Thursday 23 August 2018

गोंधळी पुनर्विवाह

गोंधळी पुनर्विवाह
मित्रांनो मी सोशल मीडियावर वर्तमानपत्रात छापुन आलेली बातमी वाचली. बातमी ही श्रीमती अनिता विनायक साळुंखे रा. चिकलठाणा, औरंगाबाद व श्री. प्रकाश वसंत गरूडकर रा. चाळीसगांव, जळगांव या विधवा-विधुर जोडप्याने गोंधळी समाजातील जुनाट रूढी परंपरांना फाटा देत पुनर्विवाह केल्याची होती.

मला शंका आली की नाही हे शक्य नाही. एवढेही मागासलेपण आपल्या जमातीत नाही की विधवा अथवा विधुर पुनर्विवाह होत नाहीत. ही बातमी म्हणजे काहीतरी स्टंटबाजी अथवा प्रसिद्धी मिळविण्यासाठी केलेली शाळा वा ड्रामेबाजी आहे. मला काहीसा रागही आला की ही स्वप्रसिद्धीसाठी समाजाची बदनामी आहे. म्हणुन मी या पुनर्विवाहाचे बातमीत छापलेले प्रेरक श्री. रामभाऊ गायकवाड यांच्याशी फोनवर बोललो. त्यांनी सांगीतले की अजुनही इकडे विधवा, घटस्फोटीतांच्या पुनर्विवाहाच्या बाबतीत समाजमन अनुकुल नाही. उलटतपासणी करण्यासाठी मी त्यांच्या बरोबरच इतर दोघा- तिघांना फोनवरून माहीती विचारून शहानिशा केली तर त्यांनीही, नाही! सहसा होत नाहीत असेच सांगीतले!!

मित्रांनो चाळीसगांव, जळगांव व एकंदरीत खानदेशातच गोंधळी जमातीमध्ये विधवा पुनर्विवाह शक्यतो होत नाहीत म्हणे!! होत असतील तर आनंदच आहे मात्र होत नसतील तर हे फारच धक्कादायक व भयानक आहे. फुले शाहु आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात 21 व्या शतकातही ही परिस्थती असेल तर ही लाजीरवाणी बाब आहे. ही परिस्थीती काही केवळ गोंधळी जमातीचीच नक्कीच नसेल. इतरही भटक्या विमुक्त जमातींची परिस्थिती यापेक्षा निश्चीतच भिन्न नसेल.

मला प्रश्न पडतो की मग शासन काय सांगते की देशातील जमातींची परिस्थिती सुधारली आहे, सुधारत आहे म्हणुन? ही सनसनीत चपराक आहे हरी नरके सारख्या तज्ञाला. जे म्हणतात की गोंधळी ही एक प्रगत व पुढारलेली जात आहे. तसेच हा पुरावा आहे, गोंधळी समाज सर्वत्र अजुनही समाजाच्या मुख्य प्रवाहात आलेला नाही. अद्यापही बराच समाज मागास व पारंपारंपरिक विचारसरणीचाच आहे याचा.

महाराष्ट्राच्या व देशाच्या सर्वच भागात हे चित्र पहायला मिळते असे नाही शिवाय खानदेशातही असे असेलच असेही मला म्हणायचे नाही. कारण मी या बातमीच्या व संबंधितांनी फोनवरून दिलेल्या माहीतीच्या आधारे लिहीत आहे. परंतु जर हे सत्य असेल तर हे आजच्या काळात अत्यंत अपमानास्पद आहे. प्रत्येक मनुष्याला जोडीदाराची नैसर्गिक व भावनिक गरज असतेच एवढे साधे शास्त्र जर आपल्याला समजत नसेल तर आपण माणुस कसे काय म्हणवले जाऊ शकतो? या पुनर्विवाहांना विरोध करण्याचा अधिकार विरोधकांना कोणी दिला? सोबतच मला हे एवढ्या सा-या संघटना, समाजसेवक, उच्च व सुशिक्षित तरूण, नोकरदार व अधिकारी यांचेही हे अपयश वाटते. एवढे सगळे मिळून परिस्थिती बदलु शकत नाहीत?

मित्रांनो शासन काही करेल नाही करेल मात्र समाजातील सुशिक्षित लोकांनी पुरोगामी विचारांची पेरणी, आपली समाजाप्रती सामाजिक बांधिलकी समजून केली पाहिजे. स्वतः बावळट रूढी परंपरांचे बंध तोडुन मानवतेच्या मार्गावर चालुन आदर्श निर्माण करून दिले पाहीजेत. परिस्थीती बदलण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. खासकरून पुढारलेल्यांनी सुधारलेल्यांनी. कारण हे मागासलेपण शासकिय सहानुभुती मिळविण्यासाठी जरी मदतगार असले तरी कायद्याच्या व मानवतेच्या दृष्टीने मात्र भुषणावह अजिबात नाही. काळ बदलत आहे, आपणही बदलले पाहिजे. जुनाट व बुरसटलेल्या विचारांसह आपण यशाची शिखरे सर करूच शकत नाहीत.

मी श्री. रामभाऊ गायकवाड (अध्यक्ष, गोंधळी समाज संघटना, चाळीसगांव) यांचे व त्यांच्या श्री. संतोष सोनवणे (उपाध्यक्ष), श्री. जयंत गायकवाड, श्री. विष्णु भिसे, श्री. सतिश पवार, श्री. बाळासाहेब गायकवाड या व इतर सहका-यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो व वधुवरांच्या निर्णयाचा व या मंडळींच्या पुढाकाराचा सर्वांनी आदर्श घ्यावा असे नम्र आवाहन करतो.

आपलाः
बाळासाहेब सिताराम धुमाळ
मो. 9673945092

No comments: