Thursday 23 August 2018

श्रद्धा व लुट

श्रद्धा व लुटः

मित्रांनो आज आम्ही माझ्या पत्नीसाठी तिच्या घरच्यांनी (माहेरच्यांनी) श्रद्धेने बोललेला नवस फेडण्यासाठी तुळजापूर व नळदुर्ग यांच्यादरम्यान असलेल्या श्री महालक्ष्मी माता देवस्थान चिवरी ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद येथे आलो आहोत. नवसाचे स्वरूप गोड नैवैद्य, साडी चोळी, इतर पुजेचे साहीत्य आणि बोकडाचा बळी असे होते.
सर्वप्रथम गोडवा नैवैद्य, साडी चोळी देवीला मनोभावे अर्पण करण्यासाठी सर्व बायका, मुलेबाळे व पुरूष मंडळी मातेच्या मंदिरात गेले. देवीपाशी बसलेल्या अंदाजे वीस वर्षाच्या देवीच्या जीवलग प्रिय व विश्वासू अशा देवी व भक्तांमधील मध्यस्थाने आमच्याकडे 251 रूपयांची मागणी केली. आम्ही देण्यास नकार दिला व श्रद्धेने 101 रूपये नैवैद्यावर ठेवले. त्याला हवी ती रक्कम 251 रुपये न दिल्याने त्याने आमचे पुजेचे ताट अक्षरशः परत केले!!
मी म्हटले काही हरकत नाही पुजेचे साहीत्य बाहेर ठेऊन दर्शन घ्या. ईश्वर सर्वव्यापी असतो. तो सर्व पाहतो व भक्तांच्या भावना समजुन घेतो. शिवाय जे काही पाप लागेल ते त्याला लागेल. बरीच बाचाबाची करून हतबल होऊन, विनंती करून आमच्यातील बायकांनी वाटाघाटी करून, विनंती करून 201 रूपयांवर प्रकरण मिटवले. अर्थात मी मात्र तत्पूर्वीच मातेला मनोभावे हात जोडून मंदिराबाहेर पडलो.
मित्रांनो तेथील डफ किंवा डपडे वादकाने (51 रूपये), बोकड कापणाराने (251 रुपये), पुजेचे साहीत्य विकणाराने (51 रुपये) जेवढे पैसे मागीतले तेवढे आम्ही विनातक्रार दिले. परंतु पुजेचे ताट देवीपर्यंत पोहचविण्यासाठी त्या दलालाने मागीतलेले 251 रूपये देण्यास मात्र विरोध केला. कारण देवाला पैसे नव्हे तर श्रद्धा लागते. खुप तळ खुप पुजेचे ताट ज्यात हळदी कुंकू श्रीफळ उद धुप अगरबत्ती साडी चोळी तेल फळे फुले मागेल. कारण भाव भक्तीचा तो भुकेला असतो असे ऐकले वाचले होते. अर्थात तो नक्की तसाच असेल मात्र त्याच्या नावाने भक्तांना लुटणारे हे दलाल, भाविक व देवीमध्ये दुरावा निर्माण करणारे जगे भक्तांना अक्षरशः लुटत आहेत. याचा तर सरळ सरळ असा अर्थ होतो की देवी ही आमची वैयक्तिक मालमत्ता (private property) आहे. जर तुम्हाला दर्शन घ्यायचे असेल तर अमुक रूपये देवाची फी द्या तरच दर्शन घ्या! दुसऱ्या शब्दात याला देवाचा बाजार व यांना व्यापारी व दलाल म्हणता येणार नाही का? भाविकांच्या श्रद्धेचे भांडवल करून स्वतःचे खिसे भरणारे, हे लुटारू आहेत असेच मी म्हणेल. स्वतः देव कैदेत असुन त्या कैद्यावर निगराणी करणारे हे शस्त्रधारी सैनिक आहेत असेच मी म्हणेन.
विशेष म्हणजे आमच्यातील काही तरूण व सुशिक्षित भली माणसे देखील, "देऊन टाका, पाप लागेल. मनातून नाही फेडला नवस तर पावन होणार नाही. आहेत ना आपल्याकडे तर देऊन टाका. या गोरगरिबांनी तरी पोट कसे भरायचे?" असे धार्मिक तत्वज्ञान देऊ लागले! मला मात्र त्यांच्या बुद्धीची किव आली आणि तरूण व सुशिक्षित माणसेही किती अंद्धश्रद्धाळु असु शकतात याचा प्रत्यय आला.
मित्रांनो मी दानधर्म समजु शकतो. नव्हे तो करायलाच हवा हे ही समजतो. विश्वास करा मी स्वतःही करतो. मात्र तो कोणाला करायला हवा हे अधिक समजतो. दान स्वेच्छेने जे दिले जाईल ते स्विकारले पाहीजे. विशेष म्हणजे हे देवस्थान नोंदणीकृत नाही. येथे संस्थान नाही. बळजबरीने वसुल केलेल्या पैशाचा काही हिशेब वगैरे नाही. त्या पैशांमधुन भाविकांसाठी कुठली ही मोफत सोय वा सुविधा उपल्ब्ध करून देण्यात आलेली नाही. पत्राची काही शेड्स आहेत परंतु त्यासाठीही 151 रुपये घेतले जातात!
मित्रांनो हे असे देवाचे बाजारीकरण फक्त येथेच झाले आहे असे नाही. तर ही जोर जबरदस्ती सर्वत्रच होताना आढळत आहे. मला कळत नाही, अमुकच दक्षणा द्या, तमुकच पैसे द्या असे बंधनकारक कसे काय केले जाऊ शकते? ही दादागिरी कशी काय सहन केली जाऊ शकते? हा वसुलीचा अधिकार या अक्कल शुन्यांना कोणी दिला? आज जी 201 रूपयांवर तडजोड झाली तीला मी तरी सौदेबाजीच म्हणेल!
मित्रांनो हा नालायकपणा थांबला पाहीजे, नव्हे आपण थांबवला पाहिजे. यात पत्रकार बंधूंनी पुढाकार घ्यायला हवा. भाविकांनी यांच्याविरोधात पोलीसात तक्रारी दिल्या पाहीजेत. कारण आपापल्या धार्मिक श्रद्धा व उपासणा जपण्याचा घटनात्मक अधिकार जनतेला खुद्द डॉ. बाबासाहेबांनी घटनेत दिला आहे. काही शांतताप्रिय समंजस व काहीसे डोळस लोक वैतागून अशा ठिकाणी जाणेच टाळतात. मात्र मी म्हणेल, आपण जाण्याचे टाळण्याऐवजी अशा हरामखोरांना मंदिरातुन हुसकावून लावले पाहीजे. एक प्रकारे देवालाही यांच्या तावडीतून सोडविले पाहिजे. आणि भक्त व देव यांच्यामधील हे दलाल दुर करून ही श्रद्धापुर्ण भेट विना अडथळा घडवून आणली पाहिजे.

बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो.9673945092.

No comments: