Tuesday 25 April 2017

भटक्यांचा सूर्य: बाळकृष्ण रेणके

भटक्यांचा सूर्य ...... 

मित्रांनो नमस्कार , आजचा दिवस माझ्यासाठी विशेष ठरला. कारणही तितकेच विशेष होते, ते म्हणजे केंद्रिय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळकृष्ण रेणके आण्णा यांच्या सोबत आख्खा दिवस राहण्याचा योग आला . काल पर्यंत रेणके आण्णा म्हणजे केंद्रिय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष एवढीच माझ्या दृष्टी अण्णांची ओळख होती. शिवाय त्यांच्या विरोधकांनी त्यांची, स्वार्थी, पदलोभी, जातिभ्रष्ट वगैरे अशी करून दिलेली ओळखही मनात होतीच . मात्र वाचनाची आणि गप्पा करण्याची आवड असल्याने, आण्णांविषयी मनात एक प्रकारचा आदर निर्माण झाला होता . सोशियल मिडीयाच्या माध्यमातून आण्णांची ओळख झाली . मधून मधून फोनवर बोलणेही होवू लागले . मध्यंतरी दोन वेळा भेटही झाली होती व गप्पाही झाल्या होत्या मात्र ठराविक विषयाला अनुसरून .. आज एकांत होता , दिवसभरातील दोन-चार तास सोडले तर वेळही होता .

या दिवसभरातील अनुभव आणि चर्चा यातून जो प्रत्यय आला तो खूपच प्रेरणादायी आणि आश्चर्य चकित करणारा होता . अत्यंत गरीब, घरहीन व भूमिहीन भटक्या गोंधळी जमातीमध्ये जन्मलेल्या अण्णांचे दरिद्री बालपण, त्यांचे स्वातंत्र्यापुर्वीचे दरवर्षी दर नव्या बोर्डींगमधील शिक्षण , त्यांचा नोकरी मिळवण्यासाठीचा रेल्वे स्टेशन हेच आपले घर समजून केलेला संघर्ष , त्यांचा आंतर जमातीय विवाह , त्याला उभय जमातींकडून झालेला विरोध त्यातून दोन्ही परिवाराला जात पंचायतींकडून वाळीत टाकले जाणे, १९६२ मध्येच बी. एस . सी. केमिष्ट्री पूर्ण करणे , त्या काळी वर्ग २ च्या नोकरीचा १९७३ मध्येच त्याग करून भटके विमुक्तांच्या चळवळीत स्वतःला झोकून देणे, स्व. इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाला सहकार्य करणे, लोकनायक जयप्रकाश नारायणांसोबत खांद्याला खांदा लावून काम करणे , त्यांचा अर्थशास्त्र , शेतीशास्त्र , समाजकारण , राजकारण , भटक्या विमुक्तांचे प्रश्न , त्यांची कारणे व उपाय या बाबतचा अभ्यास , राज्यघटना , कायदे , कलमे , शासन निर्णय , शासकीय परिपत्रके यांचे ज्ञान , कौटुंबिक जबाबदारी निभावण्यातील यश , जातीमुक्त समाजरचना निर्माण होण्यासाठीची धडपड, किमान दर्जाचे तरी मानवी जीवन भटक्या विमुक्तांना जगता यावे यासाठीची तळमळ , भटक्या विमुक्तांच्या छोट्याछोट्या पण मोठ्या अडचणींची जाण, भटक्या विमुक्तांच्या क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या हालचाली व त्यांचे संभाव्य परिणाम यांचा आभ्यास, शेती क्षेत्रातील संशोधन, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ज्ञान, प्रवाहाच्या विरुद्ध जावून प्रश्नांना वाचा फोडणे, सनदशीर मार्गांचा अवलंब करणे, सामाजिक एकोपा बिघडणार नाही अशाप्रकारे अडचणीतून मार्ग काढत आपले प्रश्न नेटाने, नम्रपणे व तितकेच परखडपणे मांडणे , तळमळीचे कार्यकर्ते ओळखणे , कार्यकर्त्यांना कामाला तयार करणे, कार्यकर्त्यांशी व मान्यवरांशी व्यक्तीशः संपर्क ठेवणे , त्यांच्याजवळ पोटतिडकीने विषय मांडणे व हाताळणे , कोणतीही राजकीय पार्श्वभूमी वा राजकीय वरदहस्त नसताना केवळ अभ्यास, कार्य, तळमळ व संपर्क यांच्या जोरावर आयोगाचे अध्यक्ष पद मिळवणे , त्या पदावरून एक ऐतिहासिक व पुढील पिढीला दिशादर्शक ठरेल असे कार्य करणे केवळ चमत्कारिक आहे. आजच्या अनेक मान्यवर नेत्यांना त्यांनी उभे केले असले तरी त्यांच्या बोलण्यात गर्व मात्र कणभरही दिसला नाही.
मित्रांनो, वयाच्या ऐंशीव्या वर्षी विचार करण्याची , बोलण्याची, चालण्याची जी क्षमता मला आण्णांमध्ये आढळली ती माझ्यातही नाही . खरोखरच आण्णा म्हणजे चालते बोलते विद्यापीठ आहे. जो त्यांच्या सानिध्यात जाईल तो खूप काही शिकल्या वाचून राहणार नाही . फक्त जाणारा निस्वार्थी असावा . त्याने सेवाभाव व समाज हित एवढेच ध्येय उराशी बांधावे . कारण अण्णांनी ठरवले असते तर ते स्वतः काहीही कमावू शकले असते . केवळ चळवळीचे यश अपेक्षीणारे आण्णा अनेकांना मदत व मार्गदर्शन करतात पण अनेकजण त्यांच्यावर टिकाही करतात. मात्र आण्णा आपल्यावरील टिकेणे डळमळून वा डगमगून जात नाहीत, चिडत नाहीत वा रागावत नाहीत आणि दुःखी होऊन रस्ता तर अजिबात सोडत नाहीत, तर टिकाकारांना क्रूतीतून उत्तर देतात. काही नेते आण्णांबद्दल अफवा पसरवताना आण्णांवर श्रद्धा असणा-या सामान्य लोकांना प्रश्न विचारतात, "एवढ्या मोठ्या आयोगाचे अध्यक्ष असुनही व आपले पाहुणे असुनही त्यांनी आपल्यासाठी काय केले?" मी त्यांना एवढेच सांगु इच्छितो की, आयोगाचे काम कोणाला वैयक्तिक लाभ मिळवून देण्याचे नाही. जसे वीज, पाणी, रस्ते, कार्डे, प्रमाणपत्रे, घरे, गुरे, शेती, नोकरी मिळवुन देणे वगेरे. तो आयोगाचा आधिकारीही. ते सरकारचे काम आहे. आयोगाचे काम दिलेल्या विषयाचा विशिष्ट कालावधीत आभ्यास करून तसा अहवाल सरकारला सादर करणे एवढेच असते. आण्णा व त्यांच्या सहका-यांनी देशातील सर्व भुभागावरील सर्व भटक्या विमुक्तांच्या प्राचीण व सद्यस्थितीतील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीचा सखोल आभ्यास करून तसा अहवाल सरकारकडे सादर केला आहे. भटक्या विमुक्तांवरील प्रेमाचा, त्यांच्या परिस्थीती बदलाच्या तळमळीच्या प्रयत्नांचा व त्यांच्या प्रगल्भतेचा परिचय त्यांचा अहवाल वाचल्यानंतरच येईल. मात्र टिका करणारांनी तो वाचलाही नसेल याची खात्री आहे. आयोग लागु करणे ही शासनाची नैतिक व प्रशासकीय जिम्मेदारी आहे व जर सरकार यात चालढकल करत आहे तर सरकार वर घटनात्मक व संख्यात्मक दबाव आणुन, सरकारला आयोगाच्या शिफारशी लागु करण्यास भाग पाडणे हे आपले कर्तव्य आहे. खास करून संघटनांचे.. किती संघटनांच्या नेत्यांनी अहवाल वाचला आहे ? लोकांपर्यंत पोहचवला आहे? त्यातील शिफारशींनुसार जनतेला संघर्शासाठी तयार केले आहे ? असे प्रश्न न विचारलेलेच ठिक राहील, अर्थात कोणीच नाही असे अजिबात नाही. पण केवळ हार तुरे, मानपान व सोय करून घेण्यासाठी समाजकारणात येणारे स्वयंघोषित नेते असे अपवादानेच करतात. असे नेते जर काही काळ आण्णांच्या सहवासात आले तर वाल्मिकी झाल्याशिवाय राहणार नाहीत. कसलीही वैयक्तिक आर्थिक कमाई नसलेले आण्णा मात्र काम कारण्याची संधी व विना शिफारस मिळालेले अनेक राज्य, राष्ट्रीय व आंतर राष्ट्रीय पुरस्कार हीच आपली खरी कमाई मानतात. आण्णा साधेपणाने जीवन कसे जगावे हे ही शिकवतात . वास्तविक पाहता या वयात एवढ्या अनुभवानंतर आण्णा रिमोट कंट्रोल बनू शकतात. मात्र केवळ उंटावरून गुरे राखण्याऐवजी ते प्रत्यक्ष जमिन स्तरावर काम करतात. त्या कामात स्वतः सहभागी होतात. प्रत्येक काम चांगल्यात चांगले कसे होईल यासाठी धडपड करतात.
त्या काळी १९६२ मध्येच बी. एस . सी. केमिष्ट्री पूर्ण करणारे आण्णा बहुदा महाराष्ट्रातील भटक्या जमातींमधील पहिले विज्ञान शाखेचे पदवीधर असावेत . फॉरेन्सिक सायन्स विभागातील वर्ग २ च्या पदावर नेमणूक मिळालेले आण्णा नोकरीमध्ये रमले नाहीत . केवळ आठ वर्षे नोकरी केल्यावर शाहू , फुले , आंबेडकरांच्या विचारांनी व कार्यांनी प्रेरित होऊन अण्णांनी पदाचा त्याग करून १९७३ पासून स्वतःला पूर्ण वेळ समाज कार्यात झोकून दिले . भटक्या जमातीमध्ये जन्माला येऊनही कागद पत्रांअभावी अण्णांना आरक्षणाचा लाभ मिळाला नाही .भटक्या विमुक्तांची तत्कालीन जीवन पद्धती आरक्षणाचा लाभ मिळवून शिक्षण घेऊन जीवनमान उंचावू शकेल अशी नव्हती . या परिस्तिथीमध्ये आजही विशेष बदल झालेला नाही असे आण्णा म्हणतात . आजही अनेक भटक्या विमुक्तांना जातीची प्रमाणपत्रे सहजासहजी मिळत नाहीत . सामाजिक , शैक्षणिक व आर्थिक समानता अपेक्षीणाऱ्या आजचा आधुनिक काळातही भटका समाज किमानतेची लढाई लढत आहे . भटक्या विमुक्तांना किमान मानवी जीवन तरी जगात यावे यासाठी अधिक काम करण्याची गरज आहे, भटक्यांच्या बाबतीत समानतेची लढाई तर आजून खूप दूर आहे असे अण्णांना वाटते.
ज्या जात पंचायतींनी आण्णांना व त्यांच्या पत्नींना जातीबाहेर टाकले , त्याच जात पंचायतींचे अस्तित्व टिकावे मात्र त्यांना कायद्याचे प्रशिक्षण देवून, त्यांची पद्धतशिर फेररचना करून, तीत एनजीओ, शासकीय व कायद्याचे प्रतिनीधी, प्रशिक्षित समुपदेशक समाविष्ट करुन जातपंचायत म्हणजे पारदर्शी समुपदेशन करणारी संस्था असावी, तीला शिक्षा करण्याचा नव्हे तर समुपदेशन करण्याचा अधिकार असावा असा आग्रह आण्णा धरतात . कारण भटक्या विमुक्तांना कायद्याचे शिक्षण नाही, तेवढा वेळ व पैसा नाही, शिवाय हमेशा पाठीवर बि-हाड असलेला हा समाज ज्युरिडीक्शन, तारिख, वकील ,पुरावे, युक्तिवाद व निकाल या सर्वांशी अनभिज्ञ आहे . त्यामुळे स्थानिक स्तरांवरच लहानलहान तंटे मिटवणा-या प्रशिक्षित जातपंचायतींचा आग्रह धरणारे आण्णा... भटक्या विमुक्तांचे त्यातही विशेषत्वाने भिक्षुक व कलावंत जमातींचे प्रश्न शासन दरबारी आत्मीयतेने मांडणारे आण्णा मला कळाले तसे इतरांनाही कळावेत. आण्णा कळाले नाहीत कारण ते ज्यांच्यासाठी काम करतात ते निरक्षर, अज्ञानी, भटके लोक पोटाची खळगी भरण्याच्या विवंचनेत परेशान, त्यांना आण्णा कसे समजतील ? पण जे जन्मजात भटके, सुक्षित आहेत, पोटाला पोटभर खावू शकतात अस्यांची ही सामाजिक जिम्मेदारी आहे की त्यांनी तरी आण्णा समजून घ्यावेत व समजून सांगावेत.
मित्रांनो, मानवी स्वभाव असतो, एखादे असामान्य व्यक्तीमत्व जेव्हा आपल्या समोर घडत असते तेव्हा आपण हातभार लावणे, कौतुक करून प्रेरणा देण्याऐवजी, टिका करतो, जळतो, उलटप्रश्न विचारतो, ऐकीव बाबींवर विश्वास ठेवुन अफवा पसरवतो. आणि जेव्हा असे असामान्य व्यक्तिमत्व जगाचा निरोप घेते तेव्हा पश्चाताप करतो, जो निर्थक असतो, किमान चळवळीत तरी. निसंकोच भटक्या विमुक्तांच्या चळवळीला लाभलेला हा एक प्रकाशमान सुर्य आहे जो समाजसेवेच्या अवकाशात ४० वर्षांपासून तळपत आहे व जो आजही अनेक कार्यकर्त्यांच्या व वंचित उपेक्षितांच्या डोक्यात प्रकाश पाडत आहे.
अण्णांविषयी सांगावे तेवढे कमीच आहे , असो एवढे मात्र नक्की की जर आण्णा भटके नसते तर आता आहेत त्याच्या खूप वर असते. कारण त्यांची ती क्षमता आहे मात्र ज्यांना जन्मजात ते व्यासपिठ व प्रसिद्धीचे वलय आहे, आण्णांना ते नाही. त्यांच्या क्षमतेचा, अनुभवाचा, अभ्यासाचा, ओळखीचा उपयोग आजचे तरुण कार्यकर्ते चळवळीसाठी जितका अधिक करून घेतील तितकी चळवळ मजबूत व गतिमान व्हायला मदत होईल यात शंका नाही . शिवाय अशी स्वयंप्रकाशीत व्यक्तीमत्वे चळवळीत पुन्हा पुन्हा घडत नाहीत व घडली तरी यात वेळ खुप खर्ची जातो, एवढे नक्की......
आपलाः
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. ९४२१८६३७२५
मो. ९६७३९४५०९२ (WhatsApp only)

Saturday 15 April 2017

डॉ. आंबेडकर आणि स्त्रिया

डॉ. आंबेडकर आणि स्त्रिया .... .....

मित्रांनो, वेदात आणि मनुस्मृतीमध्ये लिहिले होते की,
हे परमेश्वरा तू हा गर्भ बनवला आहेस, त्यातून मुलाचा जन्म होऊदे, स्त्री काय कुठेही जन्माला येईल. हे वरा तू पुरुष जन्माला घाल. मुलाला जन्म देऊ न शकणारी स्त्री दुर्दैवी असते. स्त्रियांना उपजतच कमी बुद्धिमता असते, ती ज्ञान ग्रहण करू शकत नाही. स्त्रियांसोबत मैत्री करू नका त्यांचे हृदय तरसापेक्षा क्रूर कपटी असते. स्त्रियांमध्ये कार्य शक्ती नसते म्हणून त्यांना संपत्ती मध्ये हिस्सा देऊ नये. स्त्रिया शुद्र कुत्रा कावळा हे सारखेच आहेत, त्यांच्यामध्ये असत्य, पाप आणि अज्ञान वाढत असते. कुठल्याही धार्मिक परंपरेतील समस्या असतील तर २४-३० वयोगटातील पुरुषाने ८-१२ वर्षाच्या मुलीशी लग्न करावे. बेकार काम धंदा नसलेला, नशाबाज, आणि रोगी नवऱ्याची आज्ञा जी स्त्री मानणार नाही तिला ३ महिन्यासाठी जंगलात सोडून द्यावे आणि तिचे दागिने काढून घ्यावे. नवरा विकृत, बाहेरख्याली, अनैतिक असला तरी पत्नीने त्याची पूजा आणि सेवा करावी.
यावर डॉ. आंबेडकर लिहितात...
"Though women is not married to man she was consider to be a property of entire family but she was not getting share out of property of her husband,Only sons could be successor to the property"
यातुन स्त्रियांची मुक्तता करण्यासाठी डॉ. आंबेडकरयांनी  देशाचे कायदामंत्री पद स्विकारल्यावर हिंदू कोड बिल आणले. त्यात त्यांनी म्हटले होते की...
समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर राजमहाल बांधण्यासारखे होय. हिंदू कोड बिलाला मी हे महत्त्व देतो . १९४७ पासून सतत ४ वर्षे १ महिना २६ दिवस बाबासाहेबांनी अविरत कष्ट करून हिंदू कोड बिल तयार केले होते. स्त्रियांना कायद्याने हक्क, दर्जा आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे स्वप्न त्यांनी हिंदू कोड बिलात दाखवले. हे बिल सात वेगवेगळ्या घटकांशी निगडित कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहणारे होते. हे सात घटक पुढीलप्रमाणे-
१. जी व्यक्ती मृत्युपत्र न करता मृत पावली असेल अशा मृत हिंदू व्यक्तीच्या मालमत्तेच्या हक्कांबाबत. २. मृताचा वारसदार ठरवण्याचा अधिकार ३. पोटगी ४. विवाह ५ . घटस्फोट ६. दत्तकविधान ७.अज्ञानत्व व पालकत्व.
हिंदू कोड बील लोकसभेत मंजूर झाले नाही म्हणून डॉ. बाबासाहेबांनी कायदे मंत्री पदावर लाथ मारून राजीनामा दिल्याचे भारतातील  एकमेव उदाहरण आहे. त्याचवेळी हे विधेयक पास झाले असते तर आज भारत जगात महासत्ता म्हणून राहिला असता. पुढे हिंदू कोड बिलाचे चार वेगवेगळे भाग करून हे चारही कायदे वेगवेगळ्या वेळी मंजूर झाले. १९५५-५६ मध्ये मंजूर झालेले चार हिंदू कायदे म्हणजे- १) हिंदू विवाह कायदा.२) हिंदू वारसाहक्क कायदा ३) हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा४) हिंदू दत्तक व पोटगी कायदा. एवढेच नव्हे तर शासकीय सेवेतील महीला जी आज बाळंतरजा उपभोगत आहेत , तीचीही व्यवस्था आंबेडकरांनीच केली आहे...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व भारतीय महिलांवर जे उपकार केले आहेत याची जाणीव खरचं किती महिलांना आहे ??
आंबेडकरांचे ‘हिंदू कोड बिल’ जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे, हिंदु समाजाचे, देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला. राजकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदु समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वतःचा आणि आपल्या सात कोटी असहाय आणि हिनदीन अनुयायांचा उध्दार करण्यासाठी, मानवजातीला समतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक भगवान बुध्दाला शरण जाण्यांवाचून गत्यंतर उरले नाही. असे त्यांचे विरोधक असणारे आचार्य अत्रे म्हटले होते. .

केवळ शब्दांकन : बालासाहेब सिताराम धुमाळ .
मोबाइल : ९४२१८६३७२५.

ऐकावे ते नवलच

ऐकावे ते  नवलच ......

मित्रांनो, काल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२६ वी जयंती जगभर साजरी करण्यात आली. दिवसभर जयंती उत्सवात सहभागी झाल्यावर रात्री घरी आलो. सवयीप्रमाणे टी. व्ही. लावला आणि दिवसभरातील घटनांचा आढावा घेण्यासाठी बातम्यांचे चॅनेल ट्यून केले . आय. पी. एल. वगेरे झाले कि एक बातमी वाचायला मिळाली. बातमी होती उत्तर प्रदेशचे योगी सरकार सत्तेवर आल्यापासून एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेत असल्याची. उत्तर प्रदेश मधून, योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांमधून एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण हटवण्याचा निर्णय घेतल्याची. संविधानातील तरतुदीनुसार सरकारी शिक्षण संस्थांमध्ये ओबीसी, एसटी आणि एससी प्रवर्गांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. मात्र हा नियम खाजगी शिक्षण संस्थांना बंधनकारक नाही. उत्तर प्रदेशमध्ये खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण लागू करण्याचा निर्णय मुलायम सिंग यादव सरकारने  आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात घेतला होता. त्यानुसार राज्यातील वैद्यकीय प्रवेश परीक्षांमध्ये सरकारी महाविद्यालयांबरोबरच सर्व खासगी महाविद्यालयांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षणचा कोटा लागू करण्यात आला होता. त्यानंतर अखिलेश यादव सत्तेवर आल्यानंतर त्यांनी खासगी वैद्यकिय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुद्धा आरक्षण देणे अनिवार्य केले होते . मात्र आता योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हा निर्णय बदलला असल्याची ती बातमी होती. वाचून धक्का बसला कारण आता खाजगी वैद्यकीय महाविद्यालये केवळ श्रीमंतांसाठी आणि नाही म्हटले तरी उच्च जातीयांसाठीच असतील असा सरळ सरळ त्याचा अर्थ होता. पण नंतर आठवले अलीकडेच सरसंघचालकांनी देशातील आरक्षण व्यवस्थेची समीक्षा करण्याची मागणी केली होती याची.
असो नंतरची बातमी होती, लातूरच्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टे या तरुणीला एक कोटीचे बक्षीस मिळाल्याची. आनंद वाटला कारण तिला हे बक्षीस पंतप्रधानांच्या हस्ते नागपुरात वितरित करण्यात आले होते. नक्कीच तिने एखाद्या स्पर्धा परीक्षेत काही तरी विशेष प्राविण्य मिळविले असणार किंवा तशीच वजनदार कामगिरी मानव कल्याणासाठी केली असणार याची खात्री होती म्हणुन बायको लेकरांनाही बोलावले जेणेकरून काही प्रेरणा मिळेल. मात्र भ्रमनिरास झाला जेव्हा कळले की, तिने १५९० रुपयांचा हप्ता ऑनलाइन भरला होता म्हणून तिला हे बक्षीस मिळाले होते ... तिलाच नाही तर आणखी दोघांना. नोटाबंदीनंतर सरकारने देशात डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या लकी ग्राहक योजने अंतर्गत सोडतीत राष्ट्रपतींनी तीन विजेते ठरविण्यासाठी चिठ्ठ्या काढल्या. भाग्यवंत ग्राहक योजनेचे एक कोटी रुपयांचे पहिले बक्षिस सेंट्रल बँकेच्या, ५० लाख रुपयांचे दुसरे बक्षिस बँक आॅफ इंडियाच्या तर २५ लाख रुपयांचे तिसरे बक्षिस पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकास मिळाले. आणि डिजिधन व्यापार योजने अंतर्गतही अशीच तीन बक्षिसे व्यापाऱ्यांना मिळाली .
आता तुम्ही म्हणाल तुमचा का भ्रमनिरास झाला ? ऑनलाइन व्यवहाराला प्रोत्साहन देण्याबरोबरच कॅशलेस व्यवहार वाढवून भ्रष्टाचार रोखण्यासाठी ही योजना आणण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर लोकांना रोखरहित डिजिटल व्यवहार करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरु केलेल्या बक्षिस योजनेचे हे फलित आहे. लाभ त्यांचा झाला आणि तुमचे का पोट दुखतेय ? तुमच्या बापाचे काय गेले ? तर पोट वगेरे दुखत नाही पण काळीज जळतंय ..  प्रोत्साहनाची गरज कोणाला आहे आणि सरकार प्रोत्साहन कोणाला देत आहे ? शेतकरी कर्जबाजरी झाले आहेत, शेतं बोडकी झाली आहेत , मजुरांच्या हाताला कामे नाहीत, विद्यार्थी उच्च शिक्षण इच्छा असूनही आर्थिक अडचणीमुळे घेऊ शकत नाहीत , त्यातून जीवन संपवणे किंवा नशाबाजी करणे गुन्हेगारीकडे वळणे असे प्रकार घडत आहेत , सुशिक्षित बेरोजगार पैश्या अभावी व्यापार व्यवसाय करू शकत नाहीत. अकाली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील इतरांची जीवन जगण्याची इच्छा संपलीय. अशांना संघर्ष करण्यास प्रोत्साहन देऊन जीवन जगण्यास प्रोत्साहीत करण्याऐवजी प्रोत्साहन कुणाला तर अँड्रॉईडच्या माध्यमातून खरेदी विक्री करणारांना .बरे अशाही परिस्थितीत काही तरुण तरुणी स्पर्धापरीक्षेद्वारे यश मिळवून कुटुंबाचे व गावाचे नाव मोठे करत आहेत त्यांचे कौतुक करण्याऐवजी, प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही काही विद्यार्थी संशोधन करत आहेत . शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत . त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी सरकार अप्रत्यक्षपणे मोबाइल उद्योजकांना प्रोत्साहन देत आहे असे कोणाला वाटले तर त्यात त्याचा काय दोष ? साधी बाब आहे ज्यांच्याकडे खरेदी विक्री सोडा जीवन जगण्यासाठीचा आत्मविश्वास नाही त्यांना प्रोत्साहन कसे देणार ? बरे यातून दैववाद फोफावणार नाही का ? मटक्याला बंदी आणि लॉटरीला पर्मिशन कशी काय असू शकते. लॉटरीचे समर्थन करणारांनी महसुलाचे केवीलवाने कारण पुढे करू नये. तशीही नशिबावर अवलंबून राहणारांची संख्या आपल्याकडे कमी नाही. Shallow men believe in luck. मध्यंतरी लक नावाचा संजय दत्त , मिथुन चक्रवर्ती , डॅनी यांचा हिंदी चित्रपट आला होता ज्यात नशीब आजमावण्यासाठी तरुण काय काय करतात हे आपण पहिले आहे. लॉटरी हा नशीब आजमावण्याचाच प्रकार आहे मग ती  खासगी असो वा सरकारी.
ऑनलाइन व्यवहाराला प्रोत्साहन देण्याची गरज मी समजू शकतो पण त्यासाठी हे उपाय मला पटत नाहीत. प्रत्येक ठिकाणी ऑनलाइन व्यवहाराची सोय करणे , जाहिरात करणे , सर्व अँड्रॉइड मोबाईल कंपन्यांना ऑनलाईन ट्रान्झेकशन अँप्स हॅंडसेट्स मध्ये अल्टिमेट किंवा इनबिल्ट देणे बंधनकारक करणे , ऑनलाइन व्यवहारावर सूट सवलत देणे , सेवाकर माफ करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व युजर फ्रेंडली अर्थात वापरकर्त्यांसाठी वापरण्यास सुलभ असणे असे उपाय केले तर ऑनलाइन व्यवहाराला आपोआप प्रोत्साहन मिळेल . शासकीय निधी कोणा एकालाच देण्याऐवजी अनेकांना वाटून दिला तर ग्राहकांवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. मला ही लॉटरी पद्धती एक प्रकारचे प्रलोभन वा आमिष वाटते . राहिला प्रश्न पोट दुखण्याचा तर शासनाचा पैसा हा आपला अर्थात करदात्यांचा पैसा आहे जो अशा नियोजन शून्य प्रकारे खर्च होत असेल तर पोट नाही दुखत पण डोकं उठतं . गरीब पण होतकरू विद्यार्थी, कर्जबाजारी पण मेहनती शेतकरी  आणि वैफल्यग्रस्त पण उर्जावान बेरोजगार सुशिक्षितांना प्रोत्साहन देऊन सरकारने असे  दैववादावर विश्वास ठेवायला भाग पडणारे  निर्णय घेऊ नयेत असे मनापासून वाटते. कारण असे म्हणतात की, Strong men believe in cause and effect. एकीकडे आरक्षण नाकारून सर्वसामान्यांना विकासाच्या संधीपासून दूर ठेवायचे आणि दुसरीकडे अशा पद्धतीने नशिबावर विश्वास असेल तर कसे करोडपती होता येते याचे उदाहरण मांडायचे हे थांबायला नको का ? कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारतात,
Is there any thing such as good luck and fate ?

आपला:
बालासाहेब सिताराम धुमाळ.
मो. ९४२१८६३७२५.

Thursday 6 April 2017

शेतकरी संपावर गेला तर ????

शेतकरी संपावर गेला तर ????

मित्रांनो ,भारतासारख्या लोकशाहीप्रदान देशामध्ये अगदी नवजात अर्भकाने सुद्धा सर्वात पहिल्या ऐकलेल्या काही शब्दांपैकी एक शब्द म्हणजे संप. त्यामध्ये विशेष असे काहीच वाटत नाही. संप हे आपल्या मागण्या सनदशीर मार्गाने पूर्ण करून घेण्याचे एक प्रभावी अस्त्र आहे. सर्वसाधारणपणे असंघटित कामगार व शासकीय कर्मचारी संपाचे हत्यार हमखास उपसतात. मात्र शेतकरी संप ही  संकल्पना तशी नवीच व काहीशी अविश्वसनीय तथा असामान्यच म्हणावी लागेल. जगाचा पोशिंदा व अर्थव्यवस्थेचा कणा असलेला शेतकरी संपावर गेला तर ? कल्पनाही करवत नाही ना ? अन्न, वस्त्र आणि निवारा या मानवी मूलभूत गरजा पूर्ण करणारा समाज घटक शेतकरी जर खरोखरच संपावर गेला तर ? साधारणपणे हा विद्यालयीन जीवनात निबंधाचा व महाविद्यालयीन जीवनात वादविवादाचा विषय असायचा नाही ? पण आता अहमदनगर, औरंगाबाद व बीड मधील शेतकरी, नगर जिल्ह्यातील पुणतांबा गावच्या शेतकऱ्यांच्या आव्हानानंतर संपावर जात आहेत. आगामी खरीप हंगामात पेरणी न करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. 
एकेकाळी उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ चाकरी समजली जात होती. मात्र आता चित्र नेमके उलटे आहे. शेतकऱ्यांची मुले शेती करायला नको म्हणत आहेत तर मुली शेतकरी दादला नको ग बाई म्हणत आहेत. शेतीची ही बदललेली स्तिथी या सर्वांना जिम्मेदार आहे. न परवडणारा हा व्यवसाय करायला अगदी सुशिक्षित तरुणही नको म्हणताहेत . एक काळ होता जेव्हा शेतकऱ्यांची मुले नोकरी सोडून शेती कसत होते. मात्र सरकारच्या व्यापारी धार्जिण्या धोरणांचा परिणाम शेती क्षेत्रावर झाला आहे हे सांगण्यासाठी कुठल्या तज्ज्ञाची आवशकता नाही. चित्र असे आहे की, आज शेतकरी व ग्राहक दोघेही परेशान आहेत आणि दलाल व व्यापारी गब्बर होत आहेत. शेतीचे बिघडलेले गणित सोडवताना शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. शेतीच्या दुरावस्थेचा अनिष्ठ प्रभाव शेतमजूर व शेतीपूरक व्यवसायांवरही झाला आहे. 
कल्पना करा जर शेतकरी संपावर गेला तर काय होईल ? बरे शेतकऱ्यांनी संपावर का जावू नये ? उत्पादमूल्य देखील निघत नसेल तर शेती करावीच का ? पण एवढे निश्चित की जर खरोखरच शेतकरी संपावर गेला तर अराजकता निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही .शेतकऱ्यांनी स्वतःपुरतेंच पिकवले तर इतरांनी खायचे काय ? शेतकरी सशक्त बनेल अशा उपायांची अंमलबजावणी वेळीच केली गेली नाही तर भाकरीसाठी भांडणे होतील. शेतकरी आता जागा झाला आहे, मरायचे नाही तर मारायचे अशा पवित्र्यात आता शेतकरी आला आहे. वरकरणी पाहता कर्जमाफी ही या आनंदोलनाची मागणी वाटत असली तरी शेती सशक्त करा हीच खरी आर्त मागणी आहे. यावर आयात निर्यात धोरणांमध्ये बदल करणे , शेतमालाला हमीभाव देणे, जलसिंचनाच्या सोयी निर्माण करणे ,सशक्त पीक विमा पर्याय उपलब्ध करून देणे , शेती सुविधा उपलब्ध करून देणे , सहज व स्वस्त पतपुरवठा उपलब्ध करून देणे, प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे, जोडधंद्याची व्यवस्था करणे, सहकारी चळवळीला मजबूत करणे हे उपाय योजावयास हवेत. 
ही चळवळ अमुक एका जातीची चळवळ नाही कारण शेतकऱ्याची कोणती एक ठराविक जात नाही तर शेतकरी हा एक वर्ग आहे. मी स्वतः शेतकरी नाही पण खरोखरच शेतकरी सशक्त करावयाचा असेल तर काही धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकरी आरक्षण, शेतकरी निवृत्तीवेतन असे पर्याय देऊन शेतकऱ्याला शेतीकडे आकर्षित केले जाण्याची नितांत आवश्यकता आहे. मित्रांनो रक्ताचे पाणी करून काळ्या आईची मशागत करणारा शेतकरी जर संपावर गेला तर तंत्रज्ञानाच्या या युगात शेती मशागत ऑनलाइन करता येणार नाही व शेतमाल डाउनलोड करता येणार नाही याची जाणीव सरकारला असावी म्हणजे झालं   ........ 

आपला: बालासाहेब सिताराम धुमाळ 
मोबाइल : ९४२१८६३७२५

Wednesday 5 April 2017

आद्यक्रांतीकारक कोण ???

आद्यक्रांतीकारक कोण ???
मित्रांनो, आजवर भारत हा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिला आहे. मात्र लेखणीचे तथाकथित जन्मजात हकदार, काही ठराविक व सोईस्कर घटनांचीच नोंद घेत आले आहेत . काही नरवीरांची व त्यांच्या आचंबित करणाऱ्या पराक्रमाची आणि कामगिरीची त्यांनी जाणीवपूर्वक दखलच घेतली नाही. १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारा व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा आद्यक्रांतिकारक नरवीर म्हणजे उमाजी नाईक.
नुकताच ३ फेब्रुवारी हा त्यांचा स्मृतिदिन झाला मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे महापुरुषांना जातीचे लेबल लावणाऱ्या या समाजात उमाजी नाईक केवळ रामोशी समाजाशिवाय कोणाच्याच लक्षात राहत नाहीत . महामानवांचा आदर त्यांनी केलेल्या कामावरून अथवा गाजवलेल्या पराक्रमावरून करण्याऐवजी त्यांना जाती धर्माच्या तराजूत मोजले जाते . पण अशाने या महामानवाचे महानपण सीमित होऊन जाते हे आपण का ध्यानात घेत नाही देव जाणो.
भटक्या विमुक्त जमातींमधील रामोशी या जमातीत लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी दिनांक ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म झाला. उमाजी नाईकांच्या कुटुंबावर पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी होती. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजी नाईक जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरा आणि करारी होते. यतांनी पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली होती . वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तीरकमठा, गोफण, तलवार, भाला, कुऱ्हाडी, इत्यादी चालवण्याची कला शिकले. या काळात भारतात इंग्रजांनी आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३ मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजी अत्याचार वाढू लागले. अशा परिस्थितीत करारी उमाजी बेभान झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धास्फूर्तीचे स्थान देत त्याने त्यांचा आदर्श घेऊन स्वतःच्या अधिपत्याखाली स्वराज्याचा पुकार करत माझ्या देशावर परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी नाईक, कृष्ण नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबारायाला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात पहिल्या बंडाची गर्जना केली.
उमाजी नाईक यांनी इंग्रज, सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार अन्याय झाल्यास तर ते भावासारखे धावून जाऊ लागले . इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमाजींना सरकारने इ.स. १८१८ मध्ये एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याकाळात ते लिहिणे वाचणे शिकले .आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या त्याच्या कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ लागली आणि इंग्रज मेटाकुटीला आले. उमाजींना पकडण्यासाठी इंग्रज अधिकाऱ्यांनी सासवड-पुरंदर च्या मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रजी सैन्य घेऊन पुरंदर जवळ त्यांच्यात आणि इंग्रज सैन्यात तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजींनी इंग्रज सैनिकांची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले. उमाजींचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असे. एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैनिक होते.
१८२४ ला उमाजींनी भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या देखभालीसाठी जनतेला वाटला होता. ३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने ठणकावून सांगितले की, आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंडे सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील. फक्त इशारा देऊन न थांबता त्याने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते .आणि काहीचे प्राण घेतले होते.
उमाजीने १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला. त्यात नमूद केले होते की, लोकांनी इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी विरोध करा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून उमाजींनी एकप्रकारे स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनते राजा बनले . या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले आणि त्यांनी उमाजींना पकडण्यासाठी युक्तीचा वापर केला. सावकार, वतनदार यांना मोठमोठी आमिषे दाखवण्यात आली उमाजींच्या सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले. त्यातच एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजीने हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी उमाजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाणही फितूर झाला. या दोघांनी उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजांनी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत त्याला ठेवण्यात आले.अशा या खोलीत उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस दररोज महिनाभर त्याची माहिती घेत होता. त्यानेच उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे. उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला आणि या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. देशासाठी फाशीवर जाणारा पहिला नरवीर उमाजी नाईक ३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी हसत हसत फासावर चढले. इतरांना दहशत बसावी म्हणून उमाजीचे प्रेत कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांनाही फाशी दिली.
आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक हे हि असेच उपेक्षित राहून गेलेल्यांपैकी एक. स्वत:च्या कार्याने एक दीपस्तंभ ठरलेले . ज्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वत:ला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?"
मित्रांनो विचार करण्यासारखी बाब आहे कि वयाच्या केवळ ४१ व्या वर्षी देशासाठी ब्रिटिशांकडून फासावर लटकावले गेलेले आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक किती विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, बहुजनांना, भटक्या विमुक्तांना व एकंदरीतच किती देशवासीयांना माहित आहेत. मी जेव्हा काही महिन्यांपूर्वी जेजुरीला गेलो तेव्हा तेथे उभा केलेला उमाजी नाईकांचा पुतळा पाहून भावुक झालो व उमाजी नाईकांबद्दल अधिक माहिती जमा करण्याच्या उद्देशाने, कुतूहलाने व काहीशा बावळटपणे एका पुजाऱ्याला विचारले, बाहेर जो पुतळा आहे तो कॊणाचा आहे ? तर नियोजनबद्ध उत्तर मिळाले, ते खंडोबाचे फार निस्सीम भक्त होते, भक्त उमाजी !!!!! जो काही थोडा फार ऐकीव इतिहास राहिला, तो लुटारू उमाजी नाईक एवढाच. निश्चित ते लुटारू होते पण ते कोणाला लुटत असत ? का लुटत असत ? त्या पैशांचे ते काय करत असत ? असा प्रश्न ना आपण कधी विचारतो, ना कोणी त्याचे कधी उत्तर देते ...
देशभक्त भटक्या विमुक्तांच्या टोळ्या इंग्रजांना लुटत असत, याच्या पाठीमागे देशभक्ती होती. शिवरायांच्या स्वराज्यात हेरगिरी करणारे भटके विमुक्त , जुलमी परकीय शासकांना या देशातून हाकलून लावत होते . म्हणजे आताच्या भाषेत ते स्वातंत्र्याचे युद्ध लढत होते. याचाच बदला म्हणून इंग्रजांनी क्रिमिनल ट्राईब्ज ॲक्ट १८७१, १९११, १९२४ नुसार या अशा जमातींना "जन्मजात गुन्हेगारी जाती" ठरवले . जन्माने कोणी गुन्हेगार कसा असेल ? पण जे सरकारच साम्राज्यवादी होते ते काहीही करू शकत होते. शिवाय इंग्रज हेही युरोपीय भटक्या जमातीचेच होते त्यामुळे भारतातील भटक्या जमातीमधील हे रानटी चपळ व शूर सैनिक येथील डोंगराळ भागात आपल्याला पुरून उरतील याची त्यांना जाणीव होती. म्हणूनच राजेंनी भटक्या विमुक्त जमातीचा स्वराज्य निर्मितीसाठी योग्य वापर करून घेतला. त्यांच्यावर विश्वास टाकला, जबाबदारी सोपवली व वतने जहागिऱ्या देऊन सम्मान हि केला.
टॉस नावाचा इंग्रज अधिकारी लिहितो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता, जर उमाजी नाईकांना फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." अनेक अभ्यासक म्हणतात कि, जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच भारत स्वतंत्र झाला असता. अशा या धाडसी उमाजी नाईकांनंतर तब्बल १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके जन्माला आले. मग आता तुम्हीच ठरवा आद्यक्रांतीकारक कोण ???

Friday 31 March 2017

शेती व शेतकरी

मित्रांनो, दोन तीन दिवसांपुर्वी बीडच्या मोंढ्यात गेलो होतो. आडतीमध्ये गेलो तर नंबर एक गव्हाची पट्टी होती १८५० रूपये प्रती क्विंटल!! आणि बाजारात ग्राहक मोजतात ३००० ते ३४०० !!! वाईट वाटले...
त्यावर आज ऐकले अहमदनगरमधील शेतक-यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे म्हणे!!! जेव्हा मी हे ऐकले तेव्हा हादरलोच.. कारण परिणामांची कल्पनाही मी करू शकत नव्हतो....
पण 'शेतकरी संप' ही अशक्य वाटणारी गोष्ट यापुर्वीच घडलेली असल्याचे वाचण्यात आले .!!!
ही घटना घडली होती अलिबाग तालुक्यातील चरी परिसरातील पंचवीस गावात. शेतकर्‍यांनी खोत आणि जमिनदारांच्या अन्यायाच्या विरोधात संघटीत होवुन खोतांची जमिन खंडानं करायचीच नाही असा निर्धार केला. २७ ऑक्टोबर १९३३ रोजी संपाला सुरूवात झाली. हा संप तब्बल सहा वर्षे चालला. धनदांडगे सावकार,त्याना सरकारचं असलेलं पाठबळ विरोधात गरीब ,असंघटीत शेतकरी अशी ही विषम लढाई होती.मात्र जिद्द आणि आत्मसन्मानासाठी लढल्या गेलेल्या या लढ्यात अंतिम विजय शेतकर्‍यांचाच झाला. विजयापर्यंत पोहोचताना शेतकर्‍यांना अतोनात हाल अपेष्टा भोगाव्या लागल्या. तथापि शेतकरी मागे हटले नाहीत. अखेर सरकारला शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. शेतकर्‍यांचा संघटीत आणि दीर्घकाळ चाललेला संप म्हणून चरीच्या संपाची नोंद जगाच्या इतिहासात घेतली गेली. आजही धनदांडगे शोषक (व्यापारी) आणि शोषित शेतकर्‍यांतील संघर्ष जराही कमी झालेला नाही. खोतांची जागा आज व्यापारी व काँर्पोरेट कंपन्यांनी घेतली आहे..ज्या प्रमाणं खोतांना सरकारचं संरक्षण होतं तसंच संरक्षण या कार्पोरेट कंपन्यांना सरकार कडून मिळताना  दिसत आहे. लढाई तेव्हाही विषम होती आणि आजही विषमच आहे. तरीही एकजूट आणि जिद्द असेल तर कोणतीही लढाई अशक्य नाही हा वस्तुपाठ चरीच्या संपानं शेतक-यांना घालून दिलेला आहे. आता लवकरात लवकर शासनाने जागे व्हावे व व्यापा-यांच्या जबड्यातुन शेतकरी व ग्राहकांची सुटका करावी.. अन्यथा जर शेतकरी संपावर गेला तर सर्वांचीच सुटका होईल.....!!
मित्रांनो, शेती हा एक 'व्यावसाय' आहे. तो 'टिकेल' याची व महत्वाचे म्हणजे 'परवडेल' याची काळजी सरकारने घ्यायची असते. मला वाटते त्यासाठी जे करायला हवे ते न करता जे केल्याने आजचे मरण उद्यावर जाईल अशी मलमपट्टी केली जाते. आणि आपणही दुर्दैवाने तशीच अपेक्षा करतो. शेतीचा मला तितकाचा अनुभव नसला तरी मी खानदानी शेतकरी आहे हे मला ओळखणारांना चांगलेच ठाऊक आहे. शिवाय अशा ज्वलंत व कळीच्या तसेच काहीशा संवेदनशील मुद्यावर बोलु शकेल एवढे ज्ञान नक्कीच बाळगुन आहे..
मित्रांनो शेतीची व शेतक-याची ही अशी नाजूक अवस्था होण्यात जरी निसर्गाचा वाटा अधिक असला तरी तो मला मान्य नाही कारण प्रतिकुल हवामान असणा-या देशांतही शेतीची व शेतक-याची स्थिती चांगली आहे. शिवाय औद्योगीकरणाच्या मागे लागलेल्या देशातही शेतीबाबत तेथील सरकारे जागरूक आहेत व परिणामी शेतकरी आनंदी आहे. बरे या अवस्थेस शेतक-याचे फसलेले नियोजन वा उधळपट्टी हे कारण सांगणारा एक गट आहे. मात्र हे लक्षात घ्यायला हवे की, यामुळे धोक्यात आलेले शेतकरी दशांशामध्येही नाहीत.
होतेय काय की, आपण माफी व पँकेज याच्या पलीकडे विचार करतच नाही आहोत. वास्तविक पाहता शेतक-याला शेती करणे सुलभ होईल यासाठी शेती मशागतीची अवजारे, बी बियाणे,  खते, किटक नाशके सहज व स्वस्तात मिळाली, वीज पाणी मुबलक मिळाले तर शेतकरी कर्ज घेताना दहादा विचार करील. मी नेहमी म्हणतो, देशात जेवढा खर्च रस्ते बांधणीवर केला जातो तेवढा खर्च जलप्रकल्प निर्मितीवर केला तर शेतीच्या प्रश्नाबरोबरच जलवाहतुकीच्या माध्यमातुन रस्त्यांचा प्रश्नही बराच मार्गी लागेल. अलिकडील काळात झालेले मार्ग आपल्याला लगेच आठवतात पण अलिकडील काळात झालेले मोठे जलसिंचन प्रकल्प व जलसाठे आठवत नाहीत. शेतमालाच्या साठवणुकीसाठी कोठारे, शितग्रुहे मोफत व सहज उपलब्ध असतील तर नासाडी टळुन नूकसान होणार नाही. बंधारे कालवे निर्माण करुन शेतक-यास आधुनिक शेती पध्दतीस प्रव्रुत केले जायला हवे. ठिबक-तुषारचा आजही अगदी अल्प प्रसार झाल्याचे चित्र आहे. पारंपारिक पिके व पिकविण्याची पध्दती याबाबतीत प्रशिक्षणे व चर्चासत्रे प्रबोधने याद्वारे शेतक-यांचे मनपरिवर्तन करण्याची नितांत आवश्यकता आहे.
हवामानाचा अंदाज वर्तवण्यात आपण आजही अचुक नाहीत. वातावरण व पर्जन्यमानाचा शास्त्रीय अभ्यास करून शेतक-यांना तयार करण्याचे काम शासनाने करावयास हवे. आपण आजही पिकांना पाणी पाट पध्दतीने देतोय आणि मराठवाड्यात ऊसाचे पिक घेतोय हे शेतक-यांचे नव्हे तर शासन नावाच्या यंत्रणेचे अपयश आहे. जिथे शेती अनुकूल वातावरण आहे तेथील शेतकरी कर्जबाजारी असणे तर सोडाच पण चारचाकीमधुन फिरतोय !!! शेती बरोबरच शेतीपुरक व्यावसाय (जोडधंदा) करण्यास मार्गदर्शन व मदत केली तर शेतकरी नक्कीच सुधारेल.
शेतमालाच्या आयात निर्यातीचे धोरण, आयात निर्यातीवरील कर आकारणी, हमीभाव, वितरण प्रणाली यावर नियोजनपुर्वक लक्ष देण्याची गरज आहे. बाजार व्यवस्था म्हणजे दलाल आडते व इतर व्यापारी यांवर सरकारचे नियंत्रण दिसत नाही. घाम गाळणारा उपाशी व मधलेच तुपाशी असतील तर शेती परवडेल तरी कशी ??? यावर शेतकरी जर निर्मिक व किरकोळ विक्रेता या दोन्ही भुमिकेत आला तर फरक पडेल पण त्याच्या अडचणी त्यालाच माहीत असतात. गम्मत म्हणजे शेतकरी विक्रेता असतो तेव्हा त्याचा माल स्वस्त व जेव्हा तो शेतीसाठी लागणा-या बाबी खरेदीसाठी ग्राहक असतो तेव्हा महाग!! यामुळे दराची माती दरालाही पुरत नाही!!!
कर्जमाफी तर आता तातडीची गरज आहेच पण यापुढे शेतकरी कर्ज घेणारच नाही व घेतलेच तर फेडू शकेल अशी सोय केली जावी. शेतकरी कर्ज परत फेडीची वा वसुलीची पद्धतही सदोषच आहे. ईएमआय तसेच शेतमाल विक्रीला आल्यावर तेथेच ठराविक टक्के रक्कम कर्ज खाती वर्ग व्हावयास हवी, जेणेकरून कर्जाचा डोंगर होणार नाही व कर्ज फेडणे सुलभ होईल. असो मला यात जायचे नाही मात्र एवढे नक्की की कर्ज हे कोणाही व्यावसायिकाला घ्यावेच लागते व घ्यायलाही हवे मात्र ज्यासाठी ज्या व्यावसायासाठी आपण ते घेतलेले असते तो व्यावसाय तोट्याचा झाला की कर्ज परतफेड जिवावर येते.
मला खात्री आहे वरील व यासारखेच अजून काही उपाय शासनाने अवलंबले तर शेतकरी कर्जच घेणार नाही.
शेतक-याला बळ देण्यासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता आहे व तीही भ्रष्टाचाराविना!!! मग इतर काही अयशस्वी व निरूपयोगी योजना बंद करुन तोच निधी शेती व शेतकरी सबलीकरणासाठी वापरला तर पाच वर्षांच्या आत पुन्हा शेतकरी जोमाने स्वतःच्या पायाने नाही धावला तर पहा. पुन्हा 'उत्तम शेती' झाल्याशिवाय राहाणार नाही....

आपला: बी. एस.धुमाळ .

Saturday 17 December 2016

गोंधळ व गोंधळी

..........................................“गोंधळ” व “गोंधळी”......................
भावांनो नमस्कार,
महाराष्ट्रातील बहुतांश कुळांचा कुळधर्म व कुळाचार म्हणजे “गोंधळ” होय. “गोंधळ” व “गोंधळी” या शब्दांचा अर्थ मराठी विश्वकोशामध्ये असा सांगितला आहे की, घरातील मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पाडल्याबददल, देवीची स्तुती व पूजा करुन, कृतज्ञतापुर्वक केलेला स्तवन विधी म्हणजे “गोंधळ” होय आणि हा विधी पार पाडण्याचे काम करणारी धार्मिक जात म्हणजे “गोंधळी” होय. शिवाय हे सांगण्याची आवश्यता नाही की, प्रखर हिंदुस्तवाचा केवळ अभिमान बाळगणारीच नव्हे तर हिंदुत्वाचा ख-या अर्थाने प्रचार व प्रसार करणारी जात म्हणजे “गोंधळी” होय.
हिंदु धर्मामध्ये ज्याप्रमाणे लग्न, मुंज, गृहपूजा, यज्ञ, अंत्यविधी, व तत्संबंधीत इतर विधी इत्यांदीची पूजा ब्राम्हण पार पाडतात त्याचप्रमाणे लग्न, मुंज, गृहपूजा, इत्यादी प्रसंगी गोंधळाचा व देवीच्या इतर पूजनाचा विधी “गोंधळी” पार पाडतात. गोंधळाचा विधी केवळ महाराष्ट्रातच होत नाही तर महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगढ, झारखंड, हरियाणा व दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये भक्तीभावे होतो. म्हणजे “गोंधळ” व “गोंधळी” हे शब्द बहुश्रुत व व्यापक आहेत. गोंधळाच्या पावित्र्याची जपणुक व गोंधळी यांना दिला जाणारा मान सन्मान तसेच केला जाणारा आदर हा पुर्वापार चालत आला आहे. जमदग्नी ऋषी व रेणूकामाता यांच्यापासून गोंधळाची उत्पत्ती झाली असे आपली वयस्क मंडळी सांगतात. रेणुकापुराण व रेणुकामहात्म्य यांतही याचा संदर्भ आढळतो. इ.स.पुर्व २५५० ते इ.स.पुर्व २३५० हा “भगवान परशुराम काळ” मानला जातो.त्रेता युगात श्री विष्णुंचे सहावे अवतार म्हणून भगवान परशुराम होवून गेले. हा काळ म्हणजे “गोंधळ” व “गोंधळी” उगमाचा काळ. आज रोजी महाराष्ट्रारात “गोंधळी” ही जात भटक्या जमाती(ब) या प्रवर्गात अ.क्र.१० वर आहे. हे सर्व लिहिण्याचा हेतू एवढाच की, “गोंधळ” व “गोंधळी” संपूर्णपणे प्राचीन, धार्मिक, भावनिक व जातीवाचक शब्द आहेत.
मात्र अलिकडच्या काळात “गोंधळ” व “गोंधळी” हे शब्द श्रध्दा व आदरपुर्वक कमी आणि तुच्छतात्मक व उपहासात्मक दृष्टीनेच अधिक वापरले जात आहेत. साहित्यीक अगदी सर्रासपणे आपल्या साहित्यामध्ये तर प्रसार माध्यमे आपल्या बात्म्या व निवेदनांमध्ये “गोंधळ” व “गोंधळी” हे शब्द नकारात्मक अर्थाने वापरत आहेत. ज्यामुळे गोंधळी समाजाची मने दुखावत आहेत. वास्तविक पहाता शिवछत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीच्या पवित्र कार्यात हिरीरीने सहभागी होवून हेरगिरी करुन स्वराज निर्माणास हातभार लावणारी गोंधळी जात राजेंची लाडकी होती. याचमुळे राजेंनी त्या काळात गोंधळी समाजाला वतने व जहागी-या दिल्या होत्या. आजही गोंधळी बांधव शिवछत्रपतींचा इतिहास शाहिरीबाण्यात गर्वाने प्रतिपादीत करतात. लोककला व लोकवाड.मयाद्वारे लोकजीवणाचे यथार्थ चित्रण मांडून लोकशिक्षण, लोकजागृती व लोकरंजन करणारी “गोंधळी” जात, उपहासाने उच्चारली जाते तेव्हा वेदना होतात. आज साधारणपणे “धिंगाणा” या अर्थाने “गोंधळ” हा शब्द तर “धिंगाणा घालणारे” या अर्थाने “गोंधळी” शब्द वापरला जात आहे. “प्रेक्षकांनी घातला गोंधळ….”, “कार्यालयात गोंधळ घालणारा भामटा पोलिसांच्या ताब्यात…”, “गोंधळी मद्यपी सी.सी.टिव्ही कँमे-यात कैद…”, “गोंधळी आमदारांचे निलंबन…”, अशा बातम्या पेपरात सतत छापून येतात.
“गोंधळ” व “गोंधळी” शब्दांचा वरील संदर्भांमध्ये लावला जात असलेला अर्थ आणि अगदी सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे मराठी शब्दकोश व विश्वकोशातील “गोंधळ” व “गोंधळी” शब्दांचा अर्थ यांचा काडीचाही सहसंबंध नसूनही असे घडत आहे हे क्लेशदायक आहे. तसे पहाता ज्या संदर्भाने “गोंधळ” हा शब्द वापरला जात आहे त्याला अनेक पर्यायी व अगदी प्रमाण शब्द आहेत. जसे की, धिंगाणा, गडबड, घोटाळा, हुल्लडबाजी, हुज्जत, चकमक, धुमाकूळ ते अगदी राडा पर्यंत… आणि अशाच प्रकारे ज्या संदर्भाने “गोंधळी” हा शब्द वापरला जात आहे त्याला देखील अनेक पर्यायी व अगदी प्रमाण शब्द आहेत. जसे की, धिंगाणाखोर, धिंगाणेबाज, हुल्लडबाज, हुज्जतखोर, राडेबाज इत्यादी. मग प्रश्न असा पडतो की, एवढे सगळे प्रमाणित व अधिकृत शब्द जे वापरायला हवेत ते न वापरता या सर्वांच्या ऐवजी “गोंधळ” व “गोंधळी” हेच शब्द जे वरील अर्थाने केवळ चुकीचे, अप्रमाणित व अनाधिकृत शब्द आहेत तेच वापरून “गोंधळी” जातीच्या धार्मिक व जातीय भावना का दुखावल्या जात आहेत ?
भारत हा लोकशाही प्रधान व घटनात्मक देश आहे. येथे कोणत्याही समाजाच्या जातीय व धार्मिक भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही. असे असून ही अगदी बिनदिक्कतपणे अशाप्रकारे “गोंधळ” व “गोंधळी” या शब्दांचा चुकीचा वापर मानसिक त्रास देणारा आहे. अशा प्रकाचा मानसिक त्रास केवळ गोंधळी समाजालाच होतोय असे नाही तर सर्व बारा बलुतेदार व अठारा अलुतेदार वर्गातील बांधवांनाही होतोय. “गोंधळी” ही जात अठरा अलुतेदारांपैकी एक जात. शिवाय “गोंधळ” हा विधी पार पाडणारे व गोंधळकला सादर करुन उपजिविका भागविणारे इतर जातीचे "व्यावसायिक गोंधळी" देखील दुखावतात. कारण बाहेर समाजात त्यांना ही गोंधळी म्हणूनच ओळखले जात आहे.
विशेष म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे “गोंधळ” व “गोंधळी” या शब्दांचा उपहासात्मक उच्चार व वापर महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा वगळता अन्यत्र कोठेही वापरताना आढळत नाही. हे आक्षेपार्ह आहे आणि आक्षेप नाही घेतला म्हणून प्रमाणित शब्द असल्याप्रमाणे राजरोसपणे या शब्दांचा वापर केला जात आहे हे आपण पहातो. ग्रामीण भागातील बोली भाषेचा भाग म्हणून, निव्व्ळ निरक्षर व्यक्तींकडून विरळपणे अशाप्रकारे चुकीचा वापर झाला तर एकवेळ दुर्लक्ष केले जावू शकते. मात्र अगदी साहित्य व प्रसार माध्यमांमधील वापर अशोभनिय आहे. हा वापर जसा अशोभनीय आहे तसाच तो धोकादायकही आहे. कारण साहित्यांतील व प्रसारमाध्यमांतील वापराने, शब्द प्रमाणित होत असतात आणि शब्दकोशात येत असतात. आणि मग पुढे त्याच शब्दांना हळुहळू लोकसंमती मिळत असते. त्यामुळे वेळीच आक्षेप नोंदविले जाणे गरजेचे असते. आजवर आक्षेप न घेण्याचे कारण असेही आहे की, एक तर आपण अल्पसंख्य व त्यातही विखूरलेले आहोत आणि दुसरे म्हणजे सध्या “गोंधळी” शब्द ज्या अर्थाने वापरला जात आहे आपण त्याच्या अगदी विरुध्दार्थी स्वभावाचे आहोत. म्हणजे, “कशाला विरोध करायचा ? कशाला नसल्याला धिंगाणा” ? असा बचावात्मक व काहीसा समंजसपणाचा विचार करणारी आपली जात.
अनुसूचित जाती व जमातीमधील बांधवांणा कोणी जातीवाचक बोलले तर त्यांना कायद्याने जाब विचारता येतो. मात्र विमुक्त जाती व भटक्या जमाती या देशव्यापी प्रवर्गातील बलुतेदार व अलुतेदार जातींना, बोली भाषेमध्ये उपहासाने व तुच्छतेनेच उच्चारले जात आहे हे नाकारता येणार नाही. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने “दलित” या शब्दाला आक्षेप घेणा-या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्याण “दलित” हा शब्द घटनाबाहय असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.
शब्द हे शस्त्र असतात, ते जपूण वापरावेत असे म्हणतात. तसेच वाक्यप्रचार व म्हणी हे भाषेचे अलंकार असतात त्यांचा योग्य ठिकाणी योग्य वापर केला म्हणजे भाषा सुशोभित होते. तर मग आज मराठी भाषेत “गोंधळ” व गोंधळी” हे शब्द नकारात्मक व उपहासात्मक अर्थाने का वापरले जात आहेत. भावांनो आज “गोंधळी” ही जात जरी पूर्णपणे विकसित व प्रगत नसली तरी अशा अशोभनिय वापराला विरोध करण्याइतपत नक्कीच सक्षम आहे. आज “गोंधळ” हे जरी आपले एकमेव उदरनिर्वाहाचे साधण नसले तरी ते आपल्या अस्मीतेचे व अस्तित्वाचे प्रतिक आहे. विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी साहित्य परिषद, मराठी भाषा परिषद, मराठी भाषा संचालनालय, पत्रकार संघ व महासंघ तसेच मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्यमंत्री, मा.मंत्रीमंडळ तसेच इतर लोकप्रतिनिधी यांना सविनय निवेदने देवून आपण सामूहिकपणे व शांततामय मार्गाने “गोंधळ” व गोंधळी” या शब्दांच्या चुकीच्या अर्थाने होत असलेल्या वापराला विरोध करावयास हवा. अलीकडेच मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या रेडिओवरील, “मन की बात” या कार्यक्रमातून “अपंग” शब्दाऐवजी “दिव्यांग” हा शब्द वापरण्याचे देशवासियांना आवाहन केलेले आहे.
यावर ही फरक नाही पडला तर आपल्या घटनात्मक हक्कासाठी आपण मा. उच्च न्यायालयाचे दारही ठोठावू शकतो. यासाठी मुंबई शहर व उपनगर, नागपूर व औरंगाबाद या भागातील कार्यकर्त्यानी जरा मनावर घ्यावयास हवे. न्यायालयीन लढाईने नक्कीच “गोंधळ” व गोंधळी” या शब्दांच्या उपहासात्मक व थट्टात्मक वापरावर निर्बंध येतील याबाबत माझ्या मनात किंचित ही संदेह नाही. त्यासाठी आवश्यक पुरावे ही उपलब्ध आहेत.
भावांनो मागितल्याशिवाय तर आई देखील दुध पाजत नाही. एका पवित्र "विधी" चा होत असलेला अवमान व एका प्राचीण "जाती" ची होत असलेली अवहेलना अन्यायकारक आहे. अन्यायाविरूद्ध विद्रोह केल्याशिवाय तो दूरही होणार नाही आणि अन्यायाविरोधात विद्रोह करणे ही तर महाराष्ट्राची परंपरांच आहे.
…….. बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो. ९६७३९४५०९२ (WhatsApp Only)
ई-मेल. bsayush7@gmail.com

Thursday 27 October 2016

दुरितांचे तिमिर जावो...

दुरितांचे तिमिर जावो…

मित्रांनो नमस्कार,
“मी अविवेकाची काजळी , फेडूनी विवेकदीप उजळी l
तैं योगियां पाहे दिवाळी, निरंतर ll”
ज्ञानियांचे राजे,  ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायात चोपन्नाव्या ओवी मध्ये दिवाळीचे असे वर्णन केले आहे. ज्याचा अर्थ, अविवेकाचा अंधार दूर करुन विवेकाचा दिवा पाहण्यासाठी योगी व्हावे लागेल असा, ढोबळपणे सांगता येईल.  
 सुरुवातीलाच मी हे ही स्पष्ट करु ईच्छितो की, मी लेखक वा विचारवंत नाही. मात्र अभ्यासक नक्कीच आहे. शिवाय "व्यक्त होण्याचे जे मुक्त स्वातंत्रय" सामाजिक प्रसार माध्यमामुळे प्राप्त झाले आहे त्याचा वापर करुन मी माझे दिवाळीविषयक विचार आपणापर्यंत पोहचवत आहे एवढेच. एरवी माझी शैक्षणिक व बौध्दिक पातळी फार उच्च नाही हे ही नम्रपणे सांगु इच्छितो.  कारण माझा जन्म आर्थिक बौध्दिक व सामाजिकदृष्टया अत्यंत दीन कुटूंबात झाला आहे.दिवाळी हा तसा दिवाळे काढणारा सण ! मात्र माझा सर्वात आवडता सण. अगदी लहानपणापासून ! ग्रामिण शेतकरी कुटूंबातील माझे बालपण मला चांगले आठवते. वसुबारसेला गोठयात आई आण्णा व मी, गुरांची पुजा करायचो, अत्यंत साधेपणे पण मनोभावे ! आरती करताना आम्ही म्हणायचो, “ दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाईचा चारा, बैल मारा, बैलाचे बाशींग, किकरे ताशींग … वगैरे वगैरे पुढचे आठवत नाही. माहित याचा अर्थ काय ? किंवा हे शब्द अर्थपुर्ण ही आहेत की, नाहीत ! पण ही प्रथा होती, जी आम्ही अत्यंत मनोभावे व पवित्र अंतकरणाने पुर्ण करायचो. दिवाळी आली की, माझे आई-वडील “जुन्या बाजारातील नवे कपडे” आणायचे, मेंहदी, हळद, बेसन, दूध व तेल मिश्रीत उटणे लावून अभ्यंगस्नान, खोबरेल तेलात अत्तर मिसळून तयार केलेले सुगंधी तेल केसात माळून, सकाळच्या थंडीत कुडकुडत्या हाताने तोटयाला (फटाक्याला) अगरबत्तीने पेटवताना वाटणारी भिती व होणारा आनंद खरंच मला शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यानंतर वर्षभर कधी नव्हे तो सकाळी सकाळी गोडधोड नाष्टा करुन घराबाहेर पडायचो. नदीतील खडक, डोंगरावरील दगड यावर खाकी तोटयातील दारु काढून ती यांवर ठेवायचो व त्यावर छोटा दगड ठेवून त्यावर मोठया दगडाने मारायचो. हेतू एकच एका तोटयाचे पाच-सहा तोटे व्हावेत. अगदी दिवसभर हेच चालायचे दुपारनंतर संध्याकाळची प्रतिक्षा तीव्र व्हायची. दिवस मावळता घरांवर व दारात दिवे लावयाचे, फटाके वाजवायचे, आपले संपले की, लोकांचे पाहत राहायचे !! त्या त्या दिवशीची धार्मिक व पारंपारिक पूजा करायची व उद्याच्या प्रतिक्षेत झोपी जायचे, हा दिवाळीतील दिनक्रम. ही आमची बालपणीची दिवाळी!! दिवाळीपुर्वी एक महिन्यापासूनची प्रतिक्षा व दिवाळीनंतरची एक महिन्याची हूरहूर आजही स्पष्ट आठवते.
 पण मित्रांनो आज काय पाहतो आपण ? दिवाळी या सणाचे सांस्कृतिक महत्व व श्रध्दा लोप पावत चालली आहे. पैश्याची राख रांगोळी होत आहे व विदेशी कंपन्या आणि व्यवसायिकांची चांदी होत आहे. वास्तविक दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्व सणांचा राजा, हा दिव्यांचा सण, इष्टाच्या अनिष्टावरील विजयाचे प्रतिक, गुरे ढोरे तुळसीसह पर्यावरणाप्रति कृतज्ञतेचे प्रतिक, धनाला धन्यवाद देण्याचा व त्याला नमन करण्याचा सण तसेच कौटूंबिक जिव्हाळा प्रेम,आपुलकी, व आपलेपणा जपण्याचा सण. पण आज ती सात्वीकता श्रध्दा उपासणा व आपलेपणा सहसा दिसत नाही. आज दिवाळी ध्वनी व वायू प्रदूषणाचे कारण व स्वसंपत्तीचे प्रदर्शन करण्याचे माध्यम जेव्हा होत आहे तेव्हा वाईट वाटते. हा वास्तविक पाहता दिपोत्सव आहे. सडा सारवण त्यावर रांगोळींची सजावट व पानेफुले यांची हारे व तोरणे करुन दिव्यांची आरास मांडून श्रध्दापुर्वक पूजा आर्च्या करुन कौटूंबिक व सामाजिक सौहार्द जपण्याचा सण जेव्हा प्रदर्षणाचे व प्रदुषणाचे माध्यम बनतो तेव्हा दु:ख होते.
 मात्र हे वर्णन सार्वत्रिक, सार्वभौम व सामान्य नाही. आजही अनेक ग्रामीण व शहरी कुटूंबात हा सण अत्यंत मनोभावे व श्रध्दापुर्वक साजरा करत असताना आपण पाहतो. तेव्हा दिवाळी साजरी करत असताना ऐवढेच वाटते की, दिवाळीच्या नावाखाली मोठमोठे कर्णकर्कश फटाके, धूर सोडणारी शोभेची दारु व सजावटीवरील अवास्तव खर्च टाळून साधेपणाने आपलेपणाने व श्रध्देने साजरी केलेली दिवाळी वर्षभर स्मरणात राहील.
 मित्रांनो “दिवाळी हा श्रीमंतांचा सण” ही दिवाळीची ओळख मिटून जे उपेक्षित दीन, दुबळे, गरीब,व अपंग लोक या सणाचा आनंद घेऊ शकत नाहीत तसेच देश संरक्षणार्थ सीमेवर लढणारे जवान इतर जिवनावश्यक सेवा देणारे बांधव आपापल्या कर्तव्यावर असल्यामुळे या सणाचा आनंद घेवू शकत नाहीत त्यांना धन्यवाद व शुभेच्छा.
 ही दिवाळी सर्वांची नवी स्वप्ने, नव्या आशाआकांक्षा पुर्ण करणारी, सर्वांत नवा जोश नवा उत्साह भरुन सर्वांच्या  व्यक्तीमत्वाला  नवे वलय प्राप्त करुन देणारी व यशाची क्षितीजे गाठणारी ठरो हीच आई जगदंबेस प्रार्थना. वर उल्लेख केल्याप्रमाणे दिवाळी हा दिव्यांचा अर्थात प्रकाशाचा सण, सर्वांच्या जिवणातील दु:ख द्रारिद्रय , चिंता, भय, काळजी, अनारोग्य, अपयश, गर्व, अहंकार इत्यांदीचा अंधार दूर होवून सर्वांच्या जीवणात यश व आनंदाचा प्रकाश घेवुन येवो हीच अपेक्षा व प्रार्थना, जी ज्ञानेशांनी आपल्या पसायदानात व्यक्त केली आहे…

"दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सुर्यें पाहो l
जो जे वांच्छिल तो ते लाहो, प्राणिजात ll"
दिवाळीच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा…

आपला,
बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. - 9096877345

Wednesday 12 October 2016

दसरा...

----------------------------- दसरा-----------------------
धनसंपदा आराम नेई, काम वासना आजार देई
कष्ट मेहनतीत शांती लई, निजल्या सरशी निद्रा येई.
मौज मजा अन उधळण सारी, आनंद देती क्षणाचा
सवय बनती नकळत, अन चैन हिरावी मनाचा.

गर्व अहंकार करतोस कसला, काय हाई तुझं?
सोबतीला जन्मापासुन, आणलं व्हतंस का हे ओझं?
माझं माझं कबाड ओझं, फिकुन दी रं सारं
पैस्याआडक्यातलं सुख म्हणजी, गाठोड्यातलं वारं.

समाधान धनात नाही, नाही ते मानात
फुलं पक्षी गवत वेली, सुखात डोलत्यात रानात.
धरता यायना बांधता यायना, मागं फिराय लावतय
सुख तर गड्या मनात असतय, अन मनातच ते मावतय.

मानलं तर गड्या पानही, असतय बरका सोनं
शीरीमंती म्हणजी जवळचं, जवळच्यांना देणं ...
मोठी धनानं बरीच असत्यात,  मनाने मातर छोटी
पैश्यामागं धावुन मिळते, ती पत आसतीय खोटी....

राजंही रंक झाली, अन रंकही झाली राजं
संपत्ती तर मध्यान छाया, नको मी अन माझं.
उगला दिस मावळणारंच, अमर काहीच नाही
चांगुलपण अन विचार थोर, तेवढ मागं राही..

फास त्याचा आवळणारंच, नकु करू तु अति
ख-याचा तर विजय पक्का, खोटं खातं माती.
सांगं दसरा वैर विसरा, सांगती नऊराती
जपुन ठेवरं नाती यड्या, जपुन ठेव नाती..

मोह माया अन उसनी काया, करवुन घेती पापं
सोनं वाटुन सोनं व्हणं, किती रं गड्या सोपं.
घडा भरता पापाचा, फेडावं इथच लागतंय
शरीर पैकं गाडी सारं, सोडावं इथच लागतंय.

फुकाचे तुप अन हरामची पोळी, पोटी कुटकुट करते
श्रमाची चटणी अन घामाची भाकर, आयुष्भर ना सरते.
जमा करता करता, वाल्ह्या व्हवुन जाशील
देता देता कर्णाचा, अंश सवतात पाहशील.

सोनं नाणं यायना कामी, सोडवीत नाही कुणी
चार माणसं पिरमाची, धावत येतील रणी.
सिमा वलंड पैश्याची, अन वलंड सिमा जातीची
कानावरची झापडं सारून, आईक हाक नऊरातीची.

दानधरम कर, कर तु सेवा दिन दुभळ्यांची
नाव कमव अन जिकुन दाखीव, मनं इथल्या सगळ्यांची.
वाया नाही जाणार पुण्य, नग पडु नरकात
देवालाबी आवडशील मग, अन जागा मिळल सरगात.

--- बालासाहेब सिताराम धुमाळ.
मो. ९०९६८७७३४५

Saturday 17 September 2016

उसे इन्सान कहते है Kishor Bhonde

उसे इन्सान कहते है.....

मित्रांनो नमस्कार🙏🏻
मी भिमाशंकर शासकीय वसाहत, येरवडा, पुणे-६ येथे राहतो. जुन २०१३ मध्ये जेव्हा मी येथे नविन रहायला आलो तेव्हा मी आणि माझे काम येवढेच करायचो..
हळुहळू ओळख करून घेऊ लागलो . वेगवेगळ्या शासकिय विभागात वेगवेगळ्या पदावर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हातील वेगवेगळ्या जाती-धर्माचे साधारणपणे शंभर कुटूंब आमच्या वसाहतीत वास्तव्यास आहेत. पण एके दिवशी एक व्यक्ती माझ्याच वयाचा माझी आपलेपणाने चौकशी करू लागला, ओळख झाली , विचार जुळले , लगेच मैत्रीही झाली!!  त्याचे नाव आहे किशोर रामचंद्र भोंडे , मुळगाव  सासवड ,आता पर्यंत आमची सोसायटी , यापुढे नागपुरचाळ, येरवडा, पुणे.
तर मग पुढे पुढे असं लक्षात आलं की हे माझे मित्र प्रत्येकाच्या प्रत्येक सुख दुःखात सर्वांच्या पुढे असतात!! अगदी निस्वार्थपणे !!! आता तुम्ही म्हणाल हा मित्र परिचय आम्हाला का देताय? तर त्याचं कारण असं की हे किशोर भोंडे ज्यांना मी प्रेमाने किशोरदा म्हणतो, त्यांच्या मातोश्री नियत सेवामानाने सेवा निव्रत झाल्याने आमची सोसायटी सोडून जाताहेत या महीन्याच्या अखेरीस!! आणि त्यामुळे आमचे प्रचंड नुकसान होणार आहे .
किशोरदा असे व्यक्ती आहेत ज्यांनी आमची सोसायटी एकजीव केली आहे. आमची ही सोसायटी अगदी खेडे आहे , अतिशय एकजीव,  एकात्म!! आणि ती तशी आहे केवळ किशोरदांमुळे !!
२४x७ कोणाच्याही मदतीला धावुन जाणारे, सोसायटीत गणेशोत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती पुढाकार घेवुन, वर्गणी जमा करून, प्रसंगी स्वतः खर्च करून त्यांनी साजरी केली. केवळ साजरीच नाही केली तर विविध आदर्श सामाजिक उपक्रमही राबवले. प्रत्येक बाब कमी खर्चात रुबाबदार कशी होईल? सर्वांचा सहभाव कसा असेल? यासाठी ते सर्वस्व देत. सर्वांना एकत्र धरून कसं ठेवावं ते शिकावं किशोरदांकडून!! अगदी छोट्याछोट्या बाबी जसे वसाहतीतील रहीवास्यांचे वाढदिवस, आजारी रूग्णांना भेटणे, सोसायटीचे माजी रहीवाशांशी प्रेमपुर्ण संबंध ठेवणे, अशा बाबी ते नविसरता करतात. अत्यंत सामान्य राहणी व असामान्य विचारसरणी व तशाच करणीचे किशोरदा, भावी नगरसेवक म्हणुनच बाहेर ओळखले जातात पण त्यांनी जे आमच्यासाठी केलं ते कोणताही राजकीय स्वार्थ ठेवुन नाही केलं कारण आम्ही त्यांच्या वार्डातही नाही आहोत!!! आज रोजी आमच्या सोसायटीत असे एकही कुटूंब नाही ज्यांना किशोरदा आपले कुटूंब सदस्य वाटत नाहीत.. चेह-यावर कायम हास्य असणारे , मोठ्यांचा आदर कर्ते , लहानांचे मित्र, पैशाने गरीब पण मनाने धनाड्य असे किशोरदा...
सुदैवाने त्यांच्या सौभाग्यवतीही तशाच!! अत्यंत मनमिळावु, सुसंस्कारीत, खानदानी, मराठमोळ्या, शहरी झगमगाटापासुन जाणिवपुर्वक दुर असणा-या.
किशोरदांच्या मैत्रिचा परिघ एवढा विस्तीर्ण आहे की दररोज किमान पाच दहा जण घरी येतात. त्यांच्याशी आपलेपणाने वागणा-या, आस्थेवाईकपणे चौकशी करणा-या आमच्या वहीणी, घरी आलेल्याला ग्लासभर पाणी व कपभर चहा घेतल्याशिवाय पाठवत नाहीत!!
त्यांची दोन्ही अपत्ये विराज व सई, व्वा खुपच गोड, समोरच्याचे मन कधी जिंकुण घेतात ते त्यालाही कळत नाही .. ही तिघेही अगदी तंतोतंतपणे किशोरदांचे अनुकरण करतात..
एक रात्र जुन २०१४ ची, अचानक खुप पाऊस झाला व सोसायटीत काही इमारतीतील तळघरांत पाणी शिरले तेव्हा किशोरदा रात्रभर आपल्या मित्रांसह इतरांच्या घरातील पाणी उपसत होते हे कधीही विसरता येणार नाही. नेते इतरांना काम सांगतात मात्र हे आमचे नेते स्वतः काम करतात तेही कुठलाही मोठेपणा, मानसन्मान, गर्व न बाळगता. हेतु एकच, सर्वांना एकत्र आणणे. गरजुंना आधार देणे!! आणि तेव्हा मग त्यांचे मित्र व पाहणारेही बेभान होवुन कामाला लागतात!!
जात धर्म भाषा प्रदेश गरीब श्रीमंत असा कोणताही भेद न करता किशोरदा मदतीला धावुन येतात.. ते आमच्या पासुन अंतराने दुर जरी गेले तरी आमची मैत्री संपणार नाही, पण नाही म्हटले तरी थोडे अंतर येईलच...
मात्र आम्ही त्यांना कधीही विसरू शकत नाहीत कारण माणुस परक्यांना विसरतो, आपले तर आपल्या काळजात असतात , अगदी कायमचे!! धन्यवाद देवुन परके आम्ही त्यांना करणार नाही..
असो , यालाच जीवन ऐसे नाव ...
किशोरदांना आठवलं की एक गीत हमखास ओठावर येईल,,
"किसीके काम जो आए,  उसे इन्सान कहते है | "
" पराया दर्द अपनाए , उसे इन्सान कहते है |"
आई जगदंबेला प्रार्थना, त्यांना निरोगी उदंड आयुष्य दे बस ......
कारण बाकी ते सर्व मिळवु शकतात, तसा त्यांचा स्वभाव आहे. लाथ न मारता पाणी काढतात ते आमचे मित्र किशोरदा !! "आपल्या हक्काचा माणुस!!" म्हणुनच तर त्यांचा २०१७ पुणे महानगरपालिका निवडणूकीचा प्रचार त्यांचे मित्र स्वखर्चाने आतापासुनच करत आहेत...


--------- बाळासाहेब सिताराम धुमाळ.

Sunday 14 August 2016

ऐ मेरे वतन के लोगों

ऐ मेरे वतन के लोगों.......
मित्रांनो प्रत्येक भारतीयाच्या मनामनात घर करून असलेल्या,
"ऐ मेरे वतन के लोगों" या स्फुर्ती गीता विषयी खुप छान माहीती वाचनात आली आणि ऊर तर भरून आलाच विश्वास करा, डोळहीे पाणावले ...
ऐ मेरे वतन के लोगो हे गीत कवी प्रदीप यांनी इ.स. १९६३ साली भारत-चीन युद्धानंतर, या युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली म्हणून हिंदी भाषेत लिहिलेले एक देशभक्तीपर गीत आहे. हे गीत प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविते. भारत-चीन युद्धानंतर खचलेल्या भारतीयांचे मनोबल उंचावण्याचे काम या गीताने केले होते. या गीताला सी. रामचंद्र यांचे संगीत असून लता मंगेशकर यांचा आवाज आहे.
हे गाणे जेव्हा कवी प्रदीप यांना सुचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथलेच एक सिगारेटचे रिकामे पाकीट उचलून उलगडले आणि त्याच्या पाठकोऱ्या भागावर त्यांनी हे गाणे लिहिले. गीत लिहिल्याच्या दिवसापासून काही आठवड्यानंतर निर्माते मेहबूब खान यांनी रामलीला मैदानावर होणाऱ्या एका कार्यक्रमाच्या उद्‌घाटनासाठी एक गीत लिहावे अशी विनंती कवी प्रदीप यांना केल्यानंतर प्रदीपांनी माहीमच्या फुटपाथवर लिहिलेले हे गीतच संगीतकार सी रामचंद्र आणि गायिका लता मंगेशकर यांना दाखविले.
ऐ मेरे वतन के लोगो हे गीत सर्वप्रथम दिल्लीतील रामलीला मैदानावर दिनांक २७ जानेवारी, इ.स. १९६३ रोजी झालेल्या एका कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायिले. या कार्यक्रमाला भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, व सर्व केंद्रीय मंत्री हजर होते. शिवाय चित्रपटसृष्टीतील दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार आणि गायक मोहम्मद रफी हेही उपस्थित होते. ज्या कवी प्रदीप यांनी हे गीत लिहिले होते त्यांना मात्र या कार्यक्रमाला आमंत्रित केले गेले नव्हते. लता दिदीच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडित नेहरूंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.
कवी प्रदीप यांनी ऐ मेरे वतन के लोगो या गीताबद्दल मिळणाऱ्या आपल्या बिदागीचा अर्धा हिस्सा युद्धातील विधवांच्या संस्थेला देण्यासाठी एच.एम.व्ही. या गीतमुद्रण कंपनीशी करार केला होता.कंपनीने करार पाळला नाही, आणि शेवटी प्रदीप यांच्या कन्येने दीर्घकाल कायदेशीर लढाई लढून तो हिस्सा युद्धविधवांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मिळवून दिला. २५ ऑगस्ट २००५ रोजी एच.एम.व्ही कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्या संस्थेला दहा लाख रुपये दिले. ते ऐ मेरे वतन के लोगों.....

ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का, लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर, वीरों ने है प्राण गंवाए
कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो
जो लौट के घर न आए, जो लौट के घर न आए...

ऐ मेरे वतन के लोगो, ज़रा आंख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुरबानी
ऐ मेरे वतन के लोगों ज़रा आंख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुरबानी
तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी
जो शहीद हुए हैं, उनकी, जरा याद करो कुरबानी...

जब घायल हुआ हिमालय, ख़तरे में पड़ी आज़ादी
जब तक थी सांस लड़े वो... जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी
संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी
जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुरबानी...

जब देश में थी दीवाली, वो खेल रहे थे होली
जब हम बैठे थे घरों में... जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी
जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुरबानी...

कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा,
कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी
सरहद पर मरनेवाला... सरहद पर मरनेवाला, हर वीर था भारतवासी
जो खून गिरा पर्वत पर, वो खून था हिंदुस्तानी
जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुरबानी...

थी खून से लथ - पथ काया, फिर भी बंदूक उठाके
दस - दस को एक ने मारा, फिर गिर गए होश गंवा के
जब अंत समय आया तो.... जब अंत-समय आया तो, कह गए के अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारो... खुश रहना देश के प्यारो
अब हम तो सफ़र करते हैं।.. अब हम तो सफ़र करते हैं

क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी
जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुरबानी
तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी
जो शहीद हुए हैं, उनकी जरा याद करो कुरबानी
जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना... जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना..
जय हिंद, जय हिंद जय हिंद, जय हिंद जय हिंद, जय हिंद...

संकलन व लेखन बी.एस.धुमाळ.

Thursday 23 June 2016

संगीत

संगीत ….
            ईश्वराने निर्मिलेले हे विश्व संगीताने सजलेले व धजलेले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मानवी जीवणात जन्मापासून मुत्यूपर्यंत संगीत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बारकाईने पाहिले तर निसर्गातील सर्व घटक  मग ते सजिव असोत वा निर्जीव असोत, सर्वात संगीत व्याप्त आहे. खळखळणारे झरे, मंद वा सोसाटयाचा वारा, सळसळणारी पाने, गडगडणारे ढग, कडाडणारी वीज, पक्ष्यांचा चिवचिवाट, भुग्यांची भुणभुण, रातकिडयांची किरकिर, डोलणारे पीक, प्राण्यांचे आवाज व पावसाचे पडणारे टपटप थेंब या सर्वांमध्ये संगीत व्याप्त आहे. नवजात बालकाचे रडणे व मृत्युशय्येवरील व्यक्तीचे कन्हणने, स्त्रीचे इश्श्य व पुरूषाच्या ओठातील शीळ यामध्येही संगीत व्याप्त आहे.
            मानवी जीवणामध्ये संगीताला अनन्य साधारण असे महत्व आहे. जादूई कंठ व जादूई बोटे लाभलेल्या माणसांनी  इतर माणसांच्या जीवणात भरलेला रंग म्हणजे संगीत अशी मी संगीताची व्याख्या करतो. थकून भागुन आलेल्या शरीराला व मनाला उल्हासीत करण्याचे काम संगीत करते. कहते है, संगीत है शक्ती ईश्वर की, हर सुर में बसे है राम | रागी जो गाये रागिणी, रोगी को मिले आराम | Music is the tone picture of Sociaty म्हणजे संगीत हे समाजाचे ध्वनीरुप चित्रण आहे. असे म्हटले जाते की,जर एखाद्या व्यक्तीच्या मनाचा व विचारांचा ठाव घ्यायचा असेल तर त्याच्या आवडत्या गीतांचा व संगीताचा अभ्यास करावा. असेही म्हणतात की, संगीत हे सुर व ताल या अमुर्त घटकांचा मुर्त अविष्कार असते. संगीताला भाषा नसते. As Human emotions are universal so the Music is also universal. संगीताला समजून घ्यायला डोके अथवा भाषेची गरज नसते. –हदयाने संगीताचा प्रत्येक नाद समजतो. मानवी जीवणात संगीत दु:खाची तीव्रता कमी करुन दु:खी मनाला आनंदाची झालर घालते म्हणून कलेचा आदर केला पाहिजे नव्हे केला जातो. स्वाभाविकच ही कला सादर करणा-या कलावंताचे स्थानही तितकेच महत्वपूर्ण असते. कलाकाराला स्वनिर्मिती व प्रयोग यांना महत्व दयावे लागते. तो आजन्म शिकत असतो. त्याला आजन्म सरावाची गरज असते.
            कलावंताने हे ध्यानात घ्यायला हवे कला ही अमर असते व अर्थातच तिच्यामुळे कलावंतही अमर होत असतो.  कोण मोठा व कोण छोटा यात न जाता आपल्या कलेवर लक्ष केंद्रित केले तर कलेची व कलावंताची प्रगती होत असते.
            संगीतामुळे जर पशुमधील पशुत्व नष्ट होत असेल तर मग मनुष्यातील अल्पस्वल्प पशुत्व तर निश्चितच नष्ट होईल. संगीत, गाणे किंवा ऐकणे आणि त्याचा आनंद घेणे या वेगळया गोष्टी आहेत. मनोरंजन हा जरी संगीताचा प्रधान हेतू असेल तरी सामाजिक जाणिवांचा उत्कर्ष करुन मानवी भावबंध निर्माण व्हायला देखील संगीतामुळे मदत होत असते. संगीतामध्ये सर्व जीवसृष्टीला चैतन्यमय करण्याचे सामर्थ्य आहे. जीवण संगीताची मैफल आहे व भैरवी गातागाता जीवणाची थोरवी समजते असे जे म्हणतात ते उगीच नाही. त्यामुळे संगीताचा आनंद घेवून जीवन संगीतमय होते यात शंका नाही.
लेखन :- बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ

मो.नं.- 9096877345

Tuesday 21 June 2016

गोंधळी जणगणना by Balasaheb Dhumal

गोंधळी जणगणना!!!!!!

नमस्कार मित्रांनो......
कोणत्याही जातीचा अभ्यास करण्यासाठी त्या जातीची लोकसंख्या किती आहे? हे माहीत पाहीजे. मात्र दुर्दैवाने आपल्या जातीची नेमकी लोकसंख्या किती आहे हे आपल्याला आतापर्यंत शोधता आलेले नाही. त्यासाठी गरज असते लोकसंख्या जनगणनेची अर्थात सर्वेक्षणाची. आपला समाज देशाच्या काणाकोप-यात महानगरांत, शहरांत आणि खेड्यापाड्यात वाड्यावस्त्यात विखुरलेला आहे. त्यांच्यापर्यंत कोणतीच यंत्रणा पोहचणे अगदी अशक्य आहे. तेवढे मनुष्यबळ आणायचे कोठून? तेवढा वेळ कोणाकडे आहे व त्यासाठी लागणारा खर्च कोठून आणायचा? शासन कोण्या एका जातीची लोकसंख्या का मोजेल? या विचारातुनच एक सोपा मार्ग हाती आला. . .
मोबाईल जवळजवळ सर्वांकडे आहे. निदान कुटूंबात एकाकडे तरी आहे. नसेलच तर निदान गावात एकाकडे तरी नक्कीच आहे. याचा व तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आपण आता आपली संख्या मोजुया.
ठरविले तर एका आठवड्यात आपल्याला आपली लोकसंख्या मोजता येईल! !
त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि समोर येणारा फार्म भरा अगदी घरी बसल्या बसल्या! ! हा फार्म सर्वांना वाचता यावा म्हणून मराठीत दिला आहे, तो तुम्ही कोणत्याही भाषेत भरू शकता. तर मग आता उशीर करू नका. आपला व आपल्या घरच्या तसेच संपर्कातील सर्वांचा फाॅर्म भरा व गोंधळी ताकद दाखवून द्या.
मित्रांनो, आपल्या लक्षात येऊ द्या की "गोंधळी जणगणना" हे काम जर व्यवस्थित झाले तर गोंधळी जातीची लोकसंख्या तर कळेलच पण सोबतच देशाच्या कोणत्या वार्डात/गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात व कोणत्या राज्यात किती लोक आहेत आपले? त्यांची नावे काय आहेत? त्यांची शैक्षणिक व आर्थिक स्थिती कशी आहे? अविवाहित, विवाहीत, घटस्फोटित, परित्यक्त लोक किती आहेत? ते कोणकोणते व्यवसाय करतात? स्त्रिया किती? पुरूष किती? तरूण किती?  अहो एवढेच काय समान नावाचे, आडनावाचे लोक किती हे ही आपणास कळणार आहे! !! शिवाय या आकडेवारीचा उपयोग शासनाकडे मागण्या करणे व त्यांचा पाठपुरावा करणे यासाठी होत असतो. लोकसंख्येच्या आकड्याशिवाय शासन मागण्या पुर्ण करत नाही. अर्थात हे सर्व मी करणार आहे असा आपला गैर समज होऊ देऊ नका. मी केवळ एक विद्यार्थी आहे जो जातीचा अभ्यास करतो आहे असे समजा. पण इष्ट कारणासाठी मागतील त्यांना वैयक्तिक नाही पण संख्यातरी किमान, उपल्बध होईल.
तेव्हा उठा खडबडून जागे व्हा, कोणालाच सोडू नका. अगदी त्याच्याशी तुमचे पटत नसेल तरी!! आपण प्रतिसाद चांगला देत आहात अवघ्या चार तासात 200 लोकांनी नोंदणी केली आहे! ! पण हा आकडा अगदी नगण्य, माझ्या अभ्यासाप्रमाणे आपण देशभर अनेक लाखात आहोत!! पण विभक्त व दुरवर असल्याने माहीती नाही. मात्र आता जग बदलले आहे. माहीती तंत्रज्ञानाच्या मदतीने ते जवळ आले आहे. आपली नोंद हा फार्म भरून आपला समाज बांधव अगदी विदेशातुनही करू शकणार आहे.
त्यामुळे माझी आपणास हात जोडून विनंती आहे, कृपया हा अर्ज भरा व आपल्या अस्तित्वाचा पुरावा द्या.
कसे असते मित्रांनो, मानवी स्वभाव असा आहे की, तो स्वतःच्या अधोगतीपेक्षा दुस-याच्या प्रगतीने दुखावतो!!! अनेकांना असे वाटत असेल की नक्की याचा यात काहीतरी स्वार्थ असेल! ! पण भावांनो आणि बहीणींनो मी आपणास शपथेवर सांगतो की मी सामान्य माणूस आहे. राजकारण किंवा बाकी काही माझ्या कल्पनेतही नसते. उपाशीपोटी दिवस काढत होतोत एकेकाळी, आज आई जगदंबेच्या कृपेने पोटाला पोटभर तेही सन्मानाने भेटत असताना कृघ्न आचरणाची काय आवश्यकता?
हे माझ्या मनालाही शिवत नाही, अगदी बालपणापासुन. हं स्वार्थ एवढाच की कुठतरी कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं बस. जातीच्या अभ्यासात आपला काहीतरी हातभार लागावा. . .
पण केवळ माला जिज्ञासा शमन किंवा अभ्यासच नाही तर आपल्या विविध संघटनांना, समाजसेवकांना, सेवाभावी संस्थांना, अभ्यासकांना, साहित्यिकांना, वक्त्यांना, विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
शासन दरबारी ही आकडेवारी सादर करता येईल. त्यामुळे मी विनंती करतो खासकरून तरूणांना व विविध संघटनांच्या पदाधिका-यांना की अगदी  पोलीओ लस पाजतात तशी किंवा पिग्मी एजंट वसुली करतात तशी  (कृपया शब्दावर जाऊ नका, भावना समजून घ्या ) प्रत्यकाची जातीने जात  नोंदणी करा. यासाठी खर्च काहीच नाही. आहेत थोडेसे कष्ट पण जातीसाठी माती तर खावीच लागते ना? ?
सर्वचजण संगणक किंवा मोबाईल साक्षर नसतात त्यामुळे कृपया त्यांना मदत करा.
जास्तीत जास्त लोकांना लिंक शेअर करा. माझी विनंती देखील आधिकाधिक लोकांपर्यत पोहचवा.

आपला:
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9096877345 9673945092 (WhatsApp)

Link 👇👇👇

https://docs.google.com/forms/d/10bKHkVs_USD34fZfPRTFfOBE8GobZaCVw86Ket_LONk/viewform

Tuesday 14 June 2016

नाक नाही नथीला... गंधज्ञान sense of smell

नाक नाही नथीला.....


माणसाला पंचज्ञानेंद्रिये आहेत अर्थात पाच सेंस आॅर्गंस. पाच सेंस - दृष्टी, गंध, चव, श्रवण आणि स्पर्श.  सहावा काॅमन सेंस! आणि ज्याला तो नसेल तो????? हं , नाॅनसेंस...
त्यापैकी एक नाक. ..
ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अत्यंत जूनी म्हण आहे, 'नाक नाही नथीला अन भोक पाड भितीला'. म्हणीचा अर्थ सर्वांनाच माहीत आहे. या शिवायही अनेक म्हणी व वाक्यप्रचारात नाकाने आपला ठसा उमटविला आहे! नाक हे केवळ नथीसाठीच असत नाही. असे असते तर पुरूषांना नाकच नसते! ! आता नाक नसण्याचा अर्थ काढत बसु नका...
नाक, एक ठसठशित अवयव, त्याला कधी अत्यंत सन्मानाने तर कधी अत्यंत उपहासाने पाहीले जाते. नाक,  ज्याच्यावरून व्यक्तीचे सौंदर्य, चारित्र्य  व प्रतिष्ठा ठरवली जाते तो मानवी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. मानवी शरीराचे नाक आहे नाक!! या नाकाचा उपयोग मुलतः श्वासाद्वारे आॅक्सीजन घेण्यासाठी व उच्छवासाद्वारे कार्बन डाय आॅक्साईड  सोडून देण्यासाठी होतो. याशिवाय त्याचा उपयोग होतो तो गंध ज्ञानासाठी. Human being can detect atleast one trillion distinct scents. म्हणजे मनुष्य प्राणी किमान एक ट्रिलियन प्रकारचे गंध ओळखु शकतो. आता ट्रिलियन म्हणजे एकावर बारा शुन्ये!!! म्हणजे किती ते तुम्हीच तपासा...
आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत आपल्या या गंधज्ञान क्षमतेची व नाकाची!! मानवी गंधपेशींचे दर 30 ते 60 दिवसांनी नुतनीकरण होते. आपण भिती व निराशा देखील गंध करू शकतो! गंधज्ञान हे सर्वात पहीले ज्ञान आपण घेतो. माणसाचे नाक शरिराच्या तापमानाचे संतुलन राखते. थंडीत व उष्णतेत नाक ओले होते. गंधक्षमता पुरूषांपेक्षा स्त्रीयांची अधिक तिक्ष्ण असते!! वासावरून नवरोबाने लावलेले दिवे बायको क्षणात ओळखते. मग ते मद्यपान असो वा केवळ पान असो! एवढेच नाही तर तुम्ही कोठे गेला होता हे ही ती ओळखते!!! (कृपया चांगल्या अर्थानेच वाचा)
मात्र गंधक्षमता वा गंधज्ञान केवळ माणसालाच असते असे म्हटले तर तुम्ही मला वेढ्यात काढून माझ्या बुद्धीची लांबी, रुंदी व खोली ओळखून पुढे हा लेख वाचणारही नाहीत एवढा माझा तुमच्यावर विश्वास आहे. . . . !!
याला म्हणतात विश्वास! !
मित्रांनो गंधज्ञानाची व एकंदरीत ज्ञानेंद्रियांची ही दुनिया फारच निराळी आहे. . . .
मानव व इतर प्राणी ज्ञानेंद्रियांद्वारे जगाचे ज्ञान अनुभवतात. एखादे ठराविक ज्ञानेंद्रिय एखाद्या ठराविक प्राण्यात अधिकच तिक्ष्ण असते. उदाहरणार्थ घार किंवा गिधाडासारख्या पक्षाची दृष्टी अत्यंत तिक्ष्ण असते. हे पक्षी जवळपास तीन किलोमीटर अंतरावरील उंदीर अथवा सस्यासारखे प्राणी टिपू शकतात! म्हणजे हे असे आहे की आपण इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून मुंगी पाहू शकतो!!!
वटवाघळे श्रवणात अत्यंत तिक्ष्ण असतात. लहानात लहान आवाज जो आपल्याला ऐकूही येत नाही तो ते ऐकतात व अति तिवृतेचा आवाज जो आपल्या कानांना सहनही होत नाही तोही ते ऐकू शकतात! सापासारखे प्राणी आपल्या जिभेचा वापर केवळ चविसाठी नाही करत तर ते जिभेने गंध घेऊन अन्न व शिकारी सोबतच शत्रुचेही स्थानही समजून घेतात! ते आपल्या प्रियकराला वा प्रेयसीला मिलनेच्छा गंधाने कळवतात व समजतात! ! हत्ती आपली सोंड हात म्हणून तर वापरतोच मात्र वास्तविक पाहता ते त्याचे नाक असते जे अत्यंत तिक्ष्ण असते. पृथ्वीवरील सर्वात लांब नाकाचा प्राणी असे त्याला म्हटले तर त्यात काही गैर नाही!!
मुंगीसारखा छोटा जीव गंध ज्ञानाद्वारे अन्नासोबतच आपले सहकारी मित्र शोधते व अगदी सैनिकी शिस्तीत चालणे, अन्न गोळा करणे व बांधकाम करणे अशी कामे करते. निरंतर उद्योगी मुंगी मिलेटरी शिस्तीत एकसंघपणे व कौशल्याने आपले काम करते!!
आपल्याला टाळ्या वाजवायला लावणारा किटक? ?? हं, डास. . त्याचे गंधज्ञान अत्यंत अप्रतिम आहे. कितीही अत्तर, डिओड्रंट व परफ्युमचा वापर केला तरी त्याला चकवा देता येत नाही उलट तोच आपल्याला चकवा देतो! !
या सर्व स्पर्धेत या सर्वांना मागे टाकतो तो कुत्रा.. कुत्र्याची गंध क्षमता माणसाच्या 44 पट अधिक आहे! ! तो त्याच्या हद्दीत आलेला कुत्रा त्याच्या मुत्राच्या गंधाने ओळखतो!! त्याच्या याच विलक्षण क्षमतेचा उपयोग आपण माणसे आपल्या फायद्यासाठी प्राचीन काळापासून घेत आलेले आहोत. निसर्गाची रचना आपल्या कल्पनेपलीकडील आहे. वरवर पाहता सारखेच वाटणारे झेब्रे, सारखे नसतात! ! प्रत्येक झेब्र्याच्या शरिरावरील पट्टे भिन्न भिन्न असतात! जसे आपल्या अंगठ्याचे ठसे भिन्न भिन्न असतात! आपले जसे ठसे भिन्न असतात तसेच शरिराचे वासही भिन्न असतात! कोणत्याच एका माणसाच्या शरिराचा गंध हा दुस-या माणसाच्या शरिराच्या गंधासारखा नसतो! कुत्रा एवढा अवलिया प्राणी आहे की तो गंधावरून भावना ओळखतो!! अर्थात आपला मुड कसा आहे? हेतू काय आहे? घाबरलेला माणुस, धिट माणुस, जिवंत माणुस व मृत माणुस तो गंधावरून ओळखतो! म्हणूनच गुन्हे अन्वेषणात संबंधीत यंत्रणा त्याचा खुबीने वापर करून घेतात. अपघातात मदत व बचाव पथके, जखमी व मृत अपघात गस्तांना शोधून काढण्यात कुत्र्याची अर्थात श्वानपथकाची मदत घेतात. आता तर संशोधक कुत्र्याला प्रशिक्षण देवून मानवी शरिरातील कर्करोगाच्या पेशी शोधण्यात त्याची मदत घेणार आहेत म्हणे! ! बर्फाळ प्रदेशात बर्फाखाली गाडले गेलेले मृतदेह शोधण्यात कुत्र्याची मदत होते ती त्याच्या गंध क्षमतेमुळेच!!
बरे हे झाले मानवासह इतर प्राणीमात्रांचे गंधज्ञान. . मात्र निसर्गाची अदभूत किमया एवढ्यावरच संपत नाही, वनस्पतींना देखील गंधज्ञान आहे! ! नाक नाही तरी! !! पिकणारी फळे गंधाद्वारे इतर फळांना पिकण्याचा संदेश देतात!  पाने जर आपल्यावर आळ्यांनी हल्ला केला तर इतर पानांना गंधाद्वारे धोक्याची सुचना देतात!  मग इतर पाने आपल्यातील ठरावीक रसायने स्त्राव स्वरूपात बाहेर सोडतात!! अमरवेल नावाची परजीवी वनस्पती आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. मृतदेहाचे अथवा इतर जिवंत वनस्पतीचे देहाचे शोषण करून जगणे हे तीचे वैशिष्ट्ये. कारण ती परजीवी अर्थात स्वतःचे अन्न स्वतः तयार न करू शकणारी वनस्पती आहे. तिच्या पानांमध्ये हरितद्रव्य (क्लोरोफिल) नसते. ही वनस्पती आपल्या आसपास पिकलेल्या टमाट्यांचा गंध ओळखून त्यांच्याकडे आकर्षित होते! !
आहे की नाही निसर्गाची किमया अदभूत आणि अविश्वसनीय? ? शेवटी एवढेच की नाक केवळ आपल्यालाच आहे असे नाही आणि ते केवळ नथीसाठीच आहे असेही नाही. . . . . .


लेखन :
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9096877345 / 9673945092

Thursday 9 June 2016

विरह

विरह....

पती-पत्नीचे नाते अत्यंत विलक्षण व जगावेगळे. ...
दोन वेगवेगळ्या घरात व कुळात जन्माला आलेले दोन जीव लग्नानंतर मात्र एकात्म होतात! !!
त्यातही स्त्रीचे जीवन म्हणजे एक तपश्‍चर्याच म्हणावी लागेल! ! स्वतंत्र नावाने वेगळ्या घरी वेगळ्या वातावरणात आयुष्याची साधारणपणे 18-25 वर्षे घालवलेली मुलगी लग्नानंतर मात्र स्वतःमध्ये एवढे बदल करून घेते की ती त्या पुरूषाची अर्धांगिनी कधी बनते? त्या कुटूंबरूपी गाडीचे दुसरे चाक कधी होते? हे लक्षातही येत नाही. ती सासरशी व पतीशी एवढी समरस होते, तेही हसतमुखाने मनापासून !! ती त्या कुटूंबामध्ये एवढी गुंतून घेते, की ती स्वतःलाही विसरून जाते. नाव बदलते आवडीनिवडी बदलते व पतीसाठी, कुटूंबासाठी स्वतःला अगदी पुर्णपणे वाहून घेते. जगाच्या पाठीवर हे चित्र केवळ भारतातच पहावयास मिळते. . .
जन्म एका घरात अन मृत्यू दुसर्‍या घरात! !!  विलक्षण आणि अदभुतच आहे ना? ??  तीची घराला अशी काही सवय लागते, की ती म्हणजेच घर व घर म्हणजेच ती!! ती जर घरात नसेल तर घर, घर रहात नाही. . आणि मग पतीची पत्नी विरहाने होणारी अवस्था? ?? भुक लागते पण घास गळ्याखाली उतरत नाही! झोप असते डोळ्यात पण पापण्या परस्परांना खेटत नाहीत!  डोके असते पण चालत नाही! मन असते पण लागत नाही !!! मन भुतकाळातील आठवणीत व डोळे वाटेकडे गुंतलेले असतात. विरहाच्या  वेदना मी व्यक्त करण्याऐवजी संदिप खरेंनी कशा व्यक्त केल्या आहेत पहा ना. ..

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो
हि धरा दिशाहीन होते, अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी, हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा, तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणार्‍या, मज स्मरती लाघव वेळा
श्वासांविण हृदय अडावे, मी तसाच अगतिक होतो

तू सांग सखे मज काय ,मी सांगू या घरदारा
समईचा जीव उदास, माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते, तुजवाचून जन्मच अडतो
.......

आई नंतर स्त्रीच्या पत्नी रूपाचे कौतुक करावे तेवढे कमीच. ....

शब्दांकन: बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9421863725 / 9673945092

रेणुका....

रेणुका:::::::::

ईक्ष्वाकू वंशात रेणू या नावाचा महापराक्रमी राजा होऊन गेला. भागीरथीच्या काठी कान्यकुब्ज शहरी राहून तो कारभार पाहात असे. पुत्रप्राप्तीसाठी त्याने शंकराची भक्ती केली. तेव्हा प्रसन्न होऊन शंकरांनी त्याला एक सर्वगुणसंपन्न अशी मुलगी व नंतर एक मुलगा होईल असा वर दिला. मग राजाने अत्री, वसिष्ठ इ. ऋषींना बोलावून यज्ञ आरंभला. पूर्णाहुती झाल्यावर यज्ञातून एक सर्वांगसुंदर कन्या निघाली. रेणू राजाने तिचे नाव रेणुका असे ठेवले. ही रेणुका म्हणजे पार्वती व कश्‍यप पत्नी अदिती या दोघींचा अवतार होय. याची कथा अशी
एकदा दैत्यांच्या त्रासाला कंटाळून सर्व देव विष्णूकडे गेले. त्यांनी विष्णूला पूर्वी त्यांनी हिरण्याक्षाचे वेळी घेतलेला वराहावतार, हिरण्यकश्‍यपूच्या वेळचा नृसिंहावतार व बळीच्या वेळचा वामनावतार यांची आठवण करून देऊन पुन्हा अवतार घेण्यासाठी विनंती केली. प्रसन्न होऊन विष्णू म्हणाले, "या वेळी अदितीचे उदरी मी पूर्णरूपाने अवतार घेणार आहे, तेव्हा तिने ते तेज सहन करण्याची तयारी करावी." हा निरोप घेऊन देव अदितीकडे गेले व त्यांनी आपापले तेज अदितीच्या गर्भासाठी दिले; पण ते पुरेसे नाही असे समजून तिने पार्वतीची तपश्‍चर्या सुरू केली. पार्वती प्रसन्न झाल्यावर अदिती म्हणाली, "विष्णू माझ्या उदरी अवतार घेणार आहेत, त्यांचे तेज सहन करण्यासाठी तू माझ्या शरीरात वास कर." पार्वती याला तयार झाली; पण शंकरांनी तिचे पती कश्‍यप यांच्या शरीरात वास करावा याची तजवीज करण्यास सांगितले. मग अदितीने शंकरांना प्रसन्न करून घेऊन वर मागितला, की आपण व कश्‍यप एकरूप होऊन माझा स्वीकार करावा. अशाप्रकारे शंकर व कश्‍यप तसेच पार्वती व अदिती एकरूप झाले. रेणू राजाच्या यज्ञातून बाहेर आलेली मुलगी म्हणजे अदिती व कश्‍यप यांची मुलगी जी पार्वती व अदिती या दोघींचा अवतार होय.
भागीरथीच्या तीरी कान्यकुब्जनगरीत रेणू राजाच्या यज्ञातून रेणुकेने जन्म घेतला . भृगुऋषींचा मुलगा च्यवन याचा मुलगा ऋचिक ऋषी गोदावरीच्या काठी राहत होता. त्याने सोमवंशी राजाची कन्या सत्यवती हिच्याशी विवाह केला. पुढे सत्यवतीच्या पोटी शंकर व कश्‍यप एकरूप होऊन जन्माला आले. ऋचिक ऋषीने त्या मुलाचे नाव जमदग्नी ठेवले. एकदा ऋचिक ऋषींच्या आश्रमात अनेक ऋषी आले व त्यांनी काशीयात्रेला जाण्याचा विचार केला. त्याप्रमाणे ते सर्व जण जमदग्नीला घेऊन यात्रेला निघाले. कान्यकुब्जनगरीचा राजा रेणू याने आपल्या मुलीचे स्वयंवर मांडले आहे असे कळल्यावर ते ऋषी समारंभ पाहण्यासाठी मंडपात गेले. अनेक देशांचे राजे, राजपुत्र रेणुकेच्या प्राप्तीसाठी आले होते. रेणुकेने त्या सर्वांसमोरूनच जाऊन केवळ समारंभ पाहण्यासाठी आलेल्या जगदग्नीच्या गळ्यात माळ घातली. हे पाहून सर्व राजांना संताप आला व त्यांनी रेणुकेला पळवून नेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्यांनी सैन्य एकत्र करून रेणू राजाशी युद्ध पुकारले. त्या मोठ्या सैन्याबरोबर लढून आपल्याला विजय कसा मिळणार, अशी रेणू राजाला चिंता वाटू लागली. तेव्हा जमदग्नीने आपले क्षात्रतेज प्रकट केले. त्याने आपल्या विलक्षण युद्धकौशल्याने सर्व राजांना पळवून लावले.
मग रेणू राजाने जमदग्नी व रेणुकेचा थाटामाटात विवाह करून दिला. त्याने जमदग्नीला घोडे, हत्ती, रथ, शहरे, रत्नभांडार इ. देऊन कन्यादान केले व भागीरथीच्या काठी राहण्याची विनंती केली. या समयी इंद्राने जमदग्नीला कामधेनू व कल्पतरू दिला. जमदग्नी रेणुकेसह भागीरथीच्या काठी राहू लागला.
पुढे रेणुकेच्या पोटी भगवंतांनी परशुरामाच्या रूपात अवतार घेतला.

टिप : मित्रांनो हे विचार माझे नाहीत व ना ही शब्द माझे आहेत. मी केवळ कागदावरील मॅटर टाईप करून आपल्या सेवेत सादर केले आहे.

संकलन व लेखन:
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9421863725 /9673945092

Tuesday 7 June 2016

सायबर विश्व. .....

सायबर विश्व...

एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीपासुनच प्रसार व प्रचार माध्यमांना (प्रिंट व इलेक्ट्रॉनिक) मागे टाकत सोशल मिडिया हा नवा माध्यम प्रकार समोर आला आहे. श्रीमंत युरोपियन देशांमधुन सुरू झालेला याचा वापर पाहता पाहता जगभरातील सर्वच श्रीमंत देशांसह गरीब देशांमधुनही मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आहे. आज रोजी जगात असा एकही देश नसेल बहुदा,  जेथे सोशल मिडियाचा प्रभाव पडला नाही. भारतात तर महानगरे, शहरे, खेडे ते अगदी वाड्या, वस्त्या, तांडे व पाड्यांपर्यंत याने मजल मारली आहे. समाजातील सर्व स्तरातील, सर्व वयोगटातील स्री-पुरूष, मुलं-मुली व्हाॅट्सअॅप, फेसबुकशिवाय बोलत नाहीत. हे माहीत नसणारे लोक शोधावे लागतील, सापडणार नाहीत असे नाही मात्र फार मोजकेच! !! त्याचे कारणही तसेच आहे, एकाच वेळी हजारो लोकांच्या संपर्कात राहणे यामुळे अगदी सहज शक्य होत आहे. शिवाय डेटा हस्तांतरणासाठीही याचा वापर होतो. कमी वेळात जास्त अंतरावर तात्काळ एखादी फाईल पाठवणे सोयीचे झाले आहे.
बदलत्या काळानुसार काळासोबत राहणे कधीही स्वागतार्हच म्हणावे लागेल. हायटेक व टेक्निकली अपडेटेड असणे प्रगत समाजाचे लक्षण असते. सोशल मिडिया सोबतच सोशल नेटवर्किंगही आपले पाळेमुळे मजबूत करत आहे. सोशल मिडियाचा वापर टेक्स्ट, ऑडिओज, व्हीडीओज, इमेजेस इत्यादी शेअर करण्यासाठी तसेच लाईव्ह चॅटिंग साठीही केला जात आहे. ज्यामुळे आपण जणूकाही खिशात जग टाकून फिरत आहोत असे वाटते. हा वापर म्हणजे या मिडियाचा चांगला वापर म्हणता येईल पण याच मिडियाचा वापर काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे चुकीच्या पद्धतीनेही करत आहेत. ज्यामध्ये फसवेगीरी करणे, अफवा पसरवणे, भावना भडकवणे,खोटा प्रचार करणे लैंगिक छळवणूक करणे (Sexual Harassment ) इत्यादीसाठीही केला जात आहे.
काही मानसिकदृष्ट्या विक्षिप्त लोक, स्वतःचे सुख पाशवी पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न करतात. देव जाणो पण यांना महीला मुलींना काहीतरी अश्लील ऐकवून वा दाखवून काय राक्षसी आनंद मिळतो किंवा काय मोठेपणा मिळतो कळत नाही. सोशल गृपमध्ये ब-याचदा एकाच कुटुंबातील सर्व सदस्य असतात. बरे,  यातुन संबंधित काहीतरी अश्लील टाकणा-यांची बदनामी होत नाही का?  त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत नाही का? याची त्यांना एक तर कल्पना नसावी अथवा मग फिकीर नसावी.
बहुतेक वेळा हा प्रकार सोशल मीडियाची भाषा इंग्रजीचे कमी ज्ञान असल्याने तसेच तांत्रिक बाबींची तितकीशी माहीती नसल्यामुळे अनावधानानेही होतो. मात्र यावर उपाय देखील शोधायला हवेतच ना? मी अशा प्रकारांत  आतापर्यंत अनेकांशी बोललो तेव्हा त्यांचे असे म्हणणे आले की, यातले मला काही कळत नाही, मी हे केलेच नाही, हे शक्यच नाही, कसे झाले समजत नाही. ब-याचदा खाते हॅकही केले जाते !! हे जरी खरे असले तरी सायबर जगात जेथे व्यवहार युजर आयडी व पासवर्ड शिवाय होत नसतात तेथे हे मी केले नाही असे म्हणता येत नाही. बोटे जरी आपली नसली तरी खाते आपले असल्याने तो व्यवहार देखील आपण केलेला आहे असे समजले जाते. समजत नसेल तर एटीएम व्यवहार लक्षात घ्या. असे असतानाही काही लोक याबाबतीत पराकोटीचे बिनधास्त व गाफील असल्याचेही निदर्शनास आले आहे. आपला कोणताही युजर आयडी व पासवर्ड (फेसबुक, नेटबॅकींग, इमेल व इतर अनेक ) अत्यंत गोपनीय ठेवायला हवा. ती काही पब्लिक करण्याची अथवा शेअर करण्याची गोष्ट नाही. शिवाय आपला मोबाईल तोही इंटरनेट कनेक्टेवीटी असलेला !! एखाद्या मिसाईल प्रमाणे हायली लोडेड असतो  असे म्हटले तर नवल वाटायला नको. कारण त्याचाही तितकाच घातक वापर केला जाऊ शकतो व आपण अडचणीत येऊ शकतो.
फेसबुक बाबतीत गोपनीयता व सुरक्षितता  (Privacy & Setting) वर लक्ष असायला हवे. ते setting वेळोवेळी update करायला हवे. सोशल नेटवर्किंग व मिडिया बाबत आपण संक्रमणावस्थेत आहोत. आणखी आपले ज्ञान अपुरे व अपरिपक्व आहे, तसा तांत्रिक बाबतीत कोणीही कधीही परिपूर्ण असु शकत नाही. कारण या जगात दररोज बदल होत असतात. नवे नवे softwares वापरायचे कसे हे लक्षात येत नाही. साधारणपणे असे दिसते की एखाद्या गृपचा प्रमुख अर्थात Admin  हा Technically हुशार असतो , तेव्हा तो गृप सुरक्षित ठेवणे, त्यासाठी आवश्यक Settings करणे, प्रसंगी कठोर कारवाई करणे हे त्याचे कर्तव्य असते. उदा. Post verification & approval.
यामुळे होते काय की post तो स्वतः तपासुन पहातो व योग्य असेल तरच Display करतो. आणि मग एखादी पोस्ट जी अनुचित आहे, मग ती जाणुनबुजून टाकलेली असो अथवा अनावधानाने आलेली असो, ती पब्लिक होत नाही व नाहक मानसिक त्रास गृपला व सेंडर यांना होत नाही. प्रसंगी अशा मोकार सदस्यांना Remove करायला हवे आणि असे होत नसेल तर मग आपणच तशा गृप्सना leave करायला हवे.
आणि एवढे करूनही पुरेसे नाही झाले तर सायबर सुरक्षा आणि सोशल मिडिया दुरूपयोग संदर्भात भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने कठोर कायदेशीर तरतूदी केल्या आहेत. वरीलप्रमाणे कृत्ये करणारांची तक्रार पोलिसांकडे करायला हवी. अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी तज्ञांचा समावेश असलेला स्वतंत्र विभाग  (Cyber crime cell ) आहे. यासाठी स्वतंत्र कायदे ठआहेत. आणि आता तर असेही ऐकायला मिळत आहे की लवकरच अशा प्रकारच्या केसेसची सुनावणी स्वतंत्र cyber courts मध्ये होणार आहे. त्यामुळे मित्रांनो सजग रहा, सुरक्षित रहा. . . . . .

शब्दांकन : बालासाहेब सिताराम  (बी.एस.) धुमाळ
मो. 9421863725 / 9673945092

Saturday 4 June 2016

पर्यावरण संरक्षण by Balasaheb Dhumal

पर्यावरण संरक्षण......
नमस्कार मित्रांनो, आज 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिवस. आजच्या मानवाने म्हणजे आपण स्वार्थापायी पर्यावरणाचा नाश करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र आपल्या हे लक्षात येत नाहीये की आपण पर्यावरणाचा नाश म्हणजे पर्यायाने आपलाच विनाश करून घेत आहोत. पर्यावरण रक्षण ही जबाबदारी आता सर्वांवरच येवून ठेपली आहे. त्यातही मला वाटते या बाबतीत तरूणांना अधिक गंभीर होण्याची गरज आहे.
बदलत्या काळात पर्यावरणतील वाढत चाललेला कार्बन डॉयऑक्साईड सध्या सर्वांचीच डोकेदुखी बनला आहे. जगभरात जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे. यामागील हेतू हा की बदलत चाललेले हवामान आणि वातावरणातील कार्बनचे वाढते प्रमाण याविषयीची जाणिव आपल्याला व्हावी.
जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धती साजरा केला जात आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणार्‍या क्लोरे-फ्लुरो कार्बन (सी. एफ. सी.)
वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे.
तलाव धरणे सरोवरे व समुद्र यांचे संरक्षण करून तेथील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देणे गरजेचे आहे. नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्‍या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु, यात शंका नाही.
पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरापासूनच सुरू करायला हवे. जसे की पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्‍या वस्तू ज्यात पेपर, काचेच्या वस्तू, धातुच्या वस्तु, प्लॅस्टिक व फायबरच्या वस्तु,  मोटर ऑईल अशांची पनुर्निर्मिती करायला हवी. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करायला हवे . शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करणे, प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्‍या कागदी पिशव्या वापरणे, अन्न आणि भाजीपाला प्लॅ‍स्टीकमध्ये न ठेवता सुती कपड्यात ठेवणे, पाण्याचा गैरवापर करणे थांबवणे,  गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवणे, कमी विजेची उपकरणे वापरणे, घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करणे, इत्यादिंसारखे उपाय अवलंबावयास हवेत. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जावून, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्‍या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संवर्धन करणे, पाणी अडविणे व जिरविणे , पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पुनर्भरण करणे, कमी पाण्याची पिके घेणे इत्यादी प्रातिनिधिक उपक्रम हाती घेऊन तसे लोकमत तयार करून श्रमदानाचा वापर पर्यावरण रक्षणासाठी करून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही.मानव निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्‍या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू करू शकू.
आपण तात्पुरताउपाय शोधायचा प्रयत्न करतो, त्यामुळे समस्या सुटत नाहीत उलट निर्माण होतात.
वि. स. खांडेकर म्हणतात, 'कुठलीही मानवी समस्या कधीही कायमची सुटू नये हा जीवनाचा अलिखित नियमच आहे. आजच्या समस्या आपल्याला सुटल्यासारख्या वाटतात पण त्या सुटतात उद्याच्या नविन समस्यांना जन्म देऊन. ...
त्यामुळे ही सुंदर वसुंधरा जी आपल्याला आपल्या पुर्वजांनी दिली आहे तीचा उपभोग घेताना तिला ओकसाभोक्षी ओरबाडून चालणार नाही कारण आपल्याला ती आपल्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करायची आहे. आपण हीचे मालक नसुन केवळ केअर टेकर आहोत. ...


शब्दांकन : बालासाहेब सिताराम  (बी. एस.) धुमाळ.
मो. 9421863725/9673945092

तेंव्हा पैसा खुजा वाटतो....

तेव्हा पैसा खुजा वाटतो….

मित्रांनो नुकतेच माझे चुलत सासरेबुवा श्रीमान गणपतराव पांडूरंग जाधव वय साधारणपणे 65 वर्षे राहणार पारगांव मोटे ता.वाशी जि. उस्मानाबाद हे
–हदय विकाराच्या तीव्र झटक्याने अचानक व तडकाफडकी  या जगाला सोडून गेले. वर चुलत सासरेबुवा   असा जो शब्द वापरला आहे तो केवळ सख्या सासरेबुवांना, त्यांच्या नातेवाईकांना अथवा  त्यांच्या मित्र परिवाराला वाईट वाटू नये म्हणून. एरवी मी कोणतेही नाते चुलत, मावस, आते, मामे किंवा सावत्र वगैरे मानत नाही. माझे चुलत सासरे गणपत मामा हे अत्यंत गरीब, हातावर पोट असणारे, पाच मुलींचे व एका अयशस्वी मुलाचे वडील, अयशस्वी म्हणायला मला ही दु:ख होत आहे पण सत्य हे सत्यच असते ना ? आज गणपतमामा या जगात  नाहीत याचे श्रेय जर त्यांच्या मुलाला दिले तर अतिशोक्ती ठरणार नाही!! अर्थात एवढया एकाच कारणाने त्यांना –हदय विकाराचा झटका आला नाही. पाच पैकी दोन मुली अल्प वयात अकस्मात ईश्वराला प्रिय झाल्या, सख्या भावाला त्याच्या दोन मुलींच्या लग्नाच्या अगोदरच्या दिवशी देवाने बोलावले व प्रामुख्याने गरीबी या संकटांचा सामना करता करता त्यांच्या कोमल -हदयाचा कुठपर्यंत निभाव लागणार होता? वर उल्लेख  केलेप्रमाणे गणपतमामा हे माझे जरी 'चुलत' सासरे होते तरी त्यांनी मला कधी ही चुलत जावाई अशी वागणूक दिली नाही. मी माझ्या 11 वर्षाच्या जावाई कालावधीत कधीही त्यांच्या घरुन टॉवेल टोपी शिवाय, बायको साडी चोळी शिवाय व माझी दोन अपत्य पाप्यांशिवाय आली नाहीत. जशी असेल तशी धशी व चोळी बांगडी ती ही मनपुर्वक व प्रेमपूर्वक ते मला करत. हे सांगण्यामागचे प्रयोजन माझा मोठेपणा सांगणे हा आहे असे वाटत असेल कोणाला तर माझे दुर्दैव पण त्यांचा मोठेपणा सांगणे हे माझे कर्तव्य नव्हे तर माझे सौभाग्य समजतो आणि तो सांगितला नाही तर तो त्यांच्यावर अन्याय व माझी कृतघ्नता होईल. ते केवळ माझ्यासाठीच चांगले निश्चित नव्हते. कारण चांगली माणसे ही सर्वांसाठीच चांगली असतात. ज्यांना त्यांच्या चांगुलपणाचा प्रत्यय आला ते त्यांची प्रतिक्रिया निश्चित देताहेत किंवा देतील. पण केवळ दुधाचा चहा पाहुण्यांना मिळावा म्हणुन भर उन्हात गावभर दुध शोधणारे माझे चुलत सासरेबुवा गणपतमामा मला दिसतात. पण माझ्या डोळयातील पाणी हे लिहित असताना मी आपणास दाखवू शकत नाही व आपण ते पाहू शकत नाहीत.
       दगडा मातीच्या घरात राहणा-या गणपतमामांचे माझ्यावरीलच नव्हे तर सर्वांवरीलच असणारे प्रेम दाखण्यासाठीच हा शब्द प्रपंच नाही तर खटाटोप आहे तो प्रत्यय सांगण्याचा जो मला ते गेल्यानंतर आला…
       ते गेले, सर्वांनाच जायचे आहे. कुणीही या पृथ्वीवर कायम स्वरुपी वास्तव्याचे परमिट घेवून जन्मास आलेला नाही. मृत्यु जे एक अटळ व शाश्वत सत्य आहे. जीवणरुपी प्रवासाचे ते एक शेवटचे स्थानक आहे. ते कोणीही नाकारु शकत नाही. उलटपक्षी मी असे म्हणेण की, गणणतमामांना खुप चांगला मृत्यु आला. धन्यवाद म्हटले पाहिजे त्या देवाला ज्याने –हदयविकारासारखा आजार बनविला. झटपट रामराम, ना शरीराची झिज, ना प्रतिक्षा मृत्युची! मला ही यावा तर असाच मृत्यु यावा, अगदी तडकाफडकी! पण मी पुराण वाड.यातुन असे वाचुन आहे की, असा तडकाफडकी मृत्यु केवळ पुण्यात्मांनाच येतो आणि म्हणूनच या पुण्यात्माच्या अंत्यविधीस अगदी मध्यरात्री देखील शेकडो किलो मीटरचा प्रवास करुन शेकडो मैलांवरून मिळेल ते वाहन मिळवून शेकडो लोक हजर झाले. ही त्यांची कमाई होती. मरणा दारी की तोरणा दारी, म्हणजे माणसाची आपली माणसे अथवा त्याची प्रतिष्ठा तपासायची असेल तर सु:खद वा दु:खद क्षणीच तपासावी, पण मी म्हणेल की, ती केवळ मरणादारीच तपासावी. कारण सुखाचे सोबती तर सगळेच असतात, दु:खात सर्वजण सोडून जातात. पण गणपतमामाला कोणीही सोडले नाहीत. बुध्दीजीवी, श्रीमंत, उच्च शिक्षित, गोरगरीब असे सर्व जाती धर्मातील स्त्री- पुरुष अबाल वृध्द मोठया संख्येने जमा झाले. शेवटचा आधार (खांदा देणे) साठी नंबर लावू लागले. अनेकांना खांदा दयायला प्रतिक्षा करावी लागली. मी काही बोलू शकलो नाही पण माझे डोळे बोलत होते, त्यांना आठवून साश्रू श्रध्दांजली अर्पण करत होते. माझ्या सोबत अनेकजणांची स्थिती हीच होती. मृत देहाच्या दहनाचा अंतिम विधी अटोपून अनेकजण स्वगृही गेले, अनेकजण खेडयातील रस्त्यांवर नाली शेजारी उघडयावर झोपले. झोप होती डोळयात पण ती आली नाही मला. केवळ हाच विचार येत होता मनात की, मी एक शासकीय नोकरदार, चारचाकी मध्ये फिरतो, क्विचीतच ए.सी. शिवाय! लोक म्हणतात मी एक श्रीमंत व्यक्ती आहे अर्थात मी मानत नाही पण मी निश्चितच गरीब नाही पैसाने. पण गणपतमामा, हे अत्यंत गरीब होते ना ? एवढे लोक का आले अंत्यविधीला ? का हळहळत आहेत सर्वजण ? उत्तर एकच की ते आर्थिकदृष्टया दरिद्री होते पण मनाने व विचाराने अत्यंत धनाढय होते आणि गरीब असूनही  श्रीमंता पेक्षाही श्रीमंत होते. त्यांच्यावर प्रेम करणा-यांमध्ये केवळ पाहूणे आणि नातेवाईकच नव्हे तर इतर जाती धर्माचे लोक ही होते. या सर्वांशी त्यांचे अत्यंत प्रेमपूर्ण संबंध होते. ते एक अजात शत्रू होते (त्यांचे कोणीही शत्रु नव्हते.) मग प्रश्न हा पडतो की, मनुष्य प्राणी आजन्म आपल्या नावासमोरील संपत्तीच्या आकडयासमोरील शुन्य वाढविण्यासाठी धडपड करतो त्यासाठी न्याय नितीला पायदळी तुडवतो तरीही श्रीमंत होत नाही. तो स्वत:ला श्रीमंत समजतो हा भाग निराळा पण मग अशी गणपतमामांसारखी आर्थिक दृष्टया दरिद्री माणसे कशी काय श्रीमंत बनतात ? बरे, विशेष न शिकलेल्या लोकांना आपण आडाणी समजतो आणि तेच लोक ज्ञानाचे धडे देवून जातात! मग खरे श्रीमंत कोण? ते का आपण ? खरे ज्ञानी कोण? ते का आपण ?  तर निश्चित तेच कारण श्रीमंती मनाची असो की, धनाची ती एक भौतिक नव्हे तर भावनिक व मानसिक स्थिती आहे. गणपतमामांना अखेरचा निरोप देवून जेव्हा त्यांच्या गत वास्तवाच्या ठिकाणी अर्थात त्यांच्या घरी परत आलो तेव्हा हे कळून चुकलो अशी माणसेच खरी माणसे असतात व माणूस म्हणून जगून आपला ठसा सोडून जातात. आपण मात्र व्यावसायिक म्हणून येतो व शुन्यांची भर पाडण्याच्या प्रयत्नात दरिद्री म्हणून मरतो.
       जेव्हा हातोहात अंत्यविधीची तयारी होते, जेव्हा शेकडो लोक शेकडो मैलावरुन अर्ध्या रात्री ग्रामीण भागात येतात, जेव्हा खांदा देण्यासाठी बारी लागते, जेव्हा डोळयांना रडण्याचा आव आणावा लागत नाही, जेव्हा जवळच्या नातेवायकांना दवाखाण्यात ॲडमिट करावे लागते, जेव्हा लोक पायांना वाहन बनवतात, जेव्हा लोक रात्र जागून काढतात, जेव्हा रडणारी डोळे व थरथरणारे ओठ रडू नका त्यांना त्रास होईल म्हणतात, जेव्हा पदसिध्द, पैशावाली व प्रतिष्ठीत माणसे खाली माना घालतात तेव्हा मला पैसा खुजा वाटतो.
       ज्याच्या मागे माणूस आयुष्य भर पळतो, ज्याच्यामुळे माणूस माणूस रहात नाही, जेव्हा माणसाला याचा ही विसर पडतो की, क्या तु लेकर आया था, क्या लेकर जायेगा ? खाली हाथ आया था और खाली हाथ जायेगा. हे सर्व यथेच सोडून जायचे असून ही व पैश्यामुळे मिळणारा मोठेपणा जो क्षणिक व भ्रामक आहे. हे माहित असून ही पैश्याला महत्व देतो. तेव्हा मला पैसा खुजा वाटतो. माणूस वेळेला आयुष्यभर पैश्याची ताकद दाखवतो व वेळ माणसाला एकदाच पैश्याची मर्यादा दाखवते. तेव्हा  मला पैसा खुजा वाटतो.
       पैसा निश्चित कमवायला हवा, पद पैसा व प्रतिष्ठा या त्रयींचा जवळचा संबंध आहे. पदाने पैसा व पैशाने प्रतिष्ठा अर्थात मान-सन्मान मिळतो हा समज जेव्हा गणपतमामांसारखी माणसे स्वजिवणातून गैरसमज म्हणून सिध्द करतात व हे दाखवून देतात की, पद व पैश्यांशिवाय ही मान-सन्मान मिळू शकतो तेव्हा मला पैसा खुजा वाटतो.
       सर्वांनाच एक दिवस मातीत मिसळायचे आहे. हे जग सोडून जायचे आहे. सर्वांच्याच चितेला मुखाग्नी दिला जाणार आहे, मग लाकडे साधी असतील वा चंदनाची असतील जळायचे सर्वांच आहे. मागे रहणार आहेत ते आपले विचार, शब्द व नाते वास्तविक पाहता गणपतमामांकडे काळा तर सोडाच पण पांढरी  ही कवडीही नव्हती तरी ही ते एवढे श्रीमंत कसे  तर त्याचे उत्तर एकच आयुष्यभर सेवाभाव जपून मानवता हिच खरी श्रीमंती या सुत्राचे त्यांनी कायम पालन केले म्हणून.... माणसाने बुध्दीने, शरीराने व मनाने श्रीमंत असावे ( Head, Hand and Heart) पण आपल्या नावासमोरील संपत्ती मध्ये शुन्यांची संख्या वाढविण्यात धन्य मानणा-यांना जिथे वरील प्रकारच्या श्रीमंतीचा अर्थच समजत नाही तिथे अश्या श्रीमंतीचे ते महत्व काय समजणार ? गणपतमामांकडे होते ते प्रेमाचे दोन शब्द आणि त्यामुळे जोडली गेलेली प्रेमाची चार माणसे!! कारण त्यांना हे माहित असावे कदाचित की, पैसा हे जीवण जगण्याचे साधन आहे जीवणाचे साध्य नाही. कदाचित ते हे ही जाणत असतील जे कबीर सांगून गेले की,
जब हम पैदा हुए, जग हसे हम रोये
एैसी करणी कर चलो, हम हसे जग रोये II

शब्दांकन : बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ

मो. – 9421863725 / 9673945092