Thursday 23 August 2018

जशी दृष्टी तशी सृष्टी.........

जशी दृष्टी तशी सृष्टी.........

मित्रांनो, नुकतेच धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निर्दयी हत्याकांड आपण अनुभवले. राईनपाडा ग्रामस्थांच्या अमानुष मारहाणीत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाच नाथपंथी डवरी गोसावी जमातीतील लोक दुर्दैवाने मृत्युमुखी पडले. या घटनेने संपुर्ण देश हळहळला. सोबतच भटक्या विमुक्तांची पोटाची खळगी भरण्यासाठीची वणवण भटकंती पाहुन समाजमन गहीवरले. अनेक बुद्धवाद्यांनी विचारवंतांनी, समाजसुधारक साहीत्यीकांनी आपापल्या प्रतिक्रिया मांडल्या. सोशल माध्यमातून व वर्तमान पत्रातुन खुप काही लिहीले गेले. मिडीया प्रतिनिधींनी संपादकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रत्यक्ष त्या क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्तींनीही आपले अनुभव व भटक्यांची सद्यस्थिती यावर प्रकाश टाकला. कशाने परिस्थीती पालटु शकते यावरही मंथन झाले.

जेष्ठ शिक्षणतज्ञ मा. श्री. हेरंब कुलकर्णी, मा. प्रा. श्री. हरी नरके, राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष मा. श्री. बाळकृष्ण रेणके आदिंचे मी लेख वाचले. मात्र मला प्रा. हरी नरके यांचे लिखाण भटक्या विमुक्तांच्या बाबतीत पूर्वग्रहदूषित व व्यक्तीद्वेषपुर्ण वाटले.  यापुर्वीही याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. हकनाक मेले 5 डवरी गोसावी या आपल्या लेखात हरि नरके पाच भटक्यांच्या मरणाची खिल्ली उडवताहेत की काय असे वाटते!!

ते लिहीतात भटके लोक आपापल्या परिसरातील शेतांमध्ये किंवा जवळपासच्या कारखाण्यांमध्ये मजुरी का करीत नाहीत? असे गावोगावी भटकत जगण्यात नेमके काय सुख असते ? भटक्यांचे राष्ट्रीय नेते गेली 50 वर्षे नेमकी कसली चळवळ करताहेत? ते त्यांना व्यवसाय परिवर्तन करायला का शिकवित नाहीत? सन्मानाने जगायला का सांगत नाहीत? लाचारी, व्यसनं सोडायचा संस्कार का करीत नाहीत? त्यांचं कायमचं पुनर्वसन का करीत नाहीत? अशा अनेक प्रश्नांच्या जणूकाही फैरीच ते झाडतात.

मला वाटते हे प्रश्नच सर्वकाही स्पष्ट करतात. मुळात भटके लोक स्वखुशीने व हौसेने दरदर भटकत नाहीत. भटकणे, त्यासाठी कला कसरती दाखविणे, भिक्षा मागणे हा वर्षोंवर्षीचा  व्यवसाय म्हणून या समाजाने स्विकारला आहे. शिवाय त्याला कोणता पर्यायही उपल्ब्ध नाही. हे त्यांचे जीवन जगण्याचे साधन आहे हे नरकेंनी समजुन घेतले पाहीजे. इतर साधनांची अनुपलब्धता देखील उमजून घेतली पाहिजे. यांचा ना कोणी नेता आहे, ना कोणता राजकीय पक्ष आहे. जरी असेल तरी सर्वव्यापक नाही. भटक्यांच्या क्षेत्रात काम करणारे समाज सेवक अनेक आहेत. ते आपापल्या परिने मरमर करताहेत. पण भटक्यांच्या विमुक्तांच्या जिवनमानात खरा बदल घडवून आणायचाय तो सरकारने. तळमळ असणारे कार्यकर्ते, अभ्यासक अथवा यांचे प्रश्न मांडणारे, यांना संघटीत करणा-या लोकांना यांच्या जीवनात सकारात्मक स्थित्यंतर आणणे शक्य नाही. त्यांना ना कुठले अधिकार असतात ना कुठली आर्थिक तरतूद असते. त्यामुळे त्यांनाच हरि नरके साहेब आरोपीच्या पिंजऱ्यात का उभे करत आहेत ते कळत नाही.
जिवंत असणाऱ्यांच्या समस्या व मरणारांचे दुःख तर बाजुलाच राहीले. नरकेजी हेच सांगण्यात दंग आहेत की यांचे पुरुष व्यसनी असतात, काम करत नाहीत!!! हे सांगत असताना यांची ही स्थिती का झाली? शिक्षणाबाबतीत हा समाज पिछाडीवर का आहे. याला जबाबदार कोण? पारंपरिक रोजगार बुडाल्याने ते कसे बेकार व बेरोजगार आहेत हे ते सांगत नाहीत. बहुधा हे त्यांना मान्य नसावं म्हणुन ते मान्य करीत नाहीत.
त्यांचं ते मुंबईतील गाय पुराण तर संपता संपत नाही. मात्र ते नाही केले तर ही मंडळी उपाशी मरेल हे त्यांना का समजत नाही? नंदिवाले बांधव, दत्तांच्या गाईवाले अक्षरशः रस्त्यावर आले आहेत हे त्यांना दिसत नाही? यांत्रिकीकरण व आधुनिक कायदे यांना जीवन जगण्यास अनेक अडचणी आणत आहेत. हे ते समजून घेत नाहीत? वकील पितापुत्रांचे उदाहरण तळपायाची आग मस्तकात नेहते. जर हे खरच असेल तर सरळ नाव का घेत नाहीत ते?
उपेक्षित वंचितांच्या समस्या कायम आहेत हे मान्य करतात मात्र ज्या भाषेत ते लिहीतात की, "म्हणून तर हे नेते मजेत जगताहेत. नी वंचित असे कुत्र्याच्या मौतीनं मरताहेत" हे वाचुन वाईट वाटते. वाटते जणुकाही ते जखमेवर मीठ चोळत आहेत.
मित्रांनो राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्याला, एका अभ्यासु व बुद्धीमान प्राध्यापकाला, एका कुशल साहीत्यिकाला व वक्त्याला हे शोभत नाही. हाच यांचा अभ्यास आणि हाच यांचा अनुभव का? आयतं खाण्यात, लाचारीनं जगण्यात जी मजा आहे ती कष्टात कशी असणार भाऊ? असे विचारून भटक्यांचे पारंपारिक व्यवसाय हे नरकेंना मेहनत न करता जगण्याचा, शॉर्टकट वाटावेत!! हे काम ही मंडळी हौसेने करत असल्यासारखे प्रतिप्रश्न करणे अनाकलनीय आहे.

उलट हेरंब कुलकर्णी भटक्यांचे जगणे किती विदारक आहे हे प्रामाणिकपणे मान्य करतात. भटक्यांचे पारंपरिक व्यवसाय कसे बुडाले आहेत, उदर्निवाहाची भयानक परिस्थीती कशी निर्माण झाली आहे हे ते मांडतात. भटके लोक सध्या कोणकोणते पर्यायी व्यवसाय करीत आहेत, वस्तुस्थिती किती भयावह आहे, शासन प्रशासन किती उदासीन व शोषक आहे हे विशद करतात. विकास तर सोडाच अजुन किमान माणुस म्हणून जगण्यात किती अडचणी आहेत हे ते मांडतात व अशा परिस्थितीत सरकारने व समाजाने काय करायला हवे असे उपायात्मक मतही मांडतात.
त्याचबरोबर राज्य भरातल्या भटक्यांच्या जीवनातील काही यशोगाथाही ते मांडतात. शासनाने भटक्यांच्या पालावर जावे, त्यांच्याकडे लक्ष द्यावे, निधी वाढवून द्यावा व तो पुर्णपणे खर्च करावा, भटक्या विमुक्तासाठी विशेष धोरण असावे अशी अपेक्षा व्यक्त करतात हे पाहुन असे म्हणावेसे वाटते की, व्यक्ती व्यक्तीत विचार करण्यात किती तफावत असु शकते?
या दोघांच्या अभ्यासातुन व लिखाणातुन याचा प्रत्यय येतो. हरि नरकेंचा पुर्वग्रह दुषीत द्रुष्टीकोन व हेरंब कुलकर्णींचा वास्तववादी व सहानुभूतीपुर्ण पण विशिष्ट अपेक्षा ठेवून लिहीण्याचा, मत मांडण्याचा द्रुष्टीकोन स्पष्ट दिसुन येतो. असो शेवटी काय तर जशी दृष्टी तशी सृष्टी!!

बाळासाहेब सिताराम धुमाळ.
मो. 9673945092.

No comments: