणी मुली प्रसिद्धीसाठी असे पाऊल उचलू शकत नाहीत. आपण न्यायप्रिय जमात आहोत. धर्मराजाचा न्याय आपण व्यासपिठावरून सांगतो मग आपण अन्यायाची बाजू कशी काय घेऊ शकतो? चुक ही सदासर्वकाळ चुकच. नितीमान समाज चुकीचे समर्थन करू शकत नाही, आपणही ते करणार नाही. समाज बदनाम या अशा जात पंचायतींमुळे होतोय, त्यांची काळी करतुद समोर आणून त्यांचा फांडाफोड करणारांमुळे किंवा विरोध करणारांमुळे किंवा अन्यायाला वाचा फोडणारांमुळे नाही. समाजाचे खरे गुन्हेगार कोण हे समजून घेणे गरजेचे आहे.

मग आता माझा शेवटी असा प्रश्न आहे सर्व समाज बांधवांना की, आपले शोषण करणाऱ्या, आपल्याला यातना देणा-या आणि आपल्या पवित्र जातीची बदनामी करणाऱ्या अशा स्वयंघोषित न्यायाधीशांना आपण लाथ का नाही मारली पाहिजे? मुळात ही जातीव्यवस्था हाच विषमतेचे मूळ आहे. हिने धर्म बाधित होतोय. धर्माच्या मूळ संकल्पनेचा खून होतोय. धर्म धरून ठेवतो परंतु या जातिव्यवस्थेमुळे माणसे धरून ठेवली जात नाहीत. म्हणून जातीव्यवस्थेचा अंत केला गेला पाहिजे. जातिनिर्मुलन हे घटनाकारांचे अंतिम ध्येय होते. मला तर कधी कधी वाटते की, आरक्षणामुळे जातीव्यवस्था अधिक मजबूत व दृढ होत चालली आहे! एवढेच नव्हे तर दररोज नवनव्या मागास जातींचा जन्म होत आहे! आणि विशेष म्हणजे या जाती सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत! याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे ब्राह्मण स्वतहाला जातीय आरक्षण मागत आहेत! आता यापेक्षा मोठे उदाहरण असू शकत नाही. जातपंचायतींच्या अशा क्रूर आणि अमानवी फरमाणांमागे बहुतांश वेळा "आंतरजातीय विवाह" हेच कारण दिसुन आलेले आहे. त्यामुळे आता जातीच्या रूढीवादी चाकोरीबाहेर जाऊन विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे आणि अशा विक्रुत "जातपंचायतींना वाळीत टाकण्याची वेळ आलेली आहे" बघा पटतेय का ते! आणि जर पटलेच तर इतरांशीही शेअर करा.

बालासाहेब (बालाजी) सिताराम धुमाळ

मो. 9421863725.