Wednesday 29 August 2018

विमुक्तदिन

विमुक्तदिन...

दिनांक 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री व दिनांक 15 ऑगस्ट 1947 च्या पहाटे दिल्लीत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक पवित्र भाषण केले व त्यानंतर देशभरातील जनतेने स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. मात्र तेव्हा देशात एक असाही वर्ग होता, जो भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आद्य सैनिक होता! ज्याने आपले सर्वस्व या लढाईत गमावले होते मात्र तो या सर्व चालु घडामोडींपासून खूप दूर होता. एक प्रकारचे नरक जीवन बंदिस्त ठिकाणी जगत होता!!

इसवी सन 1600 मध्ये भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटिशांची भारतातील व्यापारी कंपनी होती. या कंपनीच्या स्थापनेनंतर भटक्या जमातींच्या पारंपारिक व्यवसाय व्यापार यांच्यावर अनिष्ट परिणाम होऊ लागले. स्वदेशी मालाला पडते दिवस येऊ लागले. कारण मुळ भटक्या जमाती या व्यापारी व व्यावसायिक जमाती होत्या. मालाची ने-आण करणे, खरेदी-विक्री करणे, वस्तू तयार करून देणे अथवा स्वतः त्यांची खरेदी विक्री करणे, कला नकला दाखविणे असे या जमातींचे अर्थार्जनाचे पारंपरिक पर्याय होते. हे पारंपरिक पर्याय ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी मुळे धोक्यात आले होते. या जमाती व ईस्ट इंडिया कंपनी परस्परांचे व्यावसायिक शत्रू बनले होते. त्यामुळे या जमाती ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध हमेशा कुरापती करत असत. ज्यामध्ये इंग्रजी मालावर दरोडे घालणे, वाटमाऱ्या करणे इत्यादी. इंग्रज यांना पिंढारी अथवा ठग संबोधत असत. इथपर्यंत हा संघर्ष केवळ व्यावसायिक होता मात्र जेव्हा इंग्रजांनी येथील सत्ता काबीज करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्या दिशेने षडयंत्रे रचली जाऊ लागली तेव्हा हा सर्व डाव या जमातींच्या लक्षात आला आणि मग त्यांनी गनिमी पद्धतीने हल्ले करून इंग्रजांना जेरीस आणण्याचे कारस्थान सुरू केले. क्रांतिकारकांच्या सशस्त्र क्रांतिकारी उठावाची सुरूवात यांनीच केली. तिर, कामठा, फासे, भाले, बरचे, कुर्‍हाडी अशी पारंपारिक शस्त्रे घेऊन हे देशभक्त क्रांतिकारी भारत मातेला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करू पाहत होते. इंग्रजांच्या गुप्तचर पाहणीमध्ये असे आढळले की प्रामुख्याने या भटक्या जमातीच अशा क्रांतिकारी कारवायांमध्ये सहभागी आहेत. तसेच ज्या प्रत्यक्ष सहभागी नाहीत त्या छुप्या पद्धतीने त्यांना माहिती व वस्तूंची रसद पुरवित आहेत.

या भटक्या जमातीमधील लोक लढवय्ये, शूर व काटक तर होतेच त्याचबरोबर त्यांच्या अंगी जन्मजात कौशल्ये देखील होती. करपल्लवी नेत्रपल्लवी अशा सांकेतिक भाषा त्यांच्याकडे होत्या ज्यात विशिष्ट खुणा तथा संकेत वापरून संवाद साधले जात. शिवाय त्यांच्या त्यांच्या पारंपारिक ध्वनी भाषाही होत्या. वेषांतर करण्याची जन्मजात कला होती यामुळे इंग्रजी राजवटीविरुद्धचा असंतोष जो राष्ट्रीय उठावाच्या दिशेने जात होता तो असंतोष संघटीत होण्यास भटक्या जमाती अधिक कारणीभूत ठरत होत्या. इंग्रजी अन्याय अत्याचाराची, इंग्रजांविषयीच्या माहीतीची, इंग्रजी राजवटीविरूद्ध जनमत एकत्र करण्याची तसेच याचा थांगपत्ता इंग्रजांना न लागु देण्याची महत्वपूर्ण कामगिरी या जमाती करत असत. त्यांच्यामुळे इंग्रजी राजवटीविरुद्ध लोक एकत्र येऊन कट करू नयेत, उठावाचे लोण पसरू नये, लोकांमध्ये संदेशांची देवाणघेवाण होऊ नये, लोक पेटून उठू नयेत यासाठी इंग्रजांनी दडपशाहीच्या मार्गाने या भटक्या जमातींवर बंदी आणण्याचे ठरविले.

भारतीय स्वातंत्र्य संग्राम सर्व भारतीयांनी लढला मात्र या स्वातंत्र्यसंग्रामाला खऱ्या अर्थाने सुरुवात केली ती आदिवासी व भटक्या जमातींनी कारण ईस्ट इंडिया कंपनीचा सर्वाधिक दुष्परिणाम जंगली व फिरस्ती जमातींवर झालेला होता त्यामुळे या जमाती आपापल्या पद्धतीने या इंग्रजी जुलमी राजवटीविरुद्ध एकत्र येऊन त्यांना विरोध करत होत्या. हा विरोध अधिकाधिक व्यापक व यशस्वी कसा होईल व याचे रूपांतर उठावात व उठावाचे रूपांतर क्रांतीत अथवा स्वातंत्र्याच्या लढाईत कसे होईल यासाठी यांच्या टोळ्या प्रयत्न करायच्या. या जमाती एकत्र येऊन टोळ्या तयार करून इंग्रजी पोलीस छावण्यांवर छुपे हल्ले करायच्या, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची रक्तवाहिनी असलेली रेल्वे अडवायच्या, रेल्वे रूळ उखडायच्या, शस्त्रास्त्रे दारूगोळा यांची कोठारे लुटायच्या, कोठारे उध्वस्त करायच्या, सरकारी खजिना लुटायच्या, इंग्रज अधिकाऱ्यांचे अपहरण करायच्या, त्यांच्या हत्या करायच्या. असे राष्ट्रहिताचे व क्रांतिकारक कार्य या टोळ्या करत असत म्हणजेच या जमाती इंग्रजांच्या सर्वात मोठा शत्रु होत्या. भारतातील ब्रिटीश साम्राज्याच्या अस्तित्वास या जमातींपासुन धोका होता.

त्यामुळे 1857 चा राष्ट्रीय उठाव कसाबसा शमविल्यानंतर मात्र यापुढेही असे होऊ शकते हा संभाव्य धोका ओळखुन डोईजड होत चाललेल्या व नियंत्रणात येत नसलेल्या या भटक्या जमातींना पायबंद घालण्यासाठी इंग्रज सरकारने 1871 मध्ये एक कायदा आणला. तो कायदा होता "गुन्हेगार जमाती कायदा 1871". या जुलमी कायद्याने भटक्यांचे अक्षरशः जीवन उद्ध्वस्त करून टाकले. त्यांना जन्मतःच गुन्हेगार करून टाकले. या कायद्यान्वये सुमारे दोनशे जमातींना गुन्हेगार जमाती ठरवून त्यांचे स्वातंत्र्य नष्ट केले गेले. त्यांचे वैयक्तिक जीवनही नष्ट केले सर्व स्त्री-पुरुष आबालवृद्ध तसेच किशोरवयीन बालके एवढेच नव्हे तर अक्षरशः नुकतीच जन्माला आलेली नवजात बालके देखील या कायद्याने गुन्हेगार ठरविले.

मात्र तरीही या जमातीच्या गणीमी युद्धनीतीत फारसा फरक पडला नाही. म्हणून इंग्रजांनी 1913 मध्ये या भटक्यांच्या सर्व स्त्री-पुरुष महिला व बालके यांना सात बोटींमध्ये जबरदस्तीने कोंबले व त्या बोटी समुद्रात बुडवून देण्याचे ठरविले. मात्र ब्रिटनच्या राणीने धर्मगुरूंच्या आग्रहावरून हस्तक्षेप केला व त्यांच्यासाठी सरकारच्या नियंत्रणात रोजगार निर्मितीचे पर्याय 52 कैदखान्यांमधून उपलब्ध केले. या कैदखान्यांनाच सेटलमेंट्स असे म्हणत. अशा सेटलमेंट्स बेळगाव, विजापूर, मेरठ, धारवाड, म्हैसूर, मद्रास, दिल्ली, अहमदाबाद, झाबवा, हैदराबाद, गुलबर्गा तर महाराष्ट्रात सोलापूर, मुंडवा, अंबरनाथ यांचेसह देशातील मध्य प्रदेश बंगाल गुजरात अशा राज्यांमध्ये या 52 सेटलमेंट्स निर्माण करण्यात आल्या. या कैदखान्यात या जमातींना अक्षरशः गुलामांप्रमाणे वागणूक दिली जात असे. त्यांच्याकडून बारा-बारा तास जनावरांप्रमाणे कष्ट करून घेतले जात असे. ज्याप्रमाणे पूर्वीच्याकाळी साम्राज्यवादी विजयी सम्राट हा पराभूत सैनिकांकडून व गुलाम जनतेकडून जबरदस्तीने किल्ले बांधून घेत, रस्ते करून घेत, खिंडी खोदुन घेत, भुयारे खोदुन घेत, राजमहाल बांधुन घेत अगदी त्याचप्रमाणे या सेटलमेंटमध्येही या जमातींच्या श्रमाचे शोषण केले जात होते. या सेटलमेंट म्हणजे एक प्रकारचे काराग्रहच होते, जिथे गुलामीही होती व कष्टही होते!

स्वातंत्र्यानंतर दिनांक 31 ऑगस्ट 1952 रोजी म्हणजे तब्बल पाच वर्षे सोळा दिवसानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत भाषण केले व त्यात ते म्हणाले की, "आज रोजी आपण सर्व भारतीय मुक्त आहोत मात्र आजपासून भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी विशेष लढा उभारणारे भटके-विमुक्त विशेष मुक्त म्हणजेच "विमुक्त" आहेत." विशेष म्हणजे या सेटलमेंटच्या तारा पुरोगामी महाराष्ट्रात तुटायला 13 ऑगस्ट 1961 चा दिवस उजाडावा लागला. तब्बल 14 वर्षे!! महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते दिनांक 13 ऑगस्ट 1961 रोजी सोलापूर येथील सेटलमेंटच्या तारा तोडून बंदिस्त भटक्या जमातींना मुक्त केले, विमुक्त केले . म्हणजेच देशातील भटक्यांना इसवी सन 1952 मध्ये तर महाराष्ट्रातील भटक्यांना 1961 मध्ये ख-या अर्थाने स्वातंत्र्य लाभले!!

मात्र जरी देशातील भटक्यांची सेटलमेंट मधून 1971 चा गुन्हेगारी जमाती कायदा नष्ट करून सुटका केली असली तरी भटक्या-विमुक्तांचे दुर्दैव संपले असे अजिबात नाही. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान अस्तित्वात आले. गावगाड्यातील अस्पृश्यांना अनुसूचित जाती म्हणून व गावाबाहेरील जंगलातील आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणून आरक्षण दिले गेले. मात्र रस्त्यांवर, माळरानात, गायरानात, नदी-नाल्यांकाठी, पालांमध्ये तंबूंमध्ये राहणाऱ्या या भटक्या-विमुक्तांना कुठलेही घटनात्मक आरक्षण अथवा संरक्षण मिळाले नाही. संविधान अमलात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढाकाराने "1871 चा गुन्हेगार जमाती कायदा" रद्द झाला व भटक्या-विमुक्तांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले एवढेच.

आणखी एक दुर्दैव म्हणजे ज्यांच्याकडे ना ओळखीचा पुरावा आहे, ना शिक्षणाचा पुरावा आहे, ना वास्तव्याचा पुरावा आहे, एव्हाना ज्यांच्याकडे आपण भारतीय असल्याचाही म्हणजे भारतीयत्वाचाही पुरावा नाही!! यांना ताकदवाणांमध्ये जीवनसंघर्ष करण्यासाठी केंद्राने ओबीसीमध्ये टाकले आहे! हा भटक्या विमुक्त तमातींवर खुप मोठा अन्याय आहे. कारण "1871 च्या गुन्हेगारी जमाती कायद्याचा व 1952 च्या हॅबिच्युअल ऑफेंडर्स अॅक्टचा" परिणाम असा झाला आहे की आज हा समाज सामाजिक विषमतेने ग्रासला गेला आहे. गुन्हेगाराचा कलंक पुसला गेलेला नाही. समाजमनाची पूर्वग्रहदूषित मानसिकता या जमातींना जगू देत नाही. यांना ना काम दिले जातेय ना यांच्यावर विश्वास ठेवला जातोय. यांचे सर्वच पारंपारिक रोजगार यांत्रिकीकरणाने आधुनिकीकरणाच्या नावाखाली नष्ट करण्यात आले आहेत. कारागीर, कलाकार, नकलाकार, कसरतीकार जमातींचे पारंपरिक रोजगार व्यावसाय स्वतंत्र भारतात कायदे करून संपुष्टात आणले गेले. त्यांना अक्षरशः भिकही मागु दिली जात नाही! संशयाचे भुत यांचा पाठलाग सोडत नाहीये. अनेकदा यांना ठेसुन, जाळून मारले गेले आहे. एका संवैधानिक व लोकशाही गणराज्यात स्वातंत्र्याच्या आद्य स्वातंत्र्य सैनिकांच्या वाट्याला हे असावे हे अशोभनीय आहे. जर खर्‍या अर्थाने या जमातींना न्याय मिळवून द्यायचा असेल तर केंद्रात "डीएनटी" हे स्वतंत्र तिसरे शेड्युल निर्माण करून यांना घटनात्मक आरक्षण व संरक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. हॅबिच्युअल ऑफेंडर्स अॅक्ट 1952 रद्द करणे, कायदेशीर संरक्षण व ओळख देणे, त्यांच्यासाठी पक्क्या निवा-याची सोय करणे, शिक्षण व रोजगाराची विशेष व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा जे इसवी सन 1600 पासून सुरू होते तेच थोड्याफार फरकाने आजही सुरू आहे आणि थोड्याफार फरकाने उद्याही सुरू राहील. 

असो लिखाण जास्त लांबवत नाही मात्र "विमुक्तदिनाच्या" निमित्ताने प्रत्येक भटक्या विमुक्ताला आपला इतिहास माहित असावा असे वाटते. आपण भटके-विमुक्त म्हणजे नेमके कोण आहोत? आपल्याला तसे का संबोधले जाते व 31 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणजे "विमुक्तदिन" कसा? हे समजावे एवढ्यासाठीच हा शब्दप्रपंच....सर्व भटक्या विमुक्त भावा-बहीणींना "विमुक्तदिनाच्या" मनःपूर्वक शुभेच्छा..।।

आपला:
बाळासाहेब सिताराम धुमाळ.        
मो.9673945092.

No comments: