Saturday 17 December 2016

गोंधळ व गोंधळी

..........................................“गोंधळ” व “गोंधळी”......................
भावांनो नमस्कार,
महाराष्ट्रातील बहुतांश कुळांचा कुळधर्म व कुळाचार म्हणजे “गोंधळ” होय. “गोंधळ” व “गोंधळी” या शब्दांचा अर्थ मराठी विश्वकोशामध्ये असा सांगितला आहे की, घरातील मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पाडल्याबददल, देवीची स्तुती व पूजा करुन, कृतज्ञतापुर्वक केलेला स्तवन विधी म्हणजे “गोंधळ” होय आणि हा विधी पार पाडण्याचे काम करणारी धार्मिक जात म्हणजे “गोंधळी” होय. शिवाय हे सांगण्याची आवश्यता नाही की, प्रखर हिंदुस्तवाचा केवळ अभिमान बाळगणारीच नव्हे तर हिंदुत्वाचा ख-या अर्थाने प्रचार व प्रसार करणारी जात म्हणजे “गोंधळी” होय.
हिंदु धर्मामध्ये ज्याप्रमाणे लग्न, मुंज, गृहपूजा, यज्ञ, अंत्यविधी, व तत्संबंधीत इतर विधी इत्यांदीची पूजा ब्राम्हण पार पाडतात त्याचप्रमाणे लग्न, मुंज, गृहपूजा, इत्यादी प्रसंगी गोंधळाचा व देवीच्या इतर पूजनाचा विधी “गोंधळी” पार पाडतात. गोंधळाचा विधी केवळ महाराष्ट्रातच होत नाही तर महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगढ, झारखंड, हरियाणा व दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये भक्तीभावे होतो. म्हणजे “गोंधळ” व “गोंधळी” हे शब्द बहुश्रुत व व्यापक आहेत. गोंधळाच्या पावित्र्याची जपणुक व गोंधळी यांना दिला जाणारा मान सन्मान तसेच केला जाणारा आदर हा पुर्वापार चालत आला आहे. जमदग्नी ऋषी व रेणूकामाता यांच्यापासून गोंधळाची उत्पत्ती झाली असे आपली वयस्क मंडळी सांगतात. रेणुकापुराण व रेणुकामहात्म्य यांतही याचा संदर्भ आढळतो. इ.स.पुर्व २५५० ते इ.स.पुर्व २३५० हा “भगवान परशुराम काळ” मानला जातो.त्रेता युगात श्री विष्णुंचे सहावे अवतार म्हणून भगवान परशुराम होवून गेले. हा काळ म्हणजे “गोंधळ” व “गोंधळी” उगमाचा काळ. आज रोजी महाराष्ट्रारात “गोंधळी” ही जात भटक्या जमाती(ब) या प्रवर्गात अ.क्र.१० वर आहे. हे सर्व लिहिण्याचा हेतू एवढाच की, “गोंधळ” व “गोंधळी” संपूर्णपणे प्राचीन, धार्मिक, भावनिक व जातीवाचक शब्द आहेत.
मात्र अलिकडच्या काळात “गोंधळ” व “गोंधळी” हे शब्द श्रध्दा व आदरपुर्वक कमी आणि तुच्छतात्मक व उपहासात्मक दृष्टीनेच अधिक वापरले जात आहेत. साहित्यीक अगदी सर्रासपणे आपल्या साहित्यामध्ये तर प्रसार माध्यमे आपल्या बात्म्या व निवेदनांमध्ये “गोंधळ” व “गोंधळी” हे शब्द नकारात्मक अर्थाने वापरत आहेत. ज्यामुळे गोंधळी समाजाची मने दुखावत आहेत. वास्तविक पहाता शिवछत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीच्या पवित्र कार्यात हिरीरीने सहभागी होवून हेरगिरी करुन स्वराज निर्माणास हातभार लावणारी गोंधळी जात राजेंची लाडकी होती. याचमुळे राजेंनी त्या काळात गोंधळी समाजाला वतने व जहागी-या दिल्या होत्या. आजही गोंधळी बांधव शिवछत्रपतींचा इतिहास शाहिरीबाण्यात गर्वाने प्रतिपादीत करतात. लोककला व लोकवाड.मयाद्वारे लोकजीवणाचे यथार्थ चित्रण मांडून लोकशिक्षण, लोकजागृती व लोकरंजन करणारी “गोंधळी” जात, उपहासाने उच्चारली जाते तेव्हा वेदना होतात. आज साधारणपणे “धिंगाणा” या अर्थाने “गोंधळ” हा शब्द तर “धिंगाणा घालणारे” या अर्थाने “गोंधळी” शब्द वापरला जात आहे. “प्रेक्षकांनी घातला गोंधळ….”, “कार्यालयात गोंधळ घालणारा भामटा पोलिसांच्या ताब्यात…”, “गोंधळी मद्यपी सी.सी.टिव्ही कँमे-यात कैद…”, “गोंधळी आमदारांचे निलंबन…”, अशा बातम्या पेपरात सतत छापून येतात.
“गोंधळ” व “गोंधळी” शब्दांचा वरील संदर्भांमध्ये लावला जात असलेला अर्थ आणि अगदी सुरुवातीस सांगितल्याप्रमाणे मराठी शब्दकोश व विश्वकोशातील “गोंधळ” व “गोंधळी” शब्दांचा अर्थ यांचा काडीचाही सहसंबंध नसूनही असे घडत आहे हे क्लेशदायक आहे. तसे पहाता ज्या संदर्भाने “गोंधळ” हा शब्द वापरला जात आहे त्याला अनेक पर्यायी व अगदी प्रमाण शब्द आहेत. जसे की, धिंगाणा, गडबड, घोटाळा, हुल्लडबाजी, हुज्जत, चकमक, धुमाकूळ ते अगदी राडा पर्यंत… आणि अशाच प्रकारे ज्या संदर्भाने “गोंधळी” हा शब्द वापरला जात आहे त्याला देखील अनेक पर्यायी व अगदी प्रमाण शब्द आहेत. जसे की, धिंगाणाखोर, धिंगाणेबाज, हुल्लडबाज, हुज्जतखोर, राडेबाज इत्यादी. मग प्रश्न असा पडतो की, एवढे सगळे प्रमाणित व अधिकृत शब्द जे वापरायला हवेत ते न वापरता या सर्वांच्या ऐवजी “गोंधळ” व “गोंधळी” हेच शब्द जे वरील अर्थाने केवळ चुकीचे, अप्रमाणित व अनाधिकृत शब्द आहेत तेच वापरून “गोंधळी” जातीच्या धार्मिक व जातीय भावना का दुखावल्या जात आहेत ?
भारत हा लोकशाही प्रधान व घटनात्मक देश आहे. येथे कोणत्याही समाजाच्या जातीय व धार्मिक भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही. असे असून ही अगदी बिनदिक्कतपणे अशाप्रकारे “गोंधळ” व “गोंधळी” या शब्दांचा चुकीचा वापर मानसिक त्रास देणारा आहे. अशा प्रकाचा मानसिक त्रास केवळ गोंधळी समाजालाच होतोय असे नाही तर सर्व बारा बलुतेदार व अठारा अलुतेदार वर्गातील बांधवांनाही होतोय. “गोंधळी” ही जात अठरा अलुतेदारांपैकी एक जात. शिवाय “गोंधळ” हा विधी पार पाडणारे व गोंधळकला सादर करुन उपजिविका भागविणारे इतर जातीचे "व्यावसायिक गोंधळी" देखील दुखावतात. कारण बाहेर समाजात त्यांना ही गोंधळी म्हणूनच ओळखले जात आहे.
विशेष म्हणजे वर उल्लेख केल्याप्रमाणे “गोंधळ” व “गोंधळी” या शब्दांचा उपहासात्मक उच्चार व वापर महाराष्ट्र राज्य व मराठी भाषा वगळता अन्यत्र कोठेही वापरताना आढळत नाही. हे आक्षेपार्ह आहे आणि आक्षेप नाही घेतला म्हणून प्रमाणित शब्द असल्याप्रमाणे राजरोसपणे या शब्दांचा वापर केला जात आहे हे आपण पहातो. ग्रामीण भागातील बोली भाषेचा भाग म्हणून, निव्व्ळ निरक्षर व्यक्तींकडून विरळपणे अशाप्रकारे चुकीचा वापर झाला तर एकवेळ दुर्लक्ष केले जावू शकते. मात्र अगदी साहित्य व प्रसार माध्यमांमधील वापर अशोभनिय आहे. हा वापर जसा अशोभनीय आहे तसाच तो धोकादायकही आहे. कारण साहित्यांतील व प्रसारमाध्यमांतील वापराने, शब्द प्रमाणित होत असतात आणि शब्दकोशात येत असतात. आणि मग पुढे त्याच शब्दांना हळुहळू लोकसंमती मिळत असते. त्यामुळे वेळीच आक्षेप नोंदविले जाणे गरजेचे असते. आजवर आक्षेप न घेण्याचे कारण असेही आहे की, एक तर आपण अल्पसंख्य व त्यातही विखूरलेले आहोत आणि दुसरे म्हणजे सध्या “गोंधळी” शब्द ज्या अर्थाने वापरला जात आहे आपण त्याच्या अगदी विरुध्दार्थी स्वभावाचे आहोत. म्हणजे, “कशाला विरोध करायचा ? कशाला नसल्याला धिंगाणा” ? असा बचावात्मक व काहीसा समंजसपणाचा विचार करणारी आपली जात.
अनुसूचित जाती व जमातीमधील बांधवांणा कोणी जातीवाचक बोलले तर त्यांना कायद्याने जाब विचारता येतो. मात्र विमुक्त जाती व भटक्या जमाती या देशव्यापी प्रवर्गातील बलुतेदार व अलुतेदार जातींना, बोली भाषेमध्ये उपहासाने व तुच्छतेनेच उच्चारले जात आहे हे नाकारता येणार नाही. अलीकडेच मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने “दलित” या शब्दाला आक्षेप घेणा-या जनहित याचिकेच्या सुनावणी दरम्याण “दलित” हा शब्द घटनाबाहय असल्याचे निरीक्षण नोंदविले आहे.
शब्द हे शस्त्र असतात, ते जपूण वापरावेत असे म्हणतात. तसेच वाक्यप्रचार व म्हणी हे भाषेचे अलंकार असतात त्यांचा योग्य ठिकाणी योग्य वापर केला म्हणजे भाषा सुशोभित होते. तर मग आज मराठी भाषेत “गोंधळ” व गोंधळी” हे शब्द नकारात्मक व उपहासात्मक अर्थाने का वापरले जात आहेत. भावांनो आज “गोंधळी” ही जात जरी पूर्णपणे विकसित व प्रगत नसली तरी अशा अशोभनिय वापराला विरोध करण्याइतपत नक्कीच सक्षम आहे. आज “गोंधळ” हे जरी आपले एकमेव उदरनिर्वाहाचे साधण नसले तरी ते आपल्या अस्मीतेचे व अस्तित्वाचे प्रतिक आहे. विश्वकोश निर्मिती मंडळ, मराठी साहित्य परिषद, मराठी भाषा परिषद, मराठी भाषा संचालनालय, पत्रकार संघ व महासंघ तसेच मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्यमंत्री, मा.मंत्रीमंडळ तसेच इतर लोकप्रतिनिधी यांना सविनय निवेदने देवून आपण सामूहिकपणे व शांततामय मार्गाने “गोंधळ” व गोंधळी” या शब्दांच्या चुकीच्या अर्थाने होत असलेल्या वापराला विरोध करावयास हवा. अलीकडेच मा.पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या रेडिओवरील, “मन की बात” या कार्यक्रमातून “अपंग” शब्दाऐवजी “दिव्यांग” हा शब्द वापरण्याचे देशवासियांना आवाहन केलेले आहे.
यावर ही फरक नाही पडला तर आपल्या घटनात्मक हक्कासाठी आपण मा. उच्च न्यायालयाचे दारही ठोठावू शकतो. यासाठी मुंबई शहर व उपनगर, नागपूर व औरंगाबाद या भागातील कार्यकर्त्यानी जरा मनावर घ्यावयास हवे. न्यायालयीन लढाईने नक्कीच “गोंधळ” व गोंधळी” या शब्दांच्या उपहासात्मक व थट्टात्मक वापरावर निर्बंध येतील याबाबत माझ्या मनात किंचित ही संदेह नाही. त्यासाठी आवश्यक पुरावे ही उपलब्ध आहेत.
भावांनो मागितल्याशिवाय तर आई देखील दुध पाजत नाही. एका पवित्र "विधी" चा होत असलेला अवमान व एका प्राचीण "जाती" ची होत असलेली अवहेलना अन्यायकारक आहे. अन्यायाविरूद्ध विद्रोह केल्याशिवाय तो दूरही होणार नाही आणि अन्यायाविरोधात विद्रोह करणे ही तर महाराष्ट्राची परंपरांच आहे.
…….. बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो. ९६७३९४५०९२ (WhatsApp Only)
ई-मेल. bsayush7@gmail.com

Thursday 27 October 2016

दुरितांचे तिमिर जावो...

दुरितांचे तिमिर जावो…

मित्रांनो नमस्कार,
“मी अविवेकाची काजळी , फेडूनी विवेकदीप उजळी l
तैं योगियां पाहे दिवाळी, निरंतर ll”
ज्ञानियांचे राजे,  ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायात चोपन्नाव्या ओवी मध्ये दिवाळीचे असे वर्णन केले आहे. ज्याचा अर्थ, अविवेकाचा अंधार दूर करुन विवेकाचा दिवा पाहण्यासाठी योगी व्हावे लागेल असा, ढोबळपणे सांगता येईल.  
 सुरुवातीलाच मी हे ही स्पष्ट करु ईच्छितो की, मी लेखक वा विचारवंत नाही. मात्र अभ्यासक नक्कीच आहे. शिवाय "व्यक्त होण्याचे जे मुक्त स्वातंत्रय" सामाजिक प्रसार माध्यमामुळे प्राप्त झाले आहे त्याचा वापर करुन मी माझे दिवाळीविषयक विचार आपणापर्यंत पोहचवत आहे एवढेच. एरवी माझी शैक्षणिक व बौध्दिक पातळी फार उच्च नाही हे ही नम्रपणे सांगु इच्छितो.  कारण माझा जन्म आर्थिक बौध्दिक व सामाजिकदृष्टया अत्यंत दीन कुटूंबात झाला आहे.दिवाळी हा तसा दिवाळे काढणारा सण ! मात्र माझा सर्वात आवडता सण. अगदी लहानपणापासून ! ग्रामिण शेतकरी कुटूंबातील माझे बालपण मला चांगले आठवते. वसुबारसेला गोठयात आई आण्णा व मी, गुरांची पुजा करायचो, अत्यंत साधेपणे पण मनोभावे ! आरती करताना आम्ही म्हणायचो, “ दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाईचा चारा, बैल मारा, बैलाचे बाशींग, किकरे ताशींग … वगैरे वगैरे पुढचे आठवत नाही. माहित याचा अर्थ काय ? किंवा हे शब्द अर्थपुर्ण ही आहेत की, नाहीत ! पण ही प्रथा होती, जी आम्ही अत्यंत मनोभावे व पवित्र अंतकरणाने पुर्ण करायचो. दिवाळी आली की, माझे आई-वडील “जुन्या बाजारातील नवे कपडे” आणायचे, मेंहदी, हळद, बेसन, दूध व तेल मिश्रीत उटणे लावून अभ्यंगस्नान, खोबरेल तेलात अत्तर मिसळून तयार केलेले सुगंधी तेल केसात माळून, सकाळच्या थंडीत कुडकुडत्या हाताने तोटयाला (फटाक्याला) अगरबत्तीने पेटवताना वाटणारी भिती व होणारा आनंद खरंच मला शब्दात व्यक्त करता येत नाही. त्यानंतर वर्षभर कधी नव्हे तो सकाळी सकाळी गोडधोड नाष्टा करुन घराबाहेर पडायचो. नदीतील खडक, डोंगरावरील दगड यावर खाकी तोटयातील दारु काढून ती यांवर ठेवायचो व त्यावर छोटा दगड ठेवून त्यावर मोठया दगडाने मारायचो. हेतू एकच एका तोटयाचे पाच-सहा तोटे व्हावेत. अगदी दिवसभर हेच चालायचे दुपारनंतर संध्याकाळची प्रतिक्षा तीव्र व्हायची. दिवस मावळता घरांवर व दारात दिवे लावयाचे, फटाके वाजवायचे, आपले संपले की, लोकांचे पाहत राहायचे !! त्या त्या दिवशीची धार्मिक व पारंपारिक पूजा करायची व उद्याच्या प्रतिक्षेत झोपी जायचे, हा दिवाळीतील दिनक्रम. ही आमची बालपणीची दिवाळी!! दिवाळीपुर्वी एक महिन्यापासूनची प्रतिक्षा व दिवाळीनंतरची एक महिन्याची हूरहूर आजही स्पष्ट आठवते.
 पण मित्रांनो आज काय पाहतो आपण ? दिवाळी या सणाचे सांस्कृतिक महत्व व श्रध्दा लोप पावत चालली आहे. पैश्याची राख रांगोळी होत आहे व विदेशी कंपन्या आणि व्यवसायिकांची चांदी होत आहे. वास्तविक दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्व सणांचा राजा, हा दिव्यांचा सण, इष्टाच्या अनिष्टावरील विजयाचे प्रतिक, गुरे ढोरे तुळसीसह पर्यावरणाप्रति कृतज्ञतेचे प्रतिक, धनाला धन्यवाद देण्याचा व त्याला नमन करण्याचा सण तसेच कौटूंबिक जिव्हाळा प्रेम,आपुलकी, व आपलेपणा जपण्याचा सण. पण आज ती सात्वीकता श्रध्दा उपासणा व आपलेपणा सहसा दिसत नाही. आज दिवाळी ध्वनी व वायू प्रदूषणाचे कारण व स्वसंपत्तीचे प्रदर्शन करण्याचे माध्यम जेव्हा होत आहे तेव्हा वाईट वाटते. हा वास्तविक पाहता दिपोत्सव आहे. सडा सारवण त्यावर रांगोळींची सजावट व पानेफुले यांची हारे व तोरणे करुन दिव्यांची आरास मांडून श्रध्दापुर्वक पूजा आर्च्या करुन कौटूंबिक व सामाजिक सौहार्द जपण्याचा सण जेव्हा प्रदर्षणाचे व प्रदुषणाचे माध्यम बनतो तेव्हा दु:ख होते.
 मात्र हे वर्णन सार्वत्रिक, सार्वभौम व सामान्य नाही. आजही अनेक ग्रामीण व शहरी कुटूंबात हा सण अत्यंत मनोभावे व श्रध्दापुर्वक साजरा करत असताना आपण पाहतो. तेव्हा दिवाळी साजरी करत असताना ऐवढेच वाटते की, दिवाळीच्या नावाखाली मोठमोठे कर्णकर्कश फटाके, धूर सोडणारी शोभेची दारु व सजावटीवरील अवास्तव खर्च टाळून साधेपणाने आपलेपणाने व श्रध्देने साजरी केलेली दिवाळी वर्षभर स्मरणात राहील.
 मित्रांनो “दिवाळी हा श्रीमंतांचा सण” ही दिवाळीची ओळख मिटून जे उपेक्षित दीन, दुबळे, गरीब,व अपंग लोक या सणाचा आनंद घेऊ शकत नाहीत तसेच देश संरक्षणार्थ सीमेवर लढणारे जवान इतर जिवनावश्यक सेवा देणारे बांधव आपापल्या कर्तव्यावर असल्यामुळे या सणाचा आनंद घेवू शकत नाहीत त्यांना धन्यवाद व शुभेच्छा.
 ही दिवाळी सर्वांची नवी स्वप्ने, नव्या आशाआकांक्षा पुर्ण करणारी, सर्वांत नवा जोश नवा उत्साह भरुन सर्वांच्या  व्यक्तीमत्वाला  नवे वलय प्राप्त करुन देणारी व यशाची क्षितीजे गाठणारी ठरो हीच आई जगदंबेस प्रार्थना. वर उल्लेख केल्याप्रमाणे दिवाळी हा दिव्यांचा अर्थात प्रकाशाचा सण, सर्वांच्या जिवणातील दु:ख द्रारिद्रय , चिंता, भय, काळजी, अनारोग्य, अपयश, गर्व, अहंकार इत्यांदीचा अंधार दूर होवून सर्वांच्या जीवणात यश व आनंदाचा प्रकाश घेवुन येवो हीच अपेक्षा व प्रार्थना, जी ज्ञानेशांनी आपल्या पसायदानात व्यक्त केली आहे…

"दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सुर्यें पाहो l
जो जे वांच्छिल तो ते लाहो, प्राणिजात ll"
दिवाळीच्या सर्वांना मन:पुर्वक शुभेच्छा…

आपला,
बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. - 9096877345

Wednesday 12 October 2016

दसरा...

----------------------------- दसरा-----------------------
धनसंपदा आराम नेई, काम वासना आजार देई
कष्ट मेहनतीत शांती लई, निजल्या सरशी निद्रा येई.
मौज मजा अन उधळण सारी, आनंद देती क्षणाचा
सवय बनती नकळत, अन चैन हिरावी मनाचा.

गर्व अहंकार करतोस कसला, काय हाई तुझं?
सोबतीला जन्मापासुन, आणलं व्हतंस का हे ओझं?
माझं माझं कबाड ओझं, फिकुन दी रं सारं
पैस्याआडक्यातलं सुख म्हणजी, गाठोड्यातलं वारं.

समाधान धनात नाही, नाही ते मानात
फुलं पक्षी गवत वेली, सुखात डोलत्यात रानात.
धरता यायना बांधता यायना, मागं फिराय लावतय
सुख तर गड्या मनात असतय, अन मनातच ते मावतय.

मानलं तर गड्या पानही, असतय बरका सोनं
शीरीमंती म्हणजी जवळचं, जवळच्यांना देणं ...
मोठी धनानं बरीच असत्यात,  मनाने मातर छोटी
पैश्यामागं धावुन मिळते, ती पत आसतीय खोटी....

राजंही रंक झाली, अन रंकही झाली राजं
संपत्ती तर मध्यान छाया, नको मी अन माझं.
उगला दिस मावळणारंच, अमर काहीच नाही
चांगुलपण अन विचार थोर, तेवढ मागं राही..

फास त्याचा आवळणारंच, नकु करू तु अति
ख-याचा तर विजय पक्का, खोटं खातं माती.
सांगं दसरा वैर विसरा, सांगती नऊराती
जपुन ठेवरं नाती यड्या, जपुन ठेव नाती..

मोह माया अन उसनी काया, करवुन घेती पापं
सोनं वाटुन सोनं व्हणं, किती रं गड्या सोपं.
घडा भरता पापाचा, फेडावं इथच लागतंय
शरीर पैकं गाडी सारं, सोडावं इथच लागतंय.

फुकाचे तुप अन हरामची पोळी, पोटी कुटकुट करते
श्रमाची चटणी अन घामाची भाकर, आयुष्भर ना सरते.
जमा करता करता, वाल्ह्या व्हवुन जाशील
देता देता कर्णाचा, अंश सवतात पाहशील.

सोनं नाणं यायना कामी, सोडवीत नाही कुणी
चार माणसं पिरमाची, धावत येतील रणी.
सिमा वलंड पैश्याची, अन वलंड सिमा जातीची
कानावरची झापडं सारून, आईक हाक नऊरातीची.

दानधरम कर, कर तु सेवा दिन दुभळ्यांची
नाव कमव अन जिकुन दाखीव, मनं इथल्या सगळ्यांची.
वाया नाही जाणार पुण्य, नग पडु नरकात
देवालाबी आवडशील मग, अन जागा मिळल सरगात.

--- बालासाहेब सिताराम धुमाळ.
मो. ९०९६८७७३४५

Saturday 17 September 2016

उसे इन्सान कहते है Kishor Bhonde

उसे इन्सान कहते है.....

मित्रांनो नमस्कार🙏🏻
मी भिमाशंकर शासकीय वसाहत, येरवडा, पुणे-६ येथे राहतो. जुन २०१३ मध्ये जेव्हा मी येथे नविन रहायला आलो तेव्हा मी आणि माझे काम येवढेच करायचो..
हळुहळू ओळख करून घेऊ लागलो . वेगवेगळ्या शासकिय विभागात वेगवेगळ्या पदावर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्हातील वेगवेगळ्या जाती-धर्माचे साधारणपणे शंभर कुटूंब आमच्या वसाहतीत वास्तव्यास आहेत. पण एके दिवशी एक व्यक्ती माझ्याच वयाचा माझी आपलेपणाने चौकशी करू लागला, ओळख झाली , विचार जुळले , लगेच मैत्रीही झाली!!  त्याचे नाव आहे किशोर रामचंद्र भोंडे , मुळगाव  सासवड ,आता पर्यंत आमची सोसायटी , यापुढे नागपुरचाळ, येरवडा, पुणे.
तर मग पुढे पुढे असं लक्षात आलं की हे माझे मित्र प्रत्येकाच्या प्रत्येक सुख दुःखात सर्वांच्या पुढे असतात!! अगदी निस्वार्थपणे !!! आता तुम्ही म्हणाल हा मित्र परिचय आम्हाला का देताय? तर त्याचं कारण असं की हे किशोर भोंडे ज्यांना मी प्रेमाने किशोरदा म्हणतो, त्यांच्या मातोश्री नियत सेवामानाने सेवा निव्रत झाल्याने आमची सोसायटी सोडून जाताहेत या महीन्याच्या अखेरीस!! आणि त्यामुळे आमचे प्रचंड नुकसान होणार आहे .
किशोरदा असे व्यक्ती आहेत ज्यांनी आमची सोसायटी एकजीव केली आहे. आमची ही सोसायटी अगदी खेडे आहे , अतिशय एकजीव,  एकात्म!! आणि ती तशी आहे केवळ किशोरदांमुळे !!
२४x७ कोणाच्याही मदतीला धावुन जाणारे, सोसायटीत गणेशोत्सव, शिवजयंती, आंबेडकर जयंती पुढाकार घेवुन, वर्गणी जमा करून, प्रसंगी स्वतः खर्च करून त्यांनी साजरी केली. केवळ साजरीच नाही केली तर विविध आदर्श सामाजिक उपक्रमही राबवले. प्रत्येक बाब कमी खर्चात रुबाबदार कशी होईल? सर्वांचा सहभाव कसा असेल? यासाठी ते सर्वस्व देत. सर्वांना एकत्र धरून कसं ठेवावं ते शिकावं किशोरदांकडून!! अगदी छोट्याछोट्या बाबी जसे वसाहतीतील रहीवास्यांचे वाढदिवस, आजारी रूग्णांना भेटणे, सोसायटीचे माजी रहीवाशांशी प्रेमपुर्ण संबंध ठेवणे, अशा बाबी ते नविसरता करतात. अत्यंत सामान्य राहणी व असामान्य विचारसरणी व तशाच करणीचे किशोरदा, भावी नगरसेवक म्हणुनच बाहेर ओळखले जातात पण त्यांनी जे आमच्यासाठी केलं ते कोणताही राजकीय स्वार्थ ठेवुन नाही केलं कारण आम्ही त्यांच्या वार्डातही नाही आहोत!!! आज रोजी आमच्या सोसायटीत असे एकही कुटूंब नाही ज्यांना किशोरदा आपले कुटूंब सदस्य वाटत नाहीत.. चेह-यावर कायम हास्य असणारे , मोठ्यांचा आदर कर्ते , लहानांचे मित्र, पैशाने गरीब पण मनाने धनाड्य असे किशोरदा...
सुदैवाने त्यांच्या सौभाग्यवतीही तशाच!! अत्यंत मनमिळावु, सुसंस्कारीत, खानदानी, मराठमोळ्या, शहरी झगमगाटापासुन जाणिवपुर्वक दुर असणा-या.
किशोरदांच्या मैत्रिचा परिघ एवढा विस्तीर्ण आहे की दररोज किमान पाच दहा जण घरी येतात. त्यांच्याशी आपलेपणाने वागणा-या, आस्थेवाईकपणे चौकशी करणा-या आमच्या वहीणी, घरी आलेल्याला ग्लासभर पाणी व कपभर चहा घेतल्याशिवाय पाठवत नाहीत!!
त्यांची दोन्ही अपत्ये विराज व सई, व्वा खुपच गोड, समोरच्याचे मन कधी जिंकुण घेतात ते त्यालाही कळत नाही .. ही तिघेही अगदी तंतोतंतपणे किशोरदांचे अनुकरण करतात..
एक रात्र जुन २०१४ ची, अचानक खुप पाऊस झाला व सोसायटीत काही इमारतीतील तळघरांत पाणी शिरले तेव्हा किशोरदा रात्रभर आपल्या मित्रांसह इतरांच्या घरातील पाणी उपसत होते हे कधीही विसरता येणार नाही. नेते इतरांना काम सांगतात मात्र हे आमचे नेते स्वतः काम करतात तेही कुठलाही मोठेपणा, मानसन्मान, गर्व न बाळगता. हेतु एकच, सर्वांना एकत्र आणणे. गरजुंना आधार देणे!! आणि तेव्हा मग त्यांचे मित्र व पाहणारेही बेभान होवुन कामाला लागतात!!
जात धर्म भाषा प्रदेश गरीब श्रीमंत असा कोणताही भेद न करता किशोरदा मदतीला धावुन येतात.. ते आमच्या पासुन अंतराने दुर जरी गेले तरी आमची मैत्री संपणार नाही, पण नाही म्हटले तरी थोडे अंतर येईलच...
मात्र आम्ही त्यांना कधीही विसरू शकत नाहीत कारण माणुस परक्यांना विसरतो, आपले तर आपल्या काळजात असतात , अगदी कायमचे!! धन्यवाद देवुन परके आम्ही त्यांना करणार नाही..
असो , यालाच जीवन ऐसे नाव ...
किशोरदांना आठवलं की एक गीत हमखास ओठावर येईल,,
"किसीके काम जो आए,  उसे इन्सान कहते है | "
" पराया दर्द अपनाए , उसे इन्सान कहते है |"
आई जगदंबेला प्रार्थना, त्यांना निरोगी उदंड आयुष्य दे बस ......
कारण बाकी ते सर्व मिळवु शकतात, तसा त्यांचा स्वभाव आहे. लाथ न मारता पाणी काढतात ते आमचे मित्र किशोरदा !! "आपल्या हक्काचा माणुस!!" म्हणुनच तर त्यांचा २०१७ पुणे महानगरपालिका निवडणूकीचा प्रचार त्यांचे मित्र स्वखर्चाने आतापासुनच करत आहेत...


--------- बाळासाहेब सिताराम धुमाळ.

Sunday 14 August 2016

ऐ मेरे वतन के लोगों

ऐ मेरे वतन के लोगों.......
मित्रांनो प्रत्येक भारतीयाच्या मनामनात घर करून असलेल्या,
"ऐ मेरे वतन के लोगों" या स्फुर्ती गीता विषयी खुप छान माहीती वाचनात आली आणि ऊर तर भरून आलाच विश्वास करा, डोळहीे पाणावले ...
ऐ मेरे वतन के लोगो हे गीत कवी प्रदीप यांनी इ.स. १९६३ साली भारत-चीन युद्धानंतर, या युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली म्हणून हिंदी भाषेत लिहिलेले एक देशभक्तीपर गीत आहे. हे गीत प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविते. भारत-चीन युद्धानंतर खचलेल्या भारतीयांचे मनोबल उंचावण्याचे काम या गीताने केले होते. या गीताला सी. रामचंद्र यांचे संगीत असून लता मंगेशकर यांचा आवाज आहे.
हे गाणे जेव्हा कवी प्रदीप यांना सुचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथलेच एक सिगारेटचे रिकामे पाकीट उचलून उलगडले आणि त्याच्या पाठकोऱ्या भागावर त्यांनी हे गाणे लिहिले. गीत लिहिल्याच्या दिवसापासून काही आठवड्यानंतर निर्माते मेहबूब खान यांनी रामलीला मैदानावर होणाऱ्या एका कार्यक्रमाच्या उद्‌घाटनासाठी एक गीत लिहावे अशी विनंती कवी प्रदीप यांना केल्यानंतर प्रदीपांनी माहीमच्या फुटपाथवर लिहिलेले हे गीतच संगीतकार सी रामचंद्र आणि गायिका लता मंगेशकर यांना दाखविले.
ऐ मेरे वतन के लोगो हे गीत सर्वप्रथम दिल्लीतील रामलीला मैदानावर दिनांक २७ जानेवारी, इ.स. १९६३ रोजी झालेल्या एका कार्यक्रमात लता मंगेशकर यांनी गायिले. या कार्यक्रमाला भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, व सर्व केंद्रीय मंत्री हजर होते. शिवाय चित्रपटसृष्टीतील दिलीप कुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार आणि गायक मोहम्मद रफी हेही उपस्थित होते. ज्या कवी प्रदीप यांनी हे गीत लिहिले होते त्यांना मात्र या कार्यक्रमाला आमंत्रित केले गेले नव्हते. लता दिदीच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाऱ्या जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडित नेहरूंच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले होते.
कवी प्रदीप यांनी ऐ मेरे वतन के लोगो या गीताबद्दल मिळणाऱ्या आपल्या बिदागीचा अर्धा हिस्सा युद्धातील विधवांच्या संस्थेला देण्यासाठी एच.एम.व्ही. या गीतमुद्रण कंपनीशी करार केला होता.कंपनीने करार पाळला नाही, आणि शेवटी प्रदीप यांच्या कन्येने दीर्घकाल कायदेशीर लढाई लढून तो हिस्सा युद्धविधवांसाठी काम करणाऱ्या संस्थेला मिळवून दिला. २५ ऑगस्ट २००५ रोजी एच.एम.व्ही कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्या संस्थेला दहा लाख रुपये दिले. ते ऐ मेरे वतन के लोगों.....

ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सब का, लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर, वीरों ने है प्राण गंवाए
कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो
जो लौट के घर न आए, जो लौट के घर न आए...

ऐ मेरे वतन के लोगो, ज़रा आंख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुरबानी
ऐ मेरे वतन के लोगों ज़रा आंख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुरबानी
तुम भूल न जाओ उनको, इसलिए सुनो ये कहानी
जो शहीद हुए हैं, उनकी, जरा याद करो कुरबानी...

जब घायल हुआ हिमालय, ख़तरे में पड़ी आज़ादी
जब तक थी सांस लड़े वो... जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी लाश बिछा दी
संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदानी
जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुरबानी...

जब देश में थी दीवाली, वो खेल रहे थे होली
जब हम बैठे थे घरों में... जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो अपने, थी धन्य वो उनकी जवानी
जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुरबानी...

कोई सिख कोई जाट मराठा, कोई सिख कोई जाट मराठा,
कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी
सरहद पर मरनेवाला... सरहद पर मरनेवाला, हर वीर था भारतवासी
जो खून गिरा पर्वत पर, वो खून था हिंदुस्तानी
जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुरबानी...

थी खून से लथ - पथ काया, फिर भी बंदूक उठाके
दस - दस को एक ने मारा, फिर गिर गए होश गंवा के
जब अंत समय आया तो.... जब अंत-समय आया तो, कह गए के अब मरते हैं
खुश रहना देश के प्यारो... खुश रहना देश के प्यारो
अब हम तो सफ़र करते हैं।.. अब हम तो सफ़र करते हैं

क्या लोग थे वो दीवाने, क्या लोग थे वो अभिमानी
जो शहीद हुए हैं उनकी, ज़रा याद करो कुरबानी
तुम भूल न जाओ उनको, इसलिए कही ये कहानी
जो शहीद हुए हैं, उनकी जरा याद करो कुरबानी
जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना... जय हिंद, जय हिंद, जय हिंद की सेना..
जय हिंद, जय हिंद जय हिंद, जय हिंद जय हिंद, जय हिंद...

संकलन व लेखन बी.एस.धुमाळ.

Thursday 23 June 2016

संगीत

संगीत ….
            ईश्वराने निर्मिलेले हे विश्व संगीताने सजलेले व धजलेले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मानवी जीवणात जन्मापासून मुत्यूपर्यंत संगीत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. बारकाईने पाहिले तर निसर्गातील सर्व घटक  मग ते सजिव असोत वा निर्जीव असोत, सर्वात संगीत व्याप्त आहे. खळखळणारे झरे, मंद वा सोसाटयाचा वारा, सळसळणारी पाने, गडगडणारे ढग, कडाडणारी वीज, पक्ष्यांचा चिवचिवाट, भुग्यांची भुणभुण, रातकिडयांची किरकिर, डोलणारे पीक, प्राण्यांचे आवाज व पावसाचे पडणारे टपटप थेंब या सर्वांमध्ये संगीत व्याप्त आहे. नवजात बालकाचे रडणे व मृत्युशय्येवरील व्यक्तीचे कन्हणने, स्त्रीचे इश्श्य व पुरूषाच्या ओठातील शीळ यामध्येही संगीत व्याप्त आहे.
            मानवी जीवणामध्ये संगीताला अनन्य साधारण असे महत्व आहे. जादूई कंठ व जादूई बोटे लाभलेल्या माणसांनी  इतर माणसांच्या जीवणात भरलेला रंग म्हणजे संगीत अशी मी संगीताची व्याख्या करतो. थकून भागुन आलेल्या शरीराला व मनाला उल्हासीत करण्याचे काम संगीत करते. कहते है, संगीत है शक्ती ईश्वर की, हर सुर में बसे है राम | रागी जो गाये रागिणी, रोगी को मिले आराम | Music is the tone picture of Sociaty म्हणजे संगीत हे समाजाचे ध्वनीरुप चित्रण आहे. असे म्हटले जाते की,जर एखाद्या व्यक्तीच्या मनाचा व विचारांचा ठाव घ्यायचा असेल तर त्याच्या आवडत्या गीतांचा व संगीताचा अभ्यास करावा. असेही म्हणतात की, संगीत हे सुर व ताल या अमुर्त घटकांचा मुर्त अविष्कार असते. संगीताला भाषा नसते. As Human emotions are universal so the Music is also universal. संगीताला समजून घ्यायला डोके अथवा भाषेची गरज नसते. –हदयाने संगीताचा प्रत्येक नाद समजतो. मानवी जीवणात संगीत दु:खाची तीव्रता कमी करुन दु:खी मनाला आनंदाची झालर घालते म्हणून कलेचा आदर केला पाहिजे नव्हे केला जातो. स्वाभाविकच ही कला सादर करणा-या कलावंताचे स्थानही तितकेच महत्वपूर्ण असते. कलाकाराला स्वनिर्मिती व प्रयोग यांना महत्व दयावे लागते. तो आजन्म शिकत असतो. त्याला आजन्म सरावाची गरज असते.
            कलावंताने हे ध्यानात घ्यायला हवे कला ही अमर असते व अर्थातच तिच्यामुळे कलावंतही अमर होत असतो.  कोण मोठा व कोण छोटा यात न जाता आपल्या कलेवर लक्ष केंद्रित केले तर कलेची व कलावंताची प्रगती होत असते.
            संगीतामुळे जर पशुमधील पशुत्व नष्ट होत असेल तर मग मनुष्यातील अल्पस्वल्प पशुत्व तर निश्चितच नष्ट होईल. संगीत, गाणे किंवा ऐकणे आणि त्याचा आनंद घेणे या वेगळया गोष्टी आहेत. मनोरंजन हा जरी संगीताचा प्रधान हेतू असेल तरी सामाजिक जाणिवांचा उत्कर्ष करुन मानवी भावबंध निर्माण व्हायला देखील संगीतामुळे मदत होत असते. संगीतामध्ये सर्व जीवसृष्टीला चैतन्यमय करण्याचे सामर्थ्य आहे. जीवण संगीताची मैफल आहे व भैरवी गातागाता जीवणाची थोरवी समजते असे जे म्हणतात ते उगीच नाही. त्यामुळे संगीताचा आनंद घेवून जीवन संगीतमय होते यात शंका नाही.
लेखन :- बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ

मो.नं.- 9096877345

Tuesday 21 June 2016

गोंधळी जणगणना by Balasaheb Dhumal

गोंधळी जणगणना!!!!!!

नमस्कार मित्रांनो......
कोणत्याही जातीचा अभ्यास करण्यासाठी त्या जातीची लोकसंख्या किती आहे? हे माहीत पाहीजे. मात्र दुर्दैवाने आपल्या जातीची नेमकी लोकसंख्या किती आहे हे आपल्याला आतापर्यंत शोधता आलेले नाही. त्यासाठी गरज असते लोकसंख्या जनगणनेची अर्थात सर्वेक्षणाची. आपला समाज देशाच्या काणाकोप-यात महानगरांत, शहरांत आणि खेड्यापाड्यात वाड्यावस्त्यात विखुरलेला आहे. त्यांच्यापर्यंत कोणतीच यंत्रणा पोहचणे अगदी अशक्य आहे. तेवढे मनुष्यबळ आणायचे कोठून? तेवढा वेळ कोणाकडे आहे व त्यासाठी लागणारा खर्च कोठून आणायचा? शासन कोण्या एका जातीची लोकसंख्या का मोजेल? या विचारातुनच एक सोपा मार्ग हाती आला. . .
मोबाईल जवळजवळ सर्वांकडे आहे. निदान कुटूंबात एकाकडे तरी आहे. नसेलच तर निदान गावात एकाकडे तरी नक्कीच आहे. याचा व तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन आपण आता आपली संख्या मोजुया.
ठरविले तर एका आठवड्यात आपल्याला आपली लोकसंख्या मोजता येईल! !
त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि समोर येणारा फार्म भरा अगदी घरी बसल्या बसल्या! ! हा फार्म सर्वांना वाचता यावा म्हणून मराठीत दिला आहे, तो तुम्ही कोणत्याही भाषेत भरू शकता. तर मग आता उशीर करू नका. आपला व आपल्या घरच्या तसेच संपर्कातील सर्वांचा फाॅर्म भरा व गोंधळी ताकद दाखवून द्या.
मित्रांनो, आपल्या लक्षात येऊ द्या की "गोंधळी जणगणना" हे काम जर व्यवस्थित झाले तर गोंधळी जातीची लोकसंख्या तर कळेलच पण सोबतच देशाच्या कोणत्या वार्डात/गावात, शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात व कोणत्या राज्यात किती लोक आहेत आपले? त्यांची नावे काय आहेत? त्यांची शैक्षणिक व आर्थिक स्थिती कशी आहे? अविवाहित, विवाहीत, घटस्फोटित, परित्यक्त लोक किती आहेत? ते कोणकोणते व्यवसाय करतात? स्त्रिया किती? पुरूष किती? तरूण किती?  अहो एवढेच काय समान नावाचे, आडनावाचे लोक किती हे ही आपणास कळणार आहे! !! शिवाय या आकडेवारीचा उपयोग शासनाकडे मागण्या करणे व त्यांचा पाठपुरावा करणे यासाठी होत असतो. लोकसंख्येच्या आकड्याशिवाय शासन मागण्या पुर्ण करत नाही. अर्थात हे सर्व मी करणार आहे असा आपला गैर समज होऊ देऊ नका. मी केवळ एक विद्यार्थी आहे जो जातीचा अभ्यास करतो आहे असे समजा. पण इष्ट कारणासाठी मागतील त्यांना वैयक्तिक नाही पण संख्यातरी किमान, उपल्बध होईल.
तेव्हा उठा खडबडून जागे व्हा, कोणालाच सोडू नका. अगदी त्याच्याशी तुमचे पटत नसेल तरी!! आपण प्रतिसाद चांगला देत आहात अवघ्या चार तासात 200 लोकांनी नोंदणी केली आहे! ! पण हा आकडा अगदी नगण्य, माझ्या अभ्यासाप्रमाणे आपण देशभर अनेक लाखात आहोत!! पण विभक्त व दुरवर असल्याने माहीती नाही. मात्र आता जग बदलले आहे. माहीती तंत्रज्ञानाच्या मदतीने ते जवळ आले आहे. आपली नोंद हा फार्म भरून आपला समाज बांधव अगदी विदेशातुनही करू शकणार आहे.
त्यामुळे माझी आपणास हात जोडून विनंती आहे, कृपया हा अर्ज भरा व आपल्या अस्तित्वाचा पुरावा द्या.
कसे असते मित्रांनो, मानवी स्वभाव असा आहे की, तो स्वतःच्या अधोगतीपेक्षा दुस-याच्या प्रगतीने दुखावतो!!! अनेकांना असे वाटत असेल की नक्की याचा यात काहीतरी स्वार्थ असेल! ! पण भावांनो आणि बहीणींनो मी आपणास शपथेवर सांगतो की मी सामान्य माणूस आहे. राजकारण किंवा बाकी काही माझ्या कल्पनेतही नसते. उपाशीपोटी दिवस काढत होतोत एकेकाळी, आज आई जगदंबेच्या कृपेने पोटाला पोटभर तेही सन्मानाने भेटत असताना कृघ्न आचरणाची काय आवश्यकता?
हे माझ्या मनालाही शिवत नाही, अगदी बालपणापासुन. हं स्वार्थ एवढाच की कुठतरी कुणीतरी आपल्याला चांगलं म्हणावं बस. जातीच्या अभ्यासात आपला काहीतरी हातभार लागावा. . .
पण केवळ माला जिज्ञासा शमन किंवा अभ्यासच नाही तर आपल्या विविध संघटनांना, समाजसेवकांना, सेवाभावी संस्थांना, अभ्यासकांना, साहित्यिकांना, वक्त्यांना, विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
शासन दरबारी ही आकडेवारी सादर करता येईल. त्यामुळे मी विनंती करतो खासकरून तरूणांना व विविध संघटनांच्या पदाधिका-यांना की अगदी  पोलीओ लस पाजतात तशी किंवा पिग्मी एजंट वसुली करतात तशी  (कृपया शब्दावर जाऊ नका, भावना समजून घ्या ) प्रत्यकाची जातीने जात  नोंदणी करा. यासाठी खर्च काहीच नाही. आहेत थोडेसे कष्ट पण जातीसाठी माती तर खावीच लागते ना? ?
सर्वचजण संगणक किंवा मोबाईल साक्षर नसतात त्यामुळे कृपया त्यांना मदत करा.
जास्तीत जास्त लोकांना लिंक शेअर करा. माझी विनंती देखील आधिकाधिक लोकांपर्यत पोहचवा.

आपला:
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9096877345 9673945092 (WhatsApp)

Link 👇👇👇

https://docs.google.com/forms/d/10bKHkVs_USD34fZfPRTFfOBE8GobZaCVw86Ket_LONk/viewform

Tuesday 14 June 2016

नाक नाही नथीला... गंधज्ञान sense of smell

नाक नाही नथीला.....


माणसाला पंचज्ञानेंद्रिये आहेत अर्थात पाच सेंस आॅर्गंस. पाच सेंस - दृष्टी, गंध, चव, श्रवण आणि स्पर्श.  सहावा काॅमन सेंस! आणि ज्याला तो नसेल तो????? हं , नाॅनसेंस...
त्यापैकी एक नाक. ..
ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अत्यंत जूनी म्हण आहे, 'नाक नाही नथीला अन भोक पाड भितीला'. म्हणीचा अर्थ सर्वांनाच माहीत आहे. या शिवायही अनेक म्हणी व वाक्यप्रचारात नाकाने आपला ठसा उमटविला आहे! नाक हे केवळ नथीसाठीच असत नाही. असे असते तर पुरूषांना नाकच नसते! ! आता नाक नसण्याचा अर्थ काढत बसु नका...
नाक, एक ठसठशित अवयव, त्याला कधी अत्यंत सन्मानाने तर कधी अत्यंत उपहासाने पाहीले जाते. नाक,  ज्याच्यावरून व्यक्तीचे सौंदर्य, चारित्र्य  व प्रतिष्ठा ठरवली जाते तो मानवी शरीराचा अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. मानवी शरीराचे नाक आहे नाक!! या नाकाचा उपयोग मुलतः श्वासाद्वारे आॅक्सीजन घेण्यासाठी व उच्छवासाद्वारे कार्बन डाय आॅक्साईड  सोडून देण्यासाठी होतो. याशिवाय त्याचा उपयोग होतो तो गंध ज्ञानासाठी. Human being can detect atleast one trillion distinct scents. म्हणजे मनुष्य प्राणी किमान एक ट्रिलियन प्रकारचे गंध ओळखु शकतो. आता ट्रिलियन म्हणजे एकावर बारा शुन्ये!!! म्हणजे किती ते तुम्हीच तपासा...
आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत आपल्या या गंधज्ञान क्षमतेची व नाकाची!! मानवी गंधपेशींचे दर 30 ते 60 दिवसांनी नुतनीकरण होते. आपण भिती व निराशा देखील गंध करू शकतो! गंधज्ञान हे सर्वात पहीले ज्ञान आपण घेतो. माणसाचे नाक शरिराच्या तापमानाचे संतुलन राखते. थंडीत व उष्णतेत नाक ओले होते. गंधक्षमता पुरूषांपेक्षा स्त्रीयांची अधिक तिक्ष्ण असते!! वासावरून नवरोबाने लावलेले दिवे बायको क्षणात ओळखते. मग ते मद्यपान असो वा केवळ पान असो! एवढेच नाही तर तुम्ही कोठे गेला होता हे ही ती ओळखते!!! (कृपया चांगल्या अर्थानेच वाचा)
मात्र गंधक्षमता वा गंधज्ञान केवळ माणसालाच असते असे म्हटले तर तुम्ही मला वेढ्यात काढून माझ्या बुद्धीची लांबी, रुंदी व खोली ओळखून पुढे हा लेख वाचणारही नाहीत एवढा माझा तुमच्यावर विश्वास आहे. . . . !!
याला म्हणतात विश्वास! !
मित्रांनो गंधज्ञानाची व एकंदरीत ज्ञानेंद्रियांची ही दुनिया फारच निराळी आहे. . . .
मानव व इतर प्राणी ज्ञानेंद्रियांद्वारे जगाचे ज्ञान अनुभवतात. एखादे ठराविक ज्ञानेंद्रिय एखाद्या ठराविक प्राण्यात अधिकच तिक्ष्ण असते. उदाहरणार्थ घार किंवा गिधाडासारख्या पक्षाची दृष्टी अत्यंत तिक्ष्ण असते. हे पक्षी जवळपास तीन किलोमीटर अंतरावरील उंदीर अथवा सस्यासारखे प्राणी टिपू शकतात! म्हणजे हे असे आहे की आपण इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून मुंगी पाहू शकतो!!!
वटवाघळे श्रवणात अत्यंत तिक्ष्ण असतात. लहानात लहान आवाज जो आपल्याला ऐकूही येत नाही तो ते ऐकतात व अति तिवृतेचा आवाज जो आपल्या कानांना सहनही होत नाही तोही ते ऐकू शकतात! सापासारखे प्राणी आपल्या जिभेचा वापर केवळ चविसाठी नाही करत तर ते जिभेने गंध घेऊन अन्न व शिकारी सोबतच शत्रुचेही स्थानही समजून घेतात! ते आपल्या प्रियकराला वा प्रेयसीला मिलनेच्छा गंधाने कळवतात व समजतात! ! हत्ती आपली सोंड हात म्हणून तर वापरतोच मात्र वास्तविक पाहता ते त्याचे नाक असते जे अत्यंत तिक्ष्ण असते. पृथ्वीवरील सर्वात लांब नाकाचा प्राणी असे त्याला म्हटले तर त्यात काही गैर नाही!!
मुंगीसारखा छोटा जीव गंध ज्ञानाद्वारे अन्नासोबतच आपले सहकारी मित्र शोधते व अगदी सैनिकी शिस्तीत चालणे, अन्न गोळा करणे व बांधकाम करणे अशी कामे करते. निरंतर उद्योगी मुंगी मिलेटरी शिस्तीत एकसंघपणे व कौशल्याने आपले काम करते!!
आपल्याला टाळ्या वाजवायला लावणारा किटक? ?? हं, डास. . त्याचे गंधज्ञान अत्यंत अप्रतिम आहे. कितीही अत्तर, डिओड्रंट व परफ्युमचा वापर केला तरी त्याला चकवा देता येत नाही उलट तोच आपल्याला चकवा देतो! !
या सर्व स्पर्धेत या सर्वांना मागे टाकतो तो कुत्रा.. कुत्र्याची गंध क्षमता माणसाच्या 44 पट अधिक आहे! ! तो त्याच्या हद्दीत आलेला कुत्रा त्याच्या मुत्राच्या गंधाने ओळखतो!! त्याच्या याच विलक्षण क्षमतेचा उपयोग आपण माणसे आपल्या फायद्यासाठी प्राचीन काळापासून घेत आलेले आहोत. निसर्गाची रचना आपल्या कल्पनेपलीकडील आहे. वरवर पाहता सारखेच वाटणारे झेब्रे, सारखे नसतात! ! प्रत्येक झेब्र्याच्या शरिरावरील पट्टे भिन्न भिन्न असतात! जसे आपल्या अंगठ्याचे ठसे भिन्न भिन्न असतात! आपले जसे ठसे भिन्न असतात तसेच शरिराचे वासही भिन्न असतात! कोणत्याच एका माणसाच्या शरिराचा गंध हा दुस-या माणसाच्या शरिराच्या गंधासारखा नसतो! कुत्रा एवढा अवलिया प्राणी आहे की तो गंधावरून भावना ओळखतो!! अर्थात आपला मुड कसा आहे? हेतू काय आहे? घाबरलेला माणुस, धिट माणुस, जिवंत माणुस व मृत माणुस तो गंधावरून ओळखतो! म्हणूनच गुन्हे अन्वेषणात संबंधीत यंत्रणा त्याचा खुबीने वापर करून घेतात. अपघातात मदत व बचाव पथके, जखमी व मृत अपघात गस्तांना शोधून काढण्यात कुत्र्याची अर्थात श्वानपथकाची मदत घेतात. आता तर संशोधक कुत्र्याला प्रशिक्षण देवून मानवी शरिरातील कर्करोगाच्या पेशी शोधण्यात त्याची मदत घेणार आहेत म्हणे! ! बर्फाळ प्रदेशात बर्फाखाली गाडले गेलेले मृतदेह शोधण्यात कुत्र्याची मदत होते ती त्याच्या गंध क्षमतेमुळेच!!
बरे हे झाले मानवासह इतर प्राणीमात्रांचे गंधज्ञान. . मात्र निसर्गाची अदभूत किमया एवढ्यावरच संपत नाही, वनस्पतींना देखील गंधज्ञान आहे! ! नाक नाही तरी! !! पिकणारी फळे गंधाद्वारे इतर फळांना पिकण्याचा संदेश देतात!  पाने जर आपल्यावर आळ्यांनी हल्ला केला तर इतर पानांना गंधाद्वारे धोक्याची सुचना देतात!  मग इतर पाने आपल्यातील ठरावीक रसायने स्त्राव स्वरूपात बाहेर सोडतात!! अमरवेल नावाची परजीवी वनस्पती आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. मृतदेहाचे अथवा इतर जिवंत वनस्पतीचे देहाचे शोषण करून जगणे हे तीचे वैशिष्ट्ये. कारण ती परजीवी अर्थात स्वतःचे अन्न स्वतः तयार न करू शकणारी वनस्पती आहे. तिच्या पानांमध्ये हरितद्रव्य (क्लोरोफिल) नसते. ही वनस्पती आपल्या आसपास पिकलेल्या टमाट्यांचा गंध ओळखून त्यांच्याकडे आकर्षित होते! !
आहे की नाही निसर्गाची किमया अदभूत आणि अविश्वसनीय? ? शेवटी एवढेच की नाक केवळ आपल्यालाच आहे असे नाही आणि ते केवळ नथीसाठीच आहे असेही नाही. . . . . .


लेखन :
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9096877345 / 9673945092

Thursday 9 June 2016

विरह

विरह....

पती-पत्नीचे नाते अत्यंत विलक्षण व जगावेगळे. ...
दोन वेगवेगळ्या घरात व कुळात जन्माला आलेले दोन जीव लग्नानंतर मात्र एकात्म होतात! !!
त्यातही स्त्रीचे जीवन म्हणजे एक तपश्‍चर्याच म्हणावी लागेल! ! स्वतंत्र नावाने वेगळ्या घरी वेगळ्या वातावरणात आयुष्याची साधारणपणे 18-25 वर्षे घालवलेली मुलगी लग्नानंतर मात्र स्वतःमध्ये एवढे बदल करून घेते की ती त्या पुरूषाची अर्धांगिनी कधी बनते? त्या कुटूंबरूपी गाडीचे दुसरे चाक कधी होते? हे लक्षातही येत नाही. ती सासरशी व पतीशी एवढी समरस होते, तेही हसतमुखाने मनापासून !! ती त्या कुटूंबामध्ये एवढी गुंतून घेते, की ती स्वतःलाही विसरून जाते. नाव बदलते आवडीनिवडी बदलते व पतीसाठी, कुटूंबासाठी स्वतःला अगदी पुर्णपणे वाहून घेते. जगाच्या पाठीवर हे चित्र केवळ भारतातच पहावयास मिळते. . .
जन्म एका घरात अन मृत्यू दुसर्‍या घरात! !!  विलक्षण आणि अदभुतच आहे ना? ??  तीची घराला अशी काही सवय लागते, की ती म्हणजेच घर व घर म्हणजेच ती!! ती जर घरात नसेल तर घर, घर रहात नाही. . आणि मग पतीची पत्नी विरहाने होणारी अवस्था? ?? भुक लागते पण घास गळ्याखाली उतरत नाही! झोप असते डोळ्यात पण पापण्या परस्परांना खेटत नाहीत!  डोके असते पण चालत नाही! मन असते पण लागत नाही !!! मन भुतकाळातील आठवणीत व डोळे वाटेकडे गुंतलेले असतात. विरहाच्या  वेदना मी व्यक्त करण्याऐवजी संदिप खरेंनी कशा व्यक्त केल्या आहेत पहा ना. ..

नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी, कल्लोळ तसा ओढवतो
हि धरा दिशाहीन होते, अन्‌ चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी, हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा, तव गंधावाचून जातो

तव मिठीत विरघळणार्‍या, मज स्मरती लाघव वेळा
श्वासांविण हृदय अडावे, मी तसाच अगतिक होतो

तू सांग सखे मज काय ,मी सांगू या घरदारा
समईचा जीव उदास, माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा, ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते, तुजवाचून जन्मच अडतो
.......

आई नंतर स्त्रीच्या पत्नी रूपाचे कौतुक करावे तेवढे कमीच. ....

शब्दांकन: बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9421863725 / 9673945092

रेणुका....

रेणुका:::::::::

ईक्ष्वाकू वंशात रेणू या नावाचा महापराक्रमी राजा होऊन गेला. भागीरथीच्या काठी कान्यकुब्ज शहरी राहून तो कारभार पाहात असे. पुत्रप्राप्तीसाठी त्याने शंकराची भक्ती केली. तेव्हा प्रसन्न होऊन शंकरांनी त्याला एक सर्वगुणसंपन्न अशी मुलगी व नंतर एक मुलगा होईल असा वर दिला. मग राजाने अत्री, वसिष्ठ इ. ऋषींना बोलावून यज्ञ आरंभला. पूर्णाहुती झाल्यावर यज्ञातून एक सर्वांगसुंदर कन्या निघाली. रेणू राजाने तिचे नाव रेणुका असे ठेवले. ही रेणुका म्हणजे पार्वती व कश्‍यप पत्नी अदिती या दोघींचा अवतार होय. याची कथा अशी
एकदा दैत्यांच्या त्रासाला कंटाळून सर्व देव विष्णूकडे गेले. त्यांनी विष्णूला पूर्वी त्यांनी हिरण्याक्षाचे वेळी घेतलेला वराहावतार, हिरण्यकश्‍यपूच्या वेळचा नृसिंहावतार व बळीच्या वेळचा वामनावतार यांची आठवण करून देऊन पुन्हा अवतार घेण्यासाठी विनंती केली. प्रसन्न होऊन विष्णू म्हणाले, "या वेळी अदितीचे उदरी मी पूर्णरूपाने अवतार घेणार आहे, तेव्हा तिने ते तेज सहन करण्याची तयारी करावी." हा निरोप घेऊन देव अदितीकडे गेले व त्यांनी आपापले तेज अदितीच्या गर्भासाठी दिले; पण ते पुरेसे नाही असे समजून तिने पार्वतीची तपश्‍चर्या सुरू केली. पार्वती प्रसन्न झाल्यावर अदिती म्हणाली, "विष्णू माझ्या उदरी अवतार घेणार आहेत, त्यांचे तेज सहन करण्यासाठी तू माझ्या शरीरात वास कर." पार्वती याला तयार झाली; पण शंकरांनी तिचे पती कश्‍यप यांच्या शरीरात वास करावा याची तजवीज करण्यास सांगितले. मग अदितीने शंकरांना प्रसन्न करून घेऊन वर मागितला, की आपण व कश्‍यप एकरूप होऊन माझा स्वीकार करावा. अशाप्रकारे शंकर व कश्‍यप तसेच पार्वती व अदिती एकरूप झाले. रेणू राजाच्या यज्ञातून बाहेर आलेली मुलगी म्हणजे अदिती व कश्‍यप यांची मुलगी जी पार्वती व अदिती या दोघींचा अवतार होय.
भागीरथीच्या तीरी कान्यकुब्जनगरीत रेणू राजाच्या यज्ञातून रेणुकेने जन्म घेतला . भृगुऋषींचा मुलगा च्यवन याचा मुलगा ऋचिक ऋषी गोदावरीच्या काठी राहत होता. त्याने सोमवंशी राजाची कन्या सत्यवती हिच्याशी विवाह केला. पुढे सत्यवतीच्या पोटी शंकर व कश्‍यप एकरूप होऊन जन्माला आले. ऋचिक ऋषीने त्या मुलाचे नाव जमदग्नी ठेवले. एकदा ऋचिक ऋषींच्या आश्रमात अनेक ऋषी आले व त्यांनी काशीयात्रेला जाण्याचा विचार केला. त्याप्रमाणे ते सर्व जण जमदग्नीला घेऊन यात्रेला निघाले. कान्यकुब्जनगरीचा राजा रेणू याने आपल्या मुलीचे स्वयंवर मांडले आहे असे कळल्यावर ते ऋषी समारंभ पाहण्यासाठी मंडपात गेले. अनेक देशांचे राजे, राजपुत्र रेणुकेच्या प्राप्तीसाठी आले होते. रेणुकेने त्या सर्वांसमोरूनच जाऊन केवळ समारंभ पाहण्यासाठी आलेल्या जगदग्नीच्या गळ्यात माळ घातली. हे पाहून सर्व राजांना संताप आला व त्यांनी रेणुकेला पळवून नेण्याचा विचार केला. त्याप्रमाणे त्यांनी सैन्य एकत्र करून रेणू राजाशी युद्ध पुकारले. त्या मोठ्या सैन्याबरोबर लढून आपल्याला विजय कसा मिळणार, अशी रेणू राजाला चिंता वाटू लागली. तेव्हा जमदग्नीने आपले क्षात्रतेज प्रकट केले. त्याने आपल्या विलक्षण युद्धकौशल्याने सर्व राजांना पळवून लावले.
मग रेणू राजाने जमदग्नी व रेणुकेचा थाटामाटात विवाह करून दिला. त्याने जमदग्नीला घोडे, हत्ती, रथ, शहरे, रत्नभांडार इ. देऊन कन्यादान केले व भागीरथीच्या काठी राहण्याची विनंती केली. या समयी इंद्राने जमदग्नीला कामधेनू व कल्पतरू दिला. जमदग्नी रेणुकेसह भागीरथीच्या काठी राहू लागला.
पुढे रेणुकेच्या पोटी भगवंतांनी परशुरामाच्या रूपात अवतार घेतला.

टिप : मित्रांनो हे विचार माझे नाहीत व ना ही शब्द माझे आहेत. मी केवळ कागदावरील मॅटर टाईप करून आपल्या सेवेत सादर केले आहे.

संकलन व लेखन:
बालासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9421863725 /9673945092

Tuesday 7 June 2016

सायबर विश्व. .....

सायबर विश्व...

एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीपासुनच प्रसार व प्रचार माध्यमांना (प्रिंट व इलेक्ट्रॉनिक) मागे टाकत सोशल मिडिया हा नवा माध्यम प्रकार समोर आला आहे. श्रीमंत युरोपियन देशांमधुन सुरू झालेला याचा वापर पाहता पाहता जगभरातील सर्वच श्रीमंत देशांसह गरीब देशांमधुनही मोठ्या प्रमाणावर होताना दिसतो आहे. आज रोजी जगात असा एकही देश नसेल बहुदा,  जेथे सोशल मिडियाचा प्रभाव पडला नाही. भारतात तर महानगरे, शहरे, खेडे ते अगदी वाड्या, वस्त्या, तांडे व पाड्यांपर्यंत याने मजल मारली आहे. समाजातील सर्व स्तरातील, सर्व वयोगटातील स्री-पुरूष, मुलं-मुली व्हाॅट्सअॅप, फेसबुकशिवाय बोलत नाहीत. हे माहीत नसणारे लोक शोधावे लागतील, सापडणार नाहीत असे नाही मात्र फार मोजकेच! !! त्याचे कारणही तसेच आहे, एकाच वेळी हजारो लोकांच्या संपर्कात राहणे यामुळे अगदी सहज शक्य होत आहे. शिवाय डेटा हस्तांतरणासाठीही याचा वापर होतो. कमी वेळात जास्त अंतरावर तात्काळ एखादी फाईल पाठवणे सोयीचे झाले आहे.
बदलत्या काळानुसार काळासोबत राहणे कधीही स्वागतार्हच म्हणावे लागेल. हायटेक व टेक्निकली अपडेटेड असणे प्रगत समाजाचे लक्षण असते. सोशल मिडिया सोबतच सोशल नेटवर्किंगही आपले पाळेमुळे मजबूत करत आहे. सोशल मिडियाचा वापर टेक्स्ट, ऑडिओज, व्हीडीओज, इमेजेस इत्यादी शेअर करण्यासाठी तसेच लाईव्ह चॅटिंग साठीही केला जात आहे. ज्यामुळे आपण जणूकाही खिशात जग टाकून फिरत आहोत असे वाटते. हा वापर म्हणजे या मिडियाचा चांगला वापर म्हणता येईल पण याच मिडियाचा वापर काही गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसे चुकीच्या पद्धतीनेही करत आहेत. ज्यामध्ये फसवेगीरी करणे, अफवा पसरवणे, भावना भडकवणे,खोटा प्रचार करणे लैंगिक छळवणूक करणे (Sexual Harassment ) इत्यादीसाठीही केला जात आहे.
काही मानसिकदृष्ट्या विक्षिप्त लोक, स्वतःचे सुख पाशवी पद्धतीने मिळवण्याचा प्रयत्न करतात. देव जाणो पण यांना महीला मुलींना काहीतरी अश्लील ऐकवून वा दाखवून काय राक्षसी आनंद मिळतो किंवा काय मोठेपणा मिळतो कळत नाही. सोशल गृपमध्ये ब-याचदा एकाच कुटुंबातील सर्व सदस्य असतात. बरे,  यातुन संबंधित काहीतरी अश्लील टाकणा-यांची बदनामी होत नाही का?  त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत नाही का? याची त्यांना एक तर कल्पना नसावी अथवा मग फिकीर नसावी.
बहुतेक वेळा हा प्रकार सोशल मीडियाची भाषा इंग्रजीचे कमी ज्ञान असल्याने तसेच तांत्रिक बाबींची तितकीशी माहीती नसल्यामुळे अनावधानानेही होतो. मात्र यावर उपाय देखील शोधायला हवेतच ना? मी अशा प्रकारांत  आतापर्यंत अनेकांशी बोललो तेव्हा त्यांचे असे म्हणणे आले की, यातले मला काही कळत नाही, मी हे केलेच नाही, हे शक्यच नाही, कसे झाले समजत नाही. ब-याचदा खाते हॅकही केले जाते !! हे जरी खरे असले तरी सायबर जगात जेथे व्यवहार युजर आयडी व पासवर्ड शिवाय होत नसतात तेथे हे मी केले नाही असे म्हणता येत नाही. बोटे जरी आपली नसली तरी खाते आपले असल्याने तो व्यवहार देखील आपण केलेला आहे असे समजले जाते. समजत नसेल तर एटीएम व्यवहार लक्षात घ्या. असे असतानाही काही लोक याबाबतीत पराकोटीचे बिनधास्त व गाफील असल्याचेही निदर्शनास आले आहे. आपला कोणताही युजर आयडी व पासवर्ड (फेसबुक, नेटबॅकींग, इमेल व इतर अनेक ) अत्यंत गोपनीय ठेवायला हवा. ती काही पब्लिक करण्याची अथवा शेअर करण्याची गोष्ट नाही. शिवाय आपला मोबाईल तोही इंटरनेट कनेक्टेवीटी असलेला !! एखाद्या मिसाईल प्रमाणे हायली लोडेड असतो  असे म्हटले तर नवल वाटायला नको. कारण त्याचाही तितकाच घातक वापर केला जाऊ शकतो व आपण अडचणीत येऊ शकतो.
फेसबुक बाबतीत गोपनीयता व सुरक्षितता  (Privacy & Setting) वर लक्ष असायला हवे. ते setting वेळोवेळी update करायला हवे. सोशल नेटवर्किंग व मिडिया बाबत आपण संक्रमणावस्थेत आहोत. आणखी आपले ज्ञान अपुरे व अपरिपक्व आहे, तसा तांत्रिक बाबतीत कोणीही कधीही परिपूर्ण असु शकत नाही. कारण या जगात दररोज बदल होत असतात. नवे नवे softwares वापरायचे कसे हे लक्षात येत नाही. साधारणपणे असे दिसते की एखाद्या गृपचा प्रमुख अर्थात Admin  हा Technically हुशार असतो , तेव्हा तो गृप सुरक्षित ठेवणे, त्यासाठी आवश्यक Settings करणे, प्रसंगी कठोर कारवाई करणे हे त्याचे कर्तव्य असते. उदा. Post verification & approval.
यामुळे होते काय की post तो स्वतः तपासुन पहातो व योग्य असेल तरच Display करतो. आणि मग एखादी पोस्ट जी अनुचित आहे, मग ती जाणुनबुजून टाकलेली असो अथवा अनावधानाने आलेली असो, ती पब्लिक होत नाही व नाहक मानसिक त्रास गृपला व सेंडर यांना होत नाही. प्रसंगी अशा मोकार सदस्यांना Remove करायला हवे आणि असे होत नसेल तर मग आपणच तशा गृप्सना leave करायला हवे.
आणि एवढे करूनही पुरेसे नाही झाले तर सायबर सुरक्षा आणि सोशल मिडिया दुरूपयोग संदर्भात भारत सरकारने व महाराष्ट्र शासनाने कठोर कायदेशीर तरतूदी केल्या आहेत. वरीलप्रमाणे कृत्ये करणारांची तक्रार पोलिसांकडे करायला हवी. अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी तज्ञांचा समावेश असलेला स्वतंत्र विभाग  (Cyber crime cell ) आहे. यासाठी स्वतंत्र कायदे ठआहेत. आणि आता तर असेही ऐकायला मिळत आहे की लवकरच अशा प्रकारच्या केसेसची सुनावणी स्वतंत्र cyber courts मध्ये होणार आहे. त्यामुळे मित्रांनो सजग रहा, सुरक्षित रहा. . . . . .

शब्दांकन : बालासाहेब सिताराम  (बी.एस.) धुमाळ
मो. 9421863725 / 9673945092

Saturday 4 June 2016

पर्यावरण संरक्षण by Balasaheb Dhumal

पर्यावरण संरक्षण......
नमस्कार मित्रांनो, आज 5 जून अर्थात जागतिक पर्यावरण दिवस. आजच्या मानवाने म्हणजे आपण स्वार्थापायी पर्यावरणाचा नाश करण्याचा सपाटा लावला आहे. मात्र आपल्या हे लक्षात येत नाहीये की आपण पर्यावरणाचा नाश म्हणजे पर्यायाने आपलाच विनाश करून घेत आहोत. पर्यावरण रक्षण ही जबाबदारी आता सर्वांवरच येवून ठेपली आहे. त्यातही मला वाटते या बाबतीत तरूणांना अधिक गंभीर होण्याची गरज आहे.
बदलत्या काळात पर्यावरणतील वाढत चाललेला कार्बन डॉयऑक्साईड सध्या सर्वांचीच डोकेदुखी बनला आहे. जगभरात जवळपास 100 पेक्षा जास्त देशामध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. यामागील मुख्य उद्देश्य इतकाच की, जगातील प्रत्येक माणसामध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करणे आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेणे. यामागील हेतू हा की बदलत चाललेले हवामान आणि वातावरणातील कार्बनचे वाढते प्रमाण याविषयीची जाणिव आपल्याला व्हावी.
जागतिक पर्यावरण दिवस वेगवेगळ्या पद्धती साजरा केला जात आहे. जगातील प्रत्येक व्यक्तीने सहकार्य करुन वाढते कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण कमी होऊन ऑक्सीजनचे प्रमाण वाढण्यास नक्कीच मदत होईल. हवामान बदलातील फरक लक्षात घेता शितगृहातून निघणार्‍या क्लोरे-फ्लुरो कार्बन (सी. एफ. सी.)
वायूचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. पर्यावरणाविषयक जनजागृती करण्यासाठी सभा, संमेलने, चर्चासत्रांचे आयोजन करणे गरजेचे आहे. घनकचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावणे, घातक वायू गळतीला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करणे, कारखान्यांच्या धुरांड्यातून तसेच वाहनांमधून होणार्‍या उत्सर्जनाची रासायनिक तपासणी व त्यावरील उपाय यांचे काटेकोरपणे पालन करणे.
तलाव धरणे सरोवरे व समुद्र यांचे संरक्षण करून तेथील वन्यजीवांचे संरक्षण व विकास यावर भर देऊन त्याचे महत्त्व जनमानसात पटवून देणे गरजेचे आहे. नद्यांचे प्रदूषण शहरी सांडपाण्यामुळे होत असल्याने त्या विषारी बनत आहेत. त्यासाठी त्या ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. पर्यावरण व प्रदुषणासंदर्भात केंद्र व राज्य शासनाने संमत केलेल्या अधिनियम व नियमावलीचे काटेकोर पालन करणे या प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविल्यास आपण खर्‍या अर्थाने पर्यावरणाच्या समृद्धीच्या दिशेने वाटचाल करु, यात शंका नाही.
पर्यावरण दिनानिमित्त आपल्या हाती असलेले कार्य आपल्या घरापासूनच सुरू करायला हवे. जसे की पुन्हा पुन्हा वापरात येऊ शकणार्‍या वस्तू ज्यात पेपर, काचेच्या वस्तू, धातुच्या वस्तु, प्लॅस्टिक व फायबरच्या वस्तु,  मोटर ऑईल अशांची पनुर्निर्मिती करायला हवी. हातांनी जे काम करु शकतो ते काम इलेक्ट्रीक उपकरणाशिवाय करायला हवे . शक्य असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याचा वापर करणे, प्लॅस्टीक पिशव्यांऐवजी परत परत वापरता येणार्‍या कागदी पिशव्या वापरणे, अन्न आणि भाजीपाला प्लॅ‍स्टीकमध्ये न ठेवता सुती कपड्यात ठेवणे, पाण्याचा गैरवापर करणे थांबवणे,  गरज नसल्यास घरातील टी.व्ही., बल्ब तसेच अन्य इलेक्ट्रीक उपकरणाचा वापर थांबवणे, कमी विजेची उपकरणे वापरणे, घरातून बाहेर पडताना पाण्याचा हिटर, पंखा, विजेचा दिवा बंद करणे, इत्यादिंसारखे उपाय अवलंबावयास हवेत. याशिवाय आणखी एक पाऊल पुढे जावून, पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे काम करणार्‍या एखाद्या स्वयंसेवी संस्थेचे सभासद होऊन पर्यावरण वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व संवर्धन करणे, पाणी अडविणे व जिरविणे , पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पुनर्भरण करणे, कमी पाण्याची पिके घेणे इत्यादी प्रातिनिधिक उपक्रम हाती घेऊन तसे लोकमत तयार करून श्रमदानाचा वापर पर्यावरण रक्षणासाठी करून घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
आपला देश सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर असताना आपण पर्यावरणाच्या प्रगतीकडे डोळेझाक करुन चालणार नाही.मानव निसर्गावर अन्याय करतो हे आपण त्सुनामी, सागरी वादळे, भूकंप, ढग फूटी, महापूर, दुष्काळ रोगराई अशा अनेक नैसर्गिक प्रकोपाद्वारे जाणवला आहे. हे सर्व लक्षात घेऊन प्रत्येक व्यक्तीने वरीलप्रमाणे उपक्रम राबविल्यास आपण पर्यावरणाचा समतोल राखू आणि खर्‍या अर्थाने समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू करू शकू.
आपण तात्पुरताउपाय शोधायचा प्रयत्न करतो, त्यामुळे समस्या सुटत नाहीत उलट निर्माण होतात.
वि. स. खांडेकर म्हणतात, 'कुठलीही मानवी समस्या कधीही कायमची सुटू नये हा जीवनाचा अलिखित नियमच आहे. आजच्या समस्या आपल्याला सुटल्यासारख्या वाटतात पण त्या सुटतात उद्याच्या नविन समस्यांना जन्म देऊन. ...
त्यामुळे ही सुंदर वसुंधरा जी आपल्याला आपल्या पुर्वजांनी दिली आहे तीचा उपभोग घेताना तिला ओकसाभोक्षी ओरबाडून चालणार नाही कारण आपल्याला ती आपल्या पुढच्या पिढीला हस्तांतरित करायची आहे. आपण हीचे मालक नसुन केवळ केअर टेकर आहोत. ...


शब्दांकन : बालासाहेब सिताराम  (बी. एस.) धुमाळ.
मो. 9421863725/9673945092

तेंव्हा पैसा खुजा वाटतो....

तेव्हा पैसा खुजा वाटतो….

मित्रांनो नुकतेच माझे चुलत सासरेबुवा श्रीमान गणपतराव पांडूरंग जाधव वय साधारणपणे 65 वर्षे राहणार पारगांव मोटे ता.वाशी जि. उस्मानाबाद हे
–हदय विकाराच्या तीव्र झटक्याने अचानक व तडकाफडकी  या जगाला सोडून गेले. वर चुलत सासरेबुवा   असा जो शब्द वापरला आहे तो केवळ सख्या सासरेबुवांना, त्यांच्या नातेवाईकांना अथवा  त्यांच्या मित्र परिवाराला वाईट वाटू नये म्हणून. एरवी मी कोणतेही नाते चुलत, मावस, आते, मामे किंवा सावत्र वगैरे मानत नाही. माझे चुलत सासरे गणपत मामा हे अत्यंत गरीब, हातावर पोट असणारे, पाच मुलींचे व एका अयशस्वी मुलाचे वडील, अयशस्वी म्हणायला मला ही दु:ख होत आहे पण सत्य हे सत्यच असते ना ? आज गणपतमामा या जगात  नाहीत याचे श्रेय जर त्यांच्या मुलाला दिले तर अतिशोक्ती ठरणार नाही!! अर्थात एवढया एकाच कारणाने त्यांना –हदय विकाराचा झटका आला नाही. पाच पैकी दोन मुली अल्प वयात अकस्मात ईश्वराला प्रिय झाल्या, सख्या भावाला त्याच्या दोन मुलींच्या लग्नाच्या अगोदरच्या दिवशी देवाने बोलावले व प्रामुख्याने गरीबी या संकटांचा सामना करता करता त्यांच्या कोमल -हदयाचा कुठपर्यंत निभाव लागणार होता? वर उल्लेख  केलेप्रमाणे गणपतमामा हे माझे जरी 'चुलत' सासरे होते तरी त्यांनी मला कधी ही चुलत जावाई अशी वागणूक दिली नाही. मी माझ्या 11 वर्षाच्या जावाई कालावधीत कधीही त्यांच्या घरुन टॉवेल टोपी शिवाय, बायको साडी चोळी शिवाय व माझी दोन अपत्य पाप्यांशिवाय आली नाहीत. जशी असेल तशी धशी व चोळी बांगडी ती ही मनपुर्वक व प्रेमपूर्वक ते मला करत. हे सांगण्यामागचे प्रयोजन माझा मोठेपणा सांगणे हा आहे असे वाटत असेल कोणाला तर माझे दुर्दैव पण त्यांचा मोठेपणा सांगणे हे माझे कर्तव्य नव्हे तर माझे सौभाग्य समजतो आणि तो सांगितला नाही तर तो त्यांच्यावर अन्याय व माझी कृतघ्नता होईल. ते केवळ माझ्यासाठीच चांगले निश्चित नव्हते. कारण चांगली माणसे ही सर्वांसाठीच चांगली असतात. ज्यांना त्यांच्या चांगुलपणाचा प्रत्यय आला ते त्यांची प्रतिक्रिया निश्चित देताहेत किंवा देतील. पण केवळ दुधाचा चहा पाहुण्यांना मिळावा म्हणुन भर उन्हात गावभर दुध शोधणारे माझे चुलत सासरेबुवा गणपतमामा मला दिसतात. पण माझ्या डोळयातील पाणी हे लिहित असताना मी आपणास दाखवू शकत नाही व आपण ते पाहू शकत नाहीत.
       दगडा मातीच्या घरात राहणा-या गणपतमामांचे माझ्यावरीलच नव्हे तर सर्वांवरीलच असणारे प्रेम दाखण्यासाठीच हा शब्द प्रपंच नाही तर खटाटोप आहे तो प्रत्यय सांगण्याचा जो मला ते गेल्यानंतर आला…
       ते गेले, सर्वांनाच जायचे आहे. कुणीही या पृथ्वीवर कायम स्वरुपी वास्तव्याचे परमिट घेवून जन्मास आलेला नाही. मृत्यु जे एक अटळ व शाश्वत सत्य आहे. जीवणरुपी प्रवासाचे ते एक शेवटचे स्थानक आहे. ते कोणीही नाकारु शकत नाही. उलटपक्षी मी असे म्हणेण की, गणणतमामांना खुप चांगला मृत्यु आला. धन्यवाद म्हटले पाहिजे त्या देवाला ज्याने –हदयविकारासारखा आजार बनविला. झटपट रामराम, ना शरीराची झिज, ना प्रतिक्षा मृत्युची! मला ही यावा तर असाच मृत्यु यावा, अगदी तडकाफडकी! पण मी पुराण वाड.यातुन असे वाचुन आहे की, असा तडकाफडकी मृत्यु केवळ पुण्यात्मांनाच येतो आणि म्हणूनच या पुण्यात्माच्या अंत्यविधीस अगदी मध्यरात्री देखील शेकडो किलो मीटरचा प्रवास करुन शेकडो मैलांवरून मिळेल ते वाहन मिळवून शेकडो लोक हजर झाले. ही त्यांची कमाई होती. मरणा दारी की तोरणा दारी, म्हणजे माणसाची आपली माणसे अथवा त्याची प्रतिष्ठा तपासायची असेल तर सु:खद वा दु:खद क्षणीच तपासावी, पण मी म्हणेल की, ती केवळ मरणादारीच तपासावी. कारण सुखाचे सोबती तर सगळेच असतात, दु:खात सर्वजण सोडून जातात. पण गणपतमामाला कोणीही सोडले नाहीत. बुध्दीजीवी, श्रीमंत, उच्च शिक्षित, गोरगरीब असे सर्व जाती धर्मातील स्त्री- पुरुष अबाल वृध्द मोठया संख्येने जमा झाले. शेवटचा आधार (खांदा देणे) साठी नंबर लावू लागले. अनेकांना खांदा दयायला प्रतिक्षा करावी लागली. मी काही बोलू शकलो नाही पण माझे डोळे बोलत होते, त्यांना आठवून साश्रू श्रध्दांजली अर्पण करत होते. माझ्या सोबत अनेकजणांची स्थिती हीच होती. मृत देहाच्या दहनाचा अंतिम विधी अटोपून अनेकजण स्वगृही गेले, अनेकजण खेडयातील रस्त्यांवर नाली शेजारी उघडयावर झोपले. झोप होती डोळयात पण ती आली नाही मला. केवळ हाच विचार येत होता मनात की, मी एक शासकीय नोकरदार, चारचाकी मध्ये फिरतो, क्विचीतच ए.सी. शिवाय! लोक म्हणतात मी एक श्रीमंत व्यक्ती आहे अर्थात मी मानत नाही पण मी निश्चितच गरीब नाही पैसाने. पण गणपतमामा, हे अत्यंत गरीब होते ना ? एवढे लोक का आले अंत्यविधीला ? का हळहळत आहेत सर्वजण ? उत्तर एकच की ते आर्थिकदृष्टया दरिद्री होते पण मनाने व विचाराने अत्यंत धनाढय होते आणि गरीब असूनही  श्रीमंता पेक्षाही श्रीमंत होते. त्यांच्यावर प्रेम करणा-यांमध्ये केवळ पाहूणे आणि नातेवाईकच नव्हे तर इतर जाती धर्माचे लोक ही होते. या सर्वांशी त्यांचे अत्यंत प्रेमपूर्ण संबंध होते. ते एक अजात शत्रू होते (त्यांचे कोणीही शत्रु नव्हते.) मग प्रश्न हा पडतो की, मनुष्य प्राणी आजन्म आपल्या नावासमोरील संपत्तीच्या आकडयासमोरील शुन्य वाढविण्यासाठी धडपड करतो त्यासाठी न्याय नितीला पायदळी तुडवतो तरीही श्रीमंत होत नाही. तो स्वत:ला श्रीमंत समजतो हा भाग निराळा पण मग अशी गणपतमामांसारखी आर्थिक दृष्टया दरिद्री माणसे कशी काय श्रीमंत बनतात ? बरे, विशेष न शिकलेल्या लोकांना आपण आडाणी समजतो आणि तेच लोक ज्ञानाचे धडे देवून जातात! मग खरे श्रीमंत कोण? ते का आपण ? खरे ज्ञानी कोण? ते का आपण ?  तर निश्चित तेच कारण श्रीमंती मनाची असो की, धनाची ती एक भौतिक नव्हे तर भावनिक व मानसिक स्थिती आहे. गणपतमामांना अखेरचा निरोप देवून जेव्हा त्यांच्या गत वास्तवाच्या ठिकाणी अर्थात त्यांच्या घरी परत आलो तेव्हा हे कळून चुकलो अशी माणसेच खरी माणसे असतात व माणूस म्हणून जगून आपला ठसा सोडून जातात. आपण मात्र व्यावसायिक म्हणून येतो व शुन्यांची भर पाडण्याच्या प्रयत्नात दरिद्री म्हणून मरतो.
       जेव्हा हातोहात अंत्यविधीची तयारी होते, जेव्हा शेकडो लोक शेकडो मैलावरुन अर्ध्या रात्री ग्रामीण भागात येतात, जेव्हा खांदा देण्यासाठी बारी लागते, जेव्हा डोळयांना रडण्याचा आव आणावा लागत नाही, जेव्हा जवळच्या नातेवायकांना दवाखाण्यात ॲडमिट करावे लागते, जेव्हा लोक पायांना वाहन बनवतात, जेव्हा लोक रात्र जागून काढतात, जेव्हा रडणारी डोळे व थरथरणारे ओठ रडू नका त्यांना त्रास होईल म्हणतात, जेव्हा पदसिध्द, पैशावाली व प्रतिष्ठीत माणसे खाली माना घालतात तेव्हा मला पैसा खुजा वाटतो.
       ज्याच्या मागे माणूस आयुष्य भर पळतो, ज्याच्यामुळे माणूस माणूस रहात नाही, जेव्हा माणसाला याचा ही विसर पडतो की, क्या तु लेकर आया था, क्या लेकर जायेगा ? खाली हाथ आया था और खाली हाथ जायेगा. हे सर्व यथेच सोडून जायचे असून ही व पैश्यामुळे मिळणारा मोठेपणा जो क्षणिक व भ्रामक आहे. हे माहित असून ही पैश्याला महत्व देतो. तेव्हा मला पैसा खुजा वाटतो. माणूस वेळेला आयुष्यभर पैश्याची ताकद दाखवतो व वेळ माणसाला एकदाच पैश्याची मर्यादा दाखवते. तेव्हा  मला पैसा खुजा वाटतो.
       पैसा निश्चित कमवायला हवा, पद पैसा व प्रतिष्ठा या त्रयींचा जवळचा संबंध आहे. पदाने पैसा व पैशाने प्रतिष्ठा अर्थात मान-सन्मान मिळतो हा समज जेव्हा गणपतमामांसारखी माणसे स्वजिवणातून गैरसमज म्हणून सिध्द करतात व हे दाखवून देतात की, पद व पैश्यांशिवाय ही मान-सन्मान मिळू शकतो तेव्हा मला पैसा खुजा वाटतो.
       सर्वांनाच एक दिवस मातीत मिसळायचे आहे. हे जग सोडून जायचे आहे. सर्वांच्याच चितेला मुखाग्नी दिला जाणार आहे, मग लाकडे साधी असतील वा चंदनाची असतील जळायचे सर्वांच आहे. मागे रहणार आहेत ते आपले विचार, शब्द व नाते वास्तविक पाहता गणपतमामांकडे काळा तर सोडाच पण पांढरी  ही कवडीही नव्हती तरी ही ते एवढे श्रीमंत कसे  तर त्याचे उत्तर एकच आयुष्यभर सेवाभाव जपून मानवता हिच खरी श्रीमंती या सुत्राचे त्यांनी कायम पालन केले म्हणून.... माणसाने बुध्दीने, शरीराने व मनाने श्रीमंत असावे ( Head, Hand and Heart) पण आपल्या नावासमोरील संपत्ती मध्ये शुन्यांची संख्या वाढविण्यात धन्य मानणा-यांना जिथे वरील प्रकारच्या श्रीमंतीचा अर्थच समजत नाही तिथे अश्या श्रीमंतीचे ते महत्व काय समजणार ? गणपतमामांकडे होते ते प्रेमाचे दोन शब्द आणि त्यामुळे जोडली गेलेली प्रेमाची चार माणसे!! कारण त्यांना हे माहित असावे कदाचित की, पैसा हे जीवण जगण्याचे साधन आहे जीवणाचे साध्य नाही. कदाचित ते हे ही जाणत असतील जे कबीर सांगून गेले की,
जब हम पैदा हुए, जग हसे हम रोये
एैसी करणी कर चलो, हम हसे जग रोये II

शब्दांकन : बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ

मो. – 9421863725 / 9673945092  

Sunday 8 May 2016

गोंधळ

महाराष्ट्राची प्राचिन परंपरा गोंधळ आणि गोंधळी।

लग्न समारंभ , नवीन घर बांधणे किवा विकत घेणे नवरात्र गृहप्रवेश ईत्यादी शुभ मंगल प्रसंगी व आपल्याला होणाऱ्या आनंदात दुसऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी गोंधळ हा कार्यक्रम ठेविला जातो.

या कार्यक्रमामध्ये गोंधळी लोक सर्व देवीदेवतांचे नाव घेतात.त्यांना गोंधळास येण्याचे आवाहन करतात. या कार्यक्रमामध्ये सर्वाना अन्न दान केले जाते.

महाराष्ट्रातील लोककला या प्रकारात किर्तना नंतर गोंधळाला विशेष म्हणजेच अनन्य साधारण महत्त्व आहे. गोंधळ आणि गोंधळी प्राचीन काळापासून लोककला प्रकारात मोडली गेली आहे. विशेषत: तुळजाभवानी आणि रेणुकामाता या देवींच्या संदर्भात गोंधळ घालण्याची पिढीजात परंपरा आहे. कालांतराने अन्य देवींच्या बाबतीतही गोंधळ घालण्याची प्रथा सुरु झाली.

अंगात तेलकट झबला, कपाळावर कुंकू, गळ्यात देवींची प्रतिमा व कवड्यांची माळ अशा वेशभूषेत आपल्या दारावर आलेली व्यक्ती म्हणजे गोंधळी. अंबेमातेच्या जयजयकार करीत ही व्यक्ती संबळ आणि तुणतुणे या वाद्यांच्या साहाय्याने विविध देवींचे गाणे सादर करतो. संबळाच्या तालावर नृत्यही करतो. त्याला 'संबळ गोंधळ' म्हणतात. तर काही गोंधळी काकडे पेटवून गोंधळ घालतात. ज्याला 'काकड्या गोंधळ' असे म्हटले जाते.

आजही कोणत्याही शुभकार्याअगोदर जवळपास सर्व समाजात कुलदेवतेला प्रसन्न करण्यासाठी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. हा लोकविधी सादर करताना निरनिराळ्या देवतांना गोंधळी गोंधळाला येण्याचे गाण्यातूनच आवाहन करतात. ज्यांनी गोंधळ घालण्यासाठी बोलावले असेल तेथे जोंधळ्याच्या ताटाचे तिकाटणे उभे करतात, दिवटे पेटवतात. दिवटी हातात घेऊन संबळाच्या तालावर गीत आणि नृत्य सादर करतात. हे ऐकताना विशेष आनंद होतो.

उदा.

अंबे जोगवा दे जोगवा दे
माय माझ्या भवानी जोगवा दे ।

हे जसे भक्तीची भक्ती करणारे गीत आहे तसे-

मी मिरचीचे भांडण ।
एका रोज खटखटीन जी ॥
मिरची अंगी लईच ताठा ।
म्हणतिया मी हाई तिखटजी ॥

असे विनोदी गीतही सादर केले जाते.

उदा.
रत्नागिरी ज्योतिबा ।
गोंधळा या हो ।
तुळजापूरची अंबाबाई गोंधळा या हो।
पंढरपूरचे विठोबा गोंधळा या हो ।

असे गीत गाऊन आमंत्रित केले जाते. त्यात वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. सर्वसाधारणपणे रात्री ९ च्या सुमारास सुरु झालेला गोंधळ पहाटेपर्यंत सुरू असतो. यासाठी कुठलाही रंगमंच लागत नाही. घरापुढील आंगण, ओटा चालतो. रंगभूषा आणि नेपथ्यही नसते. संत साहित्यात देखिल गोंधळाचा उल्लेख आढळतो.

संत एकनाथांनी -

द्वैत सारूनि माळ मी घालिन।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन।
भेदरहित वारीस जाईन।

असा जोगवा मागितला.

असा हा गोंधळ महाराष्ट्रात विशेष लोकप्रिय आहे. आजही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात गोंधळ परंपरा पाहावयास मिळतो .

Only collecter

मातृभक्त परशुराम by Balasaheb Dhumal

=======मातृभक्त परशुराम======

            आज भगवान परशुराम महाराजांची जयंती आहे. भगवान परशुराम जे विष्णुचे सहावे अवतार होते ते आपल्या आईवर अत्यंत प्रेम करत असत. पिता जमदग्नी  ऋषी व माता रेणूका यांचे ते पाचवे पुत्र होते, अशी आख्यायिका आहे की, त्यांच्या आश्रमातुन ते आश्रमाबाहेर असताना तेथील राजा सहस्त्रार्जुन याने आश्रमातील कामधेनू नावाची गाय आश्रमावर हल्ला करुन व जमदग्नी ऋषींचा वध करुन पळवून नेली. पतीच्या निधनाने माता रेणूका सती गेली. आईच्या विरहाने व्याकुळ भगवान परशुराम  शोक करु लागले . तेव्हा त्यांचे मातृप्रेम पाहून आकाशवाणी झाली की "तुला तुझी आई भुमीतून वर येवून दर्शन देईल मात्र तु मागे वळून पाहू नकोस". मात्र काही वेळाने परशुरामांनी मागे वळून पाहीले तेव्हा माता रेणुकेचे फक्त डोके वर आले होते. म्हणून आजही आपण रेणुका मातेचे फक्त शिर अर्थात 'तांदळा' एवढेच रुप पाहतो.
अशी ही आख्यायिका आहे की, पुजेला नदीवर पाणी आणायला गेलेल्या रेणुका मातेला यायला उशिर झाला म्हणून संशयाने क्रोधीत होऊन जमदग्नी ऋषींनी आपल्या मुलांना मातेचे शिरच्छेद करण्याची आज्ञा केली. मात्र पाचही पुत्रांनी नकार दिला, त्यांचा जमदग्नीने वध केला. सहावा पुत्र परशुराम हा अत्यंत बुध्दीमान, शुर व आज्ञाधारक होता. वडीलांचा राग ओळखून त्याने मातेचा शिरच्छेद केला. त्या नंतर पित्याकडून वर मागून भावंडासह मातेस जीवंत केले. येथे जमग्दनी ऋषींच्या क्रोधाचे कारण रेणुका मातेने तुलसी बागेकडे दुर्लक्ष केल्याने बाग करपली. म्हणून जमग्दनी क्रोधीत झाले असे ही सांगितले जाते.
तिसरी एक आख्यायिका अशी आहे की, पुत्र परशुरामाकडून आपल्या पत्नीचे शिर उडविल्या नंतर जमग्दनी ऋषी पत्नी विरहाने व्याकूळ झाले व पश्चातापाच्या आगीत होरपळून पुत्र परशुरामाला रेणुका मातेला जीवंत कर म्हणून विणवणी करु लागले. तेव्हा परशुराम महाराज, मातेचे शिर जे उडून स्वर्गात गेले होते त्याच्या शोधात स्वर्गात जातात व देवांशी चर्चा करुन यावर उपाय शोधतात. देव गणांनी त्यांना मातेच्या शिराचा जागर करण्यासाठी गोंधळ घालण्याचे सुचविले. मग ब्रम्हा विष्णु महेशासह भगवान परशुरामांनी विश्वातील पहिला 'गोंधळ' स्वर्गात घातला.  अशाप्रकारे देवीचा गोंधळ अस्तिवात आला व तो घालणारी गोंधळी जात जन्मास आली. म्हणजे 'भगवान परशुराम हे आद्य गोंधळी होते' असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मात्र माता रेणुका आपल्या मागे खरोखरच येतेय का ? या कुतूहलातून परशुरामाने मागे वळून पाहिले आणि माता रेणुका तेथेच लुप्त झाली. ते ठिकाण म्हणजे आजचे माहूर जे पूर्वी मातापूर म्हणून ही ओळखले जात होते.
अशा अनेक आख्यायिका आहेत. मात्र आख्यायिका अनेक असल्या तरी भगवान परशुराम हे अत्यंत विदवान, शुर, आज्ञाधारक व मातृप्रेमी पुत्र होते हे स्पष्ट होते. आज त्यांची जयंती भारतभर व भारताबाहेरही अत्यंत हर्षोल्हासाने साजरी केली जात आहे. "गोंधळी" जात ही मातेची भक्त असल्याने गोंधळी समाज बांधवांत तर आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे.
आजच्या दिवसाचे आणखी एक विशेषत्व म्हणजे आज 'आंतरराष्ट्रीय मातृदिन' आहे. रेणुका मातेला जगदंबा, जगदमाता व आदिशक्ती या नावांनी ओळखले जाते. म्हणजेच जगदंबा ही सर्व विश्वाची आई आहे. आईचे आपल्या सर्वांच्या जिवणात अत्यंत मानाचे स्थान आहे. आई म्हणजे हे सांगताना कितीही मोठा विदवान असला तरी तो शब्दहीन होतो.
आईचे वर्णन करताना तिला अनेक शब्दकारांनी अनेक उपमा दिल्याचे आपण वाचतो. आईला सर्व गुन्हे माफ करणारे न्यायालय, स्वत:च्या मनाचा आरसा, दुधावरची साय, लंगडयाचा पाय, चालते बोलते विश्वविद्यालय असे  संबोधले  जाते. काहींनी तर आईला ब्रम्हा विष्णु महेश्वराची उपमा दिली आहे तर काहीजणांनी आईला कधीही न सरनारी व कधीही उरणारी शिदोरी असेही संबोधले आहे. साने गुरुजींनी आपली आई अत्यंत भावस्पर्शी सांगितली आहे. आईचे आपल्यावर एवढे उपकार असतात की, तिच्या एका जन्माचे उपकार आपण हजार जन्म घेतले तरी फिटत नाहीत. प्रत्येकजण आपापल्या परीने तिची वर्णन करतो व तिची थोरवी गातो. म्हणजे बघाना जर आपल्याला कुठे इजा झाली वा वेदना होवू लागल्या की आपल्या मुखातून अलगद ध्वनी बाहेर येतो तो “आई”! अशा या आईला विनम्र नमन. ....
शेवटी सर्वाना भगवान परशुराम महाराज जयंतीच्या व मातृदिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. या लेखाचा शेवट मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात असताना केलेल्या कवितेने करतो.

 ..............आई...............

जिने निर्मियले शब्दां, ती ब्रम्हरुप आई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

पोसण्या चिमुकल्या तान्हया
जी रात्रीचा दिस करी
कोमेजता बाळ जराही
जी रात्रभर जागी राही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

न असे स्वत:चे भान
केवळ चिमुकल्यावरीच असे ध्यान
जी नयनात तान्हुल्याच्या
उषत्काल उद्याचा पाही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

जी जगे तान्हयाकरीता
नसे ध्येय आगळे जीवणाचे
वाढविण्या पोटचा गोळा
अवघे आयुष्य आपले वाही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

उन्हात स्वत: राही
छाया चिमुकल्या देई
न होवोत त्रास इवल्या
करीता स्वयं कष्ट घेई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

वस्त्र मिळोत तीच्या बाळा
करिता स्वत: चिंधी लेई
निजविण्या पाडसा तिचिया
जी अखंड अंगाई गाई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

सुखात कधी तर कधी दु:खात त्याच्या
वर्षावात यशाच्या तर पुरात आसवांच्या
बाळा देई स्थान आई आपुल्या -हदयी
वेडी जगावेगळी त्याच्याच वृष्टीत न्हाई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही

मांगल्यमुर्ती आई,
कैवल्य किर्ती आई
अमृत बिंदू आई,
निस्वार्थ सिंधू आई
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

हकी जीवण नौका सकलांची
करुनी त्याग अण समर्पण
जी भ्र् ही न काडीता मुखातून
डोंगर दु:खाचा साही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

सरता गरज घरटयाची,
पाखुरे सोडूनी जाती
स्वार्थ पाहती आपुला
तोडूनी सर्व नाती
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

इतरांस्तव मोठे
पण आईस तरीही छोटे
सहन करी सर्व
जरी जिवाची होतसे लाही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

मी पामर सान एैसा
महती तिची काय वर्णू?
परी सांगतो एतुके, सर्वस्व माझे आई
हर क्षण आईविरहाचा करीतसे मजला त्राही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

मागणे हे ईश्वरा, असू देत तुजा आसरा
परी माफ कर मजसी, स्थान तिला तुज आदी
करीतो नमन देवा, माऊलीस कोटी कोटी
उपकार जिचे फडने, सहस्त्रजन्म शक्य नाही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

प्रार्थना तुजला देवा, दे जन्म सदैव तिच्या पोटी
न सुचोत शब्द मजला, वर्णया तिजसाठी
वाहती नयनी अश्रु अन बुध्दीच जड होई
विरहात तिच्या हे कोकरु कदापि न राही
महती तिची वर्णाया, शब्दच का सुचत नाही ?

शब्दांकन - बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ
    मो.न.  - 9421863725

Friday 6 May 2016

सैराट परश्या-आर्ची by Balasaheb Dhumal

.........सैराट परश्या-आर्ची .....
आज महाराष्ट्र र्सैराटमय झाला आहे. परश्या आर्ची आणि नागराज यांची काहीजण स्तुती करत आहेत तर काहीजण टिका करत आहेत. पण मला वाटते नागराज मंजुळेंनी सैराटद्वारे समाजातील जातीपातीच्या भिंती तोडू पाहणा-या प्रेमींचा  समाजाकडून होत असलेला छळ आणि या प्रेम करणा-या मुला-मुलींना कुटूंबाकडून व समाजाकडून असलेल्या अपेक्षा सैराट मध्ये दाखवल्या आहेत. त्यांचा दाबला जात असलेला आवाज व कोंडला जात असलेला श्वास दाखवला आहे . सामाजिक विषमता हा या देशाला लावलेला कलंक आहे आणि दुर्दैवाने हा कलंकच आपल्याला बहूमान वाटतो आहे. मग जात कोणतीही असो, अगदी मलाही माझी जात ब्राह्मणांपेक्षाही श्रेष्ठ वाटते. रोटीबेटी व्यवहारात जातच पाया असते पण जातीचा पाया व्यवसाय आहे हे विसरलं गेलं. हा कलंक धुतला जाऊ शकतो हा विश्वास नागराजला आहे. ख-या अर्थाने नागराज हा केवळ एक दिग्दर्शक नसुन या भेदाभेदाने ग्रासलेल्या समाजाला प्रेमाने एकात्म करू इच्छिणा-या प्रेम पाखरांच्या पंखांना कसे छाटले जात आहे हे दाखवणारा दृष्टा उद्बोधक आहे. सैराट अशा पाखरांच्या पंखांना बळ देणारा प्रेरक ठरणार आहे. मुळात नागराज हाच या समाजाला नकोसा झालेला, या समाज रचनेचा बळी होता. हे त्यानेच सांगितले आहे. ज्याने हे सर्व अनुभवले आहे असा तो एक खंबीर प्रबोधनकारी, क्रांतिकारी, समाज सुधारक आहे. आता तो कुणाला बोचतोय तर कुणाला टोचतोय पण त्यात त्यांचाही दोष नाही. जातीचा पगडाच एवढा घट्ट आहे की त्यामुळे निर्माण होणारी अमाणुषता न जाणवण्या इतपत मने बोथट झाली आहेत आपली.
मुख्य म्हणजे कोणी कोणाला पळवुन नेहले अथवा कोण कोणासोबत पळून गेला हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे की का आपल्या इच्छेनुसार जिवनसाथी निवडू दिला जात नाही? का प्रेमाला विरोध केला जातो? सैराट मध्ये कोळी-मराठा दाखवले आहेत परंतू मराठा ऐवजी इतर जातीतील मुलगी असती तरीही स्थिती काही वेगळी नसती. वास्तविक पाहता किमान प्रेम प्रकरणांमध्ये तरी मुलीच्या घरच्यांकडून जातीऐवजी मुलाचा स्वभाव, त्याचे आचरण, विचार, देखणेपण, शरीरयष्टी, कर्तृत्व आणि योग्यता पाहायला हवी. मुलीच्या बाबतीतही असेच काहीसे!  सैराट मधील परश्या देखणा, हुशार, सुस्वभावी, मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा, मदतगार वृत्तीचा, निर्व्यसनी मुलगा होता. त्याच्या विचारांना आदर्शाचे अधिष्ठान होते हे त्याच्या व त्याच्या शिक्षकामधील संवादातून दिसुन येते. मात्र केवळ त्याच्या जातीमुळे व गरिबीमुळे त्याला डावलले गेले. अशावेळी घरच्यांच्या हे का लक्षात येत नाही की ते दोघे परस्परांवर जिवापाड प्रेम करत आहेत, त्यातच त्यांचे सुख आहे आणि त्यांच्या सुखात आपले सुख असायला हवे. दुसरे म्हणजे आर्ची-परश्याने त्यांचा निर्णय योग्य आहे हे सिद्ध करून दाखविले होते. त्यांना मुलगा झाला होता, आर्थिक प्रगतीही झाली होती शिवाय त्यांनी घरच्यांकडून काही अपेक्षाही केली नव्हती तरीही त्यांना जिव गमवावा लागला!!! काय चुक होती त्यांची? थोडेसे अपरिपक्व वयातील प्रेम एवढीच काय ती टिका करायला जागा !!
सैराटची कथा ही जवळजवळ प्रत्येकानेच आपापल्या जिवनात अनुभवलेली आहे. जात वेगळी असल्याने व आर्थिक विषमता असल्याने असे कित्येक परश्या-आर्ची सोबत जिवन जगू शकले नाहीत व ज्यांनी तसे धाडस केले त्यांना त्याची किंमत मोजावी लागली. पण आता हवेने आपली गती व दिशा बदलली आहे , तुम्हाला मला जे जमले नाही ते आजचे तरूण करून दाखवतील आणि पुढील काही वर्षांत या भेदाभेदाच्या भिंती आपोआप ऊळमळून पडतील यात शंका नाही.
नागराजला विरोध करण्यापेक्षा आपण प्रत्येकाने चिंतन व आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, मीही. कारण आर्ची-परश्याचे सैराटपण प्रातिनिधीक आहे ते चित्रपटाद्वारे नागराजने मांडले आहे.
साधी गोष्ट आहे मित्रांनो ज्यांनी ही व्यवस्था निर्माण केली त्यांनी स्वतःत बदल केला पण आपण स्वतःला बदलायला तयार नाही आहोत. किमान प्रेम प्रकरणांत तरी हा पुरूषी अहंकार व स्वतःला श्रेष्ठ समजण्याची जुलमी अहंकारी वृत्ती सोडली जावी असे मला वाटते. बाकी ज्याचे त्याने ठरवावे.
समाज चित्रपटाने बिघडत नाही, तसे असते तर समाज खुपच सुधारलेला असता !!! प्रश्न आहे बोधाचा तर  समाजाने आता तरी जातियवाद सोडायला हवा! सैराट हा प्रस्थापित आणि विस्थापित अशा नजरेतून पाहीला तर दाहक वास्तवाचा प्रत्यय यईल.
आर्ची जे या चित्रपटाचे मध्यवर्ती पात्र आहे ते एक केवळ स्री पात्र नाही तर ते एक मत आहे आजच्या स्त्रीचं! जी विचाराने अत्यंत परिपक्व आहे, धाडसी निर्भीड आणि स्वतःच्या विचाराने वागणारी आहे. जी कोणाला घाबरत नाही, कोणाच्या दबावाखाली रहात नाही. जी समर्थ आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेवून ते योग्य आहेत हे सिद्ध करायला. जीला जाणीव आहे भारतीय संस्कृतीची, जी धैर्याने तोंड देऊ शकते संकटांना! ! जी कष्टाळू आहे, पतीच्या पावलावर पाऊल टाकत त्याला शेवट पर्यंत साथ देण्यास कटिबद्ध आहे. पण युगानुयुगे जे दमन होते आहे तिच्या भावभावनांचे आणि चिरडले जाते आहे तिच्या स्वप्ननांना ! या सर्वांना ती वैतागली आहे आणि बंड करून उठण्यास आतुर आहे. अशा मुलीचा मानस आणि अयशस्वी संघर्ष नागराजने उत्तमरीतीने मांडला आहे. पुरूषी मानसिकतेपुढे हारली ती, पण चणुक दाखवून गेली आपल्या क्षमतेची आणि देऊन गेली एक हिंमत तिच्या सारख्या अनेक आर्चींना!!
शिवाय आपण याचाही विचार करायला हवा की, परश्या-आर्ची चा निरपराध अनाथ मुलगा काय साधु संत विचारवंत किंवा सुधारकच होईल का? ? जर तो नक्षलवादी आतंकवादी वा चोर लुटारू दरोडेखोर अथवा विक्षिप्त मानसिकतेचा मनोरुग्ण गुन्हेगार निघाला तर नवल ते काय? त्यात त्याचा तरी काय दोष असेल? खुप कमी नागराज असतात जे समाजाला ते नको होते तरी आज समाजाचे प्रबोधन करताहेत. बहूतांश नागराज व परश्या-आर्चीचे लेकरं विद्रोहच करतात! ! त्यामुळे हे परश्या-आर्चीचे सैराटपण समजून घ्यायला हवे असे मला वाटते.

शब्दांकन: बालासाहेब सिताराम  (बी.एस.) धुमाळ
मो. 9421863725

Sunday 1 May 2016

दुसरी पारी

सुर्योदय दररोज होतो, सुर्यास्तही दररोज होतो. पण जेव्हा एखादा सुर्योदय मनात विचित्र हुरहुर घेवून येतो. दररोजच्या कामाची गती मदांवतो, लगबग कमी करतो, जेव्हा कार्यालयात आपल्या टेबलवर कतृज्ञतेच्या भावनेने सेवानिवृत्तीबददल शुभेच्छांचे गुच्छ यायला लागतात तेव्हा आजचा दिवस आपला कार्यालयातील शेवटचा दिवस आहे हे वास्तव पटत नाही. आजवर येथील प्रत्येक टेबल, फाईल, कपाट  हेच आपले विश्व होते, त्यावर आपला अधिकार होता जो उद्यापासून नसेल यावर विश्वास बसत नाही. वास्तविक पाहता कुण्याही कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक व्यक्तीस सेवानिवृत्ती दिवशी आनंद कमी व दु:ख अधिक होते. ज्याच्या डोळयाच्या कडा ओल्या होणार नाहीत असा एकही व्यक्ती आढळत नाही.
 आजवर आपण आपल्या आयुष्याचे हिरो असतो कुटूंबाच्या समस्या, अडचणी, वाटचाल, आरोग्य, इच्छा-आकांक्षा यांची आपण काळजी घेतो. मर्यादित वेतनात आपल्या कुटूंबाचा गाडा चालवून स्वपनांच्या पूर्ततेसाठी थेंब थेंब बचत करतो. मुलांचे शिक्षण, त्यांचे करिअर व दोनाचे चार हात करण्यासाठी राबराब राबतो. पण यापुढील भूमिका आपल्याला  सहकलाकार म्हणून पार पाडायची आहे यावर आपला लवकर विश्वास बसत नाही.सुखरुप सेवानिवृत्त झालो याचा आनंद जरी असला तरी उद्यापासून काय ? माझा वेळ कसा जाईल? स्वत:सह कुटूंबाला घडयाळयाच्या काटयांबरोबर धावण्याची लागलेली सवय कशी मोडेल ? हे प्रश्न डोक्यात थैमान घालतात.
वस्तु: सेवानिवृत्ती ही अविश्वसनिय जरी असली तरी ती निश्चित असते. जसा जन्मासोबत मृत्यु निश्चित असतो, तशीच नेमणूकीसोबत सेवानिवृत्तीही निश्चित असते. ते एक कटू वास्तव असते ज्याचा स्विकार हा प्रत्येकाला करावाच लागतो. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदात जाण्यासाठी त्या व्यक्तीची अपत्ये, सुन, नातवंडे चांगली असावी लागतात.आजवर घरातील प्रत्येक लहान मोठे निर्णय परवानगी घेवून अथवा कल्पना देवून घेतलेले असतात. मात्र जर कुटूंबाकडून सेवानिवृत्तीनंतर वेगळी, दुय्यम वागणूक दिली गेली तर अशा वेळी मन दुखावते, मनस्ताप होतो, चिडचिड होते. कमी झालेली कमाई, आर्थिक चणचण आणि काही गोष्टी तरुणपणीच का केल्या नाहीत याचा पश्याताप, गेलेली वेळ, काही चुकलेले निर्णय, आरोग्याच्या सुरु झालेल्या कटकटी व्यक्तीला हतबल करतात. कुटूंबाची घडी निट असेल तर ठिक नाही तर अनिच्छेने अनेकजण वृदधाश्रमाचा  रस्ता धरतात.
पण असे म्हटले जाते की, कर्तृत्तववान माणसाच्या सेवापुस्तकेत निवृत्ती हा शब्द कधीच येत नाही. सेवानिवृत्ती ही एका अर्थाने जिवणाची एक नवी सुरुवात असते. नव्याने जीवन जगण्याची एक नवी संधी असते.  सेवा काळातही समस्या होत्याच ना ? त्या आपण यशस्वीपणे सोडवितो, मग सेवानिवृत्तीनंतर च्या समस्या आपण सोडवू शकत नाही का? जुण्याची नव्याशी सांगड घालता आली, अतिव स्वाभिमान टाळला तर जनरेशन गॅप नावाची समस्याही येत नाही.
पर्यटन, अध्यात्मिक व सामाजिक कार्य, स्वभावातील थोडीशी लवचिकता, प्रदिर्घ अनुभव व परिपक्व बुध्दीमत्तेच्या जोरावर जीवणाच्या कसोटी क्रिकेटच्या दुस-या पारीची सुरूवात जर आत्मविश्वासाने केली तर जीवनात कधीही दुःख, उदासी व हताशा वाट्याला नाही.

शब्दांकन -  बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ
मो.न. 9421863725

Friday 22 April 2016

जागतिक वसुंधरा दिन

मित्रांनो आज जागतिक वसुंधरा दिन  (World Earth Day)🌎

एकेकाळी अत्यंत सुंदर, जणूकाही स्वर्ग शोभावी, अशी पृथ्वी आज जीवन जगण्यासाठी प्रतिकूल बनत चालली आहे. तिची ही अवस्था आपणच केली आहे.
भुकंप, ज्वालामुखी, त्सुनामी , हिमवृष्टी, अतिवृष्टी व महापुर, जलसंकट, दुष्काळ, वादळे, उष्मावृद्धी, नवनविन विषाणूजन्य असाध्य आजार हे तीच्या आजच्या अवस्थेचे परिणाम! !!
मित्रांनो ही पृथ्वी आपल्याला आपल्या पुढच्यांनी दिली आहे, आपण आपल्या मागच्यांना काय देणार? ???
आपले वंश जगावेत व पृथ्वीवर मानव सृष्टी व जीवसृष्टी टिकावी असे वाटत असेल तर आपण सर्वांनी हे केलेच पाहिजे. ....👇�
🌎पाणी वाचवून जलप्रदूषण टाळणे.
अन्नाची नासाडी टाळणे.
🌎वैयक्तिक वाहणांचा कमितकमी वापर करणे.
प्लॅस्टिक, थरमाकाॅल इ. चा वापर टाळणे.
🌎प्लॅस्टिक, फायबर, टायर यांचा पुनःर्वापर करणे त्यासाठी या वस्तू भंगारात विकणे.
🌎ध्वनी प्रदुषण (व्हईकल फायरींगज, व्हाॅर्नस, डीजे, फटाके इ.) टाळणे.
🌎वृक्षतोड थांबवणे, वृक्षारोपण करून ती जगवणे.
🌎कमीतकमी पाण्याची पिके घेणे.
जल पुनर्भरण करणे, पाणी आडवूण जिरवणे.
🌎भुजलाचा वापर शक्यतो टाळणे.
जैवविविधता टिकविणे. (पशु, पक्षी, वनस्पती)
🌎🌎
आणि सर्वात महत्वाचे "स्वतःपुरते न जगता, भविष्यात ज्यांना जगायचे आहे त्या आपल्या वंशजांचा विचार करून जगणे"
विचार करू नका. ..
कारण आता तेवढाही वेळ नाहीये. आपण आपल्या वर्तनात व शासनांनी त्यांच्या धोरणात तात्काळ बदल नाही केला तर पुढील शंभर वर्षांत आपल्या पृथ्वीच्या बहूतांश भागावर जीवन नसेल! !!!!

पृथ्वी दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐
"जगा आणि जगवा,  जीवसृष्टी टिकवा"

............बालासाहेब धुमाळ🙏

Wednesday 20 April 2016

विचारांचा लढा का मुस्कटदाबी

विचारांचा लढा का मुस्कटदाबी????

पुरोगामी महाराष्ट्रात आणखी किती बळी घेणार आहेत सनातनी? ????
अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कुठपर्यंत? ? आवाज दाबता नाही आला की कायमचाच आवाज बंद करणार? ?
वारे वा धर्म रक्षक! !! वारे वा हितचिंतक! !!
पुरोगामी राज्यात पुन्हा एक धमकी.....

"चौथ्या गोळीवर तुमचं नाव नको"  कोल्हापुरातील ज्येष्ठ साहित्यिक सुभाष देसाईंना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सनातन धर्माला विरोध करु नका, अन्यथा तीन गोळ्यांनी ज्याप्रकारे अचूक वेध घेतला, तसं चौथ्या गोळीवर तुमचं नाव नको, अशी धमकी पत्रात देण्यात आली आहे.

तसंच भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई थोडक्यात बचावल्या, असा उल्लेखही या हितचिंतकाच्या पत्रात करण्यात आला आहे.

महालक्ष्मी ही महालक्ष्मी नसून अंबाबाई आहे. शिवाय ती शिवपत्नी आहे. विष्णूपत्नी नाही, असे तुमचे म्हणणे आहे, ते तुमच्या पुरतेच ठेवा. याला तुम्ही प्रबोधन वगैरे म्हणत असाल पण असले प्रबोधन करणाऱ्यांचा शेवट कोल्हापुरात कसा झाला हे सांगायला नको. साळोखे नगरातील घरी तुम्ही एकटेच असता. त्यामुळे आम्हाला तुमची काळजी वाटते. ऑफिसमध्येही जरा सांभाळून राहा, कारण आजूबाजूचे लोकही मदत करतील असे वाटत नाही. सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करु नका. आमच्या तीन गोळ्यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा. नशिबाने एक देसाई वाचली, दुसऱ्या देसाईचे नशिब साथ देईलच असे नाही.

एक हितचिंतक......

व्वा रे हितचिंतक! !!!
अहो, विचारांची लढाई विचारांनी लढायची असते.  मतांबाबत भिन्नता असते आणि असावीही, मात्र त्यात लवचिकताही असावी, प्रथा अयोग्य व तर्कविसंगत  असेल तर बदल करून घेण्याची मानसिकता असायला हवी. माझे ते खरे म्हणण्याऐवजी खरे ते माझे म्हणण्याची आपली रित आहे. .. बालासाहेब धुमाळ

Tuesday 12 April 2016

चौथरा

चौथरा

बरं झालं बायांनो
तुम्ही  चौथरा चढलात.
वर्षानुवर्षाचा अनिष्ट
पायंडा तुम्ही मोडलात.

तुम्ही कितीही योग्यता
सिध्द जरी केलीत.
पुरुषी अहंकाराने     
मने आमची मेलीत.

विरोध तरी पुरुष 
करत आहेत कुणांना ?
हाडामासाने बनलेल्या
आपल्याच आया बहीणींना.

स्त्रीला इथे शक्तीचे 
नाव तेवढे देतात.
पण मंदिरात जाणारीला
आडवायला ही येतात.

कायदा परंपरा मानत नाही
घटनेचे येथे राज्य आहे.
देव काही बोलत नाही पण
म्हणे त्याला स्त्री त्याज्य आहे.

देव तो देवच
तो चराचरात आहे.
सांगितले फक्त एवढेच जाते
तो पती नावाच्या नरात आहे.

लेकरे सारी त्याचीच आहेत 
तो कसा काय भेद करेल?
चुकतेय कुठेतरी आपले 
पुरूष कधी खेद करेल? 

हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी
हे म्हणायला कोणीच मागे हटत नाही.
अन वास्तवात मात्र अनेकींना
पाळणाच भेटत नाही.
 
कर्तव्याला देव मानुन 
कर्म जो करतो.
खरा भक्त तोच त्याच्या
घरी देव पाणी भरतो.

मी तर तुम्हाला सांगेल
दगडात कुठे देव असतो का ?
असताच जर का तो तिथे
तर मी सर्वसुखी झालो नसतो का ?

मदतीला एखादया अबलेच्या 
धावून तुम्ही जाताल.
तर आनंदी तिच्या चेह-यावर 
देव तुम्ही पाहताल.

 शब्दांकन : 
     बालासाहेब सिताराम (बी.एस.) धुमाळ 
     मो. 9421863725

Sunday 10 April 2016

संभाजी महाराज आणि गुढीपाडवा

संभाजी महाराज आणि गुढीपाडवा
मित्रांनो नमस्कार 🙏
सुप्रभात 💐💐💐
आजची सकाळ खास आहे.
आज चैत्र शुद्ध 1 शके 1938 अर्थात शक दिनदर्शिकेतील 1938 व्या वर्षातील पहीला दिवस! !!
मित्रांनो यात तिळमात्र शंका नाही की गुढीपाडवा हा सण केवळ महाराष्ट्रातच साजरा केला जातो आहे आणि यातही शंका नाही की शंभू राजांच्या बलिदानापुर्वीपासूनच हा सण अस्तित्वात आहे. हा हिंदू नव वर्षाचा पहीला दिवस, त्यामुळे नुतन वर्षारंभ दिन साजरा करायलाच हवा. पण हेही लक्षात घ्यायला हवे की एखाद्या सणाचे दिवशी आपल्या घरात एखादी दुखद घडली तर आपण तो सण साजरा करत नाही अथवा अगदी साधेपणाने साजरा करतो.
हिंदू धर्मच राहीला नसता तर आजचे धर्माभिमानीही राहीले नसते. मग ते ब्राह्मण असोत, संभाजी ब्रिगेड वाले असोत वा हिंदू धर्माचा अभिमान असणारे तुमच्या माझ्या सारखे सामान्य नागरिक असोत. बरे ज्यांनी धर्मासाठी बलिदान दिले त्यांच्या प्रती आपण एवढे कृतघ्न असावे का ? ?
ज्यांनी राजांना पकडून देण्यात मदत केली, त्यांना आपण पाठीशी घालावे का??? का म्हणून आपण आपली संस्कृती विसरावी ??? तर मला वाटते नाही.  म्हणून मी यावर एक तोडगा 5-6 वर्षांपुर्वीच काढला आहे, गूढी ही आनंदाचे व विजयाचे प्रतीक आहे म्हणून मी वैयक्तिक माझ्या घरी, (लग्नानंतरचे घर) गूढी उभारत नाही पण नव्या वर्षाचे स्वागत माझ्या पद्धतीने करतो.
आंघोळ स्नान, औक्षण ,देवपूजा व दर्शन घेऊन  मागील वर्षी झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागुन नविन वर्षासाठी देवाकडे आशिर्वाद मागतो, संकल्प करतो. यामुळे मला वाटते की मी माझी संस्कृतीही जोपासत आहे व शंभूराजेंविषयी कृतज्ञताही बाळगत आहे. त्यासाठी मी कोणावरही जबरदस्ती करत नाही. अगदी माझ्या आई - वडीलांवरही नाही.
मित्रांनो शके 1937 आपणास आनंदाचे गेले असेलच, नसेल गेले तर मागील वर्षी आलेले नकोसे अनुभव यापुढे कधीही न येवोत हीच जगदंबेचरणी प्रार्थना करतो. मागील वर्षी माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी विनम्रपणे माफी मागतो आणि नव्या वर्षाच्या सर्वांना मनापासुन शुभेच्छा देतो.
आई जगदंबा आणि माळसाकांत खंडेराया आपणास नविन वर्षात अपार आनंद,  सुख, समाधान, शांतता,  प्रतिष्ठा, यश, समृद्धी व आरोग्य देवो हीच प्रार्थना.
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपला : बालासाहेब सिताराम  (बी. एस.)धुमाळ , बीड .

Friday 1 April 2016

बाप by Balasaheb Sitar am Dhumal

...................................... बाप ......................................

मित्रांनो आपण पहातो की, लहान असल्यापासून आई मुलांना 
सांगत असते. इथे जाऊ नको, तिथे जाऊ नको, झाडावर चढू नको, नदीकडे जाऊ नको, शाळेत जा,  अभ्यास कर नाहीतर बाप मारील. 
मग मुलं सुद्धा बापाला घाबरून बापाच्या भयाने शाळेत जातात,  अभ्यास करतात, बापाच्या दहशतीखाली शिकत राहतात, मोठी होतात. हळू हळू मुलं त्याच्याकडे दुर्लक्ष करुन आई वरच प्रेम करु लागतात. बापापासून दुरावतात आणि
आणि आईकडे आकर्षित होतात.आईचं गाणं गातात, तिच्यावर कविता लिहितात. कोणतंच मुल बापाला दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही, वासरांची गाय म्हणत नाही. बापासाठी मुलाकडे 'शब्दच' नसतात. पायाला ठेच लागली की "आई गं" म्हणतात  पण "बापरे" म्हणत नाहीत.स्वामी तिन्ही जगाचा "बापाविना" भिकारी होत नाही. साने गुरुजीनांही "श्यामचा बाप" दिसत नाही. आई घरात असली कि, घर कसं भरल्यासारखं वाटतं. पण बाप घरात असला की, मात्र स्मशान शांतता.मुलं शप्पथ सुद्धा आईचीच घेतात.बाप शप्पथेच्याही लायकीचा नसतो.बाप असतो केवळ मुलांच्या नावाच्या व आडनावाच्या मध्येच.
मुलं विठोबाला 'माउली' म्हणतात.बाबासाहेबांना "भिमाई' म्हणतात.धरणीला 'माय' म्हणतात आणि देशाला 'माता' म्हणतात.  मात्र धरणीत, देशात मुलांना बाप कधीच दिसत नाही.  कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा व्यक्ती म्हणजे बाप . केवळ रुपये, पैसे कमवण्याचे यंत्र! तेच त्याचे काम, ते त्याने केलं की, त्याचं महत्व संपलं.
पण मग एवढं सगळं असूनही तोच बाप मेल्यावर छातीत धडकी का भरते ?का ओघळतो डोळ्यातून पाऊस! का पायाखालची जमीन सरकते. का वाटतं बेवारस झाल्या सारखं.
का हंबरतात अन घाबरतात बाप मेल्यावर?कथा, कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा "पत्थरदिल" बाप खरचं पत्थरदिल असतो का हो? मग का हा अन्याय त्याच्यावर? 
मित्रांनो, डोळे मिटुन जी प्रेम करते तीला प्रेयसी म्हणतात. डोळे उघडे ठेऊन जी प्रेम करते तीला मैत्रीण म्हणतात. डोळे वटारुन जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला "आई" म्हणतात. पण...  डोळ्यात प्रेम न दाखवता जो स्वतः संपेपर्यंत लेकरांवर प्रेम करतो, त्याला  "बाप" म्हणतात मित्रांनो.
मुलाचं करियर तो करतो,  त्याला राणी तोच शोधतो. मुलीला चांगल्यात चांगले सासर तोच शोधतो. आहे नाही तेवढं लेकरांवर उडवून, वेळ आलीच मुलांकडून घराबाहेर हाकलले जाण्याची तर बायको अगोदर तोच घराबाहेर पडतो.
मित्रांनो एवढा अन्याय अत्याचार सहन करूनही, दुर्लक्षित राहूनही बाप मात्र आपली सर्व कर्तव्ये पुर्ण करतो. व्यक्तीची ओळखंच मुळात बापापासून होते. धर्म, जात, नाव, वारसा, हक्क-अधिकार , नाती व प्रतिष्ठा बापापासूनच मिळतात. पुर्वी काही पदे देखील बापापासूनच मिळत.
त्याचे प्रेम दिसत नाही पण वर म्हटल्याप्रमाणे तो आजिवन आपल्या लेकरांच्या भवित्यासाठीच झगडत असतो. कारण तो लेकरात, त्यांच्या भवितव्यात स्वतःहाला पहात असतो. मृत्यू नंतरही लेकरांत जिवंत रहात असतो.


शब्दांकन: बालासाहेब सिताराम धुमाळ 
मो. 9421863725.

Wednesday 30 March 2016

करा निर्धास्त मदत

मित्रांनो नमस्कार,

आपल्या देशात दर चार मिनिटांत एकजण रस्ते अपघातात दगावतो.
बहूतांश अपघाताचे कारण Drink and Drive,  नियमाचे उल्लंघन,  अती गती , स्पर्धा व स्टंटबाजी आणि झोप असते. काही अपघात वाहनातील तांत्रिक बिघाडामुळेही होतात.
पण अपघात कसाही झाला तरी अपघात ग्रस्तांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.
काही जण शुटींग करतात, काहीजण पोलीसांना फोन करतात, तर काही जण तर अक्षरशः मजा बघतात व निघून जातात. मदतीला धावून जाणारे कमीच असतात, जवळजवळ नसतातच.
मित्रांनो,  केवळ वेळेवर दवाखाना मिळाला नाही, एवढेच काय, गाडीबाहेर किंवा गाडीखालून काढले नाही,  पाणी पाजले नाही म्हणून अनेक जण मरतात.
याचे कारण सरकारी यंत्रणा,  ज्यात पोलीस, डाॅक्टर्स हे मदत कर्त्यालाच संशयाने पहात.  नको ते उलटसुलट प्रश्न, साक्षी पुरावे, तारखा, आरोप यांना कंटाळून मदतकर्ते मदत करत नसत.
पण आता अशा रस्ते अपघातात जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात मदत करणाऱ्या सदिच्छा मदतकर्त्यांचे पोलीस व इतर अधिका-यांकडून केल्या जाणाऱ्या छळवणूकीपासून रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांना सर्वोच्च न्यायालयाने मंजूरी दिली आहे.
त्यामुळे आता डाॅक्टरांना अगोदर तातडीने उपचार करावे लागतील. तसेच सोबतच्या मदत कर्त्याला थांबवून ठेवता येणार नाही, आगाऊ प्रश्न विचारता येणार नाहीत.
त्यामुळे आता निर्धास्त होऊन मदत करा. माणुसकीचे दर्शन घडवा आणि जिवनदाते होऊन जिवनदानाचे पुण्य मिळवा सोबतच संबंधीताचे, त्याच्या कुटूंबीयांचे आशिर्वाद मिळवा.

"किसीके काम जो आये, उसे इन्सान कहते है |"

शब्दांकन: बी. एस. धुमाळ
मो. 9421863725

Tuesday 29 March 2016

सामाजिक दायित्व

मित्रांनो नमस्कार 🙏
मराठवाडा हा तसा कायमच दुष्काळी भाग. .. मात्र मागील तीन चार वर्षांपासून दुष्काळाची दाहकता अधिकच तीव्र झाली आहे. सततची नापिकी, थंडावलेले व्यवहार यामुळे मराठवाडयातील जनता हवालदिल झाली आहे. दुष्काळाच्या तीव्रतेचा परिणाम सामाजिक व आर्थिक व्यवस्थेवरही झाला आहे. यामुळे सहाजिकच हातावर पोट असणारे गोंधळी समाजातील शेतकरी, शेतमजूर व कलावंत बांधव हैराण झाले आहेत.
अशा परिस्थितीत उपवर मुलगी झालेल्या आईवडीलांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. चिंतेचे सावट झोप येऊ देत नाही. लग्नाचा खर्च करायचा कसा?  लागणारे पैसे आणायचे कोठून?  अशा विवंचनेत असणारे आई वडील मुलीचे लग्न थांबण्याचाही निर्णय  घेतात. मात्र उपवर मुलगी तीही गरीबाची!! काही घरात ठेवायची वस्तू नाही. अशा गरीब गोंधळी माता - पित्यांच्या डोक्यावरील काळजीचा भार थोडासा वाटून घेण्याच्या प्रामाणिक उद्देशाने भगवान परशुराम गोंधळी समाज सेवा मंडळाने उपवर मुलीच्या माता पित्यांच्या मदतीला धावून जाण्याचे ठरविले आहे.
मित्रांनो, बुडत्याला काडीचा आधार असतो.  हगवणीला बायको आणि नागवणीला सोयरा असतो असे आपले पुर्वज सांगत. एक सामाजिक दायित्व म्हणून अशा गरीब जात बांधवांच्या मुलीच्या लग्नासाठी ' फुल नाही फुलाची पाकळी ' मदत म्हणून भगवान परशुराम गोंधळी समाज सेवा मंडळाने मुलीच्या घरच्यांना एक क्विंटल गहू,  एक क्विंटल तांदूळ आणि अर्धा क्विंटल साखर देण्याचे ठरविले आहे.
असे म्हटले जाते की,  ' एका हाताने केलेली मदत ही दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये ' त्यानुसार ही मदत देखील अत्यंत गोपनीय ठेवण्यात येईल. आम्ही अमूक व्यक्तीला अशी अशी मदत केली याचा आम्ही कधीही उल्लेख करणार नाही. जेणेकरून करून मुलीच्या घरच्यांचा स्वाभिमान दुखावणार नाही.
याचबरोबर ' भगवान परशुराम गोंधळी समाज सेवा मंडळ ' असेही नम्र आवाहन करते की, अशा बिकट परिस्थितीत किमान ज्यांची आर्थिक परिस्थिती सबळ नाही अशा समाज बांधवांनी लग्न समारंभात झगमगाटावरील खर्च टाळून ,  साधेपणाने लग्न उरकून वाचलेल्या पैशातून नवविवाहित दांपत्याला त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी,  त्यांचा संसार उभा राहण्यासाठी हातभार लावावा.
तरी कृपया गरजू समाज बांधवांनी अर्थात मुलीच्या घरच्यांनी , मंडळाच्या खालील पदाधिका-यांशी संपर्क साधावा ही नम्र विनंती.🙏



प्रा. श्री. तुकाराम धुमाळ (सातारा)-   9665597827
श्री. राजेंद्र काटे (बीड) - 9130786333
श्री. बबनराव काळे (लातुर) - 9049372959
श्री. अशोकराव जाधव (उस्मानाबाद) - 8308027612
प्रा. श्री. सखाराम धुमाळ (ठाणे)- 8425890282
श्री. कैलासराव काटे  (बीड)- 9545533659
श्री.  अरविंदराव बेद्रे  (बीड)- (9822578244)


शब्दांकन : बी. एस. धुमाळ (बीड)-
मो. 9421863725

Monday 28 March 2016

लाज वाटली पाहिजे. .....

लाज वाटली पाहीजे. ...

मित्रांनो,  नमस्कार🙏
गोंधळी जात म्हणजे शिवरायांचा दैदीप्यमान इतिहास शाहीरी गाण्यांद्वारे व कथांद्वारे लोकांसमोर मांडणारी जात. शत्रूच्या गोटात वेषांतर करून जाऊन तेथील खडानखडा माहीती शिवरायांना सांगणारी गनिमी कावा युद्धनितीत महत्वाचा वाटा उचलणारी, शिवरायांचे संदेश जनतेपर्यंत घेऊन जाणारी जात  आणि अशा जातीत माझा जन्म झाल्याचा अत्यंत गर्व. प्रखर हिंदूत्वाचा नुसता पुरस्कारच नव्हे तर प्रचार आणि प्रसार करणारी जात. शिवरायांविषयीचा आभिमान रोमारोमात भिनलेला असल्याने कोणत्याही स्वार्थाविना राजेंना आदर्श मानून जगणा-या जातींपैकी व राजेंना जिव की प्राण मानणाऱ्या त्यांच्या कट्टर चाहत्यांपैकी मी एक.  एक कट्टर पण सहीष्णू हिंदू एवढीच माझी मी ओळख मानतो.
आज रोजी कुठली लढाई करण्याची आवश्यकता नाही . केवळ राजेंना आदर्श मानून जिवन जगलोत तरी जन्माचे कल्याण तर होईलच पण आज रोजी भेडसावत असलेल्या अनेक समस्या निर्माणच होणार नाहीत याची खात्री बाळगणारा एक सामान्य शिक्षक सद्यस्थितीचे जेव्हा एकांतात चिंतन मनन करतो तेव्हा अत्यंत खिन्न होतो आणि राजेंना आणि त्यांच्या मावळ्यांना शोधत बसतो, त्यांच्या काळात जाऊन काल्पनिक जिवन जगत बसतो .  त्यासाठी गड किल्ले,  स्मारके व संग्रहालये धुंडाळतो. शक्य होईल तेवढे वाचण करायचा प्रयत्न करतो.  शिवरायांच्या आदर्शावर मार्गक्रमण करणाऱ्यांशी जात धर्म पंथ लिंग भाषा प्रदेश यांचा विचार न करता मैत्री करतो.  पण जेव्हा असे लोक पाहतो  ज्यांना शिवराय समजलेच नाहीत,  तेव्हा त्यांना पाहील्यावर डोके ठिकाणावर राहात नाही.  शिवरायांचा वसा जपणारा असल्याने शांतही बसू शकत नाही व राडाही करू शकत नाही.
नेत्यांचे, नट नट्यांचे,  क्रिकेटपटूंचे वाढदिवस एक दिवसच नव्हे तर सप्ताह, पंधरवडा,  महीणाभर उत्साहाने साजरे करतात आणि राजेंची जयंती एकतर  तारखेप्रमाणे नसता तिथीप्रमाणे पण दोन्हीपैकी एकच साजरी करतात.  जयंतीमध्ये व्याख्याने,  परिसंवाद, चर्चासत्रे,  जिवनपट वाचन,  शाहीरीगीते व शिवगीतांचे गायन, सद्यस्थितीचे विश्लेषण इ. न करता डीजे च्या तालावर मद्यधुंद डोलतात. काहीजण तर त्याही स्थितीत नसतात म्हणून सरळ दांडी मारतात. शिवजयंतीच्या मिरवणूकीत शाहीरी पोवाडे व इतर विर रसातील गाणी विसरून शांताबाय वाजवतात त्यांच्या कानाखाली वाजवावी वाटते.  केवळ गाड्यांना भगवे झेंडे बांधून आणि जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देऊन शिवप्रेमी समजले जाते का? ?
ढाबे रेस्टॉरंट बार यांना राजेंचे, त्यांच्या विर मावळ्यांचे अथवा त्यांच्या गढकिल्ल्याचे नाव दिल्याचे वाचले की पारा चढायला लागतो.
व्याख्याने व भाषणे ठोकून स्वप्रसिद्धी कमावणारे काही बुध्दीजीवी जेव्हा वरून पैसेही घेतात तेंव्हा वाईट वाटते आणि किव येते त्यांची व त्यांच्या बुद्धीची! !
राजेंच्या गढकिल्ल्यावर गर्ल वा बाॅय फ्रेंडला घेऊन फिरायला जाणारे आणि तेथे कचरा करणारे, दगडांवर खडकांवर  नावे लिहीणारे शिवप्रेमी पाहीले की कान गरम होतात.  यांचे कान सडकावले पाहीजेत असे वाटते व विचारावे वाटते की अशा नावे लिहील्याने इतिहासात आपली नोंद होते का? ? इतिहासाने नोंद घेण्यासाठी शिवाजी महाराजांसारखे शुर पराक्रमी व आदर्श असावे लागते.
राजेंच्या पुतळ्याला  "शिवाजीचा पुतळा,  शिवाजी पुतळा" असा उल्लेख  जेव्हा कोणी करतो तेव्हा तळपायाची आग मस्तकात जाते. राजेंचा पुतळा,  महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांचा पुतळा,  शिवरायांचा पुतळा, छत्रपतींचा पुतळा अथवा शिवबांचा पुतळा असे अभिमानाने म्हटले तर जीभ झडेल का? असेही विचारावेसे वाटते.
राजेंनी उभ्या केलेल्या स्वराज्यात आज शेतक-यांच्या होत असलेल्या आत्महत्या,  लेकीबाळींच्या लुटल्या जात असलेल्या इज्जती,  स्री भृणाच्या गर्भातच होत असलेल्या हत्या, उद्योजक व्यापारी व सावकारांकडून सामान्य प्रजेची होत असलेली लुट पाहून निराश अन हताश होतो. जिवन जगण्यासाठी येत असलेल्या अडचणी पाहून पाण्यातील रडणा-या माशाप्रमाणे अवस्था होते आणि राजेंची आठवण येते.
राजेंच्या महाराष्ट्रात जेव्हा चुकीचे पहायला, वाचायला अथवा ऐकायला मिळते तेंव्हा उदास व्हायला होते. एवढया समृद्ध व पवित्र हिंदवी स्वराज्यात जन्म मिळाला याचा अभिमान असण्याऐवजी राजेंच्या वर्तनाला, किर्तीला, विचारांना व संस्कारांना काळीमा फासण्याचा प्रयत्न करणा-या अशा  काही लोकांना विचारावे वाटते,,,,
अरे लाज वाटते का लाज? ??

बालासाहेब धुमाळ,  बीड
मो. 9421863725

Wednesday 23 March 2016

मापदंड जात विकासाचे Measures of Cast Progress

मापदंड जात विकासाचे
Measures of Cast Progress
कोणत्याही जातीच्या विकासाचे काही मापदंड असतात ते तीने पूर्ण केले म्हणजे ती जात विकसीत जात आहे असे समजले जाते. जी जात शैक्षणिक क्षेत्रात पुढे आहे, जीचे युवक युवती उच्च शिक्षण घेवून बाहेर पडतात. उच्च शिक्षण म्हणजे केवळ बी.ए. एम.ए नव्हे तर CET, AIEEE, JEE, CAT,SET, NET, GATE, MPSC, UPSC अशा परिक्षा उत्तीर्ण होऊन ज्या समाजातील विद्यार्थी आधिकारी डॉक्टर, इंजिनिअर, वकील, तंत्रज्ञ, सीए, सी एस, शासकीय कर्मचारी तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या (MNS), सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या (PSU), खाजगी क्षेत्रातील नामांकीत कंपन्या, विमा क्षेत्र, सरंक्षण व संशोधन क्षेत्र, रचना व व्यवस्थापन क्षेत्र तसेच कला, साहित्य क्रिडा, पत्रकारिता, व्यापार, व्यवसाय, उद्योग इ. क्षेत्रात प्रतिनिधीत्व मिळवून आपल्या कार्याचा ठसा उमटवतात त्या जातीला शैक्षणिक दृष्टया प्रगत जात असे संबोधले जाते. अशी बुध्दिवादी व उच्च शिक्षीत जात सहसा चिडत नाही, हिंसक बनत नाही व प्रश्नाचे उत्तर कृतीतून देतो.
      आर्थिक दृष्टया प्रगत जात कशी असते हे सांगण्याची आवश्यकता आहे काय? ज्या जातीतील लोकांकडे पैश्याची चंगळ असते, पैसा नियमित येत असतो, ज्यांची बाजारात पत असते, ज्यांच्या जगण्याचा स्तर उंच असतो (High Living Standard) ज्यांच्याकडे भव्य घरे, गाडया, दागदागिने, कपडेलत्ते, प्रवास, पर्यटन आदिंवर खर्च करण्यासाठी मुबलक पैसा असतो शिवाय ज्यांची मोठया प्रमाणात स्थावर मालमत्ता असते, ज्या जातीतील लोक बेरोजगार नाहीत व ज्या जातीचे दरडोई उत्पन्न अधिक असते, त्या जातीस आर्थिक दृष्टया प्रगत जात असे म्हटले जाते.
      आता जीवणाचे व जगाचे वास्तव विचारात घ्यायला हवे की, वरीलप्रमाणे जी जात आर्थिक व शैक्षणिक दृष्टया प्रगत असते त्या जातीचा सामाजिक विकास आपोआप होतो. सामाजिक विकासाचे विश्लेषण करताना असे म्हटले जाते की, ज्यांना समाजात प्रतिष्ठा असते, ज्यांच्यावर अन्याय होत नाही, ज्यांना प्रत्येक उपक्रमात सन्मानपूर्वक सहभागी करुन घेतले जाते, ज्यांच्या शब्दाची किंमत केली जाते अश्या जातीला सामाजिक दृष्टया प्रगत जात म्हटले जाते.
      असा विकास मोजताना जातीतील लोकांचे वर्तन हा सर्वात महत्वाचा विषय ठरतो. जर आपले वर्तन सभ्य, सौम्य, नम्र, विवेकवादी व विचारशिल असेल (Rational) तर समाज त्यांना आपोआप प्रतिष्ठा देतो. ज्या जातीत कौटुंबिक भांडणे कमी असतात, घरात वृध्दांची व्यवस्थीत काळजी घेवून मान दिला जातो, आदर केला जातो, त्या जातीचा समाज अथवा जग आदर्श घेते.  ज्या जातीत स्त्रियांना बरोबरीचा दर्जा दिला जातो, आपल्या अपत्यांच्या भवितव्यासाठी संघर्ष केला जातो व अपत्ये देखील आपल्या माता पित्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी रात्रंदिवस मेहनत घेतात, चारित्रय संभाळतात अश्या जातीचा जग आपोआप आदर करते नव्हे तो करावाच लागतो.
      ज्या जातीतील स्त्री-पुरुष चारित्रयहीन असतात, ज्या जातीतील लोकात कर्जबुडवेपणा, फसवेगिरी, चो-या, दरोडे, मारामा-या, खुन, अपहरण, बलात्कार इत्यांदी सारखे गुन्हेगारी वर्तन असते. जी जात व्यसनी असते अशी जात उर्वरित जगाकडून मानापानाची हकदार असत नाही व परिणामी अशा जातीचा सामाजिक विकासाचा विकास होताना आढळत नाही.
आता राहिला प्रश्न राजकीय विकासाचा, तर वरीलप्रमाणे विकासाचे मापदंड पूर्ण करणा-या जातीचा राजकीय विकास आपोआपच होतो. राजकीय पक्षांना व पुढा-यांना अशाच वर्गाची गरज असते. मग निवडूकांमध्ये संधी मिळवून व विजयी होवून विविध स्तरांवरील सभागृहांमध्ये त्या जातीचा आवाज पोहोचतो. मग आपल्या जातीने अथवा आपल्या समाजाने वरील मापदंड पूर्ण केले आहेत का? तर उत्तर आहे “पूर्णपणे नाही.” ज्यांनी पूर्ण केले ते प्रगत आहेत व ज्यांनी पूर्ण नाही केले ते अप्रगत आहेत.
      आपण कलाकार मंडळी आहोत आणि कलेचा विकास हा गोंधळी जातीच्या विकासाचा महत्वाचा मापदंड आहे मात्र तो विषय विसस्तृत व महत्वाचा असल्याने त्यावर सखोल चर्चा व्हावी असे वाटते. आता आपण असे म्हणाल हे काय आम्हाला माहित नाही काय? विकसीत समाज कशाला म्हणतात याची आम्हाला कल्पना नाही का? मित्रांनो इथेच खरी ग्यानबाची मेख आहे. कळतंय पण वळतं नाही अशी अवस्था आहे. मग माझ्यासारख्या एखादया समाजाविषयी तळमळ असणा-या व्यक्तीने एवढा काथ्याकुट करुन वा शब्दांचे गुराळ करुन काय फायदा? हे सर्व होणार कसे?
      मित्रांनो कोणत्याही देशातील अथवा राज्यातील देशाचा विकास करणे अथवा विकासास चालना देणे हे त्या त्या देशाच्या केंद्र व राज्यशासनाचे काम असते. आपल्या देशाच्या स्वातंत्रयांपासूनच आपल्या सारख्या अप्रगत जातींचा विकास व्हावा यासाठी सरकारे प्रयत्न करत आहेत. पण मला वाटते सरकारचा मुख्य हेतू अश्या अप्रगत जातींना मुख्य प्रवाहात आणणे ऐवढाच असतो. शासनाचा हा हेतु तत्वता पूर्ण झाला आहे असे मान्य केले तरी शंकेलाही वाव आहे. सरकार आपला विकास करु ईच्छित नसेल अथवा करु शकत नसेल तर अशा वेळी जातीने पुढाकार घ्यायला हवा. आता हेच पाहाणा दुष्काळ निवारणासाठी सरकार प्रयत्ना करुन थकले पण समस्या जैसे थेच आहेत. म्हणून “नाम” सारख्या सेवाभावी विविध संघटनांना पुढाकार घ्यावा लागला. अनेक लोक व लोकांचे गट पुढे आले. आपले ही तसेच आहे. विकासाच्या किमान पातळीपर्यंत आज आपण आहोत. काही आजार आहेतही पण अशा रुग्णांना डॉक्टरांकडे घेवून जाणे अथवा त्यांच्याकडे डॉक्टरांना घेवून येणे हे काम समाजविकासाची तळमळ असणा-या कार्यकत्यांनी करावे लागेल.
      तर आता आव्हान हे आहे की, गोंधळी जातीचा किमान विकास झाला आहे. विकसनशील जात म्हणायला हरकत नाही पण विकसित जात नाही आणि विकसित बनण्यासाठी काय करायला हवे? आपण विकसित जातीचे मापदंडही पाहिले आहेत. आता वस्तुस्थिती व अपेक्षितस्थितीची कल्पना आल्यानंतर स्वत:ला विकसित जात म्हणवून घेण्यासाठी वरील निकष पूर्ण करावयाचे आहेत. त्यासाठी मला वाटते शैक्षणिक व आर्थिक सुधारांसाठीचे प्रयत्न एकाचवेळी (Simultaneously) करण्याची आवश्यकता आहे. कारण शैक्षणिक व आर्थिक विकास हे परस्परपुरक असतात. शैक्षणिक प्रगती असेल तर आर्थिक प्रगती होते आणि बरेचदा असेही पाहण्यास मिळते की, शिक्षण घेण्यातील महत्वाची अडचण आर्थिक स्थिती सबळ नसणे हीही असते. गरीबीमुळे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे  दोन्ही प्रश्नांची उत्तरे सोबतच शोधावी लागतील. आणि आता सुरु होतो तो महत्वाचा विषय की, कसे? हे कसे करता येईल? कारण कल्पना अनेक आहेत व अनेकांकडे आहेत पण जोवर कल्पनांना प्रत्यक्षात उतरवले जाणार नाही तोपर्यंत हा प्रपंच अनाठायीच !  (क्रमश:)
शब्दांकन: बालासाहेब सिताराम (बी. एस.) धुमाळ
मो. 9421863725  


         s