Wednesday 21 March 2018

विस्कटलेल्या ग्रामीण लोकजीवनाची पुनर्घडी

..........विस्कटलेल्या ग्रामीण लोकजीवनाची पुनर्घडी..........

मित्रांनो नमस्कार मी नुकताच "आधुनिकीकरणाचा उदय अन लोकजीवनाचा अस्त" नावाचा लेख लिहिला होता. त्यापूर्वी "लोककला" नावाची कविताही लिहिली होती. दोन्हीला ही आपण भरपूर प्रतिसाद दिलात  त्याबद्दल धन्यवाद.

भटक्या विमुक्त जाती जमाती शिक्षणाबाबतीत मुळातच अज्ञानी आहेत. त्यांना ज्ञान आहे मात्र आपापल्या क्षेत्रातील. जसे की कला कसरत कारागिरी नकला करमणूक खेळ इत्यादींमधील. प्रचलित अर्थाने आपण शिक्षण म्हणतो ते पदवी अथवा पदव्युत्तर शिक्षण या जमातींमधील खूप कमी लोकांकडे आहे. बहुतांश लोक अज्ञानी व मागास आहेत. आधुनिकीकरण व त्याच्याशी संबंधित इतर बदलांमुळे या जमातींच्या जीवनमानात संकटे निर्माण झाली आहेत. याचा लेखाजोखा आपण यापूर्वीच घेतला आहे.

आधुनिकीकरण यांत्रिकीकरण संगणकीकरण औद्योगीकरण शहरीकरण आवडीनिवडी मधील व कायदे यामुळे समृद्ध भारतीय संस्कृतीची ओळख असलेले ग्रामीण लोकजीवन व या लोकजीवनाचा मूळ आधार असलेल्या भटक्या विमुक्त जमाती अत्यंत वाईट पणे प्रभावित झाल्या आहेत. बारकाईने पाहिल्यास असे आढळून येईल की सर्वच भटक्या विमुक्त जमाती केवळ हिंदुत्ववादीच नाहीत तर त्याचबरोबर त्या हिंदुत्वाच्या मुख्य प्रचारक व प्रसारक आहेत. या देशाची एक गौरवपूर्ण सांस्कृतिक ओळख निर्माण करण्यात व वैविध्यपूर्ण देश म्हणून भारताची ख्याती जगभरात निर्माण करण्यात या जमातींचा मोलाचा वाटा आहे. शिवछत्रपतींच्या स्वराज्यनिर्मित तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यात या जमातींचा सिंहाचा वाटा आहे. पुढच्या पिढीला आपला जाज्वल्य इतिहास माहीत व्हावा व त्यातून प्रेरणा मिळावी म्हणून या जमातींनी विविध कला जसे की लेखन गायन वादन नर्तन चित्र-शिल्प नकला कसरती यांद्वारे आपल्या समृद्ध संस्कृतीची पुढच्या पिढीला ओळख करून दिली आहे. मात्र जगाच्या महासागरात आधुनिकीकरणाचे वादळ आले व त्याचा अनिष्ट परिणाम लोकजीवनावर होऊन या भिक्षुक कलाकार नकलाकार कसरतीकार कारागीर जमाती परिवर्तनाच्या लाटांसरशी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून विलग होऊन किनाऱ्यावर फेकल्या गेल्या, बाजूला फेकले गेल्या.
आज रोजी जवळजवळ सर्वच भटक्या विमुक्त जमातींचे पारंपारिक व्यवसाय संपुष्टात आले आहेत. खरेतर शासनाने व समाजाने या जमातींच्या पारंपरिक व्यवसायाकडे केवळ एक उपजीविकेचे साधन म्हणून पाहण्यापेक्षा एक प्राचीन कलासंस्कृती म्हणून पाहायला हवे. ती संपुष्टात येणार नाही यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न व्हायला हवेत. लोककला वाढावी विस्तारावी फैलावी असा दृष्टिकोन सरकारचा असावा व त्यादृष्टीने धोरणे योजना व कार्यक्रम आखले जायला हवेत. ही जशी शासनाची जिम्मेदारी आहे तशीच ती आपली ही जिम्मेदारी असावी. आपणही स्व स्थितीबाबत जागरूक असायला हवे.
जगाच्या प्रवासाची दिशा तर आपण बदलू शकत नाही. परिवर्तन हे होण्यासाठीच असते ते झालेच पाहिजे व बदलत्या काळाप्रमाणे आपणही स्वतःमध्ये परिस्थितीनुरूप बदल घडवून आणले पाहिजेत. आपले अस्तित्व टिकवायचे असेल, जीवन जगायचे असेल तर हाताला काम मिळविले पाहिजे व त्यासाठी मागणीप्रमाणे स्वतःला घडविले पाहिजे. उदर्निवाहाची पर्यायी साधने जी आधुनिक जगाच्या मागणीशी सुसंगत असतील अशी साधने शोधली पाहीजेत. हाच आपल्या स्थिती बदलाचा खरा मार्ग आहे.
विज्ञानाच्या प्रगतीमुळे आलेले आधुनिकीकरण, त्यातून झालेले विस्थापन व करावयाचे पुनर्वसन या शृंखलेतील पहिली कडी आहे शिक्षण! शिक्षण मग ते दोन्ही प्रकारचे, एक पारंपारिक लोकशिक्षण पण नव्या रूपात नव्या रंगात नव्या ढंगात घेतले पाहिजे. शिक्षण म्हणजे प्रचलित शालेय व महाविद्यालयीन शिक्षण. शिक्षण घेत असताना व्यवसाय व तंत्र शिक्षणाकडेच ओढ असली पाहिजे. जे शिक्षण हाताला काम देऊ शकत नाही असे टाकाऊ व रद्दी शिक्षण घेण्यात काही अर्थ नाही. यासाठी सरकारकडे संघटितपणे मदत मागायला हवी. समाजानेही आपली सामाजिक जाणीव जागृत ठेवली पाहिजे. सरकार पिचलेल्या जमातींसाठी विविध योजना राबविते मात्र त्या योजना कोणत्या? त्यांचे पात्रता निकष व प्राप्तीसाठी ची प्रक्रिया काय असते हे या समाजातील गरजू व अज्ञानी लोकांना माहीत नसते. म्हणून शासनाने लोकांपर्यंत पोहोचून शासन करत असलेल्या उपायांची माहिती थेट जमीन स्तरावर जाऊन द्यायला हवी व समाजातील जागरूक तरुणांनी व संघटनांनी देखील आपल्या समाजाला या योजनांचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल यासाठी पुढाकार घेऊन गरजू लाभार्थ्यांना सहकार्य केले पाहिजे. अगदी निस्वार्थ भावनेने आपले सामाजिक दायित्व समजून!
सहकार हे असे क्षेत्र आहे जे अनेक हातांना काम तर मिळवून देऊ शकते. शिवाय बचत व ऐनवेळी अर्थोत्पत्तीची सोयदेखील करून देऊ शकते. सहकार म्हणजे अगदी मोठमोठे कारखाने गिरण्या पतपेढया किंवा बँकाच नव्हे (असतील तर छानच) पण लहान लहान बचत गट बी.सी.गट किंवा आर.डी.गट हे देखील सहकारच आहे.
बचत गटांनी त्यांच्या प्रदेशातील मागणीप्रमाणे सेवा पुरविणे, उत्पादन पुरविणे अशी कामे केली पाहिजेत. यात महिलांनी पुढाकार घ्यायला हवा. छोटी छोटी उत्पादने जी कुटिरोद्योग लघुउद्योग या क्षेत्रात येतात असे व्यवसाय करायला हवेत. उदाहरणादाखल सांगायचे झाले तर पापड लोणचे तयार मसाले चटण्या, चटया सजावट नक्षीकाम रांगोळी काम दुध डेअरी चालवणे, दुधाचे पदार्थ बनविणे मेणबत्ती अगरबत्ती गोळ्या चॉकलेट्स बिस्किटे वड्या फुटाणे शेव असे खाद्यपदार्थ बनवणे. बंदिस्त पशुपालन व पक्षीपालन करणे असे व्यवसाय महिला पुरुषांनी एकत्र येवुन करायला हवेत. उत्पादने तयार करणे ती व्यवस्थित साठवून ठेवणे वाहतुकीची साधने उत्पन्न करणे बाजारात घेऊन जाणे इत्यादी कामे व्यवस्थित झाली म्हणजे व्यवसाय यशस्वी होतो. राहता राहिला प्रश्न भांडवलाचा तर त्यासाठी सहकारी धोरणावर अनेकांनी एकत्र येऊन भांडवल उभे करायला हवे. प्रसंगी बँकांकडून कर्ज घ्यायला हवे.
मी हमेशा सहकारी दुकाने ही संकल्पना मांडली आहे. एकापेक्षा अधिक समाजबांधवांनी एकत्र येऊन आपापल्या ऐपतीप्रमाणे दुकान व्यापार व्यावसाय ते अगदी अगदी उद्योग सुरू करावेत. गुंतवणूक व निर्मितीप्रक्रियेतील खर्च समान करावा व नफा देखील समान वाटून घ्यावा. आपण जैन मारवाडी सिंधी कोमटी लोकांचा आदर्श घ्यायला हवा. सर्व व्यवहार पारदर्शक व काटेकोरपणे प्रामाणिकपणे एका आईच्या लेकराप्रमाणे केले तर सहकारी व्यवसाय ही संकल्पना अत्यंत यशस्वी होईल व आपला समाज प्रगत व मोठ्या व्यावसायिकांच्या पंक्तीत जाऊन बसेल.
देणा-याने देत जावे घेणा-याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावेत अर्थात ज्या ठिकाणी आपण देऊ शकतो तेथे ते दिले पाहिजे. दान केले पाहिजे देताना केवळ पैसाच देणे अभिप्रेत नाही तर पैशाबरोबरच सल्ला संधी मार्ग साधने उपलब्ध करून दिली तरी ते दानच ठरते. विशेष म्हणजे मदत ही एक गरीब सुद्धा दुसऱ्या गरिबाला करू शकतो!! दान करण्यासाठी आपण श्रीमंत असायला हवे अथवा आपण श्रीमंत असायला हवे असे नाही. पैसेच दिले पाहिजेत असे अभिप्रेत नाही. माणसाने एकवेळ खिशाने गरीब असायला हरकत नाही मात्र मनाने नेहमी धनाढ्य असावे. तसेच प्रत्येक वेळी आपल्यालाच काहीतरी कोणीतरी दिले पाहिजे ही स्वार्थी अपेक्षा बाजूला ठेवून कधी-कधी आपणही कर्ण, आपणही धर्म, आपणही राजा हरिश्चंद्र यांच्या भूमिकेत यायला हवे.

आपल्या अपयशाचे खापर इतरांच्या माती फोडण्यापेक्षा आपण कुठेतरी कमी पडत आहोत. आपण पुरेशी मेहनत घेत नाही आहोत. आपला मार्ग चुकतो आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. बऱ्याचदा एकाकी राहूनही माणूस विकासाच्या प्रवाहापासून अलिप्त राहतो व मार्ग भरकटतो. परिणामी अपयशी होतो. त्यामुळे समूहात राहा. आपल्यापैकीच सुधारलेले, प्रगत लोक, कसे सुधारले? त्याचा अभ्यास करा, त्यातून बोध घ्या व त्यांचे अनुकरण करा. सुधारितांनीही बिगर सुधारीतांना मोकळ्या मनाने सहकार्य करा. म्हणजे आपला समाज नक्कीच मुख्य प्रवाहात येईल.

मित्रांनो सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण आपापसातील तसेच कुटुंबातील हेवेदावे भांडणे रुसवे-फुगवे छळ मानसन्मान यापासून दूर राहा. हे समजून घ्या की या पृथ्वीतलावर आपले अस्तित्व अत्यंत थोडा काळ आहे. केवळ 60 ते 65 वर्षे या ग्रहावर आपण राहणार आहोत. त्यातील अर्धा काळ हा झोपेत जाणार आहे. राहिलेल्या काळात शिक्षण संघर्ष व संसार सुखदुःखे स्वप्ने कर्तव्ये स्वतःची ओळख निर्माण करणे इत्यादी भरपूर कामे करावयाची आहेत. त्यामुळे नको त्या गोष्टीत स्वतःचा वेळ वाया घालवू नका. बराच वेळ म्हातारपणातील आजारपण व मृत्युशय्येवरील झोपण्यात देखील जाणार आहे. जिवनाकडे डोळसपणे पहा. त्यामुळे उगाच कोणाला त्रास देऊ नका. नको त्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नका. स्वतःही आनंदी राहा व इतरांनाही आनंद द्या.

विधात्याने दिलेल्या मन बुद्धी व शरीराचा दिलेल्या मर्यादित कालावधीत म्हणजे ज्याला आपण जीवन असे म्हणतो त्यात योग्य असा वापर करून भाग्याने मिळालेल्या मानवी जन्माचे सोने करून दाखवा. जीवन स्वर्गासारखे बनवावे कि नर्कासारखे हे आपल्याच हाती आहे. फक्त ते आपण ठरवायला हवे. स्वर्गात जाण्यासाठी फार श्रद्धावान असण्याची गरज नाही. उपास-तापास करणे गरजेचे नाही. कामधंदा सोडून देवदेव करणे, मोठे मोठे धार्मिक खर्च करणे आवश्यक नाही. आणि स्वर्गात जाण्यासाठी मद्यासारख्या (दारू) साधनांची तर अजिबात आवश्यकता नाही. कृपया व्यसनापासून खूप दूर राहा मग व्यसन ते कोणतेही असो, नशा जुगार अथवा इतर कोणतेही व्यसण हे विनाशाचे प्रवेशद्वार असते. हे लक्षात घेऊ. क्षमा करा मात्र मी पाहतो आपला भटका-विमुक्त समाज अंधश्रद्धा व व्यसन यांचा बराच गुलाम झाला आहे. समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी समाजातील सुज्ञ लोकांनी खासकरून तरुणांनी संघटनांनी पुढाकार घेऊन शिक्षण व प्रबोधनातून समाजाला या गुलामगिरीतून मुक्त करण्याची नितांत आवश्यकता आहे.

हे वरील काही उपाय आपण स्वतः करावयाचे आहेत कारण जोवर आपण जागे होणार नाही तोवर आपली प्रगती होणार नाही. समाज म्हणून जी सामाजिक जिम्मेदारी किंवा सामाजिक दायित्व आपण पूर्ण करावयाचे असते ते पुर्ण करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी समाज संघटित असला पाहिजे. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी झाले पाहिजे. समाजामध्ये वैचारिक देवाणघेवाण चर्चा चिंतन-मनन बैठका आंतरक्रिया झाल्या पाहिजेत. भेटून बोलून समान योजना कार्यक्रम बनविले पाहिजेत. उपाययोजना व त्यांची अमलबजावणी यावर अभ्यासपूर्ण असे विचार मंथन व्हायला हवे. थोरांचा आदर करणे, कौटुंबिक जिम्मेदारी पूर्ण करणे, मदत घेणे देणे, कौतुक करणे, आदर्श निर्माण करणे, आदर्श घेणे, हेवेदावे विसरून संघटित होऊन संघर्ष करणे काळाची गरज आहे.

जेव्हा धरणच फुटते तेव्हा टोपल्याने माती टाकून ते बुजत नसते अथवा जेव्हा जंगलाला वणवाच लागतो तेव्हा चिमणीच्या पंख झटकल्याने तो विझत नसतो. आदर्शवाद व प्रत्यक्षवाद यात नेहमीच तफावत राहिलेली आहे. मात्र तरीही छोट्या छोट्या प्रयत्नांनी देखील परिणामांची तीव्रता व दाहकता सौम्य होते. हे छोटे छोटे प्रयत्न आपण नक्की करायला हवेत. मात्र यात मुख्य भूमिका आहे ती सरकारची! ती सरकारी मदत मिळवून देण्याची मुख्य जबाबदारी असते संघटनांची. समाजाने देखील संघटनांच्या पाठीशी कायम व ठामपणे उभे राहणे गरजेचे असते व संघटनांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने नियोजनपूर्वक विविध आपापसात ताळमेळ ठेवून मुख्य उद्दिष्टांपर्यंत घेवून जाणाऱ्या मुख्य प्रवाहात राहून एकजुटीने संघर्ष करत शासनाला आपल्या समस्या सांगून त्या सोडविण्यासाठी कामाला लावले पाहिजे. यासाठी स्वतः काही उपाय सुचवून ते मागणी स्वरूपात लावून धरले पाहिजेत.

मला बऱ्याचदा प्रश्न पडतो की ज्या भटक्या विमुक्त जमातींच्या अंगभूत कौशल्यांचा वापर शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीमध्ये करून घेतला त्याच कौशल्यांचा वापर हे लोकशाहीतील आपले शासन आपल्या कार्यात करून का घेऊ शकत नाही? या जातींना बेरोजगार करण्यापेक्षा त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी, या विविध पारंपारिक लोककला, जीवन संस्कृती जोपासण्यासाठी शासन पुढे का येत नाही? त्यासाठी विविध अभ्यासक्रम शाळा व महाविद्यालयात का निर्माण करत नाही? खरेतर या सर्व पारंपरिक कलागुणांना चालना दिली पाहिजे. काही पारंपरिक व्यवसाय काळाच्या ओघात आधुनिकतेच्या प्रभावामुळे बंद होऊ शकतात मात्र त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने अशा व्यावसायिकांना अथवा जमातींना पर्याय दिले पाहिजेत. मुख्य प्रवाहात जिथे तो नवा असतो तिथे आणण्यासाठी अशा जमातींना प्राधान्ये प्रशिक्षणे व आरक्षणे दिली पाहिजेत. आजही विविध कला प्रयोग सादर होतात मात्र त्यांचे कंत्राट भांडवलदार घेतात. देवस्थाने मोठमोठे कलाप्रयोग यात या पारंपारिक कलाकारांना निव्वळ मजुरांप्रमाणे वापरून राबवून घेऊन त्यांच्याकडून अल्प मोबदल्यावर कामे करून घेतली जातात. त्यात सरकारने हस्तक्षेप करून ही कंत्राटे त्या-त्या जातीच्या लोकांनाच कसे मिळतील हे पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ नद्या धरणांचे कंत्राट भोई मल्लाव कोळी बेस्तर गाबील यांनाच मिळाले पाहिजे. देवस्थानांचे कंत्राट गोंधळी जोशी गोसावी अशा जमातींनाच मिळाले पाहिजे. प्रत्येक स्मशानभूमीमध्ये मसनजोगी सरकारी कर्मचारी असला पाहिजे व त्याची नेमणूक संबंधित स्थानिक संस्थांनी केली पाहिजे. अस्वच्छ कामांची टेंडर्स भंग्यांना मेहतरांनाच मिळाली पाहिजेत. नाहीतर होते काय की ती कामे करतात हीच मंडळी मात्र नफा घेतात उच्चवर्णीय भांडवलदार लोक.

जंगल संवर्धनासाठी कायदे आले म्हणून वृक्षतोड बंद झालेली नाही. वनांची लुट थांबलेली नाही. आजही वृक्ष तोडले जातात. आजही वनांमधील पाने मध डिंक औषधी वनस्पती इ. जमा केल्या जातात. फरक एवढाच की ही सर्व कामे कायदेशीर पद्धतीने केली जातात. मग तिथे लागणारा कर्मचारीवर्ग कामगार वर्ग हा ज्यांचा या क्षेत्रातील रोजगार बुडाला आहे अशा पारंपारिक जमाती जसे कंजारभाट, कटाबु, वैदु अशा जमातींमधुनच का घेतला जात नाही? घेतला पाहिजे.

विविध कारखान्यांना कंपन्यांना कार्यालयांना सुरक्षा पुरविण्यासाठी अधिकृत सुरक्षा एजन्सी तसेच चोरी दरोडेखोरी लूटमार अशा विविध गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी पोलिस दलात प्राधान्याने कैकाडी बेरड रामोशी पारधी कंजारभाट बंजारा वाघरी अशा जमातीच्या लोकांना संधी दिली पाहिजे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटे व त्यांचे परवाने गवंडी वडार बेलदार बेस्तर अशा पारंपारिक बांधकाम व्यवसाय करणाऱ्या जमातींनाच मिळाली पाहिजेत. शासनाच्या विविध योजना कार्यक्रम सूचना अहवाने प्रबोधने इत्यादींची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी शासन लाखो हजारो रुपये जाहिरातींवर व प्रसार माध्यमांवर खर्च करते. त्याऐवजी शासनाने संपूर्णपणे प्रसारमाध्यमांवर विश्वास ठेवण्यापेक्षा आज रोजी बेरोजगार झालेल्या भिक्षुक व कलावंत जसे की गोंधळी गोसावी भराडी चित्रकथी हेळवे जोशी भुते मरीआईवाले कडकलक्ष्मीवाले यांनाच अशी कामे व त्यांची कायदेशीर कंत्राटे दिली पाहिजेत.

पुनर्वसनाच्या या प्रक्रियेमध्ये शासनासह समाजानेही आपला वाटा उचलला पाहिजे. आपल्या देशामध्ये अनेक सार्वजनिक सण-उत्सव साजरे केले जातात. यामध्ये मंडळांची महत्त्वाची भूमिका असते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ठरविले तर त्यांच्याकडून कला व संस्कृती जोपासण्याचे व रिकाम्या हातांना काम देण्याचे महत्त्वाचे काम होऊ शकते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शिवजयंती उत्सव, विवाह सोहळे अशा अनेक प्रसंगी मंडळांनी डिजिटल देखावे, डीजे यांवर पैसा खर्च करण्यापेक्षा या पारंपारिक लोककलावंतांना संधी दिली पाहिजे. यामुळे केवळ यांच्‍या उदरनिर्वाहाचाच प्रश्न सुटेल असे नाही तर आपण नष्ट होत चाललेली लोककला व आपली वैभवशाली परंपरा टिकवून ठेवण्यात देखील यशस्वी होऊ असे मला वाटते.

गोपाळ, कोल्हाटी, डोंबारी या खेळकरी कसरतीकार जमाती जन्मानेच शारीरिकदृष्ट्या चपळ काटक व लवचिक असतात. यांच्या या उपजत क्षमतांचा व कौशल्यांचा उपयोग अग्निशमन दल, मदत व पुनर्वसन विभाग व वनविभाग इत्यादी क्षेत्रात प्राधान्याने करून घ्यायला हवा. यांच्यावर शिक्षण व प्रशिक्षणावर थोडासा खर्च केला तर ही मंडळी जिम्नॅस्टिक्स व ॲथलेटिक्स मधे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांसह ऑलिम्पिकमध्येही देशासाठी पदके जिंकतील याबाबत माझ्या मनामध्ये शंका नाही.

आयुध निर्मिती व यंत्राद्वारे भांडी अवजारे व इतर उत्पादने निर्माण करणाऱ्या कारखान्यांमध्ये शिकलगार घिसाडी लोहार ओतारी ठुकारी छप्परबंद अशा कारागीर जमातींना प्राधान्याने संधी दिली गेली पाहिजे. तर वस्त्रोद्योग क्षेत्रात काशीकापडी धोबी परीट कोष्टी अशा लोकांना वाव असला पाहिजे.
गुप्‍तहेर खात्यामध्ये बहुरुपी तिरमल अशा जमातींच्या लोकांचा चतुराईने वापर करून घेतला गेला तर सरकारचे काम अधिक सोपे होईल. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी खरा पोलीस माझ्या वयाच्या साधारणपणे तेराव्या-चौदाव्या वर्षी पाहिला. तोपर्यंत मी पोलिसाच्या वेशात येणाऱ्या बहुरुपयालाच पोलीस समजायचो! सांगायचे तात्पर्य म्हणजे या लोकांकडे अंगभूत कौशल्ये आहेत. त्यांना कुठल्याही विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. अनुभवाने ही मंडळी वागण्या-बोलण्यात परिपक्व झाली आहेत. म्हणून अशांना हेरगिरीचा परवाना द्यायला हवा. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीज ही संकल्पना सरकारला चालते तर मग प्रायव्हेट हेर असायला काय हरकत आहे. बहुरूप्यांना पोलीस मित्र म्हणून तर गारुड्यांना सर्पमित्र म्हणून प्रमाणित करून परवाने द्यायला हवेत.
विविध प्राणी संग्रहालये, अभयारण्ये वनविभाग यामध्ये गारुडी मदारी दरवेशी माहुत यांना अग्रक्रमाने कामे दिली पाहिजेत. तटरक्षक दलात पाणबुडे म्हणून व मदत व पुनर्वसन विभागात, अग्निशमन विभागात बेस्तर, भोई, मल्लाव, कोळी, गाबील अशा जमातींना काहीसे प्रशिक्षण देऊन सामावून घेतले पाहिजे. खरेतर यांना प्रशिक्षणाचीही आवश्यकता नाही. संपूर्ण आयुष्य ज्यांनी लाटांवर व धोक्यात घातले अशांच्या कौशल्यांचा वापर करून घेणे हे शासनाच्या दृष्टीनेही फायद्याचे व नैतिकतेच्या दृष्टीने ही न्यायाचे ठरेल.

आज आपण पाहतो नैसर्गिक साधनसंपत्तीची अगदी बेहिशोब व बेलगाम पद्धतीने लुट सुरू आहे. सरकारी व खाजगी कंपन्यांचे व्यवसाय उद्योग या क्षेत्रात जोरात सुरू आहेत. मात्र अनादी काळापासून नैसर्गिक साधन संपत्तीच्या जिवावर, तीचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी घेत, ज्या पारंपारिक जमातींनी त्यावर उदरनिर्वाह केला, संस्कृती टिकवून ठेवली, त्या जमातींना आज कुठेच स्थान नाही! ही शोकांतिका म्हणावी लागेल.
पशुपालनावर उपजीविका असलेल्या गवळी गोपाळ धनगर आदी जमातींना पशुपालनासाठी अनुदान दिले पाहिजे. तसेच आरक्षित क्षेत्र म्हणजे गायरान वा वनराई उपलब्ध करून दिले पाहिजे. वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग यांच्या ताब्यातील वनक्षेत्रे माळराने पशूंना चरण्यासाठी खुली करून दिली पाहिजेत. अशा क्षेत्रात शेळ्यामेंढ्या, गाढवे, घोडे इतर जनावरे यांचे खाद्यान्न असलेला चा-याची लागवड केली पाहिजे. त्या चा-याचे जतन केले पाहिजे. पशुपालकांना निवाऱ्यासाठी राखीव क्षेत्र असले पाहिजे.  त्यांना ओळखपत्रे व परवाने दिली पाहिजेत.

मला नेहमी प्रश्न पडतो की तंबाखू व तंबाखूजन्य उत्पादन करणारे कारखाने, मद्य निर्मिती करणारे कारखाने बंद करण्याची मागणी करणाऱ्या जनहितयाचिका न्यायालय अमान्य करते. कारण न्यायालय या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांवर याचा विपरीत परिणाम होईल याचा विचार करते. मग भीक मागण्या-या, कसरती करून वर्षानुवर्षांपासून पोट भरणार्‍या जमातींना सरकार मज्जाव कसा काय करू शकते? एकीकडे घोड्यांच्या शर्यती मान्य आहेत. शर्यतींवर होणारा घोडेबाजार शासनाला मान्य आहे तर दुसरीकडे गारुडी मदारी नंदीबैलवाले दत्ताच्या गाडीवाले पोपटाच्या साह्याने भविष्यवाणी करणारे, वाघवाले, आस्वलवाले यांवर बंधने का लादली जातात? म्हणजे सरकार या जाती-जमातींच्या दुःखांपेक्षा प्राण्यांच्या दुःखाबाबत अधिक संवेदनशील आहे! सरकारला या जमातींच्या गुलामगिरीपेक्षा प्राण्यांच्या गुलामगिरीची जाणीव जास्त आहे. यावरून सरकार मग ते कोणतेही असो भटक्यांच्या बाबतीत किती असंवेदनशील आहे याची पुरती कल्पना येते. माझा हेतू सरकारवर किंवा कायद्यावर टीका करण्याचा नसून सरकारचे धोरण व सरकारने निर्माण केलेले हे कायदे भटक्या-विमुक्तांच्या कसे मुळावर आले आहेत याची जाणीव करुन देणे हा आहे. बरे कायदे केलेतच तर मग या कायद्यांनी भटक्या-विमुक्तांच्या  जीवनमानावर काय विपरीत परिणाम केलेत ते ही अभ्यासा आणि मग भटक्या विमुक्तांचे पुनर्वसन करणारे कायदेही कायदेमंडळात संमत करा.

 मला वाटते की या भटक्या विमुक्तांनाकडे संपूर्ण देशभर (महाराष्ट्रातील 14 अधिक 28 जमातींसह) सर्व जमातींकडे निर्वासित, भूमिहीन, अशिक्षित, असुरक्षित, असंघटित, पारंपारिक कलांत कुशल पण आधुनिक जगात अकुशल म्हणून बेरोजगार, अस्थिर, भयभीत, वंचित व दुर्लक्षित लोकांचा वर्ग म्हणून पाहायला हवे. पारंपरिक रोजगार आधुनिकतेने हिसकाऊन घेतलेल्या निराश्रित लोकांचा वर्ग म्हणून पाहायला हवे.

शासनाची ध्येय धोरणे ठरविणार्‍यांनी या बाबींचा गांभीर्याने विचार करायला नको का? आज रोजी या जमाती अगदी वेठबिगारांचे जीवन जगत आहेत. त्यासाठी शासनाने या जमातींना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात, त्यांच्यातील अंगभूत क्षमता व कौशल्ये ओळखून त्यांना सामावून घेतले पाहिजे. त्या त्या क्षेत्रातील कामांची कंत्राटे ही या जमातींनाच मिळाली पाहिजेत. कामगार अथवा कर्मचारी म्हणूनही याच जमातींना प्राधान्याने नेमले गेले पाहिजे. या जमातींना तसे प्रमाणित करून प्रमाणपत्रे, ओळखपत्रे व अधिकृत परवाने दिली पाहिजेत. तरच ख-या अर्थाने यांचे पुनर्वसन होईल. तरच आधुनिकीकरण झाले असे म्हणता येईल.

पुनर्वसनाच्या या उपायांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत असताना, या जमातींचे शिक्षण नसणे अथवा कमी शिक्षण असणे ही तांत्रिक अडचण येईल. पण त्यांच्यात कौशल्यांची कमतरता नाही, शिक्षण महत्त्वाचे की कौशल्य महत्त्वाचे? नियम महत्त्वाचे की जीवन महत्त्वाचे? यावर सहानुभूतीपूर्वक व गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे. शिक्षण हवेच आहे तर शासनामार्फत नोकरीपूर्व रोजगारपूर्व मोफत शिक्षण व प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्या त्या क्षेत्रात त्यांना सामावून घेतले जाऊ शकते. आजच्या बदललेल्या काळात या लोकांचे रोजगार हिरावून घेण्यात आले आहेत. त्यांचे समायोजन होईल, त्यांच्या हाताला काम मिळेल, पोटाला अन्न अन अंगाला कपडा मिळेल. शिवाय त्यांच्या अंगभूत कौशल्यांचा उपयोग होऊन शासनाचे कार्य देखील अधिक प्रभावी व परिणामकारक होईल. ज्यांचे नुकसान झाले आहे लाभही त्यांनाच मिळाला पाहिजे! तो मिळवून देणे म्हणजे खरे पुनर्वसन!

मी तर म्हणतो केवळ त्यांच्या त्यांच्या पारंपारिक क्षेत्रातच नव्हे तर सर्वच क्षेत्रात तेथील आवश्यक ज्ञान व कौशल्ये विविध प्रशिक्षणे अभ्यासक्रम पाठ्यक्रम यातून देऊन, तेही मोफत देऊन त्यांना कामे दिली पाहिजेत. आजही कामाची वानवा नाही. उद्योगधंद्यांसाठी तंत्रज्ञ मजूर कारागीर, रक्षक भरपूर लागतात मात्र आजची कामे यांच्यासाठी नवीन आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी कौशल्ये वेगळी आहेत. हे अज्ञानी निरक्षर गरीब लोक या आधुनिक जगाशी अगदी अनभिज्ञ आहेत. म्हणुन ख-या अर्थाने यांचे पुनर्वसन करायचे असेल तर, पिढ्यानपिढ्यांचा शैक्षणिक व आर्थिक अनुशेष भरून काढायचा असेल तर खऱ्या अर्थाने या लोकांना मोफत तांत्रिक शिक्षण कौशल्य शिक्षण व्यावसायिक शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करायला हवे आम्हाला अधिकारी बनवा अशी मागणी नाही. तशी अपेक्षा नाही. ती त्यांची योग्यता ही नाही मात्र जीवन जगणे, जीवन जगता येणे हा त्यांचा अधिकार आहे व शासनाने या जमातींना जीवन जगण्यास सक्षम व सबळ बनविले पाहिजे. हे शासनाचे कर्तव्य आहे.  एकदा का या जमाती शिक्षणाच्या व रोजगाराच्या मुख्य प्रवाहामध्ये आल्या की त्यानंतर त्यांना कुठल्याही प्रकारच्या सहानुभूतीची अथवा प्राधान्याची आवश्यकता राहणार नाही.

मित्रांनो माझ्या मनामध्ये सतत एक विचार येतो. आजही समाजामध्ये संगीताची आवड प्रचंड प्रमाणामध्ये आहे. लोकांच्या या संगीत प्रेमाचा उपयोग मोठमोठे व्यावसायिक खूप मोठ्या प्रमाणात करून घेत आहेत. मात्र श्रोते व प्रेक्षकांच्या मनामध्ये असणाऱ्या या कलाप्रेमाचा उपयोग आपण या प्रवाहापासून दूर गेलेल्या लोककलावंतांच्या उदरनिर्वाहासाठी करून देण्यात अयशस्वी ठरत आहोत. मला वाटते शासनाने एक देश पातळीवर व्यावसायिक कला मंडळ स्थापन करायला हवे. जसे की भारतीय राष्ट्रीय कला नियामक मंडळ. हे मंडळ बीसीसीआय प्रमाणे स्वायत्त पण शासनास उत्तरदायी असावे. या मंडळामार्फत राज्य, देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर कलेतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, लाईव्ह कॉन्सर्टस, स्पर्धा, पुरस्कार वितरणाचे कार्यक्रम यांचे आयोजन करावे. त्यांच्या प्रसारणाचे सर्वाधिकार  व हक्क या मंडळास असावेत. तो पैसा सरकारी तिजोरीत जमा करायला हवा. लोककलेवर आधारित विविध कार्यक्रम जसे गायन वादन नर्तन अभिनय यांच्या व्यावसायिक मैफिली भरवुन त्यातून या कार्यक्रमांचे हक्क शासनाकडे असावेत व वाहिन्यांवरून हे कार्यक्रम दाखवले जावेत त्यातून मिळणारा पैसा वृद्ध लोककलावंतांच्या लोककलावंतांसाठी वापरला जावा. लोककलावंतांना एक सन्मानजनक आयुष्य जगता यावे यासाठी निवृत्तीवेतन सुरु करावे. या क्षेत्रातही लिगचा प्रयोग व्हावा. क्रिकेटमध्ये जसा आयपीएलचा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला व त्यातून तयार झालेला पैसा माझी क्रिकेटपटूंच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणला गेला त्याच धर्तीवर कला क्षेत्रातही प्रयोग व्हावा. कलेला व्यावसायिक व्यासपिठावर आणावे. सिंगिंग लिग, डान्सींग लिग, म्युझिकल शोज व काँपिटीशन्स भरवून त्यातुन कलाकारांना बोली लावुन खरेदी करावे व मिळणाऱ्या नफ्यातील काही भाग वयोवृद्ध जेष्ठ लोककलाकारांना पेन्शन स्वरुपात द्यावा. हा प्रयोग नक्कीच यशस्वी होईल मात्र त्यासाठी जबरदस्त राजकीय इच्छाशक्ततीची आवश्यकता आहे. यासाठी भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या सर्वच संघटना, सेवाभावी व स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रितपणे सरकारवर दबाव आणला पाहिजे. आपल्या मागण्या लावून धरून त्या मान्य करून घ्यायला पाहीजेत. तरच या देशातील विस्कटलेल्या ग्रामीण लोकजीवनाची पुनर्घडी बसविण्यात यश येईल.

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो. 9673945092.

लोककला

*लोककलाः*

*दिसतय आम्हाला बी*
*मजेत आहात सवताशी*
*आजान दिसताय बहुदा*
 *कलाकारांच्या समस्यांशी.*
*पण बघू नका मजा केवळ*
*काळजी घ्या थोडीशी*
*कारण नातं आहे आमचं*
*पूर्वापार आहे इथल्या मातीशी*

*चाळ बांधली पायात पण*
*पाय नाही ढळू दिलं.*
*पिढ्या घातल्या कलेत पण*
*नख नाही कळू दिलं...*

*टाळ्या शिट्ट्यांचा जमाना गेला*
*टाळकरी हाती आता रिमोट आला*
*मग काय सारं लागिरं झालं*
*अन पारंपारीक सारं बेकारं झालं...*

*पडद्यावरची मयत कला*
*तमाशाच्या मुळावर आली.*
*ढोलकी सोबत फेट्यांची*
*काहीशी फारकत झाली..*

*गण, गौळण, रंगबाजी हुरूप आणायचे मस्त*
*वगातून प्रबोधन व्हायचे कितीतरी रास्त.*
*पण डब्बे आले घरोघरी आणि*
*कलावंतांच्या पदरी बेकारी..*

*ही फुसफुस हे दमन समजुन घ्या मायबाप*
*श्वास कोंडतोय आमचा अन कसला* *दाखवताय विकास?*
*शुद्ध, शालीन, संस्कारिक ते सारं गेलं*
*हे कसलं दाखवताय विभत्स्य अन* *अश्लील चाळं?*

*जुन्या अंगी सोनं होतं*
*आजवर ठेवलं समदं जितं.*
*संस्कृतीची खिचडी केलीत*
*अन श्रोत्यांची मारलीत मतं...*

*नागड्या पायांनी डांबरीवर नाचतय*
*बेंबीच्या देठापासून ढोलकं वाजवतय.*
*उपाशीपोटी लेकरू मारतय उड्या*
*अन साहेब गाडीतुन वाजवतोय टाळ्या...*

*टी.व्ही. सिनेमा, डी.जे. ऑर्केस्ट्राँ*
*आमचा कशालाच विरोध नाही.*
*पण आमचा पिढ्यांचा धंदा बसलाय*
*आमचा दाखवाना ना अपराध काही...*

*पुर्वी भजना किर्तनात गावातले उठायचे*
*नाही म्हणलं तरी चार पैसे यायचे.*
*आता किर्तनकरूही हायटेक झालेत*
*आयतीच सी.डी.अन कोरस* *आणायलेत...*

*खोटी प्रगती तुम्हीच गाजवा*
*तुपात खिचडी तुम्हीच शिजवा*
*पण आम्हालाबी पोटापुरता शिदा मिळू द्या*
*आमची बी थोडीशी बोटं भिजु द्या...*

*जातीचे कलावंत चाललेत बराशीवर*
 *बिनबुडाचे झिलकरी बसल्यात राशीवर.*
*कधीकाळी कलेचे दर्दी कला बघायचे*
 *त्यांच्या जीवावर लाखो कलावंत जगायचे..*

*विचित्र जगात चरित्राचा मेळ नाही*
*सचित्र पुराणकथा पहायला वेळ नाही.*
*चित्रकथी रंगतदार सादर करी कला*
*ॲनिमेशनने त्याच्यावर घातला घाला...*

*अहो भारुडे अभंग श्रवणीय किती*
*प्राचीन भारताची ही श्रीमंती होती.*
*पण बाहुला-बाहुलीचा खेळ झाला सारा*
*बाहुली नृत्यांना राहिला नाही थारा...*

*काल्पनिक दुनियेत नाथ कधी कळतील*
*डवऱ्या गोसाव्यांचे गावाकडे पाय कधी वळतील?*
*सकाळी सकाळी गावभर  छान फिरायचे*
*पेटीवरच्या गाण्याचे स्वर कानात भरायचे..*

*रंगीबेरंगी वेश अर्धा असायचा उघडा*
*मोल नाही लक्ष्मीला अन मरी आली संस्कृतीला.*
*पोतराज बी कवाचा गायब झाला*
*कळत नाही काय म्हणावे या विकृतीला...*

*गोंधळ विधीची पत ढासळली*
*जातीवंताची गळचेपी वाढली.*
*उठसुठ कोणीही होतोय गोंधळी*
*शास्त्रोक्त गोंधळ पटत नाही*
*धांगडधिंग्याला मागणी लई...*

*सकाळच्या पारी असे वासुदेव दारी*
*हरिनाम मुखी ओठावर बासरी.*
*कृष्णलीलेत कोणाला रस नाही राहिला*
 *रात्रीच टीव्हीला रासलीला पाहिला...*

*लग्नाची शोभा मोरवाला वाढवायचा*
*पिसारा फुलवून गिरकी मारायचा.*
*त्याची गिरकी आता त्या लांडोरी घेतात*
*अन हौसेने बाहुल्यावर डीजे वाजवतात...*

*रानामाळात निसर्ग गाणे*
*कसं अंतकरणात रुतायचे*
*भलरीच्या सुरांनी शेतकरी*
*कसे जोमाजोमाने राबायचे...*

 *मद्यानेच झुलायलेत सारे*
 *यांना भोलानाथची झूल काय कळणार?*
 *कार्टून्सच्या अन गेम्सच्यापुढं आता*
 *नंदीबैलाला कोण काय विचारणार...*

*जिथं ख-याचीच राहीली नाही भिती*
*तिथं खोट्यानं आव आणावा किती?*
*कामच नाही राहीलं हाताला तर*
*बहुरूप्यानं जगावं किती मरावं किती???*

*तोलच कुठ राहिलाय वागण्यात*
*सर्वकाही बेताल दिसतय.*
*डोंबारीन करतेय कसरती तरी*
*कोण तिच्या कडं बघतय....*

*पापं वाढली म्हणून सूर्यदेवही कोपतोय*
 *सारथी अरूण पांगळा म्हणून*
*आम्ही खापर माती त्याच्या फोडतोय.*
*सकाळची पवित्र वाटायची आंघुळ*
*जवा भिक्षा मागायला यायचा पांगुळ....*

*माणसंच माकडं झाल्याने बहुदा*
*कायद्याने माकडं दिसत नाहीत.*
*पण मदारीच्या पातेल्यात आता*
*तांदुळही शिजत नाहीत....*

*भूमिहीन कलाकार बँडवाले असायचे*
 *कलेच्या आशिर्वादे पोटाला खायचे.*
*ऐकावेत असे सूर कानी तेव्हा पडायचे*
*पण लुप्त झाली पिपानी अन बेसूर डीजे आले..*

 *लेकरासमान संभाळणारे गारूडी*
 *लेकरांना हिंदीत साप दाखवायचे.*
 *लुंगी घालून खेळ करायचे गमतीदार*
 *अन सुरेल पुंगी वाजवायचे...*

*मसनात तेवढे सगळे जातात*
*त्यागी असोत वा भोगी.*
*जवळचे लांबचे सगळेच भेटतात*
*पण भेटत नाहीत जोगी....*

*म्हणून एका कलाकाराची
 सुगी येणार नक्की*
*शब्दांवर विश्वास ठेवा
 खात्री देतो पक्की.*

*जर खोट्याच्या या जगात
 खरं नाही चालणार*
*तर रुदाली बिगर कुणीच
 कसं खोटं रडणार?*

*केवळ टाळ्यांनी पोट
भरत असतं सरकार
*तर आम्ही काहीच
 केली नसती तक्रार

*पण घरी गेलंकी बायकां लेकरं
 कापडांभवती फिरत्यात
घामामळा शिवाय नसतय काहीच
 म्हणून मनातच रडत्यात

*लुप्त होतोय लोकावाज
*अन रुक्ष होतेय लोकसंगीत.
*विसरू नका लोककला
*खोट्या प्रतिष्ठेच्या धुंदीत.....

*कवीः बाळासाहेब सिताराम धुमाळ
*मोबाईलः 9673945092.

Thursday 15 March 2018

आधुनिकीकरणाच्या उदयाने लोकजीवनाचा अस्त

.....…...... आधुनिकीकरणाच्या उदयाने लोकजीवनाचा अस्त.....

मित्रांनो नमस्कार...
अशातच मी माझी "लोककला" नावाची एक कविता पोष्ट केली होती. या कवितेमध्ये मी आपली समृद्ध पारंपारिक लोककला कशी लुप्त होत चालली असुन याचा लोकजीवनावर कसा विपरीत परिणाम होत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता. मी त्यात यशस्वी झालो की नाही अथवा मला काय सांगायचे होते हे आपण ओळखले की नाही? माहीत नाही.
असो प्रत्येकालाच काव्याची भाषा समजतेच असे नाही आणि प्रत्येक विषय कवितेतून तितक्याच प्रभावीपणे व विस्ताराने मांडला जाऊ शकतो असेही नाही. कवितेमध्ये शब्दांची, जागेची मर्यादा असते. मात्र अनेकांना ती आवडली. तशा प्रतिक्रियाही अनेकांनी दिल्या. म्हणूनच व माझा ही हा जिव्हाळ्याचा विषय असल्याने या गंभीर विषयावर मी गद्य स्वरुपात काही प्रश्न, मुद्दे, समस्या व अपेक्षा व्यक्त करून काहीतरी अजून जास्त व सविस्तर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
आजच्या आधुनिक जगाचा पाया प्रबोधनकारी तथा वास्तववादी विचारवंतांनी घातला तर कळस विज्ञानवादी अभ्यासकांनी व संशोधकांनी चढवला यात शंका नाही. अर्थात हा प्रवास अद्याप सुरूच आहे. उद्या काय होणार आहे याचे भाकितही आता करता येणार नाही मात्र काय झाले आहे याचे विवेचन मात्र नक्कीच करता येईल. आधुनिकीकरणाचा खुपच ठळक परिणाम मानवी जीवनावर झाला. हा परिणाम जितका चांगला झाला तितकाच तो वाईटही झाला. आधुनिकीकरणाचा ग्रामीण लोकजीवनावर किती भयानक परिणाम झाला आहे हे त्या जमातींना पाहुन समजते ज्या आज हतबल आणि मरणासन्न जीवन जगत आहेत. यांत्रिकीकरण, औद्योगिकीकरण, शहरीकरण, सर्व स्तरातील परिवर्तन हे आधुनिकीकरणाचेच भाग आहेत.
यांत्रिकीकरणामुळे उत्पादन प्रक्रियेपासून ते अगदी दैनंदिन जीवनापर्यंत यंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर वाढला. परिणामी उत्पादन वाढले, उत्पादनाचा दर्जा सुधारला. कमी वेळेत व कमी मनुष्यबळात अधिकाधिक उत्पादन बाहेर पडू लागले. यामुळे रोजगाराच्या विविध संधी निर्माण झाल्या. रोजगाराच्या व्याख्या बदलल्या. अपेक्षित कौशल्ये बदली. रोजगारांचे स्वरूप व त्यांची नावे बदलली हे सर्वांना माहीत आहे. मात्र भारतासारख्या जाती आधारित व्यावसाय वर्गीकरण असलेल्या देशातील ग्रामीण पारंपारिक लोक जीवनावर याचा अत्यंत दुरगामी परिणाम झाला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा शेती असल्याने शेतीवर आधारीत व शेतीपूरक छोटी-मोठी कामे करून उदरनिर्वाह करणे हाच ज्या वर्गाचा पारंपारिक व्यवसाय होता तो बलुतेदार व कारागीर वर्ग बेचिराख झाला आहे. बलुतेदार व कारागीर वर्गाप्रमाणेच किंबहुना त्यांच्याहुनही अधिक उपासमारीची वेळ आलेला वर्ग म्हणजे भिक्षुक, कलाकार, कसरतीकार, नकलाकार भटक्या विमुक्त जमातींचा वर्ग!!
आज रोजी ज्यांना अविकसित म्हणून गणले जात आहे अशा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील बांधवांच्या प्रगतीसाठी घटनेमध्ये तरतुद करून ठेवली आहे. त्यामुळे न्यायव्यवस्था व राज्यव्यवस्था दोहोंचाही यांच्याकडे पाहण्याचा द्रुष्टीकोन किमान सहानुभूतीपुर्ण तरी आहे. हा वर्ग संघटीत आहे. अर्थसंकल्पात यांच्यासाठी आर्थिक तरतुदी कराव्याच लागतात कारण राज्य घटनेने त्यांचे अनुसूचित्व मान्य करून त्यांना एक प्रकारे न्याय दिला आहे.
शिवाय अलिकडे ज्यांना संकटग्रस्त म्हणून गणले जात आहे असा वर्ग म्हणजे शेतकरी वर्ग. निसर्गाची अनिश्चितता, सिंचनसोयींचा अभाव, हमीभावाची तरतुद नसणे, शासनाच्या धोरणांचा दुष्परिणाम, जास्त गुंतवणूक तुलनेने कमी उत्पादन, कर्जबाजारीपण यामुळे शेतकरी वर्ग निश्चितच संकटात सापडलेला आहे. मात्र हा ही वर्ग संघटीत आहे. यांच्यासाठी देखील शासन विविध तरतुदी करीत आहे. कर्जे मिळत आहेत, ती माफही होत आहेत. अर्थसंकल्पात शेतीविषयक तरतुदी केल्या जात आहेत. त्यांचा आपला हक्काचा व्यवसाय किंवा रोजगार उपलब्ध आहे. संकटसमयी शेती गहाण ठेवणे, शेती विकणे असे पर्याय तरी यांच्याकडे उपलब्ध आहेत.
वरील दोन्ही वर्गावर अनिच्छेने का होईना शासनाला लक्ष द्यावेच लागते. मोठे व संघटीत वर्ग असल्याने राजकीय प्रतिनिधित्व मिळते. प्रश्न लावून धरले जातात व प्रसार माध्यमेही बाजू उचलून धरतात.
मात्र या देशातील किमान एक त्रुत्यांश लोकसंख्या असलेला भटका विमुक्त, बलुतेदार, आलुतेदार, कलाकार, नकलाकार, कसरतीकार समाज भूमिहीन आहे. यांना काही विकताही येत नाही, यांना कोणी कर्जही देत नाही, आणि जरी यांनी आत्महत्या केली तरी काही शासकीय मदत तर मिळतच आहे वरून ती आत्महत्या म्हणजे संकटग्रस्त वर्गाची आत्महत्या म्हणून मोजलीही जात नाही. यांना राज्यघटनेनेच ख-यार्थाने अविकसित व मागास असे मोजलेले नाही. अर्थसंकल्पात तर यांना अजिबातच थारा नाही. जरी यातील सर्वच जाती जमाती या इतर मागास प्रवर्गात मोडत असल्या तरी हा इतर मागास प्रवर्ग जवळजवळ खुल्यातच जमा आहे. बरे शासनाने यांच्यासाठी जरी काही योजना राबविल्या, काही तरतुदी केल्या तरी शिक्षणा अभावी ह्या जमाती त्यांचा लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणजे एकीकडे शिक्षणाचा अभाव दुसरीकडे घटनात्मक गैरसोय, तिसरीकडे रोजगाराची अनुपलब्धता व चौथीकडे असंघटित असल्याने हा वर्ग चहुबाजूंनी समस्यांनी जखडला गेला आहे. अज्ञानी असल्याने व असंख्य जमातींमध्ये विभागला गेला असल्याने असंघटीत आहे. त्यांमुळे अन्यायाची जाणीवही नाही आणि न्यायाची मागणीही करता येत नाही.
 उदरनिर्वाहाबाबतीत पिढ्यानपिढ्यांपासुन आपापल्या पारंपरिक व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक जमाती रोजगाराच्या बाबतीत गावातच शतप्रतिशत निर्धास्त होत्या. पण यांचा हक्काने व खात्रीपूर्वक मिळत आलेला रोजगार ओरबाडला गेला. साळी, माळी, तेली, तांबोळी, न्हावी, गवंडी, धोबी, परिट, सुतार, लोहार, चांभार, कुंभार, सोनार या अशाच काही जातींची उदहारणे आहेत. ज्या गावे सोडून शहरांकडे वळत आहेत. उपजत कौशल्ये व बालपासुनच घरच्याघरीच प्रशिक्षण मिळत असलेल्या या कुशल जाती बेरोजगार झाल्या आहेत. कंपन्या व कारखान्यांमध्ये जरी रोजगार असले तरी ते पारंपरिक कौशल्ये पाहुन दिले जात नाहीत तर व्यावसायिक शिक्षण, उच्च शैक्षणिक पात्रता व बुद्धिमत्ता तपासून दिले जात आहेत. हे शिक्षण घेण्यासाठी जातीला काहीच अर्थ नाही तर केवळ अर्थाला (पैशाला) अर्थ आहे!! भारतासारख्या पारंपारिक व्यवसायावरून जातीची निर्मिती झालेल्या देशात पिढ्यान् पिढ्यांपासून यशस्वीपणे अस्तित्वात असलेली ग्रामीण अर्थव्यवस्था अत्यंत डबघाईस आली आहे.
स्वातंत्र्योत्तर काळात विविध क्षेत्रात समाजसेवा करणारी मंडळी, सेवाभावी संस्था राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटनात्मक संस्था, विविध समित्या व आयोग यांच्या शिफारशी व अहवाल यामुळे शासनाने काही पर्यावरण पूरक, समतामूलक, प्रथा परंपरा व अंधश्रद्धा विरोधी कायदे केले. हे तात्विक द्रुष्टीने योग्यही आहे. हे असे कायदे व नियम करावे लागतात एव्हाना केलेच पाहिजेत. त्यांचा आदर करणे, त्यांचे पालन करणे हे प्रत्येक सुज्ञ नागरिकाचे कर्तव्यही असावे. मात्र कायदे करताना अहित कोणाचे होणार आहे आणि अहीत कसे होणार याची गोळाबेरीज होणे ही गरजेचे आहे. म्हणजे प्राणिमात्रांचे संरक्षण करण्याच्या प्रयत्नात त्यांच्यावर परंपरेपासून अवलंबून असणाऱ्या गारुडी, मदारी, दरवेशी, जोशी, नंदीवाले, दत्ताच्या गाडीवाले, सर्कसवाले, माहूत अक्षरशः  रस्त्यावर आले आहेत.
अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. या बाबतीत कोणाचेच दुमत असण्याचे कारण नाही मात्र अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या प्रयत्नात जोशी, गोंधळी, डवरी, गोसावी, मरीआईवाले, कडकलक्ष्मीवाले, आराधी, जोगती, मुरळी, देवदासी, देवळी या जमाती मात्र अक्षरशः भरडल्या जात आहेत.  त्यांची रोजीरोटी गेली आहे. दुर्दैवाची व काहीशी मजेशीर बाब म्हणजे या जमाती आता कायद्याने भिकही मागु शकत नाहीत! आई खाऊ देईना अन बाप भीक मागू देईना या म्हणीचा प्रत्येय भिक्षा मागून पोट भरणार्‍या गोसावी, भराडी, गोंधळी, गोपाळ, चित्रकथी, हेळवे, जोशी, कोल्हाटी, मसनजोगी, भुते, पांगुळ, बहुरूपी, मरीआईवाले, कडकलक्ष्मीवाले, दरवेशी, वाघ अस्वलवाले, भाविन, जोगती,  देवदासी, मुरळी यांना येत आहे.
ज्यांच्यावर जन्मानेच गुन्हेगार असा ठसा ब्रिटिशांनी लावला व त्यांना पुढे आपल्या सरकारनेही दुजोराच दिला त्या जमातींच्या मुळावर हे कायदे आले आहेत. बेरड, रामोशी, भामटे, पारधी, पावटा, बंजारा वडारी अशा जमातींमधील लोकांकडे इतर लोक आजही संशयाच्या नजरेने व गुन्हेगार म्हणुनच पाहत आहेत. हाती असलेली पारंपरिक कामेही गेली आणि गुन्हेगार अशी ओळख आहे म्हणून कोणी रोजगारही देईना मग आता ज्यांना सरकारनेच कायद्याने अप्रामाणिक ठरवले त्यांना प्रामाणिक असल्याचे शासन प्रमाणित करून प्रमाणपत्र देणार काय?
देवी-देवतांची पुजापाठ करणारे ठराविक लोक होते. मंदिराची साफसफाई करणे, भक्तांना अंगारा धुपारा करणे, देवी-देवतांचे गुणगान कलेतून करणे, असा पारंपारिक व्यवसाय असणारे लोक जसे की गोंधळी, गोसावी, भराडी, चित्रकथी, हेळवे, जोशी, तिरमले, कडकलक्ष्मीवाले, मरीआईवाले यांच्या तोंडचा घास कायद्याने व आधुनिकतेने हिरावून घेतला आहे हे वास्तव मात्र नाकारता येणार नाही.
डोंगर द-या, जंगल वाचवण्यात शासनाला यश आले की नाही हे तुम्हीच तपासून पहा पण ज्यांनी जंगलाचे, वन्यजीवांचे संरक्षण केले, अगदी पिढ्यांपिढ्यांपासून ज्यांनी निसर्गाला देव मानले. त्याला पोटच्या लेकरासारखे सांभाळले व त्याच्या जीवावर स्वतःच्या लेकराबाळाचे पोट भरले ते गारुडी, नंदीवाले, मदारी, दरवेशी, गौरी, गोवाडी, धनगर, जोशी, सापवाले, वाघवले, अस्वलवाले, तिरमल, वैदु यांचे जीवन अगदी नरकासमान झाले आहे.
मी कायद्यांना दोष आजिबात देत नाही अथवा कायदे मानत नाही असेही नाही. मात्र यामुळे वर्षानुवर्षांची व्यावसायिक साखळी जी व्यवस्थित व यशस्वीपणे गुंफली गेली होती, कार्यरत होती ती छिन्नविछिन्न झाली आहे. ग्रामस्तरावर पारंपारिक उद्योग धंदा करणाऱ्या जाती जमाती नेस्तनाबूत होवून कामासाठी बड्या उद्योजकांच्या दारात उभ्या राहिल्या म्हणजे विकास झाला हा विकासाचा दृष्टिकोन अथवा विकासाची व्याख्या मला हास्यास्पद वाटते.
 पुर्वापार नद्या, धरणे, तलाव, खाड्या, समुद्र यातील पाण्यावर अवलंबून राहून पोटाची खळगी भरणाऱ्या भोई, मल्लाव, कोळी गाबीत अशांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या लोकांच्या वंशपरंपरागत चालत आलेल्या व्यवसायाला पर्यावरणाचे कारण समोर ठेवून शासनाने त्यांच्यावर आपले पारंपरिक व्यवसाय बंद करण्याची वेळ आणली आहे. जलसाठ्यांचे कंत्राटीकरण आणि यांत्रिक मासेमारी यांच्या समोर या बिचार्‍यांचा निभाव लागेनासा झाला आहे. थोडक्यात काय तर मोठ्या माशांनीच या छोट्या मास्यांना गिळंकृत केले आहे. यांत्रिकीकरणाने ग्रामस्तरावर कलाकुसर व कारागिरी करणाऱ्यांचा पार सुपडा साफ केला आहे. या आधुनिकतेचा आणि यांत्रिकीकरणाचा दुष्परीणाम अनेक जाती-जमातींवर झाल्याचे भयानक वास्तव शासन अधोरेखित करीत नाही.
पारंपारिक समाजरचनेत ग्रामस्तरावर कलाकुसर व कारागिरी करून सेवा पुरवणाऱ्या लोकांच्या हाताला काम नसल्याने त्यांची अवस्था ओकले तर सुपारी नसावी अशी झाली आहे. काशीकापडी, ठेलारी, ओतारी, लोहार, गवंडी, कुंभार, बेलदार, वडार, बागडी, कोष्टी, कैकाडी, होलार, कुंभार, तांबोळी, तेली, कासार यांसारख्या शेकडो जाती-जमातींवर उपासमारीची कुराड कोसळली आहे. यंत्रासारखा उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाची सजावट व व्यवस्थापन हे या ग्रामीण अल्पशिक्षित कारागीर कामगार वर्गाला करणे शक्य नाही. आवश्यक तेवढे भांडवल उपलब्ध नाही. त्यामुळे पर्याय नसल्याने धंदा बंद करण्याशिवाय मार्ग राहीला नाही.
ग्रामीण लोकजीवनाचा अविभाज्य भाग म्हणजे लोककला व लोकसंगीत. हा सर्व लोककलाकार वर्ग ढोबळपणे भूमिहीन आहे. यांना निवारा नाही. पारंपारिक लोककलावंतांच्या व्यवसायामध्ये कंत्राटदार व बड्या भांडवलदारांच्या अतिक्रमणामुळे आलेले व्यावसायिकीकरण हे या सामान्य कलाकार व कारागीर वर्गाच्या मुळावर उठले आहे. हे कंत्राटदार आपल्या पदरी या पारंपरिक कलावंतांना राबवून त्यांना अगदी अल्प मानधन देऊन राहिलेला मलिदा स्वतःच फस्त करतात. हे चित्र सर्व प्रमुख देवस्थाने व व्यासपीठावर सादर होणारे व्यावसायिक संगीताचे कार्यक्रम यांमध्ये दिसुन येते. म्हणजे पिढ्यानपिढ्या कला सादर करणाऱ्या कलावंत जमाती उदरनिर्वाहासाठी ठेकेदारांच्या दावणीला पडल्या आहेत. हे या जमातींचे शोषण आहे.
आज लोककलेच्या क्षेत्रात अनेक जाती जमातींनी पाऊल टाकले आहे. कलेची कुठहीली जात नसते हे मी मान्य करतो मात्र आपल्या देशामध्ये प्रत्येक जातीची म्हणून एक कला आहे. तोच त्यांचा व्यवसाय आहे व प्राचीन आहे,  पारंपारिक आहे . त्यांच्यावर त्याचे कुटुंब चालत आले आहे अशा लोकांवर हे अतिक्रमण अन्यायकारक आहे. त्यामुळे जातिवंत कलाकार व कामगार बेरोजगार होवून कामाधंद्या अभावी गावे सोडून स्थलांतर करत आहेत. या विस्थापितांचे प्रश्न सोडवता सोडवता सरकारच्या नाकी नऊ येत आहेत. सरकार नावाची यंत्रणा हे सर्व हे सर्व प्रश्न सोडवू शकत नाही. पिढ्यान् पिढ्यांपासून बसलेली ही घडी अशी जर विस्कळीत होत असेल तर यामुळे निर्माण होणारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी विशेष सरकारी इच्छाशक्तीची गरज आहे.
 जवळजवळ प्रत्येक कलावंत व भिक्षुक जमातीची आपली स्वतःची भाषा, कला, वेशभूषा व उपासना पद्धती आहे. ती जिवंत राहणे टिकून राहणे सांस्कृतिक द्रुष्टीने गरजेचे आहे. मात्र आज आपण पाहतो ह्या लोकांवर अक्षरशः उपासमारीची  वेळ आलेली आहे आणि शासनाला मात्र याच्याशी काहीही देणेघेणे राहिलेले नाही. त्यामुळे या वर्गातून आलेल्या बुद्धिवाद्यांनी आपापल्या पद्धतीने रस्त्यावर उतरून शासनाला जाब विचारले पाहीजेत. समस्यांचे गांभीर्य शासनाच्या ध्यानात आणून दिले पाहिजे.
आधुनिकतेतुन होणारा बदल हा अटळ असतो. आधुनिकता म्हणजे परिवर्तन व परिवर्तन हे कधीही भूषणावहच असते. आधुनिकीकरणामुळे होणारे परिवर्तन हे समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था यांसाठी लाभदायक ठरत असते असा दृष्टिकोन मनात ठेवूनच आणि मनाची तशी धारणा करूनच नव्या बदलाचे स्वागत करायचे असते. मात्र या जमातींचा मात्र  भ्रमनिरास होताना दिसत आहे. पारंपारिक समाज रचनेतील हे स्थित्यंतर माझ्यासारख्या सामान्य पण काहीशा सुशिक्षित व्यक्तीला तारक नव्हे तर मारकच ठरताना दिसत आहे आणि म्हणून माझी दम कोंडी होत आहे. दया पवारांनी बलुतं लिहून, लक्ष्मण मानेंनी उपरा लिहून आणि शांता शेळकेंनी कोल्हाट्याचं पोर लिहून या जमातींच्या स्थितीची ओळख सर्वांना करून दिली आहे.
तमाशा सारखी कला ही मनोरंजनाचे व प्रबोधनाचे अत्यंत प्राचीन व प्रभावी साधन सिद्ध झाली आहे. तमाशाकला शेकडो हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा व्यवसाय आहे.  हा तमाशा आज रोजी अखेरच्या घटका मोजत आहे आणि दुर्दैवाने आपण व शासन डोळे मिटून शांत बसुन त्यांच्या अंताचा तमाशा पहात आहोत. ही कला व व्यवसाय जगले पाहिजेत. तमाशा कलावंतांच्या आर्थिक अडचणी, त्यांचे सुरक्षिततेचे प्रश्न ऐरणीवर आणणे व ते तत्परतेने सोडवणे अत्यंत आवश्यक आहे. कारण त्यावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह आधारलेला आहे. अशाप्रकारे पोट भरण्याचे साधन जर लुप्त होत चालले तर त्याचा परिणाम काय होईल व होत आहे हे ही आपण पाहत आहोत.
 रस्त्याच्या कडेला झोपणारे, सिग्नलवर छोट्या-मोठ्या वस्तू विकणारे, भिक मागणारे हे ही एकेकाळी छोटे मोठे कलाकार, नकलाकार, कारागीर अथवा भिक्षुक होते. मात्र आजवरच्या झालेल्या दुर्लक्षाचा परिणाम म्हणून त्यांच्यावर ही पशूसम जीवन जगण्याची वेळ आलेली आहे.
आधुनिकीकरणातून आलेला चंगळवाद आणि मध्यमवर्गीय लोकांच्या मनोरंजनाच्या बदलत चाललेल्या संकल्पना अथवा त्यांनी मनोरंजनासाठी निवडलेली नवी निर्जीव साधने हे ही या पारंपारिक कलावंत कलाकार लोकांच्या उपासमारीस कारणीभूत ठरत आहेत. आधुनिकतेच्या या अनिष्ट परिणामांची नोंद सरकारने घेणे अत्यंत आवश्यक आहे .
मित्रांनो केवळ सरकारवर अवलंबून राहून हे प्रश्‍न सुटतील असे मला अजिबात वाटत नाही. संघटित पुढाकाराने प्रबोधन, उद्बोधन व लोकसहभाग आणि प्रसंगी श्रमदानातून बरेच मार्ग निघू शकतात. लोककला आजही सामान्य श्रोते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत आहे. मात्र जातिवंत पारंपारिक त्या त्या जातीचे लोककलाकार उपेक्षितच आहेत. याचे कारण शिक्षण व भांडवलाचा अभाव असे आहे. आपण सर्वजन सर्वेक्षण करून पहा, किती सोन्याची, भांड्यांची, बांगड्यांची, बुटा चपलांची, दाढी-कटिंगची ते अगदी भाजीपाल्याची, लाकडाची, हळदीकुंकवाची, पानाफुलांची, कपड्यांची दुकाने परंपरेने ही कामे किंवा व्यवसाय करणाऱ्या जाती जमातीच्या लोकांची आहेत? उत्तर तुम्हाला निश्चितच हादरवून सोडेल. आता इतरांनी आपल्या जातीबाहेरचे व्यवसाय करू नये का? तर हरकत नाही पण याने मूळ जातीच्या लोकांवर उपासमारीची वेळ येते. असे भयावह चित्र पाहून मला प्रश्न पडतो की लोकजीवन उध्वस्त झाले म्हणजे विकास झाला का? आधुनिकतेच्या नावाखाली पारंपारिक समाजरचनेवर जीवनमान आधारलेले लोककलाकार देशोधडीला लागले आणि त्यांच्या छपरा पालावर तुळशीपत्रे ठेवली म्हणजे आधुनिकता का?  काय सरकारला यांचे काहीच सोयर सुतक नसावे? स्वातंत्र्यापासून आजपर्यंत सर्व सरकारे आपण विकास केल्याची अफवा पसरवतात. जनतेच्या पैशाने जनतेचा विकास करणारी शासन नावाची यंत्रणा जमीन स्तरावर जाते काय? खरोखरच आपण प्रगती साधली आहे की अधोगती ओढवून घेतली आहे याचे उत्तर शोधणे आवश्यक आहे.
कारण शेवटी प्रत्येक मानवाला जीवन जगता यावे हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध व घटनात्मक अधिकार आहे. मुळात समानता व समता यातील फरकच आपल्या लक्षात येत नाही. समानतेवर जास्तीचे लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नात आपण समाजामध्ये समता प्रस्थापित करू शकलो नाहीत हे अपयश लपविण्यात काही अर्थ नाही. खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित करायची असेल तर या कारागीर, लोककलावंत, कलाकार, नकलाकार, कसरतीकार, भिक्षुक जमातींकडे लक्ष देऊन ते जे आज खऱ्या अर्थाने विस्थापित दुर्भिक्षीत व दुर्लक्षित आहेत त्यांचे पुनर्वसन करणे शासनाची जबाबदारी आहे. आणि जर शासन दुर्लक्ष करत असेल तर आपण स्वतः संघटितपणे पुढे येऊन सरकारचे लक्ष वेधणे काळाची गरज आहे.

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो. 9673945092.

Friday 2 March 2018

होळी खेळावी ती न्यारी


रंगी रंग खेळे हरी

दुःख चिंता दुर करी.
पाहाता गोपिकांना धरी
राधा कावरी बावरी....



खुळी राधा ती बिचारी

भोळी जराशी अविचारी.
कान्हा शिकवितसे जगा
होळी खेळावी ती न्यारी....



रंग भरावा जीवनात

अवघे बेरंग संपावेत.
माखोत मने प्रियजनांची
परी मर्यादाही राखाव्यात....



रंग म्हणजे रे आनंद

रंग ऐका जसा अभंग.
जरा त्यांसवेही गावा
ज्यांना म्हणे जग अपंग....



रंगवा दीनदुबळ्यांना

गोरगरीब अन सगळ्यांना.
करा आपलेसे त्यांना
मित्र-शत्रू सकलांना....



रंग उमंग नव्हे डाग

रंग तरंग नव्हे आग.
यारो होळी आहे आज
चढवा प्रेमाचा रे साज....



लांघा सीमा असमतेच्या

फाडा पडदे विषमाचे.
रंग घेऊ त्या ढगांचे
माळू गाल आकाशाचे....



हेवेदावे हे फुकाचे

आज वाहून चला लावु.
रंगी रंगून जावु सारे
वैषवजण रे चला होवु....



जसा रंगीन मी कान्हा

तसे आपणही व्हाना.
ऐकता गोड वाणी तुमची
धेनुनेही सोडावा पान्हा.....



सकळ जण रंगुनी जावे

सारे रंग एक व्हावे.
खाक अनिष्ट ते व्हावे
अवघे विश्वची नेक व्हावे



जरी जीवन कृष्णधवल

उपायही सांगे मीचं.
भरा रंग आपुलकीचे
हेवा वाटेलं नक्कीचं



मी कृष्ण पिचकारीने

डाग मनावरचे काढी.
होळी करा वाईटाची
सारे लावा चला काडी....



होळीच्या नावाखाली

नका फाडु कुणाची चोळी.
दावाल द्रुष्टी जर का वक्र
याद राखा सुदर्शन चक्र...



नाही मस्ती ना हा धुडगूसं

होळी नाही रे टवाळकी
स्वच्छ पवित्र ही रीत
शिकविते मवाळकी...



माथी काजळी काळजीची

हाती रंग वैविध्याचे.
असे मिसळु एकत्र
रेखाटु हिंदमाता पवित्र...



नाती घट्ट करू सारे

समतेचे रंग घ्यारे.
होऊ थोडे अवखळं
या देश बनवू गोकुळं....



कवीः बाळासाहेब सिताराम धुमाळ

 मो: 9673945092

Thursday 1 March 2018

अम्रुतमहोत्सवी आधारवड शारदाताई बाळकृष्ण रेणके

......अम्रुतमहोत्सवी आधारवड......

मित्रांनो नमस्कार, कोणत्याही कर्तृत्वान पुरुषाच्या यशापाठीमागे एका कर्तव्यशील महिलेचा मोलाचा हातभार असतो हे आपण आजवर अनेक उदाहरणांमधुन ऐकलेले, पाहिलेले व वाचलेले आहेच. त्या कर्तृत्वान पुरुषाचे नाव तर आपण घेतो मात्र त्याच्या यशामध्ये उल्लेखनीय नैतिक वाटा असलेल्या महीलेचा मात्र विसर पडतो. अनेकदा तर अशी नावे समोरही येत नाहीत. बरे असेही नाही की हे असे मुद्दाम केले जाते कारण ही महीला दुसरी तिसरी असतेच कोण?आई,पत्नी,प्रेयसी, बहीण, मुलगी, मैत्रिण,आत्या, मावशी मामी,आजी म्हणजे आपलंच कुणीतरी अगदी जवळचं.पण काळाच्या ओघात,धावपळीत व नैसर्गिकता म्हणुन असे दुर्लक्ष होत असते. परिणामी हे महत्वपुर्ण पात्र पडद्याआडच राहतं.
तीने केलेला त्याग, घेतलेले परिश्रम, सोसलेल्या यातना आणि केलेली हुरहुर निरूल्लेखीत राहाते. असे होऊ नये म्हणून मी आपणास आज अशाच एका अत्यंत कर्तव्यशील महिलेची ओळख करुन देणार आहे.
लोक त्यांना आदराने 'ताई' म्हणून संबोधतात मात्र मी त्यांना प्रेमाने 'आई' म्हणून बोलावतो. या छोट्याशा लेखास शिर्षक मी जे "अमृतमहोत्सवी आधारवड" असे दिले आहे ते ब-याच विचारांती. आज विस्तारलेल्या आधारवडाची रुजवण झाली 75 वर्षांपुर्वी ब्रिटीश भारतात,  दि. 01 मार्च 1943 रोजी म्हणजे आजच्याच दिवशी! या आधारवडाचे नाव आहे सौ. शारदाताई रेणके (जोशी). पारतंत्र्यातील शिक्षणाची दुरावस्था, त्यातही स्त्री शिक्षणाची दयनीयता आणि भटक्या विमुक्तांची शिक्षणाविषयीची अनास्था तर विचारायलाच नको. जोशी या भटक्या जमातीमध्ये कर्नाटकच्या गुलबर्गा जिल्हयात जोशी जमातीच्या बावन्नवाडीपैकी हलकटा या गावी शारदाताईंचा जन्म झाला. या बावन्नवाडीलाच जातगाव असेही म्हणत. वास्तविक शारदाताई जन्मत:च कुशाग्र बुध्दीच्या होत्या. 1961 ला त्या चांगल्या गुणांनी एस. एस. सी. उत्तीर्ण झाल्या! मात्र त्यांना पुढे शिकविले गेले नाही. बुध्दीमान असूनही पुढे का शिकविले गेले नाही? याचे स्पष्टीकरण फार गंमतीशीर आहे मित्रांनो. ज्या काळी ज्या जमातीमध्ये एस. एस. सी. झालेला मुलगा देखील मिळणे दुरापास्त होते त्या काळी व त्या समाजात एस. एस. सी. झालेल्या शारदाताई बावन्नवाडीतील परिसरातील एकमेव मुलगी होत्या! मग त्यांच्यासाठी त्यांच्या योग्य नवरा कोठे शोधायचा? म्हणून पुढचे शिक्षण नको ही त्यांच्या घराच्यांची व्यावहारिक दुरदृष्टी!!!  कुटूंबाचे सततचे स्थलांतर, कुटूंबियांचा शिक्षणाला प्रखर विरोध, समाजाचा मुलींकडे पाहण्याचा संकुचित द्रुष्टीकोन व इतर शंका कुशंका यामुळे शारदाताईंच्या शिक्षणाचे राम नाम सत्य झाले.
त्यांच्या सुदैवाने व योग्यतेने पुढे त्यांना मुंबईत बाँबे पोर्ट ट्रस्टमध्ये क्लार्क म्हणून नोकरी मिळाली. याच काळात त्यांची ओळख झाली एका उमद्या, देखण्या, उच्चशिक्षित व परिपक्व विचारांच्या आणि परखड वाणीच्या तरुणाशी! हळूहळू ओळखीचे रूपांतर मैत्रीत अन मैत्रिचे रूपांतर प्रेमात झाले. त्या तरुणाचे नाव होते बाळकृष्ण रेणके! ज्यांना आज आपण सर्वजण आदराने रेणके आण्णा असे संबोधतो. मात्र त्याकाळी आण्णांमध्ये असे आदराने संबोधन्यासारखे काहीच दिसत नव्हते. ना घरदार, ना शेतीबाडी, ना नोकरी!
मात्र म्हणतात ना की, असामान्य द्रुष्टी असणा-यांना अगदी सामान्य माणसात सुद्धा असणारे असामान्यत्व स्पष्टपणे दिसते! त्याचप्रमाणे आण्णांमध्ये असणारे असामान्यत्व शारदाताईंना अगदी स्पष्ट दिसून आले. एकीकडे शारदाताई शासकीय नोकरदार, सुंदर तरुणी! शिवाय मध्यम वर्गीय कुटूंबातुन आलेल्या! तर दुसरीकडे आण्णा म्हणजे गरिब कुटूंबातील सुशिक्षित बेरोजगार युवक! मात्र त्यांच्याकडे होती कुशाग्र बुद्धिमत्ता, देखणेपण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते त्याकाळातील बी.एस.सी.केमिस्ट्री होते! म्हणून शारदाताईंनी आण्णांमधील हे असामान्यत्व चटकन हेरले आणि दोघांनी लग्न करण्याचा धाडसी निर्णय घेतला. धाडसी यासाठी की तो प्रत्यक्षात उतरवणे तेवढे सोपे नव्हते. भटक्या जमातींची विवाहविषयक कठोर बंधने, जातपंचायतींची दहशत असा चाकोरी बाहेरील विचार करायची हिंमतही करु देत नसायची. कारण वर सांगितल्याप्रमाणे शारदाताई जोशी समाजाच्या तर आण्णा गोंधळी समाजाचे!! दोन्हीही हिंदू भिक्षुक जमातीच मात्र स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपणा-या या जमाती! दोन्हीकडच्या केवळ कुटूंबियांचाच नव्हे तर समाजाचाही यांच्या लग्नाला कठोर विरोध होता. मात्र असला हा विरोध जुमानतील ते ताई व आण्णा कसले? शिक्षणाने अनिष्ट रूढी परंपरांना झुगारण्याचे बळ प्राप्त होत असते हे दाखवून देण्याची ती वेळ होती. पण त्यासाठी घरच्यांच्याविरोधात अगदी रणशिंगच फुंकण्याची गरज असते असे नाही हा आदर्श त्यांनी त्या काळी घालुन दिला. जर आपण बरोबर असु तर घरच्यांना ते मान्य करावेच लागेल हा विश्वास त्यांना होता. त्यामुळे दोघांनीही या विरोधाकडे, घरच्यांच्या अज्ञानातुन निर्माण झालेला, सामाजिक जडणघडणीचा प्रभाव पडलेला एक कौटुंबिक प्रश्न या द्रुष्टिनेच पाहीले. हे एक संकट न मानता एक आव्हान समजले व कोणताही टोकाचा व अनैतिक निर्णय न घेता घरच्यांना आपला निर्णय कसा बरोबर आहे व त्यांचे विचार करणे कसे चुकीचे आहे हे पटवून दिले. शेवटी घरच्यांनाही त्यांनी तयार केले! दोन्ही परिवाराच्या संमतीने गिरगावच्या दत्त मंदिरात पारंपरिक हिंदु धर्म विवाह पद्धतीने साधेपणानेच त्यांनी लग्न केले. शारदाताई जोशी या सौ. शारदाताई बाळकृष्ण रेणके झाल्या. ते दोघे परस्परांचे साता जन्माचे सोबती झाले!!
शारदाताई म्हणजे चाकोरीबद्ध जीवन जगणारी महीला. आपली नोकरी, आपला नवरा अन आपला घर संसार एवढेच त्यांचे विश्व. या बरोबरच उभय परिवाराकडून अर्थात सासर व माहेर यांच्याकडून येणाऱ्या जबाबदा-या निभावण्यात त्या व्यस्त असत. तर आण्णांच्या डोक्यात समाजसेवेचे भुत संचारलेले!! संघटन, आंदोलने, निदर्शने, मोर्चे, प्रेरक व स्फोटक भाषणे यात त्यांना रूची!! म्हणजे दोघांचे विचार व आचार निव्वळ परस्पर विरोधीच!! तरीही शारदाताई आण्णांसोबत जिथे भाड्याने घर मिळेल तिथे प्रेमाने व आनंदाने राहील्या. या सुरूवातीच्या काळात संसाराचा सारा भार ताईंवरच होता तरीही त्या डगमगल्या नाहीत, चिडचिडेपणा त्यांच्यात आला नाही की त्यांच्या मनाला अरूंदपणा वा उथळपणा स्पर्शूनही गेला नाही.
पुढे शारदाताईंच्या इच्छेप्रमाणे व आण्णांच्या योग्यतेप्रमाणे आण्णांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत फाँरेंसिक खात्यात सिनियर सायंटिफिक आँफिसर ही नोकरी मिळाली. नोकरी मिळाली खरी पण आण्णा नोकरीत रमले नाहीत.डोक्यात काहीतरी वेगळे, कटु वास्तवात बदल घडवू शकेल असे काहीतरी करावे हा विचार त्यांना स्वस्थ बसु देत नव्हता. त्यांनी लवकरच आपल्या नोकरीचा राजीनामा दिला. या निर्णयाला आजच्याच काय तेव्हाच्याही पत्नीने विरोधच केला असता. मात्र अण्णांचे विचार,त्यांची धडपड,आवड, कल पाहून शारदाताईंनी देखील आण्णांच्या निर्णयाचे स्वागत केले. अण्णांच्या भाषेतच सांगायचे तर लोक देवाला माणसे अथवा प्राणी सोडतात! त्याप्रमाणे मला शारदेने देवाला सोडले! फरक एवढाच की माझा देव माझा समाज होता व माझी देवपूजा समाज कार्य होती. शारदा नसती तर माझ्याच्याने काहीही झाले नसते. माझे राहणे खाणे, कपडेलत्ते, प्रवास खर्च, कार्यक्रमांचा खर्च सर्वकाही शारदा भागवत आली आहे. आजही मी तिच्या पेन्शनवरच उड्या मारतो आहे हे ते काहीसे भाऊक होऊन बोलतात आणि लपवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात..
मित्रांनो शारदा ताईंचे महानपण एवढ्यातच नाही. घरसंसार, नवरा, मुलेबाळे तर सर्वच करतात मात्र म्हणतात ना,  संगतीने वान नाही लागला तरी गुण मात्र हमखास लागतो. याच म्हणीचा प्रत्येय ताईंनाही आला. आण्णांच्या सहवासात राहुन त्यांच्यात देखील समाजकार्याची आवड निर्माण झाली. समाजातील गरजूंसाठी, दुर्लक्षितांसाठी, पीडितांसाठी आपणही काहीतरी केले पाहिजे या जाणिवेतून शारदाताईंनी अण्णांसोबत शनिवारी रविवारी अर्थात सुट्टीच्या दिवशी मुंबईतील रस्त्यांवर, चाळींतून आणि झोपडपट्यांमधुन सर्वेक्षण केले. यात फुटपाथवरील अनाथ महिला , कचरा गोळा करणाऱ्या महिलांपासून ते अगदी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला या सर्वांचे ताईंनी सर्वेक्षण केले 3000 देवदासींचा मुंबईत महाराष्ट्रातील पहिला महिला मेळावा त्यांनी घेतला.  याची दखल शासनाला व प्रसार माध्यमांनाही घ्यावी लागली व त्याचा परिणाम म्हणून पुढे देवदासींना पेन्शन सुरू झाली.  त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी दहा हजार रुपये अनुदान शासनाने सुरू केले. याच काळात एका अनाथ चिमुरडीचे पालकत्व ताईंनी स्वीकारले व तिला सात वर्षे आपली पोटची मुलगी म्हणून स्वतःच्या मुलींसोबत सांभाळले. पुढे त्या मुलीची हुबळी येथील मावशी आली व त्या मुलीला घेऊन गेली. मात्र तोवर ताईंनी त्या मुलीला सातवीपर्यंतचे शिक्षण दिले होते. 1993 मध्ये ताईंनी आपल्या पतीला पूर्णवेळ साथ देण्यासाठी व आपलेही कार्य पूर्णवेळ करता यावे यासाठी नोकरीतुन स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारली! याला म्हणतात त्याग मित्रांनो,  शारदाताई म्हणजे सदैव प्रसन्न हसतमुख आणि प्रसिद्धीपासून कोसो दूर राहणारं व्यक्तिमत्व. भाषणबाजी, पेपरबाजी त्यांना अजिबात आवडत नाही. मात्र चार चौघात बोलताना आपला विषय प्रतिपादन करताना त्या कसलेल्या वक्ता वाटतात. 1993 पासून सोलापूर व परिसरातील ग्रामीण महिलांचे संघटन करून त्यांना ताईंनी महिला शोषण , महीला अन्याय अत्याचार यांच्या विरुद्ध उभे ठाकण्याची शक्ती दिली. शाळाबाह्य मुलांसाठी त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार शिकवणी घेतली.  स्त्रियांसाठी रात्रीचे प्रोढशिक्षणाचे वर्ग चालवले. तसे पाहता रेणके आण्णांचे कार्यक्षेत्र भटक्या-विमुक्तांची संबंधित राहिले आहे तर शारदा ताईंना महिलांचे शोषण महिलांवरील अन्याय-अत्याचार थांबविणे व महिला सशक्तिकरण करणे या कार्याची प्रचंड आवड आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन 2003 मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांना "सावित्रीबाई फुले पुरस्कार" देऊन त्यांचा गौरव केला आहे.  त्यांच्या 1993 ते 2003 या दशकातील केलेल्या ग्रामीण गोरगरीब महिलांबद्दलच्या कार्याचा हा गौरव होता मित्रांनो. त्यांनी पतीच्या निसर्ग शेतीच्या कार्याला पूर्ण ताकदीने सहकार्य केले. अण्णांच्या त्यांनी शेतीपासून काढलेल्या विश्वविक्रमी उत्पादनाच्या प्रयोगाला महाराष्ट्र शासनाने "कृषी रत्न पुरस्कार " व सेंद्रिय पद्धतीच्या शेती प्रयोगाला "सेंद्रिय शेतीचा शिल्पकार" असे दोन पुरस्कार दिले. मात्र आण्णा या दोन्ही पुरस्कारांचे श्रेय स्वतः अजिबात घेत नाहीत. उलट ते हे नम्रपणे कबूल करतात की निसर्ग शेती व सेंद्रिय शेतीमधील माझे प्रयोग हे केवळ शारदेमुळेच शक्य झाले आहेत. माणसे, खासकरून बायका जोडण्याचे ताईंचे कसब या प्रयोगात प्रचंड कामी आले.
मित्रांनो, शारदाताई व आण्णा या दाम्पत्यांना पाच मुली आहेत. पैकी चार विवाहित आहेत तर एक अविवाहीत आहे. आण्णा म्हणजे सतत समाज कार्यात व्यस्त प्राणी. आज इथे तर उद्या तिथे. आयुष्यभर चळवळ व तत्संबंधीचे कार्यक्रम आणि पुढे राष्ट्रीय भटक्या विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून पडलेली महत्वपुर्ण जबाबदारी यामुळे अण्णा कधीकधी तर महिना-महिना घरी येत नसत. तेव्हाही लेकींना प्रेमाने सांभाळणे, त्यांच्यावर संस्कार करणे, त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या अडचणी दूर करणे ही सर्व कामे स्वतः शारदाताई व्यवस्थित करत असत. केवळ पतीलाच नव्हे तर मुलींनाही त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिले. निर्णय जरी चर्चेअंती घेतले जात असले तरीही आपले निर्णय त्यांनी कोणावरही लादले नाहीत. स्वतः वंशपरंपरागत व्यवसाय म्हणजे भिक्षुकी व घरोघरी फेरी मारण्याचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातून येणाऱ्या शारदाताईंनी आपल्या पाचही मुलींना उच्चशिक्षित बनवले. त्या कधीही बोलत नाहीत मात्र त्यांनी करून दाखवले. आज त्यांच्या पाचही मुली स्वावलंबी आहेत. सर्वजणी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत आणि स्वतःच्या पायावर केवळ उभ्याच नव्हे तर वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च उच्च पदांवर आहेत! त्यामुळे शारदाताई व आण्णा अगदी निर्धास्त आहेत. शारदाताईंनी आण्णांवर आणि उभयतांनी मुलींवर ठेवलेला विश्वास सार्थ ठरला. त्यांच्या चारही मुलींचे आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह झाले आहेत! आण्णा कधी कधी माझ्याशी गमतीने बोलतात की बाळासाहेब माझ्या घरात अख्खा भारत नांदतो आहे!! कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब अशा अनेक राज्यांशी त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत. मित्रांनो,भाषा व प्रदेशावरून रणकंदन करणाऱ्या आजच्या तकलादू लोकांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन नाही का? सर्वजाती समभाव व सर्वधर्मसमभाव यांच्या वल्गना करणाऱ्यांनी समभाव म्हणजे काय हे शिकावे या रेणके कुटुंबाकडून!! ते शिकावे या शारदाताईंकडून!!
त्यांनी मुलींसाठी संपत्ती कमावून ठेवली नाही मात्र त्या स्वतः संपत्ती कमावू शकतील एवढे त्यांना सक्षम बनविले. आज त्यांच्या सर्व मुली कुठल्याही संकटाचा मुकाबला करण्यास सक्षम आहेत हे विशेष आणि हे पाहिल्यानंतर मातापित्यांचे यश म्हणजे काय किंवा यश कशाला म्हणावे हे पटते, याचा साक्षात्कार येतो. स्वतःचे घर नसलेल्या शारदाताई, स्वतःच्या घरात रहायला गेल्या 1971 साली!!! मात्र आता त्यांच्या मुलींची मुंबईत स्वतःची घरे व स्वतःच्या गाड्या आहेत हे त्यांना गौरवास्पद व स्वप्नवत वाटते. खरे तर हे परमेश्वराने दिलेले फळ आहे असे मी समजतो. हे फळ आहे ताई आणि अण्णांच्या नीतिमत्तेला दिलेले, त्यांच्या संस्कारांना दिलेले आणि त्यांनी समाजासाठी निस्वार्थपणे केलेल्या कष्टाला दिलेले.
ताईंचे मोठेपण इथेच संपत नाही. ताईंनी दोन्हीही घरी दिवा लावला. सासरीही आणि माहेरीही! दोन्हीकडच्या जिम्मेदा-या त्यांनी लीलया पार पाडल्या. दोन्हीकडची वर्दळ, एकत्र कुटुंबपद्धती यांचा त्यांनी कधीही ताण घेतला नाही, कांगावा केला नाही, पतीला व नातेवाईकांना ऐकावणे केले नाही. त्या कधी रागावल्या नाहीत, त्यांनी कधीही कपाळावर आठ्या पडल्या नाहीत अथवा आदळ-आपट केली नाही. कधी साडीचोळीसाठी, दागदागिन्यांसाठी, गाडीघोडीसाठी हट्ट आग्रह धरला नाही. विशेष म्हणजे स्वतः कमावत्या असुनही!!!एवढेच काय तर त्यांनी ते कधी चेहऱ्यावरही दिसू दिले नाही. शारदाताई नेहमी अण्णांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहिल्या.शिवाय त्यांनी एका सुंदर संयुक्तकुटुंबाची बांधणी केली. स्वतःच्या मुली, पुतने, नातवंडे या सर्वांना एका धाग्यात गुंफुण ठेवले. अण्णांनी देखील ताईंच्या कोणत्याही निर्णयामध्ये हस्तक्षेप केला नाही अथवा त्यावर हरकत घेतली नाही.
विचार करा मित्रांनो सामान्य घरातून जाऊन, असामान्य बनुन सामान्यपणे जीवन जगणे सोपे आहे काय? पंख फुटणारे जोडपे अन शिंगे फुटणारे कारटे यांचा आदर्श घेतील काय? वेल सेटेल्डंच जोडीदार पाहीजे असा पराकोटीचा आग्रह धरणा-या आजच्या युवती शारदाताईंनी घालुन दिलेला आदर्श अंगिकारतील? शारदाताईंमध्ये सामंजस्य, मनाचे मोठेपण, आदर, त्याग, समर्पण, उदारता नसती तर बाळकृष्ण रेणके आण्णा घडले असते?
शारदाताई मराठी- कन्नड-हिंदी-गुजराती अस्खलितपणे बोलतात. त्यांचे लाघवी बोलणे, निरागस स्मित हसणे आणि निरामयी तेजस्वी दिसणे मला तर त्यांच्या प्रेमातच पाडते! मी अण्णांना गमतीने म्हणत असतो, अण्णा तुम्हाला सुंदर बायको मिळाली हं. यावर तेही प्रामाणिकपणे म्हणतात, हो बाळासाहेब, नक्कीच, त्यासाठी परमेश्वराचा मी ऋणी आहे रे. शारदा  तनाने जितकी सुंदर आहे त्याहुन कितीतरी अधिक ती मनाने सुंदर आहे. सौंदर्याची सम्राज्ञी म्हण हवं तर. मोठमोठ्या सामाजिक कार्याबरोबरच घराचं घरपण हे लहान लहान गोष्टीत असतं हे ताईंना चांगलेच ठाऊक आहे. मुलींमध्ये त्या त्यांची मोठी बहीण म्हणून राहतात. सिनेमा पाहणे, गाण्याच्या भेंड्या खेळणे, कुटुंबासह पत्ते खेळणे यात आनंद शोधणा-या शारदाताई पर्यटनाच्या खुप छंदी आहेत. त्यांना खूप आनंद मिळतो भ्रमणातुन. समुद्र पाहणे हा त्यांचा खास छंद.
मित्रांनो अखिल भारतभर भटक्या-विमुक्तांच्या चळवळीचे आधारवड आदरणीय बाळकृष्ण रेणके आण्णा आहेत याबाबत जसे कोणाचेच दुमत नाही तसेच "अण्णांचा आधारवड शारदाताई आहेत" यात स्वतः आण्णांचेही दुमत नाही हे विशेष! असा हा आधारवड अमृतमहोत्सवी झाला आहे. अर्थात शारदाताई दिनांक आज 01 मार्च 2018 रोजी वयाची 75 वर्षे पुर्ण करीत आहेत!!! म्हणजे हा त्यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस!! मात्र हा अमृतमहोत्सवी आधारवड अजूनही सळसळता आहे!गर्द आहे!टवटवीत आहे! आणि आजही आधार देतच आहे! आणि संदेश देत आहेत त्या नुसतेच डेज साजरे करण्यात धन्यता मानणाऱ्या आजच्या प्रेमी युगलांना आणि अग्नी भोवती सात फेरे घेऊन साताजन्माची साथ निभावण्याच्या आणाभाका खाऊनही सात दिवसही सुखाने संसार न करू शकणा-या सोकाँल्ड माँडर्न विवाहित जोडप्यांना की "आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याची स्वप्ने आपली असतात आणि ती पुर्ण करण्यासाठी आपण आपले योगदान कसे द्यायचे असते.
आई जगदंबा करो शारदाताईंचे सौंदर्य, औदार्य, हास्य आणि स्वास्थ्य असेच व्रुदींगत होत राहो हीच सदिच्छा. मला आज जसा आदरणीय शारदाताईंना पाहून हा त्यांचा अम्रुतमहोत्सवी वाढदिवस आहे यावर विश्वास बसत नाही तसाच विश्वास त्यांच्या शतकोत्सवी वाढदिवशीही त्यांना शुभेच्छा देताना न बसो हीच प्रार्थना व हीच शुभेच्छा.

 शुभेच्छुकः बाळासाहेब सिताराम धुमाळ
 मो. 9673945092j

Saturday 9 December 2017

बाळासाहेब जाधव

"बाळासाहेब जालिंदर जाधव" अत्यंत गरिब,  ग्रामीण, भटक्या जामातीमधील गोंधळी जामातीमध्ये पारगाव मोटे ता. भूम जि. उस्मानाबाद येथे जन्मलेले.
वडील, सरदार जालिंदर रामा जाधव सुप्रसिद्ध गोंधळी कलावंत होते पण आपल्या सहा अपत्यांचे पोट कसेबसे भरेल एवढेच उतपन्न कलेतून मिळे. रात्री पारंपारिक गोंधळाबरोबरच दिवसा भिक्षा मागावी लागे.  त्यासाठी मुलांना सोबत नेत.  शाळेत हजेरी पटावर नाव होते एवढाच मुले  'शिकत आहेत'  याचा अर्थ !!!  वास्तविक पाहता वर्षांतील किमान तीन चार महीणेही त्यांना शिक्षण घेता यायचे नाही. अथवा सलग आठवडाभर  शाळेत जाता यायचे नाही.  रात्रभर जागरण करून सकाळी अनेक मैल पायी चालून परिक्षा गाठायची व कसबसे पास होऊन वर्ग बदलायचा. जरी शिक्षणाची आवड होती व बुद्धीही होती,  तरी शैक्षणिक वातावरणाचा आणि वेळेचा अभाव यामुळे दहावीला अनुत्तीर्ण व्हावे लागले.  मात्र खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी करून पुरवणी परीक्षा देऊन उतीर्ण झाले.  ताबडतोब कमाई सुरू व्हावी व कुटूंबाला आपला आधार मिळावा म्हणून, आय. टी. आय.  चा वेल्डरचा कोर्स केला व औरंगाबाद येथे बजाज कंपनीत रूजू झाले. मात्र तुटपुंजा पगार व काहीतरी करून दाखविण्याची जिद्द त्यांना शांत बसू देत नव्हते. 1990 च्या दरम्यान औरंगाबाद कारागृह विभागात तुरूंग रक्षक भरती निघाली. काम करत करत भरतीत उतरून प्रचंड मेहनत घेऊन भरती झाले. कसून सराव करून प्रशिक्षण पुर्ण केले व सेवेत रूजू झाले.
कारागृह रक्षक म्हणून कारागृह सेवेत रुजू झाल्यानंतर पुढे सेवांतर्गत शिक्षण घेत पदवीधर झाले! !!
अभ्यास करून खात्यांतर्गत परिक्षा देऊन तुरूंगाधिकारी झाले! !! अनेक वेळा कबड्डी,  व्हाॅलीबाॅल संघाचे कर्णधार म्हणून आपल्या विभागाच्या संघाचे नेतृत्व केले व संघाला एकतर्फी विजय मिळवून दिले. 2002 मध्ये चेन्नई तामिळनाडू येथे,  2007 मध्ये अहमदाबाद गुजरात येथे, 2010 मध्ये ओरीसा मध्ये, 2012 हैद्राबाद आंध्र प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय कारागृह कर्मचारी स्पर्धा व कर्तव्य मेळावा या  राष्ट्रीय स्पर्धेत खेळल्यानंतर आता आज पुन्हा 2016 च्या अखिल भारतीय कारागृह कर्मचारी क्रिडा स्पर्धा व कर्तव्य मेळाव्यासाठी  तब्बल पाचव्यांदा हैद्राबाद,  तेलंगणा या ठिकाणी वयाच्या  पंन्नासाव्या वर्षी महाराष्ट्र व्हाॅलीबाॅल संघाचे नेतृत्व करण्यासाठी आपल्या संघासोबत रवाना होत आहेत. 2007 सालच्या अहमदाबाद गुजरात येथील राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांचा तत्कालीन मुख्यमंत्री व देशाचे सध्याचे  पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी गौरव केला! !!
बाळासाहेब जाधव केवळ तुरूंगाधिकारी नाहीत तर एक उत्कृष्ट खेळाडू व एक उत्कृष्ट संबळवादकही आहेत.  पारंपारिक गोंधळी कलेबरोबरच भजनातही त्यांना विशेष रूची आहे.अत्यंत गोड स्वभावाचे बाळासाहेब जाधव तितकेच चारित्र्यसंपन्नही आहेत. शासकीय अथवा कलेच्या  व्यासपिठावरून ते नहमी निर्व्यसनी राहण्यासाठी तरूणांना प्रेरित करतात. एक निर्व्यसनी, तंदुरूस्त, कला क्रिडागूण संपन्न व नम्र पण कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून महाराष्ट्र कारागृह प्रशासनामध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. अजमल कसाब सारखा कुप्रसिद्ध दहशतवादी हाताळण्यासाठी प्रशासनाने त्यांची विशेष निवड केली होती.  तुरूंगाधिकारी असले तरी प्रसंगी कारागृह अधिक्षकाची जबाबदारी देखील त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. वेळ प्रसंगी कारागृहातील औषधोपचार विभाग असा सांभाळतात की पाहणा-याला वाटावे हे डाॅक्टरच आहेत!  सेवापुर्व शिक्षण कमी होते तरी सेवांतर्गत शिक्षण घेऊन इंग्रजी, संगणक,  सोशल मिडिया अशांसारख्या आवश्यक बाबींचे त्यांनी ज्ञान संपादन केले. जे येत नाही ते शिकण्याची त्यांची धडपड तरूणांनाही अचंबित करते.  शिक्षणाचे महत्व जाणणा-या बाळासाहेब जाधवांनी आपल्या तिन्ही मुलांना इंजिनिअर बनवले. मित्रांमध्ये बाळासाहेब म्हणुन ओळखले जाणारे साहेब समाजात आदराने "आण्णा" या टोपण नावानेही ओळखले जातात. आपल्या यशाचे श्रेय ते आपले वडील दिवंगत जालिंदर रामा जाधव व आपले वडीलबंधू  संभाजी जाधव यांना देतात. अशा या  हरहुन्नरी व्यक्तीमत्वाचे कौतुक करायला मला गर्व वाटतो.  अशांचा आदर्श तरूण पिढीने घेतला तर आपला गोंधळी समाज प्रगतीच्या शिखरावर पोहोचल्या शिवाय राहणार नाही. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा 💐💐

शब्दांकन: बालासाहेब सिताराम (बी. एस.) धुमाळ 🙏

एफारडीआय २०१७ FRDI 2017

एफआरडीआय २०१७.......

मित्रांनो नमस्कार.....
आपण काबाडकष्ट करून साठवलेल्या पैशातून अडीअडचणीच्या काळात, म्हातारपणी मदत व्हावी म्हणून बँकेत मुदतठेव ठेवून, मुदतपूर्तीनंतर किंवा मुदतीपूर्वी ती परत घेऊन आपली कामे करतो.  पण आता असे करता येईलच असे नाही. कदाचित बँक नकार देखील देऊ शकते! आमच्या कडे आता पैसे नाहीत, तुम्ही आता पैसे काढू शकत नाहीत किंवा पुर्ण पैसे काढू शकत नाहीत, असेही म्हणू शकते!!! किंवा बँकेच्या अडचणीच्या काळात आपल्या ठेव रक्कमेची परस्पर मुदत वाढवून तीच रक्कम ती परस्पर वापरू शकते!  आहे की नाही गम्मत?
पण हे खरे आहे! कारण मायबाप केंद्र सरकार संसदेच्या हिवाळी अधिवेशनात  फायनान्शियल रिझोल्युशन अँड डिपॉझिट इन्शुरन्स (एफआरडीआय) हे विधेयक मंजूर करून घेण्याच्या प्रयत्नात आहे.
तसा याला देशभरातून  विरोध देखील वाढतो आहे म्हणा मात्र अलिकडे जनतेच्या विरोधाला सरकार विशेष जुमानताना दिसत नाही. बुडीत बँका व विमा कंपन्यांना वाचवण्याची जिम्मेदारी आता ग्राहकांची असणार आहे! यासाठी विधेयकात हेअर कट सुचवला आहे. त्यासाठीचे हे विधेयक संयुक्त संसदीय समितीपुढे सादर झाले आहे. आता हा हेअर कट म्हणजे, बुडत असलेली बँक वाचवण्यासाठी त्या बँकेच्या ठेवीदारांनी बँकेत ठेवलेल्या ठेवींमधील काही रकमेवर पाणी सोडणे होय!!
यासाठी बँक किती आजारी आहे याची वर्गवारी एफआरडीआय कायद्यांतर्गंत केली जाणार आहे. आजारी बँकांसाठी श्रेणी तयार करण्यात येऊन त्यानुसार त्या बँकेने स्वतःच्या ठेवीदारांच्या ठेवींतील किती रक्कम भागभांडवलात परावर्तित करायची ते ठरवले जाणार आहे.
बँकेचा आजार किती गंभीर आहे किंवा ती बुडण्याची स्थिती जितकी गंभीर असेल तितका तिला ठेवींवर प्रीमियम अधिक भरावा लागणार आहे. यामुळे आधीच आर्थिक संकटात असलेली अशी बँक आणखी खिळखिळी होणार आहे. सहाजिकच यापुढे लोक मुदती ठेवी ठेवणार नाहीत. ठेवल्या तरी मोठ्या राष्ट्रीयक्रुत बँकेतच ठेवतील. मग छोट्या छोट्या खासकरून सहकारी बँकांचे काय होणार???
मला तरी वैयक्तिक हा सर्व प्रकार म्हणजे चोर सोडून संन्यासाला फासावर चढवण्यासारखा वाटतो. जर बँक वाचविण्याची जिम्मेदारी खातेदारांची आहे तर सरकार काय करतेय?? बँक दिवाळखोरीत बडे व्यावसायिक, नेते व कर्मचारी काढणार आणि शिक्षा सामान्य खातेदारांना मिळणार हे चुकीचे वाटते. आणि शिवाय  जेंव्हा बँका फायद्यात असतात तेंव्हा सामान्य ग्राहक का आठवत नाहीत??
मध्यंतरी झालेल्या नोटबंदीनंतर बहुतांश पैसे बॅकेत जमा आहेत. यातील मोठा निधी अगामी काळात कर्जे म्हणून बड्या उद्योजकांना दिला जाईल. आपण मात्र आपलाच पैसा ना सोन्यात ठेवू शकतो ना घरात!! दोन लाखाहून मोठा व्यवहार करता येत नाही. तो पैसा बॅकेतच ठेवावा लागणार. बँक चुकीची कर्जे वाटून आपल्याला अडचणीत आणणार. वरून सरकार वे आँफ करून मदतही त्यांनाच करणार. आणि मोठ्यांची कर्जे वसुल करण्याऐवजी आपल्या ठेवी गोठविणार!! शिवाय आता मुदत ठेवींवरील व्याजदरही घसरणार. आज रोजी एक लाखाच्या वरील रकमेवर संकटकाळी कोणताही विमा नाही. शिवाय लाँकर्समधील वस्तुंना संरक्षण व विमा नाही. यासाठी काहीतरी करण्याऐवजी सरकार जनतेचा मनी लाँक करते आहे हे माझ्या बुद्धीला पटत नाही. यामुळे बँकांना पर्यायाने सरकारला पैसा वापरायला मिळेल. अर्थात विकासही होईल. पण सामान्य जनतेचे काय?म्हणजे कसेय की, आपण पैसै घरातही ठेवायचे नाहीत आणि बँकेत ठेवले तर मागायचेही नाहीत!!!
पण आपल्या मुलांच्या आणि आपल्या भवित्व्याचे काय???
 नाही तरी आज रोजी बँका वेगवेगळे कर लावून खातेदारांना लुटतच आहेत ना?? आता या विधेयकाने आगीत आधिकच तेल पडणार. आधी नोटाबंदी मग जीएसटी आणि आता एफआरडीआय!!

आपलाः
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9673945092.

Friday 8 December 2017

क्रिमिलेअर अट गट आणि तट

क्रिमिलेअरच्या संदर्भातील, "क्रिमिलेअर अट गट आणि तट" हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा👇👇
बालासाहेब सिताराम धुमाळ.
https://drive.google.com/file/d/0B_E8xP7EIvRUUmpocEUzLTFxQm8/view?usp=drivesdk

राज्य मागासवर्ग आयोगाच अहवाल क्रमांक ४९

माझ्या गोंधळी मित्रांनो नमस्कार....
सर्वप्रथम विनंती की हा संदेश संपुर्ण वाचा व वाचुन अधिकाधिक समाज बांधवांपर्यंत पोहचवा. महाराष्ट्र शासनाच्या विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाने जनतेला नुकतेच (५आँक्टोबरला) एक आवाहन केले आहे. शासनाने सदर आवाहन हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवाल क्रमांक ४९ नुसार केले आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदर अहवालानुसार विमुक्त जमाती 'अ' मधील १४ जमाती ज्यात बेरड, बेस्तर, भामटा,कैकाडी, कंजारभाट, कटाबु, बंजारा (लमाण) गाव पारधी, राजपूत भामटा, रामोशी, वडार, बाबरी, छप्परबंद, इत्यादी जमातींचा समावेश आहे. तसेच भटक्या जमाती 'ब' मधील २३ जमातींचा देखील समावेश आहे. यात गोसावी, भराडी, चित्रकथी, गारूडी, गोल्ला, गोपाळ, हेळवे, जोशी, कोल्हाटी, मैराळ, मसनजोगी, नंदिवाले, पांगुळ, शिकलगार, वैदु, वासुदेव, बहुरुपी, मरीआईवाले,कडकलक्ष्मीवाले, गोसाई, मुस्लिम मदारी, गारूडी, दरवेशी, वाघवाले, शाह आणि विशेष मागासवर्गातील भंगी, मेहतर, लालबेद आणि हलालखोर या जमाती समाविष्ट आहेत.
मित्रांनो वरील यादीमध्ये आपली "गोंधळी" जमात समाविष्ट नाही. उपरोक्त उल्लेखित सर्व जमातींना क्रिमिलेअरच्या अटीमधुन पुर्णतः वगळले जावे अशी शिफारस आयोगाने शासनाकडे केली आहे. मात्र आयोगाने आपल्या दोन बैठकांमध्ये"गोंधळी जमातीला सरसकट (पुर्णतः) क्रिमिलेअरच्या अटीमधुन वगळले जाऊ शकत नाही" असा बहुमताने ठराव संमत करून घेवुन ७ विरुद्ध २ मतांनी "गोंधळी" जमातीला क्रिमिलेअरच्या अटीमधुन सरसकट वगळण्यास विरोध केला. केवळ आयोगाच्या सदस्या अँड. पल्लवी रेणके व डॉ. कैलास गौड यांनीच भिन्न मत नोंदविले. आयोगाने यांचे भिन्न मत नोंदवून तसा अहवाल शासनास पाठविला आहे. मी व्यक्तीशः पल्लवी ताई व डॉ. गौड यांना विनम्र धन्यवाद देतो.
मित्रांनो, केंद्र सरकारच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीतील वंशपरंपरागत उद्योग किंवा धंदा करणाऱ्या विमुक्त जमाती 'अ', भटक्या जमाती 'ब' आणि विशेष मागास प्रवर्ग या मधील आयोगाने शिफारस केलेल्या वरील जमाती खरोखरच क्रिमिलेअरची अट रद्द होण्यास पात्र आहेत. मात्र गोंधळी, बेलदार, भुते, गिहडा, बागडी, काशिकापडी, भोई, थेलारी, ओतारी या भटक्या जमाती देखील पात्र आहेत. सवलत सरसकट भटक्या जमाती 'ब' ला देण्याऐवजी जमातीजमातींमध्ये भांडणे लावण्याचे व फुट पाडण्याचे काम आयोगाने केले आहे. गोंधळी जमात इतर भिक्षुक जमातींपेक्षा कशाने वेगळी आहे ते कळत नाही.
वास्तविक पाहता "गोंधळी" ही मुळ २८भटक्या जमातींपैकी एक जमात! आजवर भटक्या विमुक्तांचा सर्वाधिक नेटाने लढा गोंधळी जमातीनेच लढला आहे. विस्तृत अर्थाने पाहीले तर गोंधळी जमात भूमिहीन आहे. बोटावर मोजता येतील अशी काही कटुंबे अलीकडच्या काळात नोकरीच्या माध्यमातून सामान्य अथवा सामान्यपेक्षा थोड्या वरच्या स्तरावरील जीवन जगत आहेत. हे चित्र सर्वच जाती जमातींमध्ये पहायला मिळते. खरे पाहता आयोगाने शिफारस केलेल्या जमातींपेक्षा गोंधळी जमात तसुभरही वेगळी नाही तरीदेखील आयोगाने या जमातीवर हा असा अन्याय केला आहे. कोणत्याही जमातीमध्ये १०-१५ टक्के लोक हे काहीसे सुधारित असतातच! म्हणजे म्हणून ती जमात सर्वार्थाने व सर्वंकषपणे सुधारित ठरत नाही. आरक्षणाचा लाभ हा ख-या वंचित व सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक द्रुष्ट्या लायक समाज घटकाला मिळायला हवा. आज रोजी क्रिमिलेअरची मर्यादा सहा लाख रुपये प्रति वर्ष उत्पन्नाची आहे, आठ लाख प्रस्तावित आहे पण ६६,६६६ रूपये प्रती महीना उत्पन्न असलेले एखादे त्रुतीयश्रेणी कर्मचारी कुटुंब आरक्षणाचा लाभ घेण्यास अपात्र असावे हे पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात खितपत पडलेल्या जमातींच्या द्रुष्टीने अन्यायकारक आहे. हा अन्याय आहे ख-या अर्थाने त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांवर!! बदलत्या जीवन शैलीमुळे आज असंख्य कुटुंबातील पती-पत्नी दोघेही नोकरी-धंदा करतात. कदाचित वैयक्तिक त्या उभयतांना यापुढे आरक्षणाचा लाभ मिळू नये हे मत सामाजिक न्यायाच्या द्रुष्टीने मान्य केले जाऊ शकते (actually no) पण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणुन त्या कुटुंबातील अपत्ये आरक्षणाचे लाभ घेऊ शकणार नसणे हा विकासासाठी आवश्यक " घटनादत्त संधी' हिरावून घेण्याचा प्रकार आहे. दर्जा व संधीची समानता हे भारतीय संविधानाचे उद्धिष्ट आहे. मित्रांनो हा गोंधळी जमातीवर प्रचंड मोठा अन्याय आहे. आणि हा अन्याय जाणिवपुर्वक केला गेला आहे. फोडा व राज्य करा हे षडयंत्र आपण सर्व मुळ भटक्या जमातींनी ओळखायला हवे. भिक्षुक जमातींपैकी गोंधळी जमात ब-यापैकी संघर्ष करु शकणारी जमात आहे हे प्रस्थापित जाणतात. मला आणखी एक बाब सर्व गोंधळी सद्रूश भिक्षुक जमातींना विचारायची आहे....एरवी, 'आपण सर्व मुळचे गोंधळीच आहोत, आपण सर्व एक आहोत' असे म्हणणारे आता गोंधळी बांधवांना मदत करणार आहेत ना? आशा करतो सर्व मुळ भटके या संकटसमयी आम्हाला मदत करतीलच.
मित्रांनो, अजुनही वेळ गेलेली नाही, आता या अहवालानुसार कार्यवाही करणे व निर्णय घेणे शासनाच्या विचाराधीन आहे. प्रक्रियेचा भाग म्हणून या अहवालावर जनतेच्या हरकती व सुचना मागविण्याकरीता सदर अहवाल महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
अजुनही वेळ गेलेली नाही, सर्वप्रथम तर सर्व बुद्धीजीवी विद्यार्थी, नोकरदार, उच्च शिक्षीत बेरोजगार व समाजाविषयी तळमळ असलेल्या कार्यकर्त्यांनी या अहवालाचे अवलोकन करावे. आणि या अहवालावर हरकती व आक्षेप नोंदवून अभ्यासपूर्ण हरकती नोंदवाव्यात. गोंधळी जातीच्या भवितव्यासाठी हा अहवाल व यामुळे येऊ घातलेला निर्णय गोंधळी जातीसाठी कसा अन्यायकारक व चुकीचा आहे हे आयोगाच्या व शासनाच्या निदर्शनास आणून द्यावे. त्यासाठी सबळ पुरावे जसे की ध्वनीफिती, द्रुष्यफिती, छायाचित्रे व इतर लिखीत पुरावे शासनास सादर करावेत. यासाठी आपले अधिकाधिक ई- मेल bhaurao.gavit@nic.in या ई-मेल आयडीवर दिनांक २६ आँकटोबर २०१७ पर्यंत पाठवावेत. ज्यांना ई-मेल करता येत नाहीत त्यांनी पत्राद्वारे आपल्या हरकती व सुचना----
श्री. भा.रा.गावित, सहसचिव, विजाभज, इमाव व विमाप्र, कल्याण विभाग, दालन क्रमांक १५३, विस्तार, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई-३२ या पत्त्यावर पाठवाव्यात. जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर व जितक्या जास्त संख्येने शक्य आहे तितक्या आधिक संख्येने!!!
मित्रांनो, या कामी संघटनांनी सुनियोजित पद्धतीने व तात्काळ पाऊले उचलणे गरजेचे आहे. यासाठी कायद्याच्या अभ्यासकांची व तज्ञांची मदत घ्यायला हवी. शासनाने अनुसुचित जाती, अनुसूचित जमातींसाठी या पुर्वीच घेतलेला व आता वर शिफारस केलेल्या भटक्या विमुक्त जाती जमातींना क्रिमिलेअरच्या अटीमधुन वगळण्याचा  घेतलेला निर्णय न्यायोचित व संविधानाच्या उद्धिष्टांना धरुन आहे मात्र त्याच नियमाने गोंधळी व इतर जमातींना त्यात समाविष्ट न करण्याचे षडयंत्र गोंधळी व इतर वर उल्लेख केलेल्या पाच सहा जमातींसाठी कमालीचा अन्यायकारक आहे. आपण संघटित व अभ्यासपुर्ण पाऊले उचलली तर हा अन्याय थांबला जाऊ शकतो. आपल्यासाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी आता आपण एकत्र येणे व संघर्ष करणे काळाची गरज आहे. लक्षात असु द्या, शेवटची तारीख २६ आँकटोबर आहे. आणखी एक, ही भिती नाही वास्तव आहे, आज आयोगाने आपली क्रिमिलेअरची अट वगळण्यास नकार दिला, उद्या "गोंधळी" जमात ही पुरोहित वर्गातील, गावगाड्यातील, पुढारलेली व विकसित "जात" आहे असे भासवून, आयोग शासनास "गोंधळी" जमातीस भटक्या जमाती "ब" मधुन वगळून इतर मागासवर्गात समाविष्ट करू शकतो! तसा त्याचा तो अधिकार देखील आहे. मित्रांनो, अन्याय सहन केला म्हणजे तो करणाराची हिंमत वाढते व भविष्यात अन्यायाची तिव्रता देखील! बघा विचार करा, पण हे सत्य शासनाच्या लक्षात आणुन द्या की, "गोंधळी ही पुरोहित नसून भिक्षुक जमात आहे, भूमिहीन जमात आहे, मुळ भटकी जमात आहे".

आपलाः
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. ९६७३९४५०९२.

राज्य मागासवर्ग आयोगाच अहवाल क्रमांक ४९

माझ्या गोंधळी मित्रांनो नमस्कार....
सर्वप्रथम विनंती की हा संदेश संपुर्ण वाचा व वाचुन अधिकाधिक समाज बांधवांपर्यंत पोहचवा. महाराष्ट्र शासनाच्या विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाने जनतेला नुकतेच (५आँक्टोबरला) एक आवाहन केले आहे. शासनाने सदर आवाहन हे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवाल क्रमांक ४९ नुसार केले आहे.
राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदर अहवालानुसार विमुक्त जमाती 'अ' मधील १४ जमाती ज्यात बेरड, बेस्तर, भामटा,कैकाडी, कंजारभाट, कटाबु, बंजारा (लमाण) गाव पारधी, राजपूत भामटा, रामोशी, वडार, बाबरी, छप्परबंद, इत्यादी जमातींचा समावेश आहे. तसेच भटक्या जमाती 'ब' मधील २३ जमातींचा देखील समावेश आहे. यात गोसावी, भराडी, चित्रकथी, गारूडी, गोल्ला, गोपाळ, हेळवे, जोशी, कोल्हाटी, मैराळ, मसनजोगी, नंदिवाले, पांगुळ, शिकलगार, वैदु, वासुदेव, बहुरुपी, मरीआईवाले,कडकलक्ष्मीवाले, गोसाई, मुस्लिम मदारी, गारूडी, दरवेशी, वाघवाले, शाह आणि विशेष मागासवर्गातील भंगी, मेहतर, लालबेद आणि हलालखोर या जमाती समाविष्ट आहेत.
मित्रांनो वरील यादीमध्ये आपली "गोंधळी" जमात समाविष्ट नाही. उपरोक्त उल्लेखित सर्व जमातींना क्रिमिलेअरच्या अटीमधुन पुर्णतः वगळले जावे अशी शिफारस आयोगाने शासनाकडे केली आहे. मात्र आयोगाने आपल्या दोन बैठकांमध्ये"गोंधळी जमातीला सरसकट (पुर्णतः) क्रिमिलेअरच्या अटीमधुन वगळले जाऊ शकत नाही" असा बहुमताने ठराव संमत करून घेवुन ७ विरुद्ध २ मतांनी "गोंधळी" जमातीला क्रिमिलेअरच्या अटीमधुन सरसकट वगळण्यास विरोध केला. केवळ आयोगाच्या सदस्या अँड. पल्लवी रेणके व डॉ. कैलास गौड यांनीच भिन्न मत नोंदविले. आयोगाने यांचे भिन्न मत नोंदवून तसा अहवाल शासनास पाठविला आहे. मी व्यक्तीशः पल्लवी ताई व डॉ. गौड यांना विनम्र धन्यवाद देतो.
मित्रांनो, केंद्र सरकारच्या इतर मागासवर्गीयांच्या यादीतील वंशपरंपरागत उद्योग किंवा धंदा करणाऱ्या विमुक्त जमाती 'अ', भटक्या जमाती 'ब' आणि विशेष मागास प्रवर्ग या मधील आयोगाने शिफारस केलेल्या वरील जमाती खरोखरच क्रिमिलेअरची अट रद्द होण्यास पात्र आहेत. मात्र गोंधळी, बेलदार, भुते, गिहडा, बागडी, काशिकापडी, भोई, थेलारी, ओतारी या भटक्या जमाती देखील पात्र आहेत. सवलत सरसकट भटक्या जमाती 'ब' ला देण्याऐवजी जमातीजमातींमध्ये भांडणे लावण्याचे व फुट पाडण्याचे काम आयोगाने केले आहे. गोंधळी जमात इतर भिक्षुक जमातींपेक्षा कशाने वेगळी आहे ते कळत नाही.
वास्तविक पाहता "गोंधळी" ही मुळ २८भटक्या जमातींपैकी एक जमात! आजवर भटक्या विमुक्तांचा सर्वाधिक नेटाने लढा गोंधळी जमातीनेच लढला आहे. विस्तृत अर्थाने पाहीले तर गोंधळी जमात भूमिहीन आहे. बोटावर मोजता येतील अशी काही कटुंबे अलीकडच्या काळात नोकरीच्या माध्यमातून सामान्य अथवा सामान्यपेक्षा थोड्या वरच्या स्तरावरील जीवन जगत आहेत. हे चित्र सर्वच जाती जमातींमध्ये पहायला मिळते. खरे पाहता आयोगाने शिफारस केलेल्या जमातींपेक्षा गोंधळी जमात तसुभरही वेगळी नाही तरीदेखील आयोगाने या जमातीवर हा असा अन्याय केला आहे. कोणत्याही जमातीमध्ये १०-१५ टक्के लोक हे काहीसे सुधारित असतातच! म्हणजे म्हणून ती जमात सर्वार्थाने व सर्वंकषपणे सुधारित ठरत नाही. आरक्षणाचा लाभ हा ख-या वंचित व सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक द्रुष्ट्या लायक समाज घटकाला मिळायला हवा. आज रोजी क्रिमिलेअरची मर्यादा सहा लाख रुपये प्रति वर्ष उत्पन्नाची आहे, आठ लाख प्रस्तावित आहे पण ६६,६६६ रूपये प्रती महीना उत्पन्न असलेले एखादे त्रुतीयश्रेणी कर्मचारी कुटुंब आरक्षणाचा लाभ घेण्यास अपात्र असावे हे पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात खितपत पडलेल्या जमातींच्या द्रुष्टीने अन्यायकारक आहे. हा अन्याय आहे ख-या अर्थाने त्या कुटुंबातील विद्यार्थ्यांवर!! बदलत्या जीवन शैलीमुळे आज असंख्य कुटुंबातील पती-पत्नी दोघेही नोकरी-धंदा करतात. कदाचित वैयक्तिक त्या उभयतांना यापुढे आरक्षणाचा लाभ मिळू नये हे मत सामाजिक न्यायाच्या द्रुष्टीने मान्य केले जाऊ शकते (actually no) पण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणुन त्या कुटुंबातील अपत्ये आरक्षणाचे लाभ घेऊ शकणार नसणे हा विकासासाठी आवश्यक " घटनादत्त संधी' हिरावून घेण्याचा प्रकार आहे. दर्जा व संधीची समानता हे भारतीय संविधानाचे उद्धिष्ट आहे. मित्रांनो हा गोंधळी जमातीवर प्रचंड मोठा अन्याय आहे. आणि हा अन्याय जाणिवपुर्वक केला गेला आहे. फोडा व राज्य करा हे षडयंत्र आपण सर्व मुळ भटक्या जमातींनी ओळखायला हवे. भिक्षुक जमातींपैकी गोंधळी जमात ब-यापैकी संघर्ष करु शकणारी जमात आहे हे प्रस्थापित जाणतात. मला आणखी एक बाब सर्व गोंधळी सद्रूश भिक्षुक जमातींना विचारायची आहे....एरवी, 'आपण सर्व मुळचे गोंधळीच आहोत, आपण सर्व एक आहोत' असे म्हणणारे आता गोंधळी बांधवांना मदत करणार आहेत ना? आशा करतो सर्व मुळ भटके या संकटसमयी आम्हाला मदत करतीलच.
मित्रांनो, अजुनही वेळ गेलेली नाही, आता या अहवालानुसार कार्यवाही करणे व निर्णय घेणे शासनाच्या विचाराधीन आहे. प्रक्रियेचा भाग म्हणून या अहवालावर जनतेच्या हरकती व सुचना मागविण्याकरीता सदर अहवाल महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे.
अजुनही वेळ गेलेली नाही, सर्वप्रथम तर सर्व बुद्धीजीवी विद्यार्थी, नोकरदार, उच्च शिक्षीत बेरोजगार व समाजाविषयी तळमळ असलेल्या कार्यकर्त्यांनी या अहवालाचे अवलोकन करावे. आणि या अहवालावर हरकती व आक्षेप नोंदवून अभ्यासपूर्ण हरकती नोंदवाव्यात. गोंधळी जातीच्या भवितव्यासाठी हा अहवाल व यामुळे येऊ घातलेला निर्णय गोंधळी जातीसाठी कसा अन्यायकारक व चुकीचा आहे हे आयोगाच्या व शासनाच्या निदर्शनास आणून द्यावे. त्यासाठी सबळ पुरावे जसे की ध्वनीफिती, द्रुष्यफिती, छायाचित्रे व इतर लिखीत पुरावे शासनास सादर करावेत. यासाठी आपले अधिकाधिक ई- मेल bhaurao.gavit@nic.in या ई-मेल आयडीवर दिनांक २६ आँकटोबर २०१७ पर्यंत पाठवावेत. ज्यांना ई-मेल करता येत नाहीत त्यांनी पत्राद्वारे आपल्या हरकती व सुचना----
श्री. भा.रा.गावित, सहसचिव, विजाभज, इमाव व विमाप्र, कल्याण विभाग, दालन क्रमांक १५३, विस्तार, पहिला मजला, मंत्रालय, मुंबई-३२ या पत्त्यावर पाठवाव्यात. जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर व जितक्या जास्त संख्येने शक्य आहे तितक्या आधिक संख्येने!!!
मित्रांनो, या कामी संघटनांनी सुनियोजित पद्धतीने व तात्काळ पाऊले उचलणे गरजेचे आहे. यासाठी कायद्याच्या अभ्यासकांची व तज्ञांची मदत घ्यायला हवी. शासनाने अनुसुचित जाती, अनुसूचित जमातींसाठी या पुर्वीच घेतलेला व आता वर शिफारस केलेल्या भटक्या विमुक्त जाती जमातींना क्रिमिलेअरच्या अटीमधुन वगळण्याचा  घेतलेला निर्णय न्यायोचित व संविधानाच्या उद्धिष्टांना धरुन आहे मात्र त्याच नियमाने गोंधळी व इतर जमातींना त्यात समाविष्ट न करण्याचे षडयंत्र गोंधळी व इतर वर उल्लेख केलेल्या पाच सहा जमातींसाठी कमालीचा अन्यायकारक आहे. आपण संघटित व अभ्यासपुर्ण पाऊले उचलली तर हा अन्याय थांबला जाऊ शकतो. आपल्यासाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी आता आपण एकत्र येणे व संघर्ष करणे काळाची गरज आहे. लक्षात असु द्या, शेवटची तारीख २६ आँकटोबर आहे. आणखी एक, ही भिती नाही वास्तव आहे, आज आयोगाने आपली क्रिमिलेअरची अट वगळण्यास नकार दिला, उद्या "गोंधळी" जमात ही पुरोहित वर्गातील, गावगाड्यातील, पुढारलेली व विकसित "जात" आहे असे भासवून, आयोग शासनास "गोंधळी" जमातीस भटक्या जमाती "ब" मधुन वगळून इतर मागासवर्गात समाविष्ट करू शकतो! तसा त्याचा तो अधिकार देखील आहे. मित्रांनो, अन्याय सहन केला म्हणजे तो करणाराची हिंमत वाढते व भविष्यात अन्यायाची तिव्रता देखील! बघा विचार करा, पण हे सत्य शासनाच्या लक्षात आणुन द्या की, "गोंधळी ही पुरोहित नसून भिक्षुक जमात आहे, भूमिहीन जमात आहे, मुळ भटकी जमात आहे".

आपलाः
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. ९६७३९४५०९२.

Thursday 8 June 2017

भटक्यांच्या आरक्षणातील स्थित्यंतरे

भटक्यांच्या आरक्षणातील स्थित्यंतरे

मित्रानो नमस्कार ... १ नोव्हेंबर १९४९ रोजी तत्कालीन मुंबई राज्य सरकारने सर्वप्रथम आरक्षण दिले.  तसा शासन निर्णय निर्णय काढून २ एप्रिल १९५३ पासून टक्केवारी जाहीर करून आरक्षण अमलात आणायला सुरुवात केली. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.  २१ नोव्हेंबर १९६१ पासून श्री. बी. डी. देशमुख समितीच्या शिफारशीवरून महाराष्ट्रात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गास आरक्षण आमलात आले. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी पूर्वीची सरकारे मनापासून झटत असत. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने थाडे कमिशनच्या अहवालावरून दिनांक ९ एप्रिल १९६५ पासून गुन्हेगार जमातींना अनुसूचित जमातींमधून बाजूला काढुन भटक्या विमुक्त जमाती असा स्वतंत्र वर्ग निर्माण करून त्यांना ४ % वेगळे आरक्षण दिले. भटक्या विमुक्त जमाती या स्वतंत्र वर्गात तेंव्हा १४ विमुक्त जमाती व २८ भटक्या जमाती समाविष्ट होत्या. पिढ्यानपिढ्या गांजलेल्या आणि किमान मानवी जीवन पद्धतीपासून मैलोंमैल दूर असलेल्या या वंचित जमातींना न्याय देण्याच्या उदात्त हेतूने तत्कालीन सरकारे पावले उचलत असत. खऱ्या गरजू घटकांना शासनाचे पाठबळ असायचे. सहानुभूती मिळायची, दुसऱ्या शब्दात सांगायचे तर सरकारचे मन जिवंत होते.
मात्र पुढे पुढे काळ बदलत गेला तसा कमजोरांना ताकद बहाल करणाऱ्या या आरक्षण नामक घटनात्मक तरतुदीचा अर्थच बदलत गेला. एकजुटीच्या जोरावर ताकदीने मागणी करणाऱ्यांना आरक्षणाचे बक्षीस दिले जावू लागले. बहुसंख्य व एकगठ्ठा मतांवर डोळा ठेवून आरक्षणाची खिरापत वाटली जावू लागली. संख्येने जास्त व एकजूट असल्याने त्या त्या जमातींमध्ये राजकिय नेतृत्वे निर्माण होवू लागली. वाढत्या प्राबल्याचा वापर करून त्यांनी आपापल्या जमातींचे भटकेपण सिद्ध करून आपापल्या जमातींचा फायदा करून घेतला. दुर्दैवाने असे कोणतेही राजकीय नेतृत्व मूळ २८ जमातींमध्ये निर्माण झाले नाही.
दिनांक १३ ऑक्टोबर १९६७ च्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे इतर मागास प्रवर्गात १३० जाती होत्या. ज्यात आता भटक्या जमातीमध्ये असणाऱ्या अनेक जमातींचा समावेश होता. त्यातील आता पर्यंत १३ जातींचा समावेश भटक्या जमातींमध्ये झाला आहे. मूळ २८ जमातींचा हा वर्ग आता ४१ जमातींचा झाला आहे. (२५ मे २००६ च्या सामाजिक न्याय विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे ३७ व नुकत्याच २०१३ मध्ये समाविष्ट ४ जमाती धरून )
दिनांक २५ मे १९९० रोजी धनगर व तत्सम जमातींचा , दिनांक २३ मार्च १९९४ रोजी वंजारी व तत्सम जमातींचा भटक्या जमातींमध्ये समावेश करण्यात आला. पुढे १४ विमुक्त जमाती व २८  भटक्या जमाती यांचा भटक्या विमुक्त जमाती हा वर्ग वाढल्याने ४ % आरक्षण अपुरे पडू लागले म्हणून ४% वरून  ६% केले. नंतर ११% केले व भटक्या विमुक्त जमातींचे चार स्वतंत्र प्रवर्ग तयार केले. मूळ १४ विमुक्त जमातींचा विमुक्त जमाती अ हा वर्ग तयार करून त्यांना ३ % आरक्षण दिले गेले, दुसरा मूळ भटक्या जमातींचा, भटक्या जमाती ब हा वर्ग तयार करून त्यांना २. ५ % आरक्षण दिले गेले, तिसरा धनगर व तत्सम जमातींचा भटक्या जमाती क हा वर्ग तयार करून त्यांना ३.५ % आरक्षण दिले गेले आणि चौथा वंजारी व तत्सम जमातींचा भटक्या जमाती ड हा व तयार करून त्यांना २ % आरक्षण दिले गेले. यात एक बाब अधोरेखीत करायला हवी ती ही की, मूळ भटक्या जमातींची संख्या २८ वरून ४१ झाली तरी अनेक आंदोलने होऊनही आरक्षणाचा टक्का मात्र वाढवून दिला नाही. वास्तविक पाहता मूळ भटक्या जमातींची सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दयनीय स्थिती पाहता आरक्षण टक्केवारी वाढवून देणे मानवतेच्या दृष्टीने क्रम प्राप्त होते तरीही त्यात काही बदल झाला नाही हे विशेष. भटक्या विमुक्त जाती जमातींचे विस्तारलेले कुटुंब मूळ भटक्या विमुक्तांसाठी भूषणावह आहे, वास्तविक पाहता ते याहूनही अधिक मोठे आहे मात्र मूळ भिक्षेकरी, मागतकारी, खेळकरी व कलाकार जमातींच्या उत्थानाचा व त्यांच्यावरील अन्यायाचा जेंव्हा प्रश्न येतो, तेव्हा इतर भटके विमुक्त बांधव दुर्दैवाने समोर येताना दिसत नाहीत हा आजवरचा अनुभव आहे.  
आरक्षणाच्या आधारे सरकारी नोकर भरती व पदोन्नतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती यांना प्राधान्य मिळावे या हेतूने इतर मागास वर्गाकरिता निर्धारित केलेली पदे भरली न गेल्यास ती पदे अदलाबदलीने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती  यांच्यामधून भरली जात असत. ५ डिसेंबर १९९४ च्या शासन निर्णयाप्रमाणे यात बदल करून सरळ सेवा भरतीमध्ये इतर मागास प्रवर्गासहीत सर्व आरक्षित प्रवर्गाची आरक्षित पदे उमेदवार उपलब्ध नाही झाला तर ५ वर्षांपर्यंत रिक्त ठेवावेत असे शासन आदेश निघाले. ६ व्या वर्षानंतर पदे आदलाबदलीने भरावीत असे सांगण्यात आले. अदलाबदली कशी होती तर, फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यात अदलाबदली, नंतर फक्त मूळ भटके विमुक्त अर्थात विमुक्त जमाती, भटक्या जमाती यात अदलाबदली करून आणि भटके विमुक्त क, भटके विमुक्त ड व इतर मागास वर्गात अदलाबदली करून.
१८ ऑक्टोबर १९९७ पर्यंत भटके विमुक्त क, भटके विमुक्त ड यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण नव्हते. तोवर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती अ व भटक्या जमाती ब यांनाच पदोन्नतीमध्ये आरक्षण होते. भटके विमुक्त क, भटके विमुक्त ड व इतर मागास वर्ग या प्रवर्गासाठी निर्धारित केलेल्या प्रमाणानुसार त्या त्या प्रवर्गाचे उमेदवार उपलब्ध झाले नाही तर ३ भरती वर्षे प्रयत्न केला जात असे व ४ थ्या वर्षी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या दोन प्रवर्गातून व विमुक्त जमाती अ व भटक्या जमाती ब या प्रवर्गातून अदलाबदलीने भरण्यात येत असत. या मागील उद्धेश हा होता की खऱ्या अर्थाने दुर्बल व दुभळ्या जाती जमातींना प्राधान्य देऊन सबळ बनवता याव्यात.
आरक्षण प्रवर्गांचा क्रम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ड, विशेष मागास व इतर मागास वर्ग असा होता व आहे. तसा तो जगजाहीरही आहे. २९ मार्च १९९७ च्या शासन निर्णयाप्रमाणे विमुक्त जमाती व भटक्या जमातींमधील आरक्षण अंतर्गत परिवर्तनीय असेल असे सांगितले गेले. व क्रम अ, ब, क, ड असा राहील असेही सांगीतले गेले. सध्या अस्तित्वात असलेल्या महाराष्ट्र आरक्षण कायदा २००४ मधेही आरक्षित प्रवर्गांचा क्रम व आरक्षण टक्केवारी, १) अनुसूचित जाती (१३%), २) अनुसूचित जमाती (७ %) , ३) विमुक्त जमाती अ (३%), ४) भटक्या जमाती ब (२.५%), ५) भटक्या जमाती क (३.५ %), ६) भटक्या जमाती ड (२%), ७) विशेष मागास (२%) व ८)  इतर मागास वर्ग (१९%) एकूण ५२% असा आहे.
मात्र आता चित्र असे आहे की, आरक्षणाचे लोणी पळवापळवीची जणू स्पर्धाच लागल्याचे दिसत आहे. सत्तेच्या डावपेचात मूळ भटका विमुक्त समाज आरक्षणाच्या बाबतीत पराभूत होताना दिसत आहे. संघटित शक्ती, एक गठ्ठा मते, संघटन कौशल्ये, आर्थिक सबळता व राजकीय वरदहस्त यांचे जोरावर मूळ भटक्या विमुक्त समाजावर अन्यायच होत आला आहे. आता तर त्याची तीव्रता अधिकच वाढली आहे.
कालपरवा दिनांक २९ मे २०१७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक परित्रक काढले आहे . परिपत्रक छोट्या संवर्गातील मागास वर्गीयांची आरक्षित पदे भरण्याच्या कार्यपद्धतीबाबत आहे. छोट्या संवर्गातील पदोन्नतीच्या कार्यपद्धतीबाबत मार्गदर्शन सदर परिपत्रकामध्ये करण्यात आले आहे. पत्रकात असे म्हटले आहे की, आरक्षणाच्या मुख्य अधिनियमातील कलम ४(३)  तरतुदीनुसार विमुक्त जमाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क आणि भटक्या जमाती ड या प्रवर्गास विहीत करण्यात आलेले आरक्षण अंतर्गत परिवर्तनीय आहे. त्यामुळे जर विमुक्त जमाती अ प्रवर्गाचा उमेदवार उपलब्ध झाला नाही तर  विमुक्त जाती भटक्या जमाती या  गटातील ज्येष्ठता व पात्रतेच्या अधीन राहून पदोन्नतीसाठी असलेल्या बिंदुनामावलीच्या क्रमानुसार विमुक्त जमाती अ, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ब आणि भटक्या जमाती ड या क्रमाने उपलब्ध पात्र कर्मचाऱ्यास /अधिकाऱ्यास पदोन्नती देण्याची कार्यवाही करण्यात यावी !!
याला म्हणायचे ग्यानबाची मेक. तोवरच्या  बिंदुनामावलीचा क्रम व सदर परिपत्रकात आधार घेतलेल्या महाराष्ट्र आरक्षण अधिनियम २००४ मधील क्रम सुद्धा विमुक्त जमाती अ, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क आणि भटक्या जमाती ड असाच आहे. वास्तविक ही जाणीवपूर्वक मारलेली पाचार आहे. आरक्षित प्रवर्गांचा क्रम सरळ सेवा भरतीसाठी वेगळा आणि पदोन्नतीसाठी वेगळा कसा काय असू शकतो? मूळ भटका वर्ग म्हणजे भजब पदोन्नतीमध्ये भजक नंतर कसा काय आसू शकतो? बरं महाराष्ट्र आरक्षण अधिनियम २००४ मधील कलम ४(३) मध्ये काय म्हटले आहे पहा ...
The reservation specified for  the categories mentioned at serial numbers (3) to (6) (both inclusive) in the table under sub-section (2) shall be inter transferable. If suitable candidates  for the posts reserved for any of the said categories are not available in the same recruitment year, the posts shall be filled appointing suitable candidates from any of the other said caregories.
वर उल्लेख केल्याप्रमाणे अधिनियमातही तिसऱ्या क्रमांकावर विमुक्त जमाती अ, चौथ्या क्रमांकावर भटक्या जमाती ब, पाचव्या क्रमांकावर भटक्या जमाती क आणि सहाव्या क्रमांकावर भटक्या जमाती ड आहे. हा केवळ मुद्रण दोष नाही. माननीय बाळकृष्ण रेणके आण्णांशी चर्चा केली असता ते म्हणाले की, तो जी. आर . ज्यांच्या सहीने निघाला आहे ते सचिव श्री. बाजीराव जाधव , डेप्युटी सेक्रेटरी होम श्री. सुरेश खाडे, त्यांच्या सहकारी मानकर मॅडम व इतर स्टाफ याच्याशी संबंधीत कागदपत्रासह बोलणी विस्ताराने झाली. २९ मे च्या शासकिय परिपत्रकात भटके ब वर अन्याय करणारा जो मजकूर आहे तो नजर चुकीने किंवा खोडसाळपणे आज आलेला नाही तर १९९७ पासून केवळ परिपत्रकात नाही तर भरती संदर्भात झालेल्या कायद्यात सुध्दा तोच मजकुर आहे. आपल्या लक्षात आज आला. त्यात दुरुस्ती हा विषय नोकरशाहीचा नाही . मुख्यमंत्री व सामाजिक न्याय मंत्री यांच्या पातळीवर ठराविक कार्य प्रणाली अनुसरुन तो प्रश्न धसास लावावा लागेलं ..
मी थोडे मागे जाऊन शहानिशा केली असता आर. के. सबरवाल आणि इतर विरुद्ध पंजाब राज्य प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या अनुषंगाने आरक्षणाचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दिनांक १८ ऑक्टोबर १९९७ रोजी शासन निर्णय काढून दिले. या शासन आदेशापासून पदोन्नतीमध्ये भटक्या जमाती क आणि भटक्या जमाती ड यांना अनुक्रमे ३.५ % व २ % आरक्षण लागू केले. शासन निर्णयासोबतच पदोन्नतीची १०० बिंदू नमुनेवजा नामावली जोडण्यात आली व ही बिंदुनामावली १९९६-९७ च्या निवड सूची पासून अमलात आणावी आणि तसे करताना बिंदू क्रमांक १ पासून ती वापरावी असे आदेशित करण्यात आले. पदोन्नतीच्या सदर बिंदुनामावलीमध्ये अनुसूचित जातीला १३ बिंदू, अनुसूचित जमातीला ७ बिंदू, विमुक्त जमाती अ ला ३ बिंदू,  भटक्या जमाती ब ला २ बिंदू,  भटक्या जमाती क ला ३ बिंदू,  भटक्या जमाती ड ला २ बिंदू,  आणि भटक्या जमाती ब-भटक्या जमाती क यांना एक बिंदू (९९ वा) संयुक्त देण्यात आला. इथपर्यंत सर्व बरोबर व लक्षात येण्याजोगे आहे मात्र बिंदूंचा क्रम देताना ४ था बिंदू भजक ला आणि ७ वा बिंदू भजब ला देण्यात आला. परिणामी बिंदुनामावलीचा क्रम अ, क, ब, ड असा झाला. बिंदुनामावलीत ४ था बिंदू भजब ला असता तर आळीपाळीने संधी देताना अबकड मध्ये अ नंतर ब ला प्राधान्य मिळाले असते. तेव्हाच आक्षेप घेतला असता तर पदोन्नतीची मूळ भटक्यांची संधी हुकली नसती.
याचा परिणाम एवढ्यावरच संपत नाही. जर २२ पदोन्नत्या द्यायच्या असतील तर ७ पदे आरक्षित असतील ज्यामध्ये अ.जा.३ व अ.ज.२ पदे कायमस्वरुपी उपलब्ध होतील. उर्वरित दोन पदे  व्ही.जे.१ आणि एन.टी.सी. १ यांना उपलब्ध होतील. समजा  व्ही. जे. आणि एन.  टी. सी. चा उमेदवार उपलब्ध नसेल तर आळीपाळीने एन.टी.बी. नंतर एन.टी.डी. चा विचार केला जाईल. जेव्हा किमान २३ पदोन्नत्या द्यायच्या असतील तेव्हा ८ आरक्षित पदांपैकी एन.टी.बी. ला १ जागा हक्काने आरक्षित असेल तोवर नाही .सरळ सेवा भरती बाबत, समजा १३ जागा भरावयाच्या आहेत तर त्यापैकी ६ जागा आरक्षित असतील ज्यात अ.जा.- २  व अ.ज.-१ पद कायमस्वरुपी उपलब्ध होईल. २ इमाव आणि  व्ही.जे. , एन.टी.बी., एन. टी.सी. , एन.टी.डी या क्रमाने जो उपलब्ध असेल त्याला १ पद उपलब्ध असेल . उपलब्ध नाही असे होतच नाही त्यामुळे हक्काचे आरक्षण हे खरे आरक्षण. एन.टी.बी. ला हक्काची १ जागा जेव्हा किमान १४ जागा भरायच्या असतील तेव्हा मिळेल तोवर नाही. या गतीने एन.  टी.  बी. मधील भिक्षेकरी, खेळकरी आणि पारंपारिक कलाकार जमातींचा मागासलेपणा कधी दूर होणार देव जाणो. आणि मुख्य म्हणजे सरळ सेवा भरती आणि पदोन्नती या साठीच्या बिंदुनामावलीतील सामान प्रवर्गांचा सुरवातीचा क्रम वेगळा कशामुळे असेल हे माझ्या समजण्यापडीकडील असले तरी मला एक नक्की कळते की सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या भजब मधील मूळ भटका समाज पिछाडलेला आहे. त्यामुळे आळीपाळीने जेव्हा पदोन्नती किंवा भरतीची संधी देण्याची वेळ वेळ येईल तेव्हा मानवतेच्या बिंदुनामावलीत भजब चा क्रम वरचा पाहिजे.
दुसरी बाब म्हणजे आज रोजी वरील दोन्हीही परिपत्रके अस्तित्वात आहेत. यांच्या आधारे अनेक पदोन्नत्या दिल्या  आहेत दिल्या जाणार आहेत. एखादा दिला गेलेला लाभ परत घेता येत नाही कारण तो नियमाप्रमाणेच दिलेला असतो. मूळ भटक्या जमातींचे म्हणजे भिक्षेकरी, खेळकर व कलाकार जमातींचे दुर्दैव म्हणजे मोजता येत नाहीत एवढ्या संघटना संघटना व समाज सेवक असूनही आपल्यावरील अन्यायाच्या प्रतिकारासाठी एकत्र येऊन लढा कधीच देत नाहीत. तशी वेळ आलीच तर श्रेयावरून कलगीतुरा सादर करतात. वरील अन्यायकारक उलेख दुरुस्थ करताही येईल. मात्र त्यासाठी अनेक कागद काळे करावे लागतील, ते ही संघटितपणे. संबंधित विभागाचे मंत्री,  मा. मुख्यमंत्री,  मा. राज्यपाल यांना भेटून निवेदने देऊन झालेला अन्याय निदर्शनास आणून देऊन नव्याने शुध्दीपत्रक किंवा दुरुस्तीपत्रक काढण्याची विनंती करावी लागेल. मा. न्यायालयाचे दार ठोठवावे लागेल, सर्वात महत्वाचे म्हणजे सदर दिनांक २९ मे २०१७ च्या परिपत्रकास स्थगिती मिळवावी लागेल.
अशी स्थगिती मिळू शकते. यापूर्वीही अशाच प्रकारे छोट्या संवर्गामध्ये मागास प्रवर्गाची आरक्षणाची पदे भारण्याबाबतची कार्यपद्धती स्पष्ट करणारे परिपत्रक दिनांक २७ ऑक्टोबर २००८ यास याचिका क्रमांक ३०७७/२०११ मागासवर्ग कर्मचारी/अधिकारी सुरक्षा महासंघ विरुद्ध महाराष्ट्र शासन प्रकरणी मा. मुंबई न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिनांक  २९ सप्टेंबर २०११ रोजी दिलेल्या आदेशान्वे शासनाने सदरील परिपत्रकास अंतरिम स्थगिती दिनांक ५ जानेवारी २०१२ रोजी दिली होती. त्यानंतर मा. न्यायालयाने दिनांक ९ मे २०१३ रोजी दिलेल्या अंतिम आदेशान्वे शासनाने सदरील परिपत्रक दिनांक १७ ऑक्टोबर २०१३ रोजी कायमचे रद्द केले.
मित्रांनो मूळ भटक्या जमातींनी अर्थात भजब ने आजवर अनेक अन्याय सहन केले आहेत. २४ वरून ४१ झालोत मात्र आरक्षणाचा टक्का नाही वाढला. दुसरीकडे मागून येवून लोक पुढे गेले. ते पुढे गेले म्हणून असूया वगैरे असण्याचा वा पोटात वगैरे दुखण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ते ही आपली भावंडेच आहेत. जुन्या भाषेत सांगायचे तर आपण सर्व भटके विमुक्त एकाच भाकरीचे तुकडे आहोत. सर्वांची दु:खे सामान आहेत. मात्र याचे दु:ख नक्की आहे की मूळ भटक्यांच्या मदतीला कोणीही धावून येत नाही. अगदी भावंडेही. जो तो आपापला विचार करतो आणि आम्हा भटक्या भिक्षेकरी, खेळकरी आणि कलाकार जमातींमध्ये अज्ञान इतके आहे की आपण विचारही करत नाहीत.

आपला :
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो . ९६७३९४५०९२

भारत माझा देश आहे?

मुंबईमध्ये सोशल एज्युकेशन मुहमेन्ट व आखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती जमाती वेल्फेअर संघ आयोजित दि. १०/०६/२०१७ च्या "भारतीय साधनसंपत्ती पंचायत २०१७" च्या निमित्ताने....

                            भारत माझा देश आहे????

              "भारत माझा देश आहे" असे आपण शालेय जीवनात सकाळी राष्ट्रगीतानंतर प्रतिज्ञेतून दररोज म्हणत असायचो. भारतात क्वचितच एखादा महाभाग सापडेल, ज्याला ही प्रतिज्ञा मुखोद्गत नसेल. मी स्वतः शिक्षक असल्याने, माझा तर या प्रतिज्ञेशी दररोजच संबंध येतो. अध्यापनाचा भाग म्हणून विध्यार्थ्यांना प्रतिज्ञेचा अर्थही समजावून सांगावा लागतो. भारत माझा देश आहे? असे का म्हणायचे तर त्यांच्या वयाप्रमाणे व बुद्धीप्रमाणे त्यांना पटेल असे सांगून मी मोकळा होतो. मी उत्तर असे देतो  की, आपण या देशात जन्मलो, या देशात राहतोय म्हणून भारत माझा देश आहे असे म्हणायचे. अशा उत्तराने त्यांचे समाधान होते. मात्र माझ्या मधील विद्यार्थी जेव्हा जागा होतो तेव्हा माझ्यातील शिक्षकाची तारांबळ उडते. माझ्यातला भटका विमुक्त विद्यार्थी युक्तिवाद करतो, साधारणपणे देश ही एका ठराविक सीमारेषेलातील भूभाग अशी संकल्पना आहे. त्या भूभागाला अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय, नागरिकशास्त्रीय अंगे आहेतच म्हणा.  
                     माझ्या परिवाराची साधारणपणे सतरा वर्षे किरायाच्या घरात गेली. माझे तर अर्धे आयुष्यच भाड्याच्या घरात गेले . मग ज्या घरांमध्ये मी आजवर राहीलो वा आजही राहत आहे "ते" माझे घर आहे का? तर नाही, भावनिक दृष्ट्या विचार करता खोली आणि घर मधील फरक मी समजू शकतो म्हणा पण हा शब्दच्छल झाला. "माझे घर" म्हणजे माझ्या मालकीचे घर. अगदी याच पद्धतीने माझा देश म्हणजे, देशाच्या सीमेआतील काहीनाकाही भूभाग माझ्या मालकीचा असणे मग तो भूभाग शेजमीन असेल, राहते घर असेल अथवा आताच्या काळाची गरज असलेला अविभाज्य भाग म्हणजे फ्लॅट असेल. मात्र जर यापैकी माझे काहीच नाही, माझा अथवा माझ्या कुटुंबाचा जर ७/१२ नाही, ८अ नाही, कुठलेच प्रॉपर्टी कार्ड नाही तर मग हा माझा देश आहे असे कसे म्हणावे?
             भारतातील जवळ जवळ १/८ ते १/७ टक्के जनता भटकी आहे. त्यांच्या नावे कोठेच कसलाच भूभाग नाही. प्राण्यांच्या पाठीवर बिऱ्हाड बांधून गावोगाव व शहरोशहरी निरंतर भटकत राहणारा हा समाज पालात राहतो.  मात्र पालाखालची जमीन दरवेळी वेगळी असते. रस्त्याच्या कडेला , सिमेंटच्या नळीमध्ये, पुलाखाली आश्रय घेणारा हा समाज, या देशाचा रहिवाशी आहे, असे म्हणायचे धाडस करवत नाही. ओळखीचा कुठलाच पुरावा नाही, रहिवासाचा पुरावा म्हणजे काय हेच ज्यांना कळत नाही, त्यांनी आपले नागरिकत्व कसे सिद्ध करावे? व भारत माझा देश आहे असे कसे म्हणावे?
            पाळीव प्राण्यांची तरी हक्काची जागा असते. तसे बारकाईने पाहिले तर अगदी भटकणाऱ्या प्राण्यांची सुद्धा हक्काची नसली तरी ठराविक व नित्याची जागा असते. शक्यतो त्यांना कोणी उठवत नाही आणि चुकून उठवले तरी पुन्हा ते प्राणी त्याच जागेवर बसतात!! मात्र भटक्या विमुक्त जमातीतील माणसांच्या जीवनात उठवले जाणे, हाकलले जाणे, हुसकावले जाणे नित्याचेच असते. या अनुभवांचे त्या बिचाऱ्यांनाही काहीच वाईट वाटत नाही मात्र कल्पना करा बिगर भटक्यांना कोणी उठ म्हटले तर?
 भारतातील भटके विमुक्त हे या देशाचे मूळ रहिवाशी आहेत. ते कोण्या दुसऱ्या खंडावरून भारतात आले नाहीत. जे बाहेरून आले त्यांच्या नावावर शेकडो हजारो एकर जमिनी आहेत, अगदी त्यांच्या कुत्र्यामांजरांच्या नावावरही जमिनी आहेत!! तर मग या मूळ भारतीयांना हजारो वर्षांपासून या देशात राहत असूनही हक्काची व मालकीची हातभर जमीन व निवारा का नाही? ते ही एकविसाव्या शतकात !! आश्चर्यच आहे ना. यांच्या वाट्याच्या जमिनी गेल्या कुठे? कारण आदिम मानवाचा व्यवसाय तर शेतीच होता ना? हा देश जर यांचाही आहे तर मग इथल्या मातीवर यांचा अधिकार कधीच का नव्हता? व नाही? मध्यंतरी शिवछत्रपतींच्या काळात बक्षिस, दान व देणग्यांच्या रूपात मिळालेल्या जमिनी आडाणीपणाचा गैरफायदा घेत डोक्यावाल्यांनी बळकावल्या व ताकदवानांनी लुबाडल्या.
             बरं आता सर्व आयोगांनी, अभ्यास गटांनी, समित्यांनी व न्यायालयांनी निर्वाळा दिल्यानंतर हे सर्वांना पटतंय सुद्धा की, भटका विमुक्त समाज शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक दृष्ट्या अगदी आदिवासींपेक्षा व दलितांपेक्षाही मागासलेला आहे . तरी देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये भटक्याविमुक्तांना त्यांचा कादेशीर वाटा देऊन त्यांचा घटनात्मक व जन्मसिद्ध हक्क का बहाल करण्यात येत नाही?  देशाचे उत्पन्न देशातील जनतेच्या कल्याणासाठी खर्च करावयाचे असते. त्यातही तुलनेत मागे असलेल्या दुर्बल व दुर्लक्षित समाज घटकांना प्राधान्याने समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले जाणे सैद्धांतिक व नैतिक दृष्टीने क्रमप्राप्तीचे असते. तरी मग देशाच्या एवढ्या भल्यामोठ्या अर्थव्यवस्थेतील बजेट अर्थात अर्थसंकल्पामध्ये किती टक्के आर्थिक तरतूद भटक्याविमुक्तांच्या कल्याणासाठी केली जाते? खरे सांगायचे तर देशाच्या अर्थ संकल्पात भटक्याविमुक्तांच्या कल्याणासाठी अमुकअमुक रक्कम राखीव ठेवल्याचे मी आजवर वाचले किंवा ऐकले नाही. महाराष्ट्रात तरी सामाजिक न्याय विभागाचा विजाभज व इमाव विभाग, वसंतराव नाईक विकास महामंडळ व समाजकल्याण यांच्या मार्फत काही प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. मात्र यासाठी केली जात असलेली आर्थिक तरतूद ही आवश्यकतेच्या तुलनेत फारच नगण्य असते.
              वरून दुर्दैवाची बाब म्हणजे तळागाळातील खऱ्या दुभळ्या, पिडीत, शोषीत व दुर्लक्षीत भिक्षेकरी, खेळकरी, रस्त्यावरील नकलाकार व कलाकार जातींपर्यंत कल्याणाचे हे पाणी झिरपतच नाही. आडाणी लोकांना अन्याय झालेलाही कळत नाही मग न्याय मागणे, लाभ घेणे तर दूरच राहिले. आज देशातील सर्वात तळागाळातले, गरिब, निरक्षर, निराधार आणि वंचित घटक म्हणजे भटकेविमुक्त आहेत. भटक्याविमुक्तांना ७० वर्षांनंतरही स्वातंत्र्याचे कोणतेही लाभ मिळताना दिसत नाहीत. भूमिहीन व घरहीन पराभूत मानसिकता त्यांना अनैतिक व गुन्हेगारी कृत्यांकडे ओढत नेत चालली आहे. प्रश्न असाही पडतो की, सरकार सामाजिक व आर्थिक विकासावर हजारो कोटी खर्च करते तर मग त्यातले काही त्यांच्या पर्यंत का पोहचत नाही? विकास होतोय नेमका कोणाचा? संविधानाने देशाच्या प्रत्येक नागरिकास आर्थिक व राजनैतिक "न्याय" देण्याचा आणि दर्जाची व संधीची "समानता " निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा संकल्पपूर्वक निर्धार संविधान सभेत दि. २६ नोव्हेंबर १९४९ रोजीच केला आहे. मग हा शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजनैतिक न्याय भटक्या विमुक्तांना का मिळत नाही? आज देश स्वतंत्र होऊन ७० वर्षे होत आली आहेत दर्जाची आणि संधीची "समानता" भटक्या विमुक्तांना का नाही मिळाली?
              देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या जमातींनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांनाच आता का माणसासारखे जगू दिले जात नाही? देशाचा सांस्कृतिक वारसा व परंपरा अभिमानाने सांगितल्या जाणाऱ्या देशात, संस्कृतीला खरी ओळख निर्माण करून देणारे खेळकरी व पारंपारिक लोककलाकार भटके विमुक्त, संस्कृती रक्षकांना कधी दिसतील? विविधतेत एकता असणारा देश म्हणून जगभर पाठ थोपटून घेणाऱ्या लोकांना भटक्या विमुक्तांच्या विविध भाषा, लोककला, पोषाख, चालीरीती, परंपरा, श्रद्धा यांमुळेच देशाला विविधता लाभली आहे हे का दिसत नाही? त्यांच्या विविधतेचे रक्षण करण्याऐवजी शासन त्या कायद्याने बंद का करत आहे ? नागरिकांच्या मानवी हक्कांचे जतन करण्यासाठी कायदे केले आहेत. कायद्यांनी भटक्याविमुक्तांना संरक्षण देण्याऎवजी त्यांचा रोजगारच हिरावुन घेतला आहे. अस्वल, साप, माकड खेळवणारे, नंदीबैल फिरवणारे गुन्हेगार ठरले आहेत. जडीबूटी विकुन पोट भरनारे वैदु, देवाधर्माच्या नावावर भिक्षा मागनारे वासुदेव, बहुरुपी, कडकलक्ष्मीवाले , जोशी, गोंधळी, गोसावी व इतरांवर उपासमारीची वेळ आणणारे कायदे करण्यात आले.
            या देशाचा उज्ज्वल व गौरवपूर्ण इतिहास, स्फूर्तिदायी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कलेद्वारे संक्रमित व हस्तांतरित करणारा समाज का बरे जाणीवपूर्वक दुर्लक्षित व दुर्भिक्षित ठेवला जात आहे. हिंदू धर्माचा केवेळ गर्वच बाळगणारा नव्हे तर प्रखर हिंदुत्त्वाचा सर्वदूर प्रसार व प्रचार करणारा हा समाज आज भीकही मागू शकत नाही या स्तरावर आला आहे हे धर्ममार्तंडांना दिसत नाही?
           भारत एक समाजवादी गणराज्य घडविण्याचा संकल्प आपण घटनेत केला आहे. मी असे वाचले आहे की, संपत्तीचे उत्पादन समाजाच्या मालकीचे ठेवून सर्वांना सामान मानणारी व संपत्तीचे न्याय्य वितरण करून सर्वांना एकाच सामान पातळीवर आणणारी विचार प्रणाली म्हणजे समाजवाद. उत्पादन, विभाजन आणि विनिमय यांची साधने समाजाच्या म्हणजे जनतेच्या मालकीची व्हावीत, प्रत्येक व्यक्तीला आपल्या गुणांची जोपासना करण्याची सामान संधी दिली जावी व त्यातून समाजाच्या उत्पादन शक्तीचा विकास व्हावा अशी व्यवस्था म्हणजे समाजवाद. दारिद्र्य व शोषण संपुष्टात आणून न्याय्य पातळीवर समाजाची पुनर्रचना करणे व मानवी जीवन सुखी आणि समृध्द करणे म्हणजे समाजवाद. थोडक्यात समाजवाद म्हणजे समता व न्यायावर आधारित नवी समाज व्यवस्था. अशी समताधिष्ठित न्यायाधिष्ठित, समाजवादी समाजव्यवस्था भटक्या विमुक्तांच्या नशिबी कधी येईल देव जाणो.
                 देशातील प्रत्येक भटका विमुक्त मग तो सिग्नलवर वस्तू विकणारा असेल, भिक्षेकरी असेल, खेळकरी असेल, पारंपरिक लोककलाकार असेल, जादूटोण्याचे व प्राण्यांचे प्रयोग करणारा असेल,  रस्त्यावर कसरती करणारा असेल, प्रश्नांची जंत्री व चेहऱ्यावरील हावभावावरून भूत व भविष्य सांगणारा असेल, जडीबुटी विकणारा असेल, पर्यायहीनतेतून अनैतिकतेकडे व गुन्हेगारीकडे झुकलेला असेल अथवा अगदीच हतबल भिकारी असेल, प्रत्येक भटका विमुक्त देशाच्या नकाशात आपले स्थान शोधतो आहे,  देशाच्या भूभागावर आपली जमीन शोधतो आहे, देशाच्या नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये आपला वाटा शोधतो आहे,  देशाच्या अर्थ संकल्पामध्ये आपल्यासाठी काय व किती आहे हे शोधतो आहे. देशातील प्रत्येक भटका विमुक्त टाहो फोडून विचारतो आहे, भारत माझा देश आहे???

आपला :
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो . ९६७३९४५०९२

Friday 12 May 2017

स्वातंत्र्यासाठी तिष्ठत असलेल्या भटक्या विमुक्तांचा आक्रोश

"स्वातंत्र्यासाठी तिष्ठत असलेल्या भटक्या विमुक्तांचा आक्रोश"

मित्रांनो नमस्कार ......
भारत महासत्ता होणार अथवा सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळणार अशा वजनदार चर्चा नेहमीच सुरु असतात . मात्र शेकडो वर्षांपासून सुरू असलेली भटक्‍यांची भटकंती चर्चेत कधीच येत नाही. आलीही जरी कधी तरी केवळ चर्चेपुरतीच !!! पोटाची खळगी भरण्यासाठी आजही गावोगावी भटकतच असलेल्या या समाजाची भटकंती संपून त्यांच्या समृद्धीची पहाट कधी उजळणार आहे माहित नाही ??  पोट भरण्याचीच भ्रांत असलेल्या भारताच्या या भागाला जसे सेन्सेक्स आणि जीडीपी यांच्याशी काही एक देणे घेणे नाही तसेच शासनालाही यांच्या समस्यांशी काही एक सोयरसुतक नाही असाच आजवरचा इतिहास आहे .
शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्याच्याजवळ रेशनकार्ड नाही. मतदारयादीत नाव नाही. जातीचा दाखला नाही. सर्व दृष्टीने मागास असूनही आणि भटक्या विमुक्तांसाठी स्वतंत्र आयोग नेमूनही भटक्या विमुक्तांच्या स्थितीत काहीच फरक पडला नाही . भटक्या विमुक्तांच्या नशीबी आजही पालाचीच घरे आहेत, हे चित्र कधी बदलणार ? सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेला भारत जेव्हा स्वातंत्र्याची फळे चाखतोय तेव्हा भटक्या विमुक्त जातीत जन्माला आलेले बहुसंख्य लोक त्यांच्या स्वतःच्या प्रतिक्षीत स्वातंत्र्यासाठी टाहो फोडीत, किमान मानवी जीवनाची याचना करीत आहेत. आपले हक्क मागताहेत परंतु त्याकडे सर्व बाजूंनी दुर्लक्ष करण्यात येत आहे. गुन्हेगारीचा धब्बा असलेल्या भटक्या विमुक्तांना अजूनही घटनात्मक स्थान नाही. विखुरलेल्या स्वरूपातील हा सामाज पारतंत्र्य झुगारून स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करून माणूस म्हणून  न्याय , स्वातंत्र्य , समता आणि बंधुता प्रवर्धित लोकशाही प्रणालीचा हिस्सा बनण्यास आसुसला आहे . सर्वंकष विकासाची समसमान संधी , निधीतील आणि शासन प्रशासनातील हिस्सा तसेच कायदे बनवणे निर्णय घेणे आणि त्यांची प्रभावीपणे अमलबजावणी करणे या शृंखलेतील त्याचे स्थान तो शोधतो आहे.
भटका विमुक्त समाज अतिवंचित घटकातील असून अतिशय दुरावस्थेत जगत आहे. त्याने कधीही सरकारची अडवणूक केली नाही. रस्त्यावर उतरून कधी आक्रमक भूमिका घेतली नाही. असे असतानाही सरकार त्यांच्यासाठीच्या योजना राबविण्यात अपयशी ठरते आहे. रेणके आयोग जर कायमस्वरूपी लागू झाला असता तर ख-या अर्थाने सामाजिक, राजकीय, आर्थिक स्वातंत्र्य मिळून घटनात्मक संरक्षण या समाजाला मिळाले असते. मात्र या आयोगाला कच-याची पेटी दाखवण्यात आली आणि दुसरा आयोग स्थापन करण्यात आला याला तारिख पे तारिख असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही . भटक्या विमुक्तांच्या रेणके आयोगाने सादर केलेल्या अहवालावर राष्ट्रीय सल्लागार समिती , सामाजिक न्याय विभाग , नियोजन विभाग इत्यादी मधील तज्ज्ञांच्या अभ्यास गटात चर्चा झाल्या आहेत. त्यांनी सुद्धा आयोगाच्या शिफारशींसह काही स्वतःच्याही शिफारशी केल्या आहेत. मात्र मायबाप सरकारकडून निर्णय काही झाला नाही . वास्तविक पाहता लोकशाही ही मानवतेवर आधारित असावी मात्र आपल्या देशात ताकद व संख्याबळ यावर आधारित लोकशाही नांदतेय. काही गोष्टींना प्रातिनिधिक लोकशाहीमध्ये महत्व असणे स्वाभाविक असते . मात्र म्हणून मानवी मूल्ये सरकारमध्ये रुजूच नयेत अथवा सरकारे बदलली म्हणजे समाजाच्या समस्याही बदलल्या असे तर होत नाही ना ? मानवता केंद्रस्थानी असलेली लोकशाही अस्तित्वात येणे ही भटक्याविमुक्तांची खरी गरज आहे .
अलीकडेच इतर मागास वर्गाला घटनात्मक दर्जा देऊन त्याप्रमाणे अधिकार देण्याची घोषणा शासनाने केली. त्यासाठी आवश्यक घटनादुरुस्तीही करण्यात येणार आहे . कदाचित स्वतंत्र मंत्रालयही निर्माण होईल . हे सर्व कोणासाठी?  हे मी विचारत नाही, नव्हे विचारण्याची गरजही नाही . उलटपक्षी मी खुश आहे की शासनाने काहीतरी मोठा असा निर्णय तरी घेतला. पण मग असाच निर्णय भटक्या विमुक्तांचे बाबतीतही का घेतला जात नाही ? स्वतंत्र डीएनटी शेड्युलची शिफारस व जनतेची मागणी बहुमतातील सरकार असूनही का पूर्ण होत नाही. याचे कारण एकच ते म्हणजे अनास्था . वास्तविक पाहता आज देशामध्ये अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व भटके विमुक्त वगळता उर्वरित इतर मागास वर्गापेक्षा बिकट जीवन भटके विमुक्त जगत आहेत . सिग्नलवर भिक मागणारा , रस्त्यावर कला सादर करणारा , देवाना डोक्यावर घेऊन वा गळ्यात बांधून भिक्षा मागणारा अथवा मग काम मिळत नाही म्हणून गुन्हेगारीकडे वळणारा हा समाज पूर्वापार दुर्लक्षित आणि दुर्भिक्षित असणे खरे तर शासनाचे अपयश म्हणावे लागेल . पण शासन मात्र भटक्या विमुक्तांचे केवळ ध्यान भटकविण्यासाठी वेगवेगळे आयोग , समित्या , अभ्यास गट निर्माण करत आहे . वास्तविक पाहता आता कोणत्याही अभ्यासाची शासनाला गरज नाही . शासनाला या समाजाच्या वास्तव स्थितीची अगदी पूर्णपणे कल्पना आहे.  ते अनभिज्ञ नाही . कारण केवळ भटक्याविमुक्तांचा आयोगच नव्हे तर बिगर डीएनटी सुद्धा , म्हणजे अनुसूचित जाती आयोग व  अनुसूचित जमाती आयोग यांनी सुद्धा डीएनटीचा स्वतंत्र विचार होण्याची शिफारस शासनाकडे केलेली आहे. पण शासन निर्णय घेत नाही .
विशेष म्हणजे भारत हा हिंदू धर्म बहुसंख्य देश आहे आणि  भटके विमुक्त हे सर्वार्थाने हिंदुत्वाचे समर्थकच नव्हे तर प्रचारक आणि प्रसारक आहेत . तरी ही भटक्याविमुक्तांची ही स्थिती ? हिंदुत्वाचा आभिमान बाळगणाऱ्या धर्ममार्तंडांनी आपल्याच धर्मातील या पशुसमान जीवन जगणाऱ्या एका मोठ्या वर्गाकडे अशाप्रकारे डोळेझाक करणे योग्य नाही . उदयाला भटक्या विमुक्तांनी , " आम्हाला धर्माने काय दिले ?" असा प्रश्न विचारला तर नवल वाटणे तर सोडाच पण धर्माच्या पुढाऱ्यांकडे उत्तर काय असेल याचाही विचार करण्याची वेळ आली आहे . खरे तर मी हे आगतिकतेतून लिहीत आहे .वास्तविकपाह्ता कोणताच निर्णय जात अथवा धर्म पाहून व्हावा हे अयोग्यच पण भटक्याविमुक्तांच्या प्रश्नांकडे धर्माच्या चष्म्यातून न पाहता मानवतेच्या नजरेने पहिले तरी त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागू शकतात . शिवाय भटके विमुक्त केवळ एकाच धर्मात व सामाजिक प्रवर्गात नाहीयेत .
मित्रांनो वर उल्लेख केल्याप्रमाणे शासन त्यांचाच आवाज ऐकते जे ताकदीने रस्त्यावर उतरतात . खरं तर सर्व भटक्या विमुक्तांच्या प्रत्यकाने पत्र पाठवून ईमेल करून आणि सोशियल माध्यमातून एक प्रश्न विचार करायला हवा की " जर आयोगांच्या व समित्यांच्या शिफारशी स्वीकारायच्या नसतीलच तर , त्यातील वेगवेगळ्या विभागातील तज्ज्ञांच्या बुद्धीचा व  वेळेचा आणि  जनतेच्या करोडो रुपयांचा अपव्यय का  करताय ?? " आयोगाचा अभ्यास चुकीचा व आयोगाच्या शिफारशी अवास्तव होत्या का ?? मित्रांनो लोक शहाणे असणे हे परिपक्व लोकशाहीचे लक्षण आहे.
आपली आजून एक अडचण आहे , ती म्हणजे आपल्या त्या त्या जातींच्या जातीय संघटना आहेत मात्र त्यांच्या संघटित शक्तीचा भटक्या विमुक्तांच्या या व्यापक व आवश्यक चळवळीला काहीही फायदा होत नाही . काही संघटना शासनाला निवेदने वगैरे देतात आणि शांत बसतात . मित्रांनो आवक विभागात निवेदन देऊन पोहच प्रति सोशल मिडीयावर  टाकल्याने प्रश्न सुटेल एवढा सोपा हा प्रश्न नाही.  स्वातंत्र्यापासून अनेक निवेदने शासकीय कार्यालयांमध्ये वाळव्या खात आहेत. त्यामुळे या पूर्वीच्या आणि या नंतरच्या मागण्या व शिफारशी दुर्लक्षित होऊ नयेत यासाठी हा लढा नियोजनपूर्वक , अभ्यासपूर्ण पद्धतीने , कागदोपत्री तसेच संपूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरून लढावा लागणार आहे . प्रसार माध्यमे , प्रशासकीय यंत्रणा व न्याय यंत्रणा व्यवस्थित वापराव्या लागतील.  त्यासाठी तरुणांमध्ये नेतृत्व कौशल्य विकसित करावे लागेल . तन-मन-धन एकवटून सर्वांनी एकत्र येऊन एक कृती कार्यक्रम तयार करणे अत्यंत गरजेचे आहे . इतर समाज ताकदीच्या बळावर आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी रस्त्यावर उतरत असताना आणि सरकारही त्यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेऊन ताबडतोब निर्णय घेत असताना भटक्यांना कशी काय झोप येतेय देव जाणो!! विद्यमान आयोग आपला अहवाल लवकरच सादर करेल . त्यालाही केराची टोपली दाखवली जाणार नाही यासाठी आपण सर्वांनी एकप्रकारे दबाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे . शिवाय लवकरच केंद्रात आणि राज्यांमध्ये सार्वजनिक निवडणूका होणार आहेत . त्यापूर्वी आपण सर्व भटक्या विमुक्तांनी एका अभ्यासू व अनुभवी कृतीगटाच्या मार्फत देशभर आवाज उठवणे अत्यंत आवश्यक आहे .
 म्हणून हा शब्द प्रपंच ......

आपला :
बालासाहेब (बाळासाहेब  / बालाजी ) सिताराम धुमाळ
मो.  ९४२१८६३७२५  / ९६७३९४५०९२ (WhatsApp only)